बखर राघोभरारीची
राजमान्य राजश्री भीमप्रतापी पूजापती बल्लवसम्राट श्री राघोभरारी यांचे दरबारची बखर, दफ्तर क्र. ५२१.
हितशत्रू चहू ओर फैलावले आहेत ऐसी खबर राघोभरारींचे खास हेरा ऐयारांकडून गेले कितिएक दिवस येत होती. राणी विडिंबाबाईबद्दलही वावडिया उडविणारे काही कमी नोहते. राघोभरारींस चिंतेन वेढले होते. मात्र एके दिनी खबर आली ती ऐकोन राघोभरारींची आग तळपायापासोन मस्तकास गेली. खुद्द दरबारांतील मानकऱ्यांत फितोरी होती. शत्रूचा हस्त अस्तनीतच घुसोन निखारा बनोन राहीला होता. हात जळावा पण अंगार कोठोन येतो हे न समजावे, ना तो झटकोन टाकता यावा.
खबर ऐकिताच राघोभरारींनी खवचट खान गारदी यांस संतप्तपणे, 'जैसे ऐसाल तैसे, त्वरेने या.' असा धारदार हुकूमनामा धाडला. अंमलबजावणीसाठी हुजऱ्याबरोबर सात स्वार नागव्या तरवारी घेऊन धाडले. खान तेसमई आपल्या अंतःपुरी काही खाजगीत संभाषण करण्यात मग्न होता. पण ती चर्चा पुरी करण्यास समय न देता स्वारांनी येण्याची जबरी केली. गारदीयास अर्धवस्त्रावस्थेत राघोभरारींसमोर उभे केले. अस्वस्थ वाघराप्रमाणे फेऱ्या घालणारे राघोभरारी खानावर तुटोन पडले. ढगांचा गडगडाट होवोन बिजली कोसळावी त्याप्रमाणे त्यांचे शब्द गारदीयावर आदळले. नीच, हरामखोर अशा शब्दांनी फितोराची निर्भत्सना करोन त्यांनी खानाची सरदारकीची वस्त्रे काढोन घेण्याचा हुकूम फर्मावला. ते वेळी गारदीयाच्या अंगावर फारशी वस्त्रे नसल्याने प्रत्यक्ष वस्त्रे अर्पण करण्याची मानहानी पत्करावी लागली नाही. मात्र खानास राघोजींचे शब्द उघड्या अंगावर गांधीलाच्या डसण्यापरी बोचले. मनी राघोजीचा काटा काढण्याचे कारस्थान रचोन तो लागलीच विडिंबादेवीच्या राज्याकडे रवाना होता झाला.
खवचटाने ऐसी फितोरी का करावी हा प्रश्न जेव्हा हाय खालेल्या राघोंच्या दरबारी चर्चिला गेला तेव्हा काही मुद्दे निघाले. खानाने सुरूवातीपासोन आपले रंग दाखवले होते हे ध्यानात आले. राज्यात नागरिकांची भरती व्हावी यासाठी खवचट खानाने आपले खिसे गबर करणारी एक योजना मांडलेली होती. भोळ्या रयतेने आपल्या नोंदणीसाठी अनेक मोहरा खानाकडे सुपूर्त केल्या होत्या. ते धन लाटून त्यातून त्याने दूरदेशांतून वधू आणून विकण्याचा धंदा सुरू केला हेही नोंदले गेले. पलंगावरची चित्रे दाखवण्यास बोलावून लोकांच्या आंबटशौकाची चेष्टा करणेची कृतीही आठवली. खानाने सडके विडंबकांदे फेकण्यात तरबेजी मिळविण्याचे हे सबूत दिसत असोनही खानाच्या गोड बोलण्यास फसोन राघोंनी या सगळ्याकडे काणाडोळा केला. तेच त्यांस भोवले. आपल्या उदार अंतकरणाने खानास मोकळे सोडले, हे नंतर भोवले.
