पसारा शब्दाचा जनक - माझा एक शत्रू
मला जेंव्हा नीट बोलायलासुद्धा येत नव्हते, तेंव्हापासून "छुबंतलोती तल्लानं" वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. त्यातल्या "छतलूबुद्दी" या शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून माझ्या मनातला कुणाहीबद्दलचा वैरभाव काढून टाकण्याचा प्रयत्न मी अधून मधून करत असतो. माझ्या पाठीमागेसुद्धा माझ्याबद्दल बरे बोलणारे लोक मी सहसा कुणाला 'वाईट' म्हणत नाही किंवा कुणाचे वाईट चिंतत नाही असे काही वेळा सांगतात म्हणे. हे ऐकून मलाही बरे वाटते. पण मला चांगले माहीत आहे की काही शत्रूंनी माझ्या लहानपणापासून आजतागायत माझा पिच्छा पुरवला आहे. त्यांना कितीही वेळा हाकलले तरी बहिणाबाईंच्या 'वढाय वढाय मना'सारखी ही शत्रूरूपी ढोरे 'फिरी फिरी पिकावर' माघारी येतच असतात.
त्यातल्या काही व्यक्ती तर इतिहासातल्या कोणत्या शतकात होऊन गेल्या तेही मला सांगता येणार नाही, पण त्यांनी करून ठेवलेल्या कृती मला अजून छळत असतात. त्यांनी केलेल्या एकाच पापामुळे त्यांनी माझ्यासारख्या इतक्या लोकांचा तळतळाट घेतला आहे की पुढच्या निदान हजार जन्मात तरी ते डास, ढेकूण किंवा झुरळ होणार आहेत याबद्दल माझी खात्री आहे. आज ते ज्या कोणत्या योनीत आणि जिथे कुठे असतील तिथे त्यांचे तळपट व्हावे अशी इच्छा मनात येते आणि एकादा डास, ढेकूण किंवा झुरळ समोर दिसला की त्याचा पार चेंदामेंदा करावा असे वाटते. "माझ्या आयुष्यात मला कधीही न भेटलेल्या या लोकांनी माझे असे कोणते घोडे मारले आहे?" असा विचार तुमच्या मनात येईल, पण मला विचाराल तर माझे फक्त घोडेच नाही तर हत्ती, उंट, गाय, हरीण, ससा वगैरे जो कोणता प्राणी मला कधी हवाहवासा वाटला त्याची या लोकांमुळे वाट लावली गेली आहे. आता एक उदाहरणच पहा ना!
मी तेंव्हा सात आठ वर्षांचा असेन. त्या काळात आताच्या मुलांसारखा 'मी तो हमाल भारवाही' झालो नव्हतो. माझी स्लेटची पाटी, पेण्सिल, अंकल्पी (अंक लिपी), सर्वसमावेशक असे एक किंवा दोन पाठ्यपुस्तके, कुणी तरी आणून दिलेले एकाददुसरे चित्रांचे पुस्तक, एकादी जुनाट रफ वही, पाच दहा सुटे कोरे किंवा पाटकोरे कागद, शिस्पेन्सिल, रबर, रंगांच्या खडूंची पेटी इतकीच तेंव्हा माझी संपत्ती होती. आमचे प्रशस्त घर माणसांनी भरलेले होते. ऊनपाऊस, थंडीवारा आणि निवांतपणा पाहून मी एकाद्या जागी पुस्तक पहात किंवा चित्र काढत बसलो असेन, त्याच वेळी दारात आलेल्या रम्या किंवा अंत्याची हाक मला ऐकू आली तर लगेच जाऊन पहायला नको का? घरातले कपडे वेगळे आणि बाहेर जाण्यासाठी वेगळा ड्रेस म्हणजे 'आत एक आणि बाहेर एक' असा भेदभाव मी त्या काळात करत नसे. त्यामुळे "मी खेळायला चाललोय्" अशी दारातूनच आरोळी देऊन मी सटकलो तर त्याला काय हरकत होती? घरातल्या इतक्याजणांपैकी कोणी ना कोणी तरी ती नक्कीच ऐकणार याची खात्री असायची. खेळून परत आल्यावर सडकून भूक लागलेली असे, थोडे खाऊन होईपर्यंत घरातले कोणीतरी एकादे लहान सहान काम करायला सांगत असे. आपले अर्धवट सोडलेले पुस्तक पहाणे किंवा चित्र काढणे त्यानंतर पुढे चालवावे म्हंटले तर त्या वस्तू जिथे सोडून मी पळालेलो होतो तिथून त्या अदृष्य झालेल्या असायच्या. घरातल्या कोणत्या तरी ताईमाईने, आईने किंवा काकूने त्या उचलून कुठे तरी ठेवलेल्या असायच्या, पण नेमके काय झाले हे मात्र कोणीही मला सांगत नसे. कदाचित त्यांच्याही ते लक्षात येत किंवा रहात नसेल. जमीनीवर काही पडलेले दिसले की ते उचलून कुठे तरी ठेवायचे अशी त्यांच्या हातांना यांत्रिक संवय झाली असावी.
"माझ्या त्या वस्तू कुठे गेल्या?" असे कोणाला विचारायचीही सोय नसे. त्याचे उत्तर कोणाकडे आहे? हेच मुळात माहीत नसल्याने कुणाला म्हणून विचारायचे? हा प्रश्न तर होताच आणि कोणालाही माझा प्रश्न विचारला तरी "तू आपापल्या वस्तू उचलून जागेवर ठेवायला कधी शिकणार आहेस? नुसता पसारा करून ठेवायला तेवढं येतं!" हेच उत्तर मिळण्याची खात्री असायची. त्यानंतर माझ्या मनात पुन्हा कधी पुस्तक पहायचा किंवा चित्र काढायचा विचार आला तर मग मी दोन चार कपाटे आणि कोनाडे धुंडाळून माझी मालमत्ता शोधून काढत असे. त्यात इतर दहा पंधरा वस्तू जमीनीवर येत आणि माझा अर्ध्याहून अधिक मूड गेलेला असे. उरल्यासुरल्या मूडला सांभाळत मी माझ्या कामात तंद्री लावायचा प्रयत्न करतो न करतो तेवढ्यात पुन्हा कोणी ताईमाईअक्का यायच्या आणि कानाला पकडून मला ओढत नेऊन मी नव्याने केलेला 'पसारा' दाखवायच्या, तो उचलून ठेवायला लावायच्या, पाठीत धपाटाही मिळायचा. त्या काळापासून मी 'पसारा' या शब्दाचा भयंकर धसका घेतलेला आहे.
माझा एक मोठा भाऊ कॉलेजशिक्षणासाठी शहरात चालला गेला तेंव्हा रिकाम्या झालेल्या कपाटातला एक खण मी हट्ट करून माझ्या ताब्यात घेतला. माझ्या पुस्तक आणि वह्यांची संख्या तोपावेतो थोडी वाढली होती, शिवाय कंपासपेटी, फुटपट्टी, रंगपेटी, रंगकामाचे ब्रश, दौतटाक, टीपकागद वगैरे काही साधनांची त्यात भर पडली होती. आता माझी हक्काची जागा मिळाल्यामुळे मी काही वस्तूंचा संग्रह करू शकणार होतो. मी तयार केलेल्या कागदाच्या होड्या, विमाने, पक्षी वगैरे कलाकृती आतापावेतो दुसरा दिवस उजाडायच्या आत बंबामध्ये "अग्नये स्वाहा" होत असत, आता मी त्या माझ्या खणात जपून ठेवू लागलो. काडेपेट्यांचे 'छाप', रिकाम्या झालेल्या डब्या, भोवरे, गोट्या, गजगे, चिंचोके, पोस्टाची रिकामी पाकिटे, त्यांच्यावरची तिकीटे, रंगीबरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले, खेडेगावात क्वचितच मिळणारी चमकदार नवी नाणी किंवा अती प्राचीन वाटणारी घासून गुळगुळीत झालेली जुनी नाणी अशा अनेक चित्रविचित्र वस्तू मला आकर्षक वाटायच्या आणि मी त्यांना माझ्या खणात स्थान देत असे. त्यातली कुठलीही गोष्ट चुकून जमीनीवर पडली तर 'पसारा' समजली जाईल आणि कदाचित मला पुन्हा तिचे दर्शन होणार नाही एवढे शहाणपण मी अनुभवावरून शिकलो होतो. त्यामुळे मला हवी असलेली वस्तू काढतांना इतर काही वस्तू बाहेर आल्याच तरीसुद्धा मी त्यांना पुन्हा खणात कोंबून ठेवत असे.
पण एकाद्या दिवशी मी शाळेतून परत येऊन पाहतो तो माझ्या खणाचे व्यवस्थित स्वरूप आणि मोकळेपण पाहून मला रडू आवरत नसे. मी प्रेमाने जमवलेल्या काही गोष्टी तर तिथून नाहीशा झालेल्या असतच, शिवाय "बघ, मी तुझा खण किती छान आवरून ठेवला आहे? तू त्यात नुसता बुजबुजाट मांडला होतास!" असले काही उद्गार ऐकावे लागत असत. पहायला गेल्यास माझ्या खणातला सोकॉल्ड 'पसारा' कुणाला आणि कसला त्रास देत होता? ताई, माई, अक्का, आई, काकू वगैरेंना तोसुद्धा का सहन होत नव्हता? "अचानक कोणीतरी पाहुणा घरी आला आणि त्याने ते कपाट उघडून पाहिले तर त्यातला तुझा खण बघून त्याला काय वाटेल? तो (बहुतांश वेळा ती) त्यावर काय म्हणेल?" असल्या प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर होत असे. कदाचित त्यात त्यांचीही काही चूक नसेल. "ज्या कोणत्या महाभागाने मराठी भाषेत 'पसारा' हा शब्द आणला त्यालाच धरून धोपटायला पाहिजे" असे माझे ठाम मत त्या काळात बनत गेले. आजवर ते बदललेले नाही.
