चुकवू नये अशी - कहानी
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका दमट दुपारी ती दारातून बाहेर पडते - विद्या वेंकटेशन-बाग्ची; सहा-सात महिन्यांची पोटुशी, चालताना दम लागणारी. टॅक्सीचालकांचा गराडा तिच्याभोवती पडतो. त्यातला एक जण चलाखीने तिच्या बॅगचा ताबा घेतो आणि तिला आपल्या टॅक्सीत बसवतो. बहुतेक लोक घराचा किंवा हॉटेलचा पत्ता सांगतात, पण चालकाला आश्चर्य वाटते कारण तिला जायचं असतं कालीघाट पोलीसचौकीत.
पोलीसचौकीत ती तक्रार नोंदवते. तिचा नवरा - अर्णब बाग्ची - लंडनहून दोन महिन्यांपुर्वी नॅशनल डेटा सेंटरमध्ये असाईंनमेंटवर आलेला असताना अचानक गायब झालेला आहे; तिच्याकडे त्यांच्या लग्नात काढलेला त्याचा एकमेव फोटो आहे. त्याला फोटो काढणे आवडत नाही असं ती सांगते. कोलकात्यात तो राहात असलेल्या गेस्टहाऊसचा पत्ताही तिच्याकडे आहे. नवरा हरवल्याने ती रडकुंडीला आली असली तरी ती एक सुशिक्षित आणि आत्मविश्वास असलेली स्त्री आहे.
चौकीत एक नवा पोलीस वारंवार एरर मेसेज देणार्या कॉम्प्युटरशी झटापट करतोय. 'बिद्दा' बाग्ची स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने इंन्स्पेक्टरच्या विनंतीवरून झटकन दुरुस्ती करते. FIRवर सही करायला म्हणून खुर्चीतून उठताना मात्र तिला अचानक चक्कर येते. तिची अवस्था पाहून इन्स्पेक्टर त्या नवोदिताला - सात्योकी सिन्हा ऊर्फ राणाला - तिला सोडून यायला सांगतो.
अर्णब बाग्चीने तो जिथे राहतोय असं सांगितलेलं असतं ते गेस्टहाऊस. एकदम बकाल. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेलं. गेस्टहाऊसचा मालक म्हणतो अर्णब बाग्ची नावाचा माणूस कधी तिथे राहिलाच नाही. विद्या मात्र नवर्याने सांगितलेल्या गेस्टहाऊसच्या आतल्या खाणाखुणा बरोबर सांगते. अर्णब बाग्ची तिथे राहायला नव्हता यावर व्यवस्थापक ठाम .सगळेच गोंधळलेले. विद्या आपल्या नवर्याच्याच खोलीत म्हणजे रूम नंबर १५ मध्ये राहायचा निर्णय घेते.
दुसर्या दिवशी विद्या नॅशनल डेटा सेंटरमध्ये जाऊन तिथल्या एचआर मॅनेजरला - अॅग्नेस डिमेलोला - भेटते. अर्णब बाग्ची नावाचा कोणीही इसम तिथे कामाला नव्हता हे सांगून अॅग्नेस विद्याला धक्का देते. विद्या तिला परोपरीने सांगायचा प्रयत्न करते. अॅग्नेस ठाम. विद्या तिला फोटो दाखवते. तरीही अॅग्नेस आपल्या म्हणण्यावर ठाम. विद्या निराशेने तिथून बाहेर पडते.
राणा तिला भेटून सांगतो की त्यांनी तिने सांगितलेल्या तारखांचे सगळे इमिग्रेशन रेकॉर्डस तपासले पण अर्णब बाग्ची नावाचा कोणीही माणूस त्या दिवशी इंग्लंडहून निघाला नाही आणि भारतातही आला नाही. अर्णब बाग्ची नावाचा माणूस मुळात अस्तित्वात आहे की नाही इथवर शंका व्यक्त केली जाते.