प्रत्यक्ष राघोजींचेच राज्य यवनांच्या घशात घालण्याचा खानाचा डाव उधळोन गेला खरा, पण तेवढ्याने हार खाईल तर तो खवचट खान कसला. संपूर्ण विडंबक्षेत्रावर आपला अधिकार गाजवण्याचा त्याचा मनसूबा कायम होता. त्याने यवनांकडे 'त्वरेने विडिंबादेवीवर हल्ला करावा' असा निरोप घेऊन सांडणीस्वार धाडिले. आपली फितोरी विडिंबादेवीस माहित नसल्याचा फायदा घेऊन तिचे राज्यी जावोन राघोजींचा सेनापती असल्याची बतावणी करोन सैन्य ताबियात घेतले. अशा रीतीने दुर्बल झालेल्या राज्यात गनिमांस मुक्तद्वार न मिळाले तोच नवल. विडिंबादेवीस कैद करोनि तिच्या नावे स्वताचे राज्य चालवण्यात यश संपादन केले. तिला* मुक्त करण्यास आलेल्या राघोजीच्या सैन्याची शिकस्त व्यर्थ जाहली.
या सरवावरी कळस म्हणजे कांदोजी सोलकर असे खोटेच नाव घेओन स्वताचा बडेजाव करणारी बखर लिहोन इतिहासच बदलला. यवनांशी साटेलोटे साधोन राघोंचा पराभव साधला म्हणोन त्यास साट्यालोट्याची शिकस्त असे नाव पडले होते. तेही खानाने सोयीने बदलले. ही दरबारची बखर सत्य सरवांसमोर आणेल ही आशा.
टीप: अशी गद्दारी इतिहासात इतरत्र केवळ त्र्यंबकजी डेंगळ्याचीच दिसते.
प्रतिक्रिया
खीक्कन
राघोभरारी इतके दिवस आपली तलवार परजत होते तर!
खीक्कन हसल्या गेले आहे, अजून थोडी मेहनत घेतली असती तर लोळल्याही गेले असते असे वाटते
तलवार
बखर लिहिताना लिहिला गेलेला काही असभ्य मजकूर कापावा की ठेवावा या संभ्रमात होतो. शेवटी काढूनच टाकला. धारदार तलवारीने काय कापलं जाईल सांगता येत नाही...
शिवाय भारताच्या प्रगतीचा आढाव्याच्या रीव्ह्यू मीटिंगा, रीसर्च वगैरे चालू होता ते वेगळंच...
मग ठीक्कै
मग ठीक्कै. भारताच्या प्रगतीच्या आड आम्ही येऊ इच्छित नाही.
तेवढी तलवार म्यान करताना संभाळा बर्का!
प्रगती
अहो, आड येणं वगैरे काही नाही. व्हायची ती प्रगती झालीच आहे. आम्ही फक्त आढावा घेतो आहोत.
अर्रर्रर्र.... तलवार म्यान करताना तुम्ही शेजारी आहात हे लक्षातच आलं नाही. फार इजा झाली का?
तरीच!
मधली काही पानं गायब आहेत असं वाटलं!
बखर वाचली पण नक्की कुणाची बखर
बखर वाचली
पण नक्की कुणाची बखर खरी आहे याचा गोँधळ उडाल्यामुळे खरा ईतिहास शोधण्यासाठी आधुनिक इतिहासाचार्य पुरुषोत्तम खेडेकर यांची समिती नेमावी असा प्रस्ताव मांडत आहे
.
भाषाशैली जमलीय
भाषाशैली जमलीय
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
पूजापती आणि बल्लवसम्राट ही
पूजापती आणि बल्लवसम्राट ही विशेषणे यथार्थ आहेत पण भीमप्रतापी का म्हणे? एक तो बल्लवाचार्य भीम म्हणे दिसायलाही सुंदर होता; पण कलियुगातल्या राघोभरारींच्या भीमप्रतापी असण्याबद्दल आजकाल इतिहासाभ्यासकांमधे दुमत आहे म्हणे!
जेतेच इतिहास लिहीतात त्यामुळे आता खुद्द विडींबादेवींनी लिहीलेली बखरच वाचण्याशिवाय गत्यंतर नाही.
अवांतरः बखर वाचताना अनेकदा डोळे कोरडे करावे लागले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ह्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!