आध्यात्मिकता
आध्यात्मिकतेची (spiritualism) खरोखरच गरज आहे का?
आज काल 'माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विश्वास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेत(spiritualism) रुची आहे' असे सार्वजनिकरित्या विधान करणार्यांची संख्या दिवसे न दिवस वाढत आहे. जणू काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे पेवच फुटले आहे. त्यांच्या मते प्रत्येकाला आपले समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक शहाणपणाची (spiritual intelligence) गरज असून विद्यार्थ्यांना अगदी लहानपणापासूनच ते शिकवायला हवे. काही वर्षापूर्वी emotional intelligence ची हवा होती व आता त्याची जागा आध्यात्मिक शहाणपण घेवू पाहत आहे.
मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबऴ, तकलादू अशी संकल्पना आहे. त्याची शाब्दिक फोड केल्यास ऐहिकतेच्या विरोधातील ही संकल्पना आहे, हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिकता ही वास्तवातील भौतिकतेपेक्षा वेगळे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हेही लक्षात येईल. विज्ञानातील नियम, तत्व, सिद्धांत याव्यतिरिक्त या जगात इंद्रियजन्य अनुभवाच्या पलिकडे कित्येक - आत्मा, चेतना, अलौकिकशक्ती, अतिंद्रीय शक्ती, इ.इ .- गोष्टी असून त्यांची जाणीव ठेवल्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होत राहील असा तर्क त्यामागे असण्याची शक्यता आहे. ध्यान, योग, एकांत, प्राणायाम इत्यादीद्वारे मानसिक समाधान मिळू शकते, माणूस चिंतामुक्त होवू शकतो यावर येथे भर दिला जातो. आधुनिक तत्वज्ञ व वैज्ञानिक यांना मात्र आध्यात्मिकता ही एक ऐतिहासिककालीन कालबाह्य व निरुपयोगी अशी एक संकल्पना आहे, असे वाटते.
आपल्यातील काही जणांना आध्यात्मिकतेच्या रूढ अन्वयार्थाऐवजी आयुष्याला आकार देणारे जीवनमूल्य म्हणून त्याकडे पाहावे असे वाटते. आपल्या सुखी व समाधानी आयुष्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व त्यासाठी पैसा-संपत्तीची ओढ असावी लागते. त्याच बरोबर सौंदर्य, प्रेम, सहानुभूती यांची अनुभूती घेणेसुद्दा गरजेचे असते. निसर्गातील विविधतेकडे, चमत्कारसदृश घटनेकडे विस्मित दृष्टीने बघण्याचीही गरज असते. याप्रकारच्या गोष्टींचे स्पष्टीकरण विज्ञानाच्या आवाक्याबाहेरच्या असल्यामुळे व यासाठीच्या ऐहिक दृष्टिकोनात हिशोबीपणा असल्यामुळे आध्यात्मिकतेला जीवनमूल्य म्हणून स्वीकारायला हवे, असे त्यांना वाटते. परंतु सौंदर्य, प्रेम, आश्चर्य, इत्यादीसाठी आध्यात्मिकता हा शब्दप्रयोग योग्य ठरेल का? मुळात अध्यात्माची भलावण करणारे कुठल्या हेतूने हा शब्द वापरतात याचा नेमका अंदाज येत नाही. या भौतिक जगाच्या पलिकडे काही अज्ञात गोष्टी असून त्यांचा मागोवा घेणे हेच त्यांना अपेक्षित असल्यास आध्यात्मिकता धर्मव्यवहाराच्या जवळ जाणारी संकल्पना ठरेल. धर्म म्हटले की श्रद्धा. ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य. चिकित्सा न करण्याची अट. त्यामुळे आध्यात्मिकतेसाठीसुद्धा श्रद्धेची गरज आहे, असा निष्कर्ष काढावा लागेल. हेच जर खरे असल्यास अशा प्रकारे आडवळणाने सांगण्याची गरज नाही. शब्दांचा घोळ घेलण्यात अर्थ नाही. सरमिसळ करणार्या कसरतीची गरज नाही.
म्हणूनच हा शब्दप्रयोग धार्मिकांच्याच शब्दकोशातच राहू दे, असे म्हणावे लागेल. या प्रकारचा धूसर शब्द प्रेम, आश्चर्य, सौंदर्य इत्यादी जीवनमूल्यांसाठी न वापरता यासाठी वेगळाच कुठलातरी योग्य शब्द रचना शोधण्याची गरज आहे. या ऐहिक जगातच आपण समृद्ध जीवन जगू शकतो, याला पुष्टी न देणारे कुठलेही विधान स्वीकारार्ह नाही हे लक्षात घ्यायला हवे.
आपल्या आयुष्यात कमतरता असून ही कमतरता भरून काढण्यासाठी आध्यात्मिकतेला शरण जायला हवे अशी समजूत असल्यास त्यासाठी कुठून सुरुवात करावी व नेमके काय काय करायला हवे या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. एके काळी आध्यात्मिक व ऐहिक या संकल्पना स्पष्ट होत्या. त्यांना समजून घेण्यासाठी कष्ट पडत नव्हते. त्या एकमेकाच्या विरोधात आहेत याची पूर्ण कल्पना होती. आध्यात्मिकतेकडे ओढा असणार्यांनी अंतर्मनाचा वेध घेत घेत, सर्वसंगपरित्याग करून परमेश्वरापाशी पोचण्याची अनुभूती प्राप्त करून घेणे व परब्रह्माशी विलीन होणे यावर भर दिला जात असे. स्वत:चे अस्तित्व आणि ऐहिक सुखाना नाकारणे म्हणजेच आध्यात्मिकता असे समजले जात असे.
