ऐसी अक्षरे लेखनस्पर्धा
आज काळजात चर्र करणारी ही बातमी वाचली. पंधरा दिवस पृथ्वी अंधःकारात जाणार म्हणजे किती प्रचंड हाहाःकार उडणार याची कल्पनाच केलेली बरी. यात दिवसांत किती चोऱ्या, बलात्कार, हाणामाऱ्या, खूनखराबा, ट्रोलिंग, असे गुन्हे घडतील याच्या कल्पनेनेच जीव घाबरून उठला. पावसाच्या आणि माँसान्टोच्या लहरीपणामुळे आधीच गांजलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकं घेता येणार नाहीत, ऑफिसात जाणाऱ्या, एसीत, गुबगुबीत खुर्चीत बसणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्यांचा दिनक्रम पार पाडता येणार नाही, त्यामुळे फेसबुकवरच्या चर्चांनी जी वैचारिक घूसळण होऊन त्यात जी माणिकमोती निघतात त्यांनाही आपण मुकणार. पंधरा दिवस पोरं घरात बघून आया पकणार, नशीबाने मॅगीवरचा बॅन तरी तात्पुरता उठला आहे. 'अच्छे दिनां'ची अपेक्षा करणाऱ्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना हे 'काले दिन' का बघावे लागावेत. शिवाय जुलै-ऑगस्टात लोकसंख्या महामूर वाढेल ते निराळंच. या सगळ्याची योग्य वेळेस मानसिक तयारी करून देणाऱ्या 'तरुण भारत'चे पळीपंचपात्रीभर आभार.
लेखनस्पर्धेचा विषय आणि नियम-
- सरकारी, प्रशासन आणि व्यक्तिगत पातळीवर काय पावलं उचलली जावीत, या अपघटनेचे वर वर्णन केले आहे ते वगळता आणखी किती आणि कसे गैरपरिणाम होतील याबद्दल डिस्टोपिक निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
- प्रस्थापित सिक्यूलर मिडीया या दुर्घटनेकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्यांची कानउघाडणी कशी करावी याबद्दल उपाय सुचवणे.
- कृपया सकारात्मकतेला पूर्णपणे फाट्यावर मारून आपला कीबोर्ड मोकळा सोडावा. शब्दमर्यादा - २००, अक्षरी दोनशे.
- विजेत्यांना पंधरा दिवस पुरतील इतक्या मेणबत्त्या दिल्या जातील.
- काड्यांची व्यवस्था आपली आपण करायची आहे.
प्रतिक्रिया
..
काही दिवस आधी लोक फळे, चीझ, पाव, वाईन, कोल्ड कॉफी, ज्युसेस चा साठा करु लागल्याने त्यांची टंचाई निर्माण होइल.
अंधारमय काळात सर्व तुरुंगांमध्ये बंड होऊन कैदी बेलगाम, मुक्त सुटतील व सुव्यवस्था ढासळेल.
दुकाने लुटली जातीलच पण देवळांमधील देवांचे दागीने ही त्यातून सुटणार नाहीत.
अँक्झायटी, डिप्रेशन वगैरे मानसिक आजारांवर मिळणार्या औषधांचा पुरेसा साठा नसेल तर रुग्णांची स्थिती बिकट होइल.
पशु-पक्षी, फुलझाडे मरतील.
पण २ दिवसात लोकांची नजर अंधाराला सरावेल आणि मग काही जुजबी व्यापार सुरु होतील.
बंड होऊन कैदी बेलगाम
बेलगाॅम महाॅराॅष्ट्राॅत नाॅही, त्याॅचाॅ सूड क्काॅ?
(No subject)
महाराष्ट्रात बेलगाम नाही?
महाराष्ट्रात बेलगाम नाही? अभ्यास वाढवा. (हे वाक्य धनंजयला ऐकवताना कसं गारगार वाटतंय.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रात्र आरंभ
---------------------
दि. ३० नोव्हेंबर २०१५
अग्रलेख.
संपूर्ण मानवतेला काळीमा फासणार्या काळ्याकुट्ट काळरात्रीचा अर्थात अॅस्ट्रोनॉमिकल इयरचा आरंभ १५ नोव्हेंबरला झाला हे आता सर्वमान्य झाले आहे. तरूण भारतने शर्थीच्या प्रयत्नांनी ही बातमी स्पेशल फाँट मागवून पहिल्या पानावर छापण्याचे धैर्य दाखवले, हेही तुम्हाला माहितीच असेल. पण स्वत:ला पुरोगामी, विज्ञानवादी समजणार्या ह्या नरपुंगवांनी आणि मादीपुंगवींनी इथे जर आधीच लक्ष दिले असते, तर हा मजकूर "श्री दत्तत्रय चायनीज स्टॉल"मधे बसून एका मिणमिणत्या मेणबत्तीच्या छायेखाली लिहिण्याची वेळ आम्हावर येती ना. असो.
