एका धर्मांतराची कथा
लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।"
"English please, " मी म्हणालो.
बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं.
आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला विरोध करायला लोकांना फार मजा येते. अजूनही अण्णा, माझं आणि बायकोचं भांड्याला भांडं लागलं कि लगेच म्हणतात, "पहा, तरीच मी म्हणालो होतो, हे मांस खाणारे लोक, डोकं गरम असतं त्यांचं, अगोदरच कळायला पाहिजे होतं तुला,..." त्यात आमचं लग्न आंतरजातीय, आंतरराज्यीय, आंतरभाषिक, आंतरवांशिक, आंतरवर्णीय, आंतराहारपद्धतीय, आणि काहींच्या मते आंतरराष्ट्रीय सुद्धा! विरोधकांना पर्वणीच !! वास्तविक मणिपूरी विवाहपद्धत जगातली सर्वात उत्तम पद्धत असावी. तिथे प्रेमविवाहच करावा लागतो. लग्नापूर्वी साधारणतः ५-१० वर्षे लोक प्रेम करतात. मग बायकोला विवाहापूर्वी पळवून नेऊन (बलाने नव्हे हो) बुक करावे लागते. अगदी लैंगिक पूरकता पण चेक करण्याची सोय!
असो. आपला विषय धर्मांतर आहे. आम्ही दोघे मजल दरमजल करत इम्फाळला पोहोचलो. (त्यावेळेस केवळ एअर इंडीयाचं १६०००/-- रु प्रतिमाणशी एकतर्फी तिकिट होतं. म्हणून रखडत भारतीय रेल्वेने गेलो. इंडिगो एअरलाइन नसती तर आमच्या लग्नाचं आजपर्यंत मातेरं झालं असतं. असो.)पहिल्या दिवशी 'जावई घरी आल्याचा आनंद' आणि 'सुदुरदेशातून मूल परत आल्याचा आनंद' पैकी दुसराच आनंद सर्वत्र दिसल्याने पहिल्यांदा मी थोडा खट्टू झालो होतो. आमच्या सासूबाईंचे 'मयांग लोकांशी लग्न केल्यावर मुलींचे जीवन बर्बाद होते' असे फार तीव्र मत होते. ते त्या सर्वांना सोदाहरण ऐकवत म्हणे. सुदैवाने त्यांच्यात आणि माझ्यात समाईक भाषा नसल्याने मी मात्र या श्रवणश्रमांतून वाचलो होतो.
लग्नाचा दिवस आला. बरेच विधी भोगावे लागले.
(सगळे विधी कमीत कमी करायचे (पैसे वाचवायचे, इ) म्हणून मुद्दाम आर्यसमाजी लग्न करण्याचे माझे सगळे कष्ट वाया गेले. आर्य समाजाच्या पंडिताला दिल्लीत मी बर्याच अटी टाकल्या होत्या -लग्न भयंकर अशुभ दिनी व्हायला हवे, मंजे माझ्याशिवाय दुसरा कष्टमर त्यादिवशी नको, जास्तीत जास्त १५ लोकच उपस्थित राहणार अशी अट सगळ्यांना सांगायची, मला फारतर एक तासाचा पेसंन्स आहे, इ इ. तो मला त्याचे credentials , आम्ही जशा आमच्या प्रोजेक्ट शीट्स प्रोपोजलला जोडतो, तशा दाखवू लागला. साला एकही साधा विवाह त्यात नव्हता. धर्मांतरे काय, पुनर्विवाह काय, आंतरजातीय विवाह काय, आंतरवयीन विवाह काय, नि अजून काय काय! आपला विवाह हटके सदरात होत आहे याचे वाईट वाटल्याने एक तरी सामान्य विवाहाची केस दाखव म्हणून मी त्याला म्हटले. त्याने बराच वेळ अशी केस त्याच्या जाडजूड आर्काइवजमधे शोधली , पण मिळाली नाही.)
मला पारंपारिक मणिपूरी ड्रेस चढवण्यात आला होता आणि अगदी मशिन प्रमाणे मी ब्राह्मण म्हणेल तसे करत होतो. लवकरच मी मी फार आज्ञाधारक आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले.
"अजून किती वेळ?" दोन तीन तासांनी अस्वस्थतेचे पहिले चिन्ह दाखवत मी विचारले.
"झालेच, फार तर एक तास" बायको म्हणाली.
तो एक तास झाला. मी पून्हा विचारले, "आता अजून किती वेळ?"
"आता फक्त तुझे धर्मांतर करायचे राहिले आहे. दहा मिनिटात होईल. मग आपली सुट्टी."
लॉजिस्टक्स आणि धर्म यांबाबत मणिपूरी लोक किती कडक शॉक देतात हे त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आल्याशिवाय कुणाला कळणार नाही. धर्मांतर म्हणल्याने मी पहिल्यांदा दचकलो. मग आपल्या बाजूला सगळे हिंदूच आहेत आणि आपणही हिंदूच आहोत हे पाहून थोडा सावरलो.
(माझी बायको जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तेव्हा मी तिला बाईकवर नयनरम्य आणि शांत मोनास्टेरीत घेऊन गेलो होतो. "मी इथे नेहमी मॅगी सूप खातो. आज तुझ्या निमित्ताने पहिल्यांदाच बुद्धाच्या प्रतिमेचे दर्शन घेत आहे," मी म्हणालो.
"हो का? मी देखिल पहिल्यांदाच मोनास्टेरी पाहतेय," ती म्हणाली.
