भेट हवी की भेटवस्तू ?
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे. यथावकाश यजमान मंडळी त्या हिशेब वहीची बारकाईने तपासणी करत. अशा तऱ्हेने लग्नसमारंभाच्या देण्याघेण्याचा हिशेब यजमानाच्या स्मृतीत व्यवस्थित नोंदला जाई. याप्रकारे ‘लग्न हा एक बाजार असतो’ या विधानाला पुष्टीच मिळत असे. लग्नातील ही भेटवस्तू संस्कृती पूर्वापार चालू होती.
साधारण १९८० च्या दशकामध्ये शहरी भागांतील लग्नांमध्ये यावर विचारमंथन होऊ लागले. सुशिक्षित व नवमतवादी तरुणांना या पारंपरिक पद्धती मधले काही दोष चांगलेच खटकू लागले. ढोबळमानाने ते दोष असे होते:
१. एखाद्याने आपल्याला दिलेल्या भेटवस्तूची अंदाजे किंमत आपल्या मनात पक्की नोंदली जाते आणि यथावकाश त्याच्याकडील कार्यात त्या हिशेबी वृत्तीनेच आपण भेटवस्तू देतो. विशेषतः नातेवाईकांमध्ये तर ‘फिट्टम फाट’ होणे फार गरजेचे असते !
२. वस्तूऐवजी रोख रक्कम देणारे लोक आपण किती कुटुंबीय लग्नाचे जेवणार आहोत त्या हिशेबाने ती रक्कम ठरवत. अगदी जेवण्याच्या ताटाचा अंदाजे दर गुणिले आपली माणसे असा व्यवस्थित हिशेब असे!
३. एकूणच देण्याघेण्याच्या वस्तू या दुय्यम दर्जाच्या असतात.किंबहुना ती वस्तू विकत घेताना दुकानदारही तसे सांगूनच देतो. समजा, त्याच प्रकारची वस्तू जर का आपल्या स्वतासाठी घ्यायची असती तर आपण ती नक्कीच वरच्या दर्जाची घेतली असती.
४. तसेच, जेव्हा एखाद्याकडे अशा ठोकळेबाज भेटवस्तू साठतात तेव्हा त्या स्वतःसाठी वापरण्याऐवजी अन्यत्र ‘फिरवण्यासाठीच’ घरच्या माळ्यावर साठवल्या जातात.
५. भेटवस्तूच्या किमतीवरून यजमान ती देणाऱ्या व्यक्तीची ‘आर्थिक लायकी’ ठरवतो. ही मनोवृत्ती तर खूपच खटकणारी. त्यावरून घराघरात होणारे मानापमानाचे संवाद तर ठरलेलेच.
६. एकूणच काय, तर भेटवस्तू देताना धनाढ्य माणसाला आपली श्रीमंती दाखवता येते तर गरिबाला मात्र मनातून चोरट्यासारखे वाटते.
वरील सर्व गोष्टी टाळण्याच्या उद्देशातून ‘भेटवस्तू नकोत’ हा विचार पुढे आला. असा विचार करणाऱ्यांनी सुरवातीस निमंत्रण देताना सर्वाना तसे तोंडी सांगून पाहिले. पण, केवळ या तोंडी आवाहनाने पूर्वापार चालत आलेली ही रूढी मोडणे खरेच अवघड होते. मग यापुढची पायरी होती ती म्हणजे निमंत्रण पत्रिकेत तसे स्पष्ट लिहिणे. अशा पत्रिकांमध्ये नेहेमीच्या मजकुराखाली ‘’आपली उपस्थिती हाच प्रेमाचा आहेर, कृपया भेटवस्तू आणू नयेत’’ अशी तळटीप झळकू लागली.
अशा प्रकारची पत्रिका मी प्रथम १९८५ मध्ये पाहिली. नक्की हा प्रकार कधी सुरू झाला याबद्दल मला कुतूहल आहे कारण, लग्नसमारंभांच्या बाबतीतला हा एक ऐतिहासिक बदल म्हणता येईल. माझ्या लग्नात मी या प्रकाराचे आनंदाने अनुकरण केले हे सांगणे नलगे. सुरवातीस निमंत्रितांकडून याला मिळणारा प्रतिसाद हा संमिश्र होता. परंपरावाद्यांकडून तर प्रखर विरोधच होता. त्यामुळे यजमानांना पत्रिका देताना अशांकडून ‘’विवाहाला रिक्तहस्ते कधीही जाऊ नये’’, ‘’तुमच्या विनंतीचा स्वीकार करायचा की नाही ते आम्ही बघू’’ यासारखी विधाने ऐकून घ्यावी लागत.
