रैना
ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.
सगळं जग स्वार्थी असतं मात्र त्यात एका निस्वार्थ नात्याला जागा अवश्य असते. नेमकं तेच नातं ईश्वराला पाहवलेलं नसतं. मात्र नसलेली व्यक्ति नाही असं प्रत्यक्षात नसतंच. रात्रीच्या एकांताच्या वेळी ती हरवलेली व्यक्ति इतकी प्रतिक्रियाशील होऊन जाते कि ती नाहीये असा निष्कर्ष काढणं अवघड होऊन जातं. ती कशी दिसेल, कशी बसेल, कशी बोलेल, काय बोलेल, काय करेल, तिने काय घातलेलं असेल, तिचे अविर्भाव कसे असतील, ती कशी वागेल हे सगळं इतकं सुस्पष्ट ठावं असतं कि हे सगळं आपण कल्पना करतोय हे देखील विसरून जायला होतं. तिथे बाह्य जगाच्या दृष्टीनं जो एकांत आहे त्याचं अनुभवकर्त्यासाठी खर्या अर्थानं सहवासात परिवर्तन झालेलं असतं. ही विरहदायी व्यक्ति कोणाची आई असेल, पिता असेल, पत्नी असेल, मित्र असेल, प्रेयसी असेल वा अजून कोणी असेल; अस्सल प्रेमाच्या ठिकाणी ही रात्रीभेट कधीकधी अवश्य होते. ही विरहकर्ती, ती अदृश्य भेटकर्ती आणि त्यांचं भावविश्व कसं असेल हे डोकाऊन पाहावयाचं असेल तर बिती ना बिताई रैना हे गाणं एकवार एकांतात बसून अवश्य ऐकावं.
१९८७-८८? तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. आमच्या घरमालकाच्या पोरींबरोबर उदगीरमधल्या कॅटल क्लास वस्तीतून मी दुधाच्या केटल्या घेऊन नविन बंगल्याबंगल्यांच्या सुखवस्तू निडेबन वेशीकडं जायचो. तिथे एखाद्या त्यातल्या त्यात फ्रेंडली बंगलेवाल्याकडं सगळ्या केटल्या टेकवायच्या नि त्या पोरींचं दूध वितरण चालू व्हायचं. कदाचित दुधाच्या नफ्यात मला हिस्सा नाही म्हणून पायपीट करायचे कष्ट मला न देता तिथेच बसून केटल्यांचे संरक्षण करण्याचे सोपे काम मी करावे असा विचार त्या करत आणि मी कदाचित पोरींचा सहवास हाच पुरेसा मोबदला मानत असेन. त्या उच्चभ्रू लोकांच्याकडे टीवी असे नि घरात प्रवेश नसला तरी बाहेरूनच खिडकीतून आत पलंगावर बसलेल्या लोकांच्या मानांमधल्या दर्यांतून त्यांच्या फुलझाडांच्या कुंड्यांमधे पाय ठेवायला जागा शोधत टीवी पाहण्याची मुभा मला होती. अशा प्रकारे मी खिडकितून टीवी पाहत असताना पहिल्यांदा मला टीवीतही खिडकीतून पाहणारी ती पोरगी नजरेस पडली. तिच्या घरातल्या त्या पापुद्रे आलेल्या भिंती, काही जागी टवके पडलेले, त्या भिंतींचा उडालेला रंग, घरात इतकंही काही नीटनीटकं न ठेवलेलं सामान, घरातले अंधारलेले कोपरे, आजारलेलं एक माणूस आणि अगदी साधे कपडे घालून मेकप न करता बसलेली एक साधी पोरगी - हे सिनेदृश्य असलं तरी भपकेबाज असं काहीच नव्हतं त्यात. उलट एक खूप जवळीक वाटलेली. आजही वाटते. घरी येणारांसमोर घर एका विशिष्ट प्रेझेंटेबल अवस्थेत असावं असा हव्यास बरीच मंडळी धरतात नि भेटीगाठीच टाळतात हे निदर्शनाला आल्यापासून या पोरीच्या घराबद्दलची आपुलकी थोडी वाढलीच आहे.
बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुयी अँखियोंने लाख बुझाई रैना
त्यावेळेस मला रैना म्हणजे काय ते माहित नव्हतं, आता मला रैना शब्दाचा मी तेव्हा काय अर्थ काढायचो ते आठवत नाही. पण काहीतरी संपत नाहीय असं ती म्हणतेय हे कळे नि नक्कीच ते सुसह्य नव्हतं हे तिच्या नि तिच्या पित्याच्या भावसंवादातून उमजे. रैना म्हणजे काहीतरी विझवायची ज्वालाग्राही गोष्ट असावी. आणि ती ज्वाला विझली कि शांत झोप येत असावी. मात्र कितीही रडून झालं तरी ती ज्वाला काही विझत नाहीय इतका त्या मुलीला आपल्या आईचा विरह होतोय. आता चाळीशीत आल्यावर मला कदाचित लोकांना आई नसण्याची सवय झालीय. म्हणजे क्रिकेटमधे आपण टॉस जिंकतो वा हारतो, नाणं पाहायचं, अल्पसं हळहळायचं नि पुढे कामाला लागायचं. तशी कोणाला आई असते वा नसते, ऐकायचं, 'ओह सॉरी' म्हणायचं आणि पुढे कामाला लागायचं. तसं तेव्हा नव्हतं. एखाद्याला आई नसणं म्हणजे नक्की काय काय नसणं हे तेव्हा कळत असे नि व्यक्तिच्या दु:खाची संपूर्ण अनुभूती येत असे. प्रेमगीतं आवडायचं वय ते (तुम्हाला हे थोडं लवकर झालं असं वाटेल, पण असो तो विषय), पण त्या मुलीनं आपल्या देवाघरी गेलेल्या आईला गायलेली ही बॉलिवूडी रॅरिटी मला फार भावून गेली. आई नसणं म्हणजे फक्त मातृदत्त सुखं नसणं ही माझी अनुभूतीची मर्यादा हे गाणं त्या कोवळ्या वयात विस्तारित करून गेलं. भविष्यात मिळणारी सुखं गेली ते गेलीच मात्र भूतकाळात मिळालेली सुखं देखिल पिच्छा सोडत नाहीत. ती वारंवार त्यांचा नॉन-रेप्लिनेशेबलपणा कसा अद्वितीय आहे हे सांगून पिडतात. ते तर सोडाच, भूतकाळात ज्या सुखांना सुख हे लेबल लावलेलंच नव्हतं ती सुखं वर्तमानात देखील त्यांचे चेतासंदेश किती प्रबल आहेत हे वेळोवेळा सिद्ध करतात.
