दुसरं लग्न
आपल्या आजूबाजूला बघितलं तर ज्या लोकांनी दुसरं लग्न केलंय (मग ते पहिल्या जोडीदाराशी फारकत घेऊन असो की जोडीदाराच्या पश्चात) त्या व्यक्तीविषयी/त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी आपलं मत त्या व्यक्तीची सर्वसाधारण पार्श्वभूमी बघून बनवतो. दुसऱ्या लग्नाचा निर्णय कितीही वैयक्तिक असो, लोकांची मते ही असतातच, आणि ती ते व्यक्तंही करतात. पुरुषाने पत्नी निवर्तल्यावर दुसरे लग्न करणे काही गैर मानले जायचे नाही (किंवा काही प्रसंगी दोन बायकाही असायच्या). पण विधवाविवाह मात्र सर्वमान्य नव्हता किंवा आताही तेवढा नाही. पण काळ बदलला आणि विधवाविवाहही व्हायला लागले. जोडीदाराची गरज भासणे साहजिक आहे, मग कोण्या व्यक्तीने वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लग्न करायचा निर्णय घेतला तर काय फरक पडतो? म्हणायला पडत नाही, पण सामाजिक दबावाखाली (म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून) कित्येक जण आपल्या इच्छा दाबून टाकत असतील.
माझे मत दुसऱ्या लग्नाला अनुकूल असेच आहे. पण ह्याचा अर्थ जर मी माझा जोडीदार गमावला तर लगेच दुसरे लग्न करेन असा नाही, किंवा माझे माझ्या जोडीदारावर प्रेम नाही असाही नाही. पण अश्या परिस्थितीत मला स्वतःला जर कुणाच्या सोबतीची गरज भासली तर माझी दुसऱ्या लग्नाला ना नाही किंवा इतर कुणी केले तरी माझा त्याला पाठिंबा असेल. प्रत्येकाची मते ही वेगळी असू शकतात, म्हणून हा चर्चा प्रस्ताव. तुमचे मत काय आहे हे जाणून घेण्याआधी मला काही उदाहरणे द्यावीशी वाटताहेत.
१. मागच्या आठवड्यात माझी बायको मला म्हणाली की तिने तिला सांगून आलेल्या एका मुलाला नकार दिला कारण त्या मुलाच्या वडिलाने काही दिवसापूर्वीच दुसरे लग्न केले होते. त्यांची बायको वयाने तशी बरीच तरुण होती. एकुलता एक मुलगा अमेरिकेत गेल्या सातएक वर्षांपासून काम करतोय. पहिली बायको चारेक वर्षापूर्वी देवाघरी गेली. माझ्या बायकोचं म्हणणं होतं की मुलगा लग्नाचा असताना ते स्वतः कसे काय लग्न करू शकतात? मला वाटते, मुलगा अमेरिकेत, बायको देवाघरी गेल्यावर त्यांना एकाकीपणा आला असेल. कामातूनही निवृत्त झाल्याने काही वेळ मित्रांबरोबर घालवल्यावर उरलेल्या दिवसभरात घर खायला उठत असेल. अश्यांवेळी कुणी हक्कांचा सोबती त्यांना हवा असेल तर त्यांचं काय चुकलं. माझं म्हणणं बायकोला काही अंशी पटलं तरी तिला अजूनही असच वाटतं की त्यांनी दुसरं लग्न करायला नको होतं.
२. माझ्या एका काकांनी, म्हणजे मावशीच्या नवर्याने, जवळ जवळ पंधरा एक वर्षापूर्वी ते पासष्टीचे असताना दुसरे लग्न केले. अर्थात मावशी देवाघरी गेल्यावर. ह्या मावशीला तीन मुली. तिघींचेही लग्न झालेले. काकांच्या डोक्यात वयानुसार थोडा फरक पडलेला, पण एकाही मुलीने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली नाही. मग काकांनीच एका चाळिशीत असलेल्या बाईंशी लग्न केले. गरज दोघांचीही होती. काकांना त्यांच्याकडे बघणारं, त्यांची खाण्यापिण्यापासून सगळी काळजी घेणारं असं कुणीतरी हवं होतं. आणि त्या नव्या मावशीलाही आधार हवा होताच. त्यांचा लग्नाचा निर्णय चुकला असं मला वाटत नाही. परंतू काही नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. आधार हवा होता तर एखादा नोकरमाणूस ठेवायला हवा होता म्हणतात. पण असा नोकरमाणूस २४/७ त्यांच्याकडे बघेल? शेती-धंद्यामध्ये, काकांची तब्येत ठीक राहत नसताना, काही घोटाळा न करता लक्ष घालेल? म्हणायला सोपे आहे, पण एकट्या माणसाच्या व्यथा त्यांनाच माहीत, नाही का?
३. अजून एक उदाहरण म्हणजे आमच्या शेजारी राहणारी एक ताई! तिशीच्या आतच मुलगा दिडेक वर्षाचा असताना तिचे यजमान एका अपघातात गेले. अख्खं आयुष्य घालवायचं आहे. जोडीदार हा असायला हवा. पण विरोधाभास म्हणजे, एवढी तरुण असतानाही तिला चालून आलेली स्थळं ४५च्या वरचीच होती. जे तिशीतले विधुर होते त्यांना पूर्वी लग्न न झालेली मुलगीच बायको म्हणून हवी होती. ज्यांनी संमती दाखवली त्यांनी मुलाची जबाबदारी घ्यायला नकार दिला. अश्या अवस्थेत त्या ताईने सध्यातरी दुसरे लग्न करायचा निर्णय रद्द केलाय. अशावेळी मला समाज कितीही सुधारला असं कोणी ओरडून सांगितलं तरी विश्वास बसत नाही.
मध्यंतरी आलेल्या उत्तरायण चित्रपटातही दुसऱ्या लग्नाचा मुद्दा चांगल्या रितीने मांडला होता. चित्रपट बघितल्यावर मुद्दा पटतोही. तरीही समाजात दुसरं लग्न केलेल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळाच, म्हणजे १००% स्वीकारणारा नाही. वयाच्या उत्तरार्धात केलेलं लग्न बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतं. शिवाय बऱ्याचदा दुसरं लग्न हे त्यांच्या कामुक गरजा भागवण्यासाठी केलेलं आहे असंही लेबल लावलं जातं. बाहेरचे सोडा पण घरातले लोकच काय म्हणतील हा प्रश्न दुसरे लग्न करणाऱ्या समोर असू शकतो. मुलांनाही आपल्या पालकांनी केलेलं दुसरं लग्न पटतंच असं नाही. त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो हसण्याचा विषय ठरत असेल म्हणूनही असू शकते. किंवा मूल लहान असले तर सावत्र आई किंवा सावत्र बाबा वाईट असू शकतील ही भावनाही त्यांच्या मनामध्ये रेंगाळत असण्याची शक्यता असू शकते. दुसरे लग्न करणाऱ्यासमोर बऱ्याच अडचणी असू शकतात, तेव्हा त्यांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते.
आता मला पडलेले काही प्रश्न.
तुमचं या विषयावर काय मत आहे?
तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का?
बऱ्याचदा दुसर्यांकडे असे काही झाले तर आपण त्याला दुजोरा देतो. पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल?
आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का?
लेखन थोडं विस्कळीत किंवा उथळ वाटू शकतं, पण जे मनात आलं ते लिहिलंय.
माझे मतही दुसर्या लग्नाच्या बाजूनेच
तुम्ही मुद्दे चांगलेच मांडलेले आहेत.
(मावशीच्या यजमानाच्या कथेत नव्या जोडप्यात भावनिक संबंधही होते, हे तितकेसे स्पष्ट झालेले नाही. काकांना मोलकरीण हवी होती, आणि त्यांच्या बायकोला छप्पर हवे होते, असा कोरडा व्यवहार भासायची शक्यता आहे. पण उर्वरित लेख वाचल्यामुळे तसा गैरसमज झाला नाही. कोरड्या व्यवहारासाठी लग्नाऐवजी नर्यादित करार बरा.)
ताई चुकीच्या पिढीत जन्मल्या असे वाटते. पुढच्या पिढीत भारताच्या पुष्कळ भागांत सुशिक्षित मध्यमवर्गात स्त्रियांची चणचण असेल, असे वेध आहेत. ते वेध काही का असेनात. सध्या त्यांच्याबाबत दु:खच वाटते आहे.
तुमच्या पत्नीच्या बाजूने एक युक्तिवाद असू शकतो - तो तुमच्या पत्नीला विचारला पाहिजे. जर त्या आदल्या स्थळामध्ये सासर्यांनी खूप म्हणजे खूपच लहान वयाच्या (म्हणजे भावी सुनेच्याच वयाच्या) स्त्रीशी लग्न केलेले असले, तर... त्या पोक्त माणसाला तरुणींविषयी आसक्ती आहे, ही बाब कदाचित तुमच्या पत्नीला वैयक्तिक सुरक्षिततेच्या बाबतीत अस्वस्थ करणारी वाटली असेल. अशी काही अस्वस्थता असली, तर तुमची पत्नी सांगू शकेल.
दुसरे लग्न करण्याच्या बाजूने मत आहे.
असे कुठले उदाहरण नाही.
चालेल.
जरूर करावे.
फक्त मृत्यूच्या पश्चातच नव्हे. काही वर्षांपूर्वी तेव्हाच्या जोडीदाराशी माझे संबंध परस्परसंमतीने विलीन झाले. तेव्हा तो यामुळे एकटा पडला, हीच खंत होती. (मीसुद्धा एकटा होतो, पण माझी परिस्थिती मी काळजी करण्यासारखी नव्हती. कदाचित तो काळजी करत असेल.) पुढे त्याने नवीन जोडीदाराशी संबंध घट्ट केला, तेव्हा मला फार आनंद झाला.
धन्यवाद धनंजय. सर्वांना
धन्यवाद धनंजय. सर्वांना अपेक्षित असेलेला भावनिक संबंध माझ्या काका आणि मावशीमध्ये मलाही जाणवला नाही, आणि म्हणूनच तो लेखनातही उतरला नसेल. पण काकांना मोलकरीण हवी होती, आणि मावशीला छप्पर असं म्हणण्याचं धाडसंही मी करू शकत नाही. तुम्ही म्हणता तसं मी ह्या लग्नाकडे आधारासाठी एक करार म्हणून बघेन, पण त्यांचं नातं भावनिक नसलं तरी कोरडंही नव्हतं. म्हणजे सुरवातीला कोरडेपणा असेल, पण कालांतराने एकमेकांच्या सहवासाने त्यांच्या नात्यात ओलावा निर्माण झाला असेल असे वाटते.
माझ्या पत्नीच्या उदाहरणात तिने दिलेल्या माहितीशिवाय मला अधिक माहिती नाही. पण तिच्या मनात त्या व्यक्तीविषयी तुम्ही म्हणता तशी सुप्त अस्वस्थता असू शकेल. विचारायला पाहिजे.
-अनामिक
तुम्ही दिलेलं तिसरं उदा.
तुम्ही दिलेलं तिसरं उदा. आपल्या समाजाची मानसिकता दाखवतं.
आणि पहिला जोडीदार गेल्यावर म्हणजे फारकत घेतल्यावर किंवा निवर्तल्यावर किंवा कसंही त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर बाकीच्यांना काय एवढ्या मिरच्या झोंबतात कै कळत नाही.
तरुण असेल तर सगळं आयुष्य काय एकट्यानेच घालवायचं? आणि वृद्ध झाल्यावर हक्काचं, काळजी घेणारं, सुख दुख: समजून घेणारं कोणीतरी हवंच. लोकं काय बोलतातच...त्यातून आपल्याकडे स्वताच्या घरात आग लागली तरी दुसर्याच्या घरी काय चाललंय हे पहायची मानसिकता जास्त....त्यामुळे सरळ सगळ्यांना फाट्यावर मारून आपापले जीवन छानपैकी जगायचे.
ज्यांना आपली अन आपल्याला त्यांची गरज असते ते आपल्याशी नीट वागतात बोलतात अन ज्यांना नसते ते असले काय नि नसले काय...काय?
http://shilpasview.blogspot.com
>> पण समजा तुमच्या घरातल्या
>> पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल? >>
पा - ठीं- बा
____________
>> तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का? >>
१००% वाटते. जोडीदाराने आयुष्य व्यवस्थित उपभोगावे, त्याच्या आयुष्यात कोणतीही पोकळी राहू नये असे वाटते. (आता त्या दुसर्या काल्पनिक स्त्रीची कल्पनेतदेखील असूया वाटते पण ते जाऊ द्या.) अर्थात एकाकीपणा घालविण्याकरता दुसर्या व्यक्तीचीच जरूरी असते असे नाही. एखाद्या क्लबचे सभासदत्व घेता येऊ शकते, एखाद्या छंदाला वाहून घेता येते, नवीन काही शिकता येते. तेव्हा मुख्य मुद्दा हा आहे की जोडीदाराला एकाकी वाटू नये. त्याने लग्न केले तरी माझी हरकत नाही.
________________________
वरचे झाले आदर्शवादी विचार प्रत्यक्षात मुले दुसर्या आईला तितक्याशा सहजतेने स्वीकारत नाहीत असे पहाण्यात आले आहे. तसेच इस्टेटीचे कज्जे होतात. समाजाचे टोमणे वेगळेच ते परवडले पण घरातले देखील टोमणे देतात, उणेदुणे काढतात, ऐकवतात.
____________
एका परिस्थितीत मात्र व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते ते म्हणजे आर्थिक स्थैर्याकरता. मला वाटतं व्यक्तीने (स्त्रीने) स्वतः स्वतःच्या पायावर उभे रहावे मग हवे तर दुसरे लग्न करावे कारण दुसरी व्यक्ती कशी निघेल याचा काय भरवसा. केव्हाही स्वतःवर अवलंबून रहाणे चांगले. स्त्रीने म्हणते कारण माझ्या पहाण्यात असे लग्न आहे ज्यात एका विधवा स्त्रीने ४३ व्या वर्षी आर्थिक स्थैर्याकरता दुसरे लग्न केले आणि ८ वर्षात ते दुसरे यजमानही वारले. म्हणजे ना स्वतःला भक्कम केले ना मुलाबाळांची कर्तव्ये नीट पार पाडली अन परत रस्त्यावर आहे ते आहेच.
माझं या विषयावरचं मत लग्न हा
लग्न हा खासगी मामला असतो आणि"मिया-बिवी राजी तो क्या करेगा काजी" त्याप्रमाणे तिसर्या माणसाने त्यात शक्यतोवर बोलू नये असं माझं मत आहे. "सावत्र" आई किंवा वडील अज्ञान मुलांना त्रास देत असतील तर गोष्ट वेगळी.
साधारण १६-१७ वर्षांपूर्वी माझ्या नात्यातल्या एक बाई गेल्या, दोन मुलं १५ आणि १३ वर्षांची. या मुलांच्या वडलांना (वय ५२-५३) तेव्हा कोणीतरी म्हणालं, "तुला आता या वयात कोण मुलगी देणार?" त्यावर त्यांचं उत्तर मासलेवाईक होतं, "माझ्या मुलीच्या वयाला मुलगी म्हणालात तर ठीक आहे. आता मी जर लग्न केलं तर 'मुली'शी करणार नाही." त्यांना लग्न करायचं नव्हतं. पुढे दोन्ही मुलं स्वतंत्र झाल्यावर ते असते तर त्यांचं उत्तर तेच असतं का? कदाचित त्यांच्या मुलांनीच त्यांना साथीदार शोधायला सांगितलं असतं किंवा शोधली असती.
आणखी एक नात्यातली गोष्ट. साधारण चाळीशीत नवर्याने "तिकीट काढलं". मूलबाळ नव्हतं. सर्वसाधारणतः जिला सुंदर, हुशार, कर्तबगार अशी स्त्री; तेव्हा वय साधारण ३३-३४ असं. नवरा अगदीच कर्मदळिद्री आणि हिचा स्वभाव चांगला असल्यामुळे त्याच्या बर्याचश्या नातेवाईकांचाही हिलाच सदैव पाठींबा. माझी आणि तिची चांगली मैत्री असल्याचं नातेवाईकांमधे माहित होतं. तिने पुढे लग्नासाठी हालचाली का सुरू केल्या नाहीत, केल्या तरी एवढा वेळ का लागतो आहे यावरून मला इतर नातेवाईकांना तोंड द्यावं लागायचं. तिचं लग्न ठरलं आणि झाल्याचं समजलं तेव्हा अनेकांनी 'Then they lived happily ever after' असा काही पवित्रा घेतला त्याचं मला फार आश्चर्य वाटलं. निदान एवढे वर्षांनीतरी ती आनंदात आहे हे पाहून मलाही आनंद होतो, पण बाईच्या आयुष्यात लग्न हीच इतिकर्तव्यता आहे का, असा प्रश्न मला तिच्या घटनेवरून अनेकदा पडला.
