एक हे विश्व, शून्य हे विश्व
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते.
शून्य
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.
गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते. "धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". त्याचे केस कापल्यावर केस जातात केरात, राहातो तो "धनंजय". त्याचा श्वास आत-बाहेर होतो. बाहेर गेलेल्या श्वासाचा हिशोब खलास - मागे उरतो तो "धनंजय". अपघातात हात-पाय गमावले, तर हात-पायांचे सोडावेच. त्यांच्याविना राहातो तो "धनंजय". हार्ट ट्रान्स्प्लांट करा. मूळचे निकामी हृदय सोडून द्यायचे - राहातो तो "धनंजय". गाढ झोपेत बोलणे आणि विचार करणे ठप्प झाले. ते जाऊ द्या. ते नसतानाही तो "धनंजय". असे एक-एक अवयवाचे बघा. एका-एका विचाराचे बघा. हालचालीचे बघा. कुठलीच जरुरीची नाही. "धनंजय" कल्पनेचा गाभा शून्य आहे. "धनंजय" हे नाव शून्य कल्पनेसाठी आहे.
तर हे विश्व शून्य आहे.
एक
कोणी म्हणेल कांदा सोलायचा तर नाहीच. इतकेच काय, बोट दाखवून म्हटले - "हा घ्या कांदा", तर काहीच कल्पना येत नाही. खायचा कांद्याचा काय आणि निशिगंधाचा कांदा काय आणि फिरतीचा भोवरा काय. कांदा काय ते ज्ञान हवे? तो कुठे असतो, ते बघा. कसा असतो, ते बघा. कांद्याला मुळे असतात, आणि पाती असतात. त्या कळल्याशिवाय कांदा काय ते कळायचे नाही. कांद्याला स्वाद असतो नि रंग असतो. कांद्याचे पदार्थ लक्षात आले, तर मग कांदा कळेल. पण मुळे आणि पाती आणि पदार्थ समजायला हवेत ना? मुळे रुजतात भूमीत. पाती फोफायतात हवेत. शोषतात सूर्याचे तेज. म्हणजे कांदा नीट समजायचा, तर सूर्यमंडळ कवेत हवे. कांद्याचे रायते, कांद्याची फोडणी, व्हिनीगरचे कांदे... समजता समजता सगळे समाजशास्त्र कळायला हवे. कांदा खरोखरचा कळणे म्हणजे अवघे विश्व खरोखरचे कळणे. मग त्या विश्वाचे तुकडे-तुकडे केलेले ते खरे ज्ञान नाहीच. उगाच "कांदा" नाव तरी का द्या? तसेच "धनंजय" समजण्यासाठी सगळे विश्व समजणे भाग आहे.
तर सगळे विश्वच एक आहे.
दोन्ही कसे खरे?
आणि इतक्या संत-महंतांनी "शून्य" किंवा "एक" विचार आपल्याला सांगितला आहे. सांगता-सांगता आपल्याला पटला आहे. तर आपण आयुष्यात "शून्य" किंवा "एक" आचरणात का बरे आणत नाही? थोरामोठ्यांनी, आईवडलांनी समजावून सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. पटत नाहीत तरी आपण तसे वागतो. आणि "शून्य" आणि "एक" हे विचार तर पटतात!
दोन्ही विचारधारांमधली पहिली-पहिली पायरी तितकी अनुभवाने उपयोगाची असते. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे थोडेसे नकोसे भाग छाटायचे असतात. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे आजूबाजूचे भागही सामील करून घ्यायचे असतात. न्हाव्याच्या दुकानात माझे वाढून त्रासदायक झालेले केस छाटायचे असतात. केसांबरोबर कान छाटायचे नसतात. सणावारात माझ्याबरोबर कुटुंबालाही छानछान खायला मिळाले तरच मला आनंद मिळतो. पण जगाभराच्या तोंडात गोड पडण्याची वाट बघत नाही.
महत्त्वाचे काय?