बीती हुयी बतियाँ कोई दोहराये
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
चाँद की बिंदी वाली, बिंदीवाली रतिया
जागी हुयी अखियों में रात ना आयी रैना
इंजिनिअरिंगच्या परीक्षा संपल्यात. पुण्यावरनं लातूरला जाणारा मी एकटाच आहे. एक महिन्याची सुट्टी आहे. लालडब्ब्याची बस इंदापूरपुढे कुठेतरी एका ढाब्यावर थांबते. सलग तासंतास बसून कंबरडे ताणलेले सगळे प्रवासी तिथे उतरतात. ढाब्यावरही आणि बसमधेही फार काही लोक नाहीत. हायवेवरून ४-५ मिनिटांनी एखादी गाडी जातेय. ढाब्यापुढे बाजा मांडलेल्या आहेत. दणकून भूक लागलेली आहे. बाजूला एखादं कुटुंब एकमेकांना आग्रह करण्यात, खाऊ घालण्यात मग्न झालं आहे. सगळीकडे अंधारलेलं आहे. ढाब्याच्या प्रत्येक खाटेला एक कंदिल दिला आहे. फक्त काउंटरवर विजेचा दिवा असावा. कमीत कमी बिलामधे जास्तीत प्रमाणात नक्की काय येतं इतका मेनू परिचय नसल्यामुळं नि वेटरला तसं थेट विचारणं हिमतीबाहेरचं असल्यामुळं माझं देखील काहीतरी ऑर्डर करून झालंय. शिवाय किती मिनिटात जेवण उरकायचं आहे त्याची धास्ती कंडक्टरने लावून दिली आहेच. तितक्यात ढाब्याच्या खांबावर लटकावलेला रेडिओ त्या न सरणार्या रैनेचं गीत गाऊ लागतो नि माझं या गीताचं दुसरं श्रवण चालू होतं. यावेळेस मात्र मी पहिल्यापेक्षा फार स्मार्ट माणूस झालो आहे. कॉलेजमधल्या हिंदी मुलांमुळे माझी हिंदी पक्की झाली आहे. तिला आता कोणी हसत नाही. काश्मिरच्या रैना आडनावाच्या मुलानंच मला रैना म्हणजे रात्र असा अर्थ सांगीतलेला आहे. गाण्याच्या प्रारंभीच्या तंतूवाद्याच्या आघातांची ताकद अफाट आहे. त्या एकेका आघातामधे काहीतरी गूढ, गुह्य, गुप्त आहे. त्या एकेका पडघमामधे हृदयाचा एकेक कप्पा खोलत आतवर खोल शिरायचं सामर्थ्य आहे. त्या ढाब्यावरच मला माझं हृदय अंतर्बाह्य दाखवलं जातंय. वास्तविक माझ्या आयुष्यात कोणीही माझ्यापासून तसं दूर गेलेलं नाही. टच्चूड, पण माझी स्वतःची आई तर अगदी धडधाकट आहे. पण तरीही गाणं ऐकताना काहीतरी कालवाकालव होतेय. हे जितकं मातृविरहगीत आहे तितकंच ते भावविरहगीतही आहे हे मला जाणवतं. मी मला नक्की काय सोडून गेलं म्हणून सैरभैर होऊन शोध घेऊ लागतो. सात्विक, समाधानी लोकांच्या हरितप्रदेशातून मी कोरड्या, असंतुष्ट लोकांच्या मरुभूमीत येऊन पडलोय का? लहानपणीची गावं आपण नक्की कशासाठी सोडली? आपण जिथे आहोत तिथलं सगळं आपल्याला आवडतं का? आजूबाजूचं सगळं आवडायला हवं असा विचारच विपरित आहे असं मानणार्या लोकांत कदाचित आपण केवळ स्वतःसच स्वतःचं कुढणं माहित असलेले 'सामान्य' व्यक्ति तर नाहीत? आपण वयाने मोठे झालो आहोत म्हणून असं होतंय कि आपण स्थलांतरित झालो आहोत म्हणून असं होतंय? जास्त जाण आली कि जगाचा वाईटपणा जास्त प्रकर्षानं जाणवायला लागतो. तसं झालंय का आपलं? मूळात सगळं चांगलंच आहे, वा सगळं चांगलंच होईल, वा सगळं चागलं आपण स्वतः करू शकू असा शाळकरी आशावाद आता चार सहा महिन्यांत जबाददारी अंगावर घ्यायची वेळ आली आहे तेव्हा मूर्खपणा का वाटतोय? जगासाठी आपल्याला काय काय करायचं होतं? ते सगळं करण्याला आपण मुकून एका सिमित चक्राला बांधले जाणार. अस्वस्थ करत होतं सगळं. एरवी मन विषाची सवय झालेल्या शरीरासारखं असतं, पण हे रात्रीगीत ऐकलं कि ते गाणं ते विष सगळं ढवळून काढतं आणि ते चांगलंच उफाळून येतं, भिनतं. ती रात्र खरोखरंच अवघड असते. खिडकीतून मी अंधारच्या सावल्या पाहत मी मी, लोक, जग, ईश्वर कोण कुणीकडे का चाललंय याचा विचार करत असतो, बस लातूरकडे मार्गस्थ झालेली असते. सकाळी मी फार थकून उठलेला असतो, न जाणारी रात्र खरोखरीच फार लांब असते याची पहिली सिद्धता मला मिळालेली असते.
युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए
पेट्रोल नि डिझेलचा वास मारणारी गोंगाटी शहरं मला आवडत नाहीत म्हणून मी कूलू नि मनाली दोन्ही शहरं गैरसोयीची पडावीत अशा मधल्या जागी थांबलोय. हे वातावरण दिल्लीच्या दमट, उष्ण आणि रोगट वातावरणाच्या माणसासाठी स्वर्ग आहे. बायको, मुलगा, मित्र, त्याचे कुटुंबीय यांच्यासोबत खूप भटकंती केलीय. हिमालयामधे कार चालवण्याचा आनंद घेतला आहे. संध्याकाळचं जेवण झालंय. अंती तोंडात क्षणात विरघळतील असे टपोर गुलाबजाम खाऊन झालेत. त्याचा सुवासिक पाक देखील मनसोक्त चाटून झालाय. सूर्यास्त केव्हाचा झालाय नि समोरची बर्फाच्छादित पहाडे दिसताहेत कि नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या खूप खूप खाली एखादा दिवा तिथे काहीतरी आहे याची साक्ष आहे. मी एकटाच बाहेर फिरायला आलोय. मी खूप थकलोय, पण रात्रीचं, एकांताचं, शांततेचं सौंदर्य पाहायचं अजून उरलंय. अलिकडे एकांत मिळणं बंदच झालेलं आहे. मागे एकट्यानी कधी काय केलं ते आठवतच नाही. कष्ट, कर्म, ताण आणि सुख, स्वच्छंदीपणा यांनी आठवड्याचं आणि वर्षाचं २:५ आणि ३०: (३६५-३०) असं आपापसांत विभाजन करून घेतलं आहे. त्यातला सुखकाल चालू आहे म्हणून मी जाम खुष आहे. वस्तीपासून दूर मी एका दगडावर येऊन बसतो. खाली खोल घळईत दोन उंचच्या उंच समांतर पर्वतांच्या रांगांमधून व्यास नदीचा ओघ वाहत आहे. पाण्याचे अणूरेणू हातात हात घालून एकमेकांना जुन्यापुराण्या प्रवासाच्या गोष्टी सांगताहेत. दिवसा भीडेने चेपलेल्या त्या कणांना रात्रीच्या वेळी खूप आत्मविश्वास आला आहे. बेरात्री घाटांमधे निघालेल्या एखादा द्वाड ट्रक त्यांना बोलण्यात व्यत्यय न होईल याची काळजी घेत गुमान चालला आहे. त्याचा वाहता प्रकाश नागमोडी वळणांच्या रस्त्यावर कधी दिसतोय, कधी दिसत नाहीय इतकीच काय ती त्याच्या असण्याची साक्ष. त्या प्रकाशात उजळून निघालेली झाडं त्या वाहनाला आपल्या विस्ताराची, रादर त्याच्या क्षुद्र आकाराची, अहंपूर्वक जाणिव करून देतात नि क्षणार्धात गडप होतात. हा लपंडाव पाहत मी बराच वेळ पाण्याच्या कणांचं बोलणं ऐकत असतो. त्यांना कुठं जायचं असेल? त्यांचा प्लॅन काय? त्यांना अथांग महासागरात कुठेतरी पडून राहायला जास्त आवडत असेल कि कोण्या झाडाच्या मूळातून पानाकडे शिरायला आवडत असेल? आम्हा माणसांबद्दल त्यांचं काय मत असेल?
