पेन्शन-१
अण्णांना जाग आली. अंथरूणाच्या बाजुची भिंत तशीही थोडी ओलसर होतीच पण ह्या थंडीच्या दिवसात तर ती पार काकडायची़च. उधईची अंडीदेखिल सुरकुतावी एवढी थंडी! ब्रम्हपुरीला ओढ्याकाठच्या घरी, भर पावसाळ्याच्या दिवसात ज्या रात्री विष्णु झाला तेंव्हाही घर असेच गारठलेले होते. थंडी, गर्मी आणि पाऊस, सगळेच महामूर होते ब्रम्हपुरीला. पण इथल्या थंडीपुढे हात टेकले असे त्यांना वाटले. घरामागुन जाणार्या रेल्वेच्या रुळांशेजारी गेल्या पावसाळ्यात काही चर काढून नालीला जोडले होते, तेंव्हापासुन ही भिंत ओल धरु लागली होती. मधल्या खोलीतली बाज आताशा फारच कुरकुरत असे आणि परवाच्या दिवशी बापूसाहेब बसले तर तिची पार झोळीच झाली. ते म्हणालेही, आता एखादा बर्यापैकी पलंग आणवुन घे म्हणुन. पण त्यांना काही सांगत बसलं तर हरिदासाची कथा पुन्हा मूळपदावर.
दाराच्या वरच्या बाजुला हिरवट काचेची काही तावदाने होती त्यातले एक तावदान तडकले होते आणि थंडगार हवेची पांढुर पातळ ओल त्यातुन खोलीत उतरत होती. अण्णा त्या हवेने शहारले. अशी हवा दम्याला वाईट, नाही का? विष्णुला रात्रपाळ्या करून दमा जडला की दगडी-कोळशाच्या धुराने हे अण्णांना नीट आठवेना पण मेडोरीनम-३० च्या २ गोळ्या ४-४ तासांनी घ्याव्यात हे चटकन आठवले याचा त्यांना जरासा विस्मय वाटला आणि थोडे शरमल्यासारखेही झाले. विष्णुला अजुन मुंबईत रात्रपाळ्या कराव्या लागतात पण ह्या कडाक्यातुन तो सुटला हे मात्र बरे झाले. आता त्याने करुणाला आणि मुलांना आपल्यासोबत घेऊन जावे हेच ठीक. मग मागे आपले काही का होईना.. पोष्टाची पेन्शन, तुटपुंजी असली तरी, जोवर आहे तोवर कुणापुढे हात पसरावा तर लागणार नाही आणि तब्येतीचे म्हणाल तर, ते तर चालायचेच. कोण कुणाला कुठवर पुरणार? कुळकर्ण्यांची मुले सालस आहेत, करतात मदत लागली तर. मागे वहाण रस्त्यात तुटली म्हणुन आपण अनवाणी जात होतो तेंव्हा नाही का गणूने स्कुटरवरून ऑल ईंडिया रिपोर्टर पर्यंत पोहोचवुन दिले?
अण्णा कुशीवर वळले, निळी गोधडी घट्ट पांघरुन घेतली आणि समोरच्या भिंतीकडे नजर लावून निजून राहिले. उठावेसे वाटेना आणि करायचे तरी काय उठून? जरा वेळाने करुणा उठेल, चहाचे आधण ठेवेल आणि रेडिओ सुरू करेल. तेच 'ईयम् आकाशवाणी संप्रति वार्ता: श्रुयन्ताम्' असे बलदेवानन्द सागराचे किंवा विजयश्रीचे चर्हाट सुरू होईल. त्याची शेपुट धरून मग गाणी लागतील 'जय शंकरा गंगाधरा' नाहीतर 'रामचंद्र मनमोहन, नेत्र भरून पाहील काय'. अण्णांच्या आत एकदम काहीतरी हालले. 'रामचंद्र मनमोहन..!' माणिकबाई गातात, देवघरातल्या समईसारख्या शांत स्वरात. पण करूणासुद्धा गुणगुणत असते अधुन-मधुन. पोळ्या लाटताना किंवा चिमणीची वेणीफणी करताना. छान वाटते ऐकायला. तिला शिकायला मिळाले असते तर गळ्याला पैलु पडले असते खरे पण आवाजाचा मूळ पोत नावाप्रमाणे. मुलांमागे धावताना आणि म्हातार्यांच्या सगळ्या धबडग्यात तिला काही उसंत मिळते तेंव्हा गाण्यांची शिवलेली वही उघडुन छोट्या पेन्सिलीने नवी गाणी लिहित असते. खरेच, विष्णुला सांगायला हवे पुन्हा एकदा. पण त्याचीही अडचण होतेच ना तेथे, पेईंग गेस्ट म्हणुन रहाताना. मग ते सगळे बोलणे कुठे वळेल हे आता इतक्या वेळा ऐकल्यानंतर पुन्हा ऐकायचे अण्णांच्या जिवावर आले. त्यांनी गोधडी डोक्यावरुन घेतली, उशीखाली चाचपडुन विडीचे पोकळ होत आलेले बंडल आणि आगपेटी काढली. शिलगावून, थरथरत्या बोटांनी चिमटीत धरुन फकाफक दोन-तीन वेळा ओढली. छातीत छान हवीहवीशी जळजळ पसरली आणि त्यांना हुशारी वाटली. शनवारीच तर आणले होते बंडल, एवढ्यात संपतही आले? सवय जुनी खरी पण फार जळायला नको. आता कितीसे तेल उरले आहे दिव्यात? आणि ते किती दिवस पुरणार? दत्ता येवून गेला आणि छाती फुटल्यासारखे वाटते आहे त्या दिवसापासुन.