काही सनातनी तर ‘’तुम्ही जर आमच्याकडून भेट घेणार नसाल तर आम्ही लग्नाचे जेवायचे तरी कशाला?’’ अशीही मुक्ताफळे उधळत. समाजात कोणताही नवा विचार रुजवणे किती अवघड असते हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. मात्र, एकीकडे बरेच तरुण या विचाराने प्रभावित होत होते आणि त्यांचे पालकही याला राजी होऊ लागले. त्यामुळे ‘तळटीपयुक्त’ पत्रिकांची संख्या हळूहळू वाढत होती.
हळूहळू काही समंजस पाहुणे ही विनंती ऐकू लागले. मात्र, काही जण हट्टाने भेटवस्तू आणत तर अन्य काही फक्त पुष्पगुच्छ आणत. त्यामुळे यजमानही गोंधळून जात. अशा भेटी हट्टाने देणाऱ्याला मंचावर नकार देणे खूप जड जाई. नंतर निमंत्रितांचाही नक्की काय करायचे याबाबत गोंधळ होऊ लागला. काही जण भेटी देत असतील तर आपण तसेच कसे जायचे? मग काहीनी एक शक्कल लढवली. भेटवस्तू न नेता बरोबर फक्त रकमेचे पाकीट ठेवायचे आणि मग सगळे पाहुणे जसे करतील त्याप्रमाणे आपण करायचे. थोडक्यात, यजमान व पाहुणे या दोघांनीही बराच काळ याबाबत धरसोड वृत्ती अवलंबिली होती.
त्यानंतरची सुमारे १५ वर्षे ही याबाबतीत संभ्रमावस्थेची होती. कालांतराने शहरी पांढरपेशा वर्गात ‘भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ नकोत’ ही मनोवृत्ती चांगली रुजली. त्यामुळे अशा ‘तळटीपयुक्त’ पत्रिका सर्रास प्रचलित झाल्या.काही यजमानांची तर ‘’भेटवस्तू आणू नयेत, आणल्यास नाकारल्या जातील’’ इतके परखड छापण्यापर्यन्त मजल गेली. मग निमंत्रीतही त्या सूचनेचा आदर करू लागले. एक नवी सामाजिक संकल्पना समाजातील काही वर्गात तरी रुजल्याचे दिसू लागले. अशा समारंभांना जाताना पाहुण्यांना एक मोकळेपणा वाटू लागला. कधीही एखादे निमंत्रण आले तर ‘’आहेर काय द्यावा बुवा?’’ याचा विचारही करण्याची गरज संपली. लग्नाला निव्वळ उपस्थित राहणे हा निखळ आनंद ठरला. देण्याघेण्यापेक्षा एकमेकांना भेटणे व दिलखुलास गप्पा मारणे हे अधिक महत्वाचे असते, हेही मनात ठसवले गेले.
मात्र समाजातील अन्य काही वर्गांना मात्र या बदलाची दखल घ्यायची कधी गरज वाटली नाही. त्यांनी पारंपारिक राहणेच पसंत केले. त्यांच्यामते या समारंभात वस्तूंची देवाणघेवाण ही एक आवश्यक बाब असते. त्यात उगाचच काहीतरी नवे खूळ आणायची काही गरज नाही, यावर ते ठाम होते व आजही आहेत. या गटातील काही बुजुर्गांनी तर ‘’मला कोणाकडून काही नको’’ हा एक प्रकारचा अहंकार असल्याचा विचार मांडला. तसेच समाजातील श्रमिक वर्गाचे याबाबतीतले विचारही जुन्या परंपरेच्याच बाजूने राहिलेले दिसून येतात. कदाचित पुरेशी आर्थिक समृद्धी असल्याशिवाय ‘काही नको’ हा विचार पचवणे अवघड असावे.
तर, आजच्या घडीला यासंदर्भात शहरी समारंभांमध्ये काय दिसते? खालील प्रकारचे प्रतिसाद पाहायला मिळतात :
१. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप नसते त्या समारंभांना झाडून सर्व पाहुणे भेटी आणतात. याला म्हणायचे परंपरेचे पालन !
२. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप असते तिथे त्या सूचनेचे बऱ्याच अंशी पालन होते पण, अजूनही १००% नाही. काही पाहुणे( विशेषतः नातेवाईक) स्वतःला अपवाद करून लग्नापूर्वी किंवा नंतर यजमानाच्या घरी जाऊन भेटी देतातच.
३. अजून एक वेगळाच प्रकार गेल्या ५ वर्षात दिसतो आहे. यात यजमान ‘तळटीप’ जरूर छापतो पण, लोकांच्या घरी जाऊन निमंत्रण देताना मात्र एखादी छोटीशी वस्तू त्यांना पत्रिकेबरोबर देतो. आता यावर पाहुण्याने काय करायचे बरे? यजमानाला परतफेडीची अपेक्षा आहे असेच गृहीत धरावे लागते! मग प्रश्न असा पडतो की, जर देवाणघेवाण हवीच आहे तर ‘तळटीप’ छापायचे नाटक कशाला? केवळ फॅशन म्हणून?
‘ लग्नात भेटवस्तू हव्यात की नकोत’ या प्रश्नाचे उत्तर तसे अवघड असून तो एका चांगल्या चर्चा वा वादविवादाचा विषय आहे हे नक्की. आपल्याला जर वस्तूंची देवाणघेवाण हवीच असेल, तर तळटीप देण्याचे नाटक मात्र नको आणि जर तळटीप मनापासून दिली असेल, तर यजमान आणि निमंत्रित या दोघांनीही त्यानुसार वागण्याचे बंधन पाळावे हे उत्तम.
भेटवस्तूच्या औपचारिकतेपेक्षा एकमेकाला मनापासून भेटणे हाच तर समारंभांचा खरा हेतू असतो ना?
***************************************************************************
चर्चेचा आणि वादाचा विषय नाही॥
चर्चेचा आणि वादाचा विषय नाही॥ प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. इथे काही उत्तम गणले तरी तसे काही करता येणार नाही सर्वांना. जे लोक तळटिपा छापतात ते फ्याशन म्हणून छापत नसून ती त्यांची गरज असते.खरी गरज आमंत्रित पाचशे -आठशेवरून पन्नास करण्याची गरज आहे.
मी यापुढे आमच्याकडच्या
मी यापुढे आमच्याकडच्या समारंभांना तिकीट लावणार आहे. मग कळेलच की उपचार म्हणून किती, ओढ असल्याने किती आणि जेवायला किती येतात.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
थोडक्यात,
तुमच्या पत्रिका 'गोणेश्वर' छापखान्यात छापून घेणार म्हणा की!!!
वाद
अहो आत्तासुद्धा आहेरांची काटेकोर नोंद ठेवली जाते. चाळीस वर्षे का मागे जाताय?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
कोणालाही भेटवस्तू देणं म्हणजे
कोणालाही भेटवस्तू देणं म्हणजे माझ्या डोक्याला फार त्रास होतो. विशेषतः औपचारिकरीत्या भेट पाठवणं हा वैताग असतो. कारण आपण देऊ ते त्या लोकांना आवडेल का? हा प्रश्न भंडावतो. कुठेतरी काहीतरी अचानक दिसलं आणि माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला हे आवडेल असं वाटून ते भेट म्हणून देण्याचा आनंद वेगळा असतो. पण 'काहीतरी दिलं पाहिजे' या या सामाजिक बंधनातून दिलेली भेटवस्तू निवडताना मला फार त्रास होतो. त्यामुळे कोणाला काही देताना मी पैसे किंवा काहीतरी वापरून संपवण्याची गोष्ट देण्याकडे माझा कल असतो - वाईनची बाटली, चॉकोलेटं वगैरे वगैरे.
सुदैवाने मला फार वेळा लग्ना-मुंजींना जाण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण मला नेहमी वाटतं, की अशा वेळी अहेर देताना एखादी 'आय ओ यू' नोट देता आली तर किती बरं होईल! म्हणजे माझ्याकडे काही समारंभ असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीने ती परत करायची. काहीच देणंघेणं शिल्लक राहाणार नाही. आणि नको असलेले टोस्टर्स रीगिफ्ट करून समाजात कधीच न वापरता फिरत राहाणार नाहीत.
