घरचं जेवण
.
आत्ता जालवरती एक इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे फार दिवसापासून मिळालेलं नाही त्याची जाणीव झाली.
तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं.
परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं.
एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली.
.
गप्पा मारताना प्रथमच मला जाणवलं की "तिखट कांडायला कधी घेतेस" हे माझ्या आज्जीचं वाक्य आता दुर्मिळ होणार होतं.
गरम मसाल्याचा तिखट्-तेलकट वास पुन्हा नाकात शिरणार नव्हता.
माझी आई तिखट घरी बनवायची.(ते वाळक्या लाल मिरच्या आणून स्वतः दळून घेणं वगैरे.) पण अर्थातच माझी आजी आम्ही कसे मुसळानी गावाकडे हातानी कुटत असू मिरच्या(तुमच्यासारखं गिरणीतून आणत नाही) हे ऐकवायची.
ते दगडफूल का तमालपत्र का काहीतरी म्हणतात ते मसाल्याचं पान घरात आणून आम्ही "काळा मसाला" घरातच बनवायचो.
.
हळकुंड आणून घरगुती हळदही बनवली जायची.
.
अजून एक कुठलं तरी काहीतरी आणून आई औषधी म्हणून ठेवायची आंबेहळ्द म्हणे. नक्की कशासाठी वापरातात ठाउक नाही. पण घरात एका छोट्या बाटलीत तो प्रकार भरुन ठेवलेला असायचा. थोडंफार मध असायचं.(हे मात्र बहुतांशी हवाबंद असलेलं खरेदी केलेलच.)
.
आईच्या हातच्या साध्या फोडणीलाही आणि साधे वरणालाही स्वर्गीय चव. तृप्ती मिळालीच पाहिजे खाल्ल्यावर.
फोडणीही कोणती? तर नेहमी मोहरीचीच असे नाही, कधी जिर्याचीही असायची. क्वचित तुपाची फोडणी होइ.
आई कधी मुगाची खिचडी (दाल खिचडी) करी. त्यावर नुसतं चमचाभर तूप आणि सार. व्वा. हे आनंदी जीवनाचं सार.
.
मागची पाचेक वर्षे दाल फ्राय खातोय. तक्रर अशी नाही. तेही अन्नपूर्णेचच दान. पण अचानक कधी घरच्या वरणाची आठवण होते. चिंचगुळाचं वरण आंबट गोड, गुळमट चवीचं वरण. कधी साधे वरणाला नुसती जिर्याची फोडाणी आणि हल्काशी मीठ- मिरे मिश्रण भुरभुरलेलं.
टॉमॅटोचं आंबट वरण म्हणजे आमचा जीव की प्राण.
.
कधीकधी नुसतं "मुद्दा वरण", मुद्दा वरण म्हणजे हाटलेलं घट्ट वरण. आणी त्यावर घरी बनवलेला "काळा मसाला" मी हट्टाने घ्यायचो. तिखट लागायचं पण खायचोच. कधी कधी कच्च्या तेलासोबत मस्त लागायचं. पण हे घरी आवडायचं नाही.
.
लोणचं ही सुद्धा "विकत आणायची वस्तू " नव्हती. लोणचं ही "मुरवायची" कला होती.
.
लोणी-तूप हे विकत आणायचं असतं हे रूम वर राहू लागल्यापासून समजलं,. तोवर पिवळ्या रंगाचं "बटर" लोणी समजून खाल्लं नव्हतं. आई सायीचं दही लावायची. घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो.
आम्ही सायीचं दही घुसळून लोणी काढायचो. लोणी "कढवून" तूप काढायचो. तूप कढत असतानाही, कच्चं असतानाही त्यात चमचा बुडवून खायची आमची दांडगी हौस. त्याबद्दल धपाटेही खाल्लेत. तूप बनल्यावर खाली उरते ती "बेरी" खरवडून खायची. मस्त गुळासोबत टाकलीत तर क्या केहने!
माझी आवड पाहून शेजारच्या किनीकर अन वैद्य काकूही त्यांच्याकडे तूप- लोणी बनू लागलं की मला आवर्जून बोलवत.