"अरे म्हणजे तुझा धर्म बुद्ध नाही? मला वाटलं तुमच्याकडचे सगळे लोक बुद्ध असतात," मी आश्चर्याने म्हणालो.
"आमच्या इम्फाळचे सारे लोक प्रॉपर हिंदू आहेत," ती म्हणाली.
तेव्हा प्रकरण मिटले होते. पण आता मी सॉलिड संभ्रमात पडलो होतो.)
"कोणत्या धर्मात धर्मांतर करायचे आहे? आणि १० मिनिटाच्या शॉर्ट नोटीसमधे धर्मांतर करायला भाग पाडणे चूक नाही का?" मी तक्रार केली.
"गपचिप बस आणि पंडित सांगतात तसे कर. जास्त डोके लावू नको." ती म्हणाली. दोन तीन मिनिटानी माझी चूळबूळ वाढली. बायकोचे भाषेचे ज्ञान यथातथाच असल्याने मी मागे उभे असलेल्या मेव्हण्याला विचारले, "Do you mean religious conversion?"
"हो. तेच ते. तू शांतपणे विधी कर. मग नंतर मी तुला सांगतो." तो थंडपणे (या लोकांनी आज माझा शर्ट पांढरा असावा कि पिवळा यावर गांभीर्याने सविस्तर चर्चा केली होती हे खरे वाटेना.) म्हणाला. आता जास्त तोंड वाजवू नको असे बहिणभावांना म्हणायचे होते. मग मी गुपचुप सगळे विधी केले. जेवणे झाली. धर्मांतर होऊन २ तास झाले आणि मला माझ्या नव्या धर्माचे नाव देखिल सांगितले गेले नाही. 'बोलूत सावकाश' असेच प्रत्येकजण म्हणत होता. त्यांच्यालेखी काहीच घडले नव्हते. बायकोने, इतरांनी माझ्या डोक्यात एक किडा सोडून दुपारची मस्त ताणून दिली. संध्याकाळी ते जागे व्हायची मी वाट पाहत होतो, आणि तोपर्यंत धर्मांतरित माणसाचे जीवन कसे असते याची कल्पना करायचा प्रयत्न करू लागलो, धर्माचे नाव माहित नसताना!
संध्याकाळी मेहुणा मला त्याच्या स्कूटरवर फिरायला घेऊन निघाला होता. आपल्या पिलियन रायडरचा आपण आजच धर्म बदलला आहे आणि त्याला एक सुजाण नातेवाईक म्हणून त्याबद्दल काही कल्पना द्यावी असा विचार त्याच्या गावीही नव्हता. "बाबा रे, तू मला कोणत्या धर्मात घातले आहेस, त्याचे काय नियम आहेत, इ इ मला केव्हा सांगशील?" मी कळवळून म्हणालो.
"अरे हां,..." लगेच त्याने स्कूटर वळवली आणि एका डोंगरावर घेतली. तिथे एक छोटेसे चिनी टाईपचे मंदिर होते. त्याच्या बाजूला एक मोठा सूचना(?) फलक लावला होता.
"आता हे सभ्यपणे कसं सांगावं हे मला कळत नाही, पण आमच्याकडे तुमच्यासारखं धर्माचं प्रस्थ नाही. तुमच्याकडे एका माणसाचा एकच धर्म असतो. आमच्या एक, दीड आणि दोन धर्म पण असतात." तो सांगू लागला.
"मंजे? आत्ता माझे किती धर्म आहेत?" मी कुतुहलाने विचारले.
"इनसायनिया काढ." तो म्हणाला. इम्फाळमधे अल्ट्रा माइल्ड सहज मिळत नसल्याने आम्हाला निष्कारण धूम्रपानाचा दर्जा अपग्रेड करायला लागायचा. दोघांनी त्या हिरव्या कंच रानात, शांत आणि रम्य जागी दोन झुरके घेतले. "३०० वर्षांपूर्वी बंगालमधल्या एका साधुच्या प्रभावाने आमचा गरीब नवाज नावाचा राजा प्रभावित झाला आणि आम्ही हिंदू झालो. काही लोक दोन्ही धर्म पाळू लागले, काही केवळ हिंदू आणि काही केवळ मैतेयी. मैतेयी हि हिंदूंची एक जात मानली जाते पण वास्तविक तो एक वेगळा धर्म आहे." तो म्हणाला.
मला आता बर्यापैकी रोमांचक वाटू लागले. मंजे त्रास काही नाही आणि नाव सरळ रानड्या आंबेडकरांच्या यादीत!
"या धर्माचे काही तत्त्वज्ञान? काही रीती?" मी उत्साहाने विचारले. पुढे "मला काही केस, इ इ वैगेरे कापायला/ठेवायला लागणार? माझ्याने हे होणार नाही." एक बंड करायची आलेली संधी का सोडा म्हणून मी लगेच म्हणून टाकले.
"फिलॉसॉफी? तो मोठा बोर्ड पहा" एक चांगला कश घेत मेहुणा म्हणाला.
मी त्या फलकाकडे पाहिले. बुलेट पॉइंट्स मधे ८-१० गोष्टी लिहिल्या होत्या. दोन्ही बाजूला ड्रॅगन होते. मी सरसावून एक खोल कश घेतला आणि तो फलक वाचण्यासाठी पुढे सरसावलो. जगातल्या एका महान देशाच्या महान धर्माच्या अग्रणी जातीच्या माणसाने, भारतीय हिंदु ब्राह्मणाने, जगाच्या कोण्या एका कोपर्यातल्या एका अज्ञात धर्मावर भाष्य करण्याची, टिंग्या टाकण्याची सुंदर वेळ आली होती. असला मौका क्वचितच आणि तोही भाग्यवंतांनाच मिळत असावा.