आता अॅमेझॉन सारख्यांची किंवा
आता अॅमेझॉन सारख्यांची किंवा शॉपर्स स्टॉपसारख्यांची भेट व्हाउचर्स देता येतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असेच काहीसे अर्ग्युमेंट काही
असेच काहीसे अर्ग्युमेंट काही वर्षांमागे मिपावर मांडले असता गवि यांनी "भेटवस्तू, खर्च करून केलेले लग्नसमारंभ इ. मुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते" असा प्रतिवाद केला होता. त्याला काय उत्तर द्यावे हे तेव्हा समजले नव्हते. कदाचित आकडेवारीतून सांगता यावे की इकॉनॉमीतील या भागाचा हिस्सा कमी आहे इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिवाजी इतरांच्या घरी जन्मावा
शिवाजी इतरांच्या घरी जन्मावा त्याप्रमाणे याबाबतीत 'अर्थव्यवस्थेला चालना वगैरे द्यायची तर इतरांनी द्यावी'. मला निवड करणं या गोष्टीचा प्रचंड कंटाळा येतो. आयओयूऐवजी कॅशची किंवा चांगल्या दुकानांच्या गिफ्टकार्डांची देवाणघेवाण वगैरे करायला माझी काही हरकत नाही.
सहमत.
सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राघा, सहमत आहे. तसेही दुय्यम
राघा, सहमत आहे.
तसेही दुय्यम दर्जाच्या वस्तूंच्या देवाणघेवाणीतून आनंद मिळतच नाही.फक्त दुकानदारांचा फायदा होतो !
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
प्रथा तिच्यात होत गेलेला बदल
प्रथा तिच्यात होत गेलेला बदल फार उत्तम रीत्या मांडला आहे.
शुचि, धन्यवाद. 'तळटीप युक्त'
शुचि, धन्यवाद.
'तळटीप युक्त' पत्रिका सर्वप्रथम कधी छापली गेली असावी हे जाणण्याची उत्सुकता आहे. मी ती १९८५ मध्ये पाहिली. इतरांनी जरूर लिहा. मला तरी हा ऐतिहासिक बदल वाटतो.
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
म.म.द.वा.
ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही पण हे चांगले आठवते की म.म. दत्तो वामन पोतदार ह्यांनी सामाजिक बदलांचा आरसा म्हणून त्यांच्या विद्यार्थीदिवसांपासूनच्या आलेल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचा संग्रह केला होता.
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत
+१११११
बय्राचवेळा म्हणण्यापेक्षा ९८%
बय्राचवेळा म्हणण्यापेक्षा ९८% लग्नसमारंभांत दहा लोकंची तेरा मते पडतात.कित्येक गोष्टी एखाददोघांना पटल्या तरी प्रत्यक्षात अमलात येत नाही. उदा व्हिडिओ फोटोग्राफीच्या नावाखाली होमाची भडकलेली आग हे दृष्य आणि अगम्य ठाणाणा संगीतवाली सिडी चाळीस हजाराला पडते जी नवपरिणितही पाहात नाही हे सत्य असताना चार तास फ्लॅशचा भगभगीत उजेड पाडून का घेतात?
फोटो
लग्नाचे भलेथोरले अल्बम आणि त्यातले सॉफ्टलेन्स लावून काढलेले फोटो, हे प्रकरणही प्रचलित असे. हल्ली फोटो छापून घेतले जातात का फक्त सॉफ्टकॉप्या असतात?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हल्लीच्या प्याकेजात
हल्लीच्या प्याकेजात फोटोग्राफर येतो एच्डी कॅमेरे घेऊन. व्हिडीओ, स्टील सग़ळे तोच करतो. काही क्रीयेटिव्ह लोक्स नवराबायकोला लग्नाआधीच एखाद्या पार्कात रिसॉर्टात नेऊन शूट करतात. अल्ट्राक्रियेटिव्हवाले पिक्चर सिरियलसारखी थीम वगैरे बनवून(प्रेमप्रकरण टाईप, मित्रमैत्रिणी ग्यांग, पहिली झलक, नंतरचे फिराफिरी वगैरे टाईप) शूट करतात. हे इनपुट व्हिडिओला वापरतात. त्यात बॅग्राउंड म्युझिक, अॅनिमेटेड टायटल्स वगैरे दिली जातात. फोटो अल्बम ला करीझ्मा, फोटोबुक टाईपचे अल्बम्स असतात. वेगवेगळ्या विधीनुसार आधीच सांगीतलेल्या पोझनुसारच्या स्टील्सना फोटोशॉप करुन फुलपेज प्रिंट केले जातात. त्यात मेटॅलिक, टेक्शर्ड वगैरे पेपरवर प्रिंट हे अल्बम्स हेवी कव्हर वापरुन बाइंड केले जातात. ते जवळपास साड्यांच्या अल्बम्स प्रमाणेच दिसतात. हनिमून आटपून झाल्यावर तीनचार महिन्यानी बरच तगादा लावल्यावर एका छाणछाण बॅगमध्ये तो अल्बम, पिक्चरप्रमाणे कव्हर असलेली डीव्हिडी असा सगळा अहवाल जवळपास ३० हजार ते ५ लाखापर्यंत सादर केला जातो.
