दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट ? )
दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट ? )
दुर्गाबाई भागवतांच्या अचानक मृत्यूचे रहस्य उलगडले असून, नुकतच ते कारण मी प्रत्यक्ष पाहून आले. अंजली कीर्तने नामक फिल्ममेकिंगशी सुतराम संबंध नसलेली स्त्री,आपल्यावर माहितीपट करते आहे म्हटल्यावर पहिला शॉट देताच,आयशप्पथ, दुर्गाबाईंनी यमराजास पाचारण केल्याचं आढळलं.अभ्यास म्हणून गेलाबाजार फिल्म्स डिविजनचे २/३ माहितीपट पाहिले असते तरी यापेक्षा सुसह्य फिल्म कीर्तने मॅडम याने कि दिग्दर्शिका कम संशोधिका कम माहितीपट निर्मात्या महोदयाना जमली असती! ज्ञानदीप या दूरदर्शन कार्यक्रमातल्या कलाकारांना अभिनयासाठी होलसेलमध्ये ऑस्करच्या बाहुल्या सहज देता येतील अशी पात्र, बाईंनी महाराष्ट्रातून तांदुळातल्या खड्यासारखी निवडून काढली आहेत. ती प्रत्येक घासाला कचकन दाताखाली येतात.त्यांचं अवघडलेलं वावरण आणि बाळबोध संवाद अत्यंत हास्यास्पद आहेत .
घाऱ्या डोळ्यांचा, चेटकिणीला लाजवेल असा मेकप केलेली एक जरड सूत्रधार येऊन, डोळे गरागरा फिरवत नायिकेबद्दल काही सांगू लागते तेंव्हा, हा भयपट आहे कि काय अशी शंका येऊन काळजाचा थरकाप होतो. सुरुवातीलाच ९२ वर्षांच्या दुर्गाबाई दिसतात आणि पार्श्वभूमीवर एक कापरा आवाज काहीबाही म्हणतो. ते ऐकवत नाही. आता फ्ल्याशबॅकत बाल्दुर्गेच बाल्पण दाखवायचा चंग बांधून दिग्दर्शिका माहितीपटाच्या अंगणात बागडू लागलेली असते.स्वातंत्र्यलढ्यातून वेळात वेळ काढून , एकटेच फिरत फिरत गांधीजी, बाल्दुर्गा खेळत असते तिथे येतात आणि स्वातंत्र्यासाठी योगदान मागतात. तेंव्हा बाल्दुर्गा सोन्याच्या बांगड्या काढून देते. गांधीजी सोबतची गर्दी कुठून आणायची म्हणून बाईंनी कागदावर स्केचपेनाने गर्दी दाखवली आहे आणि पार्श्वभूमीवर ऑडीओ जंप असलेल्या वीरश्रीयुक्त क्षीण घोषणा ऐकू येतात .
या चिमखड्या प्रसंगात एक बाल्सखी : अय्या बर झालं बै, आता भविष्यात अंजली कीर्तनेला हा प्रसंग माहितीपटात वापरायची सोय झाली आणि आपल्याला बाल्दुर्गेसोबत बाल्लीला दाखवायची संधी.कित्ती मज्जा !
तरुण वयातली दुर्गा तर अगदीच मिळमिळीत आहे.मध्यप्रदेशात संशोधन करत असताना विषबाधा झाल्यावर औषधोपचारासाठी पैसे नसतात. तेंव्हा,' तीर्थरूप बाबांना शि.सा.न.' असा पत्राचा मायना अवकाशातून ऐकू येतो तेंव्हा हसण्याची उबळ मोठ्या कष्टाने दाबावी लागली. दुर्गेला एवढे कष्ट करुनही पी.एच.डी. मिळत नाही. आजारपण पाठ सोडत नाही तेंव्हा पार्श्वसंगीतातून असा काही करुणरस पाझरू लागतो कि भाबड्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतात . माहितीपटाचे ध्वनी आणि संगीत हे एका स्वतंत्र लेखाचे अभ्यास विषय आहेत.