क्रमशः
प्रतिक्रिया
लेखन आवडले. चित्रदर्शी शैली
लेखन आवडले. चित्रदर्शी शैली मस्त जमलीये!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद! पहिलाच प्रयत्न आहे
धन्यवाद! पहिलाच प्रयत्न आहे लिहायचा तेंव्हा सांभाळुन घ्या.
चित्रदर्शी शैली काय असते?
चित्रदर्शी शैली काय असते?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
म्हणजे लेखन वाचून मनासमोर
म्हणजे लेखन वाचून मनासमोर लगेच चित्र उभे राहते-बारीक खाचाखोचांसकट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान लिहीलय. पुभाप्र.
छान लिहीलय. पुभाप्र.
शैली आवडली.
शैली आवडली. पुढील गोष्टीविषयी उत्सुकता आहे.
उधईची अंडी हा काय प्रकार आहे ?
उधळी किंवा कसर म्हणजेच
उधळी किंवा कसर म्हणजेच 'टर्माईट'. फार उपद्रवी कीटक. वर्हाडी बोलीत त्याचा उच्चार होतो 'उधई'. नागपुरात अजनी भागात, जिथे गोष्ट घडते तेथे उधळीने घरांच्या भिंतीच्या भिंती पोखरल्याचे आठवते. उधळीची अंडी बारीक-बारीक असतात पण असतात चिवट. थंडीचा कडाका वाढला की उधळीची अंडी पक्व होणे मंदावते आणि त्याला सुरकुतणे असा शब्द मी लहानपणी ऐकला होता.
वर उपद्रवी जरी म्हटले असले तरी माणसाने ह्याचाही उपयोग करुन घेतला आहेच. पाणाडे (पाणी शोधणारे लोक) लोकांचे काही अंदाज, जसे जांभळाच्या झाडाजवळ असलेल्या उधळीच्या वारुळाजवळ गोड पाणी सापडते. बहुधा वराह मिहिरानेही याचा उल्लेख केलेला आहे.
पुढचा भाग टाकायला वेळ लावू
पुढचा भाग टाकायला वेळ लावू नका.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद! आराखडा साधारण तयार
धन्यवाद! आराखडा साधारण तयार आहे, कथा कशी वळणे घेईल याचा. पण 'डिटेलिंग'ला वेळ लागतोय. लवकरच टाकेन म्हणतो.
उत्तम लिहिताय
पु.भा.वा.ब.
कथा
कथेची सुरवात आवडली.
कथेचा भौगोलिक संदर्भ तुम्ही दिलेला आहेच. मला काळाचाही अंदाज असा लागतो की ही किमान काही दशकांपूर्वीच्या काळात घडलेली कथा असावी.
वाचताना जी ए कुलकर्णींच्या सुरवातीच्या "संसार कथां"मधे उभे केलेल्या वातावरणाची आठवण आली.
कथा इतक्या कमी लांबीच्या, छोट्याशा खंडांमधे प्रसिद्ध करावी का ? अशी शंका मला सतावते.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
हो, आणीबाणीच्या आसपासचा काळ
हो, आणीबाणीच्या आसपासचा काळ म्हणुयात.
तुम्ही म्हणता तसे जीएंच्या कथांमध्ये साकळलेले वातावरण मलाही काहिसे जाणवले. पण हा विषय मांडण्यासाठी, का कुणास ठाऊक, मला असेच शब्द सुचत गेले. धारवाडकरांची सावली फार गहिरी आणि लांब आहे हेच खरे.
तुमची शंका रास्तच आहे. मला एकटाकी (एकटंकी?) लिहायला खरेच जमले नाही आणि कथेचा घेर अजुन पुरता कवेत आला नसताना प्रसिद्ध केले गेले. पहिला डाव भुताचा म्हणुयात का? पण पुढच्या भागात सुधारणा करेन.
अवांतरच
लिखाण एकटाकीच असावं का? मला असं वाटत नाही. विशेषतः ललित लिखाणाच्या बाबतीत.
या लिखाणासारखं रोचक काही आकाराने छोटंसं पाहून थोडा हिरमोड होतो खरा; पण पुढचा भाग अजून एक महिन्यानीच येणार अशा प्रकारची छापील माध्यमाची मर्यादा जालीय माध्यमाला नाही. त्यामुळे क्वालिटी आणि वाचकांची उत्सुकता दोन्ही टिकवण्यासाठी नियमितपणे, छोटे छोटे बरेच भाग टाकणंही शक्य आहे.
कथा किंवा कोणत्याही लिखाणाची एकदा सुरूवात करून ते प्रकाशित करून टाकलं की मग वाचकांकडून पुढच्या भागांसाठी दबाव येतो त्याचाही फायदा होत असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एकदम पटेश (हे जरा
एकदम पटेश (हे जरा 'तात्यासाहेबांचे म्हणणे योग्यच आहे आणि बाबासाहेबांचेही बरोबर आहे' छाप आहे का?
लोकं सगळ्या बाजूंनी बोलतात;
लोकं सगळ्या बाजूंनी बोलतात; तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असेच.
आणि त्याचबरोबर मला चिं.त्र्यं. खानोलकर शैलीचाही भास झाला.
फूलस्टॉप
'ईयम् आकाशवाणी संप्रति वार्ता: श्रुयन्ताम्' बलदेवानंद सागर मी ऐकलेले आहे म्हणजे नक्कीच १९७५- १९७७ चा काळ नसणार. (मला -१ ते १ वर्षाचा असताना ऐकलेले कसे आठवेल?). की त्यांचा सेवाकाल अजून ११ वर्षे होता?
यात संस्कृतमधले '।' टाईपचे फूलस्टॉप टाकायचे राहिले आहेत. कॅपिटल एच ने ते येतात.
आपलं लिखाण भारी आवडलं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ठंकु! 'टिप' आणि अभिप्राय
ठंकु! 'टिप' आणि अभिप्राय दोन्हींसाठी..
बलदेवानंद सागर ८२-८३ पर्यन्त तरी आकाशवाणीवर बातम्या देत असे अंधुक आठवते. नंतर रेडिओ ऐकायची सवय मोडली आणि दुसरे कुठले नांव लक्षातच राहिले नाही. तस्मात् तेच वापरले.
८२-८३ कशाला, मी नव्वदीच्या
८२-८३ कशाला, मी नव्वदीच्या दशकात आणि २००५ च्या आधीही ऐकलं आहे त्यांना. चिरपरिचित आवाज!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
महिना
महिना लावलात तरी चालेल, पण याच्या दुप्पट भाग एका वेळेस टाका. लेखन आवडले हे प्रतिसादावरुन कळलेच असेल!
पहिलेच लेखन वाटत नाही.
आंतरजालावर एक जुने लेखक रामदास म्हणून आहेत. त्यांच्या लेखनाची आठवण झाली.
पहिला भाग चांगला झाला आहे. आवडला.
कथानकाबद्दल उत्सुकता असली तरी घाई करत नाही. सावकाश लिहा. कलाकुसर अशीच जमू दे. सशक्त कथा येऊ दे.
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचुन
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचुन हुरूप वाढलाय!
@विसुनाना: रामदासांचे लेख वाचुन काढतो आता. शेलके-शेलके लिखाण सुचवा. ह्या गोष्टीत विसंगतीच्या ऐकलेल्या कहाण्या, मनात गोंदलेले काही तपशील आणि कल्पनाविलास ह्यांचा गोपाळकाला करतो आहे. जमेल तसे लिहीनच..
उत्तम! हा भाग आवडला
उत्तम! हा भाग आवडला
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!