एक मित्र. त्याच्या लग्नानंतर तिने शिक्षण आणि नोकरीबद्दल खोटं बोलणं, तिचा क्लेप्टोमेनिया वगैरे प्रकार समोर आले. पुढे हे प्रकरण घटस्फोटाऐवजी फार वेगळ्याच वाईट वळणावर जाऊन तिने आत्महत्या केली, याला तुरूंगात वगैरे रहावं लागलं आणि कोर्टकेसचे मनस्ताप हा अजून भोगतो आहे. त्या प्रकारात होती ती नोकरी गेली, आता काही वर्षांनंतर करियर, नोकरी, तब्येत या महत्त्वाच्या गोष्टी जागेवर येत आहेत. त्याच्याबद्दल बोलणं झालं तरी कोणी त्याच्या पुढच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त करतं असं वाटत नाही. उलट या मित्राशी जे काही बोलणं झालेलं आहे त्यावरून तर मला असं वाटतं की काही मुली आणि त्यांचे 'पालक' त्याची न्यायालयाकडून निर्दोष सुटण्याचीही वाट बघावी असं म्हणत नाहीत.
आणि इंग्लंडातला एक प्रसंग. चारेक वर्षांपूर्वी लॉव्हल टेलिस्कोपला ५० वर्ष झाली म्हणून जो समारंभ होता त्यात स्वःत सर बर्नाड लॉव्हल (वय वर्ष ९२) आणि त्यांची साथीदार (वय साधारण ७५च्या पुढेच) आले होते. जेव्हा तो टेलिस्कोप बनवला तेव्हा या बाईंना रेडीओ अॅस्ट्रॉनॉमी माहितही नसेल, पण आता त्या बाईंना सर बर्नाड टेलिस्कोपबद्दल स्टेजवरून बोलताना त्यांचा किती अभिमान वाटला असेल. मला ते जोडपं फारच आवडलं.
त्या व्यक्तीची इच्छा असल्यास जरूर पाठींबा देईन.
जरूर. ओळखीत काही तरूण व्यक्तींचे मृत्यु झाले असता अशा प्रकारचा संवाद झाला होता. तसंही माझ्या मागे काय होईल यावर मी काही करू शकणारच नाही. मग माझ्या मागे माझ्या (?) नवर्याने काय करावं हा त्याचाच निर्णय असावा. माझ्या समोर तो जेवणाच्या वेळेस, गरम जेवण वाढलेलं असताना बिस्कीटं तोंडात टाकतो त्यावर मी काही करू शकत नाही, मेल्यानंतरचं काय घेऊन बसणार!
लेखातलं शेवटचं वाक्य वगळलं असतंस तरी चाललं असतं. 'देवाघरी' जाणं हा वाक्प्रयोग थोडा मजेशीर वाटला, साधारण लहान मुलांना समजवल्यासारखं वाटलं. आणि विदुर नव्हे, विधुर.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>माझ्या समोर तो जेवणाच्या
>>माझ्या समोर तो जेवणाच्या वेळेस, गरम जेवण वाढलेलं असताना बिस्कीटं तोंडात टाकतो त्यावर मी काही करू शकत नाही, मेल्यानंतरचं काय घेऊन बसणार!
नवरा हुशार आहे तुमचा. तुमच्या स्वयंपाकावर एक अक्षरही न बोलता टिप्पणी करतो. शब्देविण संवादु म्हणतात ना ते हे.
एक शंका :- तुम्ही आयटी वाईफ का हो ??
नवरा हुशार आहे तुमचा. उगाच का
उगाच का निवडला त्याला?
सरदारजीचा 'तो' जोक माहित आहे का?
एक मद्रासी, एक बंगाली आणि एक सरदार असे तिघे कलीग्ज असतात. लंच टाईमला मद्रासी म्हणतो, "उद्या माझ्या डब्यात इडली असेल तर मी जीव देईन." बंगाली त्याचा डबा उघडतो, "उद्या माझ्या डब्यात माछेर झोल असेल तर मी जीव देईन." सरदार त्याचा डबा न उघडतात म्हणतो, "उद्या माझ्या जेवणात नान असेल तर मी जीव देईन." अर्थातच दुसर्या दिवशी हे तिघे जीव देतात. मद्राश्याची बायको म्हणते, "मला माहित असतं याला इडलीचा कंटाळा आलाय तर मी दुसरं काहीतरी बनवलं असतं." बंगाल्याची बायको म्हणते, "मला एकदातरी सांगायचं माछेर झोलचा कंटाळा आलाय ते!" सरदारची बायको म्हणतो, "माझा नवरा स्वतःचा डबा स्वतःच बनवायचा!"
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझं मत
वरचे तीनही मुद्दे चांगले मांडले आहेत.
१. मुद्दा १ - कदाचित त्या मुलाच्या वडलांनी त्यांच्यापेक्षा बर्याच तरुण मुलीशी लग्न केले नसते तर तुमच्या बायकोला तेवढी अढी वाटली नसती.
२. मुद्दा २ - काकांचा निर्णय चांगला आहे. त्यांच्यासाठी उपयुक्त पण बायकोसाठी कितपत फायदेशीर माहित नाही. याची कारणे अवांतर वाटल्याने येथे मांडत नाही.
३. मुद्दा ३ - ताईबद्दल वाईट वाटले. विशेषतः ज्या बायकांचे डिवोर्स झाले आहेत किंवा नवरा वारला आहे अशांना दुसरे लग्न करताना मुलंबाळं असणार्या बिजवराशीच लग्न करावे लागते असे दिसते. या उलट, ज्यांना मुले आहेत त्यांना एखादी प्रौढा किंवा विनापाश डिवोर्सी/ विधवा मिळून जाते.
---
लग्न हा वैयक्तिक तरीही कायदेशीर मामला आहे. कायद्याने कोणीही सज्ञान व्यक्ती, दुसर्या सज्ञान व्यक्तीशी लग्न करू शकते. मी माझ्या लग्नाविषयी बोलू शकते. इतरांच्या नाही. ते लग्नाचा जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.
वर उदाहरणांत न आलेला पण आजकाल सर्रास दिसणारा एक किस्सा येथे देते -
माझ्या माहितीत एक मुलगी होती. तिचे अफेअर एका लग्न झालेल्या आणि सात-आठ वर्षांची मुलगी असलेल्या एका गृहस्थाशी होते. तिला तिच्या आईने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती बधली नाही. तिने त्या माणसाला डिवोर्स घ्यायला लावून स्वतः त्याच्याशी लग्न केले. त्या माणसाची पार्श्वभूमी पाहता (बर्यापैकी छंदीफंदी, पैशाची गुर्मी दाखवणारा वगैरे) हा संसार सुखाचा होणार नाही अशी आमची अटकळ होती. दुसर्या लग्नानंतर १२-१४ वर्षांनी ती खरी ठरली. आज ही मुलगी नवर्याला सोडून, मुलांना घेऊन घरी आली आहे. तिचे लग्न पहिलेच होते पण नवर्याचे दुसरे. हे लग्न तिने करू नये असे मला आणि माझ्या आईवडिलांना मनोमन वाटत होते पण रितसर लग्नाचा निर्णय असल्याने तिची आईच (वडिल हयात नाहीत) काही करू शकली नाही. आम्ही तर उपरे.
माझ्या आई, वडिलांनी असा निर्णय घेतला असता तर मी त्यांच्या पाठीशी उभी राहिले असते पण सोबत एखाद्या व्यक्तीला मोलकरीण म्हणून तर आणत नाही ना याची शहानिशाही केली असती.
माझ्याशी लग्न करून माझा नवरा इतका पस्तावलेला असावा की काय बिशाद आहे मी गचकल्यावर त्याची दुसरं लग्न करण्याची? शिवाय गचकल्यानंतरही मी मानगूट सोडेन असं नाहीच. हेहेहे! या उलट, मला जर दुसरं लग्न करायचं असेल तर नवरा म्हणेल - "बाई गं! मी मरण्याची वाट बघू नकोस."
असो. ऑन ए सिरिअस नोट, मी मेल्यावर कोणीही काहीही केले तर मला काय फरक पडणार? मी त्याची चिंता करत नाही.
चर्चा प्रस्ताव छान मांडला आहे
ज्याच्या त्याचा प्रश्न.. फारच खाजगी बाब.. मिया बिबी राजी वगैरे
बहुतांश वेळा नाही वाटत. मात्र एकाचीही मुले लहान असतील तर मात्र त्यांची (मुलांची) काळजी वाटेल
तसेच असेल. अगदी माझ्या पालकांनीही भविष्यात असा निर्णय घेतला तरीही फारतर ज्या व्यक्तीशी ते लग्न करणार आहेत त्या व्यक्तीबद्दलची माझी मते त्यांना (चांगली/वाईट) सांगेन त्यानंतर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी दुसरे लग्न करू नये हे कोणत्याही तर्कात बसत नाही.
मात्र ही परिस्थिती मुले लहान असताना असेलच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे त्यांची काळजी वाटेल
तिची मर्जी! मी गेल्यावर कोण काय करतो काय फरक पडतो?
बाकी वाढलेल्या वयात दुसर्या जोडीदाराची गरज का पडावी हा प्रश्न मात्र सतावतो आहे. या व्य्क्ती इतक्या वर्षांच्या आयुष्यानंतरही 'स्वयंपूर्ण' नसणे हे त्यामागचे कारण असेल का? योग्य वयात माणसे जोडून न ठेवणे (किंवा त्याला वेळ न मिळणे), छंदाचा अभाव, मोजका मित्रपरिवार, आपल्याला काय आवडते याची माहिती नसणे अशासरखे प्रश्न हल्लीच्या मुलांमधून मोकळ्या झालेल्या बर्याच पालकांना असतात असे दिसते. मुलांचे करण्याच्या वयात या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही आणि मग मुले मोठी झाल्यावर येणारा 'एम्टी नेस्ट सिंड्रोम' छळू लागतो. अशातच जोडीदार निवर्तल्यावर ते एकटेपण अधिक अधोरेखित- ठळक होऊन दुसर्या जोडीदाराची गरज पडत असेल का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खाजगी बाब
पहिले वा दुसरे लग्न करणे न करणे ही पूर्णपणे त्या दोघांची खाजगी बाब आहे. तरीही आपण समाजात राहात असल्याने त्यावरच्या प्रतिक्रियांची काळजी करावी लागते.
तुम्ही सांगितलेल्या पहिल्या प्रसंगात आक्षेप दुसरे लग्न करण्याला नसून खूप तरूण स्त्रीशी लग्न करण्याला असावा या वर काहींनी मांडलेल्या मताशी मी सहमत आहे (असा आक्षेप असण्याचे खरे तर काही कारण नाही पण असुरक्षितता किंवा विचित्र वाटत असल्याने तसे होत असावे).
दुसर्या प्रसंगातली परिस्थिती मला वाटतं आपल्याला भविष्यात अधिकाधिक पाहावी लागेल. मुले परदेशात स्थायिक झाल्याने एकटे पडलेल्या वृद्धांना कोणाच्यातरी आधाराची गरज असते हे खरेच पण केवळ आधारासाठी लग्न हे मला तरी पटत नाही. त्यापेक्षा धनंजय म्हणतात तसा मर्यादित करार किंवा लिव्ह-इन करावे. खरोखरच भावनिक गुंतवणूक झाली असेल किंवा फार पुर्वीची ओळख किंवा ओल्ड फ्लेम वगैरे असेल तर त्या परिस्थितीत लग्न करणे चांगले.
तिसर्या प्रसंगातही "जोडीदार हवाच" हे शब्द खटकले. लग्न करण्याचा अट्टाहास का? नोकरी, मुलाचे संगोपन आणि छंद हे जीवन जगण्यास पुरेसे नाहीत का? आणि लग्न करायचे म्हणून पुन्हा लग्नाच्या बाजारात उभे राहिल्यास असे अनुभव येणारच. त्यापेक्षा स्वतःचे आयुष्य छानपैकी जगावे, पुढेमागे आयुष्यात एखाद्या चांगल्या समजदार व्यक्तीशी सूर जुळतीलच, नाही असं मिळालं कोणी तरी हरकत नसावी. तिशीच्या तरूण स्त्रीने शारिरिक गरजांसाठी लग्न केलंच पाहिजे आणि ५०-५५च्या पुरुषाने मात्र शारिरिक गरजा मारून टाकल्या पाहिजेत हा थोडा दुटप्पीपणा झाला.
असो.
>>तुमचं या विषयावर काय मत आहे?
आधारासाठी किंवा करायचं म्हणून लग्न नको. स्वभाव जुळले पाहिजेत, अन्यथा करार उत्तम.
>>तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का?
असे कोणी नाही.
>>बऱ्याचदा दुसर्यांकडे असे काही झाले तर आपण त्याला दुजोरा देतो. पण >>समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर >>तुमचं मत काय असेल?
लग्न करण्याइतकी जवळीक असल्यास पाठिंबा असेल.
>>आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे >>असे तुम्हाला वाटते का?
तो जोडीदाराचा प्रश्न आहे.
<<<बाकी वाढलेल्या वयात
<<<बाकी वाढलेल्या वयात दुसर्या जोडीदाराची गरज का पडावी हा प्रश्न मात्र सतावतो आहे.
गरजा फक्त सामाजिक, भावनिकंच नाही तर शारीरीक सुद्धा असतात त्यामुळे शोधला जोडीदार अन केले लग्न तर काय बिघडतंय?
http://shilpasview.blogspot.com
'लग्न' का करावे?
अजिबात बिघडत नाही
किंबहुना माझा प्रश्न मुले मोठी झाली--कमावती (स्वतंत्र) झाल्यानंतरच्या वयातील म्हणजे तुलनेने शारीरिक गरजा कमी असतानाच्या वयातील आहे. या वयात सहज भावनिक गुंतवणूक होऊन एकत्र रहाता येतेच की एकमेकांच्या प्रॉपर्टीवर हक्क इतकाच अर्थ असलेले 'लग्न' का करावे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लैंगिक गरज
चर्चाविशय उत्तम आहे, पण थोडा ज्यास्त सावधपणाने लिहिल्यासारखा वाटतो आहे. दुसरे लग्न करण्यामागे नेहमी मानसिक आधार, एकटेपणा टाळणे असे उदात्त हेतूच असतात का? मध्यमवयात जोडीदार या ना त्या कारण्याने हरवला तर त्या व्यक्तीने आपल्या कामवासनेचे काय करावे? चाळीशी-पन्नाशीत लोक - विशेषतः पुरुष लंगिकदृष्ट्या अॅक्टीव्ह असतात असे मानायला काही हरकत नसावी. (स्त्रियांची कामनिवृत्ती पुरुषांच्या तुलनेत लवकर होते असे मानून वरील विधान केले आहे) तर अशा लोकांनी दुसरे लग्न करताना कामपूर्ती हा एक स्वच्छ हेतू ठेवला तर त्यात काही चुकीचे आहे काय?
तुमचं या विषयावर काय मत आहे?
वरीलप्रमाणे आणि अजिबात हरकत नाही असे मत आहे.
तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का?
असे वाटत नाही.
बऱ्याचदा दुसर्यांकडे असे काही झाले तर आपण त्याला दुजोरा देतो. पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल?
काहीही मत नसेल. हरकत अजिबात नसेल.
आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का?
अर्थात. नाहीतर वरच्या लिखाणाला काही अर्थच नाही.
लग्न व समाजहित
>>तुमचं या विषयावर काय मत आहे?
खरं तर लग्न ही अत्यंत खाजगी बाब आहे. पण कोणतेही लग्न हे त्या दोघांच्या फक्त आणि फक्त एकमेकांच्या प्रेमाच्या अधारवर असाव (ना कि गरजेच्या). तरचं तो संसार कोणत्याही मानसीक ओझ्याशिवाय टिकेल व बहरेल.
