सत्यमेव जयते
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे.
आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.
आता बर्याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.
मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
सामाजिक ते 'सोशल'
समंजस, मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला की खेळ मध्यमवर्गात लोकप्रिय होणार हे आमिरचं त्रैराशिक आहे हे 'तारे जमीं पर' किंवा 'पीपली लाइव्ह'सारख्या चित्रपटांमधून आतापावेतो स्पष्ट झालेलं आहे. आजच्या खेळातूनही असंच जाणवलं. स्त्रीभ्रूणहत्येची प्रथा आणि मुलींचं घटतं प्रमाण ही सध्या चिंतेची गोष्ट आहे हे खरंच आहे. त्यामुळे हाती घेतलेला प्रश्न गंभीर आहे याविषयी वाद नाही. बेकायदेशीर सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांवरची स्टिंग ऑपरेशनं, 'नकोशी' नावाच्या मुली यांसारख्या अनेक 'स्टोरीज' विविध वाहिन्या आणि छापील माध्यमांतून आता अधूनमधून पण सातत्यानं झळकत असतात. ताज्या घडामोडींमध्ये किमान रस असणाऱ्यांना त्यामुळे कार्यक्रमात काही नवीन सापडणार नाही. काही पीडित आणि धीराच्या सर्वसामान्य महिलांच्या हृदयद्रावक कहाण्या दाखवून प्रेक्षकांना भावविवश केलं गेलं. अशा प्रकरणांचा पर्दाफाश करणारे पत्रकार आणि समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करणारे काही लोक दाखवून आशेचा किरण दाखवला गेला. आणि कुणालाही सहज करता येईल अशी गोष्ट (एक रुपयाचा एक एस.एम.एस.) करायचं अखेर आवाहन करून 'चला, आपण देश सुधारण्याच्या कामात सहभागी होऊया' असं 'मै भी अण्णा' वातावरण निर्माण केलं गेलं. अशा अपेक्षित गोष्टींबरोबर एक महत्त्वाची गोष्ट केली गेली - ती म्हणजे शहरी, सुशिक्षित मध्यमवर्ग या स्त्रीभ्रूणहत्यांत मोठ्या प्रमाणात सहभागी आहे याची कुठेतरी एक किंचितशी बोचरी जाणीव करून दिली गेली.
थोडक्यात, आपल्या चलाख, चकचकीत सामाजिक संवेदनशीलतेच्या प्रतिमेला साजेसा कार्यक्रम आमिर खाननं सादर केला आहे असं दिसतंय. त्याला विशिष्ट वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळून लोकप्रियता लाभणार असं लगोलग आलेल्या फेसबुक/ट्विटरादि 'सोशल' प्रतिक्रियांवरून वाटतंय. त्यामुळे समाजात काही प्रबोधन होईल, आमूलाग्र बदल होईल किंवा परिस्थिती लक्षणीय प्रमाणात सुधारेल अशी आशा मात्र या क्षणी तरी नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इन्फोटेन्मेंट
अमीर खानही या भ्रमात नसावा. पण या प्रकारचा छोट्या पडद्यावर इन्फोटेन्मेंटचा प्रयोग यशस्वी होईल असे वाटते. भावनेला हात घातल्याशिवाय मोठ्या प्रमाणात लोकसहभाग भारतात शक्य होईल असे वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आमिर खानने केलेला हा शो
आमिर खानने केलेला हा शो स्वागतार्ह आहे. समाजात प्रबोधन होईल असं वाटत...निदान लोक या मुद्द्यांवर विचार तर करतील.
मला अनेक नवीन गोष्टी कळल्या. आपला या समस्यांशी थेट संबंध येत नाही त्यामुळे बरेच बारकावे माहीत नसतात.या कार्यक्रमातून असे बरेच काही कळले.
निश्चित उत्तर माहिती असलेले आणि नसलेले प्रश्न
बाल कामगारांच्या प्रश्नावरचा कार्यक्रम नक्कीच पहावासा वाटतोय.
म्हणजे त्यात काही उपाय सुचवले आहेत का ते पहायचे आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एव्हरी एफर्ट काउंट्स. आमीर
एव्हरी एफर्ट काउंट्स.
आमीर खानच्या संवेदनशीलतेला आणि जाणीवेला दाद द्यावी वाटते. ते बाकीचं - चकचकीत इमेज/ मध्यमवर्गीयांच्या भावनांना हात घालणे वगैरे जाऊ द्या. ते प्रबोधनाचेही सोडून द्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा माणूस भारतभर फिरलाय/ फिरतोय, वेगवेगळ्या स्तरांतील माणसांशी बोलतोय, निरनिराळे ज्वलंत प्रश्न हाताळतोय. त्या निमित्तानं एक कलाकार म्हणून (माणूस म्हणून तर आहेच) अधिक समृद्ध होतोय. त्यातून अजून उत्तम काही निर्माण करु शकेल.
आपल्याजवळ असलेला वेळ आणि पैसा त्याच्या पद्धतीने वापरायचा असं बाकीच्या कलाकारांनी आणि खेळाडूंनी ठरवलं तर राज्यसभेवर आपल्याला हेमा मालिनी, जयाप्रदा, गोविंदा, धर्मेन्द्र असल्या मंडळींना पाहण्याची वेळ येणार नाही.
आमीर, धन्यवाद. एक चांगला कार्यक्रम निर्माण केल्याबद्दल.
+१
अगदी सहमत!
- (मि. परफेक्ट्चा परफेक्ट पंखा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
दुवा देता का?