ती राणाला घेऊन अर्णब ज्या गावात शिकला त्या ठाकूरपुकुरलाही घेऊन जाते. तिथल्या शाळेतही अर्णब बाग्ची नावाचा कोणीही विद्यार्थी सापडत नाही. त्याच्या काकांच्या पत्यावर राहणार्या जोडप्याने अर्णब बाग्ची हे नाव ऐकलेलेच नसते.
पुढे काय होते? विद्याला तिचा नवरा मिळतो का? अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही? ती एकटी या सगळ्याला कशी तोंड देते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 'कहानी' प्रत्यक्ष पडद्यावर पाहून मिळवणे हेच श्रेयस्कर.
सुजोय घोष आणि कुशल गाडा यांनी निर्मिलेला आणि सुजोय घोष यांनी दिग्दर्शित केलेला कहानी हा चित्रपट दोन-अडीच तास प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवतो आणि संपल्यावरही तास-दोन तास त्याबद्दल विचार करण्यास भाग पाडतो.
कथा, पटकथा, छायाचित्रण आणि दिग्दर्शन या सर्वच बाबतीत चित्रपट अत्यंत उच्च दर्जा गाठतो आणि एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे सुख नक्कीच मिळवून देतो.
कोणत्याही प्रकारचा भडक हिंसाचार, हायटेक गॅजेट्स, गाड्यांचा पाठलाग किंवा गाड्या स्फोटाने उडणे वगैरे सवंग प्रकार नसूनही आणि संपूर्ण भारतीय वातावरणातला असूनही 'थ्रिल' म्हणजे काय याचे प्रत्यंतर हा चित्रपट देतो.
कोलकाता शहरातली गर्दी, दुर्गापूजेचा माहौल आणि एकंदरीतच बंगाली संस्कृती याचा खुबीने वापर करून पटकथाकार, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाने या चित्रपटात अप्रतिम रंग भरले आहेत.
चित्रपटाची पात्रनिवडही अगदी चपखल आहे. विद्या बालन सोडल्यास कोणीही खूप प्रसिद्ध म्हणता येईल असा कलाकार नाही पण सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. विद्या बागचीचे मध्यवर्ती पात्र अर्थातच विद्या बालनने निभावले आहे आणि ती विद्या बालन आहे हे प्रेक्षक विसरून जाईल इतक्या सहजतेने आणि चपखलपणे तिने अभिनय केला आहे. चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूला बदलणारे स्वरुपही तिने उत्कृष्टपणे आणि विश्वसनीयरीत्या दाखवले आहे.
अर्थात हा चित्रपट विद्या बालनचा म्हणून ओळखला गेला तरी पटकथा आणि दिग्दर्शनाचा हात त्यात नक्कीच जास्त आहे.
बॉलीवूडमध्ये बनलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उत्कृष्ट थ्रिलर्समध्ये कहानीचा समावेश केला जाईल हे नक्की.
प्रतिक्रिया
असहमत. मात्र सिनेमातले
असहमत.
मात्र सिनेमातले कोलकाता शहर फार खरे आणि तरीही देखणे वाटते. तसाच विद्या बालन सोडून इतर लोकांचा अभिनय.
तेवढे सोडले तर सिनेमा हुलाहूल आहे. शेवटचा धक्का पाहून माझी चिडचिड झाली. व्यवस्थित पात्ररेखाटन करायचे नसल्यास दिग्दर्शकाकडे एक सोपा मार्ग असतो, तो म्हणजे ज्या पात्राच्या वागण्याची धड कारणमीमांसा करता येत नाही, त्याला मनोरुग्ण तरी दाखवायचे नाही तर छुपा पोलीस तरी. त्याच धाटणीचा सोप्पा शेवट वाटला.
प्रेक्षकांची फसवणूकच करू नये असे माझे म्हणणे नाही, पण ते तितकेसे हुशारीने केलेले वाटले नाही, इतकेच.
हिंदीत वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे हे खरे. पण तितपतच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पिच्चर आवडला
पिच्चर आवडला
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वा!