आणीबाणीच्या काळातल्या कणखर दुर्गाबाई 'इला भाटे' यांनी बऱ्याच सुसह्य (तुका म्हणे त्यातल्या त्यात) सादर केल्या आहेत.देशात आणीबाणी लादली म्हणजे नक्की काय झाले ते इतके तपशीलात ,बटबटीतपणे , पेपरातली कात्रणे , बालिश घोषणा यांच्या सहाय्याने दाखवले आहे कि ओ बाई, आवरा आता असे आम्ही मनातल्या मनात आक्रंदत बसलो. दुर्गाबाईना संधी मिळेल तेंव्हा वर्तुळाकार किंवा अंधाऱ्या जिन्यातून अंतहीन चालवले आहे. काहीतरी हालचाली दिसायला नकोत का ? हलती चित्रे म्हणजे सिनेमा असे दादासाहेब फाळके म्हणालेच आहेत.
विक्रम गोखले यांनी मोहन भागवतांच्या भूमिकेत स्वतःलाच सादर केले आहे. तू अमुक ढमुक लिहिले आहेस ते वाचून दाखवू का , ऐकतेस का,असे ते खऱ्या दुर्गाबाईंना विचारतात , तेंव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर काहीतरी फाजील/अश्लील गोष्ट करत असल्यागत भाव दिसतात. ते पाहून विस्मयचकित झाले. आणीबाणीमध्ये बहुतेक फिल्म वाया घालवली आहे. कणखर दुर्गाबाईंच्या आयुष्यातले ते एकमेव पर्व असल्यागत तो भाग पसरट केला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दुसरे पैलू भिंग घेऊन शोधले तरी सापडत नाहीत.दुर्गाबाईंचे रेघांच्या शर्टपीसला चिकटवलेले ,तेच ते फोटो दाखवून वात आणला आहे. या संशोधक महिलेला अधिक चांगले फोटो का मिळाले नाही कळत नाहीये. पद्मजा फेणाणी बशी एवढ्या भिंगाचा चष्मा घालून देहोपनिषद म्हणते. जयवंत दळवीच्या भूमिकेतले पात्र दुर्गाबाईंच्या अटकेची बातमी देताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
सलील चित्र म्हणजे एक घरचेच कार्य असल्यागत प्रकरण आहे . कॅमेरामन सलील बहुदा अंजली बाईंचा मुलगा असावा आणि दुर्गाबाई दूरच्या आत्या आहेत असे त्या प्रकट मुलाखती मध्ये म्हणाल्या. थोर लोकांवर माहितीपट बनवणे हा त्यांचा छंद असून त्या कर्ज काढून आणि लोकवर्गणीतून हे कार्य तडीस नेतात असे कळले.
लोकहो ,कृपया त्यांना थांबवा अशी नम्र विनंती आहे.आमेन !
प्रतिक्रिया
मी पाहिलाय या पटाचा (माहितीपट
मी पाहिलाय या पटाचा (माहितीपट म्हणवेना!) काही भाग. भावना घुसल्या!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
थोर लोकांवर माहितीपट बनवणे हा
त्याबद्द्ल वेगवेगळ्या (दिवाळी) अंकात लिहीणे हा ही त्यांचा छंद आहे. ते वाचून बाई चित्रपटाच्या विषयापेक्षा स्वतःच्याच प्रेमात असाव्यात असा समज झाला होता तो बरोबर निघाला तर.