पण दुसरी एक बाजू, कितीतरी समाज उपयोगी (किंवा उद्योग ची) कामे आहेत ती करताना जास्तीस जास्त वेळ द्यावा लागातो आणि तो वेळ संसारी व्यक्तीला देणे अवघड जाते. अशा गरजेच्या गोष्टीं आपला मोलाचा वेळ देवून भरीव कामगिरी ती व्यक्ती नक्कीच करू शकते. (पण त्या करिता स्वतः ला कमी महत्व देवून समाजा ला जास्त द्याव लागेल.) ह्या चा विचार जरूर व्हावा असे वाटते.
>>तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का?
वर लिहील्या प्रमाणे, ते लग्न प्रेमा वर आधारीत नसेल तर नकोच.
>>बऱ्याचदा दुसर्यांकडे असे काही झाले तर आपण त्याला दुजोरा देतो. पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल?
आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का?
परत, लग्न प्रेमा वर आधारीत असेल तर होच.
(बघा म्हणजे)
पक्षी
चांगला लेख
सर्वांनी मांडलेले मुद्दे योग्यच आहेत. निर्णय हा त्या त्या व्यक्तीनेच घ्यायचा (आणि त्याची जवाबदारीही घ्यायची).
अनेकदा लोक काय म्हणतील या विचाराने आपण उगाच काळजी करतो. आपल्या निर्णयाने आपल्याला आवडणारे/आपल्यावर एरवी प्रेम करणारे नात्यातले लोक दुरावणार असतील - संबंध तोडणार असतील- तर जरूर विचार करावा (म्हणजे संबंध तोडण्याइतपत भयंकर गोष्ट त्यांना वाटत असेल तर आपले नक्की चुकत नाही ना हा विचार करावा). नुसते टोमणे मारणार्यांना योग्य जागी मारावे.
अवांतर : @सारिका-
>>मला वाटतं व्यक्तीने (स्त्रीने) स्वतः स्वतःच्या पायावर उभे रहावे मग हवे तर दुसरे लग्न करावे कारण दुसरी व्यक्ती कशी निघेल याचा काय भरवसा. केव्हाही स्वतःवर अवलंबून रहाणे चांगले.
हे दुसर्याच नाही तर पहिल्या लग्नाबाबतही खरे आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विषय चांगला मांडलाय.>>>> मग
विषय चांगला मांडलाय.
>>>> मग काकांनीच एका चाळिशीत असलेल्या बाईंशी लग्न केले. गरज दोघांचीही होती. काकांना त्यांच्याकडे बघणारं, त्यांची खाण्यापिण्यापासून सगळी काळजी घेणारं असं कुणीतरी हवं होतं. आणि त्या नव्या मावशीलाही आधार हवा होताच. त्यांचा लग्नाचा निर्णय चुकला असं मला वाटत नाही. परंतू काही नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. आधार हवा होता तर एखादा नोकरमाणूस ठेवायला हवा होता म्हणतात. पण असा नोकरमाणूस २४/७ त्यांच्याकडे बघेल? <<<<<
यातिल दूसर्या (वा पहिल्याही) लग्नाच्या वेळेस, होणार्या/झालेल्या पत्नीकडे "नोकरमाणूस" वा हक्काची कामवाली बाई अशा रितीने बघण्याचा सूप्त पण भयावह असा सामाजिक दृष्टीकोन जाणवतो, तो अयोग्य असे मला तरी वाटते.
अनुभव
सामाजिक जडणघडणीच्या प्रत्येक काळात चर्चिला गेलेला हा विषय असल्याने त्याचे महत्व आहेच शिवाय जरी 'लग्न' ही सर्वस्वी खाजगी बाब मानली गेली असली तरी 'दुसर्या' लग्नाचे पडसाद घरातील अन्य सदस्यांवर या ना त्या निमित्ताने, कळत-नकळत, पडत असल्याने लग्न करू इच्छिणारा तो आणि ती किंवा दोन्हीकडील ज्येष्ठ मंडळी 'या लग्नामुळे पै-पाहुणे, मित्रमंडळ काय म्हणतील ?" या शंकेने पाल चुचकारलेली ऐकत असतात.
माझ्या माहितीतील 'अ' वय ४०, यानी प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांच्याच कार्यालयातील एका सेक्शनच्या डिस्पॅच क्लार्क पदावरील ३५ च्या अविवाहित स्त्रीशी रजिस्टर्ड मॅरेज करण्याचा विचार केला. 'अ' याना एक मुलगी होती ती त्यानी त्या काळात आपल्या मामामामीकडे ठेवली. श्रीमती 'ब' याना लहान तीन भावंडे असल्याने व रोजंदारीवर अन्यत्र काम करणारे त्यांचे वडील अकाली गेल्याने आई आणि तीन लहान मुलांचे संगोपन यामध्ये त्यांचा स्वतःच्या लग्नाचा विचार साहजिकच मागे पडला. ज्या वयात स्थळे सांगून येतात तशी आली असणारच पण क्रमांक १ च्या भावाची गाडी रस्त्याला लागल्याशिवाय लग्न न करण्याचा त्यानी निर्णय घेतला. भावालाही थोरल्या बहिणीचा हा त्याग माहीत असल्याने त्याने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना अगरबत्ती आणि धूप या दोन वस्तूंची स्थानिक व्यापार्याकडून एजन्सी घेतली होती आणि पदवीधर होईपर्यंत हा धंदा त्याने इतका चांगल्यारितीने चालविला की नोकरीच्या मागे न लागता दुसर्या क्रमांकाच्या भावाला आणि धाकट्या बहिणीलाही त्याने व्यवसायात शेअर केले. इकडे श्रीमती 'बी' यांची सरकारी नोकरीही व्यवस्थित चालू होती. पण वाढत्या वयामुळे लग्नाबद्दल विचारणाही होत नव्हती. श्री.'अ' यानी 'ब' यांच्यावरील त्यांच्या घराची जबाबदारी कमी झाल्याचे पाहिले (एकत्रच काम करीत होते, त्यामुळे तितपत माहिती होत असतेच) आणि बरीच वर्षे आजारी असलेल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतरच्या पुढील वर्षातच कार्यालयातील ज्येष्ठ मंडळीमार्फत (त्यात मी एक होतो) श्रीमती 'ब' यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. 'ब' यानी नकार दिला नाहीच उलट त्या आम्हा सर्व सहकार्यांशी कृतज्ञ राहिल्या. फक्त एकच अट होती की, त्यांच्या आईच्या हयातीपर्यंत त्या दरमहा वेतनातून काही विशिष्ट रक्कम माहेरी पाठवू इच्छित होत्या. त्याला 'अ' यानी तात्काळ संमती दिली. रक्कम किती देणार याचीही विचारणा केली नाही.
इतके सर्व व्यवस्थित चालले असताना 'ब' यांच्या त्याच आईने या लग्नाला मोडता घातला. का ? तर 'आम्ही कोकणस्थ ब्राह्मण आणि ते श्री.'अ' मराठा आहेत.' काय बोलायचे यावर ? ज्या मुलीने रात्रंदिवस काबाडकष्ट करून (नोकरीव्यतिरिक्त स्थानिक पुस्तक प्रकाशन संस्थेत पार्टटाईम प्रूफ रीडरचेही त्या काम करीत) त्या आईला सांभाळले, तीन भावंडांना वाढविले, शिक्षण दिले, व्यवसायाला फंडातून कर्ज काढून भांडवल दिले, आणि घर (काहीसे) स्थिरस्थावर झाल्यावरच मग स्वत:च्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केल्यावर त्याच आईने हे जातीतील उच्चनीचतेचे करंटेपण समोर आणून तिच्या लग्नाला खो घालण्याचा प्रयत्न केला. आईचा त्रागा अशासाठी की, "मुलीने मराठ्याबरोबर लग्न केले म्हणून माझ्या मुलाला पुढे ज्ञातीतील मुलगी कुणी देणार नाही." ~ होऊ शकते असे या आजच्या काळात ? 'ब' बाईंनी तर रडून काही दिवस रजाच काढली.
बट थॅन्क गॉड.....त्या अकाली प्रौढ झालेल्या भावानेच आईला एकदम चूप केले आणि स्वतः आमच्याकडे येऊन पुढील सर्व संबंधित बाबी पूर्ण करण्यास आवश्यक ते सर्व सहकार्य केले. मग एका गोड क्षणी रजिस्ट्रार समोर आमच्या श्री.'अ' चे दुसरे लग्न नोंदविले गेले. संध्याकाळी झालेल्या छोट्याशा स्वागतसमारंभास श्रीमती 'ब' कडून फक्त तिची भावंडे आणि त्यांच्यावर माया करणारे शेजारचे एक कुटुंबवत्सल जोडपे हजर होते. लग्नास हजर न राहून आईने आपला निग्रह जपला. ठीक आहे आता या दोघांचे. एकमेकाला समजून घेऊन दोघेही सुखाने राहत आहेत. 'ब' यानी 'अ' यांच्या मुलीलाही लागलीच घरी आणले आणि तिला आपल्या आईची जाणीव होणार नाही इकडे आवर्जून पाहिले. तीच गोष्ट 'अ' यांचीही. नव्या सासूबाईंनी लग्नाला मोडता घातला होता हे माहीत असूनही त्यांच्या आणि पत्नीच्या भावंडांची तेही तितकीच काळजी घेत आहे.
त्यामुळे दुसर्या लग्नाबद्दल कुणी काहीही मत व्यक्त करोत, ती समाजस्थैर्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक बाब मानली पाहिजे. (अर्थात हाही अनुभव आहेच आहे की, अकाली विधवा झालेल्या स्त्रीशी तिच्या दुसरेपणावर लग्न करण्यास कुणी प्रथमवर पुढे येत नाही. बिजवर तयार होतात.)
क्वचितच काही धाडसी अथवा जिला बाणेदार, स्वतंत्र विचाराची युवती म्हटले जाते तीने जर एखाद्या पुरुषात तिला आवडणारे गुण हेरले असतील आणि जर तो पुरुष विधुर असेल तरीही ती त्याच्यातील गुणांना भाळून लग्न करण्याचा निर्णय घेते, आणि तिच्या घरातील ज्येष्ठांचा विरोध डावलून लग्न करून सुखीही होते. अर्थात हे सर्वसामान्यतः कलाकारांच्याबाबतीत घडल्याची उदाहरणे आहेत. त्यातील ठळक म्हणजे अर्थातच पु.ल.देशपांडे आणि सुनीता ठाकूर यांचे. [अजूनही आहेत, पण विस्तारभयास्तव हे एकच पुरे]
श्री.अनामिक यानी प्रस्तुत केलेले काही प्रश्न :
तुमचं या विषयावर काय मत आहे? ~ प्रतिसादातील उदाहरणात मी साक्षीदारच असल्याने तिथे या विषयावरील माझे मत प्रतिबिंबीत होत आहे.
तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का? ~ लागू नाही. कारण याबाबतीत अशा लग्नाला माझी अनुकूलता आहे.
पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल? ~ माझ्या केसमध्ये मीच ज्येष्ठ असल्याने प्रश्नातील स्थिती माझ्यासाठी लागू होणार नाही. पण अन्य कुणी (स्त्री/पुरुष) असा निर्णय घेणार असेल तर त्याला/तिला माझा पाठिंबा राहील.
आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का? ~ मला जे वाटते ते जोडीदारीणीलाही तितक्याच प्रखरतेने वाटले पाहिजे. समजा मृत्युशय्येवर असताना नवर्याने बायकोला 'मी गेल्यावर तू दुसरे लग्न करून सुखी राहा' असे म्हटल्यास ती तिथे थोडाच होकार देईल ? आणि दिला तर तिने तसे केले की नाही हे त्या मृतात्म्याला कळायची कसलीही शक्यता नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर, मग ते होकारार्थी असो वा नकारार्थी, फसवे असू शकते.
अशोक पाटील
हवी तेवढी आणि जमतील तितकी लग्नं करा किंवा करू नका
लग्न या संस्थेमध्ये दोन व्यक्तींनी एकमेकांच्या पुष्कळच वेगवेगळ्या गरजा भागवाव्यात अशी काहीशी अपेक्षा असते आणि ही अपेक्षा काहीशी अवाजवी असते असं मुळात वाटतं. म्हणजे काही व्यक्तींशी आपला वैचारिक संवाद अधिक चांगला होऊ शकतो; काही व्यक्तींची आणि आपली शरीरसुखाची कल्पना उत्तम तर्हेनं मिळतीजुळती असू शकते; काही व्यक्तींच्या आणि आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सारख्या असू शकतात; इतर काहीजण अडीअडचणीच्या काळात सल्ला/मदत अधिक चांगली देऊ/करू शकतात, वगैरे वगैरे. कायद्यामुळे लग्न मात्र एका वेळी एकाच व्यक्तीशी करावं लागतं. त्यामुळे त्या लग्नातून न भागणार्या गरजा लोक मारून तरी टाकतात किंवा लग्नाबाहेर शोधतात. हे पाहता एकावेळीदेखील माणसाला एकच लग्न पुरेसं असतं का, याविषयीच मुळात साशंक आहे. त्यापेक्षा परस्परेच्छेनुसार आणि परस्परसंमतीनं एकमेकांशी खुलं नातं (ओपन रिलेशनशिप) ठेवावं हा जाँ-पॉल सार्त्र आणि सिमोन द बोव्हार यांचा निर्णय अधिक प्रगल्भ वाटतो. त्यामुळे हवी तेवढी आणि जमतील तितकी लग्नं करून किंवा न करता समाधानी आयुष्य जगण्याची धडपड माणसांनी करावी असं एकंदरीत मत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ह्म्म
सहमत आहे. आणि हे शक्य नाही हे वास्तव आहे.
तेव्हा अश्या अपेक्षा ठेऊन लग्न केले की हे प्रश्न निर्माण होतात असे वाटते.
'हे सगळ्ळं सगळळं पूर्ण करणारी व्यक्ती आपली जोडीदार असावी' अशी अपेक्षा ठेऊन केलेल्या लग्नात या समस्या दिसणारच! मात्र सध्याच्या समाजिक चौकटीत राहुनदेखील आपल्याला जोडीदाराकडून काय हवेच आहे, आणि काय बाहेरून मिळवता येईल हे लग्नबंधनात शिरण्याआधी स्पष्ट असेल तर हा प्रश्न उद्भवू नये.
तेव्हा दोष लग्नव्यवस्थेला न देता त्या व्यक्तीच्या (लग्नसंस्थेकडून केल्या जाणार्या (अवाजवी)) अपेक्षेला दिला पाहिजे असे वाटते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ही अगदीच आदर्श परिस्थिती
ही अगदीच आदर्श परिस्थिती झाली.
बहुतेकदा असं मत असणार्या पुरुषाच्या हेतूंबद्दलच संशय घेतला जातो
मला वाटतं मीच राहिलोय लिहायचा.
इथे लिहित्या असणार्या जवळजवळ सगळ्यांचेच प्रतिसाद इतक्या अल्पावधीत म्हणजे धागा काढल्यापासून १२ तासांच्या आत येऊन पोहोचले आहेत. मूळ लेख अन प्रतिसादही विस्तृत व विचारपूर्वक लिहीलेले अन तसेच विचारप्रवर्तकही आहेत. त्यामुळे धागा वाचायला वेळ लागला, अन आता विचार करून टंकायलाही थोडा वेळ लागेल असं दिसतं.
आता दुसर्या लग्ना बाबत.
२-४ दिवसांपूर्वीच मिपावर एक कुणी किचेन नामक आयडी असलेल्या नवोदित सदस्या आहेत. त्यांचा सुखी संसाराची सोपि वाटचाल हा धागा वाचला. त्यांचा अशी दुसरी लग्ने जमविण्याचा मॅरेजब्यूरो किंवा काऊन्सेलिंग असा काही उपक्रम आहे असे त्यांचा धागा वाचून वाटले. पण त्यात मुख्यत्वे २० ते २५ च्या दरम्यान लग्न करून लगेच १-२ वर्षांत विवाहविच्छेद करून मोकळ्या झालेल्या स्त्रीपुरुषांच्या दुसरेपणीच्या लग्नाबाबत जास्त कार्य आहे असे दिसले.