कार्यक्रमाचा पहिला भाग बघितला नाही.
जालावर उपलब्ध असेलच. युट्युबवर शोधेनच त्याव्यतिरिक्त कुठे असेल तर दुवा देता का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भ्रम नक्की कुणाला अन् कशाचा?
भ्रमात नाहीच, पण कार्यक्रमात लोकांना आवाहन केलं जातं ते देश बदलण्याचं. म्हणून तो चलाख आहे असं म्हटलंय. एक व्यक्ती म्हणून आमिर खान समंजस आणि संवेदनशील असावा हा अंदाज ठीकच वाटतो. मुद्दा असा आहे की तो त्याचं पद्धतशीरपणे भांडवल करतोय आणि त्याद्वारे अनेकजण पैसा कमावू इच्छिताहेत.
थोडक्यात,
इतर सिनेतारकांच्या कृतिहीन खासदारकीपेक्षा आमिर खानची कृतिशील सामाजिकता बरी आहे का? हो.
कार्यक्रमामुळे देश बदलणार का? नाही.
कार्यक्रमामुळे आमिर खान, वाहिन्या, मोबाईल कंपन्या वगैरे पुष्कळ पैसा कमावणार का? हो.
वेलकम टू द रिअल वर्ल्ड.
जाताजाता : कार्यक्रमाचा आंतरजालावर अधिकृत दुवा
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दुव्याबद्दल आभार चिंजं! पुढील
दुव्याबद्दल आभार चिंजं!
पुढील रविवारी सहज टिव्ही लावलाच तर नक्की बघेन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रश्न
समजा असं मानलं की आमीरखान याचं पद्धतशीरपणे भांडवल करतो आहे, तरी सुद्धा खालील दोन निष्कर्ष कसे निघाले याबाबत कुतुहल आहे.
या एकाच कार्यक्रमामुळे देश बदलणार नाही असं म्हणणं असेल तर ठीक. पण त्या म्हणण्यालाही काहीच अर्थ नाही. कोणत्याही एकाच गोष्टीने देश बदल्याच्या घटना घडत असतील असं वाटत नाही. या कार्यक्रमामुळे ज्या विषयावर भाष्य केले जात आहे, ज्या समस्यांना वाचा फोडली जात आहे इ. बाबतीत जनजागृती होईल असे वाटते का?
किंवा हाच प्रश्न असा विचारतो, अशा कार्यक्रमातून काय व्हावे असे तुम्हाला वाटते?
असा कार्यक्रम करून पैसा कमावण्याचा यशस्वी "फॉर्म्युला" आधीच बनला आहे का? उलट अशा प्रकारच्या संवेदनशील कार्यक्रमांची लोकप्रियता फारशी नसते किंवा झपाट्याने कमी होते असे मला वाटते. या कार्यक्रमामुळे आमीर खान पुष्कळ पैसा कमवेल या वाक्याचा अर्थ असा होतो की हा एक व्यावसायीक प्रोग्रॅम आहे. तुम्हाला हा अर्थ अभिप्रेत आहे का? असल्यास असे का वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.
-Nile
दुव्यावरचं गाणं वगळता इतर
दुव्यावरचं गाणं वगळता इतर कोणतेही व्हीडीओ या देशात दिसत नाहीत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने फेसबुकावरही काही प्रतिक्रिया वाचल्या. स्त्री-भ्रूणहत्या करणार्यांवर सामाजिक बहिष्कार टाकावा, अल्टासॉनिक मशीन्सवर बंदी आणावी अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया दिसल्या. "मला एकच मुलगी आहे. हा कार्यक्रम पाहून रडलो" असंही काही ठिकाणी वाचलं.
ज्या लोकांना मुलीचा गर्भ पाडायचाच असेल ते लोक असे कार्यक्रम बघत असतील का? बघत असतील तर त्यांच्यावर याचा काही परिणाम होत असेल का? न जन्मलेल्या जीवावर प्रेम करणार्या मातेला गर्भपात करायचा नसेल तर हा कार्यक्रम पाहून तिचं कोणी ऐकतील का? या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नाहीत. पण माझा ज्या मूल्यांवर अजिबात विश्वास नाही अशा मूल्यांचं उदात्तीकरण करणारे कार्यक्रम (सासवा-सुनांचे, रामायण, महाभारताचे) मी तरी बघत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असंबंद्ध गोष्टी
या दोन गोष्टींचा काही संबंध नाही. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडूनच जागरूकता आणि उच्चाटन केले जाते. सती जाणार्या बाईनेच त्या विरोधी चळवळींमध्ये सहभाग घेतला पाहिजे असे नाही. तुमच्या आमच्या सारख्यांना अशा चळवळीमुळे जर सती प्रथेला विरोध करायची चालना मिळत असेल तर ते या चळवळीचे यशच नव्हे तर उद्दिष्ट आहे.
सासू सूना वगैरे कार्यक्रम इथे असंबंद्ध आहेत.
टीपः कार्यक्रम बघायचा आहे, अजून जमेलेले नाही. पण तरी माझी मतं जेनेरीक आणि चर्चेच्या विषयाशी संबंधित आहेत असे मला वाटते.
-Nile
+१
सहमत!
मिडीया हे जालीम माध्यम आहे वाचा फोडण्यासाठी, पण मिडीया हा नफेखोरांच्या हातात असल्यामुळे प्रभावी वापर होत नाहीयेय.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्यासाठी चिल्लर रिअॅलिटी शोचा सहारा न घेता एक सामाजिक उद्दीष्ट असलेल्या कार्यक्रमाचा वापर केला हे स्पृहनीय!