१५ दिवसांच्या ह्या भीषण काळरात्रीचे तपशील उद्या उजाडल्यावर बाहेर येतीलच- गेल्या पंधरा दिवसातल्या कत्तली, बलात्कार, लूट, खून तर आपण जाणताच!
पण-
चुकून लागलेले असंख्य राँग नंबर, अंगप्रत्यंग ठेचकाळून उद्भवलेले अपघात, चश्म्यासकट बाहेर पडूनही धडपडलेली वटवाघळं, झालंच तर तेवढ्यातल्या तेवढ्यात काँडम्सच्या, खिडकीच्या पडद्यांच्या, Noise cancelling headphonesच्या गगनाला भिडलेल्या किमती, चावट चित्रपटांचा तुटवडा, मोबाईलच्या प्रकाशाच्या जोरावर संडासात गेलेल्या धाडसी लोकांवर ओढावलेले प्रसंग, टी.व्ही बंद पडल्याने बोंबलणार्या आज्जी-आजोबांचा सामूहिक आक्रोश, पूर्णवेळ किचनमधे मिशा फेंदारून वावरणार्या झुरळांसोबतच स्वयंपाक करणार्या बायकांच्या किंकाळ्या, सदासर्वकाळ लपाछुपी खेळणार्या मुलांचा भयाकारी कोलाहल, भोकं पडलेल्या चट्टेरी चड्ड्या आणि बनियानं घालून फिरणारे नागरिक बघून वेड लागलेले लोक, गायत्रीमंत्राचा अविरत जप करणार्या साधकांवर सनगॉगल्स फेकून झालेले अत्याचार, गुरख्यांची न परवडणारी पॅकेजेस,
मेणबत्तीच्या डागांत वाहून गेलेला बराचसा मजकूरह्या सगळ्याला जबाबदार कोण?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हाहाहा झकास.
हाहाहा झकास.
सॉलिड!!!
(No subject)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बाकी सगळं ठीकच आहे. पण
बाकी सगळं ठीकच आहे. पण मादीपुंगवी?
अस्वलांच्या भाषेपासून प्रेरणा घेत मानवी भाषेत ही अभूतपूर्व भर घातल्याबद्दल अस्वलरावांना जिवंत वाळवीचं एक वारूळ (एक तरणीबांड राणी आणि तिच्या १३ लाख ७६ हजार ३९६ कामकरी वाळव्या आणि ९८७ सैनिकिणी) आणि दीड किलोचं ताजं सोनेरी मधाचं पोळं (हळू, मध गळतोय. सांभाळून. इथे सगळं चिकट कराल.) भेट देण्यात येत आहे. तरी वाळवी ना वाळवीचा पंख म्हणून या अल्पशा कृतज्ञ भेटीचा स्वीकार करावा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१११११११११११११
अगदी असेच. मादीपुंगवीसाठी पेश्शल लाईकले.
तदुपरि इतक्या मधाळ भेटीत मिशीला लावावयाच्या तुपाकडे झालेले दुर्लक्षही नजरेस आणून देऊ इच्छितो. तस्मात आमच्याकडून एक किलोभर घृतस्तंभ अर्थात तूप का खंबा भेट देण्यात येत आहे. (बेरी आवडत असेल तर बेरीसकट)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेजस्वी पत्रकारिता करणार्या
तेजस्वी पत्रकारिता करणार्या तरूण भारतच्या संपादकाचे शब्द आहेत ते..
पण मध, वाळवी, तूप का खंबा झालंच तर राणी त्या सैनिकिणी :love: ... भेटींबद्दल धन्यवाद!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मिशा
पूर्णवेळ किचनमधे मिशा फेंदारून वावरणार्या झुरळांसोबतच स्वयंपाक करणार्या बायकांच्या किंकाळ्या
........हे वाक्य मी
'पूर्णवेळ किचनमधे मिशा फेंदारून, वावरणार्या झुरळांसोबतच स्वयंपाक करणार्या बायकांच्या किंकाळ्या'
असं नकळत वाचून नि डोळ्यांसमोर तशी चित्रं येऊन बराच वेळ हसत बसलो होतो. तेव्हा तो एक स्वल्पविराम झुरळानं लंपास केला असावा असं गृहित धरतो आहे.
पण वीज जाणार्व का नुसता
पण वीज जाणार्व का नुसता सूर्य?