=))
सखुबै कधी कोणाची उतरवतील नेम नाही! (काय ते विचारू नका - समजून घ्या)
__/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आनंदीबाई जोशींवर पुस्तक
आनंदीबाई जोशींवर पुस्तक लिहिणाऱ्या त्या याच ना? आता माहितीपटही काढायला लागल्या का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सखूबैंच्या शैलीमुळे हसायच की
सखूबैंच्या शैलीमुळे हसायच की जे लिहीलय त्यामुळे दुःखीकष्टी व्हायचं कळेना
माहितीपट पाहिला नाही. पण त्या
माहितीपट पाहिला नाही. पण त्या विषयी अंजली किर्तने यांचा दिवाळी अंकातील लेख वाचला. अंक कोणता ते आठवत नाही. लेखनात अबनॉर्मल असे काही (मला तरी)जाणवले नाही. फार तर स्वांत सुखाय लेखन आहे असे म्हणता येईल. पण सतत तुच्छतावादी उपहासात्मक टीकात्मक, अति चिकित्सक वा किस पाडणारे लेखन करणे वा तसे लेखन वाचणे या पेक्षा स्वांत सुखाय लेखन हल्ली मला बरे वाटते. इतरांच्या आनंदात सहभागी झाल्याचा आनंदही मिळतो व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मीही दिवाळी अंकात.. साधारण
मीही दिवाळी अंकात.. साधारण मागच्याच्या मागच्या वर्षी ..या महितीपटावरचा कीर्तने यांनी लिहिलेला लेख वाचला होता. माहितीपट पूर्ण व्हायच्या आधीच दुर्गाबाई गेल्या आणि मग कसा शेवटचा सीन दुसर्याकुणीतरी (बहुतेक कमल देसाई) कसा शूट केला वगैरे वगैरे. तो लेख वाचून मला फिल्म बघू वाटली होती. कोणाला हा माहितीपट कुठे पाहायला मिळेल याची माहिती आहे का?
कीर्तने पती-पत्नी पैसे घेऊन विविध संस्थामध्ये
कीर्तने पती-पत्नी पैसे घेऊन विविध संस्थामध्ये वगैरे या माहितीपटाचा शो ठेवतात. मिळालेल्या पैशातून कर्जफेड करतात आणि पुढच्या माहितीपटासाठी बीज भांडवल गोळा करतात.संशोधन ,लेखन वगैरे ठीक आहे. ज्या माध्यमाची जाण नाही त्यात,थोर लोकांच्या कार्याची विल्हेवाट लावणे म्हणजे वेळ, श्रम आणि पैशाची नासाडी आहे. आम्ही दुर्गाबाईंच्या प्रेमापोटी हा अत्याचार सहन केला.
चित्रपटाचा काही अंश
चित्रपटाचा काही अंश इथे पाहता येईल -
चित्रण अतिशय शाळकरी आहे हे एवढ्या अंशावरूनही लक्षात यावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पहिलं दीडदोन मिनिट पाहिलं आणि
पहिलं दीडदोन मिनिट पाहिलं आणि ऐसी अक्षरेवरची चार टाळकी जमवून असले सिनेमे आपणही पाडावेत अशी इच्छा उफाळून वर आली.
अनुमोदन
अनुमोदन
मेहनत घेतली आहे
चित्रपटाचा अंश पाहिला. चित्रीकरण शाळकरी आहे याच्याशी सहमती.
==
मात्र तथ्याधारीत डॉक्युमेंटरी बनवताना मोठमोठे दिग्दर्शक जे त्या त्या काळाच्या उभारणीकडे दुर्लक्ष करतात ते इथे टळले आहे हे आवडलेही (आता हे संपूर्ण चित्रपटात आहे का कल्पना नाही पण दुर्गाबाइंच्या भाषणाच्यावेळी तत्कालीन माइक्स दाखवणे, कॉलेजचे वातावरण दाखवताना तत्कालीन पोशाख दाखवणे, पुढिल आयुष्यात तरुण स्त्रियापाचवारी नेसू लागल्या आहेत हे ही सुचित करणे इत्यादी गोष्टी आवडल्या).
शिवाय विविध व्यक्तींचे फोटो जमवण्यापासून ते मुलाखती घेण्यापर्यंतची मेहनतही घेतलेली वाटली.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दुर्गाबाई भागवतांच्या अचानक
अफलातून सुरुवात.
हे भारीच.
-------------
हसून हसून पुरेवाट प्रकार आहे हा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बेक्कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
बेक्कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
==)
हम्म, लोकांना भारी उत्साह
हम्म, लोकांना भारी उत्साह असतो.
बाकी घार्या डोळ्यांचा मेकप म्हणजे ज्यामच भीतिदायक असणार!
अवघड आहे.. 'आनंदीबाई जोशी:
अवघड आहे.. 'आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तव्य' वाचून कीर्तनेबाईंबद्दल आदर वाटला होता. पार वाट लावून टाकलीय त्यांनी या फिल्मची. त्यांनी पुस्तकेच लिहावी हे उत्तम!