कल्पना एकदा छाटून किंवा एकदा जोडून अधिक अर्थपूर्ण झाली, समजा. तर आणखी-आणखी छाटून किंवा जोडून फायदाच होईल का? खात्री नाही. जितपत कातरून-वधारून उपयोगी, तितपत कल्पना बदलावी. त्या उपयोगी कल्पनेला शब्द जोडावा.
बौद्धांच्या शून्यवादापासून वेदांत्यांच्या अद्वैत(एक)वादापर्यंत कितीतरी जणांनी "सोला" किंवा "जोडा" वादांना टोकापर्यंत नेले आहे. परंतु मग काय? आपले मत आपल्या वागण्यात लागू करून दाखवावे लागते. आणि वागणे असेच होते : अनेक व्यक्ती आहेत, अनेक वस्तू आहेत. त्यासाठी सोय करावी लागते. म्हणजे स्वतः सिद्ध केलेल्या सिद्धांताशी तडजोड करावी लागते.
उगाच तो तडजोडीचा व्याप. खरे तर व्यवहारासाठी "विश्व शून्य" किंवा "विश्व एक" असे टोकाशी न जाता उपदेश करता येतो. कपडे-धन-... वगैरे "मी"पासून सोला. किंवा आप्त-राष्ट्र-मानवता... वगैरे "मी"मध्ये जोडा. हे उपदेश व्यवहारात आणता येतात. आणि "विश्व शून्य" विरुद्ध "विश्व एक" या चक्रावणार्या वादामध्ये उगाच गुंततही नाही.
अगदी अंतिम सत्य काय आहे? काही दशके सबुरीने वाट बघितली, तर "धनंजय" शून्य होईल किंवा विश्वाशी एक होईल. "शून्य" खरे की "एक" खरे? सध्या त्याचा काही फरक पडत नाही. आणि मग तर सत्यच असेल, प्रश्नच पडणार नाही.
- - -
अन्यत्र प्रकाशनः दुवा
मस्त
तूर्तास एवढंच. सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.
असेच
म्हणतो.
- चक्रपाणि
प्रतिसाद
धनंजय उवाच :
...त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते. ....
इति धनंजय उवाच
आश्चर्य होते की वाटते ? या संदर्भात "मोठेच आश्चर्य वाटू लागते" किंवा "मोठेच आश्चर्य निर्माण झाल्याचे प्रत्ययास येते" असे वाक्प्रयोग अधिक योग्य झाले असते का ?
.
धनंजय उवाच :
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.
गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते. "धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". त्याचे केस कापल्यावर केस जातात केरात, राहातो तो "धनंजय". त्याचा श्वास आत-बाहेर होतो. बाहेर गेलेल्या श्वासाचा हिशोब खलास - मागे उरतो तो "धनंजय". अपघातात हात-पाय गमावले, तर हात-पायांचे सोडावेच. त्यांच्याविना राहातो तो "धनंजय". हार्ट ट्रान्स्प्लांट करा. मूळचे निकामी हृदय सोडून द्यायचे - राहातो तो "धनंजय". गाढ झोपेत बोलणे आणि विचार करणे ठप्प झाले. ते जाऊ द्या. ते नसतानाही तो "धनंजय". असे एक-एक अवयवाचे बघा. एका-एका विचाराचे बघा. हालचालीचे बघा. कुठलीच जरुरीची नाही. "धनंजय" कल्पनेचा गाभा शून्य आहे. "धनंजय" हे नाव शून्य कल्पनेसाठी आहे.
तर हे विश्व शून्य आहे.
.
इति धनंजय उवाच
वरील परिच्छेदात "एखाद्या वस्तुचे "वस्तुपण" हे त्याच्या कुठल्याही भागापेक्षा, किंवा भागाच्या समुच्चयापेक्षा वेगळे असते. हे "वस्तुपण" कुठल्याही भौतिक गुणधर्म किंवा इतर भौतिक वस्तूने/वस्तुच्या भागाने प्रतिरूप करता/दाखवता येत नाही. ही एक अॅब्स्ट्रॅक्ट संकल्पना आहे" हे सूत्र सांगितले आहे असं मला वाटलं. (चूक भूल द्यावी घ्यावी.) या (मला समजलेल्या) सूत्राचा संबंध "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. या विधानाशी आणि तर हे विश्व शून्य आहे. या निष्कर्षाशी कसा लावायचा ?