ज्या वयांपर्यंत स्त्री पुनरुत्पादनक्षम असते, (म्हणजे सुमारे ४५ पर्यंत. त्यानंतर फारच कठीण असते. मेडिकली.) त्या वयात तिने केलेले लग्न (पहिले/दुसरे/तिसरे जे कोणते असेल ते) हे जर खरंच प्रेमाखातर केलेले असेल, तर छानपैकी सफल अन सुफलही होऊ शकते. अन हे लग्न काही 'वेगळं' आहे असं कुणी समजतही नसावं. लग्नाचे 'वय' हा विषय आजकाल बराच फ्लेक्सिबल आहे, विशेषतः करियर करू इच्छिणार्या मुली/मुलांत. २८-३० पर्यंत पहिल्या लग्नासाठीही सहज थांबतात.
पण या धाग्याचा रोख उतारवयात केलेल्या दुसर्या लग्नाबद्दल दिसतो आहे.
अन मी हे थोडं खेदाने नमूद करू इच्छितो, की अनेक स्त्रियांनी इथे प्रतिक्रिया नोंदवूनही खरंच ५०-५५ वयाच्या स्त्रीच्या दृष्टीकोनातून या लग्नाबाबत काय विचार होइल याबद्दल विचार केलाय अशी मते दिसली नाहीत. जी उदाहरणे आहेत ती अमुक पुरुषाने लग्न केले, अश्या थाटाची आहेत. स्त्रीला गृहित धरून.
आपल्या समाजात, आजच्या घडीला जे उतारवयात आहेत, त्यांच्या मानसिकतेचा विचार करता, नवरा हा 'कर्ता' पुरुष अन डिक्टेटर, अन बायकोने त्याची सेवा करायची ही असलीच कल्पना जास्त प्रमाणात आहे. तरुण पिढी जरी किचन, मुलांना मोठे करण्यापासून सगळी 'घर'कामं शेयर करतात, तसे आज ५५-६०च्या आसपास असलेल्या स्त्रीपुरुषांच्या मानसिकतेत बहुतांशी नाही.
आज ५५-५८ असलेल्या स्त्रीचा नवरा, आदमासे ६५ ते ६८ च्या आसपास वय होऊन. भरपूर आजारपणं इ. काढून, पक्षी त्याच्या बायकोकडून भरपूर 'सेवा' करवून घेऊन मगच 'हलतो'. १०० पैकी जास्तीत जास्त ५-७च लग्ने खर्या खोलवर रुजलेल्या प्रेमावर आधारित टिकून असतात, बाकीची जोडपी तडजोड म्हणूनच एकत्र असतात, असा माझा निरिक्षणांती निष्कर्ष आहे. असले बायकोपण हे एकप्रकरची सक्तीची हमालीच.
अश्या परिस्थितीत.
आयुष्यभर एका संसाराचा गाडा ओढून थकलेल्या, जिला स्वत:ची प्रकृती त्रास देऊ लागली आहे - गुडघे, डायबेटीस, बीपी.. अन रिझनेबली इन्डिपेन्डन्ट (पैशाच्या बाबतीत. मुले मुली आसरा अन जेवणखाणाची सोय नक्कीच करतात. प्रश्न उरतो 'सोबती,चा) असलेल्या, अश्या त्या स्त्रीच्या मनात खरंच दुसरी वेठबिगारी पत्करायचा विचार येईल का हो??
स्वतःची तब्येत ही अशी. ज्ये. ना. संघात भेटतो, तेंव्हा कितीही उमदा अन उदारमतवादी भासणारा पुरुष प्रियकरापासून नवरा बनला की काय होतं याचा पर्सनल अन व्हिकारियस अनुभव ५५च्या आसपास वय असलेल्या स्त्रीजवळ नक्कीच असतो. म्हातरे अन म्हातर्याही कश्या झक्की असतात याचे किस्से भरपुर आहेत. वरुन परत तो ४-२ वर्षे मोठा असणार वयाने. मग परत त्याची दुखणी बहाणी करा? त्याच्या/तुमच्या : मुला/मुली/सुना/जावयांशी मानसिक खणाखाणी करा. नवा संसार उभा करा. नव्या तडजोडी स्वीकारा?
आयुष्यभर नवरा, मुलं घराबाहेर दिवसभर असण्याची सवय स्त्रीला असते. म्हणजे एकटे असण्याची सवय, अन त्यावर मात करण्याचे मार्ग तिला ठाउक असतात.
तर, अशावेळी ती स्त्री स्वतःहून लग्नाचा विचार करेल, की संसारातून रिटायर होऊन नातवंडांत थोडं खेळून बाकी वेळ आराम करण्याचा प्रयत्न करील?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
आडकित्ता यांनी फारच मार्मिक
आडकित्ता यांनी फारच मार्मिक मुद्दा मांडला आहे. आज साठील असलेले पुरूष विचाराने इतके मागास असतील असे वाटत नाही. अर्थात सेवा करून घेणे हा हक्क मोठ्या प्रमाणात समजणारे असतीलच.
ह घेण्यापुरता प्रतिसाद- त्यांनी मांडलेल्या समाजवास्तवा प्रमाणेच "आपले नवर्याची सेवा करण्याचे आयुष्यातले कर्तव्य अपुरे राहिले आहे ते पूर्ण करायचे आहे" या भावनेने ५०+ ची स्त्री दुसर्या विवाहास तयार होत असावी. ५०+ ची स्त्री त्या मानसिकतेतली असू शकेल.
@चिंजं - आपली सध्याची पत्नी आपल्या बौद्धिक उंचीची नाही म्हणून आणखी एक विवाह करण्याची फ्याशन कधीकाळी आली होती बहुतेक. त्याचे विडंबन चिं वि जोशी यांनी एका प्रकरणात केले होते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हलके नाही हो थत्ते काका
मी सइरियसली लिहीलंय ते
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
>>तुमचं या विषयावर काय मत
>>तुमचं या विषयावर काय मत आहे?
ज्याला करायचे आहे त्याने जरूर करावे. आपल्या सगळ्या अडचणी सोडवायला समाज येत नाही. त्यामुळे समाजाला नको तितके महत्त्व देऊ नये. हे शहरात तरी सहज शक्य आहे.
>>तुम्हाला काही कारणाने कुणा एका ओळखीच्या व्यक्तीने दुसरे लग्न करू नये असे वाटते का? वाटत असल्यास का?
कुणी व्यसनी, व्याधीग्रस्त असेल तर करू नये. केले तर संपूर्ण कल्पना जोडीदारास देऊन करावे.
>>बऱ्याचदा दुसर्यांकडे असे काही झाले तर आपण त्याला दुजोरा देतो. पण समजा तुमच्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठं व्यक्तीने दुसरे लग्न केले तर तुमचं मत काय असेल?
कदाचित ऑड वाटेल सुरुवातीला. पण त्याचे काय? होईल सवय. करून घेऊ सवय.
>>आणि शेवटचा प्रश्न तुम्ही गेल्यावर तुमच्या जोडीदाराने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का?
NA. म्हणून पास.
वास्तव, अपेक्षा आणि स्व-प्रतिष्ठा
अशा अपेक्षा जोडीदाराकडून ठेवू नयेत असं म्हणणं ठीक आहे, पण जोडीदाराच्या कोणत्या अपेक्षा स्वतःकडून पूर्ण व्हायला हव्यात यामध्येही मोकळीक हवी. पण त्यात कुठेतरी प्रत्येकाच्या स्व-प्रतिष्ठेचा प्रश्न येतो असं दिसतं. असं पाहा:
आपल्या जोडीदाराला आपल्याविषयी असं वाटलं तर आपल्याला कसं वाटेल असा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारून पाहावा असं सुचवेनः "माझी वैचारिक/लैंगिक भूक तू भागवू शकत नाहीस; ती मी बाहेरून भागवतो/ते. मग मला त्याचं वैषम्य वाटणार नाही आणि आपण सुखानं संसार करू. चालेल ना?"
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अपेक्षा
एक शारीरिक संबंध सोडले तर इतर अपेक्षा या कोणत्याही नात्यात येतातच. सोबत एकनिष्ठा ही देखील लग्नाला लागू होते परंतु एकनिष्ठा राखण्यासाठी लग्नाचा सोपस्कारच हवा असे वाटत नाही आणि त्याखेरीज लग्न हे नाते इतर नात्यांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. सर्व अपेक्षा पूर्ण करणे ही कसोटी सहसा कोणीच आणि कोणतेही नाते पूर्ण करू शकत नाही. अपेक्षा या सहसा अवास्तवच असतात. जो अपेक्षा करतो त्याच्यासाठी नाही पण ज्याच्याकडून अपेक्षा केली जाते त्याच्यासाठी हमखास अवास्तव असतात.
आई मुलाच्या नात्यातही, मूल आईला सोडून इतर स्त्रीला (काकी, मामी) चिकटत असेल तर आईला त्यात अक्षम्य अपमान वाटू शकतो. तिथेही थोड्याफार प्रमाणात एकनिष्ठा अपेक्षित असते.
माझ्या वयाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत मी पूर्णतः माझ्या आईवडिलांवर अवलंबून होते. माझ्या आईने असे करावे, वडिलांनी इतका खर्च करावा, मी वाचते ते ऐकून घ्यावे, माझ्याशी चर्चा करावी, मला हे शिकायला द्यावे, हेच जेवण करावे, मला स्वतंत्र खोली असावी वगैरे वगैरे अनेक अपेक्षा होत्या. माझ्या आईवडिलांच्याही अशाच अनेक अपेक्षा माझ्याकडून होत्या. कदाचित दुसर्या मुलाच्या (माझ्या भावाच्या) निमित्ताने ही अपेक्षापूर्ती करून घ्यायची संधी त्यांच्याकडे होते. आईवडिल बदलायची संधी मात्र माझ्याकडे कधीच नव्हती. ;)मी तशी अपेक्षा केली असती तर बहुधा मला धपाटा बसला असता.
एकाकडून शारिरीक संबंध, दुसर्याकडून उदरभरण, तिसर्याकडून वैचारिक भूकशमन वगैरे प्रकार रोचक वाटले तरी मानवी मनाची (समाजाची नाही हं!) गुंतागुंत इतके चोख संबंध ठेवू शकत नाही असे वाटते. सरमिसळ होतेच.
रोचक!
अगदी बरोबर आणि मुद्दा रोचकही आहे. अर्थात अपेक्षा जोडीदाराकडून ठेऊ नयेत हे दोघांकडूनही पाळले पाहिजे. आणि याचसाठि लग्नाआधी (जर अरेंज्ड मॅरेज असेल तरीही) जोडीदाराची याबद्दलची मते माहिती हवीत आणि स्पष्टपणे बोलली गेली पाहिजेत. (अगदी आवश्यकता वाटल्यास शारिरिक सुखाच्या कल्पनेबद्दलही!) याशिवाय स्वतःला मुले हवी आहेत का? असल्यास किती व स्वतःची कि दत्तक या विषयांवरहि लग्ना आधीच (अगदी साखरपुड्याच्याही आधी बोलण्यात) मला गैर वाटत नाही (आणि कोणाला वाटू नये असे स्वानुभवावरून वाटते.)
माझे स्वतःचे उदा घेतले तर मी नॉनवेज खातो - पत्नी खात नाही.. मी नॉनवेज खाण्यासाठी तिच्याच मैत्रिणिकडे गेल्याबद्दल तिचे ऑब्जेक्शन असत नाही असायचे कारण नाहि. आणि हे लग्ना आधिपासून स्पष्ट बोलले गेले आहे. मी स्वतः (अरेंज्ड मॅरेज असुनही) लग्नाआधीच माझ्या सासुरवाडीला राहिलो होतो.. पत्नी १ आठवडा आमच्याकदे होती.. त्यामुळे समोरचि व्यक्ती घरात कशी असते-वागते हे लग्नाआधीच कळते. मी अजुनही ड्राइव्ह करत नाहि. प्त्नीच करते वगैरे वगैरे.. थोडक्यात लग्नाआधी स्वतःला काय हवे-काय नको हे माहित असले व ते समोरच्याला सांगितलेले असले तर एकमेकांबद्दलच्या अपेक्षा आपोआप सेट होतात व हे दोन्हिकडून होते.
तेव्हा अनेक लग्न करणे किंवा न करता रहाणे हा पर्याय मला कायद्याच्या दृष्टीने अव्य्वहार्य/किचकट वाटते. आहे त्या व्यवस्थेतही चांगले लग्न होण्याची शक्यता वाढवता येते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सरमिसळ
सरमिसळ होणार हे स्वाभाविक आहे. म्हणूनच वेगवेगळ्या गरजांचे कप्पे करा असं म्हणत नाही आहे, तर "परस्परेच्छेनुसार आणि परस्परसंमतीनं एकमेकांशी खुलं नातं (ओपन रिलेशनशिप) ठेवावं हा जाँ-पॉल सार्त्र आणि सिमोन द बोव्हार यांचा निर्णय अधिक प्रगल्भ वाटतो" असं म्हणतोय - मग कागदोपत्री लग्न झालेलं असो अथवा लिव्ह-इन असो अथवा स्वतंत्र राहून असो; आणि त्यात कोणती गरज किती प्रमाणात कुणाकडून पूर्ण होईल हे हळूहळू ठरत जाईल आणि काळानुसार बदलत जाईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कळतंय पण वळत नाही
तुम्ही काय म्हणताय हे कळतंय पण तसं वळणं कठीण आहे. अपेक्षा करणे आणि अधिकार गाजवणे ही मानवी मनाची मोठी भूक आहे. प्रेम-ब्रेकअप, लग्न-डिवोर्स-प्रेम अशा अनेक नात्यांतून जाणार्या व्यक्तींना मानोसपचारांची पडणारी गरज लक्षात घेतल्यास गरजेचे प्रमाण ठरवणे सोपे नसावे.
खुली नाती ही कल्पना रोचक वाटते. एकाकडून शारिरीक संबंध, दुसर्याकडून उदरभरण, तिसर्याकडून वैचारिक भूकशमन सध्या ही तीनच परस्परेच्छेने प्रस्थापित नाती घेऊ पण त्यापैकी आजारपणात किंवा इतर वेळेस माझी काळजी कोण घेईल, थकल्या जिवाला रात्री विसावा घ्यावासा वाटेल (शय्यासोबत नाही) अशा आणि तत्सम प्रसंगी यापैकी कोणी साथ द्यावी हा प्रश्न पडतो कारण येथे मूळ अपेक्षांपेक्षा जास्तीच्या अपेक्षा आल्या. अधिक अपेक्षा आल्या की अधिकार गाजवणे आले.
एकंदरीत हे चक्र आहे. त्यातून सुटकेचे पर्याय दिसले तरी ते पर्याय वास्तव वाटत नाहीत.
सर्वप्रथम प्रतिसाद देणाऱ्या
सर्वप्रथम प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे आभार.
सगळ्या प्रतिसादांवरून एक सार्वमत होतेय की लग्न ही खाजगी बाब आहे, आणि दुसरे असले तरी ज्यांना ते करायचे आहे ते त्यांनी त्यांच्या मर्जीने केले तर हरकत नसावी. असं असतानाही अशोक पाटील म्हणतात त्याप्रमाणे दुसऱ्या लग्नाचे पडसाद घरातील अन्य सदस्यांवर या ना त्या निमित्ताने, कळत-नकळत, पडताना दिसतात.
ऋ'ला प्रश्न पडलाय की वाढलेल्या वयात दुसऱ्या जोडीदाराची गरज का पडावी? त्याला ह्यामागे त्या त्या व्यक्तीचं आयुष्य हे स्वयंपूर्ण नसणं हे कारण असावं असं वाटतं. मला वाटतं ह्याचा जीवन स्वयंपूर्ण नसण्याशी संबंध जोडू नये. भरपूर मित्र असणारे, छंद जोपासणारे, किंवा वाढलेल्या वयातही स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवणारे एकाकी असू शकतात. मुलं नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी किंवा दूर राहणे आजच्या काळात नित्याचेच झाले आहे. त्यामुळे उतारवयात मुलं जवळ असतीलच असे नाही. अशावेळी जोडीदार गमावल्यानंतर आयुष्यात निर्माण होणारी पोकळी ही छंद जोपासल्याने पूर्ण होईलच असे नाही. ज्या व्यक्तीशी आपले विचार जुळतात, ज्याच्या सोबतीने आपले उर्वरित आयुष्य आहे त्यापेक्षा सुखकर आणि सोईस्कर होत असेल अशा व्यक्तीशी लग्न करणे गैर नसावे. धनंजय किंवा ननि म्हणतात तसे आधारासाठी लग्न करण्यापेक्षा लिव्ह-इन किंवा करार करावा हे ठीक वाटत असलं तरी सगळ्यांना पटेलच असे नाही. लिव्ह-इन हा प्रकार आताशा बऱ्यापैकी कॉमन होत असला (विशेषतः तरुण मंडळीत) तरी त्या नात्याला समाज किंवा घरचेही किती मान्यता देतील हा प्रश्न आहेच. अश्या नात्याला स्वीकारण्यापेक्षा अमक्या अमक्याने बघा बाई ठेवली, किंवा तमकीला काय म्हातारचळ लागलाय अश्या प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागेल असे वाटते (निदान भारतात तरी). त्यापेक्षा लग्न केले तर ते सर्वमान्य होते.
