समग्र समाज कधी बघणार ?
समग्र समाज कधी बघणार ?
विसाव्या शतकातील एक जगमान्य महापुरुष , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती . समग्र आंबेडकरी जनतेची दसरा दिवाळी ! उद्यापासून महाराष्ट्रात ठीकठिकाणी भिमोत्सव साजरे होणार. हा संपूर्ण एप्रिल महिना म्हणजे आंबेडकरी विचारांच्या अस्मितेला सालाबाद प्रमाणे धार लावली जाण्याचा कालखंड. आंबेडकर जयंतीला आंबेडकरी जनतेत अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते असायलाच हवे . समाजक्रांतीचे विराट तत्वज्ञान मांडणारी ताकद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर .दलित मुक्तीलढ्यास आरंभ करून भारतातील दलित अस्पृशांची अस्मिता जागवली ती डॉ . आंबेडकरांनीच . आज थोडेफार प्रगत असलेले आंबेडकरी विचाराचे परंतु असंख्य गटा तटात विभागलेले लोक देखील उद्याच्या दिवसापुरता वेगळा जयभीम घालत नाही .फक्त उद्याच्या दिवसापुरता ! आंबेडकरी जनतेची दखल घ्यायलाच हवी हा विचार इथल्या सर्व बिगर आंबेडकरी , राजकीय बिगरराजकीय , सामाजिक बिगरसामाजिक साहित्यिक बिगरसाहित्यिक, आणि अजून बऱ्याच समूह गटांना करण्यास भाग पडणारा दिवस म्हणजे उद्याचा दिवस . मग काल का तसा विचार का केला जात नाही ? परवा तेरवा काय होते ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्या करिता आवश्यक चिंतन आंबेडकरी समाजाने करणे अत्यंत गरजेचे आहे .
बाबासाहेबांचे स्मरण करणे , त्यांच्या प्रती कृतज्ञता , प्रेम व्यक्त करणे म्हणजे , केवळ उद्या नवे कपडे घालून पुतळ्यावर जाऊन हार घालून येणे नाही . वा नरड्याच्या नसा ताणून भाषणबाजी करणे नाही.
बाबासाहेबांच्या विचारांचे बळ घेऊन जगण्याचा संकल्प करणे , तो काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी राबणे हे बाबासाहेबांचे खरे स्मरण ठरेल .वर्णद्वेष वर्गद्वेष जातीय अहंकार इत्यादी कुरुपे कापून काढून बाबासाहेबांच्या विचारांवर नीटस पाऊले टाकणे हे खरे स्मरण असेल . दुर्दैवाने शिक्षित आंबेडकरी समाजाकडून , तरुणांकडून आज काय होतेय ? एक भयानक जातीयवाद आंबेडकरी तरुणांकडून पोसला जातोय . तो अत्यंत घातक आहे . परिवर्तनाच्या लढाईमध्ये आवश्यक असणाऱ्या समविचारी , इतर जातीय तरुण विचारवंतांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर लोटण्याचे कुकर्म या नव्या जातीय अहंकारातून आंबेडकरी तरुण करत आहे. आंबेडकरांनी इथल्या सनातनी इतिहासा बरोबर जी झुंज दिली आणि यश खेचून आणले . त्या कडव्या झुंजीत बाबासाहेबांच्या बरोबर असणाऱ्या लोकात फक्त , बाबासाहेबांच्याच समाजाचे लोक होते काय ? चित्रे , लेले , चिटणीस , शास्त्री , सहस्रबुद्धे , ही सगळी सोबत असलेली माणसे ब्राह्मण जातीची होती . बाबासाहेबांनी यांच्या जातीचा द्वेष केला नाही. त्या जातीत असणाऱ्या , काही लोक बाळगणाऱ्या त्या वाईट वृतीचा त्यांनी द्वेष केला . वाईट वृत्ती विरहीत समविचारी माणूस तो कोणत्याही जातीचा असो तो आपला मैत्र असायला हवा . आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्यांच्या लढ्यात कित्येक सवर्णांनी साथ दिल्याचे आपल्याला दिसते. आजचा आपला तरुण सरसकट जात बडवताना जास्त दिसतो . सामाजिक स्वरूपाचा कुठलाही विषय असो , भट बामन उल्लेख करून जात चेचल्याशिवाय आपण आंबेडकरी असल्याचा फिलच आजच्या तरुणांना येत नाही . शिवराळ आक्रमकतेतून तुफान जातीय हल्ले केले जातात . परंतु प्रत्यक्ष प्रवृत्तीवर सक्रीय आघात करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्याची कढी पातळ होते . हे निखालस कटू वास्तव जागजागी पाहायला मिळते .