काही महिने सूर्य जाणार असेल तर ठीक, जमवून घेऊ कसंबसं.. वीज जाणार असेल तर टिव्ही नाही!!!!! बापरे, वेगळ्या ग्रहावर रहायला जाऊया बॉ!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बारुदी सन २७९३ ची
बारुदी सन २७९३ ची भूगर्भशास्त्रज्ञांची कॉन्फरन्स चालू होती. विशेष प्रवक्ता म्हणून कोर्डालू प्रोमालनचं भाषण सुरू होणार होतं. काहीतरी स्फोटक, विचारप्रवर्तक मांडणी होणार अशी कुजबुज झालेली असल्यामुळे सभागृह खचाखच भरलेलं होतं. त्यातल्या अनेकांनी त्याच्या ग्रॅज्युएट स्टुडंट्सना बीअर वगैरे पाजून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्यांनाही कोर्डालूची भीती असल्यामुळे 'चक्रीय इतिहासाविषयी काहीतरी आहे आणि पहिल्या संस्कृतीचा संबंध त्यात आहे.' इतकीच माहिती दिली होती. ज्या पद्धतीने त्यांनी ती माहिती दिली त्यावरून चक्रीय इतिहासाचा प्रश्न सुटलेला आहे असा तर्क अनेकांनी बांधला. त्यामुळे अनेक इतिहासाच्या प्रोफेसरांनीदेखील आपल्या दुर्मिळ ग्रांटचे बहुमूल्य पैसे खर्च करून रातोरात प्रवास करत कॉन्फरन्सला हजेरी लावलेली होती. प्रोफेसर प्रोमालन काय म्हणतात याकडे त्यांचे कान लागून राहिले होते.
"चक्रीय इतिहास..." एवढंच बोलून त्याने श्रोत्यांकडे नजर फिरवली. आख्ख्या सभागृहाने अपेक्षेने श्वास घेतल्याचा, आणि रोखून धरल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला, आणि त्याने समाधानाने स्वतःशीच स्मित केलं. "आत्तापर्यंत न सुटलेला प्रश्न! आपणा सर्वांनाच तो प्रश्न सोडवण्याची आणि त्यातून आपलं येत्या पंचवीस वर्षांत काय भवितव्य आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे. पण आत्तापर्यंत आपल्या प्रयत्नांना बिलकुल यश आलेलं नाही." प्रोफेसर प्रोमालनच्या चेहेऱ्यावर जे अस्फुट स्मित उमटलं त्यावरून अनेकांची खात्री पटली की उत्तर सापडलं आहे. मग पुढची पंधरा मिनिटं प्रोमालनने माहीत असलेलाच प्रश्न तपशीलवार मांडताना त्यांची उत्सुकता अर्थातच ताणली गेली. हो, दर दहा लाख वर्षांनी मनुष्यजात नष्ट होते. उत्खननात सर्व जगभर या गेल्या सात संस्कृतींचा विकास आणि ज्ञाताच्या उच्चतम पातळीला गेल्याच्या खुणा दिसतात. त्यानंतर अचानक सगळं जाळपोळीत नष्ट होऊन जातं. मग मनुष्यजात पुन्हा एकदा सुरूवात करते, टोळ्यांमधून राहाते, शेती विसरून जाते. हळूहळू करत पुन्हा ज्ञान मिळवते, स्वतःविषयी काही आशा निर्माण करते. आणि अचानक बरोब्बर दहा लाख वर्षांनी जगभर स्वतःचा विनाश करते. आपल्या संस्कृतीनेही अशीच सुरूवात केली. त्यावेळपासून आजपर्यंत नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे पंचवीस वर्षं झाली आहेत. पंचवीस वर्षांनी आपलीही अशीच परिस्थिती होणार? या चक्राचा अंत आहे का? काही हेतू आहे का? ही सगळी सर्वज्ञात मांडणी प्रोफेसर प्रोमालननी पुन्हा एकदा केली.
"या चक्रीय इतिहासाचं गूढ कोणालाच उलगडलं नव्हतं. निदान आत्तापर्यंत तरी असा समज होता." पुन्हा एक काही क्षणांचा विराम. समुदायाची उत्सुकता शिगेला पोचलेली... त्याच क्षणी एक जीर्ण कागदाच्या तुकड्याची प्रतिमा स्क्रीनवर झळकली. "नुकत्याच हाती लागलेला हा पुरावा. आश्चर्याची गोष्ट अशी की सर्वात मागास समजल्या गेलेल्या पहिल्या संस्कृतीतला हा कागद आहे. एका तत्कालीन वर्तमानपत्राचा पहिल्या पानावरचा मथळा." लोक आ वासून त्या अगम्य प्रतिमेकडे पाहात होते. त्यात नक्की काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच इच्छा होती.