"जगातील सर्व मानव समान आहेत."
"प्रत्येक माणसाने इतर प्रत्येक माणसावर कोणताही भेदभाव न बाळगता प्रेम करावे."
"मानवता हाच धर्म आहे."
.
.
.
दहा बुलेट पॉइंट्स असावेत. संपले. मेहूण्याकडून खात्री करून घेतली कि बाबा हीच का धर्मतत्त्वे? कोणताही चित्रविचित्र नियम नाही. काही आडंबर नाही. अगदी आपला महान औपनिषदिक वारसा सांगायला गेलो तरी खुजा पडावा अशी ती वाक्ये! आपलंच ते सर्वात खरं नसतं, आपलंच ते सर्वात चांगलं नसतं असा शंभरवेळा अनुभव आलेला असुनही, आपण आपल्याला सर्वात चांगले समजत असताना आपल्यापेक्षा काही चांगले निघाले तर जे दु:ख होते ते झालं.
सिगारेट संपत आली होती आणि लवकरच चिरडली जाणार होती, माझ्या आत्मश्रेष्ठत्वाच्या माजाचे जे होत होते तेच पॅरलली तिच्याबाबत होत होते. मेव्हण्याने शेजारच्या झोपडीतून पिण्याचे पाणी मागवले. डोंगरावरचे स्वच्छ, शुद्ध, गोड पाणी तरतरी देऊन गेले. ईशान्य भारताच्या शुद्ध हवेचा एक मोठा श्वास फुप्फुसांत खोल घेतला. मावळत्या सूर्याच्या किरणांत, सायंकाळच्या गुलाबी थंडीत, कोठलीही तक्रार करायची संधी न देणार्या मोहक निसर्गराईमधून क्षणाक्षणाला प्रचंड भारी होत जाणारं ते नव्या धर्माचं पालडं सांभाळत सांभाळत घरी आलो.
(सत्यकथा)
प्रतिक्रिया
थरारक अनुभव ! पण बोध काय
थरारक अनुभव ! पण बोध काय घ्यावा ?
....
बोध
आमच्या उदगीरला जर आपण बसमधे किंवा इतरत्र कोणा अपरिचित माणसाच्या शेजारी बसले असाल तर सर्वात पहिला प्रश्न पुढील प्रमाणे येतो -" कुन्या लोकाचे तुमी?" नावही जाणण्याअगोदर जात जाणण्याची जिज्ञासा म्हणा किंवा प्रथा म्हणा ग्रामीण भारतात रुढ आहे. शहरातही धर्म , जात एकतर कळतात किंवा संबंध एका मर्यादेबाहेर वाढले कि माहित करून घेतले जातात. आपला धर्म नीट कळणे, आवडणे, त्याचा अभिमान असणे, दुसरा धर्म कळणे, आवडणे आणि त्याबद्दल सहिष्णुता असणे इतकीच ओढून ताणून जास्तीत जास्त अपेक्षा अगदी सुसंस्कृत भारतीयाकडून केली जाते. परंतु पौर्वात्य देशांचा प्रकार थोडा वेगळा आहे. चीनमधे चिकार लोक मिश्रधर्मी आणि द्विधर्मी वैगेरे आहेत. 'Religious Composition of China' चा फार सरळ अर्थ काढता येत नाही. धर्म हे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि रोजमर्राच्या जिंदगीत अशा क्लिष्ट गोष्टीचे स्थान फार मागचे आहे असा तिकडचा साधारण जनमानस आहे.
परधर्मस्वीकृती हा काही अँटीमॅटरचा स्पर्श नाही.
आणि काय हो, मी मौजमजेत टाकलेल्या सदराला आपण थरारक म्हणता? अतिरेकी बसमधे घुसले आणि तुमच्यासारखे साधे प्रवासी भयभीत झाले तेव्हा मी राम गोपाल वर्मांच्या कुतुहलाने निरीक्षणे करत होतो असं काही का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अतिरेकी बसमधे घुसले आणि
नाही. रामू मारामारी झाल्यावर, सर्व अतिरेकी मारताना काही जवान हुतात्मा झाल्यावर पोहोचतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरेच्चा ! इतकं झालं इकडे ?
अरेच्चा ! इतकं झालं इकडे ? जरा बिझी होतो हो... प्रश्न आवडेस,
....
मस्त.
मस्त.
लिहीण्याची शैलीही आवडली. अजून असे चित्रविचित्र अनुभव असतील तर ते ही लिहाच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त....
वाचण्यासारखं.
वाचून विचार करण्यासारखं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लै भारी! ही आंतरराज्यीय लग्ने
लै भारी!
ही आंतरराज्यीय लग्ने म्हंजे लै मजा असते हे मान्य!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मंग जरा संसदेच्या बाहेर येऊन
मंग जरा संसदेच्या बाहेर येऊन ही मज्जा शेअर करा ना!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेखन प्रचंड खुसखुशीत झालेलं
लेखन प्रचंड खुसखुशीत झालेलं आहे.
हे तर भारीच.