तसाही ह्या कार्यक्रमाने भारत पेटून उठेल आणि परिवर्तन होइल असे आमिरलाही वाटत नसेल.
- (सामाजिक) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
सती जाणार्या बाईने किंवा
सती जाणार्या बाईने किंवा तिच्या घरच्यांनीच कार्यक्रम बघण्याची आवश्यकता नाहीच.
गेल्या काही वर्षांत, किंवा गेल्या दशकात आपल्याकडे माध्यमस्फोट झाल्यामुळे मला जे हवं तेवढं, सोयीचं तेवढंच मी पहाणार, उचलणार आणि अनुकरण करणार यासाठी अधिक वाव आहे. मला स्वतःला टाकाऊ वाटणार्या मूल्यांचं उदात्तीकरण करणारे (उदा: सासू-सुनांचे) कार्यक्रम मी पहात नाही. 'पती हाच परमेश्वर', 'बाईच्या आयुष्याची इतिकर्तव्यता नवरा आणि त्याच्या नातेवाईकांची सेवा करण्यातच असते' टाईप मालिका आणि चित्रपट कमी असतात का? अजिबात नाही. अशा कार्यक्रमांचे चाहते "निदान अशा कार्यक्रमांमुळेतरी आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीचं रक्षण होईल" अशी आशा बाळगत असले तरी या कार्यक्रमांचा दर्शक वर्ग हा ही संस्कृती जपणाराच असतो. तुझ्या-माझ्यासारखे लोकं असे कार्यक्रम बघत नाहीतच. आपण आपलं रोजचं 'संस्कृती बुडवण्याचं' काम सुरू ठेवतोच.
स्त्री-भ्रूणांची हत्या करणारे, त्याला मदत करणारे, पाठींबा देणारे या कार्यक्रमासारखे कार्यक्रम बघत असतील का? किंवा त्यांनी असे कार्यक्रम का पहावेत? किंवा आपण लोकं (समाज म्हणून) असे कार्यक्रम पहातो त्यामुळे त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? बाबागिरीचा विरोध महाराष्ट्रात किती वर्ष सुरू आहे? अगदी गाडगेबाबांपासून अनेकांनी बाबागिरीला विरोध केलेला आहे. पण तरीही कोणते ना कोणते बाबा-बुवा-माता-महाराज अगदी आजघडीलाही सोकावलेले दिसत नाहीत का?
महाराष्ट्रात आणि मुंबईतही बालिकांचं प्रमाण गेल्या जनगणनेत, त्या आधीच्या जनगणनेपेक्षा कमी भरल्याची मोठी बातमी तेव्हा झाली. रोजच्या बातम्या अशा प्रकारे वाचणार्यांच्या, त्यावर विचार करणार्यांच्या आयुष्यात या मालिकेमुळे काय फरक पडेल? व्यक्तीशः मला किंवा कोणालाही एखादी व्यक्ती असं येऊन थोडंच सांगणार आहे, "मुलगी होती, म्हणून गर्भ पाडला." तिथे तेरी भी चूप मेरी भी चूप हेच चालणार.
अशा प्रकारच्या जागृतीला माझा विरोध आहे असं नाही, पण परिणामकारकतेबद्दल मी साशंक आहे. अर्थात परिणाम कशाला म्हणायचं हा ही एक चर्चेचा मुद्दा आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वेगळे मुद्दे
बाबा बुवा किंवा सासु सुना पेक्षा सदर कार्यक्रमाचा विषय वेगळा आहे. जे प्रकार तुमच्या आमच्यात घडतात, त्यांबाबत जागृती हा विषय आहे. चिंतातुर जंतूंनी म्हणल्याप्रमाणे "शोषित लोक तुमच्या आमच्यातही आहेत" वगैरे दाखवले जात आहे. तुझा मुद्दा थोडक्यात असा आहे की सदर कार्यक्रमाचा ऑडियन्स कोणता, आणि तो हा कार्यक्रम पाहतो आहे का. तोच मुद्दा जंतु खाली मांडतात. सासु सूना वगैरे कार्यक्रमाशी तुलना करणं मात्र इथे बरोबर नाही.
-Nile
आमिर खानचे चाहते कोण?
माझ्या मते दोन्ही प्रश्नांची उत्तरं संलग्न आहेत. गेल्या काही वर्षांत (विशेषतः 'लगान' आणि नंतर) आमिर खाननं पद्धतशीरपणे आपला एक चाहता वर्ग तयार केलेला आहे. या वर्गाची व्यवच्छेदक लक्षणं म्हणजे -
सुशिक्षित, समंजस, प्रामुख्यानं शहरी असणारा बुद्धिजीवी उच्च मध्यमवर्ग यात ते मोडतात. ते मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे पाहतात, एसी कारमधून हिंडतात, मॉलमध्ये खरेदीला जातात, ब्रँड कॉन्शस असतात, स्मार्टफोन्सवरून फेसबुक स्टेटस अपडेट टाकतात. अशा अर्थानं ते सधन असतात. पण ते सामाजिकदृष्ट्या जरा जागरुक असतात. म्हणजे कसं, तर ते फॅब इंडियातले किंवा खादी भांडारातले कपडे पण अधूनमधून घालतात. प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी येण्याआधीच त्यांनी कापडी किंवा रिसायकल्ड रद्दी कागदांच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलेली असते. ते ओला-कोरडा कचरा वेगवेगळा करतात, वगैरे. खाउजा धोरणांचा त्यांना फायदा झालेला असतो, पण ते 'हिंदू' किंवा 'आउटलुक' वगैरे वाचतात. थोडक्यात, ते आजच्या 'शायनिंग इंडिया'चे प्रतिनिधी असतात, पण 'भारत' आपला मानतात. एन.जी.ओ.मध्ये वीकेंडला थोडं काम करतात, किंवा तेही नाही जमलं तर देणग्या वगैरे देतात.