परंतु आता हे सर्व बदलत आहे. आध्यात्मिक बुवाबाजीचे प्रस्त वाढत आहे. पूर्वीच्या आध्यात्मिकतेला नवीन साज चढवून विकृत स्वरूपात त्याची मांडणी केली जात आहे. सुखोपभोगाशी हात मिळवणी करत आध्यात्मिकता पुढे जात आहे. एकांतासाठी आता जंगलात जाण्याची गरज नाही. पंचतारांकित सोई - सुविधा असलेल्या एखाद्या थंड हवेच्या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये वास्तव्य करण्यात काही गैर नाही, असे या आधुनिक आध्यात्मिक बुवा, महाराज, बाबाना वाटत आहे. आध्यात्मिकता म्हणजे ध्यान व योग. या व्यतिरिक्त काहीही नाही, ही मानसिकता रूढ होत आहे. योगाचा वापर आरोग्य व विश्रांतीसाठी मुख्यत्वे होत आहे.
एका दृष्टीने आध्यात्मिकतेतील अशा प्रकारचा बदल व त्याची ऐहिकतेच्या जवळ जाणारी लवचिकता स्वागतार्ह आहे. आपण हाडामांसाची माणसं आहोत. त्यामुळे या गोष्टीत आध्यात्मिकता आहे की नाही याची चर्चा करत बसण्यापेक्षा अशा प्रकारची आध्यात्मिकता मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावते, ही गोष्ट खरोखरच स्पृहणीय ठरेल. परंतु ऐहिकतेचाच विचार करत राहणे हा माणसाचा आदिम स्वभाव असून त्यात सौंदर्यानुभवासारख्या गोष्टी नसल्यास त्या आक्षेपार्ह आहेत, असे अनेकांचा आक्षेप आहे. ऐहिक गरजा पूर्ण झाल्या तरी माणसात कुठे तरी असमाधानाची, अपूर्णतेची भावना असते. पूर्वीच्या काळची अध्यात्मिक संकल्पना त्यासाठी व त्याकाळी नक्किच उपयोगी पडली असावी. पारलौकिकतेचे गाजर पुढे करून माणसावर भुरळ पाडली असावी.
सुखोपभोगाच्या पलिकडे जाण्यासाठी पारलौकिकतेला शरण जायला हवे, यात तथ्य नाही. त्याऐवजी आपल्या अंतर्मनाला समाधान देवू शकणार्या गोष्टीत मन गुंतवून ठेवणे हाही एक (सोपा) मार्ग असू शकेल. आपल्या संवेदनांना अत्युच्च पातळीवर नेवू शकणार्या कला, साहित्य, संगीत, निसर्गाशी जवळीक वा इतर तत्सम प्रकारात मन गुंतवल्यामुळे आपले जीवन नक्कीच समृद्ध होऊ शकेल. ही समृद्धी, आध्यात्मिकवादी सांगतात त्याप्रमाणे, केवळ ध्यानधारणा वा योग-प्राणायाम यातूनच येऊ शकते याला कुठलाही आधार नाही. त्यामुळे अंतर्मनाला समाधान देऊ शकणारे विचार व कल्पना यासाठी जास्त वेळ देत असल्यास या तथाकथित आध्यात्मिकतेची गरजच भासणार नाही.
सहमत
सहमत आहे
खर आहे पण बरं आहे!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
उत्तम लेखन!
उत्तम लेखन!
धार्मिक कर्मकांडांच्यामागे लागलेल्या व्यक्तींपेक्षा स्वतःला आध्यात्मिक म्हणवणार्या (आणि ते(च) योग्य आहे हे पटवत फिरणार्या) व्यक्ती कमी तापदायक असतात असे मुळीच नाही
याविषयावर इतरांच्या मतांच्याही प्रतिक्षेत आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक धागा...ज्यावर चर्चा
रोचक धागा...ज्यावर चर्चा उद्बोधक ठरेल.
>>मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबऴ, तकलादू अशी संकल्पना आहे.<<
इथे प्रथम अध्यात्मिकतेची व्याख्या केल्याशिवाय असे म्हणणे अयोग्य ठरेल.
अध्यात्मिकतेचेचा अर्थ प्रत्येकजण आपल्यापरीने वेगवेगळा लावताना दिसतो. खरे पाहता, अधि+आत्मन , स्वत:विषयी सर्व काही म्हणजे अध्यात्म. भौतिक संवेदना ग्रहण करणारी, त्यानुसार कृती करणारी अन परिणाम भोगणारी अशी जी चेतना सर्व जीवांमध्ये आहे तिला ओळखणे, तिचे स्वरूप जाणून घेणे म्हणजे अध्यात्म असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. ही संकल्पना काही ढोबऴ, तकलादू वाटत नाही.
>>त्याचप्रमाणे आध्यात्मिकता ही वास्तवातील भौतिकतेपेक्षा वेगळे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हेही लक्षात येईल. विज्ञानातील नियम, तत्व, सिद्धांत याव्यतिरिक्त या जगात इंद्रियजन्य अनुभवाच्या पलिकडे कित्येक - आत्मा, चेतना, अलौकिकशक्ती, अतिंद्रीय शक्ती, इ.इ .- गोष्टी असून त्यांची जाणीव ठेवल्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होत राहील असा तर्क त्यामागे असण्याची शक्यता आहे. ध्यान, योग, एकांत, प्राणायाम इत्यादीद्वारे मानसिक समाधान मिळू शकते, माणूस चिंतामुक्त होवू शकतो यावर येथे भर दिला जातो. <<
अतींद्रिय अनुभूति याविषयी स्वामी विवेकानंदांनी राजयोगात विवेचन केले आहे, ते असे..