"हल्ली आमच्याकडं असं आवडिनं खाणारं कुणीच नाही" असं काहीतरी काकू म्हणायच्या. "घरी दोन दिवस कुठला जिन्नस टिकू देइल तर शपथ" असं उलट आई म्हणायची. आईचा वैताग काकूंना आनंद वाटायचा.
ह्या काकूंच्या आदरातिथ्याच्या बदल्यात बाजारातून येताना त्याचं एखादं पत्र टाकणं, लगे हाथ आमच्या सामनासोबत त्यांचय खातेदारीवर त्यांचं सामान उचलणं अशी कामं करावी लागायची. घरगुती चविष्ट प्रकारांच्या मोबदल्यात ही कामं काहीच नवह्ती.
.
सणांना मजा असायची. पुरणाचे कणकेत उकडून तयार केलेले "दिंडे" नागपंचमीस मिळायचे. झोप येइस्तोवर हादडायचो.
गौरे-गणपतीतही खाणे हे स्वर्गसुख.
.
चैत्र महिन्याच्या आसपास कधीतरी कैरी आणि डाळ ह्यांचं आईच्या हातून जमलेलं ओलसर मिश्रण म्हणजे यंव रे यंव.
.
कधी कांद्याच्या पातीचा घोलाणा होइ. कच्च्या पाती कापून त्यावर थोडीफार फोडणी आणि मीठ. बस्स. मस्त लागायचं.
.
कधी कांद्य्चाच्या पातीची "भरडा भाजी " मिळे, तर कधी ढोबळा मिरचीचा भरडा. कुठलीही भरडा भाजी खावी तर दह्यासोबतच हे माझं तेव्हापासून तत्वच ठरलं. अमराठी रुम मेट्सच्या घरातही ह्यासदृश प्रकार बनत असावा. पण त्यांना ती वस्तू explain करताना मला नाकी नउ आले होते. डाळीचे पीठ आणि इतर भाज्या ह्यांचे मुळात कॉम्बिनेशन करावेच कशाल हेच तो विचारित राहिला. मला कधीच धड त्याला सम्जावता आले नाही.
.
पालक, मेथी, चुका, अंबाडी ह्यातली कुठलीही भाजी किंव तशी इतर कुठलीही रानभाजी पानात पडली तर पूर्वी चेहरा वाकडा होइ. पण नक्की हा प्रकार कधी आवडायला लागला ते सांगता येणार नाही.
परवा जाणवलेली गोष्ट म्हणजे मी चक्क चक्क अळूची भाजी आवडिने, मिटक्या मारत खात होतो! काय होतो मी, काय झालो मी.
.
बाहेरच्या कोशिंबीरिच्या चवीबद्दल सुरुवातीस माझी तक्रार होती. काहीतरी खटकत होतं. नंतर जाण्वलं मला ज्या कोशिंबिरीची सवय आहे, त्यात डाळ आणि दही दोन्हीही वापरलेले असतात. हाटेलात बहुतांश ठिकाणी दहि + काकडी/टोमॅटो/कांदा ह्यास कोशिंबीर म्हणतात. म्हणून मला त्रास होइ. नंतर अर्थातच त्यचीही सवय झाली.
.
कधी कधी मला आवडतो म्हणून भात कुकरमध्ये न करता भांड्यात शिजवला जाइ.(steam rice न करता boiled rice बने. आजही बहुसंख्य दाक्षिणाट्यांत घरी boiled riceच बनतो हे नंतर सहकार्याकडून समजले.) भांड्याला लागलेली खालची भाताची "खरवड" सुध्हा चविष्टच.
.
संक्रांतीला बाजरीच्या भाकर्या होत. दूध आणि गुळासोबत मस्त लागत.
कधी आळूचेसुद्धा भजे बनवले जात. मला आवडत.
.
हल्ली हळद, तिखट्,मसाला, लोणचे,लोणी(यलो बटर),तूप सगळं खरेदीच होताना दिसतं. त्यामुळे कामातही सुटसुटितपणा येतो असा मुद्दा सहकार्यांशी गप्पा मारताना निघाला.
.