अशावेळी सहसा मी गाणी ऐकतच नाही नि ऐकली तर भावगीतं ऐकतो. पण यावेळेस का कोण जाणे, वाटलं आपल्या यादीतल्या शेकडो गाण्यांपैकी एखादं गाणं रँडमली वाजवावं. कमाल म्हणजे पुन्हा व्हायोलिनवर बिती ना बिताई रैना चालू झालं. (https://www.kkbox.com/hk/en/album/Cx-a6FsPk5fBGu0FG4Oo0091-index.html) आवडीचं म्हणून हे गाणं कित्येकदा ऐकलं होतं, मात्र वाद्यसंगीत म्हणून क्वचित. पुन्हा ते पडघम वाजले नि अंतःकरणाची सगळी पटलं उघडली. तसा मांजर जसं दूध पितं तसं मी हे गाणं ऐकतो. ते दूध देणारी गाय कोणती, ते गरम कोणी केलं, थंड कोणी केलं, बशीत कोणी घातलं, आणून कोणी दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नसतं.
काळ नावाचं असं सवतं काही असतंच का? या ब्रह्मांडाच्या बाहेर नेऊन न्याहाळून पाहू शकू असा काळ नावाचा कोणता पदार्थ आहे का? कि जे सामान्यतः इंट्यूशन होतं कि अन्य बाबींतील बदलांच्या गतींचे जे परस्परसंबंध आहेत त्यांच्यावरच काळ असण्याचा सोयीचा आरोप केला गेला आहे? आईनस्टाइननं तर काळ आणि अवकाश यांचं संयुज असतं आणि ते वाकतं, मंदावतं, थांबतं, धावतं असं सांगीतलं आहे. जगातल्या सर्वात बुद्धीमान माणसानं सांगीतलं आहे तर काळ नावाचं एक सवतं सत्य असावं खरं. काळाचा हा सापेक्षतावाद मला कधीही झेपला नाही. पण रात्र सरण्यामधला सापेक्षतावाद जो कवीनं सांगीतला आहे तो चटकन उमजतो नि भावतो. युगं सरतात पण आठवणींचे काही क्षण त्यांच्यापेक्षा दीर्घायुषी वाटतात. तशी आयुष्याची डिटेल्ड समरी करायला सांगीतली तर माझं तास दोन तासांत सांगून होईल, पण अशा काही मोजक्या आठवणी आहेत, मी मलाच सांगत राहीन आणि माझ्यातलाच एक दुसरा मी ऐकतच राहील आणि ती गोष्ट कधीच संपणार नाही. आता मी अशा क्षणांचं रवंथ करायला चालू करतो. विसरलेले क्षण, न विसरता येणारे क्षण, विसरलेले लोक, न विसरता येणारे लोक, आयुष्यात विशेष स्थान असलेल्या जागा, परतून न जायच्या जागा, विसरलेल्या सवयी, विसरलेले स्वभावपदर, न विसरता येण्यासारखे काही जणांचे शब्द, ... बरंच काही आठवत राहतं. मनात एक काहूर उठतं. हे गीत जितकं विरहगीत आहे तितकंच ते वादळगीत देखील आहे. आठवणींच्या पिटार्यातून कितीतरी सिनेमांच्या क्लिप्स रिमिक्स होऊन अव्याहतपणे सुसाटपणे डोळ्यासमोर पळायला लागतात. पापण्यांच्या खालच्या पेशींना मेंदू संदेश देणारच असतो तितक्यात बायकोचा फोन येतो नि वादळ शमवून मी हॉटेलकडे चालू लागतो. तिच्या पदराखाली मी ५-१० मिनिटानी निवांत झोपणार असतो. किमान हिच्या आठवणींत मला हे गाणं कधीच ऐकायला लागू नये असं इश्वराला मनोमन घोकत मी हॉटेलमधे पोचतो नि हुरहुर शांत झाल्यावर रैना नकळत सरून जाते.
झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अखियों ने, लाख मनाई रैना
घरात मी एकटाच असाच टीवीचे चॅनेल चाळत असतो. परिचय, हे गाणं ज्यात आहे तो सिनेमा लागलाय. सिनेमा पाहावा का ठेवावा असा विचार मी करतोय. भावूकतेचे जास्त संदर्भ माहित झाले तर भाव कोरडे होतात असा अनुभव आहे. नेहमीप्रमाणे आल्याड पल्याड करत मी मधे मधे काही सीन पाहतोय. आपल्या मातेला नि पित्याला आपले कठोर हृदयाचे आजोबा घरातून काढून टाकतात म्हणून मनात अढी ठेऊन असलेल्या नातीस त्या कठोर आवरणाखाली दडलेल्या आजोबांच्या मृदू, प्रेमळ आत्म्याचा परिचय होतो अशी छोटीशी कथा! त्यातल्या नातीने नि तिच्या वडिलांनी त्यांच्या बिकट परिस्थितीच्या काळात मरण पावलेल्या आईच्या आठवणीत हे गाणं. पुन्हा तंतूनाद होतात नि पुन्हा हृदयाचे कप्पे उघडले जातात. एकटं गाठून माझ्या अंतःकरणाला निर्वस्त्र करण्याची या गाण्याला सवयच जडलीय. आयुष्यात फार काही शत्रूसंग्रह केलेला नाहीय परंतु ज्यांच्याबद्दल अवधारणा आहेत असे लोक नाहीतच असं नाही. आपण खरोखरच लोकांशी न्याय्यपणे वागलो आहोत का असा विचार मी करतो. एकेका प्रतिमापतिताची फ्रेम माझ्या डोळ्यासमोरून सरकतेय. अगोदर चांगले वाटलेले, नंतर वाईट वाटलेले. अगोदर वाईट भासल्याने दूर ठेवलेले, नंतर फार छान निघालेले. गळेपडू म्हणून तिटकारलेले. कोरडे म्हणून टाळलेले. इन्कंपॅटिबल म्हणून चार हात दूर ठेवलेले. जोखमीचे वाटले म्हणून अव्हेरलेले. हलकीशी घमेंड दाखवल्यामुळे आयुष्यभरासाठी मित्र बनण्याचे पोटेंशिअल नाही असे मानलेले. मी चांगले वागत असतानाही तिढा ठेऊन वागणारे. अंगावर काहीतरी जबाबदारी टाकतील असे वाटलेले असे आणि असले बरेचशे. आयुष्यात कधी एका जागी स्थिर राहिलो नाही. खूप सर्कल्स बदलली. जास्त तापमान आणि जास्त दाबाखाली जास्त तास लागणार्या प्रक्रिया आयुष्यात कधीच झाल्याच नाहीत. जे काही घडलं ते फटाफट घडलं. माणसांबद्दल मत बनवायला फार काही वेळ नव्हता. आपण फार ओपन आहोत, लिबरल आहोत, फ्रेंडली आहोत असा समज नक्की किती सुयोग्य आहे हे क्रॉसचेक करून पाहावं असं कधी वाटलं नाही. ज्यांच्या भिन्न भिन्न ऋण प्रतिमा आहेत असे कितीतरी चेहरे मी नजरेसमोरून घालतो. मी यश पावतो, माझं काही भलं होतं तेव्हा त्यांच्याकडे एक अवहेलनात्मक कटाक्ष टाकतो नि माझे पाठीराखे, माझ्या गुडबूक्समधली माणसं,जी या विघ्नचिंतकांच्या कितीतरी पट आहेत, ती जोरजोरात हर्षोल्लास करत असतात. हे सगळे उत्सव समारंभ माझ्या मनातल्या स्टेडियममधे होत असतात. आयुष्यात प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी हे स्टेडियम खच्चून भरलेलं असतं. माझे सवंगडी भरपूर जल्लोष करत असतात. तिथली ही दुष्ट लोकांची पराभूत टिम हिरमसून गेलेली असते. माझ्या यशाचं त्यांना दु:ख असल्याची मला पूर्ण खात्री आहे. नि माझ्या बाजूच्या लोकांसमोर, लोकांसोबत त्यांना हिणवताना होणारा आनंद सार्थक आहे असंच मी मानत असतो. असंच मानत मी आयुष्य जगत आलेला असतो, मग ती मंडळी माझ्या दैनंदीन आयुष्यात नसोत नाहीतर या जगात नसोत! अचानक ती न सरणारी रैना मला आठवण करून देते कि ही हारकी टिम तुला कोणी लागत नाही का? किमान त्यातले काही? ती नाठाळ नात बनून किती दिवस राहायचं? कधीतरी त्या आजोबाच्या आत्म्याकडे निरपक्षपणे का नाही पाहायचं? मी पुन्हा त्या विघ्नचिंतकांच्या केसेसच्या फाईल्स उघडतो. बर्याच ठिकाणी मला माझा अहंकार, टोकाची प्रतिक्रिया, दाबून ठेवावा लागलेला राग, माहिती नसल्यामुळं करून घेतलेले गैरसमज, पूर्वग्रहदोष, संकुचित अस्मिता, ईर्ष्या, लोभ, स्वार्थ यांची एक तटस्थ म्हणून वकीली करता येत नाही. माझीच काही वर्तनं उघडीनागडी पडलेली दिसतात. रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते. जिथे माझ्याच ऋणगुणांचा परिणाम आहे अशा सगळ्या मंडळीना मी अल्लाद उचलून स्टेडियममधे माझ्या मित्रमंडळींमधेच कुठेतरी अॅडजस्ट करतो. ईथून पुढे आपण काही साजरं करू तेव्हा ते त्यांच्या नाकावर टिच्चून वैगेरे साजरं करायचं नाही असा निर्धार मी करतो. त्या केसेस मी क्लोज करतो. तरी काही केसेस उरतातच. त्या क्लोज करणं अवघड जातंय हे मला स्पष्ट दिसतंय. ही उरलेली अल्प स्वल्प मंडळी माझ्यासोबतच नव्हे तर जनरलीच दुष्ट असल्याचं मला पक्कं माहित आहे. त्यांना चांगलं मानणं बौद्धिक काँप्रोमाइज ठरेल. तरीही ही मंडळी आनंदानं जगतात, त्यांचं माझ्याइतकंच मोठं सर्कल असतं, कधीकधी त्यांना महाजनपद लाभतं, प्रसिद्धी लाभते , नि आपल्या दुष्टपणाचा कुठला गम त्यांना असल्याचं त्यांना दिसतच नाही. कैकदा मीच त्यांच्यासाठी गौण असतो. त्यांना लाभणारी सुखशांती लाभावी कि लाभू नये याबद्दल मी काय विचार करावा? मी या केसेसचं काय करायचं म्हणून बुचकाळ्यात पडलेलो आहे. रात्र उशिरापर्यंत चढलेली आहे.मी त्यांच्याबाजून विचार करायचाय कि माझ्या यात मला खूप संभ्रम व्हायला लागलाय. ज्यांना जी सहानुभूती द्यायला हवी, न्याय्य स्थान द्यायला हवं ते मी कदाचित देत नसेन म्हणून मी अस्वस्थ होतो आहे. मला काही उत्तर काढता येत नाहीय. एक मात्र कळलं आहे कि नक्की काय करायचं आहे हे जाणण्यासाठी मला माझ्याच आत्म्याचा अधिकचा परिचय हवा आहे.
प्रतिक्रिया
__/\__
__/\__
द्वाड ट्रक काय सवतं सत्य काय.. तुमच्या मागे ललित लेखनाचा लग्गा लावणे वसूल!
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आम्ही नेहमीच आपल्या सेवेत
आम्ही नेहमीच आपल्या सेवेत रूजू आहोत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
ऋशी सहमत. ललित लिखाण ही तुमची खरी ताकद आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुमच्या सारख्या क
तुमच्या सारख्या कलाक्षेत्रातील जाणत्या माणसास असं वाटावं ही खूप खूप आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. धन्यवाद्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वा! अजो, वा! एक नम्बर लिहिले
वा! अजो, वा! एक नम्बर लिहिले आहे.
