Skip to main content

कोविड काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग २)

WFH

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात टाळेबंदी घोषित झाली आणि घराघरांमध्ये उलथापालथ झाली. सकाळी उठून डबा घेऊन नोकरीवर/शाळेला जाणे अचानक बंद झाले. घरातील सगळे सदस्य २४ तास घरात राहू लागले. याचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम झाला.

नोकरी न करणाऱ्या स्त्रिया - बाकीची माणसं बाहेर गेली की आपल्या सोयीने, वेळेनुसार, गरजेनुसार घरकाम, टीव्ही, स्वयंपाक, जेवण, फोनवर गप्पा, बाजारहाट, मदतनीस सखीशी गप्पा, वगैरे करायचा यांचा दिनक्रम बदलला. तसंच सतत माणसं घरात असल्याने स्वयंपाकही जास्त वेळा व जास्त प्रमाणात करावा लागला, त्यात रोज वैविध्य आणावं लागलं. मुलं सतत घरात असणं, नवरा सतत असणं याची अनेकींना सवय नव्हती व त्यामुळे ही परिस्थिती जरा अवघड बनली. हळूहळू याचीही सवय झालीय अर्थात. आता तर मुलांच्या शाळाही घरातूनच सुरू झाल्यात. सकाळी वेळेवर उठून गणवेश वगैरे घालून पोरांना तयार करावं लागतंय.

नोकरी करणाऱ्या स्त्रिया - यातल्या अनेकींना WFH होतं. म्हणजे सकाळी वेळेवर उठून आवरून ऑफिसच्या वेळेत लॉगिन, त्याआधी स्वयंपाक, केर- लादी- कपडे- भांडी. मुलं लहान असतील तर आपलं काम करता करता त्यांचं मनोरंजन, वगैरे. यातच घरी कोणी आजारी व वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची काळजी हे मोठं काम.

नोकरी-व्यवसायासाठी रोज घराबाहेर पडणारे पुरुष - अचानक घरात बसावं लागल्याने ही मंडळी काहीशी सैरभैर झाली होती. फेसबुकवर व व्हाट्सअपवर कणिक भिजवणाऱ्या वा केर काढणाऱ्या वा भांडी घासणाऱ्या मित्रांचे/भावांचे फोटो पाहून अनेकांनी स्फूर्ती घेतली आणि आपल्या घरात कामाला लागले. कोणी केर काढायची जबाबदारी घेतली तर कोणी भांडी घासायची. परंतु साधारण १५ दिवसांतच यातल्या पुष्कळांचा उत्साह मावळला. आता ३ महिन्यांनी तर यातली किती टक्के मंडळी ही कामं करतायत हा संशोधनाचा विषय होईल. बरं करताना 'मी बायकोला कशी मदत करतोय' हा आव तर मोठाच! तू तुझ्याच घरचं काम करतोयस ना लेक, मिरवतोयस काय त्यात? हेच अपेक्षित आहे, हे नॉर्मल आहे, हे त्यांना कळलंच नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत परंतु ते तसे वागतात पूर्वीपासूनच, ताळेबंदीचा त्यात काही हात नाही.

१५-१५ या वयोगटातील मुलं (मुलगे आणि मुली) - यांना या काळात स्वयंपाक ही एक कला आहे आणि ती आपल्यालाही जमू शकते याचं भान आलं. इंस्टावर शेअर करण्यासाठी का होईना मुलं स्वयंपाकघराकडे वळली. एकदा स्वयंपाकाची गोडी लागली की सहसा उतरत नाही. पुढेही ती स्वयंपाक करत राहतील अशी अशा. यातल्याही अनेकांनी आपापल्या आवडीच्या विषयातले अभ्यास केले, गाण्याचा वादनाचा सराव केला, चित्र काढली.

ज्या घरात सदस्यांचे एकमेकांशी उत्तम संबंध होते ती घरं या टाळेबंदीच्या काळाचा खूप छान उपभोग घेऊ शकत आहेत. उदा. एकमेकांच्या मदतीने स्वयंपाकाचं नियोजन, तो करणं, एकत्र जेवण, पत्त्यांचा डाव टाकणं, गाणी म्हणणं, आणखी काही बैठे खेळ, आणि सगळ्यांनी मिळून केलेलं घरकाम असा यांचा दिवस जातोय. बाहेरगावी असलेले सदस्य घरी आहेत, कुठेही जाण्याचा ताण नाही, असे हे अविस्मरणीय दिवस त्यांच्यासाठी.

