रॅबिट प्रुफ फेन्स
रॅबिट प्रुफ फेन्स
सुमारे १९३०चा सुमार. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातली जिगालाँग ही एक छोटीशी आदिवासी वस्ती. ही वस्ती रॅबिट प्रुफ फेन्स या कुंपणाला लागून होती. या गावात तीन बहिणी आपली आई आणि आज्जी यांच्या सोबत रहात असत. चवदा वर्षांची मॉली, आठ वर्षांची डेझी आणि दहा वर्षांची ग्रेसी. स्वच्छ निळे आकाश आणि जमिनीशी असलेले घट्ट नाते यांच्या बळावर आनंदात दिवस चालले असत.
इकडे हजारो मैल दूर 'ऑस्ट्रेलियन आदिवासींचा रक्षक' असे सरकारी पद असलेला नेव्हिल हा या तीन मुलींना आपल्या कुटुंबापासून धोका असल्याने शिक्षणासाठी म्हणून त्यांना आई वडिलांपासून वेगळे करण्याच्या आदेशावर सही करतो. त्यांची रवानगी शिक्षणासाठी होणार असते. नेव्हिल ची अशी धारणा होती की ही मिश्र वर्णाची मुले गोऱ्या लोकात ठेवली वाढवली आणि त्यांचा फक्त गोऱ्याच लोकांशी संकर होऊ दिला तर ही पुढील पिढी पूर्णपणे गोरी तयार होईल. म्हणून या तीन मुलींनाही आता आई पासून वेगळे केले जाणार असते.
रिग्ज या ऑफिसरची गाडी वस्तीवर येते आणि रडत असलेल्या आई आणि आजीला मागे सोडून या तिघींना घेऊन जाते. गाडी घेऊन एका स्टेशनवर येते. मग त्यांना रेल्वे मध्ये डब्यातल्या एका पिंजऱ्यात बंदिस्त केले जाते. मग परत एका गाडीत त्यांना चढवले जाते. शेवटचा टप्पा पूर्ण होतो आणि त्या थकल्या-भागल्या एका वस्तीवर पोहोचतात. हा कॅंप असतो कुप्रसिद्ध मूर नदीवरची आदिवासी वसाहत. आल्या आल्या त्यांना मळकट असे कपडे हवाली केले जातात आणि धार्मिक ख्रिश्चन रीतीरिवाज पाळायला लावले जातात.
बावरलेल्या तिघी आल्या बरोबर तेथली मारहाण आणि इतर राहण्याच्या पद्धती पाहिल्यावर त्या पळून जायचे ठरवतात. पण हे सोपे नसते कारण पळालेली मुले शोधून आणायला तेथे एक मूडू नावाचा आदिवासीच ठेवलेला असतो. तो सर्व खुणा बारकाईने शोधून मुले धरून परत आणत असतो. त्याच्या पासून कुणाचीही सुटका झालेली नसते. पण एका सायंकाळी पाऊस येणार असे दिसताच सर्वात मोठी मॉली सांगते की हीच आपली वेळ आहे. आपण पळून जायचे. आता गेलो तर येणारा पाऊस आपल्या पाऊल खुणा मागे ठेवणार नाही. त्या तिघी पळून जातात.
त्या पळाल्यावर नेव्हिल संतापतो. आणि त्याना तातडीने पकडण्याचा हुकुम जारी करतो. आदेशानुसार मूडू घोड्यावरून पाठलाग सुरू करतो.
कुठे जायचे आणि घरी कसे जायचे याची मॉलीला कल्पनाच नसते. फक्त मूडू पासून दूर पळायचे इतकाच मुख्य हेतू असतो. चातुर्याने आपल्या बहिणींना धोक्यापासून वाचवत मॉली बरीच दूर येते. काही वेळा मागावर असलेला मूडू तर अगदी जवळून जातो पण कधी निव्वळ शांत राहून तर कधी भराभर चालून मुली त्याला गुंगारा देतात.