अमोल पालेकरचा भन्नाट "समांतर" पाहिल्यावर कोलकात्यात वसवलेल्या बिगर-बंगाली चित्रपटांची धास्तीच बसली होती. त्या आधी "युवा" पण अर्धवट पाहिला होता. आता हा पहायचे धाडस करते!
समांतर
समांतर विषयी सहमत. तरीही हा चित्रपट बघणार आहे.
अवांतरः सर्वसामान्यांना आवडणार्या गोष्टींना, चारचौघांनी शिफारस केलेलेल्या चित्रपटांना वगैरे सतत किरकोळीत काढत राहाणे हे उच्च अभिरुचीचे व्यवच्छेदक आहे काय?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
समांतर चा दुवा याच धाग्याकडे
समांतर चा दुवा याच धाग्याकडे पुन्हा आणतो. तुम्हाला वेगळा द्यायचा होता का?
दुवा
http://www.mr.upakram.org/node/2025
हा दुवा मला दुवायचा... सॉरी.... द्यायचा होता...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हाहाहा
समांतरचे परीक्षण आवडले. मला संगीतही फारसे आवडले नाही, त्यात शेवटी शेवटी गंगातीरी एक नावाडी मराठीत भाटीयाली म्हणतो, त्याने तर माझं डोकंच फिरलं. सिनेमा एरवी चांगला असता तर हा प्रयोगाची तेवढी चिडचिड झाली नसती, पण दोन तासाच्या डोकेदुखी नंतर ते फार म्हणजे फारच झालं.
बंगालित अलिकडे ऋतुपर्ण घोष असेच सिनेमे काढतो. त्याचे सुरुवातीचे काही सिनेमे मस्त होते - उनिषे एप्रिल, रेनकोट, बाडी़वाली, वगैरे. मग एकावर एक भन्नाट कथानक आणि पात्रं, आणि फक्त चकचकीत "एथ्निक" देखाव्यावर, इंटीरियर्स वर भर. समांतर पाहून असंच वाटलं - सबंध पिक्चर "फॅबइंडिया" सारख्या दुकानाची अखंड जाहिरात करतो. आणि मुद्दा कळला नसल्यास एक सीन शेवटी त्या दुकानातच घेतलाय!
असो. पालेकर मात्र म्हातारा झाल्यावर चांगला दिसतोय!
मस्त परिचय
मस्त परिचय. याच्या ट्रेलरपासूनच कुतूहल होतेच. आता नक्कीच पाहणार.
अजून एक म्हणजे इतर एक दोन ठिकाणी लोकांनी परीक्षण लिहीताना शेवट थोडासा उघड केलेला होता. येथे तसे न करता सुंदर माहिती दिलेली आहे. धन्यवाद!
वासरात लंगडी गाय शहाणी ह्या
वासरात लंगडी गाय शहाणी ह्या न्यायाने सिनेमा चांगला आहे म्हणायला हरकत नाही. चित्रीकरण छान जमलंय, परंतू शेवट बघून चिडचिड होऊ शकते, त्यासाठी तयार रहा.
सर्वात जास्तं आवडलं कोलकाता शहराचं दर्शन (म्हणजे रियालिस्टीक वाटलं), आणि बॅकग्राउंडमध्ये आलेली आरडींची गाणी!
वरच्या मेघना ह्यांच्या मताशी सहमत!
-अनामिक
कोलकाता शहराबद्दल बरंच काही
कोलकाता शहराबद्दल बरंच काही ऐकून होते. मोजून चार दिवस तिथे फिरल्यावर इथे अधूनमधून फिरायला यावं असं वाटलं. (पण रहायला आवडणार नाही.)
चित्रपटमात्र कधी बघायला मिळतो ते बघायचं. मिळाला की बघेनच. लंगडी गाय तर ती ही चालेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चांगला परिचय
विद्या बाग्ची नक्की कोण, तिचं पुढे काय होतं याची उत्सुकता वाढली. बघायला हवा.
