सत्तेतली मिश्किली आणि विवेक
काल माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस क्लबात. त्यांनी "एक असाधारण वाचक" सादर केलं. हा "अॅलन बेनेट" लिखित ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उपस्थित राहणं हा नितळ सुंदर, निव्वळ अप्रतिम अनुभव होता. विविध भाषांवरची पुरंदरेंची हुकुमत , व त्या- त्या भाषेतलं सहित्य समजून घेणं हे सगळं तर त्यांच्याठायी आहेच पण एका भाषेतला मज्कूर दुसऱ्या भाषेत नेमक्या आशयासह पोचवणं हे काम लै अवघड. पण ह्या त्यातही वाकबगार आहेत.
असो.
तर कार्यक्रम काय आहे, कशाबद्दल असणारे, ह्याची माहिती म्हणुन हे वाचायला मिळालं होतं --
( हा एवढा परिच्छेद जssssरा जडबोजड वाटू शकेल. )
आपला सत्तारथ सुसाट वेगाने धावत राहावा म्हणून सगळेच सत्ताधीश एक प्रशस्त आणि सुरक्षित मार्ग तयार करत असतात. तो फक्त त्यांच्यासाठीच असतो, आणि तरीही त्यावरून सदसद्विवेक, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, संवेदना अशांसारख्या नावांची मांजरे वेळोवेळी आडवी जातच असतात. सत्तारथ सामान्यत: त्यांना चिरडून पुढे धावत राहतो; पण क्वचित एखाद्या सत्ताधीशाचे त्यातल्या एखाद्या मांजराकडे लक्ष जाते. अनवधानाने तो लगाम खेचतो. मांजर उडी मारून रथावर चढते; सत्ताधीशाच्या पायांमध्ये घोटाळू लागते; त्याच्या मांडीवर चढून बसते. नकळत रथाचा वेग मंदावतो एवढेच नव्हे, तर तो आपला मार्गच आता बदलणार अशी परिस्थिती निर्माण होते…
*‘एक असाधारण वाचक’*
*अॅलन बेनेट लिखित ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद*
साधारणत्: थीम अशीये --
इंग्लंडच्या राणीसाहेबांना हळुहळु वाचनाचा नाद लागतो. मूळचा त्यांचा स्वभाव प्रगल्भ असतोच, व्यक्तिमत्वात एक संवेदनशीलताही असते. पण त्याला पुरेसा वाव आजवर मिळालेला नसतो. म्हणजे, त्यांचं सगळं जगणं कसं कर्तव्य म्हणून जगल्यासारखं, भावनेपूर्वी कर्तव्याला स्थान देणारं. (काहिसं आपल्याकडिल "निष्काम कर्मयोगा"ची आठवण करुन देणारं.) त्यांच्या वागण्याबोलण्यातून त्या इंग्लंडच्या राणी आहेत, हे सतत जाणवणारं. तो आब राखला जाइल असच वागणं अपेक्षित. त्यांची चारचौघात मिसळायची वेळही ठरलेली, कार्यक्रमही ठरलेला. आणि त्यातली 'सहजता' , 'उत्स्फुर्तता' आणि 'एम्पथी' ही सुद्धा ठरीव,घोटिव आणि पदाची आब राखण्यासठी म्हणुन असलेली.