पक्षी म्हणतात की कितीतरी समाज उपयोगी (किंवा उद्योगाची) कामे आहेत ती करताना जास्तीस जास्त वेळ द्यावा लागतो आणि अशा गरजेच्या गोष्टी आपला मोलाचा वेळ देऊन भरीव कामगिरी ती व्यक्ती नक्कीच करू शकते. मला वाटतं की प्रत्येकजण हा समाजोपयोगी कामे करण्यासाठी आणि स्वतःला त्यात झोकून देण्यासाठी तयार असतोच असे नाही. म्हणजे चला जोडीदार गमावला, मी आता सोशल सर्वीस करेन म्हणतो असे क्वचितच होते. शिवाय उतारवयात समाजसेवा करणे हे शक्य होईलच असे नाही. आडकित्ता ह्यांनी एक वेगळाच विचार मांडला आहे. आयुष्यभर एका संसाराचा गाडा ओढून थकलेल्या, जिला स्वत:ची प्रकृती त्रास देऊ लागली आहे, अश्या त्या स्त्रीच्या मनात खरंच दुसरी वेठबिगारी पत्करायचा विचार येईल का? थकलेल्या आणि प्रकृती त्रास देऊ लागलेल्या स्त्रीला कदाचित दुसरे लग्न करावे वाटणार नाही. पण मी वर म्हटल्याप्रमाणे जर कुणाशी विचार जुळत असतील, आणि उरलेलं आयुष्य एकमेकांच्या सोबतीने आणि एकमेकांची काळजी घेऊन जाणार असेल ती असा विचार करूही शकते. माझ्या बायकोच्याच ओळखीचे एक व्यक्ती आहेत. साठीच्या पुढचे आहेत. त्यांनी मागच्या वर्षीच एका समवयस्क बाईशी लग्न केले. दोघांचेही मुलं अमेरिकेत आहेत. मुलांनी विरोध केला असे म्हंटले जाते. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता ह्या दोघांनी लग्न केलंय आणि आता बरं चाल्लंय त्यांचं. मुलांनीपण सुरवातीच्या विरोधानंतर हे नातं स्वीकारलं आहे (आणखी करूपण काय शकत होते म्हणा).
सगळ्यात वेगळा विचार मांडलाय तो चिंजंनी. त्यांना परस्पर इच्छेनुसार आणि परस्परसंमतीनं एकमेकांशी खुलं नातं (ओपन रिलेशनशिप) ठेवावं हा जाँ-पॉल सार्त्र आणि सिमोन द बोव्हार यांचा निर्णय अधिक प्रगल्भ वाटतो. हा मुद्दा कळत असूनही ह्या क्षणी मला प्रियाली ह्यांचे मत पटते. प्रत्येक नात्यात असतात तश्या लग्नाच्या नात्यातही अपेक्षा असतात, पण काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून लगेच दुसरा पर्याय खुला असावा असे मला वाटत नाही. प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे पर्याय दिसले/असले तरी ते पर्याय मला वास्तव वाटत नाहीत. भारतीय समाज तेवढा पुढे जायला आणि ओपन रिलेशनशिप सर्वमान्य व्हायला किमान काही पिढ्यातरी जाव्या लागती असे वाटते.
-अनामिक
नाहि पटले
१. माझा प्रश्न असा होता की उतारवयात अश्या कोणत्या अपेक्षा असतात ज्या लग्न केल्यानेच पूर्ण होऊ शकतात? अशी लग्ने मला काहिवेळा पैशासाठि केलेली असु शकतात. आणि असे असेल तर ते मला योग्य वाटते.(यात निगेटिव्ह छटा टाळुनही / घेऊनहि हेच मत आहे)
२. लग्न न करता रहायचे तर समाज बोलतो हे कबूल. जर हे सहन करायचे नसेल तर एकत्र राहु नये.
तरुणपणीदेखील आपला जोडीदार २४ तास आपल्यासोबत नसतो. पैशाचा अपव्यय टाळणे, शारीरीक गरजा, घरतील कामांना इतर व्यापांमुळे एकमेकांना न जमणारी कामे पुरक पद्धतीने करून जीवन सुकर करणे, मुलांना जन्म देणे व वाढवणे अश्या कारणांमसाठि एकत्र राहिले जाते
मात्र उतारवयात ना शारीरिक गरजा उरल्या असतात, ना मुलांना जन्म द्यायचा असतो. मग एकत्र राहायचच का असतं?
एकुणच वेळ भरपूर असल्याने व गरजा कमी झाल्याने कामेच कमी होतात (व ती करायला गडी/मोलकरीण ठेवता येते*) मग उरतो भरपूर वेळ. छंद नसल्यानेच नव्हे तर एकुणच स्वतःचि कामे स्वतःला करता न येणे( सध्या ५०-७० वर्षांच्या अनेक पुरुषांमधे हा दोष सर्रास आढळतो)माझ्या कित्यके परिचित पुरुषांना साधे शर्टाला बटण लावणे, चांगला गहु निवडणे, मशिनला कपडे लावणे-वाळत घालणे, कुकर लावणे असली साधी-साधी कामे येत नाहित तर कित्येक परिचित या वयातील स्त्रियांना चेक लिहिणे-तो बॅंकेत भरून पैसे काढणे, बिले भरणे, गॅस सिलेंडर लावणे, नारळ फोडणे, पैशाची योग्य गुंतवणूक करणे वगैरे कामे येत नाहित असे दिसते. इतकेच काय स्वतः कमवून आणलेल्या पैशाचे काय करायचे असते हे देखील कित्येक स्त्रीयांना माहित नसते.
अश्यावेळि अचानक एकटे झाल्यावर या गरजा भागवण्यासथी त्यांना जोडीदार हवा असतो असे वाटले तर त्यत गैर ते काय? अश्या बाबतीत स्वयंपूर्ण असणार्या व्यक्तिंना दुसरे लग्न करावेसे वाटत नाही असे निरिक्षण आहे
उतारवयात ज्याच्यासोबतीने उर्वरीत आयुष्य आहे त्यापेक्षा सुखकर आणि सोयीस्कर करायला 'एकत्र रहाण्याने' किंवा 'एका घरात राहुन' काय वेगळे घडू शकते? जर केवळ एखाद्याची सोबत आवडते तर त्यासाठी एकत्र रहायचि काय गरज?
थोडक्यात माझा आक्षेप दुसरे लग्न करण्याबद्द्ल नाहिच आहे. मात्र त्याचा उद्देद्श उगाच त्यांना एकत्र रहायला आवडते वगैरे देऊ नये असे वाटते. (त्यांना एकत्र रहायला का आवडते हे बघा.. उत्तर स्वयम्पूर्ण (सगळ्याच बाबतीत - अगदी भावनिकही) नसल्याने हे मिळेल)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चर्चा
चर्चा आवडली.
-Nile
वास्तव पर्याय?
वास्तवाशी संबंध लावायचा तर काही प्रमाणात आजूबाजूच्या समाजात कोणत्या गोष्टी दिसतात हे पाहणं उद्बोधक ठरावं. शहरी मराठी मध्यमवर्गात आता ओपन किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप हा अनेक पिढ्या पुढे असणारा प्रकार उरलेला नाही असं दिसतं. काही उदाहरणं:
मुंबईच्या उपनगरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारं लिव्ह-इन जोडपं: वय सुमारे ३५-४०. दोघंही कमावते. दोघंही मराठी. मूल आहे. शाळेत दाखला घेताना मूल आईचं नाव लावतं. यांनी लग्न केलेलं नाही हे सोसायटीत सर्वश्रुत. सोसायटीत ८०+ वयाच्या निवृत्त आजी-आजोबांपासून पन्नाशीची घटस्फोटित नोकरदार बाई आणि ३५-४० वर्षांची जोडपी असे अनेक संसारी गाळेधारक. कुणालाही या प्रकाराचं विशेष अप्रूप किंवा गॉसिप म्हणून चघळण्यात फारसा रस नाही. सोसायटीचा गणपती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांत लिव्ह-इन जोडप्याचा सहभाग. वेळप्रसंगी अडीअडचणीला एकमेकांची मदत करणं (उदा: २६ जुलैचा पाऊस) वगैरे सर्व काही चारचौघांसारखं.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात ओपन रिलेशनशिपमध्ये राहणारं जोडपं - वय वर्षं ५०+ (सहवासः सुमारे २५ वर्षं); दोघांचा (वेगवेगळ्या ठिकाणी) स्वतंत्र फ्लॅट; एकमेकांकडे नियमित जाणं-येणं; प्रसंगी राहणं; सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसह वावरणं. नातेवाईक, मित्रपरिवार यांना हे माहीत आहे. नातेवाईक सदाशिव-नारायण-शनिवार इथे अनेक पिढ्यांपासून स्थायिक उच्चवर्णीय मराठी.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात (एका पेठेत) ओपन रिलेशनशिपमध्ये राहणारं समलिंगी जोडपं - जोडीदार वय ५०+ आणि सुमारे ४० (सहवासः सुमारे १५+ वर्षं). ते समलिंगी आहेत हे नातेवाईक-मित्रपरिवार-सोसायटी-काम करण्याची जागा-फेसबुक इथे माहीत आहे. ते मजेत राहतात हे सर्वांना दिसतं. कुणाची हरकत नाही.
मुंबईच्या उपनगरातला तरुणः वय वर्षं २५. नुकताच कमावता झालेला. आतापर्यंत दोन गर्लफ्रेंड्स झालेल्या आहेत. त्यांना घरी आणून आजी-आजोबांशी ओळख वगैरे करून दिलेली आहे. एकमेकांच्या घरी जाऊन राहणं; बाहेरगावी जोडीनं जाणं वगैरे सर्व घरच्यांना सांगून. काही वर्षांनंतर ब्रेकप झाला. आता तिसरीच्या शोधात. दरम्यान इतर मैत्रिणींची घरी ये-जा पण त्या 'गर्लफ्रेंड' नाहीत; नुसत्याच मैत्रिणी हे स्पष्ट. आजी-आजोबा (वय वर्षं ८०+) कट्टर हिंदुत्ववादी उच्चवर्णीय मराठी. नातवाची चेष्टा करतात की बाबा रे एकीला तरी आयुष्यभर पकडून ठेवणार आहेस की असाच फुलपाखरी जगत म्हातारा होणारेस? तो म्हणतो पुढचं पुढे बघूया. आता घाई कशाला?
मुंबईच्या उपनगरातली तरुणी: वय वर्षं ३०. कमावती. बॉयफ्रेंड आहे, पण दुसर्या शहरात. जमेल तेव्हा एकमेकांकडे जातात. दोघांच्याही आयुष्यात आधी इतर येऊन गेलेले आणि काही कारणामुळे ब्रेकप झालेले. इतर वेळी इतर पुरुष मित्र तिच्याकडे राहतात (मुंबईत जागा मिळेस्तोवर तात्पुरती सोय किंवा बाहेरगावाहून आलेले एक-दोन रात्रींसाठी म्हणून). ते नुसतेच मित्र; बॉयफ्रेंड नाहीत, हे उघड.
अगदी या धाग्यावरसुद्धा अनेकांनी हा (दुसरं किंवा पहिलं) लग्न करणार्यांचा खाजगी मामला आहे असं सांगितलं आहेच. तसाच अनुभव आता ओपन किंवा लिव्ह-इनबाबत येतो. नवीन ओळख असता सुरुवातीला लोक किंचित चौकशी करतात. स्पष्ट उत्तर मिळाल्यानंतर चेष्टा/आक्षेप/इतर त्रास नाही. हे माझ्या परिसरातलं आजचं वास्तव आहे. कदाचित तुमच्याही असेल, पण तुम्हाला माहीत नसेल, इतकंच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गोंधळ होतोय असं वाटतं
तुम्ही माझं आणि अनामिक यांचं वाक्य एकत्र जोडून काहीतरी गोंधळ केला आहे.
भारतीय समाज कुठे चालला आहे आणि कुठे जातो आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मी त्या पुढल्या घडामोडीविषयी भाष्य केले आहे.
तुम्ही वर दिलेल्या सर्व उदाहरणांत ही जोडपी एकमेकांशी एकनिष्ठ असल्यासारखी वागत आहेत. मग भले ती वेगवेगळी राहत असोत किंवा सम-भिन्नलिंगी असोत. यांत मला अपेक्षित असणारी सरमिसळ दिसलीच नाही.अगदी बॉयफ्रेंड वेगळ्या शहरात राहणार्या मुलीतही.
अशी अनेक उदाहरणे मला दिसतात. माझा स्वतःचाच एक अविवाहीत मित्र आहे, ज्याच्याकडे माझ्या इतर मित्रांच्या बायका बाहेरगावाहून मुंबईत आल्या की उतरतात. त्यांना किंवा त्यांच्या नवर्यांना त्यात काहीही गैर वाटत नाही. इथे परस्पर विश्वासाचं नातं आहे पण त्या विश्वासाला तडा गेला तर काही वाटणारच नाही असं मी म्हणू शकत नाही.
तुम्ही दिलेल्या उदाहरणांपैकी कोणी तिसर्या व्यक्तीस मध्ये आणले किंवा मला शारिरीक संबंध तुझ्याशी अमुक पद्धतीने आवडतात पण तिसरी व्यक्ती तमुक पद्धतीने ते मला देऊ शकते तसे देणे तुला अशक्य आहे हे म्हणून मी आता त्या तिसर्या व्यक्तीशी स्टेडी संबंध (हॉटेलातून भाजी आवडते म्हणून ती आणतो असे नव्हे. कदाचित दरवेळेस तुझ्या हातची वाटाण्याची भाजी आवडत नाही म्हणून हॉटेलातून घेऊन येतो असे सांगितले तरी काहींचा अपमान होऊ शकतो.) ठेवतो (संदर्भ: सार्त्र-सिमोन - ते अपवादात्मक दिसतात) असे म्हटले तर कदाचित ते सर्वांच्याच पचनी पडेल असे नाही.
जिथे मानवी मन गुंतलेले असते तेथे व्यवहार इतके साधे-सरळ-रोख-ठोक असतात असे वाटत नाही.
परस्परेच्छेनुसार आणि परस्परसंमतीनं एकमेकांशी खुलं नातं (ओपन रिलेशनशिप) ठेवावं हा पर्याय अतिशय सोपा दिसतो तो तसा पाळणे अतिशय कठीण आहे. श्रद्धा अंधश्रद्धेच्या चक्रातून जाणार्या माणसाला अंधश्रद्धा सोडायची असेल तर भीती सोडण्याची गरज असते. भीतीशिवाय माणूस नाही. भीती केवळ श्रद्धेशी निगडित असते असे नाही तर भविष्यकाळ, अधिकार, आधार अशा अनेक गोष्टींशी निगडित असते. जोपर्यंत भीती राहिल तोपर्यंत खुली नाती आम होणे कठीण वाटते.म्हणून मी म्हटले,
एकंदरीत हे चक्र आहे. त्यातून सुटकेचे पर्याय दिसले तरी ते पर्याय वास्तव वाटत नाहीत.
ओपन रिलेशनशिप
माफ करा. ओपन रिलेशनशिप लिहिताना मी ते गृहित धरलं, पण आता स्पष्ट लिहितो: तिथे नात्यातल्या दोघांनाही इतरांशी शरीरसंबंध ठेवण्याची मुभा आहे (सेफ सेक्स असावा अशी अपेक्षा अर्थात आहे). कोण किती वेळा ही मुभा घेतात याविषयी माझ्याशी चर्चा होत नाही किंवा ते उघड दिसत नाही त्यामुळे तसं नक्की सांगता येत नाही, पण मुभा आहे (आणि कधीकधी घेतली जाते) हे नक्की.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हम्म!