मला खरे तर गाण्याबिण्याची रसग्रहणे आवडत नाहीत. 'साहिरने काय तोडलय बघा' अथवा 'लताचा कोमल निषाद काय लागलाय!' वगैरे लय बोर होते. अशा रन ऑफ द मिल रसग्रहणाच्या तुलनेत आतून आलेले हे ललित चमकून गेले.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
धन्यवाद
धन्यवाद
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'लताचा कोमल निषाद काय लागलाय
आदूबाळ, तुम्हाला संगीताचं खूप छान द्न्यान आहे. "प्रेम पिसे भरले अंगी"चा गोडवा अर्थ कळून नि न कळुन फरक पडत असावा. गीतकाराच्या मनाशी एकरुप होण्यासाठी अर्थ कळणं गरजेचं आहे तसं कलेच सगळे पैलू माहित असणं गरजेचं असावं. नैतर लोक दाद देतात नि आपण तोंड बघत बसतो असा प्रसंग येतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मान्य आहे.
मान्य आहे.
माझा मुद्दा असा होता, की अन्य रसग्रहणांमध्ये गाणं केंद्रस्थानी असतं. या लेखनामध्ये लेखकाचे अनुभव केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे ललित आहे, नेहेमीच्या रसग्रहणांपेक्षा वेगळं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बाय तो वे निशाद आणि ते तोडणं
बाय तो वे निशाद आणि ते तोडणं आम्हला कळायला एक सिरिज आहे. वर ते बोरिंग कसं आहे हे सांगायला पण लेख लिहा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वाद्य
आदूबाळ, या गाण्याच्या प्रारंभी ठळक वाजतं ते (तंतू?)वाद्य कोणतं रे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सतार आहे ती.
सतार आहे ती.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
म्हणजे संतूर्?
म्हणजे संतूर्?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नाही.
नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला सांगीतिक जार्गनचा तिटकारा
मला सांगीतिक जार्गनचा तिटकारा असण्याची कारणे दोन:
१. ती जार्गन मला येत नाही.
२. ती जार्गन फेकणारे लोक म्हणजे मूर्तिमंत तुच्छता असतात बहुतेकदा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जार्गन
(अजून एक जार्गनयुक्त प्रतिसाद...)
यमनात कोमल निषाद ?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
या गाण्यासंबंधी नव्हे तर अशा
या गाण्यासंबंधी नव्हे तर अशा लोकांबद्दल जनरल प्रतिसाद होता. जार्गनेस माफी करावी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
एक नंबरी अजो...
एक नंबरी अजो...
अनुतैंना लेखातली कोणती गोश्ट
अनुतैंना लेखातली कोणती गोश्ट सर्वात आवडली? असल्या बाबतीत तुम्ही कशा लिहिता ते वाचलेलं आठवत नाही म्हणोन पृच्छ्हा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
You are expecting too much.
You are expecting too much. मी तुम्हाला एक बोधकथा देऊ शकते, पण देणार नाही.
बोधकथा व्यनिमधे तर नक्कीच देऊ
बोधकथा व्यनिमधे तर नक्कीच देऊ शकता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
झक्कास अजो, फेसबुकावर शेअर
झक्कास अजो, फेसबुकावर शेअर केलेले आहे.
मला टॅग करा हो. लेखनावरच्या
मला टॅग करा हो. लेखनावरच्या अनोळखी लोकांच्या प्रतिक्रिया वाचणं मजेशीर असेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बौद्धिक काँप्रोमाइज
Amazing point - "बौद्धिक काँप्रोमाइज" Kudos!!
मला ४४ वर्षे लागली हे समजायला की - It's okay to deny few people, few energies, few attitudes.
सतत त्या वृत्तीची बाजू घेणे हे बौद्धिक काँप्रोमाइज" आहे. निष्फळ आहे. त्यातून आपल्यालाच त्रास होतो, मनस्ताप होतो, मन विद्ध होतं, कलुषित , मलिन होतं. It's okay to deny!
Staying soft hearted, receptive, compassionate all the time - is NOT POSSIBLE!! It is really not possible.
.
छान लिहिले आहे.
Amazing point - "बौद्धिक
==============
असे अवघड म्हणून ज्या व्यक्तिंचा संच बनवला आहे तो देखील डायनामिक असतो. तो तितक्या स्थिरपणे डिनाय करून राहता येत नाही. आपण त्यांच्यापैकी बर्याच जणांना होल्डवर ठेवलेलं बरं.
==========================
आणि ४४ च, आयुष्य सरतं, कशाचं काही कळत नाही संवेदनशील लोकांना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आभार!
अनेकदा ऐकण्यात आलेल्या गाण्याचा आणि अनेकदा वाचनात दिसलेल्या अजोंचा वेगळा परिचय.
या लेखनासाठी अनेक आभार!
अवांतर : कधी काळची ही कविता आठवली.
परिचितांच्या आभार प्रदर्श
परिचितांच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आपले देखील खूप खूप आभार्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्कृष्ट
लेख आवडला अजो. खूपच छान.
धन्यवाद.
धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
होळीचा सीझन चालू आहे म्हणून
हे असं लिहिण्याऐवजी आमच्यासारख्या फालतू लोकांशी वाद घालत बसणाऱ्या अजोंच्या बैलाला हो .....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुम्हाला फालतू म्हणून आम्ही
तुम्हाला फालतू म्हणून आम्ही कुठं जायचं? धन्यवाद्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो उलगडले मला आज.
अजो उलगडले मला आज.
नि:शब्द केलंत.
ग्रेट अजो !
हर आदमी मे होते है दस बीस आदमी
जिस को भी देखना हो कइ बार देखना
मार्केट मागे लागणार , डीमांड करणार,
प्लीज दाद देउ नका
आम्हाला नाही वाचायला मिळाल तरी हरकत नाही
तुम्ही तुमचा कोवळा कोपरा जपुन ठेवा
धन्यवाद.
धन्यवाद.
तुमच्या कवितेतले संदर्भ जरा विस्कटून सांगाल लप्लीज्?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छान लिहिलय अजो!
छान लिहिलय अजो!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
धन्यवाद अनुप
धन्यवाद अनुप
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख अफाट आणि अप्रतिम आहे.
लेख अफाट आणि अप्रतिम आहे. अशेच लिहीत रहा. लेखक म्हणून नाव कमवाल. (चेष्टा नाही, खरंच.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(चेष्टा नाही, खरंच.)
हा हा. बॅट्या, त्या दिवशी नाव कसं कमवावं म्हणून प्रश्न केला होता तेव्हा गप्प बसला होतास. हा हा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आप यूँ फासलों से गुजरते रहें...
लेख अतिशय आवडला.
!!!
क्लास! शीर्षकातल्या गाण्यातली 'आहटों से अंधेरे चमकते रहें, रात आती रही रात जाती रही' ओळ आठवून गेली.
नेमकं. (या निरीक्षणाचं चित्रपटाच्या नावाशी असणारं विरोधाभासात्मक नातंही)
या निरीक्षणाचं चित्रपटाच्या
निव्वळ थोर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो अजो अजो!