चालत असताना त्यांना अनोळखी आदिवासी भेटतात. तर कधी वस्तीवर काम करणाऱ्या लोकांकडून अन्नाचे सोय होते. काहीच मिळाले नाही तर भुकेल्या चालत राहतात. शेवटी त्यांना एक गुराखी सांगतो की तुमचे गाव तर रॅबिट प्रुफ फेन्सला लागूनच आहे. फक्त याच्या कडेने चालत गेलात की घरीच! आत सुमारे बाराशे किलोमिटर्सचे अंतर पायांनी कापायचे असते. वर टळटळते उन, खायला काही नाही अशा परिस्थितीत ही चाल सुरू होते. काही दिवसांनी छोटी डेझी सांगते की यापेक्षा जास्त चालणे शक्य नाही माझे पाय आता दुखताहेत. मग मॉली तिला पाठगुळी उचलून घेते. नेव्हिल त्यांना शोधण्यासाठी अनेक माणसे पाठवतो. पण त्या त्यांच्यापासून बरोब्बर पळ काढतात. शेवटी नेव्हिल 'मुलींची आई विलुना नावाच्या गावात त्यांची आई वाट पाहते आहे' अशी अफवा उठवतो. त्यांना एक माणूस ही अफवा सांगतो.
त्याला बळी पडून ग्रेसी म्हणते की तिकडे जाणार. मॉली तिला समजावते की हे खरे नाही, पण ग्रेसी ऐकत नाही आणि एकटीच त्या दिशेने जाते. मॉली आणि डेझीपण् मग नाईलाजाने तिच्या मागे जातात. मॉली तिला स्टेशनवर बसलेली पाहते. पण त्यांची भेट होण्याच्या आतच रिग्ज तेथे पोहोचतो आणि ग्रेसीला ताब्यात घेतो. ती अफवा सांगणारा माणूसही तेथे दिसतो. या कामगिरी बद्दल त्याला आता एक शिलिंग मिळणार असतो. लपलेल्या मॉलीला रडू आवरत नाही. तरी मॉली आणि डेझीची लपत छपत चाल परत सुरू होते.
इकडे त्यांच्या आई आणि आजी पर्यंत मुली पळाल्याची बातमी पोहोचते. त्या आता मुली भेटणार म्हणून आनंदतात. पण मुलींसाठी रिग्ज गावात येऊन बसलेला असतो. मुली गावाजवळ पोहोचतात. चतुराईने पक्ष्यांचा वाज काढून आईला आल्याचे कळवतात. शेवटी भेट होते! मॉली रडत आजी सांगते की 'तरी तीला वाचवू शकले नाही'. चौघीजणी आश्रयाला वाळवंटात पळून जातात...
शेवटी खरी मॉली आणि डेझी दिसतात. त्यांचे आता वार्धाक्याने सुरकुतलेले पण ठाम चेहेरे दिसतात. मॉली सांगते की माझ्या दोन मुली आणि मलाही त्यांनी पळवून नेले होते. पण मी माझी ३ वर्षांची मुलगी ॲनाबेला ला परत पळून गेले! परत् सुमारे १५०० किलोमिटर्स चालून नाहीशी झाले. पण त्यांनी मला परत शोधले आणि माझ्या मुलीला माझ्यापासून घेऊन गेले.
ती मला आजवर परत दिसली नाही!
------------
२००२ मध्ये आलेला सत्यकथेवरचा हा चित्रपट अतिशय सुंदर आहे.
संयतपणे उलगडलेली कथा, आणि ऑस्ट्रेलियाच्या आतील भागाचे सुंदर चित्रण.
मॉलीची भूमीका करणारी एव्हेलिन तर खुपच सुंदर आहे. तीचे 'तरी तीला वाचवू शकले नाही' हे आजीला सांगणे अगडी डोळ्यात पाणी आणते. मूडूची भूमीका केलेला सुप्रसिद्ध डेव्हिड गलिपली तर ग्रेटच. त्याची मुलगीही त्याच कॅंपमध्ये असते. आणि तिला सोडून जायची वेळ आल्यावर फक्त डोळ्यांनी त्याने दाखवलेल्या भावना अगदी गलबलून टाकतात. छोटीशी गोड डेझी झालेली तियाना, तिचे किती कौतुक करावे.