‘या अनुभूतीतून (ऋतंभरा प्रज्ञा) मिळालेले ज्ञान हे पंचेन्द्रीयांच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाच्या विरोधी अगर वेगळे नसून ते एखाद्या वस्तूविषयी पंचेंद्रिये, बुद्धी व तर्क यांच्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाचीच पुढील पायरी असते आणि त्याच्याशी (पंचेंद्रियांपासून मिळणाऱ्या ज्ञानाशी) सुसंगतच असते.’
म्हणजे विवेकानंदांच्या मते विज्ञान, तर्क जिथे संपतात, तिथे अध्यात्म सुरु होते.
तसेच भौतिक आयुष्य समृद्ध करणे, मानसिक समाधान, कमतरता भरून काढणे किंवा चिंतामुक्ती हा अध्यात्माचा हेतू नसून भौतीकातेपलीकडे काय आहे हे जाणण्याची जिज्ञासा हा आहे. अध्यात्म हे सर्वांना कंपलसरी नसून भौतिकतेच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिज्ञासूंसाठी मार्गदर्शन आहे. अध्यात्माने जीवनातील कमतरता नक्कीच भरून निघते. त्याशिवाय का योगशास्त्राचा जगभर इतका प्रसार झाला आहे ?
>>एके काळी आध्यात्मिक व ऐहिक या संकल्पना स्पष्ट होत्या. त्यांना समजून घेण्यासाठी कष्ट पडत नव्हते. त्या एकमेकाच्या विरोधात आहेत याची पूर्ण कल्पना होती. आध्यात्मिकतेकडे ओढा असणार्यां नी अंतर्मनाचा वेध घेत घेत, सर्वसंगपरित्याग करून परमेश्वरापाशी पोचण्याची अनुभूती प्राप्त करून घेणे व परब्रह्माशी विलीन होणे यावर भर दिला जात असे. स्वत:चे अस्तित्व आणि ऐहिक सुखाना नाकारणे म्हणजेच आध्यात्मिकता असे समजले जात असे.<<<
आध्यात्मिक व ऐहिक या संकल्पना एकमेकांच्या विरोधी असण्याचे काहीच कारण नाही. अध्यात्म हे ऐहीकतेची पुढची पायरी आहे असे फार तर म्हणता येईल. समर्थ रामदासांनी याबाबत म्हटले आहे.. ‘जो त्रिविधतापे पोळला तोच अध्यात्म सुखाला अधिकारी जाहला.’ म्हणजे ऐहिक जगाचा पूर्ण अनुभव घेतल्याशिवाय अध्यात्म येणेच नाही. तसेच त्यासाठी ऐहिक सुखांना नाकारण्याचीही गरज नाही. गौतम बुद्ध आणि प्रह्लाद यांनी आत्मज्ञान झाल्यानंतरही गृहस्थाश्रम स्वीकारून राजवैभव भोगले होते.
ध्यान धारणा हा अद्म्यात्माच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. आणि त्यातून आरोग्याचेही पुष्कळ फायदे होतात हे सिद्ध झाले आहे. तेव्हा निवासी/ अनिवासी शाळांमधून ते शिकवले जाते ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.
तेव्हा अध्यात्म अगदीच काही टाकाऊ संकल्पना नाही.
हां, मात्र अलीकडे बऱ्याच संधीसाधूंनी अध्यात्माचा बाजार करून टाकला आहे याच्याशी मात्र सहमत आहे. बाजारातून माल घेताना आपणच सावध राहावे.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
टीकेपार
> मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबऴ, तकलादू अशी संकल्पना आहे.
> मुळात अध्यात्माची भलावण करणारे कुठल्या हेतूने हा शब्द वापरतात याचा नेमका अंदाज येत नाही.
हे मला शंभर टक्के मान्य अाहे. पण त्यामुळे गोची अशी की या कल्पनेवर टीका करता येत नाही. ढगात तीर मारण्यासारखा तो प्रकार होतो. त्यामुळे एखादा माणूस 'मी धार्मिक नाही, पण अाध्यात्मिक वृत्तीचा अाहे' असं जर म्हणाला, तर 'तुम्ही काय म्हणता ते नीट कळत नाही, पण इतरांना त्रास होणार नाही अशा बेताने तुम्ही तुमची वृत्ती सांभाळायला माझी हरकत नाही' असं उत्तर द्यावंसं वाटतं. अाध्यात्मिकतेबद्दल उत्साही असलेल्या बहुतेक लोकांना त्या कल्पनेची चिकित्सा करण्याचा तितकासा उत्साह नसतो.
सध्या जोनाथन हेटचं (Jonathan Haidt) 'The righteous mind' हे पुस्तक गाजतं अाहे. त्याचं म्हणणं असं की 'spirituality' किंवा 'self-transcendence' ह्या कल्पनांची मुळं मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत अाहेत. पण पुन्हा अडचण हीच येते की हे शब्द त्याने फार ढगाळ अर्थाने वापरलेले असल्यामुळे त्याचं म्हणणं पटतही नाही, अाणि त्याचं खंडनही करता येत नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
नक्की काय?