पुढील भागाचा परामर्ष आणखी सवड मिळेल तसा घेतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
"आश्चर्य होणे"सुद्धा चालेल
"आश्चर्यकारक घटना होणे", "चमत्कार होणे" वगैरे अर्थांनी "आश्चर्य होणे" हे अधिक बरोबर आहे.
अर्थात "व्यक्तीला आश्चर्य ___" हा अर्थ असेल, तर "वाटणे" प्रयोग कानांना बरा वाटतो. पण "झाले" असेसुद्धा वापरात आहे, असे वाटते. (कदाचित संस्कृतापासून.)
- - -
परंतु येथे वस्तू आहे की नाही याबाबत संदेह आहे. त्यामुळे "वस्तूपण आहे" हे गृहीतक म्हणून घेता येत नाही. कांद्याला वस्तू म्हणायची प्रथा आहे, इतकेच गृहीतक म्हणून घेतलेले आहे.
(जसे "फ्लोजिस्टॉनला वस्तू म्हणण्याची प्रथा आहे" असे गृहीतक आपण घेतो; आणि नंतर प्रयोग करून "तशी वस्तू मानण्याची गरज नाही" अशा निष्कर्षापर्यंत पोचतो. मात्र कुठल्याही घटन-विघटन प्रयोगाच्या पलीकडते वस्तूपण "फ्लोजिस्टॉन"मध्ये आहे, असे गृहीतक घेतले, तर फ्लोजिस्टॉन ही वस्तू गृहीतक-सिद्ध होते.)
शिवाय उदाहरणातल्या कांद्याचे आहे : पापुद्रा काढून टाकल्यावरही उरलेल्या गड्ड्याला कांदा म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे पापुद्रा-समुच्चय वगैरे आपोआप अनावश्यक होतात.
असे माझे सूत्र म्हणून सांगितलेले नाही माझे मत "महत्त्वाचे काय?" परिच्छेदात मांडलेले आहे. अॅब्स्ट्रॅक्ट वस्तूपणा असतो, असे प्लेटोचे मत आहे, खरे. पण या परिच्छेदात शून्यवादाची बाजू मांडली आहे. अॅब्स्ट्रॅक्ट वस्तूपणा हा शून्यवाद्यांना मान्य नाही. शून्यवाद्यांची सिद्धता असते, की वस्तू अशा काही नसतातच. "वस्तूपणा" हा भ्रम आहे, मनाचे खेळ आहेत. किंवा "मन" ही वस्तू मानली नाही तर "वस्तूपणा" शुद्ध निरर्थक आहे.
येथे शून्यवाद्यांची बाजू मांडलेली आहे. "वस्तू" म्हणण्याची प्रथा असलेल्या एका-एका गोष्टींचे विश्लेषण करून ती-ती शून्य म्हणून दाखवता येते. "हे सामान्यपणे करता येते" असे पटल्यास विगमनाने विश्वाला शून्यता लागू करता येते. येथे अर्थात टोकाचा शून्यवाद सांगितलेला आहे. सोपेपणाकरिता. बौद्धांच्या मते नेहमीच्या नावे असलेल्या वस्तू "कांदा"/"धनंजय" वगैरे शून्य असतात. पण विश्वाचे घटक "संखार" - म्हणजे जड पंचमहाभूते, मनोव्यापाराचे घटक, वगैरे - खर्या वस्तू असतात.
संवाद महत्त्वाचा
इथे आश्चर्य वाटणे किंवा होणे या शब्द प्रयोगावरून शंका येऊ नये असं मला वाटतं. धनंजय काय म्हणतात ते समजलं की पुरे. शिवाय, गोव्यातल्या मराठीत 'आश्चर्य झाले' अशा प्रकारचे प्रयोग अजून वापरात आहेत. जुन्या मराठीत जसे 'नवल वर्तले' होतं तसंच.