आता या सगळ्या गोष्टी वाईट आहेत किंवा मी त्यांची चेष्टा करतो आहे असं नाही. फक्त एवढंच, की या वर्गाची सामाजिक जागृती तशी आधीच झालेली असते. ते काही आपल्या पोटच्या पोरींना मारत नसतात. त्यांना हा कार्यक्रम आवडतो आहे असं दिसतं आहे, पण त्यातून समाजजागृती होणार नाही. याउलट माझ्या आसपासच्या सधन, पण अशा प्रकारे जागरुक नसलेल्या आणि बुद्धिजीवी नसलेल्या लोकांमध्ये गुपचूप अनेक अनिष्ट रुढी पाळल्या जातात (हुंडा, लग्नात प्रचंड खर्च, कुणीतरी बाबा-साधू यांच्यावर पैसे ओतणं पण सामाजिक कार्य करणार्या संस्थांना देणग्या न देणं, वगैरे) त्यांच्याकडे मुलींचे गर्भसुद्धा गुपचूप पाडले जात असतील कदाचित (काही उदाहरणं मला माहीत आहेत.). हा वर्ग 'तारे जमीं पर' किंवा 'पीपली लाइव्ह' पाहत नाही. ते शाहरुख-सलमानचे सिनेमे पाहतात. असा हा फरक आहे.
फरकच करायचा झाला, तर सलमान खानच्या लोकप्रियतेपेक्षा ही (आमिरची लोकप्रियता) प्रमाणात अल्प अशी आहे, पण यातही आता लाखो लोक येतात. पण या माणसांची क्रयशक्ती उरलेल्या भारतापेक्षा अधिक आहे. तिचा फायदा घ्यायला अनेक ब्रँड सज्ज असतात. त्यांना भिडेल अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं स्वरूप बांधलेलं आहे - म्हणजे भावनांना आवाहन, पण शांतपणे, मेलोड्रामानं नाही. पॉवर पॉईंट संस्कृतीतली स्मार्ट आकडेवारी देत देत विषय समजावून देणं, पण तशी बाळबोध मांडणी - एक प्रकारे अॅपोकॅलिप्टिक. परिस्थिती गंभीर नाही असं नाही, पण इथे तुमचा थरकाप उडावा, तुम्ही अस्वस्थ व्हावं अशा हिशेबी हेतूनं चढत्या भाजणीत मांडणी केलेली दिसते. म्हणजे आधी निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रिया दाखवल्या. मग काही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना रस्त्यावर गाठून त्यांच्या 'हे सर्व खेडेगावांत घडतं; अशिक्षित लोकांत घडतं' अशा(च) प्रतिक्रिया दाखवल्या, आणि मग डॉक्टर नवरा-बायको, प्रोफेसर सासरा अशा घरातलं उदाहरण दाखवून 'हे लोक तुमच्या आसपास आहेत' हे दाखवलं. आता पुण्यात भर नागनाथ पारापासच्या मध्यमवर्गीय डॉक्टरची बातमी ज्यांनी वाचलेली असते त्यांना याचं आश्चर्य का वाटावं? पण औंधात परिहार चौकात राहणार्यांना असा प्रश्न कदाचित लागू होत नाही.
असो. मुद्दा समजला असेल अशी आशा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
विवेचन
आमीर खानसारख्यांनी केलेले प्रयत्न हे "टीचिंग टू द क्वायर आहेत" या स्वरूपाचं केलेलं विवेचन काही अंशी खरं आहे परंतु सरसकट खरं मानता येणार नाही. आमीर खान ची लोकप्रियता ही सलमान खान इतकी राक्षसी बहुदा नसेल, परंतु पहिल्या पाचात त्याचं नाव नक्की मोडतं असं म्हणायला जागा आहेच. आणि ही लोकप्रियता गेली पंचवीस एक वर्षं क्रमाक्रमाने वर गेलेली आहे. तस्मात् , "आमीर खान हा लोकप्रिय आहे पण सलमान इतका कुठे आहे" या स्वरूपाचा युक्तिवाद (प्रस्तुत संदर्भात) पुरेसा योग्य वाटत नाही.
बाकी एकंदर सुसंगत जीवन जगू पाहणार्या मध्यमवर्गाचं जंतू यांनी केलेलं विवेचन जवळपास पर्फेक्ट आहे. मात्र, एकशे पंधरा कोटींच्या देशात असं सुसंगत आयुष्य जगू पहाणार्यांची संख्या केवळ काही लाखच असू शकते (असा जर का रोख असेल तर त्या स्वरूपाचं ) हे प्रतिपादन शंका उत्पन्न व्हावी अशा प्रकारचं मला वाटतं. (तसा रोख नसेल तर माझ्या वाचण्यात/समजून घेण्यात चूक झाली असं समजावं.) मुद्दा "नेमके किती लोक असे असतील" हा नसून त्यांच्या "केवळ काही लाखांच्या" एस्टीमेशनचा आहे.