पिठलं बाहेरचं खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी दोन्ही प्रकारचं पिठलं पूर्वीपासून बने. साधं (पुण्यातल्या काही मराठी हाटेलात मिळतं; मला आवडतं) तसं आणि दुसरं म्हणजे तव्यावरचं, दह्यातलं पिठलं. ह्याचीही खरवड मस्त लागाय्ची. आख्खा तवा खरवडून फस्त केला जायचा. पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का.
.
कढी...पिवळी कढी नि पांढरी कढी. वरती लिहिलेलं लोणी काढल्यावर उरतं ना त्या ताकाचीही कढी व्हायची. भरगच्च होइस्तोवर तीही हाणली जायची. बाहेर पडल्यावरही गुजराती-राजस्थानी थालीच्या निमित्ताने हा माझा आवडता पदार्ध मात्र मला कायम मनासारखा मिळत आला.
.
घरी बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.आठवतय तेव्हापासून जेव्हा केव्हा खायला मिळालं तेव्हा साधसंच पण छान असं मिळालेलं.
आता परत गेलो की भरडा भाजी, कढवलेलं तूप नि गरमागरम कढी ह्यावर तुटून पडायचं आहे.
"व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते ; कधी त्याला वैविध्यपूर्ण व्हेज जेवण मिळालं नस्सावं ह्या अंदाजाने वाईटही वाटतं.
.
--मनोबा
प्रतिक्रिया
भूतकाळात का?
तुम्ही भूतकाळात लिहिलेली वाक्ये आम्हाला भूतकालाइतकीच वर्तमानकालातही सातत्याने अनुभवण्याचे भाग्य लाभल्याने आम्हाला योग्य कुटुंबात जन्माला घालण्याबरोबरच आमची गाठ योग्य ठिकाणी मारल्याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार.
बाय-द-वे, आपले मंगल झाले आहे का? अजून नसावे अशी आशा आहे.
आपलाही भविष्यकाल उज्ज्वल ठरो ही सदिच्छा. हा लेख आपल्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे असे मानून चालतो.;) झाले असल्यास मात्र...असो.
क्या बात!!!
क्या बात!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मस्त
मस्त नॉस्टाल-जिया. सध्याचा काळ बराच खडतर दिसतो आहे.
शीर्षक - "आइच्या हातचं जेवण" असही चाललं असतं, पण विसूनाना म्हणतात त्याप्रमाणे (शुभ)(मंगल) झाल्यावर ते बदलेलं.
मनसोक्त स्मरण(चवींचे)रंजन
मनसोक्त स्मरणरंजन किंवा स्मरण(चवींचे)रंजन!
बाकी "करायचो" या सदरातल्या बहुतांश गोष्टी अजूनही घरी "करतो" या सदरात असल्याने जरा बरे वाटले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आश्चर्य
लेखाच्या पहिल्या परिच्छेदासच ठसका लागला.
आपणांस फारा दिवसांपासून इडली मिळालेली नाही? वाचून आश्चर्य वाटले.
नेमके कोठे राहता आपण? नाही म्हणजे, इडली आजकाल त्रिभुवनात कोठेही मिळते, अशी आमची समजूत होती, म्हणून विचारले.*
ती जुनीपुराणी 'उठाव लुंगी, बजाव पुंगी' मोहीम अखेरीस खरोखरच सफल झाली काय तुमच्याइथे? अरेरे! दुर्दैव तुमचे, अजून काय? (पण नसत्या लोकांना डोक्यावर घेतले, की हे व्हायचेच. सर्व्हज़ यू राइट.)
तळटीपा:
* आम्ही अनेकदा सपाटून हाणतो. उडप्याच्या हाटेलात जाऊन, नाहीतर मग घरीच. इडलीचे ताजेतवाने ब्याटर मिळते आमचेइथे डब्यातून**. डबा आणायचा, इडलीपात्रात ओतायचा, वाफ काढायची, हाय काय नि नाय काय! आणि एखादवेळेस नाहीच मिळाले, तर मग "मैं ने बनाया, 'गिट्स' से" आहेच. पण 'गिट्स'ला मजा नाही.