जरा निसर्गाकडे पहा. निसर्गातले डोंगर हे एकादा पिरॅमिड, देवळाचा घुमट किंवा भाताची मूद यासारखे कधी तरी सिमेट्रिकल असतात का? निरनिराळ्या नद्या कधी सरळ रेषेत आणि एकमेकींना समांतर किंवा काटकोन करून वाहतात का? आभाळातले ढग कधी वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी किंवा पंचकोनी असतात का? रानात उगवलेली झाडे कवायत करत असलेल्या सैनिकांसारखी एकेका रांगेत ठराविक अंतर सोडून उभी असतात का? जमीनीवर पडलेली त्यांची पाने सत्यनारायणाच्या पूजेसाठी मांडतात तशी एकाच बाजूला देठ करून उताणी ठेवलेली असतात का? पाने, फुले, गवत, दगड, गोटे वगैरेंचे त्यांच्या आकारानुसार किंवा रंगांप्रमाणे वेगवेगळे ढीग असतात का? निसर्गामध्ये तसले काही नसते. तिथे सगळे काही अव्यवस्थितपणे मिसळलेले असते. याचाच अर्थ पसारा असणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो करणे हा प्राणीमात्रांचा नैसर्गिक गुण आहे, अर्थातच मनुष्यप्राण्याचासुद्धा, हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.
मी कॉलेजशिक्षणासाठी हॉस्टेलवर रहायला गेलो तिथे एकेका खोलीत तीन तीन मुलांची सोय केलेली होती. प्रत्येकासाठी एक लहानशी कॉट आणि टेबलखुर्ची दाटीवाटी करून ठेवली होती, कपाट मात्र नव्हते. सगळ्या मुलांनी पलंगाखाली आपापल्या ट्रंका आणि बॅगा ठेवून त्यात आपापले सामान ठेवायला सुरुवात केली. पण तिथे रोख पैसे सोडल्यास आणखी काही सहसा चोरीला जात नाही हे लवकरच सर्वांच्या लक्षात आले. रोज चार पाच तास लेक्चर्स ऐकण्यात आणि तीनचार तास प्रॅक्टिकल्स करण्यातच दिवसातला सगळा वेळ आणि शक्ती खर्ची पडत होती. नवीन ओळखी करून घेणे, नवे मित्र जोडणे, नवे वातावरण समजून घेऊन त्याच्याशी जमवून घेणे वगैरेंमध्ये उरलेल्या वेळात प्रयत्न करत होतो. सकाळी उठल्यानंतर समायिक स्वच्छतागृहांमध्ये नंबर लावून सकाळची कामे उरकून घेऊन आणि मेसमध्ये जाऊन पोटभर नाश्ता करून वेळेवर कॉलेजला पोचण्यात रोज खूप धावपळ करावी लागत होती. यामुळे त्यानंतर सगळ्या मुलांमधले नैसर्गिक गुण बाहेर आले. मग अंगावरून काढलेले कपडे कॉटवर टाकले जायचे, लॅबकोट किंवा बॉयलरसूट असे काही चढवलेले असले तर ते कॉलेजमधून परत आल्यानंतर आधी काढून तिथेच भिरकावले जायचे, रात्री झोपायच्या आधी कपडे बदलले तर काढलेले कपडे त्यावरच पडायचे. वह्यापुस्तकेसुध्दा काही टेबलावर तर काही पलंगावर मस्तपैकी पसरलेली असायची. ही अवस्था सगळ्याच खोल्यांची होती. एकादा मुलगा कुठून तरी एकादे पिवळे पुस्तक घेऊन आला तर ते मात्र गादीखाली, उशीच्या अभ्र्यात वगैरे लपवून ठेवले जायचे आणि त्याची कुणकुण इतर कोणाला लागताच ते तिथून अदृष्य व्हायचे.
एका अतीश्रीमंत मुलाचे त्या काळातले फॉरेनरिटर्न्ड आईवडील त्याला भेटण्यासाठी दर रविवारी मुंबईहून मोटारगाडीने येत असत. त्यांनी त्या मुलाच्या खोलीतल्या एका कोपर्यात कॅनव्हासचा भला मोठा झोळा अडकवून ठेवला होता. अंगावरून काढलेला कोणताही कपडा, तसेच वापरलेला टॉवेल, नॅपकिन, रुमाल वगैरे सगळे तो लगेच त्या झोळ्यात टाकायचा. आईवडिलांनी त्यांच्याबरोबर आणलेला नोकर त्या मुलाच्या पलंगावरच्या चादरी, पलंगपोस, टेबलक्लॉथ आणि त्या झोळ्यात जमा झालेले सगळे कपडे काढून त्याचा गठ्ठा बांधून बाजूला ठेवायचा. व्यवस्थित धुवून इस्त्री केलेल्या कपड्यांचा त्याने सोबत आणलेला नवा गठ्ठा उघडून त्यातली चादर गादीवर व्यवस्थितपणे अंथरायचा, उशांचे अभ्रे बदलायचा, टेबलक्लॉथ बदलून त्यावरची सगळी वह्यापुस्तके लगोरीसारखी म्हणजे सर्वात मोठे पुस्तक तळाशी, त्याहून किंचित लहान आकाराचे त्यावर अशा रीतीने नीट मांडून ठेवायचा, रुमाल, टॉवेल्स, घरातले कपडे, बाहेर जातांना घालायचे कपडे, पांघरायच्या चादरी वगैरे सगळ्यांचा भरपूर नवा स्टॉक त्या मित्राच्या खोलीतल्या ट्रंकेत व्यवस्थित ठेवायचा आणि बांधून ठेवलेला गठ्ठा घेऊन जायचा. पसारा आणि नीटनेटकेपणा या विषयांवरील व्याख्यान ऐकायची इच्छा नसल्यामुळे त्या मुलाचे रूममेट दर रविवारी सकाळी उठून आपापल्या वस्तू जमतील तेवढ्या आवरून ठेवू लागले. पहिल्या एक दोन आठवड्यानंतर त्या मुलाचे वडील त्याला भेटायला हॉस्टेलवर क्वचितच आले असतील, त्याच्या आईचे येणेही हळूहळू कमी होत गेले, पण नोकर किंवा ड्रायव्हर मात्र न चुकता दर रविवारी येत राहिला आणि त्याचे कर्तव्य बजावत राहिला. पुढे त्याच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली तेंव्हा त्याचे चाळीस पन्नास किंवा जितके काही कपड्यांचे सेट होते ते एका मोठ्या ट्रंकेत घालून हॉस्टेलवर येऊन पडले. ते धुवून घेण्यासाठी त्याने स्थानिक व्यवस्था केली, पण लवकरच तो आणि त्याचे रूममेट माणसांत आले. .
काही मुलांची घरे हॉस्टेलपासून दीडदोन तासांच्या अंतरावर होती किंवा पुण्यातच त्यांची एकादी ताई किंवा माई रहात असे. यामुळे घरातले कोणीतरी कधीही अवचितपणे त्यांच्या खोलीवर येण्याची दाट शक्यता असायची. ती मुलेसुद्धा रविवारची सगळी सकाळ आपापली खोली आवरण्यात घालवायची. एकदोन मुलांना बहुधा आवरोमॅनिया झाला होता. आपली प्रत्येक वस्तू कुठल्याही क्षणी विशिष्ट जागी, विशिष्ट अवस्थेतच असणे हेच जीवनात सर्वात जास्त महत्वाचे असते असे ते समजत असत. एकाद्या पुस्तकातली माहिती पहायची असली तर ते लोक आधी त्या पुस्तकाच्या वर असलेली सगळी पुस्तके एक एक करून व्यवस्थितपणे बाजूला काढून ठेवत, हवे असलेले पुस्तक बाजूला ठेऊन इतर सगळी पुस्तके पुन्हा व्यवस्थितपणे रचून ठेवत आणि नंतर ते बाजूला ठेवलेले पुस्तक उघडून पहात. त्यातली माहिती वाचून किंवा पाहून झाली की पुन्हा ते पुस्तक त्याच्या ठरलेल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवत. अर्थातच इतर सगळ्या पुस्तकांना दोन वेळा व्यवस्थितपणे हाताळणे त्यात आलेच. हॉस्टेलमधल्या दुसर्या एकाद्या मुलाने त्या शिस्तप्रिय मुलाच्या टेबलावरच्या पुस्तकांच्या चंवडीमधले एकादे तळातले पुस्तक पाहण्यासाठी खस्सकन ओढून काढले किंवा ते पाहून झाल्यानंतर टेबलावरच कुठेसे ठेवले तर तो त्याचा अक्षम्य अपराध असायचा. सगळ्यात वर दिसत असलेले पुस्तकसुद्धा पाहून झाल्यानंतर त्याच्या मूळ जागेवर ठेवतांना ते उलटे ठेवले गेले, म्हणजे त्याचे मुखपृष्ठ खालच्या बाजूला किंवा शिवण डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला झाली तर त्या मुलांना ती गोष्ट अस्वस्थ करत असे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे कोणीही त्यांच्या कुठल्याच वस्तूला हात लावत नसत आणि त्यांचा सगळा वेळ आवरासावरीतच जात असल्यामुळे इतर कुणाशी मैत्री करणे, त्या मित्रांबरोबर गप्पा मारणे, खेळणे, भटकणे वगैरे काही आपल्या जीवनात असते हे त्यांच्या गावी नसायचे.
असे काही अपवाद सोडले तर इतर सगळी मुले मात्र रविवारी सकाळी उन्हे चांगली अंगावर येईपर्यंत आपल्या पलंगावरच्या पसार्यात आरामात लोळत पडायची. मनसोक्त लोळून झाल्यानंतर मग आठवडाभरात साठलेली किरकोळ कामे हातात घ्यायची, एकादा मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा खेळाची मॅच पहायला जायची, उगाचच बाजारात फिरून विंडोशॉपिंग करायची आणि या सगळ्यामधून फालतू वेळ मिळाला तर खोलीची थोडी आवराआवर करायची असा त्या काळातल्या सुटीच्या दिवसाचा दिनक्रम असायचा. त्या काळात पसारा हा शब्द फारसा कानावर पडायचा नाही आणि पडला तरी त्याची मजा वाटायची. त्यामुळे या शब्दाच्या निर्मात्याबद्दल मनात बसलेली आढी तेंव्हा त्रासदायक वाटत नव्हती. किंबहुना मी त्याला विसरून गेलो होतो. बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणायची पद्धत असली तरी मला मात्र हॉस्टेलमधला काळ सुखाचा असेच तेंव्हा वाटत असे आणि ते फारसे चूक नव्हते.
मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर 'घर' या संकल्पनेचे काही फंडे समजत गेले. आपले घर म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तसे आरामात राहण्याची हक्काची जागा आहे असे मला वाटत असले तरी आपल्याकडे येणार्याजाणार्यांनी आपल्या घराला चांगले म्हणणे अतीशय आवश्यक असते. त्यांनी आपल्या घराचे (म्हणजे गृहिणीचे) कौतुक करावे, निदान त्यांना नावे तरी ठेऊ नयेत हे सर्वात जास्त महत्वाचे असते. त्यांना नाव ठेवायला जागाच मिळू न देणे हे गृहिणीचे परमोच्च कर्तव्य तसेच ध्येय असते. अर्थातच आपल्या घराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातल्या उणीवा दाखवणे हा त्या येणार्याजाणार्यांचा मुख्य हेतू असणार. ते लोक आपल्याला भेटायला किंवा आपल्याशी बोलायला येत असतात असे मला उगीचच वाटते. आपले घर कसे असते यापेक्षा ते कसे दिसते याला जास्त महत्व असते. यात पुन्हा चांगलेवाईट ही विशेषणे सापेक्ष असतात. त्यामुळे "आपलं घर तर किती छान दिसतंय्?" असे मी म्हणून काही उपयोग नसतो. तसे इतरांनी म्हणायला हवे, पण दिवसभर मी कामासाठी बाहेरच असल्यामुळे हे येणारे जाणारे, खरे तर येणार्याजाणार्या, आपल्या घराबद्दल काय बोलत असतात ते मला कसे समजणार? त्यामुळे मी या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही आणि नुसतेच बोललेले कोणाला ऐकण्याची काय गरज? घरासंबंधीच्या तत्वज्ञानाचे थोडे बाळकडू मी लहानपणी प्राशन केले होते, पण हॉस्टेल्समध्ये घालवलेल्या सुवर्णयुगात त्याचा अंमल ओसरला होता. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक मी संसार थाटल्यानंतर पुन्हा कलीसारखा माझ्या घरात घुसला.
घर चांगले दिसण्यात 'पसारा' या शब्दाला अवाच्या सव्वा निगेटिव्ह मार्क असतात. केर, कचरा, घाण वगैरेंना घरात थारा देता कामा नयेच हे कोणीही मान्य करेल, पण जगातल्या सगळ्या संदर वस्तू वेचून तुम्ही घरी आणून ते सजवलेत तरी एकाद्या जागी झालेला पसारा त्या सगळ्यावर बोळा फिरवतो. 'पसारा' म्हणजे 'पसरलेल्या वस्तू' असा व्याकरणातला अर्थ असेल, पण घराच्या सौंदर्याच्या संदर्भात या शब्दाला एक वेगळाच व्यापक अर्थ असतो. कोणतीही टुकार, खराब किंवा वाईटच नव्हे, एकादी सुरेख, उपयुक्त आणि तुमची अत्यंत आवडती वस्तूसुद्धा जर का जमीनीवर, गादीवर, सोफ्यावर, खुर्चीवर, खिडकीत वगैरे पडली असेल तर ती वस्तू 'वस्तू' न राहता तिचे रूपांतर 'पसार्या'त होते. 'नो पार्किंग झोन'मध्ये एकादी मर्सिडिज गाडी उभी असली तरी तिला खेचून नेणारे महाभाग असतात, त्याचप्रमाणे कुठेही 'पसारा' दिसला की त्याला उचलून नजरेआड करणारे हात सारखे शिवशिवत असतात. 'टोइंग'वाल्यांनी नेलेली गाडी कुठे मिळेल याची थोडी फार कल्पना असते, पण 'पसारा' म्हणून गायब झालेल्या वस्तूंबद्दल काही सांगता येणार नाही. मिळाल्या तर एका मिनिटात मिळतील नाहीतर त्या कुठल्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाल्या हे कधीच समजणार नाही. त्यातून जर का हा 'पसारा' घरी आलेल्या पाहुण्याच्या नजरेला पडेल अशी शक्यता निर्माण झाली तर त्याला देहांताची शिक्षा होणे अटळ असते. खरे वाटत नसले तर एक अनुभव सांगतो.
मी जेंव्हा चारपाच वर्षांचा होतो त्या काळात आमच्या घरातल्या एकाद्या कोनाड्याचा एकादा कोपरासुद्धा 'माझा' नव्हता, पण या बाबतीत माझा मुलगा नशीबवान होता. तो तीनचार वर्षांचा झाला होता तोपर्यंत त्याला अनेक खेळणी आणि चित्रमय पुस्तके मिळाली होती. ती सगळी ठेवण्यासाठी आम्ही त्याला घरातली एक खोलीच दिली होती. त्या खोलीत त्याला वाटेल तसे खेळायला मोकळीक दिली होती. ती खोली त्याला 'त्याची' वाटावी म्हणून भिंतींवर आकर्षक रंगीत चित्रे लावली होती. इतके सगळे करूनसुद्धा त्याला मात्र तसे काही वाटत नसे, कारण तो पठ्ठा 'हे (संपूर्ण) घर माझेचि विश्व' असे मानायचा आणि अर्थातच घरातल्या सगळ्या वस्तू त्याला हाताळून पहायच्या असत. एकाद्या सम्राटाच्या ऐटीत तो घरभर फिरायचा, लाटणे, झारा, टूथपेस्ट, पेन, घड्याळ असले जे काही हाताला लागेल ते उचलून कुठेही नेऊन तो त्याच्याबरोबर खेळत बसायचा. त्याला उचलून त्याच्या खोलीत नेऊन खेळवणे आणि त्याच्या हातातल्या इतर वस्तू काढून घेणे हे काम मला नाइलाजाने करावे लागत असे. एकादा कायदा तत्वतः मान्य नसला तरी जबाबदार नागरिकाला त्याचे पालन करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे 'पसाराविरोधी' अध्यादेशाची अंमलबजावणी करणे मला भाग होते.
एकदा माझे शासरेबुवा आमच्याकडे आलेले होते. त्यांना त्यांच्या मुलीबरोबर निवांतपणे गुजगोष्टी करायला मिळाव्यात म्हणून मी माझ्या मुलाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो. पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सर्व घराबरोबर त्याची खोलीही आवरली गेली होतीच, सगळी खेळणी आणि पुस्तके कपाटात बंद केलेली होती. त्यातले एक चित्रमय पुस्तक काढून मी त्यातली परीकथा सांगायला सुरुवात केली. अनेकदा ऐकून त्याला ती गोष्ट पाठ झालेली होती, मी एक वाक्य बोलताच तो पुढचे वाक्य सांगायचा. अशा प्रकारे ते पुस्तक वाचेपर्यंत तो कंटाळला. त्याला थोड्या प्रॅक्टिकल आणि क्रिएटिव्ह कामात गुंतवण्याच्या दृष्टीने मी पत्त्यांचा जोड काढला आणि आम्ही दोघांनी मिळून बंगला बनवायला सुरुवात केली. दोन पत्त्यांचा त्रिकोण तयार करणे, त्याला धक्का न लावता शेजारी दुसरा त्रिकोण रचणे आणि त्यांना आडव्या पत्त्याने हलकेच जोडणे त्याला जमायला लागले आणि आमचा बंगला मोठा मोठा होत गेला. माझ्या मुलाला त्यात एक प्रकारचा अपूर्व आनंद मिळत होता, त्याच्या वयाच्या मानाने पाहता त्याचे हस्तकौशल्य खरोखरच कौतुक करण्यासारखे होते आणि ते करून मी त्याला प्रोत्साहन देत होतो.
"चहा तयार झालाय् रे" अशी माझ्या आईची हाक कानावर येताच मी उठलो आणि "मी पाच मिनिटात येतोय् हां." असे मुलाला सांगून बाहेर हॉलमध्ये आलो. आम्ही सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली. एवढ्यात माझा मुलगाही बाहेर आला आणि "आजोबा, चला, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे." असे म्हणत त्यांचे बोट धरून ओढायला लागला. एका हातात कप धरून ते त्याच्याबरोबर गेले असते तरी काही बिघडणार नव्हते आणि त्यांची तशी तयारीही होती. पण "अरे आजोबांना जरा चहा तर पिऊ दे. दोन मिनिटांनी ते येतील." असे म्हणून त्याची समजूत घातली गेली. तो बिचारा निमूटपणे वाट पहात उभा राहिला. यामागचा कावा माझ्याही लक्षात न आल्यामुळे मीही गाफिल राहिलो.
चहाचा शेवटचा घोट घेतल्यावर आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत गेलो आणि तिथले दृष्य पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझा मुलगा तर आश्चर्याने आणि दुःखाने सुन्न होऊन गेला कारण तेवढ्यात कोणीतरी तिथे येऊन जमीनीवरचा पसारा हलवायचा म्हणून आम्ही बांधलेला बंगला पार नाहीसा करून टाकला होता आणि पत्त्यांचा जोड उचलून कपाटात ठेऊन दिला होता. कारण काय तर पाहुण्यांनी पहायला ती खोली चांगली दिसायला हवी ना! वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स कोसळल्यानंतर अमेरिकेच्या जनतेला उद्देशून आषण करतांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या चेहर्यावर जे भाव दिसले होते त्याहूनही जास्त आक्रोश माझ्या मुलाच्या इवल्याशा डोळ्यांमध्ये मला दिसत होता. पण कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगावे अशी माझी अवस्था झाली. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक माझ्याकडे बघून खदाखदा हसतो आहे असे मला वाटून गेले.