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
मकी, ब्लॉगपोस्ट खूप आवडली.
मकी, ब्लॉगपोस्ट खूप आवडली.
लिंक आवडली .
<'आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तव्य' वाचून कीर्तनेबाईंबद्दल आदर वाटला होता.> या कार्याबद्दल आदर अजूनही आहेच.
दोघींनाही थँक्यू..
दोघींनाही थँक्यू..
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
तरीहि प्रयत्न चांगला आहे.
वरचा ६ मिनिटांचा तुकडा पाहिला. चित्रपटनिर्मितिशास्त्राच्या भिंगामधून पाहिल्यास एकूण चित्रपट बाळबोध वाटतो आणि पात्रांचे कपडे, बोलणे, मागचे नेपथ्य कालसंगत वाटत नाही. अलीकडच्या रानडे, टिळक, बालगंधर्व ह्यांच्यावरील चित्रपट/मालिका ह्यांच्याबद्दल हेच म्हणता येईल.
तरीहि मला अशा प्रयत्नांची प्रशंसा करावीशी वाटते अशासाठी की त्यामुळे स्मरणीय व्यक्तींच्या आयुष्याचे आणि त्यांच्याशी संबंधित जागा, व्यक्ति ह्यांचे documentation कोठेतरी होते आणि ते यूट्यूबसारख्या माध्यमांमधून सार्वकालीन टिकण्याची अपेक्षा वाढते. असा कोठलाच तपशील स्वतः फार महत्त्वाचा नसेल पण एका ठिकाणी ह्या सर्व बाबी पाहण्यास मिळणे हे दुरापास्त असते. ह्याच चित्रपटातील मला दिसलेल्या आणि पूर्वी माहीत नसलेल्या दोनचार गोष्टी सांगतो.
दुर्गाबाईंची मुंबईतील जुन्या घरातील राहती जागा कशी होती ह्याचा अंदाज आला. त्या एशिअॅटिकच्या लायब्ररीत दिवसाचा बराच काळ असत हे माहीत होते पण त्यांना आणीबाणीतील अटक तेथे झाली हे नव्याने कळले. एशिअॅटिकचा गोल जिना - ज्याच्या तळाशी जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे मोठे संगरवरी शिल्प आहे - तोहि दिसला. डॉ. घुर्येंचा फोटो दिसला. दुर्गाबाई एका छायाचित्रात एका आरामखुर्चीत बसलेल्या दिसतात. ही त्यांची आवडती बसण्याची खुर्ची असणार पण मला हा वैयक्तिक तपशील माहीत नव्हता तो चित्रपटामुळे कळला. असे अनेक तपशील कळले. (असे तपशील मनात कोठेतरी टिकून राहतात. गो.स.सरदेसाईंची अशीच एक आवडती खुर्ची होती, जिच्यावर ते नेहमी बसत. आपले दहन त्याच खुर्चीवर बसलेल्या स्थितीत केले जावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि तसेच झाले हा किरकोळ पण हृद्य तपशील मी फार वर्षांपूर्वी कोठेतरी वाचला होता तो आत्ता ह्या निमित्तने आठवला.) दुर्गाबाईंची आठवण टिकावी असे ज्यांना वाटते त्यांच्या लेखी असे तपशीलहि महत्त्वाचे असतात. व्यक्तीच्या चरित्राला त्यामुळे भरीवपणा येतो.
शिवाजीसारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्याबाबत आपल्याला महत्त्वाच्या घटना आणि वर्षे ह्यापलीकडे जवळजवळ काहीच माहीत नसते. अशा व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्याचे तपशील कोठे नोंदवलेले मिळाले तर आपणास किती आनंद होईल? पण ते काम आता होण्याची शक्यता नाही. दुर्गाबाईंबाबत असे कोणी केले तर त्याच्या प्रयत्नांच्या एवढ्या भागची कृतज्ञतापूर्ण नॉद घ्यावी, त्याची संपूर्ण खिल्ली उडवू नये असे माझे वैयक्तिक मत नोंदवतो.