ती एका प्रगत, संपन्न, समृद्ध, 'सुसंस्कृत' देशाची नामधारी का असेना पण... प्रमुख. ती राणी. तिची ऊठबस देशोदेशींच्या व्हि आय पी लोकांसोबत. ती बहुश्रुत असल्याचं सगळ्यांना कसं "दिसलं" पाहिजे. तिला अर्थशास्त्र्य , समाज शास्त्रे, चित्रकला, संगीत, नाट्यकला, देशोदेशीचं लोकसंगीत, देशो देशीचे खास ' एक्झॉटिक ' खाद्यपदार्थ, ते खायच्या पद्धती, त्या पदार्थांचा इतिहास, अगदि कागदाची ओरिगामी , अन् उच्च दर्जाचं परफ्युम वगैरेही...ह्यातलं सगळच कसं माहित असल्यासारखं "दाखवता" आलं पाहिजे. तिचा परीघ अर्थातच ह्यामुळेच मर्यादित. बहुश्रुत, विविध क्षेत्रांतला "जाणकार" असण्यासाठी आपल्या आवडिंचं "अभिजातपण" मिरवण्यासाठी जितपत काठावरुन पाहिलेलं पुरतं; तितपतच तिनं करणं अपेक्षित. आणि तीही ते इमानेइतबारे करत आलिये. तिला संगीत, वाचन,चित्रकला ह्या सगळ्यात "नेम ड्रॉपिंग" करण्याइतपत माहिती असेलही. पण त्याहून अधिक खोलात ती शिरलेलीच नाही. बारकावे बघण्यास तिच्या व्यग्र/व्यस्त आखिवपत्रिकेतून तिला सवड नाही. शिवाय हे सगळं आवडतय म्हणून, मजा येत्ये म्हणुन सहजतेनंही व्हायला नकोय! नैतर ती फार खोलात शिरेल. तिच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होउ शकेल! तिला हाताखाली एक भलाथोरला स्टाफ आहे, सहायक आहेत. ती तिला असं काठाकाठानं कसं जायचं ते सांगणार. तिनं त्यांच्या सल्ल्यानं ते तेवढच करायचं. एकवेळ किंचित कमी केली मुशाफिरी तर ठीक; पण जास्त व्हायला नको!
हे असं का करायचं ? तर तिनं ' फोकस्ड ' रहायला हवं अशी तिच्या पदबद्दलची अपेक्सा. वेळप्रसंगी नोकरशाहीकडनं , ब्युरोक्रॅट्सकडून तिला कामही करवून घ्यायचय. तिला हे "काम करवून घेण्यावर" भर द्यायचाय. "टास्क मास्टर" बनायचय.
तिला विविध देश प्रमुख भेटतात, तेव्हा ती त्या त्या देशाबद्दल ठळक जे काय असेल ते आदल्या दिवशी विचारुन घेणार. दुसऱ्या दिवशी त्याबद्दल ठराविक आस्थेवाइक चौकशी करणार. तसच कधी कोणता पुरस्कार समारंभ असेल, इतर कोणत्या निमित्तानं एखाद्या सेलिब्रिटिला भेटायचं असेल, तर बरोब्बर होमवर्क ती करुन येणार. म्हणजे.... तिचा स्टाफ तिला तो कच्चा माल पुरवणार. ती उजळणी करणार. आणि दुसरे दिवशी चपखल तालीम केल्यानुसार रसिकता दिसू देणार. अर्थात ते सेलिब्रिटिही तिच्या सामाजिक्-राजकिय स्थानाला किंचित दचकूनच असणार. ते समोर तरी तिला अतिशय आदर दाखवणार. कृत्रिमता त्यांच्याकडूनही असणार. पण त्यांच्याबाजूनं तो अपरिहार्यतेचा भाग अधिक असणार.
जी गत ह्या जाणकारीची तीच गत तिच्या "सामाजिक भान" , "वंचितांच्या प्रती आस्था/सहानुभूती"ची. तशी ती विविध दुर्बल , संकटग्रस्त वगैरेंना मदत करणाऱ्या संस्थांना सढळ देणगी देतही असेल, किंवा कित्येक वाचनालयांची अन अनाथालयांची आश्रयदातीही असेल. पण मुळात ती खरोखर स्वत्: दारिद्र्यात, गरिबीत कितपत राहिली असावी ? किती पिढ्यांपूर्वी तिच्या पूर्वजांनी त्या वेदना, दु:ख अनुभवलं असेल ? काहीकाळ "दारिद्र्य पर्यटन " केल्यासारख्म त्यांच्यात मिसळून, फोटो काढुन ती परत तिच्या महालात येणार ए सी गाडीत बसून.
.
तर गंमत अशीये की आपल्याला पुरेशी जाण नाही; ह्याची मात्र तिला जाण आहे!
तितपत प्रगल्भ, समजूतदार ,चांगल्या मनाची,सज्जन आणि नेक ती आहे!!
ह्या सहजतेतल्या यांत्रिकपणाची, तालमीच्या उत्स्फुर्ततेची , आस्थेतल्या औपचारिकतेची ....तिला....जाणीव.... आहे.
.