आज मला अवचितपणे, अजो नामक मनोरण्यात अमर्याद भटकता आले. तसा, माझ्याच तिमारण्यात मी नेहमीच भटकत असतो. पण इतरांच्या अभयारण्यात, सहजासहजी प्रवेश मिळत नाही. पण अजोंनी कवाडे नुसती किलकिलीच नव्हे, तर सताड उघडून, आम्हा सर्वांना मुक्त प्रवेश दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
ते विस्तीर्ण प्रतिसाद वाचताना, या अजोरण्याच्या भव्यतेची कल्पनाच कधी आली नाही. पण केवळ, एका रात्रीत जेवढे फिरुन पाहिले तेच मन भरुन येणारे होते.
ते विस्तीर्ण प्रतिसाद वाचताना
आपणांस अजोरण्याचे हवेत तितके अक्सेस राईस घ्या. ज्यांना आपण अरण्ये म्हणवतो ते सुंदर सुंदर प्रासाद असतात्. आम्हालाही कधी तिमामहलाची ओळख करून द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छान लिहिलंय अजो. मला अशा,
छान लिहिलंय अजो. मला अशा, स्वत:चा स्वत:शी होणारा संवाद शब्दबद्ध करु शकणाऱ्या लोकांचा फार हेवा वाटतो. मला ५ मिनिटांपूर्वी काय विचार करत होतो ते ही आठवत नाही.
हेवा वाटण्यासारखं फार कै नै
हेवा वाटण्यासारखं फार कै नै. विचारमंडल इतकं घनदाट असतं त्यातले समोरच्यास समजतील असे सुसूत्र धागे एक करणं, मग ते वाचकांसमोर मांडणं हे वरकरणी अवघड वाटतं पण प्रयत्न करून पाहा. फटकन जमेल्.
धन्यवाद्.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आज वेगळेच अजो पहायला मिळाले
अतिशय उत्तम असं लिखाण आहे. हल्लीच्या काळात दुर्मीळ.
ह्यानंतर तुम्ही जे तुमच्या भावनांचं अत्यंत तरल असं वर्णन केलंय, त्याला माझा कुनिर्सात. आई, वडील, गाव इत्यादींबाबत लिहीताना साधारण लेखक फार अगतिक होतात. तुम्ही तुमची अलिप्तता अतिशय अबाधित राखली आहे. हे एक अख्ख्याच लेखात जाणवतं. स्वत:च्याच भावनांचं इतकं काटेकोर विश्लेषण ह्याआधी फक्त व्यमांनी केलेलं स्मरणात आहे. तेव्हाच त्यातलं सौंदर्यही तुम्ही तितक्याच अलिप्ततेने मांडता हेही सांगावंसं वाटतं.
तुमचं लॅण्ड्स्केप स्किल भन्नाट आहे. जन्मात कधी हिमलयाची सफर न केलेल्या अभाग्याला तुम्ही क्षणार्धात त्या वातावरणात नेऊन उभं करता. वातावरणाशी मन अनभिद्न्य असलं तरीही त्यातली शांतता तुम्ही मनापर्यंत पोहोचवता. ह्याबद्दल फार बोलून मी त्याची चिरफाड करणार नाहीये.
शेवटचं निवेदनही अप्रतिम आहे. इथेही तुमची ती अलिप्तता दिसते, आणि त्याबरोबरच तुमच्या (अचाट) डोक्यातला विचारकल्लोळही तुम्ही यथार्थ मांडता.
ही तटस्थताच आतापर्यंत गवसलेलं सगळ्यात मोठं कौशल्य आहे, असं माझं मत आहे. त्यामुळेच तुमच्या ह्या कागदावर तुम्ही भूत-भविष्य-वर्तमानाचे सगळे रंग व्यवस्थित भरू शकता, जिथे प्रत्येकाच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुयोग्य न्याय दिलेला आहे. शेवटचं वाक्यही, तुम्ही बांधलेल्या लेखाचा अतिशय सुंदर कळस झालेलं आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
काय मनस्वी दाद दिली आहे कि
काय मनस्वी दाद दिली आहे कि दादेची दाद काय द्यावी ते कळत नाहीय्यै.
व्यंकटेश मांडगुळकर्? कोणतं पुस्तक्? *
खरंय्.
==============
विरामचिन्हात नि वाक्याच्या अंतीच्या अxअरात एक स्पेस असते का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यवाद!
होय, व्यंकटेश माडगूळकरच. त्यांची छोटी छोटी इतकी पुस्तकं वाचली की नक्की नाव आठवत नाहीये. ज्या पुस्तकांत त्यांनी प्रतिसरकारात सहभागी होऊन दिलेल्या लढ्याच्या दिवसांचं वर्णन आहे ते सगळ्यात छान आहे. मला शीर्षक आठवत नाही. ही सगळी पुस्तकं एकाच प्रकाशनाने छापलेली असल्याचं आठवतं.
सगळीच फार छान आहेत. वाचाच.
असंच विचारतोय: तुम्ही गणिती आहात का हो? (गणित, विशेषत: पारंपरिक शुद्ध गणितात तुम्ही कार्यरत आहात/होतात का?)
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
पारंपरिक शुद्ध गणितात
म्हणजे केवळ गणित म्हणायचं असेल तर हो. शुद्ध पारंपारिकचची कल्पना नाही.
बाय द वे, मी एक्सेल बेस्ड महाभयंकर किचकट गणितं करत असतो, नोकरीनिमित्ताने, पण वैद्न्यानिक xरेत्रातली नाहेए.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>> ज्या पुस्तकांत त्यांनी
माझ्या आठवणीनुसार 'कोवळे दिवस'.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
होय, हेच ते पुस्तक.
कोवळे दिवस हेच त्या पुस्तकाचं नाव आहे. काही पुस्तकं, एखाद्या उनाड दिवशी भरदुपारी बाहेर रणरणतं उन माजलेलं असताना; छान टेबलफॅनच्या घर्र आवाजात पाय पसरून आरामात वाचायची असतात. कोवळे दिवस त्यातलंच एक. दुसरं बोकीलांचं 'गवत्या', आणि 'शाळा'.
वरच्या दुव्यात एक उतारा वाचता येईल.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
"कोवळी उन्हे" विजय
"कोवळी उन्हे" विजय तेंडुलकरांचे आहे.
"कोवळे दिवस" माहीत नाही.
_____
Oh both books look different. You have described well the mood of the book in a nutshell.
दुसरं बोकीलांचं 'गवत्या'
अरे बापरे .................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................
ह्या टिंब टिंब च्या जागी मला तुमच्यावर काय वैयक्तीक कॉमेंट करायची असेल ती समजुन घ्या.
कलाकार!
कलाकार!
धन्यवाद्
धन्यवाद अचरट्
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लौ यु अजो.... झकास लिहिलं आहे
लौ यु अजो.... झकास लिहिलं आहे.... कुर्निसात _/\_
हे असे स्वत्:शी स्वत्: केलेले संवाद फार वेड असतात. ते शब्दात उतरवणं हि केवळ अफलातून कला आहे, तुम्ही कलाकार अहात - अजून येऊ द्या.