अगदी बरोबर. देव या शब्दातून व्यक्त होणारी प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असली, आणि अशीच थोडी ढगाळ असली तरी तिचा साधारण आवाका कळू शकतो. मात्र अध्यात्म या शब्दाने हातात काहीच गवसत नाही. 'मी आध्यात्मिक आहे' असं जेव्हा कोणी म्हणतो/म्हणते तेव्हा त्यांना नक्की काय सांगायचं असतं हे कोणीतरी कृपा करून मला सांगू शकेल का? 'माझा देवावर विश्वास आहे' यातून जो मला साधारण, विशविशीत अर्थ समजतो, तितका ढोबळ अर्थ समजला तरी पुरे आहे.
मंडण खंडण आणि पुटिंग वर्ड्स इन्टू माउथ
एक कल्पना घ्यायची. तिचे आपल्या सोईने "मंडण" करायचे. आपणच. आपल्या कल्पनेने. मग त्यावर ताशेरे ओढायचे. एकांगी. आणि वर त्या कल्पनेचे "खंडण" केल्याचा आव आणायचा.
आमच्या वर्गात एक शहाणा "डान्सिंग वू ली मास्टर्स", "इन सर्च ऑफ श्रोडिंजर्स कॅट" आदि पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊन सरांशी "न्यूटन कसा 'चुकीचा' होता" यावर वाद घालीत असे. त्याची आठवण झाली.
आध्यात्मिकता अशी रस्त्यावर पडलेली नाही की कुणीही उचलावी आणि झोडपावी. आपल्याला समजत नाही म्हणावे आणि गप्प बसावे. फारच वैज्ञानिक वगैरे दृष्टीकोण असेल तर या देशात (तसेच या देशाबाहेरही) हजारो वर्षांपासून अनेक आध्यात्मिकांनी आपापली दर्शने मांडून ठेवलेली आहेत, ती कशी चुकीची आहेत, ढोबळ आहेत, तकलादू आहेत, टाकाऊ आहेत याची मांडणी करायला कुणाची ना नाही. घ्यावे एखादे दर्शन आणि करावा सिद्ध त्यातील भंपकपणा.
हं
त्यावर टीका करणारे रस्त्यावर पडलेले आहेत असे तुम्हाला वाटते काय? तसे वाटत असल्यास तसे सिद्ध करावे आणि वाटत नसल्यास आपल्याला समजत नाही असे म्हणावे आणि गप्प बसावे.
तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याने तुमच्या विधानातील फोलपणा लक्षात येईल अशी आशा आहे.
-Nile
फोल
आध्यात्मिकतेची मांडणी (एखाद्या) आध्यात्मिक दर्शनाच्या(च) भाषेत मांडून त्यातील पोलपणा सिद्ध करावा; आपले शब्द त्यात घुसडून सोईची विधाने करुन झोडपण्यात काही अर्थ नाही - अशा आशयाचा माझा प्रतिसाद.
त्यावरची तुमची प्रतिक्रिया पुन्हा एकदा तपासून पहा. लेख जेवढा फोल, तेवढीच फोल तुमची प्रतिक्रिया. असो.
तीच भाषा
दरवेळेला असेच करायला हवे असे नाही. असे करता येतेच असे नाही. आणि तसे केलेच पाहिजे असेही नाही.
उदाहरणादाखल एक मुद्दा मांडतो. स्वर्ग आहे, देव आहे वगैरे म्हणणारे लोक आहेत. तसे मानण्यार्यांचे ग्रंथ वगैरेही आहेत. पण देव नाही हे सिद्ध करण्याकरता त्यांच ग्रंथात कशी चुक आहे दाखवण्याची गरज नसते. त्याचे उत्तर फारच सोपे असते. बाबयल मध्ये देवाने अॅडम आणि इव्ह निर्माण केला आणि मग आपण झालो असे लिहले आहे. ते लोक उत्क्रांतीला मानत नाहीत पण म्हणून शास्त्रज्ञांना उत्क्रांती बरोबर आणि अॅडम इव्ह मार्गाने मनुष्य निर्मिला नाही असे बाबयलच्याच भाषेत मांडायचे असे कोणी म्हणाला तर त्यापेक्षा हास्यास्पद काही नाही. तरीही तसे करणारेही अनेक आहेत पण त्याचा फारसा उपयोग होत नाही हे तुम्हाला माहित असेलच.
आता तुम्ही म्हणाला आध्यात्म आणी देव इतर पुराण ग्रंथ वगैरे वेगळे मुद्दे आहेत म्हणून. समजा आहेत असे मानू. म्हणूनच त्यात तथ्य आहे किंवा नाही हे तपासायचे अनेक मार्ग असू शकतात. फक्त त्या दर्शनांच्याच भाषेत मांडून खरे खोटे करा म्हणणे म्हणजे कोतेपणाचे लक्षण आहे. असो. यापेक्षा जास्त प्रतिवाद करण्याइतका वेळ नसल्याने हा शेवटचा प्रतिसाद. क्षमस्व.
-Nile
आध्यात्मिक'शास्त्र'
'आळश्यांचा राजा' यांच्या मते आध्यात्मिकतेवर टीका - टिप्पणी करणारे एकूण एक टीकाकार पाखंडी आहेत. पारंपारिक रित्या हजारो वर्षापासून ऋषी - मुनी - तपस्वी यांच्या कडून आलेल्या व पिढ्यान पिढ्या संवर्धित होत गेलेल्या या आध्यात्मिकतेच्या विरोधात एकही शब्द ऐकण्याच्या (वा वाचण्याच्या) मनस्थितीत ते नाहीत असे त्यांच्या प्रतिसादातील अभिनिवेशावरून वाटते. (शक्य होत असल्यास असे काही तरी अर्धवट लिहिणार्यांना त्यांनी शाप देऊन भस्मसात करून टाकले असते.)