तिच्या कारकिर्दीची आता दशकं उलटलित ह्या सगळ्यात. आणि कधीतरी तिला फिरताना आडवं येतं ते एक वाचनालय. फिरतं वाचनालय. त्याची पदसिद्ध आश्रयदात्री ती स्वत्:च आहे. तिच्याच देणग्यांवर चालणार्या अनेक वाचनालयांपैकी हे एक. पण आजवर कधी त्यात फार कधी शिरली नाही. इन फ्याक्ट असं काही अस्तित्वात आहे, हे ही तिच्या डोक्यात फारसं नसतं. निदान त्यावेळेपर्यंत तरी नसतं. मग सहज म्हणुन ती आत शिरते. तिथं कुणीसा नॉर्मन नावाचा तिच्याच स्वयंपाकघरात काम करणारा आचारी तिला भेटतो. पण तो स्वत्: पुस्तकवेडा आहे. त्याच्याशी बोलताना मग कधी नव्हे ते ती आख्खं वाचण्यासाठी म्हणुन एक पुस्तक उचलते. (ते बहुतेक आपल्याकडच्या दवणेंसारखं असावं, किंवा फार तर व पुं सारखं असावं.) ती एक नवशिकी वाचक आहे. आचारी हा त्या अर्थी तिचा गुरु आहे.(बहुतेक विशी तिशीतलं पोरगं असावं.) आणि ही नवशिकी शिष्या तल्लख बुद्धीची आणि उत्साहाची आहे, पंचाहात्तरी ओलांडली तरी.
आधी कसंबसं नेटानं अर्धी कादंबरी ती वाचते. मग धडपड करत नवं पुस्तक मागवते. ते कुणाच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या संघर्षाचे किस्से असतात. त्यात ती खिळते. मग कुठूनसं तत्वद्न्यानात्मकही तिच्या हाती लागतं. अल्लाद अल्लाद काठावरुन एकेक पाय रेतीत टाकत ती पाण्यात उतरते. तिला हे जितकं मिळतय तितकी उलट तिची भूक वाढतिये. कदाचित आपण सुरुवातच फार उशीरा केलिये असं तिला वाटतय. आता आयुष्यात "शिल्लक वेळ फार नाही" हा एक वास्तववादी पण काहिसा गडद विचारही तिथे डोक्यात घोळतोय.
तिला आता खरोखरच "भीषण वास्तव" म्हणजे काय असू शकतं हेही चाखायला मिळतय. "आता सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे ना" हे जर ती आधी एखाद्या युद्धग्रस्त पण शांत होउ लागलेल्या ( सिरिया इराक वगैरेसारख्या ) भागातल्या प्रतिनिधीला म्हणत असेल, तर आता तिला "परिस्थिती नियंत्रणात असण्याच्या पूर्वीची" परिस्थिती काय असू शकते हे दिसतय. आपण जे आयुष्य ग्रुहितच धरतोय, ते कसं कोणासाठी तरी पार अप्राप्य, किम्वा निदान दुष्प्राप्य आहे; आणि आपला सर्वसाधारण दिवसही कसा कोणासाठी असूयेचं कारण असू शकतो हे लख्ख समोर दिसतय. कुठं शौर्यांच्या गौरवकथांमागचे दडपलेले आवाजही ऐकू येताहेत. आजवर कर्तव्याला अधिक महत्व/प्राधान्य म्हणुन तिनं मनाची कित्येक कवाडं बंद ठेवली होती. ती एकेक उघडली जाताहेत. तिचा विवेक जागा होतोय.
.
अर्थात, सर्वात म्हणजे ...हे सगळं एका रात्रीत होत नाही! अगदि हळूवारपणे पण सतत एका दिशेने हे होतय. एखाद्या सर्वसाधारण अंगकाठीच्या पोरानं नियमित आणि चिवटपणं व्यायाम केला, घाम गाळला, अनेक दिवस कष्ट उपसले तर तो कसा पैलवान व्हायला लागतो; तसच.
हे एका झटक्यात होणारं नाही. ह्याचे दृश्य परिणाम दिसायला काही महिने किंवा कदाचित आख्खी वर्षं जावी लागतात.
एक चांगली बाब म्हणजे राणीतले बदल एका झटक्यात होत नाहीत. त्यात फिल्मिपणा नाही. खोटी वाटेल इतपत नाट्यमयता नाही. वास्तववादी पण मिश्किल टिप्पणी आहे. किंवा कधी कधी टिप्पणीही नाहिच. नुसतं बेरकी साळसूदपणानं घडलय ते तसं सांगण्याचा (पण मनातून वात्रटपणाचा) सूर आहे.