सर्व मानव समान आहेत, आणि सर्वांनी एकमेकांवर भेदभाव न करता प्रेम करावे वगैरे दहा बुलेट पाइंटात सगळं महत्त्वाचं सांगून टाकणारा धर्म आवडला. मला वाटतं की अवडंबराशिवायचं सत्य सांगणं हाच या धर्माचा एकाच वेळी स्ट्रॉंगेस्ट आणि वीकेस्ट पॉइंट आहे. कर्मकांडं, नीतीनियम, भक्ष्य-अभक्ष्य, सोवळं-ओवळं, देवादिकांच्या मूर्ती आणि त्यांच्या मनोरंजक कथा हे सगळं नसल्यामुळे धर्म सुटसुटीत आहे खरा. पण खांद्यावरती कसलंच जोखड घातल्यामुळे त्याला तितकीशी पकड येत नसावी. या मैतेयी धर्माविषयी आणखीन माहिती वाचायला आवडेल.
आणि हो, अशाच खुसखुशीत शैलीत अजून लिखाणही वाचायला आवडेल.
स्विकार्यता
खरं आहे, सर्वस्विकार्यता असलेले धर्म स्विकार्यता कमी असलेले धर्म गिळंकृत करतात.
आणि हा धर्म जसा माझ्यासमोर उलगडत जाईल तसा तसा मी आपणांस परिचयाचा करून द्यायचा प्रयत्न करेन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सुंदर! असाही धर्म आहे तर!
सुंदर! असाही धर्म आहे तर! ('न'वी बाजू यांनी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे "आमच्या अज्ञानास पारावार नाही!")
लेखनही अगदी थेट, अनुभवाला भिडणारे!
अफलातून आवडलं आहे लिखाण.
अफलातून आवडलं आहे लिखाण. सेन्स ऑफ ह्युमर अप्रतिम आहेच पण लेखनशैलीत नुसताच दर दोन वाक्यांनी विनोद, इतकं ध्येय न ठेवता एकदम उत्कृष्ट विचार उतरवले आहेत.
असेच आणखी वाचायला आवडेल.
-(आंतरराज्यीय, आंतर्भाषिक, आंतराहारपद्धतीय विवाह केलेला) गवि
व्वा
एक सुखद धक्का. लेखन प्रचंड आवडल्या गेले आहे.(असेच लिहितात नं?)
गविंनी पण त्यांचे अनुभव लिहावे.
भारी लिहिलंय. अनुभव जितका हट
भारी लिहिलंय. अनुभव जितका हट के आहे, तितकीच शैलीपण. अशा चालीवर आणखी लिहा की - इकडे तिकडे नुसते मुद्देसूद वाद घालत फिरता ते!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मस्तं!
सहीच आहे हे धर्मांतर.
आवडले.
क्लास!
परधर्मो भयावहः च्या खोल रुजलेल्या भीतीला तडा देणारा अनुभव.
पिंड
तसा गोष्टी लिहायचा माझा पिंड नाही. त्याउपर प्रतिभा, ज्ञान आणि भाषा अशा त्रिमितीय उणिवा माझ्याकडे बालपणापासून आहेत. काल अर्ध्या तासात हा लेख (शब्द चुकला पुन्हा) लिहिला, एक तास एडिट करत बसलो, शेवटी बॅटमॅनला पाठवून दिला. म्हटलं यातलं गिर्यामर, पेलिंगं आणि फलो नीट करून दिलात तर (वाचणारांवर) उपकार होतील. त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला.
शेवटी आपल्या सगळ्यांना वाचायला आवडलं, छान वाटलं
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आवडले
अरुण जोशी हे तूर्तास ऐसीचे बाब्या नं १ आहेत.
मंजे काय? आमच्या उदगीरला
मंजे काय? आमच्या उदगीरला बाब्या शब्द फार कौतुकाने उच्चारला जात नाही म्हणून विचारतोय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निर्भेळ कौतुक
सॉरी सॉरी कौतुक हो.
आधी मी बाबा नं १ असे वाचले.
आधी मी बाबा नं १ असे वाचले. वय.. वय..!!
हम्म.. हे बाब्या तर मग ..मग.. मग.. अम्..अं.. कारटे कोण ??
कारटे कोण?
ओह! आता याच्या उत्तराकरता 'ऐसीकरांची ओळख' विडंबन आले पाहीजे इतकेच म्हणतो हो गवि.
शंका - गवि हे ऐसीचे सल्लागार कार्यकर्ते गणले काय?
वा अनुभव छानच आहे. आणि अगदी
वा अनुभव छानच आहे. आणि अगदी ओघवत्या भाषेत लिहिलाय. अजुन येउद्यात.
ब्याट्याचेपण आभार.
आवडला.
लेख आवडला, शेवटचा परिच्छेद खासच.
हे विनय म्हणून ठीक आहे पण त्यात काही फार तथ्य नाही हे तुम्हालाही माहीत आहेच. त्यामुळे अजून नक्की लिहा, वाचायला आवडेल.
छान
मजेदार अनुभव. जर हा सत्य अनुभव असेल तर काय धमाल आली असेल हा विचार करूनच धमाल मजा आली!
-Nile
१००% सत्य अनुभव आहे. जालावर
१००% सत्य अनुभव आहे. जालावर टाकता यावा आणि तासाभरात लिहून व्हावा म्हणून बराच डायल्यूट करून लिहिला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नीट-नेटका
डायल्यूट करूनही लेख नेटका आहे. 'नीट'ही वाचायला आवडेल
+१
शिवाय कोणी बेलारुसियन किंवा पोलीश ओळखीची असेल तर कळवा! अनुभवाचं कुतुहल हो फक्त, दुसरं काही नाही!