** नाही म्हणायला, तांदूळ नि उडदाची डाळ भिजवून, ग्राइंडरमधून काढून, त्यात यीस्ट घालून घरगुती ब्याटरही बनवलेले आहे एकदोनदा. बरे जमते, पण कोणी जर आयते देत असेल, तर घरी कोण बनवत बसतो? तर सांगण्याचा मुद्दा, (१) इडली त्रिभुवनात कोठेही मिळते (अटलांटात मिळते तर अटलांटिकपार पुण्यामुंबईत मिळत नाही हे पटायला थोडे कठीण जाते, शिवसेना-मनसे वगैरे नि तत्सम मंडळींनी समस्त उडप्यांस नि मद्राश्यांस पुण्यामुंबईतून हाकलून दिलेले असल्याखेरीज***), (२) आणि नाही मिळाली तर बनवता येते, आणि (३) इच्छा असेल, तर मार्ग दिसेल. (मराठी माणसात 'एंटरप्राइज़' नाही म्हणतात, तो हाच! इडल्या तर खायच्यात, पण स्वतःही बनवायला नकोत नि विकतचे गिळू घालणारा शोधायला बूडही हलवायला नको.)
*** नाही म्हणायला, आमच्या लहानपणी, आम्ही वाढलो त्या पिनकोड ४११०३० मध्ये मराठी माणसाने बनवलेल्या इडल्यासुद्धा मिळत असत, नाही असे नाही. केसरीवाडा (इंदूताई टिळक?) आणि नक्की आठवत नाही, पण बहुधा 'अनाथ हिंदू महिलाश्रम' किंवा 'सेवासदन' यांपैकी कोणतीतरी एक संस्था, यांच्या संयुक्त उद्यमाने, घरगुती खाद्यपदार्थांचे एक दुकान केसरीवाड्याच्या बाहेरच्या बाजूस चालत असे, तेथे मिळत. अगदी मद्राशी क्वालिटी नाही, तरी बर्या असायच्या. सांगण्याचा मुद्दा, मराठी माणूससुद्धा जर मनात आणले, तर बर्या - निदान खाता येण्याइतपत - इडल्या बनवू शकतो, नाही असे नाही. पण आधी (बोले तो, पुंगी वाजवण्याआधी) बूड हलविलेचि पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?
इडली
दुर्मिळ इडलीला म्हटलेले नाही. इडली पाहून काहीतरी आठवलं. ते "काहीतरी" फार दिवसात मिळालेले नाही.
"आपणांस फारा दिवसांपासून इडली मिळालेली नाही" असा निष्कर्ष निघत असेल तर तो चूक आहे; किंवा मांडण्यात गफलत असावी.
तसेही माझे वास्तव्य ज्या शहरात व त्यातील ज्या भागात आहे तेलक्षात घेता इडली चांगली इडली मिळणे हे सहजसोपे काम नाही, हे खरे.
पुण्यामुंबईत मिळत नाही हे पटायला थोडे कठीण जाते धागाकर्ता पुण्या मुंबैत असावा असा निष्कर्ष का काढला गेला असावा?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्पष्ट होत नाही
तसे असल्यास, ते पुरेसे स्पष्ट होणे इष्ट आहे. अन्यथा, केवळ दिलेल्या वाक्यांवरून असा ग्रह होणे साहजिक आहे, एवढेच नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो.
असे ठिकाण पृथ्वीतलावर असावे, हे पटावयास कठीण जाते. परंतु तरीही, तसे मानल्यास, 'मारी आंत्वानेत' नामक व्यक्तीने दिलेल्या ऐतिहासिक सल्ल्यातील तथ्याकडे आपले लक्ष वेधावेसे वाटते. (वस्तुतः, 'ऐतिहासिक' कशाकडेही आपले लक्ष मुद्दाम वेधावयाची फारशी गरज नसावी.)
हम्म्म... रोचक प्रश्न. थोडा तर्क लढवला.
काय आहे, पुणे नि मुंबई ही महाराष्ट्रातली त्यातल्या त्यात मोठी शहरे. सबब, गिरण्यांची संख्या इतर गावांहून अधिक. तेव्हा, छापातील धागे दळून घ्यायला गिरण्यांची उपलब्धताही तेथे इतर गावांच्या मानाने थोडी अधिक असावी, अशी अटकळ बांधली, इतकेच.