पूर्ण चित्रपट अजून पाहिलेला नाही पण काही गोष्टींची त्यात नोंद आहे काय अशी उत्सुकता आहे. दुर्गाबाई विदुषी होत्याच पण स्वैपाकहि उत्तम करीत. (भांडारकर इन्स्टिटयूटच्या बैठकांसाठी त्या पुण्याला जात तेव्हा मुद्दाम स्वैपाक करून अन्य सर्व सभासदांना खाऊ घालत असे वाचले आहे. भाज्यांची डेखे, साली साधारणतः टाकून देण्यात येतात पण अशा गोष्टी वापरून कायकाय पदार्थ बनवता येतात ह्याच्य अनेक कल्पना दुर्गाबाईंजवळ होत्या आणि त्यांवर त्यांनी आणि त्याच्या भगिनी डॉ. कमलाताई सोहोनी (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स) ह्यांनी एक लेखमालिका गुंफली होती. आपण आणि इरावतीबाई कर्वे ह्यांच्यामध्ये डावेउजवे करून घुर्येंनी आपल्यावर अन्याय केला असे दुर्गाबाईंना वाटत असे असे ऐकिवात आहे. दुर्गाबाईंना त्याच्या उतारवयात अशोक शहाणे आणि मित्र असा एक तरुण फॅनक्लब - जो एशिअॅटिअकमध्येच पडिक असे - मिळाला होता. अशा गोष्टी ह्या चित्रपटात आहेत काय?
प्रतिसाद आवडला. ____ बाकी
प्रतिसाद आवडला.
____
बाकी चित्रपट पाहीला नसल्याने माझा पास.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
दुर्गाबाईंबाबत असे कोणी केले
सहमत आहे. ज्यांना माध्यमाची जाण नाही अशा लोकांनी माहितीपट काढु नये अशा आशयाचे सूर इथे आळवले गेले. मुद्दा असा कि ज्यांना जाण आहे त्यांनी इतके वर्षे मग काय केल? त्यांना का नाही माहितीपट काढावासा वाटला? माध्यमाची जाण असलेले लोक चांगल्या दर्जाचा लघुपट काढू शकतात पण त्यासाठी लागणारे आर्थिक गणिताच मेळ कोण बसवणार? व कशासाठी बसवणार? बर्याचदा उद्योगपती, समाजसेवक, विद्वान यांच्यावरचे लघु/माहिती पट त्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभार्थी व्यक्ती वा संस्था किंवा प्रेम व आदरापोटी त्यांचे कुटुंबीय/ हितचिंतक काढतात. अतुल पेठेंकडून असे अनेक दर्जेदार लघुपट तयार करुन घेण्यात आलेले आहेत.
स्वतः तर काही करायच नाही पण जे आपल्या कुवतीनुसार करतात त्यांची खिल्ली उडवत राहायच असा वर्ग समाजात नेहमीच असतो. तरी देखील काही माणस स्वत:ला खाज म्हणुन काहीतरी करत राहतात.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
तसे म्हणणे नाही
>>ज्यांना माध्यमाची जाण नाही अशा लोकांनी माहितीपट काढु नये अशा आशयाचे सूर इथे आळवले गेले. मुद्दा असा कि ज्यांना जाण आहे त्यांनी इतके वर्षे मग काय केल? त्यांना का नाही माहितीपट काढावासा वाटला?
माहितीपट काढावासा वाटणे आणि प्रत्यक्ष काढणे यात फरक आहे. ज्याला माहितीपट काढावासा वाटतो त्याने तो काढावा पक्षी - त्याचा खर्च उचलावा, लोकांकडून पैसे जमवावे, रिसर्च करावा, माहिती जमवावी. पण माध्यमाची जाण नसेल तर त्याचे पटकथा-दिग्दर्शन-छायाचित्रण जाणकाराकडून करून घ्यावे.
मला एखाद्या व्यक्तीचा पुतळा असावा असे वाटणे ठीक आहे. पण तो मीच बनवायला गेलो तर आफत होईल. तो मी शिल्पकाराकडूनच बनवून घ्यायला हवा. त्यासाठीचा खर्च भले मी करीन, शिल्पकार शोधीन, त्याला पटवीन, मोबदला ठरवीन, पैसे जमा करीन, दगड आणून देईन, सब्जेक्टचे फोटो आणून देईन. पुतळा मी बनवणार नाही.