मी सस्पेन्स चित्रपटांचे
मी सस्पेन्स चित्रपटांचे परिक्षण वाचत नाही. मात्र चित्रपट बघणार आहेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ननिंनी 'भांजी मार ली'
खरंतर विद्याच्या ह्या कहानीवर,बघून झाल्यावर, मला धागा काढायचा होता पण ननिंनी 'भांजी मार ली'
असो, त्यामुळे इथे हौस भागवली आहे.
चित्रपट भयंकर आवडला गेल्या आहे.
- (विद्याच्या 'कहानी'त गुंगलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
नोटेबल वन
विद्या बालनसाठी 'कहानी' पाहावा असे मनी येत होतेच, पण आता तो पाहिला इथले नेमके परीक्षण वाचल्यानंतर.
नो डाऊट, शेवटपर्यंत 'अर्नब' रहस्य दिग्दर्शकाने खुबीने लपविले आहे आणि विद्याची तगमग पाहताना ती खरोखरीच नवर्याच्या शोधासाठी किती कासावीस झाल्ये त्याचा प्रत्यय तिच्या अभिनयाच्या क्षमतेवरून तसेच कथानकाच्या वेगवान हाताळणीवरून जाणवते. एक विद्या सोडली तर एकही अभिनेता माहीतीचा नसूनही सर्व पात्रनिवड नेमकी वाटते (विद्या बालननेदेखील आपण एक वेल सेटल्ड अभिनेत्री असल्याची जाणीव त्या कलाकारांना करून दिलेली नाही, इतका सहज वावर तिने पूर्ण चित्रपटात ठेवला आहे). एसीपी खान हे पात्र मात्र अकारण "भडक" रंगविल्यासारखे वाटते, विशेषतः विद्याने 'मी गर्भवती आहे, आणि तुम्ही चौकीत सिगारेट ओढता हे काही पटत नाही' असे म्हटल्या नंतरही त्या उच्चपदस्थ पोलिस अधिकार्याला सिगारेट अॅश ट्रे मध्ये चुरगाळावी वाटत नाही, हे पचविणे जड जाते.
बाकी त्या भाडोत्री मारेकर्याने मोबाईलवरून चेहरे पाहून भक्ष्याला टिपणे ही सरळसरळ 'बोर्न सीरीज' चित्रपटाची नक्कल आहे. पण ठीक आहे. कलकत्यासारख्या महाप्रचंड गर्दीच्या शहरात कॅमेरा सतत फिरत असूनही 'शूटिंग' चालले आहे याची जाणीव कॅमेरमनने करून दिलेली नाही हे एक मोठे यश आहे त्या टीमचे.
(श्रेयनामावलीत अमिताभ बच्चनचे आभार का मानले आहेत हे समजले, पण आदित्य चोप्राचे कशासाठी असावे याचा तर्क बांधता आला नाही. अर्थात या बाबी "कहानी" कथानकाशी संबंधित नाहीत.)
लेख वाचून कहाणी बघावा आणि
परीक्षण वाचून कहाणी बघावा आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून दोन तास मेंदूचं दही करून शेवटी जर चीडचीड होत असेल तर बघावा की नाही असा प्रश्न आता पडलाय!!!!!!!!!
कहानी पाहिल्यावर..
आज थेटरात प्रचंड गर्दी होती, सगळे शो हौसफुल्ल - कलकत्तेकरांना तरी कहानी फार आवडलेली दिसते. हिंदी पडद्यावर सिनेमातले कलाकार नवीन असले तरी बंगालीत बरेच लोकप्रिय आहेत - भास्करनच्या भूमिकेत धृतिमान चटर्जी (३६ चौरिंघी लेन, १५ पार्क अॅवेन्यू), परमब्रोतो चटर्जी (बाँग कनेक्शन), इत्यादी. मला चित्रपट आवडला. पैसा वसूल - ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या. म्हणजे छोट्याशा प्रवासात एखादं हल्कंफुल्कं रहस्यकथेचं पेपरबॅक वाचावं तसं.