कुठेही कडवटपणा न दाखवता किंवा द्वेषाचा एक शब्दही न उच्चारता चित्रपट आपल्या आदिवासींवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगतो. मला वाटते हे असे सांगता येणे हेच या चित्रपटाचे यश आहे. एकदा पाहायलाच हवा असा चित्रपट!
भूमीका
मॉली - एव्हेलिन सांपी
डेझी - तियाना सान्सबरी
नेव्हिल - केनेथ ब्राना
मूडू - डेव्हिड गलिपली
रिग्ज - जेसन क्लार्क
आजी - म्यार्न लॉफर्ड
दिग्दर्शक - फिलिप नॉइस
पटकथा - क्रिस्टिन ऑल्सन
मूळ लेखिका - डोरिस पिल्किंग्टन गरिमारा
संगीत - पिटर गॅब्रियेल
पुरस्कार
ऑस्ट्रेलियन फिल्म इंस्टिट्युट
व इतर अनेक!
टीपा -
चोरलेली मुले: सुमारे १९०९ ते १९७० या काळात ऑस्ट्रेलियात मध्ये आदिवासींकडून त्यांची मुले काढून घेतली जावी असा कायदा अस्तित्वात होता. आदिवासींना आम्ही त्यांच्या पासूनच वाचवतो आहोत, असा तत्कालिन ऑस्ट्रेलियन सरकारचा दावा होता. या मध्ये प्रामुख्याने मिश्र आईवडीलांची मुले असत. या कायद्या अंतर्गत ऑस्ट्रेलियातील आदिवासींची मुले त्यांच्याकडून काढून घेतली जात. या मुलांना एका ठिकाणी ठेऊन तेथे त्यांचे चर्चच्या देखरेखीखाली शिक्षण केले जात असे. मग ही मुले गोऱ्या लोकांकडे हलकी सलकी काम करणारे कामगार म्हणून भरती केले जात. या कायद्याचा आधार घेऊन सुमारे एक लाख मुले अशी आई वडीलांपासून तोडली गेली असावीत असा अंदाज आहे. हे कॅम्पस अतिशय कडक धार्मिक शिस्तीचे असत. यातून कुणी पळाले तर त्यांना शोधून काढून चाबकाने मार दिला जाई. शिवाय त्यांना काही काळ एकटे ठेवण्यासारख्या शिक्षाही दिल्या जात. पळून जाणे शक्य नसलेले हे तुरुंगच होते. यात अगदी एक महिन्याच्या बाळापासून मुले आई पासून तोडून आणली जात असत. या सर्व प्रकारात सरकार व गोरे लोक यांचे फायदे पाहणे इतका एकच हेतु असत असे. या मुलांची अवस्था अतिशय केविलवाणी असत असे.
रॅबिट प्रुफ फेन्स: पूर्व ऑस्ट्रेलियात इंग्रजांनी सोडलेले ससे शेतीचा विध्वंस करत होते. हा विध्वंस टाळावा व पश्चिम ऑस्ट्रेलियात हे ससे येऊ देऊ नयेत म्हणून सगळ्या ऑस्ट्रेलिया खंडाला विभागणारे हे कुंपण घातले गेले. या कुंपणाची लांबी होती ३२५६ किलोमिटर्स! पुढे हेच कुंपण अजून ३ भागात वाढवले गेले. १९५० पर्यंत या कुंपणाचे अतिशय महत्त्व होते. पण पुढे जंतु सोडून ससे मारण्याचे तंत्र विकसित केले गेले आणि यांची संख्या नियंत्रित केली गेली. हे कुंपण घातल्याने अनेक आदिवासी गावे विभागली गेली. अनेक विखुरलेल्या आदिवासी गटांचा एकमेकांशी संपर्क तुटला व त्यांची वाताहत झाली.
प्रतिक्रिया
छान परीक्षण
परीक्षण आवडले.