-Nile
असे दुसर्यांना सर्चवायला
असे दुसर्यांना सर्चवायला सांगत बसले तर कसं होणार तुमचं निळोबा ब्यानरजी
(आणि हो, निळोबाच्या आधी आम्हाला कळवायला विसरू नका.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे बाबा!
सुचवण्याने गेले कित्येक पिढ्या होत आलं आहे माहित नाही का तुला? असो, असो. पण मी तुझ्याकरताच विचारत होतो, दोस्तोव्हिस्की फिस्की वाचणारे लोक आवडतात त्या पोरींना असं ऐकून आहे!
-Nile
ctrefgjkxyz
दस्तयेव्हास्की वरून एक अवांत ज्योक आठवला. एक रशियन/पोलिश/जॉर्जियन माणूस भारतात येतो.
त्याचा चष्मा फुटल्याने नवा बनवायला जातो. डॉक्टर डोळे तपासत असताना त्याला विचारतो,
समोरचं बोर्डावर लिहिलेलं "ctrefgjkxyz" वाचता येतंय का तुम्हाला?
तो उत्तरतो, वाचणे राहो, याच नावाचा माझा मित्रही आहे.
बाकी आपली अस्मादिकांप्रतीची कळकळ बघून नेत्र खरेच भरून आले. असाच लोभ राहूदे आणि इंडोयुरोपीय फ्यामिलीतल्या अन्य सबफ्यामिल्यांतही शोध घ्यावा अशी विनंती आत्ताच करोन ठेवितो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इमेल फॉरवर्ड करतो
मला युक्रेनमध्यल्या पोरींचे सारखे इमेल येत असतात. मी ते एका विशेष फोल्डर मध्ये ठेवलेले आहेच. सगळे तुला पाठवून देतो?
-Nile
पूर्व युरोपातले अदृष्टपूर्व
ओहो आता युक्रेन फेव्हरीट नेशन झालेय का? "आमच्या इथे" आग्नेय आशिया या बाबतीत जास्त फेमस होता. पण हर्कत नै, ब्रिङ्ग इट ऑन्!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Kiev
ऐसीच्या तरूण पिढीला गरजू युक्रेनियन पोरींची येणारी कीव पाहून अं.ह. झालो
कोटिवरवंदना नमोऽस्तुते |
कुणाला कशाचं, नंदनला कोटीचं. विषय चाललाय गरीब बिचार्या पोरींचा, त्यांच्या दैन्याला दूर करायचं सोडून कीव-मस्का करीत बसलेत. आता मोठ्यांनीच असं केल्यावर लहानांनी आणि गरीब बिचार्या पोरींनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? (एकमेकांच्या).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'चिक'न किएव्ह्
'किएव्हच्या चिक्स्' पाहा किंवा या आम्ही बनविलेल्या 'चिकन् किएव्ह'कडे पाहा...
फीलिंग
'चीझी फिलिंग्ज'ची दखल घेण्यात आलेली आहे
अमुकबल्लवाचार्य
अमुकरावांनी आता "द चीझी फिजिसिस्ट" असे एक हाटेल काढावे अशी शिफारस केल्या गेली आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वा! वा!!
अगदी लुसलुशीत!! तोंडाला पाणी सुटले!!
चिकनबद्दलच म्हणतोय!!
-Nile
बॅचलर पार्टी?
अहो, 'सुभद्रेचे लग्न होऊन तिला एक मूलदेखील झाले! तुमची 'किएव्हियन चिक्सची ब्यॅचलर पार्टी अंमळ उशीराच सुरु झालीय!
आपलं स्थान, आपल्या रसाचं स्थान आणि आमचं स्थान
नाईलसाहेब, आपण एकावेळी कोणत्या तरी एकाच जागी राहत असाल ना? मग मला दोन जागांची स्थळं पाहायला का सांगताय? का ते मेलं कुठलं पार्टीकल त्या पार्टीकल थेरीवाल्यांनी शोधून काढलं होतं जे म्हणे एकाच वेळी दोन भिन्न भिन्न जागी असत असायचं? आम्हाला मनुष्यतेच्या मर्यादा आहेत हो, म्हणून महान लोक काय म्हणतात ते उमगत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
:)
धागा नेटवर टाकता यावा म्हणून म्हणून नेट-का ठेवला असं दिसतय.
आता सविस्तर लिहा म्हणावं किस्सा नेटा-ने.
.
ही आंतरराज्यीय लग्ने म्हंजे लै मजा असते हे मान्य करणार्या अ ऋणा ने (अरुणाने) आपले अनुभव असेच मांडले तर वाचक अ ऋणा त आय मीन ऋणात राहतील.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला पुढच्या पिढीबाबत काय हे
मला पुढच्या पिढीबाबत काय हे जाणण्यात जास्त रस आहे. कारण माझ्या घरी याबाबत निरीक्षणे आहेत.
माझा मुलगा मराठी बोलत नाही, पण त्याला मराठीचा शब्दनशब्द समजतो. मला दु:ख अजिबात नाही. मला एकूण संवाद महत्वाचा वाटतो. भाषा हा मी अस्मितेचा विषय मानत नाही.
पण इतरत्र अशा केसेसमधे:
मिश्र कुटुंबात पोरं खरंच ग्लोबल होतात की दोन पद्धतींमधे गोंधळतात?