आताच्या समाजात ज्या अर्थाने आध्यात्मिकतेचा अर्थबोध होतो त्याचाच थोडक्यात परामर्श घेण्याच्या प्रयत्न लेखात केला आहे. स्वत:ला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेत सत्संग, संकीर्तन, प्रवचन, योग प्रात्यक्षिके, ध्यान इत्यादींचे रतीब घालत भक्तांची मती गुंग करणार्यांचे पीक मोठ्या प्रमाणात येत आहे. फक्त माझाच गुरु प्रामाणिक व इतर सर्व भोंदू असे म्हणत आध्यात्मिकतेच्या आहारी जाणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खरोखरच यात काही तथ्य आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. गंमत म्हणजे प्रत्येक गुरु - बाबा - महाराज यांची आध्यात्मिकतेची व्याख्या वा त्याविषयीचे समज व्यक्तीनिष्ठ असल्यामुळे सामान्य माणूस गोधळून जाण्याची शक्यता जास्त आहे.
आध्यात्मिकशास्त्राविषयी अधिक माहिती देणार्या दर्शनशास्त्र, वेद, पुराण, धर्मग्रंथ, श्रुती इत्यादींचा अभ्यास न करता ('आळश्यांचा राजा'च्या मते ठोकून) दिलेली ही मतं आहेत. लेखात जे लिहिले आहे ते लेखकाच्या अल्पमतीवर आधारित आहे. आवती भोवती बघितल्यास आध्यात्मिक बुवाबाजीचे ओंगळ स्वरूपच दिसत आहे व त्याच्या बाजारीकरणामुळे मध्यमवर्गीय फसत आहेत म्हणून हा लेख लिहिलेला आहे.
नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मकपणे विचार करताना जी गोष्ट नाही ती नाही असे सिद्ध करणे यापेक्षा जी गोष्ट आहे ती आहे म्हणून सिद्ध करणे तुलनेने सोपे असते (उदाहरणार्थ: जगात पांढरे कावळे नाहीत याच्या शोधासाठी आटापिटा करण्यापेक्षा जगभरातील सर्व कावळे काळे आहेत हे सिद्ध करणे सोपे ठरू शकते.) म्हणून (आताच्या स्वरूपात असलेली) आध्यात्मिकता कशी बरोबर आहे, वस्तुनिष्ठ आहे, अचूक आहे, टिकाऊ आहे व ज्ञानार्जनेचे, सुख समाधानाचे एक अत्युत्तम साधन आहे, आणि त्यात अजिबात भंपकपणा नाही, असा एखादा अभ्यासपूर्ण लेख लिहिल्यास, किंवा अशा एखाद्या लेखाचा संदर्भ दिल्यास माझ्यासारख्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
:-)
माझ्या अभिनिवेशामुळे का होईना प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद!
हा हा हा! खूप हसलो. पण मला शाप द्यायची आवश्यकता नाही. तुमच्याही लिखाणात तसलाच अभिनिवेश आहे. त्यामुळे माझ्यासारख्यांच्या शापाची गरज नाही अंगाची आग व्हायला.
ओंगळ बाजारीपणावर कोरडे ओढण्यासाठी आध्यात्मिकताच मोडीत काढण्याची (मुळीच) आवश्यकता नाही. दर्शने मांडण्याच्या योग्यतेच्या असलेल्या अनेक श्रेष्ठ आध्यात्मिकांनी बुवाबाजीवर आसूड ओढलेले आहेत. तेंव्हा हजारो वर्षांपासून आपण असे काहीतरी पहिल्यांदाच करीत आहोत असे समजण्याचे कारण नाही. बुवाबाजीवर टीका करताना आध्यात्मिकतेलाच धारेवर धरायचे असेल, तर दर्शनशास्त्रे कशी चुकीची आहेत यावर सांगोपांग लेख येऊ द्यात. स्वागत आहे.
चिक्कार संदर्भ आहेत. तुमच्यासारख्या विद्वान अभ्यासू आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांना मी काय सांगावे! आपण निश्चितच वाचन केले असेल, आणि या मार्गातील काही ज्ञानी माणसांना कधी ना कधी भेटलाही असाल. बंद मनाने याबाबत विचार करता याचे नवल वाटते आणि खेदही.
पाठिंबा पण मर्यादित
मला माझ्या आयुष्यात 'जीवन समृद्ध करणार्या' कसल्याहि तथाकथित आध्यात्मिकतेची आवश्यकता भासत नाही. ज्यांना वाटते त्यांना सदुपदेश करण्याने काही निष्पन्न होईल काय ह्याबाबतहि मी साशंक आहे.
तरीहि सर्वत्र - विशेषेकरून भारतात - पंचतारांकित अध्यात्म फार बोकाळत आहे हेहि दिसते आणि त्याचीहि चिंता वाटते.
प्रभाकर नानावटींसारखे कोणी त्याला विरोध करायला पुढे होत असले तर त्याला माझा 'तुम लड़ो, हम कपडा सम्हालेगा' प्रकारचा पाठिंबा आहे.
हे वाचून काही विचार आले
हे वाचून काही विचार आले मनात.