वरच्या उदाहरणांतील सर्व ओपन रिलेशनशिप असतील तर बहुधा भारतात खुली नातेव्यवस्था इतकी रुजू लागली आहे हे मला माहित नव्हते हे मान्य करते.
प्रश्न शक्यतेचा
"त्यातून सुटकेचे पर्याय दिसले तरी ते पर्याय वास्तव वाटत नाहीत."
~ यू सेड इट, प्रियाली. शुअरली व्हेरी डाऊन टु अर्थ कन्क्लुजन.
धागाकर्त्याचा विषय 'दुसरे लग्न' म्हणजे लग्नाची (देवाब्राह्मणासमोर) मारलेली गाठ इकडेच संकेत दाखवत असल्याने श्री.चिंजं म्हणतात - सुचवितात असे म्हणत नाही - त्याप्रमाणे Live-in Relationship चा या चर्चेत समावेश करणे अप्रस्तुत आहे असे एक 'सीनिअर' या नात्याने म्हणतो, म्हणजे त्यानुसार सिमॉन-सार्त्र वा तत्सम उदाहरणेही आपोआपच गैरलागू होत जातील. मुळात भारतीय समाजस्थिती आणि दुसर्या लग्नाबद्दलची 'मास' मानसिकता यादृष्टीनेच या विषयाकडे आणि त्यातून उदभवणार्या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे. श्री.चिंजं आणि त्यांची मते पुरस्कृत करणारे हे माझ्या अंदाजाप्रमाणे तिशीच्या आत असतील तर पाश्चिमात्य साहित्य आणि तेथील खुल्या राहणीमानाचा त्यांच्या मतावर/विचारावर प्रभाव पडणे ही एक नैसर्गिक बाब आहे. पण वयाची पन्नाशी ओलांडलेला/ली (इथे भारतीय भूमीत) अशा कल्पना सर्वत्र रुजतील असे कुणी मानत असेल यावर विश्वास बसणे जड जाते.
वेस्टर्न कल्चरमध्ये विशिष्ट वयानंतर मुले आईवडिलांपासून दूर राहून स्वतंत्र जगतात, मग आईवडील कधी एकटे, कधी जोडीने आयुष्य आपापल्या मगदुरीप्रमाणे घालविण्यास सुरुवात करतात, सरकारही सीनिअर्सची तिथे योग्य काळजी घेते, इ.इ. या बाबी स्वीडन नॉर्वे, फ्रान्समध्ये ठीक आहेत. पण इथल्या भूमीत 'एकत्र कुटुंब' नावाची संकल्पना आजही आपली मूळे घट्ट रोवून आहे. मुलामुलींची लग्ने ठरविताना दोन्ही घराण्याकडून जी काही शेरलॉक होम्सगिरी होते त्यामध्ये असे उपपदर कुठे आहेत्/होते का याचेही छिद्रान्वेषी संशोधन होत असते. यामध्ये त्या मुलीचा वा मुलाचा कसलाही दोष नसला तरी व्यवहाराच्या वेळी 'दुसरेपणावर' कुणीतरी लग्न केले आहे, मग हा दुसरा अगर दुसरी कुठल्या घराण्यातील, का लग्न केले, इतिहास काय? अशा अनेकविध प्रश्नांचे मोहोळ उठते (मी स्वतः अशा अनेक उदाहरणाचा साक्षीदार असल्याने ही वस्तुस्थिती आहे हे मान्य व्हावे. कदाचित ब्राह्मण कुटुंबात काहीसे स्वातंत्र्य असते अशा संदर्भात, पण मराठा आणि अन्य पदर ईल्ला.)
ज्या सुनीताबाईंचे मी वर एका प्रतिसादात उदाहरण दिले आहे, त्यांचे लग्नाबाबतचे मतही अगदी श्री.चिंजं यांच्यासारखेच होते. त्या लिहितात, "भाईची माझी ओळख झाली. दोनतीन महिन्यातच भाई 'लग्न करू या' म्हणू लागला. माझा मात्र लग्न या गोष्टीला पूर्ण विरोध होता. आपले प्रेम जर पक्के असेल तर कुणालाही घाबरायची गरजच काय ? आपण एकत्र राहावे. त्यासाठी लग्नाचे कृत्रिम बंधन कशाला ? आणि समजा, उद्या प्रेम संपले किंवा कमी झाले, तर केवळ लग्न झालेय म्हणून एकमेकांजवळ मनाविरुद्ध कशासाठी राहावे ? जो समाज आपले असले वैयक्तिक प्रश्न निर्माणही करत नाही आणि सोडवायलाही येत नाहे, त्याचा या बाबतीत विचारच कशाला करायचा ?"
~~ इतके प्रगल्भ आणि प्रस्थापित समाजव्यवस्थेविरूद्ध रोखठोक मते असणार्या सुनीता ठाकूर या युवतीलाही त्याच समाजाचे ऐकायला लागले आणि रितसर धार्मिक संस्कार होऊनच त्या ठाकूरच्या देशपांडे झाल्या. ही झाली एका तेजस्विनीची कहाणी, मग सांप्रत महाराष्ट्रदेशी मुंबई-पुण्यातील दोनचार उदाहरणे वगळता अशा किती मुली सापडतील ज्या सिमॉन होऊन एखाद्या सार्त्ररावाबरोबर 'तशाच' राहू शकतील?
अशोक पाटील
सुनीताबाईंच्या उदाहरणावरूनः
सुनीताबाईंचं लग्न झालं त्याला आता पन्नास-साठ वर्ष झाली असतील. या वर्षांमधे भारतीय समाज नक्कीच बदलला आहे.
चारेक वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या काही महिने आधीच, "तुला लग्न करायची गरज काय?" असा प्रश्न मला माझ्या आईच्या वयाच्या शेजारच्या काकूने विचारला होता. साठी उलटलेली, आयुष्यभर कारकूनाची नोकरी केलेली ही काकू कोणी असामान्य कर्तृत्वाची आणि टोकदार जाणीवा असणारी रोखठोक सुनीताबाई नव्हे, सामान्य संसारी स्त्रीच आहे. तिच्याशी या विषयावर मी तेव्हा तासभर चर्चा केली होती. त्यामुळे रोखठोक सुनीताबाईंना पड खावी लागली तर इतर मुलींची काय कथा हा प्रश्न मला पडत नाही.
माझ्या साधारण चारेक वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मला मॅरेज सर्टीफिकेटची गरज पडली ती डिपेंडंट व्हीजा काढण्यासाठी, आणि घर भाड्याने घेताना प्रोसेसिंग फी कमी भरावी लागावी म्हणून! भारतात असताना या कागदाची एकदाही गरज पडली नाही, ना कोणी मुद्दाम चौकशी केली. किंबहुना भारतीय मित्रमंडळापैकी काहींनी माझ्या लग्न करण्याबद्दल आश्चर्यच व्यक्त केलं.
एका कागदावर सही केली म्हणून काय बदललं हे मला अजूनही समजलेलं नाही. कागदावर सही करणार्यांचंच बहुमत आहे हे निश्चित; पण म्हणून सिमोन, सार्त्र आणि जंतूसारख्या अल्पसंख्यांकांचं अस्तित्व अजिबात अमान्य नाही आणि त्यांचे विचार मी समजू शकते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सही
चर्चेत काहीसे अवांतर असले तरी लग्नाच्या उद्देशांविषयी गोंधळ निर्माण झाल्यासारखे वाटले म्हणून :
>>एका कागदावर सही केली म्हणून काय बदललं हे मला अजूनही समजलेलं नाही. कागदावर सही करणार्यांचंच बहुमत आहे हे निश्चित; पण म्हणून सिमोन, सार्त्र आणि जंतूसारख्या अल्पसंख्यांकांचं अस्तित्व अजिबात अमान्य नाही आणि त्यांचे विचार मी समजू शकते.
तो लग्नाचा उद्देश नाही. लग्नसंस्थेचा उद्देश (पुरुषप्रधान समाजात) पुरुषाच्या संपत्तीचे अधिकृत वारस ठरवण्याचा निकष पुरवणे एवढाच आहे. बाकी कुठल्याही गरजा पुरवण्यासाठी लग्न करण्याची काही आवश्यकता नाही. सहजीवन, केअरिंग वगैरे लग्नाचे आनुषंगिक परिणाम आहेत.
कागदावर सही केल्यामुळे बदललं ते इतकंच की लग्नामुळे निर्माण होणारे अधिकार तुम्हाला प्राप्त झाले. तुम्ही तुमच्या नवर्याच्या संपत्तीच्या अधिकृत वारस झालात. तुम्हास मूल झाल्यास ते मूल तुमच्या नवर्याचं अधिकृत वारस होईल. सही केल्यामुळे हे बदललं. संपत्ती* आणि वारसाहक्क यांच्या वाट्याला जायचे नसेल तर सही केल्याने काहीच बदललं नाही**.
*संपत्ती म्हणजे राहते घरसुद्धा
**तरीसुद्धा थोडंफार बदलतंच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धाडसाचे विधान
"या वर्षांमधे भारतीय समाज नक्कीच बदलला आहे."
~ आय अॅम सॉरी अदिती.....पण तुझे हे विधान फार फार धाडसाचे आणि सत्य वस्तुस्थितीपासून कोसोमैल दूर आहे. प्लीज, एनआरआय आणि मुंबई मेट्रोशिवायही महाराष्ट्र नावाचा एक प्रदेश अस्तित्वात आहे आणि तिथे रोटीबेटीचे व्यवहार अत्यंत काटेकोरपद्धतीने आजही इथे चालतातच, हे जर तू लक्षात घेतलेस तर तुझ्या विधानातील सत्यतेची धार मर्यादित होईल.
बिलिव्ह मी.
अशोक पाटील
१००% सहमत आहे.
१००% सहमत आहे.
http://shilpasview.blogspot.com
तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत
तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती ओपन रिलेशनशिपची नसून लिव्ह-इनची आहेत. मला अभिप्रेत असलेली ओपन रिलेशनशिपची व्याख्या - तुमच्या जोडीदाराच्या सहमतीने तुम्ही किंवा तुमचा जोडीदार एक किंवा अनेक व्यक्तींशी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संबंध ठेवणे (ह्या गरजा शारिरीकही असू शकतात किंवा इतरही) अशी काहिशी आहे. शहरी भागात लिव्ह-इन बरंच कॉमन व्हायला लागलं आहे, पण म्हणून ते संपूर्ण समाजाचं प्रतिनिधीत्व करत नाही. शिवाय लिव्ह-इन मधले दोघे हे एकमेकांशी एकनीष्ठ असतात असा माझा समज आहे. आणि म्हणूनच लग्न न करताही त्या नात्याला आज मान्यता मिळत असेल. आणि मला वाटतं हे सध्यातरी शहरी भागापूरतं मर्यादीत असावं. शहरी भाग वगळता इतर ठिकाणी अजूनही अश्या नात्यांना सहज मान्यता मिळत नसावी. ओपन रिलेशनशिप हे लिव्ह्-इनच्याही पुढचं पाऊल आहे, म्हणूनच मी काही पिढ्या म्हंटले. ते कदाचित एखादी पिढी असेही होऊ शकेल, कोणास ठाऊक!
-अनामिक
प्रकाटाआ
प्रकाटाआ
शंका - ओपन रीलेशन
एक शंका - ओपन रीलेशनशिप मध्ये
१. 'अ' हि व्यक्ति 'ब' ची भावनिक(उदा.) गरज पूर्ण करू शकते.
२. पण फक्त 'ब' हि व्यक्ति 'अ' ची शाररिक गरज पूर्ण करू शकते. (भावनिक गुंतवणूक)
३. पण 'अ' हि व्यक्ति 'ब' ची शाररिक गरज पूर्ण करू शकत नाही.
शंका - 'ब' ही व्यक्ति हा ट्रेड-ऑफ करायला तयार होइल काय?
नितिन: होय, हा मुद्दा मान्य
नितिन: होय, हा मुद्दा मान्य आहे. पण म्हणूनच मी मुद्दाम लग्न होऊन फार काळ न उलटण्याचा उल्लेख केला आहे.
मला अनुभव नाही म्हणून मुद्दाम प्रश्नः मूल जन्माला येतं तेव्हा आई-वडलांचं मॅरेज सर्टीफीकेट मागतात का? हा सूर्य आणि हा जयद्रथ (वडलांनी आपली ओळख शाबीत करून अपत्याचं पालकत्त्व मान्य करणं) पुरत नाही का?
अशोक पाटील: सुनीताबाईंनी लग्न केलं तेव्हा असा विचार करणारे किती लोकं होते आणि आज किती आहेत याचा विचार केला तर नक्कीच समाज बदलला आहे. हा बदललेला समाज फक्त मुंबई आणि पुण्यातच बहुतांशाने आहे हे दुर्दैवी सत्य मान्य आहे. पण म्हणून बदल झालेला आहे हे संपूर्ण अमान्य करावं का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुरेसे
>>हा सूर्य आणि हा जयद्रथ (वडलांनी आपली ओळख शाबीत करून अपत्याचं पालकत्त्व मान्य करणं) पुरत नाही का?
जोवर वडील मान्य करतात तोवर पुरतं.
अवांतर: जोवर सगळं सुरळित असतं तोवर काही प्रश्न नसतो. बिघडल्यावर घर सोडावे लागू नये म्हणून सही करावी लागते]
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्पष्टीकरणं
वरच्या उदाहरणांतील सर्व नाही, तर मोजून दोघांसाठी मी 'ओपन रिलेशनशिप' हे शब्द वापरलेले आहेत. अर्थात, डोळा मारण्याचा आपला अधिकार शाबूत आहे तसा त्या तपशीलाकडे कानाडोळा करण्याचादेखील आहेच
इथे काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे असं वाटतं:
'पालकनीती' या सुजाण पालकत्वाला वाहिलेल्या मासिकाचा रौप्यमहोत्सव आजच पुण्यात साजरा होणार आहे. म्हणजे ज्या पिढीला सुजाण पालक बनवण्यासाठी हे मासिक सुरू झालं त्या पालकांची मुलंही आज पंचविशीच्या आसपास आहेत आणि असे पालक पन्नाशीत आहेत हे लक्षात घ्या. आर्थिक उदारीकरणाच्या वातावरणात जे नुकतेच कमावते झालेले होते आणि ज्यांना खा-उ-जा धोरणांचे लाभ मिळाले असे लोक १९८७ मध्ये विशीत असतील तर आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. यांपैकी अनेकांची (पुष्कळदा एकुलती एक) मुलं आर्थिक सुबत्तेच्या (किंबहुना चंगळीच्या) वातावरणात वाढून आता पंचविशीच्या उंबरठ्यावर आहेत. ही पालकांची पिढी माझ्यासारख्यांच्या डोळ्यासमोर लग्न-घटस्फोट-दुसरं लग्न किंवा इतर काही खुले व्यवहार या चक्रातून गेलेली आहेत. त्यामुळे 'दुसरं लग्न करावं का?' यात फार नैतिक/तात्त्विक प्रश्न पडू नयेत असंच मला वाटतं आणि माझ्या पहिल्या प्रतिसादात हे मांडण्यापुरतीच पार्श्वभूमी मी दिली होती.
आता जरा या वर उल्लेख केलेल्या शहरी मध्यमवर्गीय (पन्नाशीतल्या) पालकांच्या मुलांचा विचार करा. त्यांचे पालक बर्यापैकी सहिष्णू आहेत आणि ती मुलं अशा बाबतीत स्वतःच्या मतांवर ठाम राहिली तर पालक त्यांना किरकोळ शाब्दिक वादापलीकडे विरोध करत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे याच वातावरणातल्या (मराठी, शहरी, मध्यमवर्गीय, सुशिक्षित वगैरे) आजच्या सुनीतांना मन मारून असं करावं लागत नाही.
याविषयी माझ्या मनात संदेह नाही, पण अशा या आपल्या महाराष्ट्रातली तरुण पिढी आज मुंबई-पुण्यासारख्या शहरांत (नोकरी-व्यवसायाच्या संधी अधिक असल्यामुळे) येते आणि इथे पारंपरिक रोटीबेटीच्या व्यवहारांपलीकडचे पुष्कळ व्यवहार करते हेही माझ्या डोळ्यांसमोर आहे. मुंबई-पुण्यातल्या कोणत्याही मोठ्या कंपनीतल्या एच.आर. डिपार्ट्मेंटमध्ये चौकशी केलीत तर छोट्या गावांतल्या मुलामुलींचे गंमतीशीर (किंवा तुम्हाला भोवळ आणतील असे) लैंगिक व्यवहार तुम्हाला समजतील.