रोचक
वा, रोचक कांदा.
धनंजय काय?, एक अनुभव आहे शब्दाचा, दृश्याचा, स्पर्शाचा किंवा ध्वनीचा. अनुभव घेतला तेवढ्या क्षणापुरता तो धनंजय होता, त्याआधी/त्यानंतर तो कोण हे माहीतच नाही, किंवा त्याचे अस्तित्वच नाही. पण मग केवळ एक स्पर्श/दृश्य/शब्द्/ध्वनी अनुभव धंनजय 'असल्याचे' समाधान देत नाही, मग चैतन्यरुपी दृक-श्राव्य अनुभव म्हणजे धंनजय, पण चैतन्य म्हणजे देखिल एक अनुभवच शेवटी.
हा हायजेनबर्ग देखिल असेच काहिसे म्हणतो काय - प्रकाश आणि वस्तुत्व(मॅटर)ह्या दोन गोष्टी नसून एकच(अद्वैत)आहे, ते द्वैत आपल्या अनुभवाचा(भाषेचा)परिणाम आहे, *तद्वत सर्व जड/अजड पदार्थ अनुभवामुळे आहेत किंवा नाहित.
आँ
>>हा हायजेनबर्ग देखिल असेच काहिसे म्हणतो काय - प्रकाश आणि वस्तुत्व(मॅटर)ह्या दोन गोष्टी नसून एकच(अद्वैत)आहे, ते द्वैत आपल्या अनुभवाचा(भाषेचा)परिणाम आहे,
हायझेनबर्ग कधी बुवा असं म्हणाला? :O एखाद्या कणाची जागा (पोझिशन) आणि गती (वेलॉसिटी) एकाच वेळी अचूक जाणणे अशक्य आहे असे तो म्हणाल्याचे ठाउक आहे. ऊर्जा आणि द्रव्य हे मूलतः एकच आहे (आणि द्रव्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते -आणि उलटही) असे आईनस्टाईनने सांगितले. आणि तो अनुभवाचा परिणाम आहे वगैरे कोणीही सांगितलेले नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१९३० साली
१९३० साली म्हणाला होता बहूतेक...
"पोझिशन आणि मोमेन्ट्म्" हा अभ्युपगम बहुदा अनिश्चितता तत्वात विषद केला आहे. मी म्हणतोय ते वाक्य त्याने Physical Principles of the Quantum Theory (1930) मध्ये सांगितले असावे. मला फारसे भौतिकीचे ज्ञान नाही.
इतक्यात मीच/देखिल ते सांगितले.
जग केवळ बायनरी नाही - काँप्लेक्स आहे.
कदाचित प्रतिक्रियात्मक का असेना पण एक विचारप्रवर्तक लेख! लेखकाने मांडलेले मत प्रत्येकाला कधी ना कधी आपसुकच कळत असावे अशी अपेक्षा आहे.
पण त्या विचारांना योग्य असे मूर्त स्वरूप या लेखात मिळालेले आहे हे निश्चित.
जग म्हणजे काय? वस्तु म्हणजे काय? पदार्थ म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे काय?
हे आणि असले अनेक प्रश्न पूर्वापार चालत आलेले आहेत आणि आजही त्यांच्या उत्तरांचा शोध सुरूच आहे. कदाचित या प्रश्नांची पूर्ण सत्य उत्तरेच नसतील.
किंवा असली तरी ती मानवी बुद्धीच्या (उत्तरांच्या शोधकर्त्यांच्या) पलिकडे असतील.
जग हे एक आहे (अद्वैत) किंवा जग हे शून्य आहे (बौद्ध) ही बायनरी विचारप्रणाली झाली. पण जग हे दोन्ही धरून या दोहोंमध्ये आणि त्यापलिकडेही आहे.