मातेची माया, ममता वगैरेंची थोरवी असंख्य लोकांनी सांगितली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे जितक्या भाषा मला येतात त्या सगळ्यांमध्ये मी याबद्दल अनेक वेळा वाचले आहे. स्वाहिली किंवा हिब्रू वगैरे ज्या भाषा मला समजत नाहीत त्यांमध्येसुद्धा तिचे वर्णन असणार याची मला खात्री आहे. "मुलाचा आनंद म्हणजेच आईचा आनंद आणि मुलाचे दुःख म्हणजेच आईचे दुःख, मुलाला कुठे टोचलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि मुलाच्या डोळ्यातली चमक पाहून आईचे डोळे चमकायला लागतात." वगैरे जे काही सगळेजण म्हणतात तसे असणारच, पण मला एक गोष्ट समजत नाही. घरात दंगामस्ती करून सगळे सामान इकडेतिकडे टाकणारी लहान मुले सगळ्या काळांमध्ये मी घरोघरी पाहिली आहेत. त्यात मुलांना होत असलेला आनंदही त्यांच्या चेहे-यावर ओसंडतांना दिसत असतो, पण हा आनंद त्यांच्या माउलींच्या तोंडावर मात्र दिसत नाही. मुलाच्या आनंदामुळे आनंदी होण्याऐवजी त्या रागावतात, वैतागतात, मुलांना दटावून त्यांचा विरस करतात किंवा रट्टे देऊन त्यांना रडवतात. असे का होत असावे? आपल्या घरातला पसारा बघून कोणीतरी आपल्याला काय म्हणेल? ही इनसिक्यूरिटी इतकी तीव्र असते की या क्षणी आपल्या मुलाला काय वाटेल? हा विचार त्यांना त्यावेळी करावासा वाटत नाही,
साक्षात मातेच्या मनावरसुद्धा अशा प्रकारे सत्ता गाजवणारा हा विचार ज्याच्यामुळे निर्माण झाला तो म्हणजे पसारा शब्दाचा जनक आपला शत्रूच नाही का? मी तर त्याला शत्रूच समजतो.
प्रतिक्रिया
__/\__ आधी एखादी उल्का दिसावी
__/\__
आधी एखादी उल्का दिसावी म्हणून आकाशांत टक लाऊन बसावे नी पाठोपाठ अजून एक तितकीच मनोहारी उल्का दिसावी! मग, हा उल्कावर्षाव तर नव्हे या कल्पनेने मन आनंदून जावे तसे काल रामदास काका आणि आज घारेसरांच्या या लेखनाने झाले आहे!
बाकी आम्हीही 'पसारा'संप्रदायाचे सच्चे सेवक असल्याने घरी कमीत कमी फर्निचर केले आहे. बहुतांश वस्तुंना "एक" अशी खास जागा ठेवलेलीच नाही त्यामुळे मुळात नो पार्किंग झोनच निर्माण न केल्याने माझी मर्सिडीज कुठेही लाऊ शकतो नी त्याला "पसारा" लेबलही टाळले जाते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पसार्याबद्दलचा पसरट लेख मस्त
पसार्याबद्दलचा पसरट लेख मस्त आवडला!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्त लेख
मस्त लेख आवडला.... मला घरी हवा तसा पसारा मांडायला मिळत नाही. त्यामुळे ऑफिसातील टेबलावर मी मनसोक्त पसारा मांडून बसतो.
मस्त लिहीलय! _/\_
मस्त लिहीलय! _/\_
खुप छान लिहीलंय... मुळात मी
खुप छान लिहीलंय... मुळात मी स्वतः 'आवरोमॅनिया'ग्रस्त आहे हे प्रामाणिकपणे नमूद करतो पण तरीही लेख जाम आवडला आहे
(आणि हो मी 'आवरोमॅनिया'ग्रस्त असलो आणि म्हणून घरं अवरलेलं असावं असा अट्टाहास असला तरी तो माझ्या स्वतःसाठी असतो कारण मला स्वतःला ते तसं असल्यास चांगलं वाटतं[त्याने घरातल्या 'पसारा'सांप्रादायावर अत्याचार होत असतीलही] , पण माझं ते वाटणं पाहूण्यांना वा इतर घरात कोणी येणार्याला ते चांगलं वाटावं म्हणून नसतं. तसंही पाहुण्यांच्या माझ्या घराबद्दलच्या मतांना I don't give a damn )
काय मस्त लिहिलय हो!
काय मस्त लिहिलय हो! मुजरा..!!!
आणि कळस म्हणजे बाई म्हटल म्हणजे ती पसारा आवरणारीच असच समिकरण असतं. मग माझ्यासारख्या पसाराप्रीय व्यक्तिचा प्रचण्ड कोंडमारा होतो. पाहुणे यायच्या आधी घर आवरणे हा तर एक टास्कच! मी तर ईतकी बदनाम आहे कि एकदा असच नाईलाजानी घर झाडत होते तर कार्ट म्हणतं "आई कोणी पाहुणे येणार आहेत का?" अश्शी उखडले त्याच्यावर..
एकदा असच नाईलाजानी घर झाडत
अरेरेरेरेरेरे, सच्चाई का जमाना ही नहीं रहा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तर काय हो..? खरच..
तर काय हो..? खरच..
बिच्चारी देवाघरची फुले,
बिच्चारी देवाघरची फुले, उग्गीच ओरडतात आया त्यांच्यावर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झकास लेख.
झकास लेख.
लहानपणी आईबरोबर रद्दी विकायला मी जायचे. जरा उंची, शक्ती वाढल्यावर रद्दी सायकलला अडकवून आम्ही दोघी रिकाम्या हाताने चालत जायचं असा शिरस्ता झाला. त्यामुळे जास्त काळ रद्दी साठवलेली चालायची. ते सगळं रिकामं केलं की अचानक घर विचित्र दिसायला लागायचं. मग मी तक्रार करायचे, "रद्दी असते तेव्हा घर कसं भरलेलं वाटतं!" पण रद्दीचे पैसे मलाच खर्चायला मिळायचे म्हणून ही तक्रार फार तीव्र नसायची.
(कोणी नावं ठेवतील/न ठेवतील याची पर्वा न करता) 'द सेकंड सेक्स' वाचलं नसशील तर वाच. त्यात सिमोन दी बोव्व्हारने स्त्रियांचं असं वर्तन, त्यामागची कारणं याबद्दल रोचक पद्धतीने, पण मूलगामी विचार मांडला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वाचलय...पण परत काढुन ठेवलं
वाचलय...पण परत काढुन ठेवलं वरच.... ;;) ;;) ;;)
आमचे कन्यारत्न.
एकदा कोणी येणार म्हणून मुलीला "मावशी काय म्हणेल आपला पसारा पाहून?" असे बोलून तिची खोली आवरायला पाठवले तर आमच्या (सहा वर्षीय) सत्यनिष्ठ कन्यारत्नाने "पण नेहमी घरात पसारा असताना, फक्त कोणी येणार म्हणून आवरले तर तो खोटेपणा नाही झाला का?" असा युक्तीवाद केला होता.
या पोरांना ना सोयिस्कररीत्या
या पोरांना ना सोयिस्कररीत्या हरिश्चंद्र चावतो
स्वनेत्रीचे मौसलपर्व न पाहोन
स्वनेत्रीचे मौसलपर्व न पाहोन पोरनेत्रीचा शलाकाध्याय पाहिला की असंच होणार
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाSSहिद, ईस्ज्ञान, स्जलासा,
वाSSहिद, ईस्ज्ञान, स्जलासा, आरबाह, ख्साम्सा, सित्ता, सबाSSह, झ्समानियाSSह, तिस्सा, आशरह....
आप्पडिया! आनालुम् एन्न
आप्पडिया! आनालुम् एन्न सोलरिंगळ्
तरवाता इदि चूडंडि:
आशरह, आशरीन, सलासीन, आरबैन, खमसैन, तिसैन, इ.इ.इ. मयातैन व अलफ!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुडिचिटियाऽऽऽऽ???
अय्यो सू* मूड रा डे! *त्ता! ते*डिया*दि! *म्माल*क्का! *वडे़कॉ बॉल१!
- (कोणे एके काळी हॉष्टेलवर तमिऴ ग्यांगांमधून वावरून तद्भाषिक अपशब्दकोष आत्मसात केलेला) 'न'वी बाजू.
----------------------------------------------------------------------------------------------------------
१ ही शिवी हिंदीसदृश भासली, तरी तमिऴच आहे. अर्थ हुबेहूब हिंदीतल्यासारखा. (तद्भव?) आणि उच्चार अस्साच करायचा. 'व' दीर्घ अकारान्त, 'व'वर आघात, 'बॉ'वर आघात.
रिकाम्या जागा भरा.
तु, व, --, --, --, ल??
तमिऴ जास्त ठौक नै. एएसएपी शिकले पाहिजे
-तंबी बॅटाई.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे असले विदाऊट सबटायट्ल्स
हे असले विदाऊट सबटायट्ल्स सबग्रुपिंग/सबऐसी ब्यान केले पाहिजे किंवा त्याला निदान उच्चभ्रु दर्जा तरी द्या.
Thamizhar Apashabdakosha
Thamizhar Apashabdakosha येईपर्यंत वाट पहा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चरणस्पर्श करके प्रणाम. मला
चरणस्पर्श करके प्रणाम.
मला स्वतःला पसारा खूप आवडतो. "स्पाँटेनियस ऑर्डर" मधलं स्पाँटेनियस फक्त उचललंय. ऑर्डर फक्त बायकोची झाली की पसारा आवरल्यासारखं करणे.
पसारा म्हणजे काय?
पसारा आवडला, पण त्यातला हा नीटनेटका कोपरा वगळता -
सिमेट्रिकल किंवा विवक्षित मांडणी म्हणजेच व्यवस्थित अन्यथा पसारा हे गृहितक रुढ अर्थाने खरे असले तरी ते मान्य करण्याचे कारण नाही. निसर्गातल्या मांडणीमुळे त्याला त्याच्या गोष्टी शोधायला त्रास पडत नाही, निसर्गाचे रुप 'गचाळ वाटत' नाही, निसर्ग एकच आहे त्यामुळे एका निसर्गाने ठेवलेली गोष्ट दुसर्या निसर्गाला शोधावी लागत नाही. त्यापलिकडे मला असे वाटते कि 'तुमचा नेट-नेटकेपणा हा माझ्यासाठी पसारा असु शकतो'.
माझ्यामते पसारा म्हणजे गैरसोय, गचाळपणा, अस्वच्छता, हे सगळं नसल्यास तो पसारा नाहीच.
माझ्यामते पसारा म्हणजे
+१ माझीही 'पसर्याची' व्याख्या बरीचशी हीच आहे.
माझ्यामते पसारा म्हणजे
गचाळपणा हे अतिशयच सापेक्ष असल्याने ते वगळता सहमत आहे.