थोडक्यात, भारताचं माहीत नाही, पण महाराष्ट्र नक्कीच बदलतो आहे आणि मुंबई-पुणं तुमच्या दृष्टीनं जात्यात असेल तर इतर महाराष्ट्र सुपात आहे एवढंच म्हणतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अपवादात्मक
हो. तुम्ही तसं स्पष्टपणे म्हटलंत. माझे दुर्लक्ष (पक्षी: काणाडोळा) झाला हे मान्य करते.
दोन चार उदाहरणे देऊन समाज बदलतो आहे असे म्हणणे मला पटत नाही. अशा गोष्टी समाजात अव्याहत चालत होत्या. पूर्वी ज्याला निंदाजनक शब्दांची विशेषणे दिली जात तसे आज जाहीररित्या मुंबई-पुण्यात होत नाही इतकेच. त्या दिशेने समाज बदलतो आहे असे म्हणावे लागेल.
अन्यथा, इतरत्र मागे एका समलिंगी प्राध्यापकांवर हल्ला करून त्यांचा जीव घेण्याची घटना फार जुनी नाही पण अर्थातच मेट्रो शहरांत असे होणार नाही असे वाटते.
इतरांचे लैंगिक व्यवहार समजल्यावर भोवळ वगैरे येईल असे का वाटले ते कळत नाही. असे व्यवहार ५० वर्षांपूर्वी चालत नव्हते की इतर सर्व बाळबोध आहेत असे वाटते? पण असो. असे लैंगिक व्यवहार करणारे आयुष्यातील किती वर्षे "तशाच" लैंगिक व्यवहारांना चिकटून असतात? त्यातले बरेचसे कालांतराने लग्न, मुलंबाळं यांच्या मार्गानेच जातात असे वाटते.
माझ्या स्वतःच्या कुटुंबात असं उदाहरण आहे की आपल्या बॉयफ्रेंडसोबत एक मुलगी अमेरिकेला विजिट विसावर आली आणि तिथेच राहिली. (ही गोष्ट सुमारे २५ वर्षांपूर्वीची) नंतर अनेक प्रकारचे विजा मिळवून, गडबडी करून कायम झाली. कालांतराने या बॉयफ्रेंडला सोडून त्याच्या मित्राशी लग्न केलं. आज ते तिघेही कधी वेगळे, कधी एकत्र मजेत राहतात. घरातल्या सर्व प्रसंगांमध्ये त्यांची हजेरी असते. तोंडावर त्यांना कोणी काही म्हणत नाही. मागून सर्वांच्या आठवड्याभराच्या गॉसिपिंगची सोय होते.
या तिघांविषयी बर्याचशा बातम्या या मुलीच्या भावाची बायको पुरवते. ही बाई अमेरिकन असून, तिला या आधी पहिल्या लग्नातून झालेला एक मुलगाही आहे. पण तरीही, आपल्या नणंदेने असे करू नये असे तिला वाटते.
मानवी मन अतिशय मजेशीर असते. इतरांनी अमुक गोष्ट केली, तशी आपल्या लोकांनीही करावी याला ते संमती देत नाही. वरील चर्चाप्रस्ताव बहुधा तेच विचारतो आहे.
काही गोष्टींना जाहीर कोणी काही म्हणत नाही याचा अर्थ सर्व आलबेल आहे असा नसतो. विशेषतः मेट्रो शहरांत स्वतःच्याच अडचणी इतक्या असतात की इतरांकडे इतके लक्ष देण्यास वेळ नसतो.
अपवादात्मक परिस्थिती हे समाजमन होत नाही असं वाटतं. असो.
आंबट शौक!
अट्टाहासाने या धाग्यावर पुन्हा प्रतिक्रिया देण्याचे टाळत होतो.
{लांब तोंड मोड ऑन}
धाग्याचा विषय हा फक्त 'विषया'भोवती घुटमळतो आहे.
उतारवयात नव्या जोडीदाराची गरज, कुणाशी बोलण्याची भावनीक निकड, सोबतीची गरज, पुनरुत्पादनाची नैसर्गीक उर्मी संपल्यानंतरही मनुष्य ह्या अतिउत्क्रांत प्राण्याने बनविलेल्या समाज नावाच्या रसायनात टेलोमिअर्स संपलेल्या एककांची वागणूक. लग्न नावाच्या बंधनात त्यांनी अडकलेच पाहिजे काय, अन अडकण्याचा / न अडकण्याचा निर्णय कसा व का येतो? अडकल्यावर काय होते? या बाबतींत काही चर्चा वाचावयास मिळेल अशी आशा होती.
इथे परत ट्रायबल लाइफ जगतांना, मानवांत विवाहसंस्था अस्तित्वात येण्याआधीचा जो व्यवहार होता, त्याच्या पुनरुज्जीवना बाबतीतच चर्चा वाचावयास मिळते आहे.
{लांब तोंड मोड ऑफ}
फ्याशन घुमून फिरून परत येते म्हंतात.
पुना त्येच घुमून फिरुन्शान याया लाग्लंय का?? त्ये करार बिरार काय र्हातंया त्ये.
त्ये येक राज्वाडे साय्बांचा पुस्तक हाय माज्यापाशी. "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" पाय्जे आसल तर पीडीयफ द्येउ शक्तो. (व्यनि ओन्ली)
अजून कुठे हाच धागा काढला आहे काय? लिंक देण्याची कृपा करावी.
(करार करने कू बेकरार र्हैने वाला, क्या कोई करेगी इकरार और करेंगी इक करार?? या हरेककू है इन-कार?)
आडकित्ता
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हे घ्या पुस्तक
हा घ्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास.
हे पुस्तक व्यनीपुरतंच मर्यादित ठेवायचं असतं तर राजवाडे-डांगे यांनी प्रकाशित का केलं असतं? असो. मलातरी ही लिंक इथे देण्यात काही बंडखोरी किंवा वाह्यादपणा करण्याचा आनंद मिळालेला नाही हे निश्चित.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आभार
माझ्याजवळची प्रत कदाचित कॉपीराईटचा भंगबिंग करील असे वाटले म्हणून व्यनीत देईन असे म्हटलो होतो.
त्यांनी हे पुस्तक लिहिले, त्याकाळीही लग्नपत्रिकेत "चि.सौ.का. यमीचा शरीरसंबंध श्री. टमुकपंत यांचेसी करणे योजिले असे" हे छापले/लिहिले जाई. त्यामुळे मनुष्यांतील विविध प्रकारचे लैंगिक संबंध, याबद्दल (फॉर अ चेंज कॉलेजात : त्यातील पर्व्हजन्स सकट सबकुछ : शिकलेल्या) मलातरी त्यात वाह्यातपणाचा काही प्रश्नच वाटत नाही अन नव्हता.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
इथे कोणालाही पहिल्या धारेचा
इथे कोणालाही पहिल्या धारेचा (पक्षी:फर्स्ट हॅन्ड) अनुभव नसावा त्यामुळे दुसर्या लग्नाच्या गुंत्यात अडकण्याचा/न अडकण्याचा निर्णय कसा येतो अशी चर्चा होत नसेल.
बाकी विवाहसंस्थेचा इतिहास वगैरे वाचला नाहीय पण रूढार्थाने ज्याला आपण लग्न म्हणतो तो एक करारच (किंवा वचननामा) आहे असे वाटते.
दुसरे लग्न
आडकित्ता, तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे. ५० नंतर स्त्रीने परत लग्न करायचे म्हणजे तिला जेव्हा आयुष्यात थोडीशी मोकळीक, श्वास घेण्याची सवड मिळते तेव्हाच एका नव्या वेठ बिगारीत अडकण्यासारखे आहे. ज्या काही उपलब्ध ऑप्शन्स असतात त्या ५५ - ६६ च्या दरम्यात असतात व तिला
आपला वेळ जास्त करून ह्या नवर्याची सेवा करणे इत्यादी मध्येच घालवावा लागेल. छंद पुरविणे, उत्तम खाणे, जग भर फिरणे सिनेमे पाहणे इत्यादी आनंदी गोष्टी न करता ह्या माणसाचे बेड पॅन उचलणे, गोळ्यांच्या वेळा लक्षात
ठेवणे त्याचे राग अपमान झेलणे इत्यादी पीळ गोष्टी कराव्या लागतील. तसेच
एव्ढे करून प्रेम, सहानुभूती, कंपॅनिअन शिप कितीशी मिळेल. कोण जाणे.
अश्या वयात केलेल्या दुसर्या लग्नास सामाजिक मान्यता कितीशी मिळते माहीत नाही. त्यामुळे बंधनात परत अडकताना खूप विचार करावा. अगदीच कोणी कॅनडातील बिलिओनेअर वगैरे भेटल्यास गोष्ट वेगळी.
उत्तम चर्चा केली आहे व खूप माहिती मिळाली. कितीतरी चांगली उदाहरणेही कळली. फार वैयक्तिक निर्णय आहे. जपूनच घ्यावा.
विशाखा
अहो कॅनडातील ५५-५६च्या
अहो कॅनडातील ५५-५६च्या बिलियनेरला २०शीच्या पोरी पटवतील त्यामुळे एखाद्या उच्चमध्यमवर्गीय वगैरे म्हणा हवं तर...
बाकी स्वत: जर कमावत असाल तर उगा लग्नात अडकण्यापेक्षा लिव्ह इन रीलेशनशीप चांगली. मोकळीक ते मोकळीक अन नातेवाईकांचं जोखड नै...
एक गोष्ट मात्र गंमतीशीर हो!! दुसर्यानी काय करावं हे ठरवायला लोकं कसे हीरीरीनं मतं देतात...
त्यांना करायचं लग्न तर करु देत, नुसतंच एकत्र रहायचं तर राहु देत नै तर ऑर्जी करु देत...जोपर्यंत आपल्याला नको असताना त्यात खेचत नैत तोपर्यंत त्यांचं चालु देत..वैयक्तीक आयुष्य आहे काही गुन्हा करत नैत ना!!
http://shilpasview.blogspot.com
तू
हॅ हॅ हॅ. उद्या नवर्याने ऑफिसमध्ये काही भानगड केली तर असेच म्हणणार ना शिल्पा तू ?
टार्या बडबडवे
आमचे येथे **वर फोक मारून मिळतील
ऐसी अक्षरे गिरवीन की....
त्याने केली तर मी काय करायचं
त्याने केली तर मी काय करायचं ते बघेन...तु कशाला इतकी काळजी चालवलीयेस?
बाकी, त्याने एक भानगड केली तर मला ३ भानगडी करायला मोकळीक असा आमचा करार आहे
http://shilpasview.blogspot.com
सहिष्णुता
मला समाजातला एवढाच बदल मांडायचा होता - तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही घेतलेले निर्णय समाज (आप्तेष्ट, सहकारी, शेजारी वगैरे) बर्यापैकी सहिष्णुतेनं घेतात. जातीपातीबाहेरची लग्नं असोत वा दुसरी लग्नं असोत, त्याविषयी इथे अनेकांनी मांडलेले विचार हे सहिष्णुतेचेच होते. माझ्या अनुभवातले पर्यायी जीवनशैलीचे अनेक अनुभव असंच सांगतात. मग असं असताना 'दुसरं लग्न' हा एवढा मोठा चर्चाविषय व्हावा याचंच मला नवल वाटलं.
भोवळ यावी अशी माझीही अपेक्षा/इच्छा नाही, पण इथले काही प्रतिसाद पाहून तरुणवर्गाच्या या बाबतीतल्या मोकळेपणाविषयी अनभिज्ञता असावी अशी शंका आली. अनेक पर्यायी जीवनशैली या केवळ मोठ्या शहरांतली किंवा एन.आर.आय. माणसं आपल्याशा करतात असं म्हणून आजकाल भागेल असं वाटत नाही एवढंच. मला वाटतं या वावतीत तुमची-माझी सहमतीच आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पाचवा मुद्दा!
अहो अनामिक, यात पाचवा मुद्दा- चुकून दुर्दैवाने समजा तुमचा जोडीदार गेला तर तुम्ही दुसरे लग्न कराल का हा असायला हवा.
याच्या उत्तरात प्रत्येकाला स्वतःचा धांडोळा घेता येईल.
चर्चाप्रस्ताव
चांगला चर्चाप्रस्ताव.
अनामिक ह्यांनी लिहितं व्हायला हवं.
ते चांगल्या चर्चा मांडतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझा अनुभव
आमच्या घरात बरीच दुसरी लग्नं झालीत, इतकी की माझी मुलगी ५-६ वर्षांची असताना 'सगळेच लोक दोन लग्नं करतात' असा तिचा समज झालेला होता. एक फरक आहे की ही दुसरी लग्नं विधूर पुरुषांनी केलीत, विधवा बायकांनी दुसरी लग्नं केली नाहीत.
माझ्या वडलांनी माझ्या आईच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न केलं त्याला आता पंधरा वर्षं होऊन गेली. त्यांचं व्यवस्थित चाललं आहे. एका मामांनी दुसरं लग्न केलं त्यांचंही व्यवस्थित चाललं आहे.
आईच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यसंस्कार केले त्याच रात्री वडलांच्या दुसर्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तो अनुभव मात्र निश्चितच तापदायक होता. दुसरा तापदायक भाग म्हणजे अगदी त्यांच्या निम्म्या वयाच्या 'मुली'ही सांगून येऊ लागल्या आणि त्यांच्या मित्रांना त्यात काही वावगं वाटत नव्हतं. हे गोंधळ लक्षात आल्यावर आम्ही मुलांनी पुढाकार घेतला आणि एका काका-काकूंच्या ताब्यात सगळी सूत्रं दिली. पहिली चाळणी त्यांनी लावल्यावर अंतिम निर्णय वडलांनी घ्यावा असं सुचवलं. 'रोहिणी'त जाहिरात दिली आणि त्यातूनच योग्य स्थळ मिळालं. या बाई विधवा होत्या व त्यांना दोन मुली होत्या. एकीचं लग्न त्यांनी केलं होतं, दुसरीचं नंतर झालं. आईने दुसरं लग्न केल्याने तिच्या लग्नात अडचणी येतील असे जे म्हणत होते, त्यांना व्यवस्थित शह बसला कारण 'आधुनिक विचार' असलेला चांगला नवरा तिला मिळाला. माझ्या आईकडच्या नातलगांनी आम्हांला 'भावनिक ताप' दिला काही काळ की आईच्या जागी तुम्ही दुसरी बाई आणून बसवताय इत्यादी. पण आम्ही ठाम होतो. जागा ज्यांचीत्यांची निश्चित असते, कुणी कुणाची जागा घेत नाही व घेऊ शकत नाही आणि जागा पुष्कळ असतात. हे मला लग्नच काय, प्रेमाबाबतही वाटतं. समाजात माघारी या गोष्टीची भरपूर टिंगलटवाळी होते किंवा सुरुवातीला अनेक धार्मिक समारंभात सहभागी करून घेण्यास लोक नाक मुरडतात, पण हे गृहीत धरलं तर फार त्रास होत नाही. धार्मिक इत्यादी नसाल व ती हौस / अपेक्षा नसेल तर तशाही अडचणी येत नाहीत. 'व्यवहार' म्हणून हे सगळ्यांच्याच सोयीचं ठरलं. बाकी बारीकसारिक कुरबुरी असतात, त्याचा पहिलं-दुसरं इत्यादीशी संबंध नाही.
माझ्या घटस्फोटानंतर दुसर्याच आठवड्यात नवर्याने दुसरं लग्न केलं. त्याच्या दुसर्या बायकोचंही घटस्फोटानंतरचं हे दुसरं लग्न होतं. अनेकांनी तेव्हा मला 'तिला सांग' किंवा 'माहिती दे' इत्यादी सुचवलं; त्या भानगडीत मी पडले नाही. तिशी ओलांडलेली आणि एका मोडलेल्या लग्नाचा अनुभव असलेली बाई असेल तर तिचं तिला काय करायचं ते करू द्यावं, असं माझं मत होतं. ते योग्यच ठरलं.