पोरं खरंच दोन्ही भाषांमधे सहजी पारंगत होतात की एकही धड शिकत नाहीत? ते नेमकी कोणती भाषा उचलतात?
मुलं कोणत्या पद्धतीने वागतात? त्यातून आईबापांपैकी एक सश्रद्ध असेल आणि दुसरा अश्रद्ध तर जनरल विचारांच्या अनुकरणाबाबत पोरं काय करतात?
शाकाहार- मांसाहार इ इ विषयी त्यांना काय वाटतं ? (कारण एक व्यक्ती हिंसक आहे असं दुसर्याकडे पाहून वाटू शकतं. माझ्याबाबतीत असं होतंय असं मला वाटतं कारण माझा मुलगा शुद्ध शाकाहारी आहे आणि मी चिकन मासे घेत असताना तो नाक दाबतो. )
दोन्ही बाजूचे आजीआजोबा मुलांच्या संपर्कात असतील तर त्यांच्यात काय समीकरण असतं आणि काही परस्परविरोधी शिकवणी / संदेश पोरांकडे जातात का?
पोर कोणाकडे जास्त वेळ असतं किंवा कोणाचा प्रभाव जास्त यावर हे अवलंबून असल्याचं दिसतंय. पण ती एका कोणत्यातरी बाजूचं बरंचसं उचलतात असं आत्तापर्यंत वाटतं आहे.
जॉन ग्रेगॉर मेन्डेल
जीवशास्त्रातील जॉने ग्रेगॉर मेन्डेल ह्याच्या purebred recessive alleles, hybrid आणि purebred dominant ह्या जनुकशास्त्राबद्दलच्या संकल्पना आथवल्या. Law of Segregation आणि Law of Independent Assortment वगैरे वगैरे पण.
वैचारिक बाबतीतही म्हणाल पोरं अनुवांशिक गुण/विचारसरणी उचलणार(स्वतःच्या भावना-विचार/अनुभवांची/स्वतंत्र जनुकांची भर घालून) हे आलच. पण कुठल्या बाजूचा हे पाहणं रोचक आणि ओळखणं कर्मकठीण वाटतं.
.
एकाच झाडाच्या दोन जाती- एक उंच, एक लहान अशा जनुकांचा संकर केल्यावर मध्यम उंचीची झाडं मिश्रणातून मेन्डेलला अपेक्षित होती. पण प्रत्यक्षात मात्र डॉमिनन्ट ट्रेट असणारी, उंच झाडच अधिक उगवली.
.
.
.
अवांतरः-
अरेरे शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न मातीत गेला की काय
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काही जण्रल उत्तरे देऊ शकतो.
काही जण्रल उत्तरे देऊ शकतो. एका मर्यादित अर्थाने मराठी-कन्नड मिश्र कुटुंबात मी वाढलो असे म्हणता येईल.
तसे पैतृक घराणे मूळचे कन्नड, परंतु महाराष्ट्रात ४-५ पिढ्यांपासूनचे वास्तव्य. तदुपरि आजोबा अन बाबा या दोघांच्याही आया मराठी. त्यामुळे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, मी लहान असल्यापासून घरात वातावरण मराठी.
आईचे घराणे कन्नड. महाराष्ट्रात वाढलेली आई-मावशी-मामा यांची पहिलीच पिढी, शिवाय कर्नाटकशी कनेक्शन तगडे होते. सर्व नातेवाईक कन्नड, तर घराबाहेरचे मित्रमैत्रिणी मात्र मराठी. त्यामुळे कल्चरली मराठी एकजिनसीपणा काही अंशी आला असला तरी कन्नड चालीरीती टिकून होत्या.
त्यामुळे मावशी-मामा किंवा आईकडच्या अजून कुणा नातेवाईकांकडे गेल्यास आपसात सगळे कन्नड बोलत. सुरुवातीला विचारावे लागे हे काय ते काय इ.इ. पण नंतर समजत गेले, फारसे अवघड काही गेले नाही.
गोंधळण्याइतका अंतर्विरोध आणि वेगळेपणा दोन्ही ठिकाणी दिसला नाही. काही गोष्टी जरा ऑड वाटल्या- उदा. कझिन म्यारेज. नात्यातल्या एका तशा लग्नास जाताना लै ऑड वाटले होते सुरुवातीला अन प्रश्न विचारून घरच्यांना भंडावून सोडले होते. आता गोंधळ नसला तरी मी वैयक्तिक असे काही करणे अशक्य. बाकी पर्स्पेक्टिव्ह काही अंशी तरी का होईना विस्तारतोच. कन्नड लोकांची खिल्ली उडवणारे बरेच मराठी लोक पाहिले, पण कन्नडिगांचा जवळून परिचय असल्याने तसे करावेसे कधी वाटले नाही. त्यातच नंतर सेतुमाधवराव पगडींच्या आत्मचरित्रातील "मराठी आणि कन्नड या दोन्ही माझ्या मातृभाषाच" हे वाक्य वाचल्यावर डोक्यात एकदम प्रकाश पडला. शिवाय कुठे लग्नसमारंभात वैग्रे गेल्यावर आपसांत बोलायला कोड लँग्वेज म्हणूनही कन्नड कामी येत असे. त्यामुळे एकदा एका लग्नावेळी सक्त ताकीद दिली गेली होती, की जास्त कन्नड पाजळू नका-'शत्रुपक्षा'लाही कन्नड येते म्हणून.