राहता राहिला मध्यवर्ती मुद्दा : आमीर खान आणि तत्सम लोक अतिशय ठळक अशा स्वरूपाचा सामाजिक संदेश देण्याकरता आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेत आहेत असं दिसतं. "जरी उद्धरणीं व्यय न तिचा हो सांचा/हा व्यर्थ भार विद्येचा" या सावरकरोक्तीचंच हे प्रत्यंतर आहे. एकट्या आमीर खानने काहीही होणार नाही आणि एकंदरीतच एकेकट्या व्यक्तीने बदल घडवून आणण्याची घटना ( जी कदाचित ज्योतिराव फुले, आंबेडकर यांच्याबाबतीत घडली असं म्हणता येईल) आताच्या काळात घडेल का याची शंका वाटते (ती निराळी चर्चा होईल.) पण वर म्हण्टल्याप्रमाणे "एव्हरी एफर्ट काऊंट्स्". आणि आमीरखानची लोकप्रियता लक्षांत घेता हा प्रयत्न फार लहान म्हणता येणार नाही.
थोडं अवांतर : आमीर खानच्या कार्यक्रमाचे काही अंश पाहिले तेव्हा प्रिया तेंडुलकरच्या १९८०-९० च्या दशकांतल्या कार्यक्रमाची आठवण झाली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मुद्दा समजला.
तुम्ही म्हणता त्या आमीर खान चाहत्या वर्गाला टार्गेटेड शो आहे असं मानून चालूयात. या शो मुळे ह्या वर्गाला वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची ओळख होईल, (हा वर्ग अवेअर असला तरी संपूर्ण वर्गाला सर्व संघटनांची माहिती असणं काही आवश्यक नाही), कदाचित या वर्गाकडून सामाजिक देणगीत (आर्थिक, मनुष्यबळ इ.) भर पडेल, आणि सामाजिक कार्याला हातभारच लागेल. यातून वाईट असं काही होईल असं दिसत नाही. (फायदा घेण्यार्या ब्रँडचा विषय असेल, तर अशा या "अवेअर" वर्गाला आपला फायदा कोण घेतोय इतपत तरी कळत असेल असे तुम्ही दिलेल्या लक्षणांवरून वाटते)
त्या शिवाय, सदर वर्गाला अपीलींग असलामुळेही चर्चेत, वर्तमानपत्रान, न्युज चॅनेल इत्यादींवर शो बद्दल बोलले जाईल. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या वर्गांपर्यंत जागृती होण्याच्या संधी उपलब्ध तर होतीलच. तुम्ही म्हणता त्या वर्गाला सोडून इतर वर्गांची रीअॅक्शन काय आहे हे जाणून घेण्याचा काही मार्ग आहे का? ते असो.
तुर्तात इतकेच नोंदवून थांबतो. अधिक बोलण्यापूर्वी कार्यक्रम पाहिला पाहिजे.
-Nile
विस्कळीत लाऊड थिंकिंग
प्रतिसाद आवडला. प्रतिसाद वाचतेवेळी
इथे काहिसा थबकलो. असे प्रकार जागरूक असलेल्या व/किंवा बुद्धीजीवी असलेल्या लोकांमधेही आहेत.
यावरून असा विचार मनात आला की आमिर खान केवळ निम्न उत्पन्न गटातले प्रश्नच मांडेल असे वाटते का? (कारण तो गट त्याचा तितकासा - सलमान वगैरेंच्या तुलनेत - फ्यान नाही). उच्चभ्रुंच्या झिरमिळ्या पाडायचे धाडस तो दाखवेल का?
जसे काहि पटकन सुचलेले
-- काही उच्च-मध्यमवर्गीय सोसायट्यांमधे काहि धर्मियांना/काही खाद्यसवयी असलेल्या व्यक्तींना वगैरे जागा घेऊ न देणे
-- अगदी वरून सभ्य दिसणार्या घरांतील घरगुती हिंसाचार व अन्याय - जसे (उदा.) वडील/काके/आजोबा वगैरेंकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार
-- मोठमोठ्या देवस्थानांमधून चाललेला भ्रष्ट्राचार किंवा प्रसिद्ध बाबांकडून होणारे मनीलाँडरिंग व त्याचा निवडणूकीतील उपयोग वगैरे वगैरे
अर्थात तो ज्या विषयांवर काम करतो आहे त्याबद्दल अकर्यक्रम बघितला की/तर लिहेनच. पण वरील वाक्य वाचून झालेले हे विस्कळीत लाऊड थिंकिंग समजा हवं तर
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सर्व सधन आमिर खानचे चाहते आहेत का?
मुद्दा असा नाही आहे. ज्या सामाजिक गटात आमिर खान लोकप्रिय आहे तो गट बुद्धिजीवी-देशप्रेमी-जागरुक नागरिकांचा आहे हा मुद्दा आहे. असा गट तुलनेनं अल्पसंख्य असणार एवढंच.
असं म्हणणं हे एका व्यापक उदारमतवादी भूमिकेतून ठीकच वाटतं. आयबॉल्स, टीआरपी, येनकेनप्रकारेणप्रसिद्धी वगैरेच्या आजच्या काळात आणि कार्यक्रमाचं एकंदर भावनाप्रधान स्वरूप पाहता निव्वळ समाज बदलण्याच्या निरागस आणि नितळ भूमिकेतून तो (कार्यक्रम) आला आहे असं मात्र वाटत नाही. आणि 'जाग उठा भारत' असं जे काही कवित्व सोशल नेटवर्कवर दिसतं आहे ते फसवं आहे एवढंच.