थेट आणि प्रत्यक्ष लढ्यात शिक्षित तरुणाचा वाटा अत्यंत अल्प आहे . सोशल मिडियाच्या उपलब्धतेमुळे शहरी तरुण अधिक सशक्त पाने व्यक्त होताना दिसून येतो . पण तो जे काही व्यक्त होतोय , ते कौतुकास्पद न ठरता चिंतनीय ठरते आहे.आंबेडकरी तरुणांच्या डोळ्यावर चष्मा आंबेडकरी विचारांचाच असायला हवा हे हजार टक्के मान्य ! पण त्या चष्म्यातून त्यांनी आंबेडकरी समजा बरोबरच समग्र समाज पाह्यला , अनुभवायला हवा मांडायला हवा . परखड आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आज आंबेडकरी तरुणाला आहे . पेपरमधल्या वधूवर विषयक जाहिरातीत , एस सी , एस टी क्षमस्व ची खिल्ली उडवताना , आपण धर्मांतरित . मातंग , चांभार , वा भटके यांच्या मुली कितपत स्वीकारल्या आहेत ? आजही लाडवन गोडवन , सोमवंशी , सूर्यवंशी ची थेरं आंबेडकरी लग्नसराईत थैमान घालताना दिसतातच .नव साहित्यिक , नव कलावंतांची तर बातच न्यारी . सूर्य नारायण आयुष्यात दोनदा भिला हे आपण जाणतो , सकाळचा नाष्टा म्हणून मारुती लाल फळ समजून सूर्याला गिळायला गेला त्यावेळेस आणि नंतर काय ते राहू केतू शनी साडेसाती ग्रहण वगैरे या म्याटर मध्ये .नंतर बरेच दिवस तो कशाला भ्याल्याचे ऐकिवात न्हवते . पण हल्ली मात्र तो नवीन दलित कवींना चळाचळा कापू लागल्याचे ऐकून आहोत . हर कवितेत त्याला गिळले , गाडले , जाण्याची धमकी सोसावी लागतेय . कवी लोकांनी पार वाट लावली त्याची ! आणि यातलेच कित्येक कवी त्यांना माहिती अधिकारात अर्ज करता का म्हटले कि सतीश शेट्टीचं उदाहरण देतात . नामदेव ढसाळ, दया पवार , राजा ढाले , अविनाश गायकवाड या कृतीशील कवींची लढाऊ परंपरा विसरून केवळ अनुकरणातून क्रांतीच्या नावचे पुळचट जहरी काव्य प्रसवत राहतात. अत्यंत दमदार दलित साहित्य प्रवाहामध्ये आंबेडकरी विचारांच्या नावे भयंकर काही हिणकस साहित्यात रुजू लागले आहे .
आज डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत पुढे जात , त्यांनी आयुष्यभर जे विचार मांडले , जे विचार मातीतून माणूस घडवायला कारणीभूत ठरले ते विचारधन नव्यानं दमदार संकल्प करून जोपासण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. बाबासाहेब केवळ भावनेतून स्वीकारणे आजच्या काळात अत्यंत लटके आणि तात्पुरते बळ देणारे असेल . इथल्या प्रस्थापित समाज , राज्यकर्त्या समूहाशी लढताना नितांत गरज आहे ती बाबासाहेबांच्या सर्वकश विचारांच्या अभ्यासाची , त्यांच्या सर्व जाती समूहांकडे बघण्याच्या अभ्यासू दृष्टीकोनाची. बाबासाहेबांनी मी तीन गुरु केले असे म्हटले . भगवान बुद्ध , संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले..या तिन्ही गुरूंनी त्यांची वैचारिक जडणघडण केली . यांच्या कुणाच्याही विचारात जातीपेक्षा प्रवृत्तीवर हल्ला हे सूत्र आपल्याला आढळते ,हेच नेमके लक्षात घेवून प्रवृत्ती चेचायला हव्यात . बाबासाहेब समविचारी सहकारी ब्राह्मण समाजचे , मराठा समाजचे मैत्र राखून देखील कडवट व अजिबातच तडजोड नसलेली झुंज देत होते . ‘भाला’कार भोपटकर आणि बहिष्कृत भारतकार आंबेडकर यांच्यातला वाग्युधाचा रंग आपण पहिला तर बाबासाहेब जशास तसे ठोशास ठोसा हे धोरण अगदी समर्थपणे वापरत होते हे लक्षात येते . “अस्पृश्यांनी देवळात शिरण्याचा अविचार केल्यास त्यांच्या पाठी सडकल्या जाण्याचा संभव आहे” ही धमकी दिल्याबरोबर बाबासाहेब कडक उत्तर देताना म्हणतात , “आमच्या पाठी सडकण्याची धमकी देणाऱ्यांची प्रसंग पडल्यास टाळकी शेकण्यास आम्ही कमी करणार नाही.” या धोरणाने बाबासाहेबांनी पर जातीतील चांगले लोक स्वीकारले आणि वाईटांना सडकले . बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील हे सहज शक्य आहे .