सश्रद्ध-अश्रद्ध याबद्दल बोलणे अवघड आहे. लहानपणी आपण ज्याच्याशी क्लोज असतो त्यांचे अनुकरण साहजिकच करतो. मोठेपणी ते कितपत टिकते हे पाहणे रोचक ठरावे. लहानपणी मारे पूजापाठाची आवड असूनही आज ते काही टिकले नाही.
शाकाहार-मांसाहाराबद्दल: जिथे मांसमच्छीचा उल्लेख केला तरी नाके मुरडणारे खंडीभर लोक मिळतील अशा टिपिकल ब्राह्मणी समाजात मी वाढलो. पण स्वतः वडिलांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन अतिशय उदार होता, त्यामुळे त्यासंबंधी कसलाच गंड कधी आला नाही. त्यामुळे मिरजेत राहत असताना आमच्या मुस्लिम मोलकरणीच्या घरी जाऊन शीरखुर्माच काय, मटणकरी-राईस ओरपायलाही अडचण कधी आली नाही. आणि मुख्य म्हणजे घरचे वातावरण यात फार महत्त्वाचे आहे. आमच्या घरी डॉग्मॅटिक वातावरण आजिबात नसायचे आणि नाही. समजा असा वाद कधी उद्भवलाच तर ग्रंथाधारे वादाची पद्धत घरी बहुत प्राचीन आहे-तेही खेळीमेळीत. त्यामुळे त्याचे कसले ब्यागेज नसायचे.
दोन्हीकडचे आजीआजोबा संपर्कात असतील तर परस्परविरोधी संदेश जाऊ शकतात-अगदी शक्य आहे. कुणाशी संपर्क किती नियमित अन किती जवळिकीचा आहे अन कशा स्वरूपाचा आहे त्यावर हे अवलंबून आहे. सुदैवाने असे फारसे मला कधी झाले नाही.
शेवटी पोरे एकाच बाजूचे जास्त उचलतात हे खरे आहे आणि साहजिकच. पण त्यातही एक रीमिक्स असतो, ते पाहणे रोचक असते. व्यक्तिमत्त्वाच्या कुठल्या पैलूमध्ये कुठल्या बाजूची किती टक्के उसनवार आहे हे पृथक्करण करून पाहिले, तर मजा येऊ शकेल. जसे मी सांस्कृतिकदृष्ट्या मराठी असलो तरी उत्तर कर्नाटकी खाद्यपदार्थ मला फार जास्त आवडतात. इन्सुलारिटी तुलनेने कमी आहे. यास नंतर थोडेसे फिरणे कारणीभूत असले तरी घरच्या परिस्थितीचाही हातभार नक्कीच लागतो.
पण शेवटी काही झाले तरी मराठी अन कन्नड संस्कृतींमधला अंतर्विरोध तुलनेने तसा बर्राच कमी आहे. भाषा सोडली तर फार काही फरक आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय कन्नड लोक साधारणपणे अधिक धर्मनिष्ठ वगैरे असतात. मराठी लोकांइतके तर्ककर्कश कन्नडिग मी तरी अजून पाहिले नाहीत. पण एवढे फरक सोडले तर खास काही फरक आहे असे नाही. मध्यमवर्गीय मूल्येही तीच. तस्मात पंजाबी-तमिळ, बंगाली-पंजाबी, इ.इ. लग्नांमध्ये जो अंतर्विरोध येऊ शकतो, तो इथे अज्जीच नाही. पण तरी काही अंशी या उत्तराची मदत होईल असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिश्र कुटुंबात पोरं खरंच
याला एकच एक उत्तर असेल असं वाटत नाही - बरंचसं मुलाचा कल/आवड आणि घरात केले जाणारे जाणीवपूर्वक प्रयत्न यावर अवलंबून असावं. वर बॅटमॅनने लिहिले आहे तशी माझ्याही विस्तारित कुटुंबात आई मराठी - वडील सिंधी, आई गुजराती - वडील मराठी, आई तमिळ - वडील कोकणी अशी उदाहरणं आहेत. सगळ्यांच्या मुलांना दोन्ही भाषा उत्तम येतात. ज्याला कोड-स्विचिंग म्हणतात, तो एकाच संभाषणात अनेक भाषा वापरल्या जाण्याचा प्रकारही सर्रास होतो.
उदाहरणच द्यायचं तर आत्या, तिचा सिंधी नवरा आणि त्यांची मुलं आमच्या घरी आले की - आत्याचा आजीशी आणि वडलांशी संवाद मालवणीतून, आमच्याशी मराठीतून, नवर्याशी हिंदीतून आणि मुलांशी इंग्रजीतून होतो. पण असं असलं तरी, त्या मुलांना मराठीच काय पण मालवणीही संदर्भाने बर्यापैकी समजते.
अगदी फ्रेंच आणि बहासा इंडोनेशिया यासारख्या सर्वस्वी वेगळ्या भाषा बोलणार्या कुटुंबातही हे शक्य आहे -
किंचित अवांतर - कोड स्विचिंगच्या संदर्भातला हा लेखही वाचनीय आहे.
गमतीदार
मजा आहे. आणि शिवाय सत्यकथा.
मस्त
अतिशय आवडला लेख. वेगळाच भारि अनुभव
सविता
जोशीसाहेब, कॉन्ग्रॅच्युलेशन्स!!!!
तुमची स्टोरी मनाला खूप भावली...