मात्र कित्येकदा वस्तु "जागच्या जागी" ठेवण्यापेक्षा "सोयीच्या" जागी ठेवल्या की "पसारा! पसारा!!" अशी ओरड होते ना!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मात्र कित्येकदा वस्तु
अगदी सहमत!!!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आवश्यकतेनुसार सोयीच्या जागेवर वस्तू ठेवणे
टेलिफोनच्याजवळ एक कागदाचे पॅड आणि पेन ठेवणे माझ्या मते अत्यंत उपयोगाचे असते, पण तो 'पसारा' दिसतो आणि त्यामुळे जागेवरून पसारही होतो.
अचानक वीज गेली तर लगेच सापडावी म्हणून एक मेणबत्ती आणि काडेपेटी अगदी सहज हाताला लागेल अशी ठेवली तर ती सहजपणे दिसते आणि तिच्यामुळे घराचे सौंदर्य बिघडते पण न ठेवल्यामुळे वीज गेल्यानंतर अंधारात बाजारात जाऊन या वस्तू आणण्याची वेळ येते.
अगदी मान्य @ सोयीच्या जागा.
अगदी मान्य @ सोयीच्या जागा. पण आमच्या घरात 'पसारा'सांप्रदायचे लोक 'सोयीची जागा' रोज बदलत असतात त्यामूळे कॉमन गोष्टी शोधताना किंवा आवरताना चिडचिड होते आणि मग "पसारा पसारा" ची ओरड सुरु होते
सोयीची जागा
आमच्या घरी झाडून सगळे पसारा संप्रदायी आहेत. त्यामुळे आमच्याकडे 'सोयीची जागा' म्हणजे जिन्नस पटकन हाताशी येण्याच्या दृष्टीने सोयीची जागा असा नसून जिन्नस हातावेगळा करण्यासाठी सोयीची जागा असा असतो.
लेख खूप आवडला.
निसर्गातला रँडमनेस
निसर्गाचे उदाहरण मी त्यातील रँडमनेससाठी दिलेले आहे. निसर्गात ठोकळेबाजपणा नसतो हे या परिच्छेदात दा़खवले आहे.
सिमेट्रिकल किंवा विवक्षित मांडणी म्हणजेच व्यवस्थित, अन्यथा पसारा हे गृहितक रुढ अर्थाने खरे असले तरी ते मान्य करण्याचे कारण नाही.
मलाही ते मान्य नाहीच. निसर्ग चुकीचा आहे असे मला म्हणायचे नाहीच. उलट माणसाने निसर्गाकडे पहावे असे मी लिहिले आहे.
'पसारा' या शब्दाच्या रूढ अर्थाला आणि तो आवरण्याच्या खटाटोपाला माझा आक्षेप आहे हे मी अनेक उदाहरणे देऊन मांडले आहे. लेख 'ललित' या सदरात असल्यामुळे त्यात मुद्देसूद मंडण खंडण न करता तो रंजकतेच्या अंगाने लिहिलेला आहे.
धन्यवाद
धन्यवाद, ललित असल्याने प्रतिवाद करत नाही. परत एकदा - ललित आवडले.
तर्कदुष्टपणा
>>जरा निसर्गाकडे पहा.<<
निसर्गात सिमेट्री नसते हे काही पटले नाही! निसर्गात ठोकळेबाजपणा नसतो हे देखील पटेना. हा परिच्छेद तर्कदुष्टपणाचा आरोप मान्य करून अजिबात पटेना!
symmetry in nature असे नुस्ता इमेज-गुगुलून पाहिले तरी हजारो नेत्रदीपक इमेजेस दिसतील.
>>पाने, फुले, गवत, दगड, गोटे वगैरेंचे त्यांच्या आकारानुसार किंवा रंगांप्रमाणे वेगवेगळे ढीग असतात का?<<
किमान दगड, गोटे यांचे तरी खूप व्यवस्थित(ऑरगॅनाईज्ड) ढीग असू शकतात.
नियम आणि अपवाद
काही विशिष्ट जागी निसर्गातली सिमेट्री असते. उदाहरणार्थ प्राणी, पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे वगैरेंची बाह्य शरीररचना, समुद्राच्या लाटा, संथ पाण्यावर उठणा-या वर्तुळाकार लहरी, इंद्रधनुष्याची कमान, वाळवंटाचे दृष्य वगैरे. काही ठिकाणी एकाच आकाराच्या दगडांचे ढीग कदाचित दिसतीलही, मी कधी पाहिलेले नाहीत. पण आपल्याला सर्वसामान्यपणे सगळीकडे जे दिसते ते मी उदाहरणांसह माझ्या लेखात दिले आहे.
मस्त लेखन
मस्त लेख आहे. आवडला.
पसारा
खुमासदार लेख. लेखातले सगळे पॅरा आवडले. तो निसर्गावरचा परिच्छेदही मला तिथे फिट वाटला.
शिवाय ज्यांचे लहानपणीपासून स्वतःचे घर असते त्यांना अनेक वस्तू घरात आणून मांडायची हौस असते. ज्यांचे उंटावरचे घर असते ते जास्त सामान घेत नाहीत. आता मोठेपणी परिस्थिती पालटली तरी या सवयी जात नाहीत. स्वतःचे घर असलेले लोक सहसा कोणते सामान टाकून देऊ इच्छित नाहीत. भाडेकरू लोक त्याउलट करतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खुसखुशीत लेखन.
आवडले अन मनापासून पटलेही. निसर्गाचा पॅरा एकदम चखोट !
बाकी, 'आवरोमॅनिया' ची बाधा मलाही आहे बॉ थोडीशी !
उत्तम
मस्त जुळुन आलं आहे. फक्त शेवट थोडा मनाला खट्टु करुन गेला. छोट्याचा उतरलेला चेह्ररा अगदी डोळ्या समोर तरळत होता.
नीटनेटकेपणा
एकाचा नीटनेटकेपणा दुसर्याला त्रासदायक होउ शकते हे खरेच.
मला काही ठराविक पुस्तके वाचताना हातात पेन्सिल घेउन बसायची सवय.
मी काही आवडलेल्या, महत्वाच्या वआटलेल्या ओळी अधोरेखित करुन ठेवतो; पुन्हा पुन्हा वाचायच्या असतील तर शोधायला सोपे पडावे म्हणून.
पण काही लोकांचा कोर्या कोरकरीत पुस्तकावर भारी जीव!
मी असे काही केलेले दिसले तर खोडरबर घेउन त्या ओळी खोडून काढणार्या काही सदस्यांसोबत राहणे हा एक खास अनुभव आहे.
अर्थात, हे अधोरेखन वगैरे मी स्वतःच्याच पुस्तकात करतो; उसनवारीवर आणलेल्या पुस्तकात नाही.
मला अजून एक न समजलेली गोष्ट म्हणजे स्नान झाल्यावर पाणी बादलित तसेच का सोडून द्यायचे ?
अरे स्नान करायला घेतलेत ना पाणी ? वाप्रा की पूर्ण.
ह्या मुद्द्यावरून मी लहान असताना सतत ज्येष्ठांशी किरकिर होइ.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला अजून एक न समजलेली गोष्ट
असा(ही) काही नियम असतो?!!!
ही (जिथे तिथे माजलेली -साभार-) कुटुंबसंस्था (साली) आता बाथरूममध्येही काय करायचं ते ही ठरवते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नवीनच ऐकतोय
ही रीत कधी ऐकली नव्हती!
मी (जेव्हा कधी तशी आंघोळ करतो) तेव्हा उरले-सुरले सगळे पाणी डोक्यावर ओतून घेतो. बरं वाटतं!
उरले-सुरले सगळे पाणी डोक्यावर ओतून घेतो. बरं वाटतं
उरले-सुरले सगळे पाणी डोक्यावर ओतून घेतो. बरं वाटतं
ते मीही करतो. पण मला ते क्रांती वगैरे केल्याच्या थाटात करावं लागतं.
मग कुणी "प्रथा " वगैरे बद्दल बोललं की मी नेहमीचीच यशस्वी "ज्ञानेश्वरांनी संस्कृतात रचना करण्याची प्रथा मोडली नाही का.
कृष्णानं यज्ञ - इंद्र स्तवन वगैरेची प्रथा मोडून गोपूजन वगैरे प्रथा सुरु केली नाही का" वगैरे वगैरे वाद घालतो.
पुरेसा वेळ बर्बाद झाला की मंडळी थकून आपापल्या कामाला लागतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बादलीतले पाणी
मला अजून एक न समजलेली गोष्ट म्हणजे स्नान झाल्यावर पाणी बादलित तसेच का सोडून द्यायचे ?
हे मुद्दाम ठरवून केले जाते की आंघोळ झाल्यावर उरलेले असते?
मुद्दाम ठरवून केले जात असेल तर
१. ते वाया जाऊ नये, उपयोगात यावे अशी इच्छा असेल म्हणून शिल्लक ठेवले असेल. किंवा
२. आपली आंघोळ झाली, काम संपले एवढाच विचार असेल
बादलीमधून तांब्याने किंवा मगाने पाणी काढून ते अंगावर घ्यायचे असेल तर बादलीतले सर्व पाणी संपणे अशक्य आहे. तळाशी थोडे पाणी उरणे अपरिहार्य आहे. ते मोरीत ओतून टाकायचे की हरहरगंगे म्हणत अंगावर ओतून घ्यायचे हे विकल्प आहेत. आंघोळ झाली याचा अर्थ अंग स्वच्छ झाले असा असला तर तांब्याभर जास्त पाण्याने ते जास्त स्वच्छ होणार नाही, उलट बादलीच्या तळाशी असलेल्या गाळाने ते थोडे घाण होण्याचीच अधिक शक्यता दिसते.
पाणी तापवण्यासाठी झालेला विजेचा किंवा गॅसचा खर्च वसूल व्हायलाच हवा असाही एक मुद्दा असू शकतो. शेवटच्या तांब्यातल्या गरम पाण्यानेही अंगाला थोडा शेक मिळतो तसेच पाण्यामधली उर्जा त्वचेला मिळते याचे समाधान मिळू शकते.
गेल्या कित्येक दशकांपासून मी शॉवरने स्नान करत असल्यामुळे बादलीतल्या पाण्याचा प्रश्न मला कधी पडला नव्हता. गीजरचे बटन बंद केल्यानंतर सुद्धा त्यातले गरम पाणी संपेपर्यंत अंगावर घेत रहायचे की नाही? विजेचा खर्च वसूल करण्यासाठी पाणी वाया घालवायचे का? हा यक्षप्रश्न मात्र विचार करायचा झाल्यास पडतो.