परिवर्तनाची ,क्रांतीची सामाजिक लढाई हा फक्त आपलाच , आपल्याच जातीचा ठेका नसून समाविष्ट होणाऱ्या सर्व परजातीतील समविचारी मित्रांना सामावून घेऊन . त्यांच्या प्रती जातीय अहंकार न बाळगता सामुदाईक लढा लढून जिंकणे ही आजची खरी गरज आहे . दलित समाजात जन्माला आलेल्या बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष ! भारतात लोकशाही यावी म्हणून त्यांनी आपले आयुष्य वेचले , विद्वत्ता पणाला लावली . दलित जातीजमातीत स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली . मानवाला खरा मानवी चेहरा देणारे सामाजिक तत्वज्ञान विषद केले . आणि म्हणूनच दलित समाजाचे म्हणून असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या आंबेडकरी तरुण विचारवंतांवर इतरांपेक्षा मणभर जास्त जबाबदारी आहे ती बाबासाहेबांचे क्रांतिकारी तत्वज्ञान काटेकोरपणे पाळण्याची. आणि त्यांनी ती समर्थपणे पेलायला हवी . हे बाबासाहेबांचे खरे स्मरण , वंदन आणि त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ठरेल.
प्रा. सतीश वाघमारे
दैनिक दिव्य मराठी . दि. १३/४/२०१४
आत्मपरिक्षण
सदर प्रतिसादात खोब्रागडे यांचा उल्लेख होता. प्रा. सतिश यांनि खोब्रागडे प्रकरणात काहिच मत व्यक्त केलेले नसल्याने या प्रतिसादातिल आत्मपरिक्षणाचा अनाहुत सल्ला खरोखर निरर्थक होता. श्रेणिदात्यांनि हि चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
समयोचित लिखाण. सूर्याला
समयोचित लिखाण. सूर्याला गिळण्याची, विझवण्याची, गाडण्याची नुसती भाषा वापरून प्रत्यक्षात काही न करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
दलित चळवळ सुरू झाली ती अर्थातच जातिनिहाय अन्याय थांबवण्यासाठी. रोटीबेटीचे व्यवहार होत नाहीत ही परिस्थिती होतीच. पण यापेक्षाही कठोर वास्तव म्हणजे शिक्षण, अन्न, पाणी, नोकऱ्या आणि आत्मसन्मान मिळत नाही ही होती. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेतून याबाबत कठोर कायदे केल्यामुळे गेल्या साठेक वर्षांत हे बदललं आहे.
माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रगतीमुळे दलितांचे सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले का? म्हणजे खरोखरच सूर्य गिळण्याची गरज आता शिल्लक राहिली नाही, कारण दलितांच्या खिडकीतूनही त्याचे किरण येत आहेत, म्हणून केवळ भाषेत, कवितांत ते उल्लेख शिल्लक आहेत का? आपल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची स्फुरणदायी आठवण म्हणून या कविता येतात का - कोणीही मावळे शिल्लक नसताना पोवाडे ऐकायला बरं वाटावं तसं?
वरच्या लेखनातून कुठेही 'ह्यॅं आता काय तक्रार करायला जागा शिल्लक आहे?' असं ट्रिव्हियलायझेशन करायचं नाहीये. खरोखरच 'या चळवळीने काही मिळवलं, काही अजून बाकी आहे. ते मिळवण्यासाठी पुढची दिशा काय बरं असावी?' असा प्रश्न विचारायचा आहे.
छान लिहिलं आहे. लेख आवडला आणि
छान लिहिलं आहे. लेख आवडला आणि पटला !
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
...
आत्मपरीक्षण आवडले. (समजले, असे म्हणू शकेनच, असे नाही, पण प्रयत्न आवडला, त्यामागील जाणवणारा प्रामाणिकपणा, कळकळ भावली.)
--------------------------------------------------------------------------------------------------------------
काही बारीक मुद्दे (बहुतांशी अवांतर):
अधोरेखित आडनावे ब्राह्मणी नसावीत. (पैकी पहिले निश्चितच नाही. दुसरे बहुधा नसावे.)