ले ले सेल्फी यार
आणि हनीमूनचे सेल्फी फेसबुकवर येतात की नाही?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
फेस्बुकावर टाकायला
फेस्बुकावर टाकायला फोटोग्राफरकडेच सॉफ्टकॉप्या मागतात.
हनिमून सेल्फी काय बघाया नाई आजपरेंत.
हनिमूनच्या सेल्फीवरून एक
हनिमूनच्या सेल्फीवरून एक किस्सा आठवला.
गुजरातेत ऑडिटला जायचो. एकदा कसल्यातरी जोडून तीन सुट्ट्या आल्या, तेव्हा आम्ही चौघं ऑडिटरं 'माऊंट अबू'ला गेलो. आमच्यातले दोघं अध्यात्ममार्गी असल्याने त्यांना तिथला प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रम बघायचा होता. उरलेले आम्ही दोघं त्या आश्रमात जेमतेम दहा मिनिटं टिकलो आणि काषायपेयाच्या शोधात तिथून कल्टी घेतली. (गुजरात ड्राय स्टेट आहे, त्यामुळे आमच्या जीवनाचा कोंडमारा होत असे.)
अबूच्या गाडीतळाजवळच्या एका कळकट बाराला आश्रय देऊन दोघे बाहेर बसलो होतो. ब्रह्मकुमार परतले नव्हते. आम्ही नुसतेच बसलेलो बघून परचूटण विक्रेते आम्हाला भंडावत होते. माझा जोडीदार जरा 'छैल छबीलो गुजराती' प्रकारचा असल्याने तो त्या विक्रेत्यांना अर्धचेष्टेने वाटेला लावत होता.
एक फोटोग्राफर मात्र सारखासारखा येत होता. शेवटी माझ्या सोबत्याने त्याला वन्सॅण्ड्फॉरॉल कटवण्यासाठी विचारलं, "कुछ वैसे फोटो है?"
फोटोग्राफर चक्क फुलला! म्हणे बरेच गुज्जे-मारे अबूला हनिमूनसाठी येतात. आणि घरच्या गोतावळ्यापासून पहिल्यांदाच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे असावं - एकदम चेकाळल्यासारखे वागतात. (पीडीए-सदृश भानगडी आम्हीही पाहिल्या होत्या अबूमध्ये.) त्या आठवणी असाव्यात म्हणून की काय - तिथल्याच फोटोग्राफरकडून फोटो काढवून घेतात. त्याने नमुना म्हणून एक-दोन दाखवले. अगदी तीन क्ष नसले तरी दीड-पावणेदोन क्ष तर नक्कीच होते.
तर हे असले फोटो तो गृहस्थ तीनशे रुपयाला विकत द्यायला तयार होता!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हाण्ण तेजायला
हाण्ण तेजायला
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दीड-पावणेदोन क्ष खरं तर
खरं तर हनीमूनला चाळीशीत पाठवावं/जावं तेजायला तरुणपणी हनीमून म्हणजे नुसतच टिक-टॅक-टो लर्निंग आणि तडजोड असते ओह येस्स्स्स आणि भरमसाठ फोटोज.
पन्नास-साठचं प्याकेज असतं जड
पन्नास-साठचं प्याकेज असतं जड अॅल्बम,सिडीसहीत.