समजुतीत काहीसा गोंधळ होतो आहे असं वाटतंय. प्रश्न निम्न उत्पन्न गटापुरता नसून सधन गटातही आहे असंच दाखवलेलं आहे (आणि ते खरंही आहे). फक्त त्या सधन गटाची मी पुढे जाऊन आणखी वर्गवारी केलेली आहे - म्हणजे सधन पण सामाजिक जागरुकता असणारे बुद्धिजीवी (साने गुरुजींची गोड बाळं - चेष्टेच्या सुरात नाही!) आणि सधन पण धंदेवाईकतेला सर्वोच्च प्राधान्य देणारे (धनिक-वणिक बाळं). निश्चित टक्केवारी माहीत नाही, पण जर समाजाचा वरचा ५% हिस्सा सधन मानला, तर या दोन्हींतला पहिला वर्ग त्यातही अल्पसंख्य असेल. आता तुम्ही उच्चभ्रूंच्या दुर्गुणांची तुमची वरची यादी पुन्हा वाचलीत, तर लक्षात येईल की ती मुख्यतः दुसर्या वर्गाला लागू होईल अशी आहे.
जाताजाता : एक रोचक दुवा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रोचक
दुवा खरंच रोचक आहे. अर्थात, सत्येन यांचं लेखन आहे.
या एका वाक्यात सारं काही आलं... या वाक्यावर युक्तिवाद होऊ शकतात, होतील...
दुवा खरंच रोचक आहे आता एपिसोड
दुवा खरंच रोचक आहे
आता एपिसोड नक्की बघेन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अवेअरनेस आहे की नाही?
काही तासांपूर्वी आमच्या हाफिसातला एका सहचार्याने मला म्हटले "काय?? तु सत्यमेव नाही बघितलास? अरे काही सोशल अवेअरनेस आहे की नाही?"
फेसबुक वर 'कॉज'ला लाईक करणे, 'मी अण्णा' टोपी घालणे, ऑनलाईन काहिसाश्या 'चळवळींवर' आय सपोर्ट सह्या (क्लिक)करण्याबरोबरच "सत्यमेव जयते" हे सोशल अवेअरनेस असण्याचे नवे परिमाण झालेले दिसते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धनिक-वणिक बाळांच्या प्रतिक्रिया
धनिक-वणिक बाळांकडून माझ्यापर्यंत आलेल्या काही प्रतिक्रिया (त्या प्रातिनिधिक आहेत असा माझा दावा नाही; पण असाव्यात असं मला वाटलं.)
बकवास शो. (मध्यमवयीन पुरुष. स्वतःचा व्यवसाय आहे.)
पचपचीत शो. (मध्यमवयीन पुरुष. नोकरदार.)
मला ऑलरेडी डायबेटिस आणि ब्लड प्रेशर आहे. मी असले शो पाहत नाही. आधीच असलेल्या टेन्शनमध्ये उगीच आणखी वाढ! (मध्यमवयीन गृहिणी. सासू-सून मालिका पाहते.)
मी पाच मिनिटांत टीव्ही बंद केला. असलं काही पाहायची अजिबात इच्छा नाही. (मध्यमवयीन पुरुष. नोकरदार. टीव्हीवर मुख्यतः क्रिकेट सामने आणि बातम्या पाहतो.)
पाच मिनिटांत टीव्ही बंद केला ही प्रतिक्रिया आणखी ३ मध्यमवयीन पुरुषांकडून आली. कारण सांगितलं नाही.
टेन्शन वाढेल असे कार्यक्रम पाहात नाही ही प्रतिक्रिया आणखी २ मध्यमवयीन स्त्रियांकडून आली. त्यापैकी एक नोकरदार आणि एक गृहिणी होती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वेगवेगळ्या प्रतिक्रीया
सत्येन यांचा लेख वाचला. लेख रोचक काही तरीही काही मुद्द्यांबाबत असहमती आहे. सत्येन आणि या लेखात अनुमान साधारण एकसारखेच आहे पण निरीक्षणे वेगळी आहेत.
सत्येन यांच्या
मता पेक्षा मी दिलेल्या दुव्यातील मतं जास्त पटण्यासारखी आहेत.
सत्येन यांचा लेख आमीर कसा चलाखीने 'कॅश इन' करण्याचा प्रयत्न करतो आहे असे म्हणतो तर उलट रेडिफच्या दुवा मात्र आमीर हा शो करताना भावनिक जास्त झाला* आहे आणि अशा शो करता लागणारे 'प्रोफेशनलिझ्म' पुढील इपिसोडमध्ये तो काळजी घेईल अशी आशा व्यक्त करतो.
*सत्येन मात्र या शो वर असा सेन्सेशनलिझ्म मुद्दाम आणल्याचा आरोप करतात.
दोन्ही दुव्यांवरती फक्त टीव्ही पाहून काही होणार नाही हे मत व्यक्त केलेले आहेच. पण त्यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण फक्ट टीव्ही पाहुन काही होत नाही म्हणून टीव्हीचा वापर करून जनजागृती करणं निष्फळ आहे (किंवा जनजागृती होणं शक्य नाही, इ.) वगैरे म्हणण्या मागे काही तर्क मला दिसत नाही.