"पहिल्या संस्कृतीचा अभ्यास आज फार लोक करत नाहीत. पण आम्ही तो चालू ठेवला. त्यांच्या तत्कालीन भाषा, लेखनपद्धती, उच्चार यांचा एक मोठा डेटाबेस तयार केला. त्यावरून असं लक्षात येतं की ही 'युवक भरत्भूमी' नावाच्या, किंवा तत्सम अर्थाच्या नावाच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. त्यात असं स्पष्ट लिहिलेलं आहे की दर दहा लाख वर्षांनी आपला ग्रह, ज्याला त्यांच्या भाषेत पृथ्वी असं नाव होतं, अंधःकारात लोटला जातो. या घटनेला त्यांनी ज्योतिर्विदीय वर्ष असं संबोधलं होतं. ते अज्ञानी नसून प्रचंड ज्ञानी होते हे यावरून सिद्धच होतं. कारण त्यांना ही घटना आधीही घडलेली आहे याची कल्पना होती. मात्र त्यानंतरच्या सात चक्रांमध्ये हे ज्ञान लोप पावलं. आणि तरीही आपण स्वतःला सर्वात प्रगत आणि ज्ञानी समजतो... "
प्रोमालनच्या भाषणाचा प्रचंड परिणाम सर्वांवरती झाला होता. त्यांचे फोटो, स्वाक्षऱ्या घ्यायला, त्यांची मुलाखत घ्यायला शेकडो लोक जमले होते. मात्र त्यांपैकी कोणालाच संधी मिळाली नाही. मंचावर अचानक अनेक काळ्या कोटातली काही माणसं आली. त्यांनी काही विनंती करण्याचीही गरज पडू नये इतकी सामान्य जनतेला त्या युनिफॉर्मची दहशत होती. लोकं पांगली. अत्यंत अदबीने आणि जरबीने प्रोमालनना एका प्रशस्त काळ्या गाडीत बसवलं गेलं.
एका आकार-रंगहीन खोलीत प्रोमालन बसले होते. समोर काळ्या कोटातला एक धारदार नजरेचा अधिकारी, हातात काही कागदपत्रं चाळत बसलेला...
"हम्म्म... तुमच्या आजपर्यंतच्या इतिहासात काहीच बोट ठेवण्यासारखं नाही... सुंदेडर युनिव्हर्सिटीतून डिग्री... तिथेच भूगर्भशास्त्रात डॉक्टरेट मग पॉंटरूलूमध्ये प्रोफेसरशिप... रीसर्च... गरबोट मेडल..." फायली बंद करून त्याने एक सुस्कारा सोडला. आणि शांतपणे खालून नजर उचलत प्रोमालनच्या नजरेला भिडवली.
"का प्रोफेसर? आजच अचानक तुम्हाला काय झालं?"
"काय झालं म्हणजे? गेली दोन वर्षं आमचा हा रीसर्च चालू आहे."
"ते माहीत आहे आम्हाला. आमचं सगळीकडे लक्ष असतं." किंचित स्मिताची रेषा स्वतःच्या चेहेऱ्यावर येऊ देत तो अधिकारी म्हणाला.
"पण यापुढे हा रीसर्च चालणं शक्य नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेलच."
"मी काहीही गुन्हा केलेला नाही. मी शोधलेलं सगळं सत्य आहे. बरोब्बर पंचवीस वर्षांनी आपल्यालाही या ज्योतिर्विदीय वर्षांतून जावं लागणार"
"म्हणजे तुम्ही बोलत असलेल्या या चक्रम प्रकारावर तुमचाही विश्वास आहे तर. हम्म्म... मला वाटलं होतं त्यापेक्षा ही केस कठीण आहे तर."
"कठीण केस? माझा दोन वर्षांचा अभ्यास आहे याच विषयावर. आणि त्याआधीची बावीस वर्षं एकंदरीत भूगर्भीय इतिहासावर. "
"म्हणूनच तर मी कठीण केस म्हणतो आहे. दुसरं कोणी असतं तर त्याच्यावर अविश्वास उत्पन्न करणं सोपं गेलं असतं"
काही काळ दोघेही शांत होते. काळ्या कोटातल्या अधिकाऱ्याने फायली पुन्हा चाळल्या.
"ही राजवट गेली दीडशे वर्षं टिकलेली आहे. पंचवीस वर्षांत ती राजवटच नाही, तर आख्खी पृथ्वीच नाहीशी होईल असा विश्वास पसरू देणं राजवटीसाठी भल्याचं नाही"
"पण आपल्याला तयार व्हायला पाहिजे. आधीच्या सात संस्कृती खाक झाल्या. चौथ्या संस्कृतीने तर आपल्याही पुढची मजल गाठली होती. पण तीही नाहीशी झाली. आपण तर..."
"म्हणूनच ही बातमी कुठे बाहेर पडणार नाही याची व्यवस्था करायला हवी. या राजवटीला ज्योतिर्विदीय वर्ष का काय म्हणता त्याचा धोका नसून तुमच्यासारख्या भीती पसरवणारांचा आहे."
"मग काय करणाराहात तुम्ही?"
"महत्त्वाच्या लोकांना... आमच्या नजरेखाली ठेवायचं. आणि बिनमहत्त्वाचे लोक... ते कदाचित हरवून जातील." त्या अधिकाऱ्याने डोळे बारीक करत प्रोफेसरांकडे पाहिलं. "आणि पुढची पंचवीस वर्षं तयारी करायची."
ती भेट लवकरच संपली. प्रोमालनना माहीत होतं की त्यांच्या स्वतःच्या जिवाला धोका नाही. पण कॉन्फरन्सला आलेले बहुतेक सर्वजण लवकरच हरवून जाणार होते. त्यांच्यापैकी कोणी जर वर्तमानपत्रांना कळवून मुलाखती वगैरे दिल्या असतील तर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विशेष ट्रीटमेंट मिळणार होती. वर्तमानपत्रं तशी आतून सरकारच्या मालकीचीच होती. केव्हाही, कधीही, कोणीही हरवून जाण्याची शक्यता असल्यामुळे नियंत्रण तसंही सोपंच होतं. नियंत्रण झालं नाही तर गरज पडेल तेव्हा इतिहास बदलून टाकणंही सोपं नसलं तरी शक्य होतं. प्रोमालन खिन्नपणे बसले होते. लवकरच त्यांना एक खालच्या दर्जाचा अधिकारी येऊन घेऊन गेला. ती खोली छोटीशीच होती. कोणी काही म्हणालं नाही, पण आता पुढची पंचवीस वर्षं त्यांचं ते घर असणार होतं, हे त्यांना कळून चुकलं होतं.
भेट संपली तेव्हा तो अधिकारी खोलीतून बाहेर पडता पडता परत आला होता. प्रोमालनच्या जवळ जाऊन वाकून त्याने विचारलं होतं... "प्रोफेसर, तुम्ही आमच्याकडे का नाही आलात आधी? आम्हालाही गरज होती तुमची. तुम्ही म्हणता तशी जर पंचवीस वर्षांत पृथ्वी जळून खाक होणार असेल तर... तर ते टाळायची आमचीही इच्छा आहे. त्याशिवाय राजवट पुढे कशी टिकणार?" काही क्षण त्याने प्रोमालनकडे रोखून पाहिलं होतं. आणि निर्णय झाल्याप्रमाणे झपाट्याने मान वळवून तो निघून गेला होता.
आता प्रोमेलन त्या खोलीत एकटाच होता. पंचवीस वर्षांनंतर येणाऱ्या काळरात्रीपासून अलिप्त.
आवडली कथा. एकदम रोचक आहे.
आवडली कथा. एकदम रोचक आहे.
बारुदी २७९३
बारुदी २७९३ ,आवडली.
))डिस्टोपिक निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आलेली आह))---???डिस्टोपिक?आगामी {आणि बहुतेक वाइट } भाकीतावर आधारीत?
dystopia - an imaginary place
dystopia - an imaginary place where people lead dehumanized and often fearful lives
भीतीपोटी लोकांना सारासार विचार करता येत नाही; निष्कारण जोखण्याच्या भाषेत बोलायचं तर लोक डोक्यावर पडल्यासारखे वागतात. या धाग्यात आलेले प्रतिसाद असेच, डोक्यावर पडल्यासारखे, असावेत अशी अपेक्षा होती. (ती पूर्ण होत्ये हे दिसत आहेच.) असाही अर्थ लावता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोकसत्ता अग्रलेख
३० नोव्हेंबर
'रात्र काळी घागर काळी'
आम्ही ११ ऑगस्ट २०१५ रोजी सांगितल्यानुसार १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात पृथ्वी अंधारात राहिली. वास्तविक या बातमीवर सर्वप्रथम शिक्कामोर्तब केले ते 'नासा' या अमेरिकी संस्थेने. आता ही संस्था जरी अमेरिकी असली तरी त्यात प्रामुख्याने भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ काम करतात. आपली व्यवस्था कमअस्सलांनाच डोक्यावर घेत असल्याने खऱ्या प्रज्ञावंतांना बाहेरची वाट धरावी लागते आणि यामागची कारणपरंपरा सर्वांना माहीत असली तरी त्यावर यानिमित्ताने मल्लीनाथी करणे हे आमचे कर्तव्य आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळूनही संपूर्ण पृथ्वी अंधारात कधी राहणार याची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला पश्चिमेची वाट पहावी लागते हे आपल्या गेल्या ७० वर्षाच्या लाजिरवाण्या राजकीय व्यवस्थेचे प्रतीक आहे. 'नासा'मध्ये काम करणारे बहुसंख्य भारतीय हे आयआयटी आणि आयआयएम सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमधून शिकलेले आहेत परंतु आपल्या विद्यमान सरकामधील मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री विदुषी स्मृती इराणी आयआयटीचे सरकारीकरण करू पाहत आहेत. 'मेक इन इंडिया' आणि 'स्टार्टप इंडिया, स्टॅँडप इंडिया' सारख्या फुकाच्या पोकळ घोषणा देणारे मोदी याकडे दुर्लक्ष करत आहेत याची आठवण करुन दिली तर ते मोदींच्या भक्तांना आवडणार नाही. गेल्या १५ दिवसाच्या अंधारपर्वामध्ये प्रकाशव्यवस्थेसाठी वापरल्या गेलेल्या मेणबत्त्याही आपण चीनमधून आयात केलेल्या आहेत. आपल्या सरकारचा भिकार दृष्टिकोण आणि गुणवत्तेस रोखणारी तितकीच भिकार सामाजिक, राजकीय कारणे यांमुळे भारतीय तरुणांनी अमेरिकेचा रस्ता धरला, तर किमान दर्जाही न पाळणाऱ्या आपल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे भारतातील ग्राहकांनी चीनी उत्पादनांना आश्रय दिला. यानिमित्ताने भारतातील उत्पादित मेणबत्त्यांच्या दर्जाविषयीही काही प्रश्न निर्माण झाले त्याकडे आम्ही सोडून सर्वांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलेच आहे.
तेव्हा राष्ट्राभिमान आदी मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा आपण आपल्या दर्जाबाबत अधिक सजग आणि सक्षम होणे गरजेचे आहे. अन्यथा पृथ्वी केव्हा अंधारात राहणार या नासाच्या रात्रीसोबत चीनी मेणबत्त्यांची घागरही काळी राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
रिकामा बैल
अस्वलाला वाळवीचं वारूळ मिळणार असेल तर अतिशहाण्याला रिकामा बैल दिला पाहिजे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बेश्ट!
अग्रलेख आवडलाच, पण शेवट खुद्द कुबेरांनीच लिहिल्यासारखा झालाय.. जियो!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हाहाहा
हाहाहा
परग्रहमानवांचा इशारा: 'अच्छॆ दिन नहीं,अंधॆरॆ दिन'
जगविख्यात अंतराळ शॊध संस्था 'नासा' कडून अुपलबध झालॆल्या ताज्या वृत्ताप्रमाणॆ पृथवीवर नॊव्हॆंबर महिन्यात पंधरा दिवस सलग अंधार पडणार अाहॆ. तथाकथित 'ॲस्ट्रॊनॲामिकल इयर' चा हा परिणाम असलयाचं सांगितलं जातंय. अॆक लक्ष वर्षांनी ही घटना घडतॆ असं खगॊलशास्त्र्यांचॆ म्हणणॆ अाहॆ. जनतॆनॆ खगॊलीय रॊषाच्या भीतीपॊटी बाजारॆ रिती करण्यास सुरुवात कॆली अाहॆ. सर्वत्र या अलाैकिक बातमी नॆ खळबळ माजवली अाहॆ.
पण तुमच्या अावडत्या व महाराष्ट्रात अव्वल असलॆल्या या वृत्तपत्राला काही गुप्त सुत्रांकडून एक अतिशय धक्कादायक सत्याचा पत्ता लागला अाहॆ.
'अच्छॆ दिन अानॆ वालॆ हेॆॆें' अशी गर्जना करीत जवळजवळ 15 महिन्यांअाधी दिल्लीच्या गादीवर अालॆलॆ प्रंतप्रधान नरॆन्द्र मॊदी यांच्या प्रंतप्रधान कार्यालयाला 'वॊगॲान' नावाच्या परग्रहवासींनी गतवर्शीच अशी कल्पना दिलॆली अाढळतॆ. अवकाशात राजमार्ग बनविणयाकरिता तुमच्या सूर्यमाण्डळाचॆ अधिग्रहण कॆलॆ जाईल, अशा शब्दांत प्रंतप्रधान कार्यालयाला पत्र पॊहॊचविलॆ गॆलॆ हॊतॆ. अाणि मॊदींच्या परदॆश यात्रा या जगभरातील राष्ट्रांचॆ मत वळविण्याकरिता हॊत्या, हॆसुद्धा तुमच्या अावडत्या (व महाराष्ट्रात अव्वल असलॆल्या) या वृत्तपत्राला कळलॆ अाहॆ.
बातमी इथवरच थांबत नाही. मॊदींची अमॆरिका यात्रा ही अधिग्रहणासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता हॊती, असॆ सुद्धा कळलॆ अाहॆ. अमॆरिकॆतील वाळवाण्टातील कुख्यात 'अॆरिया 51' यॆथॆ असा करार करण्यात अाला हॊता की राममंदिराकरिता पुरॆशी जागा शिल्लक ठॆवल्यास भारतात भूमी अधिग्रहण विधॆयक पारित करून मॊकळी कॆलॆली जमीन वॊगॲान सरकारला सुपूर्द कॆली जाईल, अशी बाब उघडकीला अाली अाहॆ.
काॅंग्रॆसचॆ उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नॆमक्या याच कारणावारून पृथ्वीवर भूमी अधिग्रहण विधॆयकाचा इतका कडवा विरॊध कॆलॆला दिसतॊ. 'सूटबूट परिधान करणारॆ अंतराळमानवच या राजमार्गाचा उपयॊग करतील' अशी घॊषणा दॆत राहुल गांधींनी दिल्लीची संसद गाजविली. ही गर्जना पृथ्वीच काय, तर मंगळ व गुरू ग्रहांपर्यान्त पॊहॊचली, परन्तु मॊदीभक्तीत गुंग असलॆल्या अापल्या संचारमाध्यामांना मात्र काही याची नॊंद घ्यावीशी वाटली नाही.