(ही माहिती फॉर-व्हॉटेवर-इट-ईज़-वर्थ तत्त्वावर, केवळ तांत्रिक अचूकतेकरिता पुरवीत आहे. अन्यथा, ही मंडळी ब्राह्मण असण्यानसण्याशी - किंवा त्याविरुद्ध - मला व्यक्तिशः काहीही घेणेदेणे नाही.)
गरज काय?
सामाजिक समतेकरिता महाराने मातंगाच्या - सोडा, चित्पावनाने कर्हाड्याच्या - मुली स्वीकारल्याच पाहिजेत, याची मुळात गरज काय? (औचित्याचा प्रश्न फार पुढचा झाला.)
'एस सी, एस टी क्षमस्व'मध्ये काय, किंवा नवबौद्धाने विवाहाकरिता चांभाराच्या मुलींना प्राधान्य न देण्यामध्ये काय, मला किमानपक्षी खिल्ली उडविण्यालायक तरी काही आढळत नाही.
उद्या समजा समलिंगी विवाहांना भारतात कायद्याने मान्यता मिळाली (जी, बायदवे, मिळावी अशा मताचा मी आहे), तर मग त्यापुढे पेपरांतल्या 'वर पाहिजे' आणि 'वधू पाहिजे' अशा दोन स्वतंत्र कॉलमांचे उच्चाटन होऊन 'जोडीदार पाहिजे' असा एकच समाईक, लिंगनिरपेक्ष कॉलम येण्याचा अट्टाहास असावा काय? नि अशा कॉलमांतून जाहिराती देणार्यांनी लिंगनिरपेक्षतः सर्वच उमेदवारांचा विचार करावा, अन्यथा ते खिल्ली उडविण्यास पात्र आहेत, असे मानावे काय?
(समलिंगी विवाहांना मान्यता जरी मिळाली, तरी सध्याच्या कॉलमपद्धतीत समलिंगी जोडीदाराकरिता जाहिरात देण्याची कोणतीही तरतूद किमानपक्षी भारतात तरी नाही, ही समस्या आहे खरी. आणि, सध्याच्या भारतीय समाजव्यवस्थेत समलैंगिकांवर अन्याय होतो, हेदेखील स्वतंत्रपणे मान्य. पण म्हणून सगळ्यांकडून एककॉलमपद्धतीस स्वीकृतीची अपेक्षा करून आणि हे शासन जो न मानी तेहास खिल्लीपात्र ठरवून यांपैकी नेमक्या कोणत्या समस्येचे निराकरण होते, नि नेमका कोणाचा - अंशतःसुद्धा - फायदा होतो? पैकी, पहिल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सध्याच्या द्विकॉलमपद्धतीचे उच्चाटन करून त्याजागी एककॉलमपद्धती प्रस्थापित करण्यापेक्षा, किमानपक्षी चतुष्कॉलमपद्धती - म्यान सीकिंग वूमन, वूमन सीकिंग म्यान, म्यान सीकिंग म्यान आणि वूमन सीकिंग वूमन; जो/जी जे वांच्छील तो/ती ते वरो! - प्रस्थापित करणे अधिक फायद्याचे नाही काय? आणि, दुसर्या समस्येबद्दल बोलायचे तर, सर्वांवर एककॉलमपद्धती लादल्याने - आणि ती न मानणार्यांची खिल्ली उडविल्याने - समलैंगिकाची समाजातील स्वीकृती नेमकी कशी वाढणार आहे? त्याकरिता उपायांची आवश्यकता आहे, हे कबूल करूनसुद्धा, हा उपाय नेमका कसा काय होऊ शकतो? त्याकरिता अन्य काही उपाय शोधला पाहिजे.)
उलटपक्षी, दुसर्या बाजूने विचार केल्यास, चांभाराच्या मुली नवबौद्ध मुलाशी (किंवा कर्हाड्याच्या मुली चित्पावनाच्या मुलाशी) विवाह करण्यास उत्सुक (आणि/किंवा डेस्परेट) असतात, या गृहीतकास तरी आधार नेमका काय?
एक किंचित दुरुस्ती, कदाचित अतिअवांतर. त्या मुंगी आकाशात उडाल्याच्या भानगडीतसुद्धा सूर्य कदाचित घाबरला असावा, असे मानण्यास जागा आहे. असो.
.
समलैंगिक असणं किंवा नसणं या गोष्टी व्यक्तीला (किंवा शरीराला) जन्मतः असतात. (काही काळानंतर लक्षात येतात.) जात ही गोष्टही जन्मतः मिळाली तरी तिला काही शारीरिक, वैज्ञानिक आधार नाही.
लेख आवडला. या लेखातही सूर्य गिळायची भाषा नाही. पण ही चांगली गोष्टच आहे. त्याबद्दल घासकडवींच्या प्रतिसादाशी सहमती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हं... असो.