युरोपियनांनी अमेरिकेत स्थानिक आदिवासींच्या केलेल्या छळाविषयी बरेच वाचायला/पहायला मिळते. ऑस्ट्रेलियातील घटनांबाबत तेवढी माहिती मिळत नाही.
योग आल्यास चित्रपट पाहिला जाईलच.
अवांतर - सशांच्या कुंपणावरून, मिठाची तस्करी रोखण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात बांधलेल्या ह्या कुंपणाची आठवण झाली!
खरे आहे
जी काही मिळते त्यावरही तीव्र आक्षेप घेतले जातात. असे कुजबुजीत ऐकले आहे की सुमारे १९५० पर्यंत गोरे इंग्रज गंमत म्हणून आदिवासींच्या शिकारीला जात. त्यांना माणूस म्हणून किंमत नसल्याने आणि त्यांची शिरगणतीही नसल्याने तसा काही फरक पडत नसे.
-निनाद
असे पिच्चर पाहिले तरी शेवटी
असे पिच्चर पाहिले तरी शेवटी टू लिटल अँड टू लेट असेच वाटत राहते (मी हा पिच्चर पाहिला नै पण माझे मत).
शेवटी, "अन्यायाचा बदला" नामक गोष्ट अस्तित्वातच नसते की काय असे वाटते कैकदा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्र ही तर चित्रपटाची कथा
अर्र ही तर चित्रपटाची कथा निघाली. असो वाचली, आवडली पण चित्रपट पहाताना उत्सूकता तितकीशी वाटेल का माहिती नाही.
कृपया इथे कथा उघड करण्यापूर्वी सुचना द्यावी.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
हा धागा विस्मरणात गेल्यावरच चित्रपट बघेन.
(मागे तुम्हीच ओळख करून दिलेला 'बोल्बर' पाहिला आणि तो फारच आवडला होता.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतर: हे वाचून मेलियन
अवांतर: हे वाचून मेलियन ड्वायलॉक नामक प्रकार आठवला उग्गीच. अथेन्स आणि स्पार्टाच्या दरम्यान २७ वर्षे सतत चाललेल्या युद्धाच्या दरम्यान एकदा अथेन्सवाल्यांनी मेलॉस नामक एका छोट्या बेटाला वेढा घालून "आमच्या बाजूने या नैतर नतीजा बुरा होगा" छाप धमकी दिली. मेलियन लोकांनी अथेन्सच्या लोकशाही जाणिवेला हात घालून रेड्यापाड्याच्या झुंजीत आमचा पाड तो काय? सबब आम्ही न्यूट्रलच राहू, तो आमचा हक्क आहे वैग्रे वैग्रे लै मनधरणी केली. पण दांडगट अथेन्सवाल्यांना त्याचे काय होय! योग्य-अयोग्य वैग्रे उपदेश दुबळ्यांनी दांडग्यांना करणे फजूल आहे असे सांगून त्यांनी सरळ वेढा घातला, सर्व पुरुषांची कत्तल करून बायकापोरांना गुलाम केले आणि तिथे काही शे अथीनियन पुरुषांना पाठवले-आपली कॉलनी म्हणून नव्याने वसवायला. लोकशाहीचे उगमस्थान म्हणून गाजलेल्या अथेन्सनेही असला रानदांडगेपणा लै वेळेस केलेला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रोचक!
रोचक!
+1
I wish to watch that Mudy's acting.
अगदी
बॅट्मॅनशी सहमत.
अगदी खरे आहे. जे काय अत्याचार झाले - आणि होत आहेत- त्यामाने सगळे टू लिटल आणि टू लेट असेच आहे. आजही उत्तर ऑस्ट्रेलियातील आदिवासींची परिस्थिती 'फार बदलली आहे' असे नाहीच म्हणता येत. अजूनही पोलिसी जुलूमाविरुद्ध काही कायद्यांविरुद्ध अतिशय असंतोष आहे. पण आदिवासींचे ऐकतो कोण?