सत्येन यांनी आमीरखानच्या वैयक्तिक भुमिकेबाबत घेतेलेल आक्षेप रास्त आहेत असे वाटते (लेखातील गोष्टी खर्या आहे असे मानून). पण एकंदरीत सत्येन यांचा लेख आमीरचे हे कार्य तुम्हाला फसवत आहे असे सुचवत आहे असेच वाटत राहते. पण तसे असेल तर का याचे मात्र सबळ कारण मला सत्येन यांच्या लेखात मिळाले नाही. उलट रेडिफवरचा लेख कार्यक्रमावर टीका करतो. त्यातल्या त्रूटी दाखवतोच मात्र मुख्य उद्देशावर(जागृती) शंका घेताना दिसत नाही. सत्येन यांच्या लेख या सर्व कारणामुळे मला जास्त एकांगी वाटला. असो.
बाकी जंतू म्हणतात त्या आमीर-चाहत्या-वर्गाची लक्षणं असणार्या काही लोकांकडून "आमीरच्या सोडलेल्या बायकोला पुढच्या वेळेला शो वर बोलाव" वगैरे प्रतिक्रीया मला मिळाल्या त्याच बरोबर बहुसंख्य (त्याच वर्गाकडून) अपेक्षीत प्रतिक्रीयाही मिळाल्या.
थोडक्यात, आमीर खानच्या (आणि कार्यक्रमाच्या) हेतूबद्दल शंका व्यक्त करणार्या एकंदरीत प्रतिक्रीया का उमटल्या आहेत याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. कार्यक्रमावर केलेल्या बहुतेक टिका मात्र मला पटण्यासारख्या आहेत.
-Nile
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमिर खानला या सर्व डॉक्टरांच्या चौकशीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. आजतकच्या संस्थळावरून
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे झालं(प्रत्यक्षात) तर खरेच
हे झालं(प्रत्यक्षात) तर खरेच कार्यक्रमाला श्रेय द्यावं लागेल, पण बहुदा पुढच्या एपिसोडच्या आधी ही बातमी प्रसारीत होणं सहज वाटत नाही.
थांबा जरा!फास्ट ट्रॅक कोर्ट
थांबा जरा!
हे एका राजकारण्याचे आश्वासन आहे. सध्याच्या जनमताच्या लाटेमुळे त्यांना तसे देणे भागच होते.आश्वासने पूर्ण न करण्यात राजकारण्यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
पण लगेच मी नकारार्थी सुर लावतोय असाही समज करून घेउ नका. फक्त 'वेट अॅन्ड वॉच' एवढेच म्हणणे आहे.
- (आश्वासनं देऊन पाळणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
प्रश्न आश्वासनाचा....
"हे एका राजकारण्याचे आश्वासन आहे....."
~ सोकाजीराव, तरीही असू दे. निदान या कार्यक्रमामुळे गेली ७ वर्षे 'पेन्डिंग' नावाखाली धूळ खात पडलेल्या त्या फाईल्सला शासकीय हात तरी लागेल, या निमित्ताने...अशी आशा आमीर खानच्या त्या भेटीने निर्माण होत असेल तर तिचे एक सुजाण नागरिक या नात्याने आपण शाब्दिक स्वागत तरी करू या. श्री.गेहलोत याना खरोखरीच 'जाग' आली असेल तर त्या दोन पत्रकारांच्या मागील 'अरेस्ट वॉरन्ट' चे भूत तरी गाडले जाईल.
प्रत्येक गोष्टीकडे केवळ 'न' भूमिका घेऊनच आपण पाहू लागलो तर श्वास घेणेही मुश्किल होऊन बसेल.
अशोक पाटील
अशोकजी, आपल्या मताशी एकदम
अशोकजी, आपल्या मताशी एकदम सहमत आहेच!
म्हणूनच हे "लगेच मी नकारार्थी सुर लावतोय असाही समज करून घेउ नका" वाक्य माझ्या प्रतिसादात टाकले होते.
बहुदा "डिस्क्लेमर" असे म्हणून टाकले असते तर अधोरेखित झाले असते
- (B+ ह्यावर गाढ श्रद्धा असणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
तरीही
वरती एका प्रतिसादात मी "तरीही या शो चे फायदे" अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला आहे त्यात हा मुद्दा लिहायचा राहिला. (सदस्य)मी म्हणतात त्याप्रमाणे हे 'सहज' नसेलही. सहज नसेल तर काय असेल?
पर्याय १. आमीर आणि स्टार ग्रुपची चलाख मार्केटींग खेळी
पर्याय २. गेहलोत यांची आमीरच्या लोकप्रियतेला कॅश करून राजकीय फायदा करून घेण्याची खेळी
दोन्ही पर्याय जागृतीच्या दृष्टीने विशेष तोट्याचे (फायद्यापेक्षा) नाहीत. अशा कार्यक्रमामुळे असे अप्रत्यक्ष फायदे या सामाजिक प्रश्नांना होतील हे साहजिकच आहे. एकूण कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे इतर सेलीब्रीटी+बिझनेस ग्रुप एकत्र येऊन अशा प्रकारचे शो निर्माण करतील कदाचित. (अर्थात, नफा हा प्राथमिक उद्देश असे गृहित धरू) त्यामुळे जंतू म्हणतात त्याप्रमाणे 'जागृती' फक्त आमीर खान चाहत्या वर्गांबरोबरच सलमानादी चाहत्या वर्गांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढेलच.
राजकीय नेते या कार्यक्रमाद्वारे आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करतील. हा प्रयत्न म्हणजे त्यांना गेहलोत यांनी घेतले असे काही निर्णय जाहिर करावे लागतील आणी नंतरच्या परिस्थितीनुसार निर्णय अमलातही आणावे लागतील. लोकशाहीतील लोकांकडे असलेल्या कंट्रोल बटनाचे हे प्रात्यक्षिक आहे असे म्हणले तर अतिशयोक्ति व्हायला नको.