बादली
हल्ली शहरी भागात , अपार्टमेंट संस्कृतीत, कार्पोरेशनच्या पाण्यात प्लास्टिकच्या बादलीच्या तळाशी गाळ साठलेला फारसा दिसतो कुठे ?
पाणी नुसते ठेवून करायचे काय, नुसते जमिनीवर नंतर टाकून देण्यापेक्षा अंगावर ओतून घेतलेले काय वाईट, असा माझा विचार असतो.
स्नानासाठी शॉवर आवडत असला तरी मी बादलीचा वापर करतो.
गिझर तापलाच आहे, तर तो बरोब्बर काटेकोर वापरुन घेणे अशक्य वाटते.
(पाणी आहे म्हणून ओले व्हायचे, मग आहे ते पाणी किंचित कमी गरम वाटते, मग अजून तापवून पाहयचे.
पुन्हा ते तापलेले शिल्लक आहे, म्हणून पुन्हा ओतून घ्यायचे असे विचित्र चक्र आमच्यासारख्या धांदरटाचे होउ शकते.
घरी भाजी भाकरी खाताना हीच अडचण होते.
नेमकी किती भाजी बरोब्बर तेवढ्या भाकर्यांना पुरेल हे समजत नाही.
शेवटाचे एक दोन घास मग मी चटणी - लोणचे ह्यांना तोंडी लावून खातो.
)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गंगेचे पाणी
बादलीत थोडेसे पाणी ठेवण्याचा संबंध ते पाणी गंगेचे असते वगैरे असा काहिसा आहे, नक्की तपशील आठवत नाही.
अंघोळ करून उरलेल्या पाण्यावर
अंघोळ करून उरलेल्या पाण्यावर इतकी चर्चा? आपलं उपक्रम होत चाललंय का? :-S
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उष्टे खरकटेवर पण बरीच चर्चा
उष्टे खरकटेवर पण बरीच चर्चा झालेली
छे
छे अंघोळ करण्याआधीच चर्चा व्हायला हवी होती निदान पाणी तरी जास्त होते.
पुनर्विचाराची विनंती.
मेघनाने macroeconomics नक्कीच वाचले नसावे. किंवा क्लासमधे झोपा काढत असावी (हलकेच घेणे). किंवा सिलॅबस मधे नसावे.
भारताचा विचार करू. १२५ कोटी लोक. पैकी ९९% आंघोळ करतात (घासकडवी म्हणतात, मी तर इतके लोक पाणीही पीत नाहीत म्हणतो). १०% लोक दोनदा आंघोळ करतात. एका बकेट मधे १४, १६, वा १८ लिटर पाणी असते. प्रत्येक जण आपल्या सवयीप्रमाणे ०(अंगावर ओतून घेणे), ५ मीमी, १० मीमी, ते १० सेमी उंचीचे इतके पाणी खाली केवळ फेकून द्यायला शिल्लक ठेऊ शकतो.हे एकूण बादलीच्या क्षमतेच्या ० ते १०% मानता येईल. सरासरी पाच मानू. १ घन मी पाण्याच्या शुद्धीकरणाची व पुरवठ्याची किंमत १० रु आहे. आणि वर्षात ३६५ दिवस (कमित कमी असतात.) या सगळ्या माहितीवरून ही चर्चा वर्शाला ३.९ बिलियन वा ३९० कोटी रु. ची आहे.
४०० कोटी रुपयांची किंमत नसणे ही वृत्ती बरी नव्हे (पुन्हा हलकेच घ्या.)
शिवाय या 'फेकलेल्या' पाण्यातले अर्धे पाणे, वर्षातले अर्धेच दिवस, बाहेरच्या तापमानापेक्षा १० ते ३० डीग्री ने वाढवून, म्हणजे ४ रु प्रति यूनिटला पडणारी वीज ४/३६०० रुपी/ ज्यूल्स हा दर. इतक्या पाण्याला स्थिर दाबाखाली तापवायला ४१८६ ज्यूल्स प्रतिकिलो प्रति सेल्सियस लागते. म्हणजे ९.२ बिलियन म्हणजे ९२० कोटी रु.
वर्षाला १३१० कोटी. हे ही conservative अनुमान.
तरीही मी या पाण्याची 'घरातली' स्टोरेज कॉस्ट, निचरा करण्याची कॉस्ट (इतक्या पाण्यामुळे नाले मोठे बांधावे लागतात, इ) मोजत नाहीय.
आमची चर्चा महत्त्वपूर्ण आहे कि नाही यावर पुनर्विचार व्हावा हि विनंती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे तुम्ही 'उपक्रम'
म्हणजे तुम्ही 'उपक्रम' महत्त्वपूर्ण नाही असं म्हणताय की काय?! असेल महत्त्वपूर्ण तुमची चर्चा. त्यानं काय ती रंजक वगैरे होते की काय? झोपा काढणारच माणूस.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
"शेवटचा मग वा बादलीतले शेवटचे
"शेवटचा मग वा बादलीतले शेवटचे पाणी अंगावर घेणे" याची परिपूर्ण संकल्पना करावी. रंजकता आपोआप आढ्ळून येईल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे 'उपक्रम' महत्त्वपूर्ण
असो.
आता गंभीरपणे:
ऐसीवर फार ललित लिहिलं जात नाही अशी एक तक्रार असते. मी स्वत: ललित लिहिते. पण मी ते ऐसीवर लिहिताना दहा वेळा विचार करते. अमुक एखाद्या विषयावरून काहीतरी विषय निघाला आणि त्यावरून महत्त्वाची आणि रोचक चर्चा झाली असं इथे बरेच वेळा घडतं. पण त्याचबरोबर नाही त्या बाऽरीकशा तपशिलावरून अस्थानी (लेखाचा सूर, शैली, उद्देश, रोख इत्यादींचा विचार न करता) खुसपटं काढून 'बाल की खाल' काढण्याचा प्रकारही खूऽऽप वेळा घडतो. माझ्या ललित लिखाणाच्या बरेवाईटपणावरून चर्चा होण्याला माझी अजिबात ना नाही. पण ती ललित लिखाणाच्या विषयाला, सुराला, शैलीला धरून व्हावी. कविता आहे कातरवेळच्या मनःस्थितीला उद्देशून लिहिलेली, आणि तिच्याखाली 'मुदलात मुंबईत कातरवेळ अनुभवायला मिळण्याइतकी स्वच्छ हवा आहे का, हवेतलं कार्बनडायॉक्सॉइडचं प्रमाण, धुरके पडण्याची वारंवारिता' अशी किंवा या धर्तीवरची चर्चा होण्याची ग्यारण्टी मात्र आहे - तर मी इथे ललित का लिहीन?
इथली चर्चा वाचून मला तसा फील आला खरा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तर मी इथे ललित का लिहीन?
तर मी इथे ललित का लिहीन?
हे उगी आपले अवगुण लपवणं झालं.
होणार्या टिकेची आपणास भीती वआटते असे आमचे मत आहे.
भीती वाटत नसल्यास इथे लिहिणं सुरु करा पाहू.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला भीती वाटते.
मला भीती वाटते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
...
प्रस्तुत ललित लेखाचे लेखक श्री. आनंद घारे हे आहेत. त्यांच्या प्रस्तुत ललित लेखावर प्रस्तुत स्वरूपाची चर्चा झालेली आवडण्या-न आवडण्याचा लोकस ष्ट्याण्डाय (असलाच तर) श्री. आनंद घारे यांना असू शकावा, असे वाटते (चूभूद्याघ्या.), असे अतिविनम्रपणे निदर्शनास आणून देण्याचे धाडस (मराठीत: जुर्रत) करू इच्छितो.
बाकी, "चर्चा तर होणारच".
चालू द्या.
कविता आहे कातरवेळच्या
हे एक वाक्य सुश्री मेघना भुस्कुटे यांचे 'पाऴ्सोनाल मोतामोत' दर्शवते असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'पाऴ्सोनाल मोतामोत'...
...प्रत्येकालाच एकएक (तरी)१ असते. सबब, चालू द्यावे, हेच बरे, याच्याशी सहमत. (आय ष्ट्यांड करेक्टेड.)
(अवांतर: 'मोतामोत'चा उगम कळला नाही.)
-------------------------------------------------------------------------------------------
१ (अतिअवांतर:) इतरही अनेक गोष्टी प्रत्येकाला एकएक(च) असतात. तो अधिकार आम्ही नाकारत नाही. मग मताधिकार तरी का नाकारावा, नैका?
रत्येकालाच एकएक (तरी)१
ओपीनियन्स आर लैक..........एव्हरीवन हॅज़ वन.
वङ्गभाषेत "आमार निजोश्शो मोतामोत" अर्थात आमचे वैयक्तिक मत असे म्हंटात. मोतामोत=मत+अमत असा अंमळ स्यूडोसंस्कृत संधी असावा की काय अशी आपली एक शङ्का.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
आभार.
पाऴ्सोनाल मोतामोत म्हणजे?
पाऴ्सोनाल मोतामोत म्हणजे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अंग्रेज़ लोग जब मरते हैं, तब...
बंगाली लोक जेव्हा आपले वैयक्तिक मत मांडतात, तेव्हा त्यास 'पाऴ्सोनाल मोतामोत' म्हणतात. (असे वाटते. चूभूद्याघ्या.)
लेकिन ये लोग मरते कैसे हैं?
पण हे बंगाली लोक आपले वैयक्तिक मत कुठे बरं मांडतात?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पाऴ्सोनाल=पर्सनल चे वंगीय
पाऴ्सोनाल=पर्सनल चे वंगीय रूप. मोतामोत=मत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोकस ष्ट्याण्डायबद्दल
लोकस ष्ट्याण्डायबद्दल सांगण्याकरता घारे यांजकडे स्वतःचा आयडी असू शकेल (चूभूद्याघ्या) असे अतिअतिविनम्रपणे निदर्शनास आणून देण्याचे धाडस मीही करू इच्छिते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वेल...
...आम्हींही आमच्या वैयक्तिक अधिकारांत आमचे 'पाऴसोनाल'च प्रतिपादिले१.