डिस्क्लेमर: अंजली कीर्तने यांच्या माध्यम ज्ञानाबाबत मला काहीही माहिती नाही. मी 'इतरांनी इतकी वर्षे का नाही बनवला? मग आता ज्यांनी बनवला तो कसाही असला तरी गोड मानून घ्यायला हवा' याबाबतचे मत व्यक्त करीत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुम्ही जेंव्हा एखादी कलाकृती
तुम्ही जेंव्हा एखादी कलाकृती पब्लिक डोमेन मधे आणता तेंव्हा त्याला एक मिनिमम दर्जा असणे आवश्यक आहे. घरी नातेवाईकांना दाखवण्यासाठी पट काढायचा असेल तर तो कसल्याही दर्जाचा काढावा, कोणी काही तक्रार करणार नाही.
आणि ज्या व्यक्ती बद्दल असा माहीतीपट काढत आहोत तिच्या भरजरी पैठणीला आपण घाणेरडे ठीगळ तर लावत नाही ना हा विचार करणे पण आवश्यक.
दुर्गाबाईंची पाककला
दुर्गाबाईंचे खमंग नावाचे पाककृतींचे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे, त्याची प्रस्तावनाही रोचक आहे.
माझं मत
मला वाटतं की चित्रपटकर्तीनं तुम्ही म्हणताय तशा पद्धतीचं साधंसरळ डॉक्युमेंटेशन करण्याचा नीटस प्रयत्न केला असता, तर मलाही चित्रपट बघताना इतका त्रास झाला नसता. ह्या चित्रपटात वापरलेल्या नटांमुळे दुर्गाबाईंसारख्या व्यक्तिमत्वाला न्याय तर मिळत नाहीच, तर उलट त्यांची थट्टाच होते असं मला वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अनेक पैलू
दुर्गाबाईना भरतकाम आणि विणकामातही अतिशय रस आणि पारंगतता होती. देशातल्या वेगवेगळ्या भागातले भरतकामातील टाक्यांचे नमुने त्यांनी जपून ठेवले होते. ते वापरून त्यांनी स्वतः काही रचना (डिज़ाइन्स) बनवल्या होत्या. (याविषयी एक किंवदन्ति वाचली आहे पण केवळ आठवणीवर आधारित असे काही लिहिणे योग्य नव्हे म्हणून लिहीत नाही. पण त्या भरतकाम उत्कृष्ट करीत हे खरे.)
'कालनिर्णय'चे साळगावकर कालनिर्णयसाठी एक पाककृतिस्पर्धा घेत. १९८७ सालच्या स्पर्धेतल्या उल्लेखनीय पाककृती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या गेल्या. त्या पुस्तकाला दुर्गाबाईची अभ्यासपूर्ण आणि दीर्घ प्रस्तावना आहे. म.टा. किंवा लोकसत्तामध्ये त्यांनी खमंग आणि ... (पूर्ण नाव आठवत नाही म्हणून टिंब टिंब.) असे सदर चालवले होते. त्याचेही पुस्तक त्याच नावाने निघालेले आहे. शंकर सखारामांचा 'खापुर्ला' नावाचा एका वेगळ्या भाकरीवरचा लेख दैनिकात प्रसिद्ध झाला होता त्याला त्यांनी मनापासून दाद दिली होती. सतीश काळसेकरांच्या आईकडून 'सातकापे घावन' नावाचा एक प्रकार त्यांनी शिकून घेतला होता अशी आठवणही वाचल्याचे आठवते. पाण्याचा हात लावून हातावर भाकरी थापणे ही गोष्ट त्यांना मोठी कौशल्यपूर्ण वाटे आणि त्यांना ती शिकायची होती. या संदर्भात त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटात रत्नमालाबाईंनी कुशलतेने हातावर भाकरी थापल्याच्या सीनचा उल्लेख केला आहे.