चीप थ्रिल्स - मोकँबो हे माझे शहरातले अगदी खास आवडते रेस्टॉरंट. जुने, मस्त, काँटिनेंटल शैलीचे. त्याचा उल्लेख पाहून उगीच आनंद झाला. तसेच, मोनालिसा गेस्टहाउस ची पाटी रोज घरी जाताना दिसते - ती एकदम पडद्यावर बघून हसू आले.
चित्रपटाच्या शेवटाचा अंदाज लवकरच आला, पण तरी कथानक ठीक होतं. दुर्गा पूजेच्या संदर्भ आल्यावरच शंका आली होती, पण दुर्गापूजा, ट्रॅम, हात-रिक्षा इत्यादी दाखवल्याशिवाय कलकत्ता हे कसं कळणार, म्हणून संशयाचा फायदा दिला. असो. ज्युवेल थीफ पहिल्यांदा पाहताना देवानंदच्या डबल बद्दल सत्य कळल्यावर जशी चिडचिड झाली होती, तशी फारशी चिडचिड झाली नाही. एम-टी-वी स्टाइल कॅमेरा आणि भरभर बदलणार्या शॉट्स नी जास्त डोकं फिरलं.
विद्या बागचीला दुर्गा पूजा बद्दल बंगाली नवर्याकडून माहित असतं, पण डाकनाम बद्दल माहित नाही हे पटलं नाही - असा बराच किरकोळ निरर्थक मसाला "एक्झॉटिक रीजनल फ्लेवर" साठी घातलाय.
बच्चनच्या आवाजातले अगदी शेवटचे मनोगत आणि मेणबत्त्या टाळल्या असत्या तर बरे झाले असते. त्याने अॅक्ला चॉलो रे गाणं छान म्हटलंय पण!
बरेच प्रश्न पडले -
मिलन दामजी नावाचा माणूस भारताच्या कोणत्या प्रदेशाचा असावा?
विद्या बागची सुरुवातीला मधेच एकदोन तमिळ वाक्य बोलते. त्याची सिनेमाशी काही लिंक होती की नाही कोणास ठाउक. तिच्या नातेवाइकांबद्दल कोणी कसे विचारत नाही?
बॉब बिस्वास ला विद्या बागची भर शहरात नेमकी त्याच वेळेला कुठे आहे हे कसं कळतं?
परेश इन्फॉर्मर ला त्याची माहिती कुठून मिळते?
बाजपेयी झालेला नट आणि एच्डीएफसी च्या जाहिरातीतला नट हे एकच का?
ट्रायंग्युलर पार्क च्या पूजेच्या गर्दीत विद्याला नेमकं कुठे जायचं हे कसं कळतं?
इत्यदी इत्यदी...
विद्या बागचीला दुर्गा पूजा
शेवट पाहिल्यानंतर बॅकट्रॅक करताना आधी वास्तव म्हणून पाहिलेल्या घटना नंतर निव्वळ आपली गृहीतके म्हणून उरतात. शेवटचा "कौन हो तुम?" हा प्रश्न आणि "क्या फर्क पडता है?" हे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे निरर्थक संवाद नाहीय.
मुळात ती तमिळ आहे आणि तिला बंगाली संस्कृतीबद्दल फारशी माहिती नाही या तिने "सांगितलेल्या" गोष्टी आहेत आणि त्यावर राणा आणि त्याच्या बॉसचा विश्वास बसला हे गोष्टीसाठी पुरेसे आहे. तिच्यावरच संशय घ्यायचे त्यावेळीतरी त्या दोघांना काहीच कारण नाही.
"आपका कोई माँ-बाप-भाई-बहन नही है?"
"नही. मैं xxx सालकी थी तब मेरे माँ-बाप एक अॅक्सिडेंट मे चल बसे. अब अर्णब के सिवाय मेरा इस दुनिया में कोई नही"
असा संवाद असता किंवा आता नाहीय तर कथेच्या दृष्टीने काय फरक पडतो? जिला आपली कहानी खपवायची आहे ती काही तरी उत्तर तयार करूनच आलेली असणार ना?