उदाहरणार्थ, डेव्हिड गलिपली हा कोरीवकाम करणारा कलाकारही आहे. कोरीवकाम करण्यासाठी लागतात तसे चाकू त्याच्याजवळ होते. एकदा झालेल्या किरकोळ भांडणात पोलिसांनी त्याच्या विरुद्ध या कोरीव कामाच्या उपकरणांसाठी शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल केला. शेवटी खटला चालून कोर्टाने त्याची सुटका केली!
इतक्या गाजलेल्या कलाकाराची ही परिस्थिती असेल तर इतरांचे काय हाल?
-निनाद
?
इतका छळ आहे तर आदिवासी व्यवस्थेविरुद्ध हिंसक का होत नाहित?
एखाद्याला दाबता येणे समजू शकतो.
आख्ख्या समूहाला दाबले जात आहे.
म्हणजेच आख्ख्या समूहाकडून पाठिंबा मिळेल ठिणगी टाकली तर.
व्यापक आणि जुलमी सत्तेविरुद्ध हिंसक न होणं हे त्याला समर्थन असतं.
बरं, एखाद्-दुसरी आडवळणाची केस मह्णूनही सोडून देता येत नाही.
पाच्-सात दशकं चाललेला उद्योग आहे.
आदिवासांनी काही सशस्त्र (जमेल ते शस्त्र, प्रसंगी दगड धोंडे) घेउन प्रतिकार केला नाही का?
की केला आहे पण त्याचे तितके रेफरन्सेस नाहित?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रतिकार
आदिवासींनी अनेकदा प्रतिकार केला होता. परंतु संघटित प्रतिकार सरकार हाणून पाडले. नव्या काळात आदिवासी संघटित होण्याआधीच संघटक गायब होतात किंवा कोणत्यातरी 'कायदेशीर खटल्यात' अडकतात असे मला वाटते. (अधिकृत कागदपत्रे तसे म्हणत नाहीत!)
शिवाय त्यांची संख्या अतिशय नगण्य राहिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवडणूकीत काही प्रभावही पाडत नाहीत. (त्यापेक्षा मुस्लीम व्होट बँक मोठ्या प्रमाणात निवडणूकीचे निकाल हलवू शकते.)
त्यांना बंड करणे शक्य नाही कारण जे काही लोक राहिलेत त्यांच्यावर नजर ठेवलेलीच आहे. बंडाच्या विरोधात अतिशय कडक कायदे आहेत आणि ते चालवण्यात येथल्या प्रशासनाचा हात कुणीच धरू शकत नाही.
शिवाय लोक तेव्हढे संघटितही उरलेले नाहीत. जे आहेत ते दारूच्या आहारी गेले आहेत... अशा अनेक कारणांनी त्यांची दुरावस्थ आहे.
परंतु सगळेच वाईट नाही. सरकार त्यांना बेकारी भत्ता देते. नोकरीत आरक्षण मिळते. पण आता आळशी बनलेली पीढी फार काही दिवे लावत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.
-निनाद
तू नळीवर
सारिका तू नळीवर चित्रपट उपलब्ध आहे. डेव्हीड चा अभिनय पाहता येईल. परंतु तो प्रताधिकार भंग असावा असे माझे मत आहे म्हणून मी दुवा देत नाहीये. डेव्हीड गलिपली अनेक चित्रपटांतला नायक आहे. त्याचाच द ट्रॅकर नावाचा अप्रतिम चित्रपट आहे. २००६ मध्ये आलेल टेन कनू पण छान आहे. बघण्यालायक.
-निनाद
द व्हाईट एप वॉज द मोस्ट बार्बॅरियस ऑफ देम ऑल.
लेख आवडला; पण चित्रपट पाहणार नाही.
बहुतेक जॉन होवार्ड यांनी
बहुतेक
जॉन होवार्डयांनी सार्या अबॉरिजीनल्सची हा कायदा कधी काळी त्यांच्या देशात होता म्हणून माफी मागीतली होती.http://news.bbc.co.uk/2/hi/7241965.stm
ते केविन रड होते आणि साल २००८.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरोबर
केविन रड यांनी आदिवासींची माफी मागितली होती. पण त्यांनी अशी माफी मागू नये म्हणून त्यांच्यावर मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता.
-निनाद