सूत्रांकडून मिळालॆल्या बातमीप्रमाणॆ जरी मॊध्यम (माध्यम) याची दखल घॆण्याकरिता अत्याधिक व्यस्त असलॆ, तरी तरूण वयाच्या उकळत्या रक्ताचा दरारा सूर्यमंडळाला भॆदून टाकणारा हॊता. राहुल गांधींची ही सिंहगर्जना कानी पडल्यावर फक्त मॊदीच काय तर वॊगॲान गणाध्यक्षांनी सुद्धा या उधाण अालॆल्या ऊर्जॆला मान दॆत हा प्रकल्प रद्द कॆला, असॆ कळलॆ अाहॆ. तसॆच वॊगॲान गणाध्यक्ष ऊ-ग्ळूमॊ-चार्रू-म्माक्स यांनी भारतीय राष्ट्रीय काॅंग्रॆस चॆ सभासदत्व स्वीकारलॆ. अखिल भारतीय काॅंग्रॆस समिति चॆ कॆन्द्रीय दफ्तर त्यांच्या ग्रहावर प्रस्थापित कॆलॆ जाईल, या गॊष्टीची दखल घ्यायला कुणाला सवडच नव्हती का काय, असॆ वाटू लागलॆ अाहॆ.
वाचकांस प्रश्न पडू शकॆल की या घटनॆचा अाणि यॆत्या 15 दिवसांच्या अंधाराचा संबंध काय ? अाम्हांला उपलब्ध झालॆल्या बातमीनुसार संसदॆतली कारवाई अडकविण्याचा प्रयत्न अपयशी झाल्यामुळॆ काॅंग्रॆसनॆ जन अांदॊलनाचा मॊठा कार्यक्रम अाखला अाहॆ. 'व्यापमं'व (ललित तसॆच नरॆन्द्र)'मॊदी' या दॊन (तीन?) प्रकरणाच्या कात्रीत भाजप ला अडकवू पाहणा-या काॅंग्रॆसनॆ 'संसद सॆ सडक सॆ सूरज तक' असा एल्गार करत शीतकाल सत्राची जय्यत तयारी कॆल्याचॆ कळतॆ अाहॆ. वॊगॲान गणाध्यक्ष व नवीन काॅंग्रॆस प्रवक्तॆ ऊ-ग्ळूमॊ-चार्रू-म्माक्स यांनी सुषमा स्वराजांचा व शिवराज चव्हाणांचा राजीनामा मागत पत्रकारांना सांगितलॆ ,"मॊदी जी गुस्सॆ की राजनीति करता हैं. श्री.राहुल गांधी जी हमकॊ समझायॆ कि गुस्सा नहीं प्यार ही हमकॊ ष्कूग्लीखातॊ (बृहस्पति) सॆ छूटने की गति दॆगा. कांग्रॆस पार्टी चाहता है कि सुषमा अाैर शिवराज जी इस्तीफा दॊ, वरना हम 15 दिन संसद ही नहीं, सडक अाैर सूरज भी नहीं चलानॆ दॆगा. हिन्दुस्तान पर अच्छॆ दिन नहीं,अंधॆरॆ दिन अाया है".
अर्थातच मॊदी सरकाराची मुख्य जवाबदारी सुषमा स्वराजांना व शिवराज चव्हाणांना पदावरून दूर करणॆ अाहॆ, नाहीतर भारतीय जनतॆला गाढान्धःकारात मासार्ध भर लॊटण्याचॆ पाप सरकारला भॊगावयास लागॆल. 'नासा' सारख्या प्रतिष्ठित संस्थॆत सत्याचॆ एवढॆ क्रूर विद्रूपीकरण कसॆ झालॆ, कॊणास ठाऊक.
दरम्यान सरकार या घडामॊडींचा पाठपुरावा कसा करतॆ, याबद्दल लॊकांत मतभॆद अाहॆत. काहींनी सावध अाशा व्यक्त कॆली अाहॆ की तॆव्हापर्यंत या दॊन व्यक्तींना पदावरून दूर कॆलॆ जाईल. इतर काहीजणांच्या मतॆ हॆ अांदॊलन सरकारला धडा शिकविण्यासाठी गरजॆचॆ अाहॆ. इहलाैकिक कारण असल्यामुळॆ साधारण जनतॆनॆ चिन्तॆऎवजी सरकारकडून जाब मागावा, असा संदॆश सर्वच विरॊधी पक्षांनी दिला अाहॆ.