अर्थात, इतर गावांतही अशा गिरण्या अगदीच उपलब्ध नसाव्यात, असे नाही, आणि, आजकालच्या औटसोर्सिंगच्या जमान्यात, दळून घेणार्याने गिरणीच्याच गावी असले पाहिजे, असेही नाही; सबब, तर्कात चूभूद्याघ्याची पळवाट आहेच.
क्लीशे
अतिशय वैश्विक (मराठीत: 'युनिवर्सल'.) असे, 'क्लीशे' स्वरूपाचे विधान. लेखास 'बल्क' (की रफ़ेज?) पुरवून लेखाची लांबी वाढवण्यापलीकडे काहीही साध्य न करणारे. (मग ते कितीही खरे असले, तरीही.)
'अत्यंत दुर्जन, हलकट, पापी आणि दुष्ट म्हणजे काय, हे पहायचे, तर आमच्या मातु:श्रींकडे पहावे' अशा स्वरूपाचे वाक्य तमाम मराठी वाङ्मयात आजतायागत वाचलेले नाही, नि यापुढे वाचावयास मिळण्याची आशाही नाही. (मग प्रसंगी ते कितीही खरे असले, तरीही.)
आभार...
थोर विचार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सुधारणा
नाही म्हणायला, दुष्ट, हलकट नि पापी आयांची वर्णनेही मराठी वाङ्मयात वाचलेली आहेत, नाही असे नाही, हे वरील प्रतिसाद लिहिल्यानंतर लक्षात आले. आमच्या लहानपणी, बहुधा गिरगांवातून प्रसिद्ध होणारी अशी चोवीस पानी* पुस्तके पैशास पासरी या दराने** मिळत, आणि आमच्या माथी हमखास मारली जात. मात्र, त्या आया या 'थर्ड पार्टी' स्वरूपाच्या असत***, आणि हटकून सावत्र असत. तसेच, या सर्व 'द केस ऑफ द सावत्र**** मदर' छापाच्या वाङ्मयात, ही जी सावत्र आई असे, ती जिची रिप्लेसमेंट म्हणून यायची, ती सख्खी आई ही हटकून खूप लवकर मेलेली असल्याकारणाने, ती 'वरिजनल' सख्खी आई ही सद्गुणी की हलकट, याबद्दल पुरेसा विदा तुलनेकरिता कधीही उपलब्ध नसे, त्यामुळे सर्व सद्गुण हे 'काञ्चनमाश्रयन्ते'सारखे***** बाय डिफॉल्ट तिलाच (बोले तो, सख्ख्या आईला) येऊन चिकटत असत. 'कुमाता न भवति'सारखी (क्लीशेवजा) मिथ्यके ही बहुधा अशातूनच जन्माला आली असावीत. अन्यथा, मनुष्यात सर्व प्रकार आढळतात - सद्गुणी, हलकट वगैरे. आई ही काय 'मनुष्य' नव्हे?
असो. या सुधारणावजा उपसंहाराबरोबर ही टिप्पणी येथेच थांबवतो.
तळटीपा:
* पुस्तकांच्या पृष्ठसंख्येच्या तपशिलाबाबत चूभूद्याघ्या.
** पुस्तकांच्या दराच्या तपशिलाबाबत चूभूद्याघ्या.
*** बोले तो, लेखक (नि वाचक) सोडून तिसर्याच कोणाच्यातरी. यांपैकी कोणत्याही लेखकाने स्वतःच्या मातु:श्रींचे वर्णन अशा प्रकारे केलेले आम्हांस आठवत नाही. (टू देअर क्रेडिट, यांपैकी कोणत्याही लेखकाने वाचकाच्या मातु:श्रींचेही वर्णन अशा प्रकारे केल्याचे आठवत नाही; परंतु हा मुद्दा येथे अवांतर आहे.) त्यामुळे, "'अत्यंत दुर्जन, हलकट, पापी आणि दुष्ट म्हणजे काय, हे पहायचे, तर आमच्या मातु:श्रींकडे पहावे' अशा स्वरूपाचे वाक्य तमाम मराठी वाङ्मयात आजतायागत वाचलेले नाही" या आमच्या दाव्यास आम्ही अद्यपि धरून आहोत.
**** 'सावत्र' या शब्दास जो खटका आहे, नि प्रभाव आहे, तो 'स्टेप' या शब्दास नाही. निदान मराठीत तरी. अन्यथा, 'सावत्र'ला इंग्रजीत 'स्टेप' म्हणतात हे आम्हांसही ठाऊक आहे.
***** आश्चर्याची बाब म्हणजे, सदरहू सख्ख्या आईकडे सहसा काञ्चनही अभावानेच असण्याचा प्रघात असे.
अतिशय वैश्विक (मराठीत:
हे विधान
या विधानापेक्षा येडझवं क्लिशे आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
क्लिशे-क्लिशे मध्ये
क्लिशे-क्लिशे मध्ये वायझेडपणाची उतरंड नक्की कशी डिफाईन करणार ते सांगा बघू.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काळा मसाला
आम्ही बुवा (आम्ही बोले तो आमच्या मातु:श्री. सद्गुणी की हलकट, हा प्रश्न येथे अलाहिदा आहे. नि आमच्या मातु:श्री काळा मसाला विकत आणण्याकरिता अनेकदा बाय डिफॉल्ट आम्हालाच पिटाळत, म्हणून आम्हीसुद्धा.) हिंदुस्थान बेकरीवाले जे मेहेंदळे, त्यांच्या बंधूंचे दुकान बेकरीशेजारीच होते, तेथून विकत आणत असू. ते घरीच बनवत असत बहुधा. ('घरगुती आहे' म्हणून त्यांनी स्वतः सांगितलेले आम्हांस आजही आठवते.)
अहाहा! त्यांच्याकडे मिळणार्या त्या काळ्या मसाल्यास त्रिभुवनात तोड नाही. आजही त्या काळ्या मसाल्याची चव जिभेवर रेंगाळते. (आम्ही नुसताच दह्यात कालवून, चपातीबरोबर खात असू. आमचा फेवरिट. मजा येत असे.) आज मेहेंदळ्यांचे ते बेकरीशेजारचे छोटेखानी दुकान बहुधा अस्तित्वात नसावे; ते मेहेंदळेही आज हयात आहेत की नाही, कल्पना नाही. ('मग शिंच्या, या माहितीचा तिर्हाइतास आजमितीस उपयोग काय, नि घेणेदेणे काय?' पण ते असो.) पण त्या मेहेंदळ्यांच्या त्या काळ्या मसाल्याच्या आठवणीच्या सुगंधाने आसमंत आजही दरवळून येतो. त्या काळ्या मसाल्याने आमचे बालपण समृद्ध केलेले आहे, मसालेदार केलेले आहे. ('लेका, बालपण तुझे! त्यात तू काय, कोठे नि किती खाल्लेस, याचा आमच्याशी काय संबंध? नि बालपण काय, प्रत्येकालाच असते, अगदी तुझ्या ब्याकयार्डात वळवळणार्या त्या गांडुळालासुद्धा. ते गांडूळ तुला सांगायला येते काय कधी, की त्याने बालपणी किती नि कुठची माती खाल्ली नि त्याने त्याचे आयुष्य किती समृद्ध झाले ते? इयत्ता सातवी तुकडी "ब" मध्ये तूच गांडुळाच्या नावे घोस्ट-राइट केलेल्या "गांडुळाला जेव्हा वाचा फुटते"छाप निबंधाच्या बाहेर?' पण असो. ज्याचेत्याचे स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्तीचेही, आणि आपापल्या निबंधाचा विषय निवडण्याचेही. त्यामुळे चालू द्या. बोले तो, तुमचेही चालू द्या, नि आम्ही आमचेही चालू ठेवतो. कसें?)
अलाहिदा
लेखणी "तुमचं कॉपीप्रकरणात" मातु:श्रींच्या मुद्द्यावर अडखळली म्हणायची, तिथे अलाहिदा झालं एकदम!! -- पण असो. ज्याचेत्याचे स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्तीचेही.
?
१. येथे प्रतिसाद टंकताना आम्ही कळफलक वापरतो, लेखणी नव्हे, हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.
२. आमचा कळफलकाची गाडी मातु:श्रींच्या ठेसनावर अडखळली कशाने? मातु:श्रींच्या थांब्यावर अंमळ विसावून पुढे मेहेंदळे नि बालपणमार्गे गांडुळाच्या स्थानकाकडे भरधाव वेगाने प्रस्थान करती नाही झाली? (कदाचित आपण मातु:श्रींच्या ठेसनावर अंमळ उतरून गाडी चुकून मागे राहिले असावेत काय?)