(अवांतर -- मराठी पिच्चर आहे "आत्मविश्वास" ह्या नावाचा. सचिन - अशोक सराफ - नीलकांती पाटेकर आहेत त्यात. त्यात एकदम knee-jerk म्हणावा तसा वागण्या-बोलण्यात फरक पडतो पमुख्य पात्राच्या. एकदम विरुद्ध टोकाचा स्वभाव बनतो त्याचा. तसं इथं नाही. )
.
ही "घटना" नाहिये, event नाहिये. ही प्रक्रिया/ process आहे. त्यामुळं सावकाश, संथ पण नियमित होणारी बाब आहे.
अर्थातच मग ह्या दरम्यान तिची यांत्रिकता श्रेष्ठ ठरवणारे सहाय्यक, कर्तव्यकठोर सिन्सिअर प्रामाणिक पण निष्ठूर अधिकारी, काही स्वार्थी व असूयाग्रस्त,मत्सरी कुटिल आत्मे, कुणी सल्लागाराचं काम करणारे ...असे अनेकजण ह्यात अडथळे आणू पाहतात. पण ही बाई मुळात खमकी. शिवाय ह्यांची मालकीण! तिला ते रोखू शकत नाहित.
.
मला हे सगळं जरासं एखाद्या अध्यात्मिक प्रवासासारखं वाटलं. तिचा स्वत्:बद्दलचा शोध वाटला. तिला पडलेले प्रश्न दिसले. त्यातून मिळणाऱ्या उत्तरातून पुढचे पडणारे प्रश्नही दिसले. सरतेशेवटी सगळ्या प्रश्नांना उत्तरं नसू शकण्याचा शांत स्वीकारही दिसला. सरतेशेवटी तिची तृप्ती जाणवली. तरिही सांसारिक जगात टिकून राहणं, बेरकी असणं , व्यवहारकुशल असणं हेही दिसलं. संवेदनशील बनली म्हणजे ती भोळसट बनलेली नाही. योग्यवेळी अधिकार तिला अजूनही गाजवता येतोय. तिची जरब आहे. हे सगळं जाणवलं. त्या खडुस व प्रेमळ, बेरकी व सालस , कडक/स्ट्रिक्ट व समजूतदार म्हाताऱ्या राणीआजीच्या मी प्रेमात पडलोय. मला माझी आजी आठवतिये. आणि कसंतरीच होतय.
असो. डोळे पुसतो आणि पुढचं सांगतो.
.
हे सगळं मला जरा प्रतीकात्मकही वाटतय. म्हणजे राणी हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. बलाढ्य देशाच्या सत्तेचं आणि त्यासोबतच तिथल्या समाजातल्या जाणत्या लोकांचं... त्या समाजाच्या conscience चं, विवेकाचं ते प्रतीक. आपण पुरेसं बलाढ्य आहोत हे सिद्ध केल्यावर, सरतेशेवटी सत्तेवर मांड पक्की बसल्यावर बलशाली, पावरफुल माणसाला शेवटी भूक कशाची असते ? तर आपण नुसतेच रासवट बलशाली नाहित; तर अगदि सुसंस्कृत आहोत; हे दाखवायची. "आम्हीच सर्वात बलाढ्य आहोत तेच बरे आहोत. इतर कुणी असते तर इतके सोबर राहिले असते का " असं बहुतेक ते कोणाला तरी सांगताहेत. ऐकणारं कुणी नसेल तर कदाचित स्वत:लाच सांगताहेत.
मला "सामना" पिच्चर आठवतो. त्यातला निळू फुल्यांचा "धोंडे पाटिल" आठवतो. तो जणु हजारोंचा पोशिंदा असतो; किंवा... असं स्वत: तरी मानत असतो. सामर्थ्यवान असतो. इतका हा पावरफुल साखरसम्राट वगैरे धोंडे पाटिल. तो त्या भुक्कड मास्तराला , श्रीराम लागूंना बाजुला का सारु शकत नाही ? त्याला आतुन काहिसं एक अप्रूप, स्वतःला त्या वेड्या -कफल्लक मास्तराशी जोडून घ्यायची इच्छा का असते? तो मास्तर इतकं अवघड जागचं दुखणं बनणार ह्याची लक्षणंही दिसत असतात. तरी मनातलं काहीतरी पुटपुटावं तसं तो मास्तरला "ऑफर " का देतो ?