जसे- एखाद्या संख्यारेषेवर ० आणि १ असतात आणि त्यांच्या दरम्यान, अलिकडे, पलिकडे असंख्य परिमेय आणि अपरिमेय संख्या असतात;
इतकेच काय पण त्या संख्यारेषेच्या प्रतलात आभासी (इमॅजिनरी) संख्यांचीही रेषा असते, या प्रतलावर असंख्य संयुक्त (कॉप्लेक्स) संख्या असतात - तसे.
या जगात फिरणार्या, संपर्क माध्यमांतून अनुभवणार्या, वाचन करणार्या आणि त्याबद्दल विचार करणार्या व्यक्तीच्या
शारिरीक आणि मानसिक आवाक्यात येईल तेवढेच आणि तेच त्याचे जग आणि त्याला गवसला तेवढाच त्या जगाचा त्याच्यापुरता अर्थ.
फारतर असे म्हणता येईल की संख्याप्रतलाचा मूळ बिंदू (ओरिजिन) आणि त्या प्रतलाची व्याप्ती त्या व्यक्तीच्या मेंदूपुरती असते.
***
लेखकाचे "काही दशके सबुरीने वाट बघितली, तर..." - हे वाक्य विनोदनिर्मिती करणारे आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.
काही जणांना मात्र ताबडतोब आणि तयार उत्तर हवे असते, ते त्यांना मिळते की नाही ते माहित नाही पण त्यांच्या डोक्यातले संख्याप्रतल मात्र ताबडतोब नाहीसे होते.
डीकन्स्ट्रक्शन/लोगोसेन्ट्रिजम
नुकत्याच शब्दवेगळ्या (आणि आता शब्दहीन झालेल्या) धाग्यावर झालेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर हे मुक्तक रोचक वाटले. 'डीकन्स्ट्रक्शन'चे उदाहरण म्हणून हे कांद्याचे पापुद्रे उपयोगात आणले जातात. उदा:
Deconstruction is further defined as:
to peel away like an onion the layers of constructed meanings ... a strategy for revealing the underlayers of meanings 'in' a text that were suppressed or assumed in order for it to take its actual form - in particular the assumptions of 'presence' (the hidden representations of guaranteed certainty ) [referred to as logocentrism] ... [And] Any meaning or identity (including our own) is provisional and relative, because it is never exhaustive, it can always be traced further back to a prior network of differences, and further back again...(Appignanesi and Garrat, 1995, pp. 79-80)
स्रोतः http://www.massey.ac.nz/~alock/theory/derrida.htm
याउलट लोगोसेन्ट्रिजममध्ये कोणत्याही गोष्टीला (वस्तू/संकल्पना) मूलतः कोणतेतरी एकचएक स्वरूप असते आणि शब्दांद्वारे (खरे तर संहितेद्वारे!) त्याच्या जवळपास जाण्याचा यत्न करता येतो असे मानले जाते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नक्की प्रश्न काय पडलेला आहे?
जर विश्व शून्य मानले तर धनंजय शून्य झाल्यास विश्वाशी एक(रूप) होईल. म्हणजे शून्य अन एक, दोघेही खरे असा अर्थ नाही होत का?
अन अचानक बुधवारी २००वा धागा लिहिताना अंतीम सत्याचा प्रश्न का पडावा बरे TheUnknownJoyना?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
कही ओळी कळाल्या...मग अवघड
कही ओळी कळाल्या...मग अवघड गेले...
चुकून उपक्रम उघडल्यासारखे वाटले...
लेख आवडला
छान लेख.
मी एका अध्यात्माच्या पुस्तकात २ कन्सेप्ट वाचल्या होत्या त्यांची नावे आता आठवत नाही.
पण पहीली ही होती - की मी म्हणजेच तो (सोहम) हा चराचरात सर्वत्र आहे असे समजले की मग बाकी काहीच उरत नाही. देवच (मीच) सर्व व्यापून उरतो. सर्व एकच आहे.
याउलट दुसरी होती शंकराचार्यांची - मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी हे नाही , मी ते नाही मग उरते ते शून्य.
जबरदस्त!
सांगण्याची पद्धत फारच भारी!!
-Nile