१. << आध्यात्मिकतेची (spiritualism) खरोखरच गरज आहे का?>>
हे कुणी कुणासाठी ठरवायचे? कुणाला तसा अधिकार आहे? हे ज्याचे त्याला (जिचे तिला) ठरवता येत नाही, किंवा जे तसे ठरवतात ते चुकीचे आहेत हे कशावरुन समजायचे?
२. << आधुनिक तत्वज्ञ व वैज्ञानिक यांना मात्र आध्यात्मिकता ही एक ऐतिहासिककालीन कालबाह्य व निरुपयोगी अशी एक संकल्पना आहे, असे वाटते.>>
उद्या एखादा आध्यात्मिक गुरु 'आधुनिक विज्ञान हे एक थोतांड आहे' असं म्हणाला (म्हणाली) तर त्याला किती महत्त्व द्यायचे? मग तसेच वैज्ञानिक अथवा तत्त्वज्ञ यांच्या या विषयावरील मताला महत्त्व किती द्यावे? महत्त्व मताला द्यावे की मत व्यक्त करणा-या व्यक्तीच्या त्या विषयातील अधिकाराला द्यावे - हा याच संस्थळावर दुस-या धाग्यावर चर्चिला गेलेला विचार आठवला. यातले तारतम्य जो तो समाज आणि जी ती व्यक्ती स्वतःच्या वकुबानुसार ठरवत असतेच. सगळ्यांनी एकाच विचारसरणीला मानावे असा आग्रह कितपत योग्य आहे?
३. << धर्म म्हटले की श्रद्धा. ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य. चिकित्सा न करण्याची अट.>>
हा एक सर्वसाधारण दृष्टिकोन आहे हे मान्य. पण धर्म हे सगळे असूनही बदलत कसा गेला? धर्माची स्वतःला आव्हान देत देत वाटचाल होत आहे असे मला वाटते - धर्माचा अगदी गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास पाहिला तरी. धर्माची ही अट असली तरी पारंपरिक श्रद्धा नसणारे, ग्रंथांचा वेगवेगळा अर्थ लावणारे, चिकित्सा करणारे कितीतरी लोक होऊन गेले - पुढेही होत राहतीलच. तेव्हा धर्माचा हा एक अर्थ, एक आवाका - पण तेवढे म्हणजेच नेहमी सगळ्यांसाठी धर्म असतो असे काही म्हणता येत नाही.
४. << स्वत:चे अस्तित्व आणि ऐहिक सुखाना नाकारणे म्हणजेच आध्यात्मिकता असे समजले जात असे. >>
ही कल्पनाही काही कालातीत सत्य नाही, कालसापेक्ष आहे. काही काळात ती प्रामुख्याने दिसत असली तरी तिला अपवाद आहेत परंपरेत. उदाहरणार्थ जनक राजा, नचिकेत, राम, कृष्ण .. यांनी ऐहिक सुख उपभोगले नाही का? .. हे लोक खरेच होऊन गेले का नाही हे माहिती नाही - पण त्यांचा पगडा जनमानसावर आहे भारतीय हिंदूंच्या म्हणून सहज हे सुचले. इतर धर्मांत अशी उदाहरणे असतीलही - मला ती माहिती नाहीत.
५. << त्यामुळे अंतर्मनाला समाधान देऊ शकणारे विचार व कल्पना यासाठी जास्त वेळ देत असल्यास या तथाकथित आध्यात्मिकतेची गरजच भासणार नाही.>>
सहमत. प्रत्येकाची आध्यात्मिकतेची व्याख्या आणि गरज वेगवेगळी असू शकते हे आपण मान्य केले की मग इतर प्रश्न नाहीसे होतील का?
बुवाबाजीचे अर्थातच समर्थन नाही. आणि अध्यात्माच्या फॅशनचेही नाही. अध्यात्माचे दुकान थाटणे मलाही हास्यास्पद वाटते. पण एखाद्या संकल्पनेचा अर्थ लोक आपल्या मते चुकीचा लावत असतील तर त्या शब्दाचे आणखी काही अर्थ आहेत का आजच्या समाजाच्या चौकटीने माझ्यापर्यंत न आणलेले - असाही विचार करायला हरकत नाही.
***
अब्द शब्द
तारतम्य
'तारतम्य' हा शब्द अशा विषयांवरील चर्चेत वापरणं हे शहाणपणाचं लक्षण नसतं हे तुम्हाला माहिती नाही का?
अन्याय्य विधान
मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणेच
तुम्हाला जर अशा विषयांवरच्या चर्चेत तारतम्याचा अभाव आत्तापर्यंत आढळून आला असेल तर तो कदाचित त्या समाजाच्या अथवा व्यक्तींच्या वकुबाचा प्रश्न असू शकेल. ऐसी अक्षरेवरील माझा अनुभव असा आहे की काही आगंतुक अपवाद सोडले तर चर्चेत कितीही टोकाची मतं मांडली तरीही एक विशिष्ट पातळी सोडली जात नाही. मुद्दे कितीही तापले तरी गुद्दे येत नाहीत. त्यामुळे असं सरसकट विधान इथेही वापरणं अन्यायाचं वाटलं.
अशी विधानं करताना तारतम्य बाळगावं, ही विनंती.
किंवा
>>>तुम्हाला जर अशा विषयांवरच्या चर्चेत तारतम्याचा अभाव आत्तापर्यंत आढळून आला असेल तर तो कदाचित त्या समाजाच्या अथवा व्यक्तींच्या वकुबाचा प्रश्न असू शकेल.<<<<
किंवा हा माझ्याही वकूबाचा प्रश्न असू शकतो
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
असहमत
'ऐसीअक्षरे'विषयी मी काहीही म्हटलेले नाही.