या वृत्तपत्राकडून सर्वांना नम्र विनंती अाहॆ की अफवांवर विश्वास न ठॆवता सरकारला इष्ट तॆ करावयास प्रॊत्साहन द्यावॆ.
अन्न्य्या
:डया बातमीबद्दल अन्न्य्या
या बातमीबद्दल अन्न्य्या यांच्या वतीने दैनिक सुकाळ आणि त्यांचे न्यूज मॅगझिन 'न'वा काळ यांचे एक वर्षांची वर्गणी भरली जाणार आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रकरण एक: उभा दावा स्थळः 300
प्रकरण एक: उभा दावा
स्थळः 300 E St SW, Washington, DC 20546, United States
अॅडमिनिस्ट्रेटर चार्ली बोल्डन अस्वस्थपणे त्यांच्या ऑफिसात फेर्या घालत होते. छताला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं मॉडेल लटकत होतं. उंच्यापुर्या बोल्डनच्या टाळक्याची आणि सोलर अॅरेची टक्कर कधी होते आहे याची वाट पाहत डेप्युटी अॅडमिनिस्ट्रेटर दावा न्यूमन बसल्या होत्या.
"दावा!" हातातला 'तरूण भारत' हलवत बोल्डन कडाडले.
दावा न्यूमनना थोडंसं वाईट वाटलं. आता जगाच्या कोपर्यातल्या एखाद्या पेपरने काहीतरी वेडंविद्रं छापलं यात माझी काय चूक?
"..दावा मांडलाय साल्यांनी!"
हां! तो दावा वेगळाय तर. दावा न्यूमन जरा सैलावल्या.
"आपण कधी असं काही प्रसिद्ध केलं? च्यायला ..." बोल्डन धुसफुसले. "पंधरा दिवस अंधार ... अॅस्ट्रोनॉमिकल ईयर म्हणे ..."
"चार्ली.. रिलॅक्स. याच्या पाठिमागे नक्कीच कोणाचा तरी चावटपणा आहे. नाहीतर तरूण भारतसारखा पेपर असं करायचा नाही. यामागे काहीतरी कारस्थान आहे. मी सकाळीच सीआयएला फोन केला. त्यांनी भारतातल्या टॉप माणसाला आपल्या मदतीसाठी पाठवला आहे. बाहेर बसलाय, बोलावू का त्याला?"
"एसीपी प्रद्युमन नाही ना?" बोल्डन जरा चरकले.
"नाही नाही."
"अस्मिता पण नाही ना?"
"कोण अस्मिता?"
"जाऊदे.. कोण आहे ती व्यक्ती?"
"जनू शिंगरे. भारतातला सीआयएचा टॉप एजंट!"
या वाक्यासरशी जनू दार ढकलून आत आला. त्याच्या अंगावर विल्यम हंटचा सूट होता, आणि खिशात माणिकचंदची माळ होती.
"जनू!" बोल्डेन ओरडले. शिंगरेची आणि त्यांची जुनी ओळख होती.
"चार्ली! काय प्लॅन मग नोव्हेंबरचा?" जनूने मिस्किलपणे विचारलं.
"आता तू आलायस! मला काही चिंता नाही.." बोल्डेन निर्धास्तपणे म्हणाले. "आठवड्याभरात शोधून काढशील, याच्या मागे कोण आहे."
"आठवड्याभरात?" जनूने खोली पुडी. खुशबू उडी. "दोन दिवसांत!"
"डबल घे रे!" बोल्डेन आशाळभूतपणे म्हणाले. "सध्या महाग झालीय राव..."
वासाने दावा न्यूमनना मळमळायला लागलं. दोन पुरुषांना एकमेकांशी बोबडं बोबडं बोलायला सोडून त्या बाथरूमकडे धावल्या.
(टु बी कंटिन्यूड..)
प्रकरण दोनः जनू आणि यूएसए
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ठ्ठो (जनू बांडेप्रेमी)
ठ्ठो
(जनू बांडेप्रेमी) बॅटमॅन.
जुन्या आठवणी काढल्यात राव, आता हे पुस्तक मिळवणे आले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
हा हा... झकास
स्तुती तरी कितीदा करायची
स्तुती तरी कितीदा करायची तुझी? ते काही नाही, लवकर पुढचा भाग येऊ द्या.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
डुप्रकाटाआ
डुप्रकाटाआ
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
झकास. पुढचा भाग लवकर येऊ
झकास. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
कुबेरछाप अग्रलेख,अच्छे दिन
कुबेरछाप अग्रलेख,अच्छे दिन जरा कंटाळवाणे.जनू पुढे तरूण भारतात कोणत्या तरुणीस भेटतो?"stirred but not shaken "मराठीत कोणत्या लोणच्याच्या बरणीत बसवतो यावर बाळसुलभ उत्सुकता आहे.
अवांतर - 'तरुण भारत'च्या चळचळ
अवांतर - 'तरुण भारत'च्या चळचळ उत्साहाचा स्रोत सापडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.