मिलन दामजी नावाचाच तो माणूस असतो याची खात्री आहे? की ते फक्त एक रेकॉर्ड असते एनडीसी मधले आयबीने त्याच्यासाठी बनवलेले? त्याच्या अनेक नावांपैकी एक? क्या फर्क पडता है?
असो. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे टंकायचा कंटाळा आला आहे.
हा प्रतिसाद इतरांसाठी स्पॉयलर ठरेल कदाचित, पण नंतर चिडचिड होण्यापेक्षा हे बरं.
युजुअल सस्पेक्ट, बोर्न ट्रिलॉजी आणि अन्नोन (Unknown) या चित्रपटांवरून प्रेरणा घेतल्या असाव्यात असा अंदाज आहे. ते मूळ चित्रपट पाहणे कधीही चांगले. त्यात काही प्रश्न पडत नाहीत.
चिडचिड माझी तरी नाहीच झालेली
चिडचिड माझी तरी नाहीच झालेली - आवडत्या सिनेमाचे पोस्टमोर्टम करायला आवडते - पण प्रश्नांनी तुमची होतीय असं दिसतंय! असो, प्रश्नांचे उत्तर हवेतच असा आग्रह नाही.
खरा माणूस असो वा फक्त रेकॉर्ड असो, दामजी हे नाव नवीन वाटले, आधी कधी ऐकले नाही, म्हणून प्रदेशाबद्दल कुतूहल.
"मेरा कोई नहीं" म्हणून एखादा डायलॉग विद्याच्या तोंडी घातला असला तरी तिने दिलेली माहिती पोलीसांनी (खान वगैरे तरी कथेत आल्यानंतर) थोडी क्रॉसचेक तरी करताना दाखवता आले असते. तिच्या नवर्याबद्दल नाही, तर तिच्या बद्दलची. ते असं करतील ह्याचा विचार करून तिने केलेली तयारी ही दाखवता आली असती. म्हणजे एरवी घट्ट बांधलेल्या कथेत तो धागा सुटा राहिला नसता. "तिला सोडून पळून गेला" म्हणून समाधान वाटून घेतलेलं तेवढं पचलं नाही.
पण प्रश्नांनी तुमची होतीय असं
हो थोडी झाली खरी.
पण त्यात इतर लोकांनी इतरत्र विचारलेल्या शंकांचा भाग जास्त आहे. असो.
दामजी
हाच प्रश्न मला आशुतोष गोवारीकरचा आमीर खान अभिनीत "बाजी" पाहिल्यापासून पडलेला आहे! (अमर दामजी).
तीन दामजी
"मिलन दामजी नावाचा माणूस भारताच्या कोणत्या प्रदेशाचा असावा?"
~ हे 'दामजी' चे गूढ चांगलेच रोचक बनल्याने उत्सुकतेपोटी काही गुगलिंग केले आणि एक नाही चक्क तीन दामजी सापडले, तिघेही विविध गुन्ह्यांशी संबंधित आणि या तिघांपैकी एकही भारतीय नाही.
१. फराह दामजी : कंपाला, युगांडा मध्ये जन्म
दक्षिण आफ्रिकेतील जमीनजुमल्याच्या व्यवसायात गब्बर असलेल्या अमिर दामजीची मुलगी. ऑब्झर्व्हर आणि न्यू स्टेट्समनसाठी स्तंभलेखिका म्हणून काम करत असे. पण पोलिसांनी फ्रॉडच्या विविध कलमाखाली तिला अटक करून सहा महिन्याच्या तुरुंगवासात पाठविले. तिथून सुटका झाल्यानंतर अमेरिका आणि इंग्लंडमध्येही हाच प्रकार. सरेच्या तुरुंगात तिला साडेतीन वर्षासाठी डांबले गेले. ही गोष्ट २००५ ची. पण हा सिलसिला या तारखेपर्यंत चालूच आहे. सध्या फराह दामजी लंडन इथे दीडवर्षाच्या तुरुंगवासात आहे. तिने आत्मचरित्र लिहिले असून त्याचे नावही टिपिकल तिच्या कार्यासारखेच आहे 'ट्राय मी'.