माझ्या विधानाचा 'ऐसीअक्षरे'शी संबंध जोडू पाहणं बादरायणी आहे. त्यामुळं तारतम्य बाळगण्याचा सल्ला योग्य जागी मारला आहे.
यापलीकडे "माझा अनुभव..." वगैरे सापेक्ष बाबींवर काही बोलण्याजोगे नाही.
या मुद्यावर यापुढं काही लिहिणार नाही. तुम्हाला पावशेर टाकण्याची संधी आहे.
मनःशांती
कुठल्याही माणसाला ऐहिक सुखाबरोबर पाहिजे असते ती मनःशांती. आता ती कुठल्या मार्गाने मिळवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला ती नामःस्मरण करुन मिळत असेल तर कोणाला एखाद्या बाबाच्या पाया पडून मिळत असेल. कुणाला ती कलेतून, संगीत ऐकून वा कामात बुडवून घेऊनही मिळत असेल. अमूकच मार्ग बरोबर आणि दुसरे सगळे चूक हे आपण सांगणारे कोण ? संपूर्ण जगाचे ज्ञान असलेला एकही मानव नाही. तर ज्याला ज्या मार्गाने जायचे असेल त्याला जाऊ द्या की.
बुवाबाजी करुन जर कोणी फसवत असेल तर त्याच्या इतकाच फसवून घेणाराही दोषी आहे. शहाणपण हे कित्येकदा अनुभवानेच येते, ज्यांना दुसर्यांच्या अनुभवातून शिकायचे नसेल त्यांनी स्वतः अनुभव घ्यावाच.
माझ्यावर जशी देवावर श्रद्धा ठेवण्याची कुणी सक्ती करत नाही तशीच देव नाहीच हे मीही कुणाला ठासून सांगणार नाही. कारण देव आहे हे जसे सिद्ध करता येत नाही तसेच तो नाहीच असेही सिद्ध करता येणार नाही.
हे सगळ्यानांच माहित आहे.
हा मुद्दा या प्रकारच्या चर्चांमध्ये नेहमीच येतो. पण हे तर बाय डिफॉल्ट सत्य आहे. कसे ते सांगतो.
१. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये कोणालाही कोणीही ओढून आणत नाही. (आणायचा प्रयत्न केला तरीही तसं आणता येत नाही)
२. ज्याला ज्या मार्गाने जायचे आहे तो मार्ग तो निवडतोच पण चर्चा करणारे एकतर दुसर्याचा मार्ग कसा चुकिचा आहे किंवा आपला मार्ग कसा दुसर्यापेक्षा चांगला आहे हे सुचवत असतात.
३. चर्चा वाचणारे, आपला मार्ग तपासत असतात. त्याच बरोबर दुसर्याच्या मार्गाबद्दल माहिती घेत असतात.
थोडक्यात काय, 'ज्याला ज्या मार्गाने जायचे' आहे त्या मार्गाने जाऊ नका म्हणणारे कोणी नसतातच. लोक इथे फक्त मार्ग कोणता बरोबर चुक ह्यावर चर्चा करत असतात.
-Nile
बुद्धिभेद
बरोबर/चूक सापेक्ष असल्यास, बुद्धीभेद होत असला तरी तो जाणूनबुजून करु नये. असे प्रतिपादन असू शकते.
चर्चा
म्हणजे चर्चाच करू नये असे झाले. मग अनेकांना अशा बुद्धीभेदाची गरज असताना दोघांना खुश ठेवणे शक्य नाही.
-Nile
शिरा ताणून बोलण्याची गरज आहे का?
चर्चा नेहमीच्या मार्गानंच जात असणार याविषयी खात्री होती म्हणून ती वाचलीच नव्हती. अपेक्षेनुसारच ती चाललेली दिसते आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिसादकर्त्यांना माझी एक विनंती आहे. मानवी मनाचा थांग घेण्याचे वैज्ञानिकांचे प्रयत्न जसजसे पुढे जात आहेत तसतसे माणसाच्या मूलभूत मानसिक गरजा काय असतात आणि त्याच्या मेंदूच्या रचनेत किंवा त्यातल्या प्रक्रियांत त्या आपोआप कशा समाविष्ट असतात हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललेलं आहे. देची आणि रायन* यांचं संशोधन याविषयी महत्त्वाचं मानलं जातं. त्यांचा असा दावा आहे की मनुष्याच्या तीन मूलभूत मानसिक गरजा असतात : स्वायत्तता (autonomy), सक्षमता (competence) आणि संबद्धता (relatedness). यांतली संबद्धतेची गरज ही आध्यात्मिकतेच्या मुद्द्याशी संबंधित आहे. आपला परिसर आणि आपले आप्तस्वकीय यांच्याशी मनुष्याचं असलेलं नातं या संबद्धतेच्या गरजेतून निर्माण होतं. त्याबरोबर 'सत्यमेव जयते'सारख्या कार्यक्रमातल्या स्त्रियांची हृदयद्रावक कहाणी ऐकून भावविवश होणं किंवा सिनेमा-नाटक पाहताना / कथा-कादंबरी वाचताना त्यातल्या पात्रांशी समरस होणं अशा अनेक वर्तणुकीद्वारे मनुष्य संबद्धतेची गरज भागवत असतो. 