Skip to main content

कोविड काळातली काही निरीक्षणं, अनुभव

Flatten The Curve

काही दिवसांपूर्वी एका माजी सहकाऱ्याचा फोन आला होता. मूळ भोपाळचा, दैनिक भास्करमध्ये होता, आवृत्ती सुरू झाली तेव्हा औरंगाबादला आला. कुटुंब भोपाळलाच आहे, बायको नोकरी करत नाही. काही वर्षांनी सकाळला गेला, अकोल्याला. HR Admin सांभाळत होता ५ वर्षं झाली. आणि आता आवृत्तीच बंद केलीय! ४ आवृत्ती बंद केल्यात, २५०-२७५ लोक रस्त्यावर. ३० तारीख शेवटची आहे. पुण्यात घर बुक केलंय, २५ लाख कर्ज आहे! मला कळेना मी काय सांगू त्याला.

पर्यटन क्षेत्रात फार कठीण अवस्था आहे. पुण्यातल्या मैत्रिणीच्या नवऱ्याला सांगितलंय, ३ महिने पगार मिळणार नाही. ती नोकरी करत नाही, मुलाचं शिक्षण व्हायचंय.

मुंबईतल्या अनेक पत्रकार मित्रांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना जेमतेम निम्मा पगार हातात मिळतो आहे. ज्यांचे गृहकर्ज आहे ते अतिशय चिंतेत आहेत.

गूगल सिंगापूरने १ वर्ष WFH करायला सांगितलंय, कर्मचाऱ्यांना ikea मधून फर्निचर घ्यायला पैसेही दिले आहेत, घरात चांगली ऑफिस स्पेस तयार करायला.

भारतात ग्रोफर्सने ३१ ऑगस्टपर्यंत WFH सांगितलंय. मैत्रिणीचा मुलगा दिल्लीत असतो, मार्चमध्ये परत आलाय, अजून ३ महिने इथेच असेल. तोवर तिथल्या घराचं/ फर्निचरचं भाडं देत राहायचं.

स्टोकहोमला असलेली मैत्रिणीची मुलगी गेल्या आठवड्यात परत आली, भारत सरकारच्या मदतीने. एक आठवडा हॉटेलवर काढला, आता आजीचं रिकामं घर स्वच्छ करून आठवडाभर तिथे राहणार. परत कधी जाऊ शकणार माहीत नाही.

IIT खरगपूरला असलेला एक शेजारी परवा परत येऊ शकला आहे. तोही १५ दिवस quarantine. नशिबाने घर आहे रिकामं जिथे तो राहू शकतो १५ दिवस.

एक तरुण मैत्रीण अमेरिकेत आहे, शिकतेय. व्हिसा सप्टेंबरपर्यंत आहे, तोवर नोकरी मिळाली तर ठीक नाही तर परत येणार. पण ते कठीण दिसतंय, एके ठिकाणी मोफत काम करायची तयारी होती, तेही नाही मिळालं. ती जैन आहे, इथे कट्टर आहेत घरचे. तिला तिथे राहून कांदा लसूण खायची सवय झालीय, तिला टेन्शन आलंय घरी आल्यावर काय होणार! आजी फार कट्टर आहे तिची.

एक नातेवाईक मार्चपासून जबलपूरला अडकलेत, वय वर्ष ८२. गेल्या आठवड्यात विमानाचं तिकीट होतं , पण महाराष्ट्र सरकारने विमानाला परवानगी नाकारल्याने फिस्कटलं. ते तसे जवळच्या नातलगांच्या घरीच आहेत पण ३ महिने अति झालंय. ट्रेन सुरू झाल्या तरी लांबचा प्रवास धोकादायक वाटतो आहे.

महाविद्यालयांचे FY/SY चे निकाल अद्याप लागलेले नाहीत, त्यामुळे पुढचे प्रवेश झालेले नाहीत. वर्ग कधी सुरू होणार माहीत नाही. त्या मानाने शाळांचे वर्ग सुरू झालेले दिसतात. त्याविषयी बऱ्याच तक्रारी आहेत पालकांच्या. सरकारने काही आदेश काढले आहेत बहुधा आता. ४ वर्षांची पोरं सकाळी ९ वाजता तयार होऊन लॅपटॉप समोर बसतायत. झोप काढतात मधेच. अभ्यास कितपत होतोय देव जाणे. आणि समजा दोन महिने नाही शिकली ही मुलं तर काय बिघडणार आहे तेही!

मला एका NGOमध्ये नोकरी मिळाली आहे! टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी मुलाखत दिली होती, video call वर. त्यानंतर हापिस बंदच अर्थात. झूम, ईमेलवर काम हळूहळू सुरू आहे. रुजू होण्याची तारीख असणार आहे ऑफिस सुरु होण्याची! तोवर पगार इल्ले.

कुटुंबातील एका ज्येष्ठ नागरिकाची angioplasty झाली होती दीड वर्षापूर्वी, हिंदुजात. follow up appointment होती, ती video call वर झाली. Blood reports etc were shared on WA and the doctor sent new prescription on WA itself. The usual charges were paid. Saved the taxi fare :-) भविष्यात हे अधिक प्रमाणात होईल असे दिसते.

भाग २
भाग ३

अबापट Tue, 23/06/2020 - 11:10

विविध क्षेत्रातील लोकांवर महासाथीमुळे झालेल्या परिणामांचे अनुभवदर्शन.
उत्तम पॉइंटर्स
Actually, या क्षेत्रातील लोकांनी (म्हणजे पर्यटन, मीडिया, शिक्षण )
लोकांनी जास्त सखोल लिहिले तर अजून कळेल.
ही निरीक्षणे लिहिल्याबद्दल आभार !!

नितिन थत्ते Wed, 24/06/2020 - 08:02

एक वेगळा कोन
बऱ्याच जणांचा तात्कालिक/इमिजिएट सिरिअस प्रश्न हा "गृहकर्जाचे हप्ते" हा असावा. अन्यथा तीन महिने पगार नाही किंवा अर्धाच/३० टक्केच पगार मिळतोय याने तात्कालिक अडचण येऊ नये.

सामान्यत: कर्जफेडीचे हप्ते एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या ३०-४० टक्कयाहून अधिक नसावेत असं बहुतांश सल्लागार सांगतात. "१० बिगेस्ट मिस्टेक्स यंग पीपल मेक" किंवा "टिप्स फॉर फायनान्शिअल प्लॅनिंग" अशा स्वरूपाचे जे लेख नियमित पणे अनेक वेबसाइट्सवर येत असतात त्यातही असा सल्ला सामान्यत: दिलेला असतो. (करोनापूर्व काळात) हा नॉर्म पाळला असेल तर सात-ते दहा वर्ष नोकरी झालेल्या व्यक्तींना सहा महिने पगार मिळाला नाही तरी मॅनेज करता येऊ शकेल. सहा महिन्यांनी ओढाताण होऊ लागेल पण ती जाणवणार नाही. एक वर्षाने प्रत्यक्ष ओढाताण सुरू होईल तोपर्यंत परिस्थितीत काही सुधारणा होऊ शकेल.

अर्थात आपण काम करत असलेले क्षेत्रच कोसळत असेल तर एक वर्षाने सुद्धा परिस्थिती सुधारेल असे नाही.

नितिन थत्ते Wed, 24/06/2020 - 08:15

एकवीसाव्या शतकाची वीस वर्ष संपताना नोकरी न करणाऱ्या गृह-व्यवस्थापक महिला शहरी ममव कुटुंबांत बऱ्यापैकी संख्येने आहेत हे रोचक आहे.

रांधा वाढा उष्टी काढा यातून अजून सुटका नाही.
पैसे कमावून कुटुंबाला श्रीमंती लाईफस्टाईल पुरवण्यातून अजून सुटका नाही.