"मास्तर इथच ऱ्हावा. आपण शाळा काढू. लोकांचं भलं करु. ते माझं नाव घेतील." असं म्हणत आपल्या मागाहून राहणाऱ्या नावाची काळजी का करतो ? एरव्हीचा त्याचा तो पक्का लौकिकाचाच, भौतिकाचाच विचार करणारा, पक्का स्वार्थी ,व्यवहारी स्वभाव कुठं जातो? "मागे राहुन गेलेली लिगसी" ह्याचा विचार करायची त्याला काय गरज पडते ?
कारण तेच. पुढच्या टप्प्यातली भूक. सुसंस्कृतपणाची आस.
थैमान घालत सुटलेल्या काली मातेनं सर्व संहार झाल्यावर कदाचित एकदा सरस्वती बनुन लोकांकडुन भीतियुक्त आदराऐवजी आपुलकीची आस धरावी; तसं काहिसं. अर्थात मी धार्मिक घरातला असल्यानं मला हे वाटत असेल.
.
गंमत तीच आहे. लेखक चलाख आहे. त्यानं थेट असं कुठं काहिच म्हटलेलं नाही. काय काय घडतय ते तो त्याच्या मिश्किल शैलीत तुमच्यासमोर टाकतो. त्याचा अन्वयार्थ तुमच्यावर सोडतो. तुमच्या आकलनानुसार, पूर्वग्रहानुसार अंदाजानुसार बाकिचा कॅन्व्हास तुम्हिच तुमच्या मनात रंगवणार. रंगवणार म्हणजे.... खरोखर तुम्ही तो स्वत्:हून रंगवत नाहिच. तो तुमच्याकडून आपोआप रंगवला जाणार. सरतेशेवटी रंगीत ब्रशच्या त्याच फटकाऱ्यांतून तुमच्या डोक्यात उमटणारं चित्र आणि माझ्या डोक्यात उमटणारं चित्र बरच वेगळंही असू शकणार.
त्या राणीनं पुस्तकं वाचायला सुरुवात केली तेव्हा आणी नंतर काही काळानं आणी मग अगदि शेवटी जी नावं, जे लेखक येतात ते बदलत जातात. तिचं मोठं, मॅच्युअर होत जाणं त्यात दिसतं. अर्थात त्या सगळ्यांची नावं, त्यांची पुस्तकं तुम्हाला माहित नसली तरी हे सगळं कंटाळवाणं होइल असं काही नाही. पण जर माहित असेल तर कदाचित 'बिटवीन द लाइन्स' तुम्हाला जास्त उलगडत जाइल.
.
मला ती राणी...ती आजी... ती राणीआजी फारच आवडल्ये. मधाळ आहे म्हातारी.
प्रतिक्रिया
काल श्री जंतू कृपेने मीही
काल श्री जंतू कृपेने मीही उपस्थित होतो . मनोबाची हि भेट झाली . कार्यक्रम बहारदार होताच .. बाकी मनोबा लिहिलंच .
थीम जाम रोचक आहे, मस्त प्र
थीम जाम रोचक आहे, मस्त प्रकार दिसतोय एकूण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उच्च पदावरील व्यक्ति
उच्च पदावरील व्यक्तींना सर्व क्षेत्रांशी थोडी तोंडओळख ठेवायला लागते हे खरे आहे. ह्या कथनामधील राणी मात्र केवळ तोंडओळखीच्या पुढे जाते.
अशी दोन उदाहरणे अलीकडे वाचण्यात/पाहण्यात आली. येथे नुकतीच 'Queen' ही ब्रिटनच्या महाराणीच्या नवी राणी होण्याच्या काळवरील सीरियल पाहण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षाशी ठरलेल्य पहिल्या भेटीच्या वेळी त्या भेटीची पूर्वतयारी म्हणून एका फिजिक्सच्या एका प्रख्यात प्राध्यापकाला बोलावून राणी त्याच्याकडून न्यूक्लीयर फिजिक्स, अॅटमबॉंब ह्या विषयांची माहिती करून घेते असा एक प्रसंग त्यात आहे. डी.आर.पेंडसे हे अर्थतज्ञ टाटा ग्रुपचे प्रमुख अर्थसल्लागार होते. त्यांच्या कामाचा एक भाग म्हणजे दररोज सकाळी जे आर डी टाटांना भेटून त्या दिवशीच्या वृत्तपत्रांतील आर्थिक महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा करणे हा होता असे मी कोठेतरी वाचलेले आहे.