'आध्यात्मिकता' हीदेखील मनुष्याच्या संबद्धतेच्या मानसिक गरजेतून उत्पन्न होते. आपण या विश्वात का आलो, आपण कशासाठी जगावं वगैरे गोष्टींचा उहापोह मानवी संस्कृतीनं आध्यात्मिकतेखाली केलेला दिसतो. ज्यांद्वारे आपल्या मानसिक गरजा भागत असतात त्या गोष्टी सिद्ध करता येत नसल्या तरीही मानवी मन त्या सत्य मानत राहतं, कारण आपला मेंदू आपल्याला फसवत असतो. ही एक प्रकारची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे आणि ती उत्क्रांतीमधून बळकट होत गेलेली आहे. अट्टल दारुडा किंवा कॉफीबाज ज्याप्रमाणे 'क्ष ग्लास/कप वाईन/कॉफी रोज पिणं आरोग्याला हितावह असतं' अशा संशोधनाकडे खेचला जातो त्याप्रमाणे ज्यांची संबद्धतेची मानसिक गरज आध्यात्मिकतेतून (अंशतः तरी) भागवली जात असते, ती माणसं आध्यात्मिकतेच्या बाजूच्या युक्तिवादांकडे खेचली जातात आणि ज्यांना ती गरज भागवण्यासाठी आध्यात्मिकतेचा आधार घ्यावा लागत नाही त्यांना हा सर्व मूर्खपणा वाटतो. दोन्ही बाजू तपासल्या तर आपल्याला न पटणार्या बाजूविरोधात शिरा ताणून बोलण्याची गरज भासणार नाही. याचा विचार दोन्ही बाजूंकडून व्हावा एवढीच माझी विनंती आहे.
* Deci, E., & Ryan, R. (1991). A motivational approach to self: Integration in personality'. In R. Dienstbier (Ed.), Nebraska symposium on motivation: Vol. 38. Perspectives on motivation (pp. 237–288). Lincoln: University of Nebraska Press.
Deci, E. L., & Ryan, R. M. (1995). Human autonomy: The basis for true self-esteem. In M. Kernis (Ed.), Efficacy, agency, and self-esteem (pp. 3149). New York: Plenum.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रतिसाद माहितीपुर्ण आहे आणि
प्रतिसाद माहितीपुर्ण आहे आणि अभ्यासकांसाठी रोचकही आहे. पण हे विश्लेषण खूपच सामान्यिकरणाकडे झुकले आहे, नियतवाद(/कारण-परिणाम) मान्य केल्यास कुठल्याच विषयावर शिरा ताणाव्या लागणार नाहीत, अर्थात शिरा ताणण्यात फारसा अर्थ असतो असे नाही पण शिरा ताणल्याच नाहीत तर संभाषण थोडे बेचव होण्याची शक्यता आहे.
शिरा ताणण्याचे उपयोग
प्रस्तुत चर्चाविषय पाहता आणि विविध मराठी संवादस्थळांवर त्या अनुषंगानं अनेकदा झालेल्या आणि त्याच त्याच मुद्द्यांवर घोटाळणार्या चर्चा पाहता असं म्हणावं लागतं की या विषयावर शिरा ताणण्याद्वारे आणि असे शिरा ताणलेले प्रतिसाद वाचण्याद्वारे कदाचित काही सदस्यांच्या मूलभूत मानसिक गरजा भागत असाव्यात.
असो. चालू द्या.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत
>>विषयावर शिरा ताणण्याद्वारे आणि असे शिरा ताणलेले प्रतिसाद वाचण्याद्वारे कदाचित काही सदस्यांच्या मूलभूत मानसिक गरजा भागत असाव्यात.
प्रगल्भ मानसिक गरजा भागविण्याचे विषय 'वेगळे' असावेत असं वाटतं.
हुश्श
हुश्श!
मार्मीक, माहितीपूर्ण, रोचक!!!
चिंतातुर जंतू यांना प्रतिसाद
तुमचा प्रतिसाद आवडला.
"आध्यात्मिकतेची गरज आहे काय ?" या प्रश्नाचा शोध घेणं म्हणजे शिरा ताणून बोलणं नव्हे. जंतू यांनी ज्या थिअरीजचा उल्लेख केलेला आहे त्या थिअरीजसुद्धा "आध्यात्मिकतेची गरज आहे काय/आध्यात्मिकतेची नक्की गरज काय आहे ?" या अंगानेच विचार/संशोधन करताना दिसतात. मूळ चर्चाप्रस्तावामधे असा "शिराताणू" अभिनिवेश नव्हता असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अवास्तव आणि निरुपयोगी यांत फरक
मान्य. पण त्याविषयी उपलब्ध असलेले वैज्ञानिक सिद्धांत विचारात घेतले तर खाली दिलेल्या विधानासारखी विधानं करावीशी वाटणार नाहीत. अशा विधानांना बर्याचदा लोक आक्षेप घेताना दिसतात आणि मग चर्चा पुन:पुन्हा त्याचत्याच ठिकाणी अडकते असं दिसतं:
इहलोकापलीकडे काही आहे याला कसलाही वैज्ञानिक पुरावा नाही, असं म्हणणं ठीक आहे. पण तसं काही आहे असं मानण्यापोटी काही माणसांची संबद्धतेची मानसिक गरज काही प्रमाणात भागते असं मात्र दिसतं; म्हणजे हे निरुपयोगी नाही. हे विचारात घेतल्यामुळे कदाचित चर्चा अधिक विधायक होऊ शकते एवढंच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||