२. कमलेश मनसुखलाल दामजी : जन्म मोंबासा, केनया
ही व्यक्तीही अशा 'फ्रॉड' करणार्यांच्या गटातीलच. केनियातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यामागील (गोल्डनबर्ग स्कॅन्डल) हाच प्रमुख सूत्रधार.
३. सलीम दामजी : कॅनडा
फ्रॉड मेम्बर क्रमांक ३ - स्वतःला डेन्टिस्ट घोषित केलेला पण कोणत्याही विद्यापीठीची पदवी नसलेल्या सलीमने 'इन्स्टंट व्हाईट' नावाची टूथपावडर निर्मितीची घोषणा करून त्यात कोलगेट पामोलिव्हदेखील सहभागी असल्याची जाहिरात केली होती. जवळपास ७५ दशलक्ष डॉलर्सची माया जमविली, पुढे भांडे फुटले. सध्या हे तिसरे दामजी कॅनेडियन कस्टडीत आहेत.
(माहिती विकीवरून साभार....)
....."दामजी' नावाला अशी पूर्वपिठीका असल्याने कदाचित 'कहानी' मधील दामजी महोदय दिग्दर्शकाने रहस्यमयच ठेवले असावेत.
अशोक पाटील
यूजुअल सस्पेक्ट्स
कहानी बघितल्यावर पुन्हा एकदा यूजुअल सस्पेक्ट्स बघायची इच्छा आहे - त्या सिनेम्यातून बरेच "इंस्पिरेशन" घेतले आहे.
चित्रपट आवडला कथानकाचा
चित्रपट आवडला
कथानकाचा (रसस्याचा) अंदाज फारच लवकर आला मात्र खात्री शेवटापर्यंत होत नव्हती हे कथेचं यश असावं.
एकुणच न चुकवावी अशी कहानी हे खरं!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रचंड आवडला चित्रपट
काही त्रुटी आहेत, काही 'बाय चान्स' जमलेल्या गोष्टींमुळे कहानी दिग्दर्शकाला हवी तशी पुढे जाते (तो मुख्य प्रसंग त्या मिरवणुकीच्या दिवशी झाला नसता तर? तसेच त्या मुलाचा शर्ट राणाने आधीच नीट बघितला असता तर?), तसेच नीट लक्ष दिले तर एक निगेटिव्ह् ("खान") व एक पॉझिटिव्ह (दुर्गापूजा) क्लूही मिळतो.
पण चित्रपटाने दोन अडीच तास पूर्ण खिळवून ठेवले, जरी शेवट मला थोडाफार माहीत होता तरीही! आणि थिएटर मधून उठताना आपण जबरी पिक्चर बघितला असे वाटले हे याचे यश! नंत्॑र घरी विचार केल्यावर काही गोच्या आठवल्या तरी ते नंतरचे झाले.
परीक्षण चांगले आहे हे आधी लिहीलेले आहेच.
कहानी... आवडला
काल सकाळी कहानी पाहिला. मला चित्रपट अतिशय आवडला. रहस्य काय असेल याचा शोधच न घेता शेवटपर्यंत दिग्दर्शकाने ते रहस्य आपल्यासमोर उलगडेपर्यंत वाट बघायची असा (आळशी) अॅप्रोच असल्यामुळे चित्रपटाचं थ्रिल अगदी पुरेपूर एन्जॉय करता आलं. थिएटरमधे जाऊन हिंदी चित्रपट पाहिला आणि आपला वेळ आणि पैसा सत्कारणी लागला असं वाटलं ही दुर्मिळ घटना काल घडली त्यामुळे आनंद झाला. यापूर्वी असा आनंद फक्त तारे जमी पर ने दिला होता.
इथे परीक्षण वाचलं नसतं तर कहानी नावाचा चित्रपट आहे हेसुद्धा माहीत झालं नसतं. परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद!
अदिति
--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||