मी घटस्फोट घेतलेलाच घरी आवडला नव्हता, आता निदान दुसरं लग्न तरी करू नये, असंच सगळ्या नातलगांचं ठाम मत होतं. मुलीचाही मी दुसरं लग्न करण्यास विरोध होता. ( आता मोठी झालीय चांगली, तर 'तेव्हा मी चुकले, लहान होते, मला कळत नव्हतं... तू कर काहीही...' असं म्हणते ओशाळून.) वडलांच्या कानावर गॉसिप्स गेल्या तेव्हा त्यांनी 'तू दुसरं लग्न करण्यास आमची हरकत नाही' असं नाइलाजाने का असेना पण सांगितलं; तेव्हा माझी बहीण म्हणाली होती की ती तिचं ठरवेल काय ते आणि करेल वा न करेल. तुम्हांला ती विचारतेय कुठे?
जी स्थळं आली त्यातला एकही बाप्या 'बायको' हवी, असं म्हणणारा नव्हता. घरी करणारं ( स्वयंपाक इत्यादी ) कुणी नाही, मुलांना पाहिलं पाहिजे, आईवडील आजारी असतात अशीच त्यांची दुसरं लग्न करण्याची कारणं होती आणि मला स्वयंपाकीण, आया वा नर्स बनण्यात रस नव्हता. कुटुंब म्हणून या गोष्टी कराव्या लागतात व त्या मी पहिल्या लग्नातही केल्या. सामाजिक काम करताना नसत्या जबाबदार्या ओढवून घेऊन लोकांचंही केलं तर घरच्यांचं न करण्याचं कारणच नव्हतं; पण 'त्यासाठी लग्न' हे काही मंजूर नव्हतं.
एका आर्थिक संकटाच्या वेळीही थकवा येऊन या शॉर्टकटचा मोह झाला होता, पण तेव्हा 'आर्थिक कारणास्तव लग्न करू नकोस' असा सल्ला मित्रमैत्रिणींनी दिला आणि अशा वेळा कायम राहत नाहीत, दिवस बदलतात व अडचणीत आम्ही मदतीला आहोत असा दिलासाही दिला. त्यामुळे ती चू़क टळली.
बाकी गोतावळा मोठा आहे व कामाचे व्याप भरपूर आहेत, आपले प्राधान्यक्रम आपल्यालाच ठरवता येतात व निर्णयस्वातंत्र्य असतं... असे एकटेपणाचे फायदे असले, तरीही ते काही एकटेपणाचे सगळे तोटे झाकून टाकणारे नसतात. दु:खाच्या व आनंदाच्या क्षणीही 'आपल्या माणसा'चा अभाव जाणवतो.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
जी स्थळं आली त्यातला एकही
जी स्थळं आली त्यातला एकही बाप्या 'बायको' हवी, असं म्हणणारा नव्हता. घरी करणारं ( स्वयंपाक इत्यादी ) कुणी नाही, मुलांना पाहिलं पाहिजे, आईवडील आजारी असतात अशीच त्यांची दुसरं लग्न करण्याची कारणं होती आणि मला स्वयंपाकीण, आया वा नर्स बनण्यात रस नव्हता.
दणकट मुद्दा.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तडाखेबंद प्रतिसाद! यावर अधिक
तडाखेबंद प्रतिसाद! यावर अधिक काही लिहिण्यासारखं राहिलेलं नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
राहिलेले दोन मुद्दे
दोन मुद्दे राहिलेच...
एक : हेच जर आईऐवजी वडील गेले असते, तर आईसाठी दुसरा नवरा शोधण्याची उठाठेव आम्ही मुलांनी केली असती का?
वडलांनी ज्या विधवा बाईंशी लग्न केलं, त्यांना दोन मुलीच होत्या आणि मुली लग्नं होऊन गेल्या की त्या एकट्या पडतील असं कारण दिलं जाऊन मुलींची समजूत काढली गेली. त्यांना जर एखादा मुलगा असता तर वयाच्या पंचेचाळिशीनंतर त्यांनी व त्यांच्या भावांनी त्यांच्या लग्नाचा विचार तरी केला असता का? आमच्या वडलांना दोन मुली, एक मुलगा, एक जावई, एक सून इतके लोक होते; तरी त्यांना जोडिदाराची आवश्यकता असणं ( खासगीत खिल्ली उडवली तरी ) समाजमान्य होतं. पण आईने असं दुसरं लग्न इतके लोक असताना करणं मान्य झालं असतं का?
दोन : दुसरं लग्न करायला ( तेही माझ्यासारख्या बाईशी ) पुरुष बिचकले, तरीही दुसरी, तिसरी इत्यादी 'प्रेमं' करायला उत्सुक रांग लावून असतात. आणि गंमत म्हणजे त्यातले ९५ % विवाहित, परिचित व ज्यांचे संसार सुबकोत्तम आहेत अशी तोवरची आपली समजूत असते ( ते असं दाखवत असतात म्हणून समजूत असते व 'तरीही' माझ्यावर प्रेम करून ते मला उपकृत करू इच्छित असतात सदभावनेने. ) अर्थात हा अवांतर विषय आहे. आणि पुरुष का बिचकतात हा अजूनच अवांतर-अवांतर विषय आहे.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
लिहु तेव्हढं खरंच. याच्याशी
लिहु तेव्हढं खरंच.
याच्याशी म्हटलं तर अवांतर म्हटलं तर समांतरः
माझ्या काकुला, काकांच्या निधनानंतर (त्यांना अपत्य नाहीत - वय साठी ओलांडलेले) तुम्ही अजून याच घरात रहाणार का विकणार? असा प्रश्न त्या जागेवर डोळा असणार्या इतक्या शेजार्यांनी विचारला की जणु काही नवर्याच्या जाण्यानंतर तीने त्याच घरात एकटीने रहाणे म्हणजे अब्रह्मण्यम आहे. इतकंच नाहि तर "कै बै हट्टीपणा, नवर्यानंतरही घराला चिकटून आहे" वगैरे तिला ऐकु जाईल अशा आवाजात बोलले गेले.
अर्थात काकु स्वतः अतिशय शांत व सम्यक तसेच पुरोगामी विचारांची असल्याने, कोणाच्या बोलण्याला किती किंमत द्यावी हे तीला बरोब्बर कळते व त्यानुसार तिने अशांकडे योग्य तितके दुर्लक्ष केले - गरज वाटली तिथे तोंडे बंद केली. पण इतर भावनाप्रधान म्हणा, समाज काय म्हणेल या विचारांनी दबलेल्या म्हणा - दाबलेल्या म्हणा स्त्रियांचे असे प्रश्न वरवर लहान वाटले तरी त्या व्यक्तीसाठी प्रचंड मोठे असु शकतात हे जाणवलेच. आणि मग अश्या स्त्रियांना पुन्हा लग्नबंधनात- खरंतर निव्वळ घरकामात किंवा वयानुसार शरीरसंबंधात- अडकवायला आतूर समाज नी त्याहून आतूर घोडनवरे बघितले की डोके बधीर होते हे (ही) खरेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लोक्स...
लोक असंही बोलतात आणि तसंही बोलतात. दुनिया फाट्यावर मारायची आणि आपल्याला काय करायचं ते करायचं असं सध्याचं - म्हणजे गेल्या काही वर्षांमधलं माझं धोरण आहे. एक एवढंसं आयुष्य... त्यात लोकांचा विचार करण्यात अर्धी उमर सरते. बरं आपले प्रॉब्लेम्स असतात तेव्हा हे पब्लिक कुठे असतं? पळ काढतात. त्यामुळे माझे असे जे दोनचार आपुलकीतले - विश्वासाचे लोक आहेत, त्यांचीच तेवढी मी पर्वा करते. बाकी कुणाची पर्वा करणं आता सोडून दिलंय. नाहीतर जगणं, लिहिणं, बोलणं, खाणंपिणं, लेणं सगळंच मुश्किल होऊन बसतं.
विचित्र वागवतात तेव्हा मी त्यांच्याकडे 'नमुना' किंवा 'परंपरेचा बळी' म्हणून पाहते आणि दुर्लक्ष करते. कारण बारक्या बारक्या किचन पॉलिटिक्सला सामोरं जावं लागतं आणि ते उगीच डोकं आणि वेळ कुरतडून ठेवतं. म्हणजे साधं राहावं, नटूसजू नये ( येवढ्यानेच पुरुषांचा आकर्षण वाटतं असा एक थोर गैरसमज ), घरी पुरुषांना बोलावू नये वा येऊ देऊ नये इथपासून ते उताणं झोपू नये ( ते पुरुषांना आमंत्रण देणारं वा आवाहन करणारं असतं म्हणे ) इथपर्यंत काहीही सल्ले दिले जातात. कोणत्याही घरगुती सोहळ्यांमध्ये जो 'आहेर' दिला जातो त्यात फिक्या रंगाचे कपडे दिले जातात... खरेदी करतानाच घरात कोण विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आहेत हे पाहून तितक्या साड्या वा सुट्स फिकट रंगाचे घेतले जातात. साधा फोन आला तरी संशयानं पाहिलं जातं. पत्रं परस्पर उघडून वाचली जातात. थोडक्यात संशय घेतला जातो. हे घरचे लोक झाले. बाहेरचे तर संशयाच्या दुर्बिणीच लावून बसलेले असतात. माझ्या कॉलनीत माझी इत्थंभुत माहिती असते लोकांना... मोलकरीण, स्वयंपाकीण, पीए इत्यादींकडून मिळवलेली. आज तर स्वयंपाकाला येणारी बाई म्हणाली,"तुम्ही 'अशा' आहात ना, म्हणून तुम्ही लावलेली तुळस जगली नाही." नीट खतपाणी झालं नाही, हे साधं कारण होतं; आणि बाकीही झाडं गेली त्यात. पण तिला 'पवित्र तुळस' तेवढी दिसली. काय आणि कुणाकुणाला म्हणणार? या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. लोक्स किंवा लोके अस्संच वागणार हे गृहीत धरायचं.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
समजलं नाही
प्रतिसाद समजला नाही.
"जे विवाह करायला बिचकले; तेच इतरत्र लगट करु पहात होते" असा भावार्थ जाणवला.
आता हे बिचकणारे कोण असू शकतात ? दोन ढोबळ क्याटेगरी पकडू विवाहित व सिंगल्स.(ह्यात सुरुवातीपासून सिंगल्स
असलेले ते अगदि मधल्या काळात डब्बल्स होउन पुन्हा काही कारणाने सिंगल झालेले असे सगळे आले असे समजू.)
.
आता ,विवाहित का बिचकत असावेत ह्याचे कारण सरळ आहे.
खरं तर मी त्याला बिचकणं म्हणण्यापेक्षा सरळसाधी सचोटीची वागणूक म्हणेन.
(जोडिदाराशी प्रामाणिक रहावं; त्याला धरुन रहावं अशी आपली माझी सचोटिची व्याख्या आहे.)
आय मीन, त्यांनी लग्न करणं शक्यच नाही. (उदा :- मला सध्या प्रियांका चोप्रा किम्वा अजून एखाद्या सिनेतारका अप्सरेनं
किंवा एखाद्या महाविद्वत् तेजस्वी विदुषीनं जरी लग्नाची मागणी घातली तरी मी नम्रपणे नकारच देइन. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीबद्दल माझं मत वाईट आहे असं नाही.
ती व्यक्ती चांगलीच आहे हो; फक्त मला विवाह करायचा नाही; इतकच काय ते आहे.
हीच गत इतर विवाहितांची असणार असं गृहित धरतो.
)
काही सिंगल्स लग्न करायला बिचकत असतील; तर मात्र त्यात खटकण्यासारखे असू शकते.
विशेषतः हे सिंग्ल्स विवाहास बिचकतात; एरव्ही खेटू पाहतात, लगट करु पाहतात म्हणजे काय ते स्पष्ट आहे.
ती भली माणसे नाहित.
.
.
असो. फारच वैयक्तिक मुद्दा असल्यानं ह्यावर बोलावं की नाही ह्याचा विचार करत होतो.
पण एकूणात तुमच्या पाहण्यात काही माणसं वाईट आहेत; म्हणून सगळीकडेच तक्रारदाराच्या चष्म्यातून पाहिलं
जातय की काय;असं वाटलं म्हणून गप्प राहवलं नाही.
भोचकपणा वाटला असल्यास तसं कळवावं; प्रतिसाद उडवला जाइल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वैयक्तिक
< फारच वैयक्तिक मुद्दा असल्यानं ह्यावर बोलावं की नाही ह्याचा विचार करत होतो.
पण एकूणात तुमच्या पाहण्यात काही माणसं वाईट आहेत; म्हणून सगळीकडेच तक्रारदाराच्या चष्म्यातून पाहिलं
जातय की काय;असं वाटलं म्हणून गप्प राहवलं नाही.
भोचकपणा वाटला असल्यास तसं कळवावं; प्रतिसाद उडवला जाइल. >
आमच्यात खासगीबिसगी काही नसतं, म्हणून तर इथं इतकं थेट लिहिलंय. जे आपल्याला खासगी वाटतं ते बोललं की अजून पाचपंधरा हजार लोक हेच असंच आपलंही खासगी असल्याचं सांगतात. सार्वत्रिक असतात गोष्टी.
काही माणसं वाईट असंही मी म्हणणार नाही; कारण जर मलाही लफडं करायचं असेल आणि आवडलाच एखादा बाप्या तर काही मी आधी त्याचा बायोडाटा पाहून मग लौ यू म्हणायला जाणार नाही; तो मग विवाहित असो नसो काहीही असो. मी तक्रार करत नाहीये, फक्त वृत्ती सांगतेय लोकांच्या.
आणि मला भोचकपणा करायला आवडतो... मी पण भरपूर करते.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
दुसरे लग्न - अजून काही
ज्या विधवा स्त्रीयांना मोठी झालेली वा लग्न झालेली मुले आहेत त्यांचे दुसरे लग्ने होत नाहीत/नसावीत असा या विधानाचा अर्थ होतो. असा खरोखरीच विदा (म्हणजे जनरल निरीक्षण) आहे का? विधवा आणि विधुर समान संख्येने समाजात आहेत असे मानले तर विधुरांशी लग्न करणार्या सगळ्या विधवा स्त्रीया "मुलगा नसणार्या" प्रकारातल्या म्हणून सरासरी अर्धेच सँपल उरतात. "आपल्या आईचे दुसरे लग्न" हा विरोधाचा मुद्दा नसावा, "मुलासहित आलेल्या स्त्रीच्या आपल्या नसलेल्या मुलाला आपली संपत्ती द्यावी लागणे" असावा असेही असू शकते. कारण प्रत्येक स्त्रीला २ मुले मानल्यास "मुलगा नसलेली विधवा" हे सँपल सगळ्या विवाहोच्छोक समाजाला पुरेल इतके नसावे.
अशा विवाहित पुरुषांच्या खरोखरीच्या आणि नाटकी/दुरुद्देषित प्रेमाला वेगळे कसे काढणार हा मुद्दा आहे. पण विवाहित पुरुष विधवा/घटस्फोटीत स्त्रीवर (खरे) प्रेम करू(च) शकत नाही असे म्हणणे आपला उद्देश नसावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
दुसर्या लग्नांचे प्रकार
लग्न कितवे चालले आहे?
दुसरे
घरातल्या कोणत्या सदस्याचे लग्न चालले आहे?
१. पुरुषाचे लग्न कि स्त्रीचे लग्न
वय
२. समवयीन आणि वयांतर असलेली वर्/वधु
अपत्य
३. सापत्य आणि अपत्यहीन वर्/वधू
अपत्याचे लिंग
४. अपत्य मुलगा आहे कि मुलगी आहे कि दोन्ही असे वर/वधू
अपत्याच्या लग्नाची स्थिती
५. सर्व /काही अपत्यांची लग्ने झाली आहेत कि नाहीत असे वर / वधू
संपत्ती आणि नोकरी
६. संपत्ती, नोकरी असणारे वा नसणारे वर्/वधू
उद्देश
७. अपत्यप्राप्ती, घरकाम, संपत्ती, चालू उत्पन्न, एकटेपणा, असलेल्या/होणार्या मुलास दोन्ही बाजूंचे सकस पालकत्व, लिंगसुख, योग्य जोडीदाराचा/नात्याचा पुनर्शोध, जणू प्रथम विवाह, इतर
माझ्यामते जोपावतो घरकाम, उत्पन्न, लिंगसुख हे उद्देश तशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कल्पना देऊन झालेले असतील तर त्यांना आरोपीच्या पिंजर्यात ठेऊ नये.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.