बादवे, माझ्या डोक्यात वायरी आहेत म्हणून नक्की कोणी सांगितले तुम्हाला?
शब्दच्छल
थोडी दुरुस्ती सुचवतो - शब्दच्छल म्हणा हवे तर...
<थेट आणि प्रत्यक्ष लढ्यात शिक्षित तरुणाचा वाटा अत्यंत अल्प आहे . सोशल मिडियाच्या उपलब्धतेमुळे शहरी तरुण अधिक सशक्त पाने व्यक्त होताना दिसून येतो . पण तो जे काही व्यक्त होतोय , ते कौतुकास्पद न ठरता चिंतनीय ठरते आहे. >
चिंतनीय नाही, चिन्ताजनक. चिन्तनीय म्हणजे ज्याच्यावर विचार आणि मनन व्हावे अशा योग्यतेचे.
असहमत / सहमत
आपण मांडलेला मुद्दा चिंतनीय नसून शब्दच्छल (म्हणण्यासारखा) आहे, या म्हणण्याशी असहमत.
(आपण मांडलेल्या) मुद्द्याशी / सुचविलेल्या दुरुस्तीशी सहमत.
उत्तम लेखन. एक तक्रारः गेले
उत्तम लेखन.
एक तक्रारः गेले काही लेख इथे लिहिल्यावर त्याच्या प्रतिक्रियांना कोणताही प्रतिसाद न देता तुम्ही पुढिल लेख टाकताय. त्यामुळे काही खंडन जरी करायचे असते (या लेखात तसे फारसे काही नाही, तरी) हुरूप जातो. लेखन टाकण्याबरोबर त्यावर होणार्या चर्चेत सहभाग वाढवावा ही विनंती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
लेख आवडला.
ऋषिकेशच्या तक्रारीशीही सहमत.
लेख फार आवडला. उचल तळपती
लेख फार आवडला. उचल तळपती लेखणी, कर एखाद्या उच्चवर्णीय जातीवर प्रहार आणि तेवढ्याच भांडवलावर ठर पुरोगामी, या स्ट्रेटेजीचा तिटकारा आला होता. त्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचून सुखद धक्का बसला.
ऋषिकेशच्या सूचनेला दुजोरा आणि राजेशच्या प्रश्नालाही. त्यावर इथे अजून लिहिलंत, तर वाचायला खचित आवडेल.
बाकी, सूर्याबद्दलचं निरीक्षण जबराट आहे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ऋषिकेशच्या तक्रारीशी सहमत.
ऋषिकेशच्या तक्रारीशी सहमत.
दलितांनीच त्यांचे दलित असणे
दलितांनीच त्यांचे दलित असणे सोडावयास पाहीजे. तेच होताना दिसत नाही. स्वताची उन्नती घडवुन आणण्यापेक्षा दुसर्यांन्ना खाली ओढुन आपल्या बरोबर आणण्यानी कोणाचीच प्रगती होणार नाही.
सूर्य नारायण आयुष्यात दोनदा
हे काय प्रकर्ण आहे? हा संदर्भ कळला नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लेखाजोखा?
ह्या लेखावर सकारात्मक प्रतिक्रीया देणे म्हणजे - "आम्ही हेच तर सांगत होतो" असे म्ह्णणे ठरेल काय?, दलितांची (किमान अॅव्हरेज) सामाजिक/साहित्यिक परिस्थिती काय आहे हे किती लोकांना ठावूक आहे, नसल्यास फक्त आत्मपरिक्षण करण्यास सांगणे हे नेहमीच उत्तम ह्या धर्तीवर ह्या लेखावर प्रतिक्रीया देणे योग्य आहे काय?
छान लेख
लेख आवडला.
सेन्सिबल लिखाण.
सेन्सिबल लिखाण.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
उत्तम विचार आणि लिखाण.
उत्तम विचार आणि लिखाण.
लेख आवडला. प्रांत भाषा जात
लेख आवडला. प्रांत भाषा जात वर्ग वर्ण इ अस्मिता या इतिहासाच्या पाउलखुणा आहेत. पण किती काळ इतिहासात अडकून पडायच? या अस्मिताच राष्ट्रिय ऐक्याला मारक ठरत आहेत. जातीयता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे परिणामकारक भुमिका बजावतील. जातीअंताचा लढा हा दीर्घकाळ चालणारी प्रबोधन प्रक्रिया आहे. द्वेषमूलक लिखाण बोथट होत जाणे हे देखील या लढ्यातील विधायक दिशेने जाण्यासारखेच आहे
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/