म्हणून मुद्दाम लॉग-इन करुन सांगतो, 'कॉग्रॅच्युलेशन्स'!!!
बस्स, इतकंच!!
धन्यवाद. अहो माझे लग्न २००६
धन्यवाद. अहो माझे लग्न २००६ मधे झाले आहे. मुलगा ६ वर्षांचा आहे. पण ठीक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रंजक
धर्मांतर का करावं लागलं म्हणे?
कथाकाराचे मनोगत
पूर्वजांचा अभिमान आणि पूजा हे ईशान्य भारतीय संस्कॄतीचा मोठा हिस्सा आहे. मला जितपत ते धर्मांतराचे विधी आठवतात त्याप्रमाणे त्या पूर्वजांच्या मंदीरासमोर (प्रत्येक घरात,वाड्यात एक मंदीर असते) डोके टेकवण्याच्या स्वरुपातले होते. आमच्याकडच्या विवाहात तिथले कोणीच, बायकोचे वडील वजा जाता, सामील झाले नाही म्हणून लग्न पून्हा करावे लागले. ते लग्न ज्याच्याशी करायचे त्याचे तो मैतेयी सुद्धा (हा सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण हा सुद्धा आहे, च नाही. हा सुद्धाच कथेचा गाभा आहे)असणे गरजेचे होते. अगदी तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर धर्मांतर झालं नसतं तर त्यांच्या दृष्टीने हा विवाह आंतरधर्मीय झाला असता आणि अशा विवाहाची कोणती प्रोसिजर तिकडे नव्हती.
http://manipuronline.com/culture-society/traditional-religion-of-the-mei...
या लिंकमधला खालून दुसरा पॅरा खाली वाचा. तो 'मूळ' मैतेयी धर्माबद्दल आहे.
...So, the Meitei religion is not sectarian and also not a mere structure of creeds. But this faith is a living force that brings out all the manifold experiences into a system. The sectarian faith brings diversions among the upholders of different beliefs. But the Meiteis faith transcends narrow individuality and small interests. So the term ‘Meiteis’ signifies mankind. Thus the followers of the Meiteis religion is nothing but the religion of man which is universal in outlook and is not built around any particular interest. When the new faith – Vaishnavism came to be the state religion of Manipur, there was in the beginning resistance to change on the part of the devotees of the traditional cults....
या सगळ्याचा अर्थ असा निघतो कि आमची मूलगी लग्न करणार आहे तो किमान एक 'माणूस' असावा. या धर्मांतरात वैष्णव धर्म स्विकारणार्या आणि त्याला तात्विक विरोध करणार्या दोन्ही पूर्वजांचा सन्मान आहे.
शिवाय यात माझ्या बायकोची आणि मेव्हण्याची भाषामर्यादा पण आहे. 'अजून एक धर्म स्विकारणे'ला ते धर्मांतर म्हणाले. वास्तव या प्रकाराला दुसरे असायला हवे.
यात घासकडवींनी उचललेला चांगल्या धर्मांच्या र्हासाचा मुद्दा पण महत्त्वाचा आहे. आज प्रचंड प्रमाणात मणिपूरी लोकांची (विशेषतः अन्य भारतात शिकायला आलेल्या मूलींची) मयांग लोकांसोबत लग्ने होतात. हा धर्म या हिशोबाने येत्या ५० -१०० वर्षात कंप्लीट नष्ट होईल. म्हणून मी अट्टाहासाने माझे धर्मांतर झाले आहे असे म्हणतो आणि या र्हासाला प्रसाराचे रुप देतो. अर्थात् असा विचार करण्याबाबत मी अल्पसंख्यकांत मोडतो हे खरे असले तरी काय फरक पडतो? कथा मीच लिहितोय, दुसरा कोणी नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उद्देश
वैयक्तिक टीका करायचा हेतू नाही. धर्मांतर करून घेण्याची गरज 'मानवतावादी' धर्माला का पडली अशी शंका आली, 'धर्म स्विकारण्याची' गरज का असावी?, माणूस स्विकारण्याची सोय धर्मात नाही म्हणून माणसाने धर्म स्विकारावा हे इतर धर्मांपेक्षा इथे वेगळे कसे?
Best possible religion
आपले म्हणणे योग्य आहे. इतका उदात्त हा धर्म नाही. कथा 'शक्य आदर्शतम धर्म' आणि हा धर्म यांची तुलना नसून 'माझा विद्यमान धर्म' आणि हा धर्म यांची आहे.
उपनिषदातल्या तत्त्वांना मी खुजे असा शब्द कचरत कचरत वापरला आहे, ओम शांति शांति शांति ही फार मोठी उदात्त कल्पना आहे, त्यात तीन प्रकारच्या शांत्यांचे प्रकार स्पष्ट दिसत नसले तरी सांगता येतील. पण एखाद्या श्रेद्धेने ऐकणार्या परंतु रॅशनल माणसाला ओम एक अक्षरच म्हणून त्याचे महत्त्व पटवून देणे अवघड काम असावे. म्हणून दोन्ही धर्मांत शुद्धता, उदात्तता प्रचंड असली तरी मैतेई धर्मात ती खूप सरळ, स्पष्ट आणि unencrypted वाटली.
आपल्यापैकी प्रत्येक सुज्ञ जण आपल्या विद्यमान धर्माला आपणांस अभिप्रेत असलेल्या 'शक्य आदर्शतम धर्माचे' मनातल्या मनात रुप द्यायचा करत असतो कदाचित. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.