परंतु, ज्या घरांमध्ये छुपा व उघड तणाव होता, तिथली परिस्थिती बिकट झाली. आपलं जमत नसलेल्या व्यक्तींबरोबर २४ तास अनेक दिवस कोंडून घातल्यासारखी. (सासरच्यांचा छळ सहन करावा लागणाऱ्या स्त्रियांनी या काळात काय केलं असेल?) यातून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही. सहन करणे इतकेच यांच्या हातात. या सगळ्याचा किती मानसिक ताण यांच्यावर आला असेल याची कल्पनाही करवत नाही. यात पुरुष, स्त्रिया, मुलं सगळेच आले. (शारीरिक/मानसिक विकलांग, LGBTQ व्यक्ती यांच्या समस्या तर अधिकच क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या.)

आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्यांच्या संशय आणखीच वेगळ्या. अनेक लोक आपापल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये स्वस्त मिळणारे जेवण घेतात, ही मंडळी आता सतत घरी असल्याने घरातली किराणा मालाची गरज वाढली, त्यावरचा खर्च वाढला. चाळी अथवा झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तींसाठी ऑफिसमधील स्वच्छ प्रसाधनगृह हाही मोठा दिलासा असतो, तोही आता उपलब्ध नव्हता. दिवसभर अनेक व्यक्ती घरात असल्याने पाणीही जास्ती आवश्यक झालं आणि ते भरणं/साठवणं ही मोठी शिक्षा होऊन बसली. लहान घर, त्यात ६-७ माणसं, मुंबईचा उकाडा हेदेखील परिस्थिती चिघळवणारे घटकच.

आता हळूहळू सगळं खुलं होतंय, पण हे तणाव किती/कसे/कधी निवळतील?

(हे सगळं साधारण शहरी मध्यमवर्गीय घरांमधलं निरीक्षण आहे. ही याची मर्यादा म्हणता येऊ शकते.)
---
भाग १
भाग ३

अबापट Wed, 24/06/2020 - 07:21

रोचक निरीक्षणे आहेत. मोठ्या शहरांमधील मध्यमवर्गीय घरांमध्ये जे घडत होतं त्याचं प्रतिबिंब आलंय.
शहरातील आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ किंवा झोपडपट्टीसदृश वस्त्यांमध्ये किंवा निमशहरे आणि खेड्यांमध्ये काय दृश्य असेल हे वाचायला आवडेल.

नितिन थत्ते Wed, 24/06/2020 - 08:11

अनेक लोकांना विशेषत: नोकरीसाठी मोठ्या शहरात शेअरिंग बेसिसवर फ्लॅट घेऊन राहणाऱ्या बॅचलरांना अडचणी आल्या. म्हणाजे तीन जण रहात असतील आणि तिघेही वर्क फ्रॉम होम करताना त्यांचे रोज कॉल्स, वेबमीटिंग्ज आणि त्या मीटिंगचा इतरांना होणारा उपद्रव.

शिवाय ते लोक सहसा एखादी स्वैपाकीण ठेवून जेवणाची व्यवस्था करत असतील त्यांना जेवण बनवणे वगैरे "कधीच न केलेली कामे" करावी लागत असतील.

घाटावरचे भट Wed, 24/06/2020 - 11:18

In reply to by नितिन थत्ते

अनेक लोकांना विशेषत: नोकरीसाठी मोठ्या शहरात शेअरिंग बेसिसवर फ्लॅट घेऊन राहणाऱ्या बॅचलरांना अडचणी आल्या.

यातले बहुतांश लोक आपापल्या मूळ गावी निघून गेले.

असीच एक कथा - आमच्या हापिसातला एक जण २० मार्चला दुचाकीवर पुण्याहून ठाण्याला (तिथे त्याचे पालक असतात) गेला. ठाण्यात त्याच्या घराच्या भवती शंभरएक लोक कोव्हिड पॉझिटिव्ह सापडले म्हटल्यावर त्याचे कुटुंबीय घाबरले आणि भर लॉकडाऊनमध्ये मूळ गावी जाण्यासाठी पासच्या मागे लागलं. त्यात त्याच्या पालकांची गाडी आणि पास अशी दोन्ही व्यवस्था झाली आणि ते सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी गेले. हा भाऊ आणि त्याच्या पत्नीचा पास एका आठवड्यानंतर आणी बऱ्याच खटपटींनंतर मिळाला आणि ते दोघे परत एकदा सुमारे ३०० किमी दुचाकीवर ठाण्याहून त्यांच्या मूळ गावी गेले. तिथे परत त्यांना १४ दिवस हातावर शिक्के मारून क्वारंटाईनमध्ये टाकलं. तोपर्यंत हळू हळू लॉकडाऊन संपत आला आणि हापिसचं बोलावणं आलं. मग हा आमचा सहकारी परत एकदा पास वगैरे काढून दुचाकीवरच पुण्यात परतला.

मी हे सगळं लिहितानाही दमलो, तर त्याची काय वाट लागली असेल विचारायलाच नको.

मन्या ऽ Wed, 24/06/2020 - 14:35

दोन्ही लेखात न आलेले मुद्दे
(थोडक्यात)
१. mpsc/upsc चे परिक्षार्थी. पुण्यासारख्या शहरात झालेले त्यांचे हाल.

२. यंदा आषाढी वारी -पालखी सोहळा/गणेशोत्सव रद्द झाला. त्या सोहळ्याशी निगडीत कित्येक छोटे व्यवसाय. आणि त्यातुन होणारी पैशांची उलाढाल ढप्प!

३. लोक 24*7घरात राहुन हिंसक झाल्याची उदाहरण.
/दारू-तंबाखु ड्रग्स या परिस्थितीत वेळेत न मिळाल्यामुळे वाढलेली हिंसा

३.दुसऱ्या राज्यातुन आलेले मजुर परत गेले यामुळे महाराष्ट्रात वाढलेल्या रोजगार संध्या

४.अप्रगत शेतकरी वर्गाचे झालेले नुकसान. ज्या शेतकऱ्याकडे smart phones नाहीत/ त्याचा वापर आपल्या हितासाठी कसा करावा हे न समजुन घेऊ शकलेला वर्ग.

५.आरोग्य कर्मचारी, त्यांच्यावर अचानक आलेला ताण

६.ऑनलाईन शिक्षण पद्धतीतल्या शेकडो गैरसोयी. टिवी/ स्मार्टफोन्स याची अनुल्पब्धता. नेटवर्क problems

७. चीन-भारत सीमांवर वाढता तणाव, संभावित युद्धपरिस्थिती

८.आटत चाललेला सरकार खजिना ,जागतिक मंदी
(असे अनेक मुद्दे आहेत. आठवेल तस ऍड करेल. :) )

नितिन थत्ते Thu, 25/06/2020 - 08:47

काही गृहीतके करोना काळात व्हॅलिड नसल्याचा अनुभव आला.

सामान्यत: बँकेत आपण चेक डिपोझिट करतो तेव्हा एक पे-स्लिप जोडतो. बँक कर्मचारी आपल्याला काउंटर फॉईल देतो. चेक १०.३०-११.०० च्या पूर्वी डिपोझिट केला असेल तर तो त्याच दिवशी क्लिअरिंगला जातो. दुसऱ्या दिवशी पैसे देणाऱ्याच्या बँकेत तो पोचतो आणि त्याच दिवशी तो ती बँक पास करते आणि तिसऱ्या दिवसा अखेर पर्यंत आपल्याला पैसे मिळालेले असतात. यात पहिल्या दिवशी उशीरा चेक डिपॉझिट केला असेल तर एक दिवस अजून जातो. पण तीन दिवसात चेकचे पैसे आपल्याला मिळतात.

करोना काळात एक चेक शुक्रवारी सकाळी दहा वाजता सबमिट करायला गेलो. पण करोनामुळे बँकेत पुरेसे कर्मचारी नसल्याने ड्रॉप बॉक्स मध्ये चेक टाकण्यास सांगण्यात आले. सामान्यत: त्याच दिवशी माझ्या खात्यात एन्ट्री आली असती. ती त्या दिवशी आली नाही, दुसऱ्या दिवशी वर्किंग शनिवार होता तरी आली नाही. ती सोमवारी आली आणि बुधवारी माझ्या खात्यात क्लिअर बॅलन्स दिसू लागला. म्हणजेच दोन वर्किंग डेज जास्त लागले.

म्हणजे जोपर्यंत करोना प्रकरण चालू आहे तोपर्यंत चेक जमा करून पुढे पेमेंट करायचे असेल तर दोन वर्किंग डेज जास्त धरले पाहिजेत.

तिरशिंगराव Thu, 25/06/2020 - 11:09

In reply to by नितिन थत्ते

हल्ली, चेक फिजिकली मूळ बँकेत जात नाही. त्याची स्कॅन्ड कॉपी जाते. त्यामुळे एवढा वेळ लागू नये. पण स्टाफ खूपच कमी असल्याने हे झाले असावे.

नितिन थत्ते Fri, 26/06/2020 - 09:06

In reply to by तिरशिंगराव

हे माहिती नव्हतं.

यातली आणखी गंमत म्हणजे ही घटना खाजगी बँकेत (एच्डीएफसी) घडली. त्याच दिवशी शुक्रवारी आणखी एक चेक बँक ऑफ बरोडा मध्ये टाकला होता. शुक्रवारीच त्याची टेंपररी एंट्री आली आणि सोमवारी सकाळीच तो क्लिअर बॅलन्स मध्ये दाखवत होता.

सरकारी बँका डिसाळ आणि खाजगी बँका कार्यक्षम-ग्राहक हितैषु असतात हे गृहीतकही मोडीत निघाले.

अनुप ढेरे Fri, 26/06/2020 - 10:38

In reply to by नितिन थत्ते

सरकारी बँका डिसाळ आणि खाजगी बँका कार्यक्षम-ग्राहक हितैषु असतात हे गृहीतकही मोडीत निघाले.

असल्या चिल्लर अनुभवातुन लोक आपली ग्रुहितके बदलतात हे थोर आहे.

अनुप ढेरे Sat, 27/06/2020 - 18:05

In reply to by नितिन थत्ते

गेल्या सहा वर्षात बँक ऑफ बडोदाचा टोटल नफा 900 कोटी आहे. एच डि एफ सी बॅंकेचा सहा वर्षाचा टोटल नफा 96000 कोटी आहे. कोणती बॅंक अधिक कार्यक्षम आहे हे स्वयंस्पष्ट आहे.

नितिन थत्ते Sat, 27/06/2020 - 19:48

In reply to by अनुप ढेरे

त्यांना नफा होण्याचा मला चांगली सेवा देण्याशी काय संबंध. या केसमध्ये मला एचडीएफ्सी कडून वाईटा सेवा मिळाली आणि बँक ओफ बडोदा कडून चांगली सेवा मिळाली.
(याचा अर्थ मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समर्थन करतो असे नाही. एखादी सेवा खाजगी असेल तर ती ऑपॉप चांगली असते या गृहीतकाला छेद गेला आहे).

अनुप ढेरे Sat, 27/06/2020 - 20:49

In reply to by नितिन थत्ते

कार्यक्षमता जज केलीत तुम्ही एक चेक पास होण्याच्या दिवसातून. माझ्या मते कार्यक्षमता त्याने मोजता येणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2020 - 22:42

In reply to by अनुप ढेरे

गिऱ्हाईकांना मिळणारी चांगली सेवा (customer service) आणि कार्यक्षमता (efficiency) ह्या दोन संपूर्ण स्वतंत्र, परस्परांना लंब मिती नसतात का? म्हणून दोन्हींचं एकत्र optimisation करणं फायद्याचं ठरेल ना?

अनुप ढेरे Fri, 03/07/2020 - 12:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इव्हन कस्टमर सेवेबाबत बॅंक ऑफ बरोडाचा भयाण अनुभव आणि एह डि एफ ची चा उत्तम अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे विकेंडवरच्या एका चेकच्या उदाहरणाने थत्तेचाचांनी डायरेक कार्यक्षमतेला हात घालणे पाहून गंमत वाटली.
दोन्हीच एकत्र करणे बरोबरच. त्या गोष्टी लम्ब नाहीतच.