लौ यू टू!!
लौ यू टू!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वाह्....
कसल मस्त लिहिलय अजो...
बाकि , कूलू नि मनाली दोन्ही शहरं गैरसोयीची पडावीत अशा मधल्या जागी थांबलोय -> हि कुठलि जागा?
नग्गर किल्ला. गविंनी कधीतरी
नग्गर किल्ला. गविंनी कधीतरी सांगितला होता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फार सुंदर.
फार सुंदर.
सुंदरच.
येस्स्. हा अस्वस्थपणा कित्येकदा अनुभवला आहे. पुन्हा पुन्हा अनुभवते. पुन्हा वेगवेगळ्या चक्रात अडकवून घेते. जग आपल्या गतीनं बदलतं असतं.
अश्या मनस्वी क्षणांचा प्रवास जेव्हा कराल तेव्हा ते लिखाणात जरूर उतरवा आणि अर्थात इथे टाका.
येस्स्. हा अस्वस्थपणा
तै, खूप छान लिहिलं आहेत्. अशी अस्वस्थता मनुष्याच्या संवेदनशीलतेची पारिचायक आहे.
तुमच्यासाटि काय बी. बगाच तुमी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
_/\_
_/\_
धन्यवाद चार्वी
धन्यवाद चार्वी
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो, फारच छान लिहिलं आहेत.
अजो, फारच छान लिहिलं आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद. तुम्हाला सर्वात
धन्यवाद. तुम्हाला सर्वात आवडलेली ओळ कोणती ते मला जाणायचं आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नातं आणि स्वतःशी संवाद
ठरावीक ओळ अशी सांगता येणार नाही. (ती माझी मर्यादा.)
एका गाण्याचा अनुभव एक मुलगा म्हणून, तरुण म्हणून आणि आता स्वतःच्या संसाराची जबाबदारी घेणारा माणूस घेतो; या वय वाढण्याबरोबर मुलाचा कोवळा निरागसपणा संपून चाळीशी उलटलेल्या मनुष्याचा कोरडा कोडगेपणा येणं नैसर्गिक आहे. पण किमान काही बाबतीत तरी तसं होऊ न देता त्या गाण्याशी जे नातं जपलं आहे. लहान वयात जोडलेली नाती पुढे बदलत जातात; अनेकदा त्यात अंतरं पडतात. गाण्यातल्या मुलीशी जोडलेलं नातं मात्र तसं कोरडं झालेलं नाही. तुमचेच शब्द थोडे उसने घ्यायचे तर, या गाण्याचे जागतिक, सार्वकालिक असे संदर्भ शोधण्याजागी तुम्ही स्वतःचे संदर्भ तयार केले आहेत; त्यात कोरडेपणा आलेला नाही.
हे गाणं निमित्त आहे, स्वतःकडे बघण्याचं; 'मी कसा आहे' याचा विचार करण्याचं. कोणतंही नातं अधिक अर्थपूर्ण तेव्हा बनतं जेव्हा त्या नात्यातून प्रेम, आपुलकी यांच्या जोडीला आपण काय, कसे हे तपासण्याची संधी मिळते; स्वतःला
सुधरण्याचीबदलण्याची संधी मिळते. या गाण्याशी तुमचं नातं असं काहीसं जडलंय, हे दिसतंय.त्यामुळे ठरावीक कोणती ओळ म्हणून आवडण्यापेक्षाही, हे नातं आणि त्यातून स्वतःशी संवाद साधणं, हे चित्र दिसतंय ते मला आवडलं.
अजो, तुम्ही ललित लिहीत राहाच. तुम्हाला ते चांगलं जमतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणतंही नातं अधिक अर्थपूर्ण
अगदी अगदी. संक्षेपात .
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जे ट्रान्स्फॉर्म करत /
जे ट्रान्स्फॉर्म करत / अल्केमिस्ट नाहि नाहि ते नातं , नातं म्हणुच नये
जादूई शक्ती
आत्मशोध घेणारं लेखन आवडलं. खासकरून शेवटचा पॅरा... "मी पुन्हा त्या विघ्नचिंतकांच्या केसेसच्या फाईल्स उघडतो. बर्याच ठिकाणी मला माझा अहंकार, टोकाची प्रतिक्रिया, दाबून ठेवावा लागलेला राग, माहिती नसल्यामुळं करून घेतलेले गैरसमज, पूर्वग्रहदोष, संकुचित अस्मिता, ईर्ष्या, लोभ, स्वार्थ यांची एक तटस्थ म्हणून वकीली करता येत नाही. माझीच काही वर्तनं उघडीनागडी पडलेली दिसतात. रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते...." स्वतःचं निरपेक्ष निरीक्षण करायला लावणारी जादूई शक्ती मला अजूनतरी सापडलेली नाही. शोधतो आहे. बाकी तुमचं रैना गाणं ऐकलं. मागे गब्बरने शेअर केलेलं... ठिक आहे.. मला ते तितकसं भावलं नाही.
धन्यवाद.
धन्यवाद.
तुम्हाला जे भावलं आहे, ते कोणतंही गाणं वा कला वा तसलं काहीही पार्शभूमी म्हणून घ्या . ते केवळ निमित्तमात्र आहे. ईथे मी या गाण्यामुळे येणारे विचार मांडलेत . तुमच्या आत्म्याची ड्रेसिंग वेगळी असेल पण त्यात जी परिशुद्धी शोधायची आहे ती तीच आहे.
============
हे गाणं देखिल अत्यंत गोड आहे. पूर्वग्रह सोडून ऐका. वारंवार ऐका. किमान यात नक्की मीठ मिरचू कमी पडतंय ते सांगायचा प्रयत्न करा. आपण अजून संवाद करू.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रैना चा अर्थच माहीत नव्हता या अगोदर
रैना चा अर्थच माहीत नव्हता या अगोदर. जुनी हिंदी गाणी फारशी ऐकलेली नाहीत. पुन्हा एकदा ऐकून पाहतो.
अगदि हाछ आत्मशोध फार आवडला.
अगदि हाछ आत्मशोध फार आवडला.
उत्तम संज्ञाप्रवाही लेखन.
उत्तम संज्ञाप्रवाही लेखन. लेखाला एका गाण्याचं सूत्र आहे, आणि ते गाणं स्थिर असताना बदलेल्या आयुष्याची पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर मागचा पडदा बदलल्यामुळे तेच गाणं वेगळ्या पद्धतीने खुलून दिसतं याचं नेटकं संशोधन आहे. त्या गाण्यात असलेली हरवल्याची भावना आणि आयुष्यात आपण काय मिळवलं आणि काय गमवलं याचा लेखाजोखा यांचं रसायन छान जमलेलं आहे.
इतरांनीही म्हटलेलं आहे, तसंच मीही म्हणतो. तुम्ही ललित लेखन करत राहा. तुम्हाला ते उत्तम जमतं. तुमच्या आधीच्या काही लेखांमधूनही हे जाणवलेलं होतं, हा लेख वाचून ते दुणावलं.
इतरांनीही म्हटलेलं आहे, तसंच
आपली आज्ञा शिरसावंद्य.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख आवडला
फार आवडला लेख. आपल्या आत बुडी मारताना, एकेक कप्पे उघडत जातानाही, आपलं आपल्या बाहेरच्या भावतालाशी असलेलं नातं आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर तपासणं आणि त्याला एका गाण्याच्या सूत्रात बांधणं हे फारच सुंदर जमलं आहे. शैली, शब्दरचना हेवा वाटावा अशी मोहक आहे, तुम्हाला सहजसाध्य आहे.
अलिकडे आंतरजालावर मतमतांतरांच्या कल्लोळात भेदरून जायला होतं, कोणाचंही बोलणं स्पष्ट ऐकूच येत नाही, आंतर्मुख होणं किंवा संवेदनाशील असणं कालबाह्यच झालं आहे की काय अशी शंका यायला लागते. त्या पार्श्वभूमीवर असा सहजसुंदर लेख लक्ष्य वेधून घेतो. अभिनंदन!
+१
याबद्दल तर अगदी सहमत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
याबद्दल तर अगदी सहमत.
जान्ने दे जान्ने दे ... थोडी हव्वा आने दे
आयमिन ...आवरा.
(अवांतर मोड ऑन्)
मतमतांतरांचा कल्लोळ हे संवेदनशीलतेचं लक्षण नाही ?
कुणीतरी कशाबद्दलतरी संवेदनक्षम असतं व साद घालतं व् त्याला प्रतिसाद म्हणून दुसरं कुणीतरी (जे संवेदनशील असतं) मतांतर मांडतं. व मतमतांतरे सुरु होतात्.
(अवांतर मोड ऑफ्फ)
अलिकडे आंतरजालावर
भावनांशी वारंवार सहमत .
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्व वाचकांचे धन्यवाद.
सर्व वाचकांचे धन्यवाद.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भावलेले गाणे
भावलेले गीत, पण आयुष्यातील वेगवेगळ्या वयांत, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळे अनुभव देऊन गेले - सर्वच उत्कट!
गाण्याच्या स्पर्शाने परिचय चित्रपटाकडे आणि तिथे स्पर्शून मग केलेले आत्मपरीक्षणही - ते उत्कट नसून अनिश्चित आहे, हे सुद्धा योग्यच.
ते उत्कट नसून अनिश्चित
हे माझ्यापण लक्षात आलं नव्हतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख आवडला
लेख आवडला. टॉल्स्टॉयच्या "Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way" ह्या विधानाच्या धर्तीवर असे म्हणता येईल की दु:खद, भावस्पर्शी व काळीज पिळवटून टाकणारी गाणीही प्रत्येक ऐकणाऱ्याला वेगळी, वैयक्तिक अनुभूती देतात. संवेदनशील माणूस कवीच्या ओळींचा सांधा कळत-नकळत आपल्या स्मृतींच्या हळव्या कोपऱ्यांशी कसा अलगद जोडतो ह्याचे हा लेख उत्तम उदाहरण आहे. अभिनंदन, अजो.
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि.
कालिदासाने उल्लेखिलेली आणि मनात खोलवर रुतून बसलेली अन्य जन्मातली - पक्षी अन्य संबंधातली - नाती अन्य संबंधातली एकान्तामध्ये बाहेर डोकावतात आणि हुरहूर लावतात ह्याचे उत्तम उदाहरण.
एकाच गोष्टीला वेगवेगळे
एकाच गोष्टीला वेगवेगळे व्यक्ती आपापल्या दृष्टीकोनातून बघतात. लहानपणी ऐकलेल्या सहा आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखं. तसंच एकच व्यक्तीचा दृष्टीकोन पण अनुभवानुसार बदलत जातो. त्या बदलत्या अनुभवाचे वर्णन चांगले वाटले. मी तरी कुठल्या गाण्याचा एवढा विचार केलेला नाही, असला तरी तो उतरून काढेन असं वाटत नाही.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
खूपच सुंदर लेख अजो!
>>तशी कोणाला आई असते वा नसते, ऐकायचं, 'ओह सॉरी' म्हणायचं आणि पुढे कामाला लागायचं. तसं तेव्हा नव्हतं. एखाद्याला आई नसणं म्हणजे नक्की काय काय नसणं हे तेव्हा कळत असे नि व्यक्तिच्या दु:खाची संपूर्ण अनुभूती येत असे>>
मनापासून पटलं ...
हिमालयाच्या पायथ्याशी बसून आकाशगंगा बघत स्वतःच स्वतःशी संवाद साधणे हि माझी सुप्त इच्छा ... तुमचा हेवा वाटतो ....
पुढील लेखनाची आतुरतेने वाट पहात आहे !
या लेखावर प्रतिसाद देण्याची
या लेखावर प्रतिसाद देण्याची माझी क्षमता निश्चित नाही. फक्त एवढेच म्हणेल अप्रतिम मानवी मनात दडलेले पैलू उलगडणारा .
खूप झक्कास
भावस्पर्शी लिहिणार होतो, पण उगा शब्दबंबाळ नको म्हणून टाळण्यात आले आहे.
प्रकाशित झाल्यापासून किमान ६ ते ७ वेळा हे ललित वाचलंय, आणि दर वेळी नव्याने आवडतंय. रच्याकने, मी सुद्धा या गाण्याचा चाहता.. तुमचा लेख वाचल्यावर, एक जिलबी पाडली याच गाण्याला धरून. माझ्या लेखात एका विरहिणीच्या दृष्टिकोनातून गाण्याच्या बरोबर चालणारे विचार लिहिले आहेत.
तुमच्या लेखाने प्रेरित होऊन लिहिलेय, परवानगी द्याल तर प्रकाशित करू का?
--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?
माझ्या लेखात एका विरहिणीच्या
तुम्हाला हे ललित आवडलं त्याबद्दल धन्यवाद. या लेखानं तुम्हाला काही सुचलं असेल तर त्यावर माझा अधिकार कसा असेल?
====================
मी लेखक इ नाही. मला व्हायचं देखिल नाही. बौद्धिक संपदा (माझी इतरांनी कॉपी करण्यात, कारण उलटं बेकायदेशीर ठरेल) या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. तुमची तर ती पण केस नाही. प्लिझ गो अहेड.
===================
मला देखिल वाचायला आवडेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रभाकर जोग यांची व्हायलिन
प्रभाकर जोग यांची व्हायलिन धून ऐकली की हा लेख डोळ्यासमोर येतो.
कोल्हटकर सर, धपा, रावसाहेब,
कोल्हटकर सर, धपा, रावसाहेब, मिलिंद यांचे आभार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
Wish you a very happy b'day AJo
Wish you a very happy b'day AJo
मस्त !!
मस्त !!
पाने