---------------------------------------------------------------------------
१ कोणाच्या स्पेसिफिकली प्रति नव्हे; इन्जण्रळच सर्वांप्रतिपादिले. असो.
माझी भूमिका
मागे एकदा मी अणुशक्तीच्या संदर्भात थोडासा माहितीपूर्ण लेख लिहिला होता त्यावेळी त्यामध्ये मांडलेल्या तांत्रिक तपशीलाऐवजी अणुशक्तीचे फायदेतोटे वगैरे पॉप्युलर विषयांकडे चर्चा वळू नये अशी माझी इच्छा मी लेखाच्या अखेरीस व्यक्त केली होती. या लेखाबद्दल माझा असा काही आग्रह नाही. हा लेख मी आता ऐसी अक्षरेच्या स्वाधीन केला आहे. त्यावर अवांतर चर्चा झाली तरी त्याला माझी हरकत नाही. मी स्वतःच त्यात भाग घेतला असल्यामुळे मी तसे म्हणू शकतही नाही.
मी सगळ्याच प्रतिसादकर्त्यांचा अत्यंत आभारी आहे, बाकी चालू द्या.
ललिताचे रसग्रहण
१. संस्थळावर अवांतर चर्चा करणारांनी मूळ ललित आवश्यक तितक्या आस्वादाने मूळात वाचलेच नाही असे जाणवत असेल,
२. असेच सदस्य बहुसंख्य आहेत असे जाणवत असेल, आणि
३. या गदारोळात आस्वादपूर्वक वाचन करून योग्य अभिप्राय देणारे अल्पसंख्य अग्राह्य वाटत असतील
तर ललित लेखन अशा स्थळावर करू नये. ऐसीवर असे होत नाही. उदा. याच लेखनाला अनेक उत्तम अभिप्राय मिळाले आहेत. लोक अवांतर करत राहणार, त्याला इलाज नाही. ललित वाचणारे मूळ लेख वाचतात, तारे देतात आणि निघून जातात. अवांतर करणार्या लोकांतील चर्चा इतरांनी वाचणे अपेक्षित, अभिप्रेत नाही. शिवाय तोच वेगळा चविष्ठ विषय बनला तर इथे वेगळ्या ठिकाणी हलवतात.
शिवाय मला असे वाटते कि, ललितावर न्याय झाला का नाही हे ते वाचले गेले कि नाही यावरून ठरवावे. त्यावर चर्चा कोणत्या स्वरुपाची झाली यावरून नाही. चर्चा हा ललिताच्या रसग्रहणाचा शुद्ध जालीय, दुय्यम भाग आहे.
पण अवांतराचा अतिरेक नसावा हा आग्रहही योग्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सुंदर विश्लेषण
धन्यवाद.
मनोगत, मिसळपाव, उपक्रम आणि ऐसी अक्षरे या सगळ्या ठिकाणी मी अधून मधून अगदी थोडासा फिरून आलो आहे. प्रत्येकाची काही धोरणे असतात आणि ती असली तरच त्याची तशी प्रतिमा तयार होते. काही सदस्य याची आठवण करून देत असतात.
मुळात मी जे काही लिहितो तेंव्हा ते कुठल्याच चौकटीत मांडण्याचा प्रयत्न करत नाही. लेखनाचा प्रकार यात एका पर्यायावर टिचकी मारणे आवश्यक असते म्हणून याला 'ललित' असे नाव दिले. लालित्य, त्याच्यावर होणारा न्याय, अन्याय किंवा त्याचे रसग्रहण वगैरे विषयामध्ये मला फारशी गती नाही.
या लेखनाला अनेक उत्तम अभिप्राय मिळाले आहेत. (अर्थातच त्या मित्रांनी लेख वाचूनच दिले असणार) हे मात्र मूठभर मांस चढवणारे आहे. सर्वांचे आभार.
मस्त
मस्त लेख! फार आवडला.
मस्तं !
मस्तं !
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
झक्कास जमलाय लेख! -
झक्कास जमलाय लेख!
- (पसाराप्रिय) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
(पसाराप्रिय) सोकाजी (तुमच्या
(तुमच्या धाग्यांवरील द्रव्यांचे परिपूर्ण व नेटके फोटो आठवत) हे बात हजम नय हुयी!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा पसार्याचा गुण लेखनातही
हा पसार्याचा गुण लेखनातही उतरत असावा काय?
माझे वा मनोबाचे लेखन बघा, कसे भरपूर नी विस्कळीत असते
त्यामानाने चिंजं पसारा घालतात, व/वा विसुनाना पसारा घालतात असे कोणी म्हटले तर त्यांचे लेखन वाचून ते खरे वाटावे का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अहो पण लेखनाचा अन लेखकाच्या
अहो पण लेखनाचा अन लेखकाच्या जीवनशैलीचा संबंधच काय?
'शत्रूला रुधिराचे स्नान घालू' इ. कविता लिहिणारे कवी काव्यसंमेलनात कविता म्हणताना कसे लटलटत असतात ते पाहतोच की
किंवा गेलाबाजार ट्रोजन युद्धाचे वर्णन मिटक्या मारत करणार्या अस्मादिकांनीही कधी कुणा माणसाला ठार मारलेले नै
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला काय माहित, मला तरी तशी
मला काय माहित, मला तरी तशी शंका आली बॉ!
वर ज्यांनी ज्यांनी स्वतःला आवरोमॅनिया आहे लिहिलं आहे त्यांचे लेखनही तसेच बेतशीर, टु द पॉइंट असते. पसारा घालणारे मात्र अवांतरही भरपूर लिहितात (अपवाद साक्षात घारे सर! )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा हा हा
हा हा हा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ऐकतोय.
.
अपवाद म्हणजे
आपल्याला मी पसारा न घालणारा वाटतो की अवांतर न लिहिणारा वाटतो? आंतर्जालावर माझी काय इमेज बनली आहे? इथे मला प्रत्यक्षात ओळखणारे फारसे कोणी नसावेत यामुळे त्या इमेजला महत्व!
लेखनावरून माझ्या डोक्यात
लेखनावरून माझ्या डोक्यात तुमची इमेज, एक मुद्देसूद व तर्कशुद्ध व्यक्ती अशी आहेच. शिवाय अवांतरही फारसे दिसत नाही. गोळीबंद प्रतिसाद/लेखन हे अनेकदा जाणवणार वैशिष्ट्य!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद
तुम्ही लिहिले तसे असावे अशीच माझीही साधारण कल्पना होती, त्यामुळेच अपवाद कसा हे नीटसे समजले नाही. माझी इमेज तयार करण्याचा किंवा तिला जपण्याचा मी विशेष प्रयत्न करत नाहीच. जेंव्हा जसे सुचेल तसे लिहून टाकतो. असो.
लेख आवडला.
लेख आवडला.
माझा आवडता दुर्गुण
ज्या व्यक्तिला घर झाडावे, पुसावे लागते तिला पसार्यामुळे भयानक त्रास होतो. त्यातहि स्वच्छता-टापटिप यावरुन येताजाता जिला टोमणे ऐकावे लागत तिच्या चष्म्यातुनहि पसार्याकडे पाहिले जावे असे वाटते.
अशा निबंधांना आवडण्याचा एक काळ होता. आता आवडत नाहित.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
माझ्या लेखातला मुद्दा
ज्या व्यक्तिला घर झाडावे, पुसावे लागते ... ही स्वच्छता झाली. ती आवश्यकच असते, मग पसारा असो किंवा नसो.
तिला पसार्यामुळे भयानक त्रास होतो. .... पसारा या शब्दाची जी तथाकथित व्याख्या मी लेखात लिहिली आहे तिच्यामुळे कुणालाही त्याचा त्रास का व्हावा?
त्यातहि स्वच्छता-टापटिप यावरुन येताजाता जिला टोमणे ऐकावे लागतात .. कुणीही का म्हणून टोमणे मारावेत?
हेच प्रश्न मी उपस्थित केले आहेत.
मला वाटते आपण माझा लेख संपूर्ण वाचलेला दिसत नाही किंवा कदाचित मला माझा मुद्दा पुरेशा स्पष्टपणे मांडता आलेला नाही. .
अनेक वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांवरून पाहता हे लिखाण कालबाह्य झाले नसावे असे वाटते. अर्थात पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना।
असलेले-नसलेले
एका खोलित ५० टाइल्स आहेत. त्याव्रच्या १७ टाइल्सवर लेगो य खेळण्याचे तुकडे विखुरलेले आहेत असे कल्पा. एका व्यक्तिस पुर्ण ५ओ टाइल्स पुसायच्या आहेत. १७ टाइल्सवर लेगोचे तुकडे पसरलेले नसते तर टाइल्स पुसणे तुलनेने सोपे असले असते. त्यामुळे पसारा > पसरलेल्या गोष्टि यांचा त्रास होतो असे म्हटले आहे. लहान असतांना आणि आजकालहि चुकुन-माकुन एखाद्याचे घर चांगले आवरलेले नसल्याबद्दल बलणे ऐकलेले आहे. टोमणे मारणार्या लोकांचि कारणे मला सांगता येणार नाहित. तुमच्याहि लेखात पाहुण्यांसमोर पसार दिसु नये याबद्दल गृहिणिंनि घेतलेलि दक्षता पसार्याबद्दल असलेली सामाजिक घृणाच दिसते. असो.
मि आपला लेख पुर्ण वाचलेला आहे. आपला निबंध वाचनिय आहे. मला त्यात नसलेल्या गोष्टिंचा अर्थात 'न मांडलेल्या पसार्याचा' अभाव जाणवल्याने आवडु शकला नाहि.
१००% सहमत. कृपया गैरसमज नसावा.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
एक असेच ऐकलेले...
'अ क्लीन डेस्क इज़ अ साइन ऑफ अ डर्टी माइण्ड'.
(स्पष्टीकरण विचारू नका. माहीत नाही, मिळणार नाही. टेक इट फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ, ऑर लीव इट. पण स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप वगैरे तथाकथित सद्गुणांना तात्त्विक विरोध जरी नसला, तरी त्यांचे ऑब्सेशन - आणि खास करून इतरांप्रति ऑब्सेशन - ही एक विकृती असू शकते, हेही कोठेतरी मनोमन पटते. आणि हो, विकृतीचे झटके आम्हालाही अधूनमधून येऊ शकतात बरे!)