Queen की "The Crown"?? नेट
Queen की "The Crown"?? नेटफ्लिक्सवरच्या क्राऊन मालिकेत एलिझाबेथ्-२ ला आपण राज्यघटनेबाहेर काहीच शिकलो नाही याचं शल्य असतं आणि तीही एका मुलाखतीआधी एका जाणकाराला बोलावून माहिती करून घेते. वर उल्लेखलेला प्रसंग त्या मालिकेत आहे असे आठवतेय..
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
हे सगळं मला जरा प्र
मनोबा, झक्कास लिहिलंयस.
संयुक्त राष्ट्रे, जागतिक ब्यांक यांची स्थापना का झाली त्याचे गमक हेच असावे.
भारी प्रकार आहे! पुस्तक नक्की
भारी प्रकार आहे! पुस्तक नक्की वाचणार!
आभार, मनोबा!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
धन्यवाद!
अनेकानेक आभार मनोबा. लेखन फार रसाळ झालं आहे.
कादंबरीचा अनुवाद कोणी केला आहे?
भाषांतर
भाषांतर (आणि वरचं सारभाष्य) - माधुरी पुरंदरे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
फार छान
फार छान लिहिलंयस मनोबा. भारी दिसतंय प्रकरण.
गंमत तीच आहे. लेखक चलाख
बस्सं क्या बात है मनोबा! अप्रतिम वर्णन
माझ्या डोक्यात असा एक प्रश्न आहे की एखाद्या चित्रकाराने काढलेले चित्र घ्यायचे व त्या चित्राच कॅनव्हास बदलला की पहाणाऱ्याचे त्या चित्राविषयीचे आकलनही बदलेल
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
अगदी आवडला लेख.
मूळ पुस्तक जे काही असायचे ते असो. पुस्तकपरिचय आणि अभिवाचनाचा परिचय आणि त्यावरचे भाष्य अतिशय आवडले. कुठलीही कृत्रिम शैली न पांघरलेली, अभिनिवेशहीन अशी सुंदर (मराठी) भाषा जालावर फारशी दिसत नाही. पुस्तक वाचले जाईल तेव्हा जाईल पण हे सारभाष्य मात्र पुन्हा पुन्हा वाचले.
फार छान लिहिलयस मनोबा.
फार छान लिहिलयस मनोबा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मनोबा ने उत्तम लिहिले आहे .
मनोबा ने उत्तम लिहिले आहे . त्याने लिहिलेल्याच्या हुन जास्त काही लिहिण्यासारखे नाही .
तरीपण अजून एक जाणवलेली गोष्ट लिहितो .
रूपांतरातील/ भाषांतरातील भाषा अत्यंत ओघवती आहे . कुठेही चुकूनही कानाला टोचत नाही (हा श्राव्य कार्यक्रम असल्याने कानाला लिहिले . )
शिवाय माधुरी पुरंदरेंचे वाचन / सादरीकरण हि अत्यंत उत्तम होते . ऐकत राहावे असे . कार्यक्रम जवळ जवळ पावणे दोन तास चालू होता , पण कुठेही एका मिनिटालाही कंटाळा सोडाच , पण ब्रेक असला तर बरे झाले असते असे वाटले नाही . त्यांचा आवाज अत्यंत श्रवणीय आहेच.
अवांतर : प्राचीन काळी ( नक्की आठवत नाही, पण १९६९-७१ मध्ये केव्हातरी असावे ) एका गायन क्लास च्या संमेलनाच्या वेळी त्यांनी गायलेले मालवून टाक दीप ऐकले होते तेव्हापासून मी त्यांच्या आवाजाचा फ्यान आहेच
आणि हो, हे त्या धाग्यावर का
आणि हो, हे त्या धाग्यावर का नाय टाकले मनोबा, कार्यक्रमाच्या? आम्हीही आलो असतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ढेरे सरकार , कार्यक्रम खाजगी
ढेरे सरकार , कार्यक्रम खाजगी होता , जाहीर नाही . म्हणून त्याने टाकले नसावे .
आभार , धन्यवाद
वाचक प्रतिसादकांना धन्यवाद.
@अनुप ढेरे -- मलाच फार आयत्यावेळी समजलं कार्यक्रम आहे म्हणून. मग घाईगडबडित निघालो आहे तसाच. शिवाय कार्यक्रम खाजगी होता. जाहिर नाही. पण हेच अभिवाचन माधुरी पुरेंदरेंनीच 'रिंगण ' मध्ये केलेलं आहे. तेव्हा अशा इतर उपक्रमांदरम्यान त्याचा प्रयोग पुन्हा होउ शकेलही, असा माझा अंदाज.
@अरविंद कोल्हटकर --
हो. सगळीच बडी बमंडळी हे करत असावीत.
@मस्त कलंदर --
Queen की "The Crown" हे ठरलं/सापडलं की सांग आठवणीनं :).
.
@गब्बर --
येस्. तसं वाटतं खरं. अगदि UNO हे नाव ठरायच्याही आधी, १९४३ च्या मध्यावर जेव्हा महायुद्ध संपलंही नव्हतं; तेव्हा दोस्तांच्या राष्ह्ट्रप्रमुखांनी जे निवेदन प्रसिद्ध केलं (तेहरान कॉन्फरन्स का कुठेतरी) तेव्हाही हीच उद्दीष्ट सांगण्यात आली होती. दुर्बळांचं संरक्षण आणी भलं करुत आम्ही वगैरे स्टाइलची. आणि अॅक्सिस देश जे होते , जपान जर्मनी वगैरे... तेही new world order अस्तित्वात आणुन अधिक 'न्याय्य' माम्डणी करु बघत होते जगाची.(सध्याची मांडणी अन्याय्य आहे, अशी भूमिका घेउन. जपान तर पराभूत राष्टांना co-prosperity zone वगैरेच्या करारात सामील करुन घेत असे.)
.
.
@आ.बा. अमुक मिहिर अनुप ढेरे आभार.
@ पकाकाका -- आय्डिया तर भारिये. नजरघोळाची, दृष्टिभ्रमाची (optical illusion) कैक चित्रं पाहिलित.त्या प्रकारात अजुन एक वेगळा उपप्रकार हा सामील करता येलसं वाटतं.
@राही -- थोडंबहुत इथं मांडायला जमलं असलच तर श्रेय माधुरी पुरंदऱ्यांचच आहे. त्यांनी इतकं रंजक करुन सांगितलं की सहज डोक्यात ठसत गेलं. आणि इथेही रा.घा, , मेघना वगैरे मंडळी कसं लिहायचं ह्याबद्दल टिप्पणी करत असतच. ह्यावेळी फक्त तिकडं अधिक लक्ष दिलं. (प्रकाशित केल्यावरही एक दोनदा वाचून पाहणं, काटछाट करणं, फार जास्त टिंबांचा उपयोग टाळणं, सोपे/प्रचलित मराठी शब्द असतील तर तेच वापरणं वगैरे.)
@ चिंज -- तुम्ही कधी लिहिताय तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते ? मला वाटलं तुम्ही लिहाल लागलिच.
बॅट्याचे विशेष आभार. त्याला जर काही बरं वाटलं लिहिलेलं तर आवर्जून तसं हरेक धाग्यावर कळवतो. त्या फीडबॅकचा उपयोग होतो अधिक सुधारणा करायला.
कारेक्रमाबद्दल --
तिथं एकूण तीसेक महिला होत्या. नऊ दहा पुरुष होते. ऑल्मोस्ट सगळेच ज्येष्ठ नागरिक प्रकारची मंडळी होती. सुमारे दोनेक तास कारेक्रम चालला.
कसलं मस्त लिहिलयंत तुम्ही
कसलं मस्त लिहिलयंत तुम्ही!! पुस्तक वाचायची उत्सुकता लागलिये आता. कुठे मिळेल हे पुस्तक? बूकगंगा वर?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
केवळ अप्रतिम!
मनरावांचा रसास्वाद अप्रतिम आणि मनाला (pun unintended) भिडणारा आहे। ह्या लेखनाचा आणखी एक विलोभनीय पैलू म्हणजे, ह्या अनुभवात त्यांना आपणा सर्वांना संमीलित करून घ्यावेसे वाटले। जेंव्हा एखादा अनुभव अनुभूतीच्या पातळीवर उतरतो, तेंव्हाच हे शक्य होत असावे। इतक्या उत्कृष्ट लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद।
आता दोन्ही कादंबऱ्या वाचणे आलेच।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
उत्तम
परिचय. मूळ पुस्तक आणि अनुवादही मिळवून-वाचायच्या-यादीत टाकला आहे.
नेमकं. याची आठवण झाली: http://www.keepcalmandcarryon.com/history/