३. आपण "कॉपीप्रकरण" म्हणता. आम्ही "प्रेरणा" म्हणतो. ज्याचेत्याचे स्वातंत्र्य आहे. शब्द निवडण्याचेही. असो.
अवांतर
१. तुमचा नम्रपणा भावला, तो मसल्याच्या स्टेशनावर नव्हता, नंतर गांडूळाच्या स्टेशनावर सापडला वाटतं.
२. तुमची गाडी अडखळली नाही, गाडीने अलाहिदाचा ट्रॅक घेतला, बहुदा नेहमीच्या रस्त्यावर काम चालू होतं.
३. प्रेरणा एखाद प्रतिसादात संपली नाही म्हणून कुतुहल वाटले, ते अजुन वाटतेच आहे.
प्रत्युत्तर
१. मसाल्याच्या ठेसनावर आमचा फार मोठा थांबा नव्हता, सबब वेळ नव्हता, हे नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो. (तसेही, आमचा नम्रपणा हा 'अॅट विल' तत्त्वावर चालतो, हेही नमूद करण्याची संधी येथे साधणे अनुचित नसावे.)
२. आमच्या गाडीकरिता 'अलाहिदाचा ट्र्याक' हाच 'नेहमीचा रस्ता' असतो, हे आपणास अद्याप लक्षात आले नसावे, याचे आश्चर्य वाटते.
३. दुसरी एखादी प्रेरणा मिळेपर्यंत (किंवा कंटाळा येईपर्यंत) हे असेच चालायचे. असो.
स्वादिष्ट मसाले करतांना लागणारे ठसके आपण विसरतोय का?
घरी बनवलेल्या पदार्थांविषयी प्रत्येकालाच असलेली ओढ समजण्यासारखी आहे. परंतु या सर्व स्मृतीरंजनात फक्त चांगलेच हरवले असा काहीसा भास होतो. खरेतर या सर्वांबरोबर एकत्र कुटूंबांत होणारी स्त्रियांची कुचंबणा, सुगरण नसल्यास होणारा मनस्ताप आणि एकूणातच काही समाजमान्य नृशंसपणाही हरवला आहे.
तसे नव्हे...
हरेक गोष्टींचे फायदे तोटे असतातच. बरं जे गेलय त्याबद्दल फार तक्रारिचा सूरही माझा नाही.
मुळात उल्लेख केलेल्या बहुतांश गोष्टी येण्यासाठी जगावेगळी अवघड अशी पाकृ करावी लागेल असे मला वाटत नाही.
"मुद्दा वरण" साधीशीच तर गोष्ट आहे.(मी स्वतः हल्ली आईला बनवून देतो उलट.)
शिवाय गृहिणीस इतरांनी मदत करावी ही अपेक्षा मला रास्त वाटते. त्यामुळेच
घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो.
गृहिणीस सहकार्य हे हवच. म्हणूनच
घरी बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.
जर स्त्री कामही करत असेल, मग तर अधिक सहकार्य मिळणे हा तिचा हक्क आहे.
.
लेखातून "पूर्वीच सर्व छान होतं आणि आता मात्र काहीही नाही" असं सूचित होतय का?
होतं काय, पूर्वी काय छान होतं, हे लक्षात घेतलं तर कित्येकदा त्यातील काही गोष्टी आपण अजूअन्ही करु शकतो, आपल्याल आवडत असतील नि झेपत असतील तर हे लक्षात येतं. पण त्यासाठी मुळात, आपल्याला काय आवडायचं हे तर आठवयाला हवं ना. जीवनाच्या रहाटगाडग्यात मी तेच दोनेक वर्षे विसरुन गेलो होतो. "साधी दाल खिचडी आवडते ना? घे की स्वतःच्या हातानी बनवून" असं स्वतःलाच म्हणालो आणि उत्तम दाल खिचडी करण्यास शिकलो.
पालकांना ती आवडलेली पाहून भरुन पावलो. अजूनही खावीशी वाटेत तेव्हा करतो. पण त्यासाठी सर्व व्याप सांभालून काय काय सामावून घेता येतय ह्यासाठी आपली आवड ठाउक असणं महत्वाचं.
"सांस्कृतिक ठेवा देशाला मिळावा म्हणून वनवासी, आदिवासी कीम्वा अन्य मागास ह्यांना प्रवाहापासून काळजीपूर्वक दूर ठेवावं" असा दृष्टीकोन माझा नाही.
(मला चांगलं खायला मिळावं, म्हणून दुसर्यानं स्वत्:च नुकसान करुन घ्यावं, मन मारुन जगावं, असे मी म्हणत नाही.)
.
पण अर्थातच "मला काय चांगलं खायला मिलायचं" ह्याची आठवण काढणंही चूक वाटत नाही.
--मनोबा
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आईवरून क्लीशे अवांतर
ह्या धाग्यावरचं आईपुराण पाहून काहीतरी आठवलं.
जे फार दिवसापासून मिळालेलं नाही त्याची जाणीव झाली.
तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई कर्तबगार गाय वगैरेच्या व्याख्येत येत होती.
कारण तिचं दुध, दुधाचा खरवस आणि तुप चक्क पुणे ४११०३० मधे विकलं जायचं.
पण तिच्या उत्पादनाचे ग्राहक सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सल असले म्हणून काय झालं.
आमच्या मातोश्री काही तशा नव्हत्या. चांगल्याच रागीट आणि लाथाळ होत्या.
आता पुणे ४११०३० मधे वाढलेले काही अश्रध्ध लोक असं म्हण्तील की रागीट आणि लाथाळ गाय ही क्लीशेच आहे.
पण ते असो.
आणि हो...
गाय लाथाळ असली तरी पवित्र असते.
गायीचं दुध आणि तुप पण यलो अस्तं.
म्हणून यलो बटरला हिणवू नये.
बैलांच्या आणि सश्रध्ध माणसांच्या भावना दुखावतात.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
आभार...
मी,विसुनाना, ऋषिकेश, क्रेमर आणि सर्व वाचकांचे आभार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझे खाद्य-पेय जीवन
खाण्यावर प्रेम करणार्यांसाठी....
http://sanjopraav.wordpress.com/2009/11/16/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हा ब्लॉग बरेच दिवस
हा ब्लॉग बरेच दिवस इनॅक्सेसिबल होता. पूर्ववत सुरु झाला आहे असे दिसते. आनंद झाला. आता मनसोक्त वाचता येईल. धन्यवाद.
नाँस्टँल्जिक!!! हे सगळं लहान
नाँस्टँल्जिक!!!
हे सगळं लहान असताना आजोळी अनुभवल आहे
अर्थात एका काडीचीही मदत न करता आणि नको तिथे लूडबूड केल्याबद्दल आजीचे धपाटे खाऊन
वरती क्रेमर यांनी म्हटल्याप्रमाणे ही सारी कष्टाची काम आहेत
आजी मावश्यांचा घामटा निघायचा
कंबर मोडेपर्यत कुटणं डोळे लालेलाल होईपर्यत भाजण असे प्रकार
फार मेहनतीची काम
एक नक्की या जुन्या बायकांना कितीही कष्ट पडले तरी हेच वाटण घाटण हवस वाटत
काय माहीत कसा जीव गुंतला असतो
आजही आजीला बाहेरचा मसाला आवडत नाही
विस्मृतीचा विकार असूनही ह्या जुन्या गोष्टी बरोबर आठवतात
स्ट्रेँज
असो लेख आवडला
.
छान स्मरणरंजन.
छान स्मरणरंजन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आहेस खरा खवय्या!
आहेस खरा खवय्या!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
तू है, नंबर एक खवैय्या!
असं कुठल्याश्या गोविंदा+कादरखानच्या पिच्चरमध्ये गाणं होतं ते आठवलं. ख च्या जागी ग घातल्यास वरिजिनल होतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'न'वी बाजू आणि काळा मठ्ठ बैल
'न'वी बाजू आणि काळा मठ्ठ बैल अंधारातला _/\_
लेख आवडला बरं का मनोबा. छान लिहीलाय.
लेख आवडलेला आहे.
लेख आवडलेला आहे.