बाकी, ते एण्ट्रोपी, सेकण्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वगैरे भानगडी जिथे विश्वाच्या वाढत्या पसार्याबद्दलच बोलतात, तिथे हम जो थोड़ी सी पी के ज़रा झूमे - आम्हीही थोडा पसारा मांडला - तर नेमके काय बिघडते, असा प्रश्न विचारावासा वाटतो.
विकृती नव्हे संवय
विकृती हा फार टोकाचा शब्द झाला. मी ज्यांना आवगोमॅनियाग्रस्त म्हंटले आहे त्यांच्या बाबतीत तो कदाचित लागू होऊ शकेल. पण अशा व्यक्ती क्वचितच दिसतात. मी ज्यांचे उल्लेख केले आहेत, ज्यांना मी घरोघरी पाहतो, त्या व्यक्तींना स्वतःला नीटनेटकेपणा, टापटीप वगैरेंची मनापासून अत्यधिक आवड असते असे नाही. कोणतीही वस्तू डोळ्यासमोर म्हणजे जमीनीवर, खिडकीत, सोफ्यावर, खुर्चीवर वगैरे दिसली की पसारा झाला असे समजून आणि लोक काय म्हणतील या धास्तीने तिला ते फक्त नजरेआड करतात. तशी त्यांना संवय लागली असते किंवा तथाकथित संस्कारांमधून लावली गेलेली असते. माझ्या लेखाचा रोख अशा प्रकारच्या वागण्यावर आहे. आपल्या उपयोगाच्या वस्तू आवश्यकता पडल्यास चटकन मिळतील इतपत व्यवस्थितपणे ठेवल्या पाहिजेतच, त्या अस्ताव्यस्त पसरल्या तर त्यांना शोधण्यात वेळ जाईल, हे लक्षात घेऊन त्या डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या तर त्यात फायदाच आहे, पण पाहुण्यांना आपले घर कसे दिसायला हवे याला अवास्तव महत्व दिले तर त्यामुळे त्या वस्तू नजरेआढ केल्या जातात आणि सहज सापडतील अशा जागी रहात नाहीत. हे मला खटकते.
अरे... तुम्ही 'आवरोमॅनियॅक'
अरे... तुम्ही 'आवरोमॅनियॅक' ची व्याख्या थोडी व्यापक केलीत. नाहीतर मी इथे 'मी आवरोमॅनियॅक आहे' अशी कबुली देणार होते.
मला पसारा आवडत नाही, उगीचच सतत गोष्टी इतरत्र विखुरलेल्या दिसल्या की मला गप्प बसवत नाही. माझं स्वतःचं ऑफिसमधलं टेबल, बर्याचशा फायली नीट लावलेल्या असतात(दोनचार वेळा तोंडघशी पडल्यापासून नीट असतात. तोवर मात्र योग्य त्या फाईलमध्ये कागद फक्त एकत्र असत) इतकेच नव्हे, तर माझ्या एका वरिष्ठांचं टेबल पण मी सतत आवरत असते. मला त्यांच्याकडे बहुतेक वेळा काम पडतं आणि टेबलावर हा ढीग, त्यातून हवा तो कागद कधी नीट सापडत नाही, उगीचच अठराशे सत्तावनापासूनचे तेव्हा कामाचे असलेले आणि आताचे निरूपयोगी/कधीच कामाचे नसलेले असले सगळे कागद कधीही कुठेही असतात. मी वेळोवेळी नको असलेले टाकून देणे, उपयोगी पण त्यांना/मला महत्वाच्या नसलेल्या वस्तू ज्यांना उपयोग होईल अशांना देऊन टाकणे. हे सगळं करत असताना, 'पहा, मला तुमच्यामुळे किती काम पडत आहे' असं झापणे अशा गोष्टी करत असते.
मला घर नीटनेटकं आवडतं, ते आपल्याला अशा घरात प्रसन्न वाटतं म्हणून. पण दिसली गोष्ट की उचल असं मी नाही करत. आताही व्यवस्थित घड्या घातलेले कपडे बाहेर सोफ्यावर पडून आहेत, ते मला त्रास देत नाहीयेत. :-). पर्ंतु मला गोष्टी जागच्याजागी असाव्यात असं वाटतं, कारण त्या मग त्याच ठिकाणी व्यवस्थित सापडतात. मी स्वतः बहुतेक वेळा तसंच करायचा प्रयत्न करते. त्यामुळे मी घरी नसताना निखिलने कपाटातून काय काय बाहेर काढले, कुठल्या डब्यातला खाऊ खाल्ला हे लगेच कळतं. अर्थात त्याला डब्यांच्या बदललेल्या जागेसोबतच नीट न लावलेली झाकणं हेही एक कारण असतं.
घारेकाकांच्या वरच्या प्रतिसादामुळे मी बेताची आवरोमॅनियॅक आहे असं वाटतंय.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
मॅनियाक नाही निरलस
वस्तू अस्ताव्यस्तपणे राहू देणे बहुतेक वेळा आळसापोटी घडत असते. त्यांना निश्चित केलेल्या जागी ठेवणे नक्कीच चांगले असते. ऑफिसमध्ये त्यासाठी फायलिंग सिस्टिम असते. ती पाळणे ऑफिसच्या शिस्तीमुळे आवश्यक असते. आपल्यालाच नव्हे तर इतर सहकार्यांनासुद्धा आवश्यक असलेली माहिती त्वरित मिळण्यासाठी तशी व्यवस्था केकेली असते. या बाबतीत मी स्वतःसुद्धा काही मित्रांच्या दृष्टीतून 'अतिरेकी' होतो.
घरामध्ये कशामुळे 'प्रसन्न' वाटेल हे व्यक्तीसापेक्ष असते. तो आनंद मिळवण्यासाठी किती प्रयत्न किंवा कष्ट करावेत याचे गणित वेगवेगळे असते. मी सुद्धा हा लेख लिहिला म्हणून घराचा उकिरडा होऊ देत नाही. माझ्या परीने जमेल तेवढे ते नीटच ठेवतो, फक्त लोक काय म्हणतील? इकडे लक्ष देत नाही.
जरा भोचकपणा करतोय, पण 'नीट
जरा भोचकपणा करतोय, पण 'नीट आवरलेलं घर ही संगणक बंद पडल्याची खूण आहे' अशी तुमचीच स्वाक्षरी होती का? असेल तर, ती स्वाक्षरी वाचून ह्या बाईचं घर पसार्याने भरलेलं असेल असं वाटत रहायचं !
-अनामिक
सुमारे एका आठवड्याचा क्रम
शुक्रवार : ऑफिस मधून घरी येणे. चहाकॉफीबरोबर, बायकोपोरांबरोबर टाईमपास. संध्याकाळी सर्वांनी बाहेर जाणे किंवा एखादा सिनेमा टिव्हीवर.
शुक्रवारी रात्री घराची स्थिती : पसारा, मुलांचं घरभर पसरलेलं खाणं, न केलेली लाँड्री वगैरे
शनिवार सकाळ : आज पाहुणे येणार. घर आवरणे, स्वच्छता करणे. घर आवरणे याचा अर्थ : घरात पसरलेली पुस्तकं, कागदपत्रे विविध खोक्यांत घालणे आणि पाहुणे जाणार नाहीत अशा खोलीत ठेवणे. कपडे हँगरला लावणे. व्हॅक्युमिंग करणे.
शनिवार संध्याकाळ : पाहुणे यायच्या क्षणी घर म्युजियम सारखं ठेवणे. येणारे पाहुणे हे मानवयोनीतले असल्याने ते यथावकाश विसावतात. खातात पितात, गप्पा हाणतात. त्यांची नि आमची मुलं मिळून गोंधळ घालतात. (मुलांची जमात "पाहुणे जाणे अपेक्षित नाही त्या" खोलीत कधीकधी जाते. तिथे रचून ठेवलेली खोकी पाहून एका पोराने "हे काय्ये" असा नको तो प्रश्न विचारला. तेव्हा आमच्या चिरंजीवांनी "गेस्ट येतात तेव्हा आम्ही इथे सगळं ठेवतो" असं राजा हरिश्चंद्री उत्तर दिलं.)
शनिवार रात्री घराची स्थिती : साधारणपणे शुक्रवार रात्रीसारखीच. फक्त लाँड्री केलेली आहे. घरातल्या पसार्याचं स्वरूप सर्कशीचे तंबू उठल्यावर राहिलेल्या मैदानासारखे.
रविवार सकाळ : हक्काने झोपायचा वार. सर्व जण भरपूर उशीरा उठतात. उठल्यावर "सर्कशीचे तंबू उठल्यावर राहिलेल्या मैदाना"मधे येऊन चहा कॉफी. मैदानामधला कचरा उचलणे. "पाहुणे जाणे अपेक्षित नाही त्या" खोलीतून" खोके आणून ठेवणे. जमेल तसतशी कागदपत्रे त्या खोक्यातून उचकटणे. पुस्तके इत्यादि गोष्टी वाचणे. डिव्हीड्या पाहाणे. बिले भरणे. रविवार आळसात काढणे.
रविवार रात्री घराची स्थिती : साधारणपणे शुक्रवारशनिवार रात्रीसारखीच. हळुहळू कचरा जमायला प्राथमिक स्टेजची सुरवात झालेली आहे. पण या कचर्याचं निवारण इतक्यात होईलच असं नाही. लाँड्रीदेखील थोडी जमा होते आहे. एकच डिपार्टमेंट काहीसं सुव्यवस्थित आहे. मुलांची दुसर्या दिवशीची दप्तरं. कारण ती न आवरणं म्हणजे सोमवार सकाळ नावाच्या भयाण वेळी शोधाशोध आणि रडारड आणि आदळआपट यांना आमंत्रण देणें हे होय.
येथपासून शुक्रवार संध्याकाळपर्यंत हळुहळू जमत जाणारा पसारा यांचे साक्षीदार बनणे. शुक्रवारी संध्याकाळी मुलाचा प्रश्न : "Are we going out tomorrow some place or is anyone visiting us ?" याचे उतर म्हणजे दुसरा पर्याय असल्यास तो निमूटपणे "आपला खोका" भरायला सिद्ध होतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
भारिच
अगदि चित्रदर्शी!
वार्ताहर धावतं वर्णन करतो तसच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाने