सजले अंतर
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर
प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...
- कुमार जावडेकर
प्रतिक्रिया
कायमस्वरुपी वियोग ... सुंदर
कायमस्वरुपी वियोग ... सुंदर कविता
.
अतिशय सुंदर उपमा. पागोळ्यांचा आवाज फार गोड असतो. आमच्याकडे पागोळ्या नसतातच एकदम आयसिकल्स् अर्थात बर्फाचे सुळे असतात.
वा!
सुंदर विश्लेषण आणि चित्र...
आपले म्हणजे मूळ कविचे (तुमचे
आपले म्हणजे मूळ कविचे (तुमचे) विश्लेषण ऐकायलाही आवडेल.
मला मात्र आज ही कविता वाचताना फार उदास वाटले. बाबा आठवले. बाबांना आईबद्दल काहीसे असे वाटत असू शकते. त्यामुळे मी या कवितेशी तादात्म्य (आयडेंटिफाय) पावू शकले.
अर्थ
मला अभिप्रेत असलेला अर्थ -
गझलेत (किंवा कवितेतही) 'तू' हा एकाच वेळी अनेकांना उद्देशून असू शकतो. उदा. प्रेयसी आणि देव.
ही कविता देवाला उद्देशून आहे असा विचार करून बघा.
शेवटया कडव्यात हे स्पष्ट केलंय की तो वेगळा कुणी नाही तर आपल्याच अस्तित्व किंवा प्रवासाठी लाभलेला श्वास (प्रेरणा) आहे.
धन्यवाद
धन्यवाद