तस्मात, हे सहज नाही असे म्हणताना फक्त निगेटिव्ह विचार करणं न्याय्य होणार नाही.
-Nile
आमीर जयपूर भेट
निलेश...... तुम्हाला माहीत असेलच की, आजकाल मंत्रालयात मुख्यमंत्री शिंकले तरी ती 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून डझनावारी चॅनेल्सवरून झळकते, तेही त्या शिंकेचा जोर कमी होण्यापूर्वीच. मग सध्या देशात सर्वत्र (चांगल्या अर्थाने असो वा अन्य कोणत्याही) नाव झालेला एक सुजाण अभिनेता लोकप्रश्नासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटायलो येतो आणि ते भेट देतातही; तर ह्या भेटीच्या बातमीचा पाठलाग करण्यासाठी कॅमेर्यांची फौज त्या मागे धावणे हा त्यांच्या व्यवसायाचा एक अटळ असा भागच होईल ना ? असे असेल तर मग त्या कृतीला आमीर आणि स्टार ग्रुपची मार्केटिंग (त्यातही चलाख) खेळी कशी म्हणता येईल ?
दुसर्या एपिसोडला तर कसल्याही कॅनव्हासिंगची जरूरी नाही इतके होकारार्थी वातावरण देशभर त्या पहिल्याच एपिसोडने केले आहे हे कार्यक्रमाचे समर्थक तसेच विरोधकही मान्य करतील. त्यामुळे केवळ हवा गरम आहे तर पोळी भाजून घ्या अशा वृत्तीने आमीर नक्कीच जयपूरला गेला नसणार. त्याच्या प्रयत्नाचे फळ काय मिळणार असेल समाजाला ते येणारा काळच ठरवील; तरीही मेडिकल व्यवसायातील अपप्रवृत्तीना आळा घालण्याचे प्रयत्न करू इच्छिणार्या त्या दोन शोध पत्रकारांसारख्या अनेकांना यातून जर स्फूर्ती मिळत असेल तर त्याचे श्रेय तरी आपण आमीरला देऊ या.
"या देशात कधीच काही चांगले घडणार नाही म्हणजे नाही...." हाच उदासवाणा सूर आळवण्यात तर काय अर्थ ?
अशोक पाटील
गफलत
बहुतेक मी प्रतिसाद नीट लिहला नाही.
असे मी म्हणतो आहे असे तुम्हाला वाटले असल्यास मी प्रतिसाद नीट लिहला नाही हे कबूल करतो. पण मी उलट म्हणतो आहे. वरती झालेली एकंदर चर्चा पाहता मी हा(गेहलोत) मुद्दा निगेटीव्ह पणे घेऊ नका असेच सुचवतो आहे.
असे म्हणण्याचे कारण वर झालेली चर्चा आणि चर्चे आलेले दुवे (उदा. सत्येन यांचा लेख). माझ्या म्हणण्याचा असा उद्देश आहे के समजा आमीर खान आणि स्टार ग्रुप यांनी लोकप्रियता वाढवण्याकरता गेहलोत यांच्याशी 'डील' करून गेहलोत यांचे निर्णय जाहिर करणे घडवून आणले असेल, तरीही त्याचे फायदे तोट्यापेक्षा जास्त आहेत. (असे करण्याची या कार्यक्रमाला गरज आहे की नाही हा मुद्दा अलाहिदा.)
-Nile
सर्वसमावेशक विधान
"या देशात कधीच काही चांगले घडणार नाही म्हणजे नाही...." हाच उदासवाणा सूर आळवण्यात तर काय अर्थ ?...."
~ नोप. हे वाक्य एक जनरल विधान असून ते जालीय विश्वाशिवायही अन्यत्र प्रसृत झालेल्या मतांना उद्देश्यून होते....तुमच्या प्रतिसादात तसा विचार उमटला आहे असे मला बिलकुल सुचवायचे नव्हते. फक्त (योगायोगाने) माझ्या प्रतिसादात ते सहजगत्या आले इतकेच.
गेहलोत, आमीर, स्टार ग्रुप यांच्या "डील" संदर्भातील वाक्यात तुम्ही 'समजा' असे म्हटले आहे ते ठीक झाले. कोणत्याही प्रकारच्या शक्यता गृहीत धरता येत असतात हे मान्यच. व्यक्तीशः मला अशा कोणत्याही 'डील' चे बीजारोपण आमीरने केले असेल असे वाटत नाही....तशी त्याला गरजदेखील पडली नसेल.
अशोक पाटील
काव्यात्मक न्याय
एकाच एपिसोडवरुन काही निष्कर्ष काढणे नकारात्मक वाटेल, म्हणून थांबतो.
>राजकीय नेते या कार्यक्रमाद्वारे आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करतील. हा प्रयत्न म्हणजे त्यांना गेहलोत यांनी घेतले असे काही निर्णय जाहिर करावे लागतील आणी नंतरच्या परिस्थितीनुसार निर्णय अमलातही आणावे लागतील. लोकशाहीतील लोकांकडे असलेल्या कंट्रोल बटनाचे हे प्रात्यक्षिक आहे असे म्हणले तर अतिशयोक्ति व्हायला नको.
काव्यात्मक न्याय म्हणून ह्याकडे पहायला हरकत नाही.