त्यांची पुस्तके वाचत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि विद्वत्तेचे अनेक कंगोरे लक्षात येत राहातात. त्यांची पुस्तके वाचणे हेच त्यांची स्मृती जपणे आहे. माहितीपट पाहून आपल्याला दुर्गाबाई दिसतील त्या निर्मातीच्या दृष्टिकोनातून. दिव्यावदान किंवा कादंबरीसारखे प्रचंड काम त्यांनी कसे केले याची कल्पना माहितीपटातून येणार नाही की त्यांच्या पृथक्करणात्मक अशा धारदार बुद्धिमत्तेचे तेजही कळणार नाही.
अशोक शहाण्यांबरोबरच विश्वास पाटील (पानिपतकार नव्हेत) यांचाही उल्लेख उतारवयातील त्यांचे चाहते, सुहृद आणि सोबती म्हणून व्हायला हवा.
दुर्दैवाने, पुढल्या पिढीपर्यंत त्यांची आठवण पोचेल ती फक्त 'आणीबाणीतली रणरागिणी' अशीच आणि इतकीच, याचे वाईट वाटते.
सहमत, पण
चित्रण, संवाद, नेपथ्य, सारेच अगदी अगदी बघवले नाही. तरीपण कोल्हतकरांचा मुद्दा पटला.
मात्र वरील नमुन्याचा दर्जा इतका सुमार आहे की पूर्ण माहितीपट बघणे अति कंटाळवाणे होणार. बघण्यापेक्षा त्याबद्दल वाचणेच मला झेपेल.
हे त्या सावरकर चित्रपटापेक्षाही रटाळ वाटते आहे.
योगायोग
योगायोगाने आजच्याच लोकसत्तेमध्ये दुर्गाबाईंच्या १९७५ कर्हाड संमेलनातील भाषणाचा सारांश वाचला. त्यातील एक अल्प भाग वरच्या क्लिपमध्येहि आहे.
माहितीपट काढल्याने नक्की काय
माहितीपट काढल्याने नक्की काय होते? कोट्यवधी मराठी लोक आहेत ज्यांना दुर्गा भागवत माहित नसतील आणि माहित व्हायची शक्यताही नसेल. ज्यांना थोडीफार माहिती आहे; त्यांना आणखी तपशीलवार माहिती मिळून नक्की काय फरक पडतो?
दुर्गाबाईंच्या कार्यक्षेत्रातील लोक अशा माहितीपटांवर अवलंबून असतात का? असे म्हणजे उदाहरणार्थ अनेक प्रश्न पडतात.
अशी अनेक प्रकारची निरुपयोगी माहिती गोळा करण्याचे प्रयोजन काय? केवळ लोकांनी बहुश्रुत म्हणावे म्हणून?
(ज्याने आपल्याला नजिकच्या भविष्यात फरक पडेल अशा माहितीबद्दल मात्र लोक प्रचंड उदासीन असतात.)
पटाचं वर्णन वाचून हा चित्रपट
पटाचं वर्णन वाचून हा चित्रपट वाटला, माहितीपटात अभिनेते उभे करत नाहीत. "माध्यमाची जाण नसेल तर त्याचे पटकथा-दिग्दर्शन-छायाचित्रण जाणकाराकडून करून घ्यावे," हे मत पटलं.
बाकी उसंत सखू यांना उदंड चित्रपट बघायला मिळोत आणि त्यांचा टंकनाचा वेग सतत वाढतच राहो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
घाटात ब्रेक तुटून उतारावर घरंगळत चाललेल्या वाहनासारखा?
"घाटात ब्रेक तुटून उतारावर
"घाटात ब्रेक तुटून उतारावर घरंगळत चाललेल्या वाहनासारखा" टंकनाचा वेग वाढण्यात मला तरी धोका दिसत नाही. प्रकाशित करण्याचा वेग निराळा. आणि लेखन 'होण्याचा' वेग आणखीनच निराळा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बहुधा न'वी बाजू स्वानुभवावरून
बहुधा न'वी बाजू स्वानुभवावरून विचारीत असावेत...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हा हा हा!
वाट लावलीय व्यवस्थित! नुसत्या त्या सहा मिनिटांच्या स्नॅपशॉटवरून हा संपूर्ण प्रकार किती येडझवा असेल याची कल्पना येते. दुर्भाग्य!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला