सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.
एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?
प्रसंग दुसरा.
एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला. तिचे अंग काळ्या दगडाने घासा...आईच्या नावाला कलंक लावणारी बाई हे करून बघते ...त्या पोरीचे सगळे अंग सोलवटून निघते . वेदनेने तो ओरडू लागते ..
कोणीतरी शहाणी शेजारीण पोलिसांना बोलावते आणि या मुलीची सुटका होते.
प्रसंग तिसरा.
एक तरूण आपल्या आईला आणि सक्ख्या भावाला भोसकून मारून टाकतो . जवळजवळ ५० वेळा हा आपल्या आईला भोसकतो. त्याच्या मनाप्रमाणे त्याला मालमत्ता मिळाली नाही म्हणून.
प्रसंग चौथा.
एका आजारी आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या वयस्कर नाट्य दिग्दर्शिकाला देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेला तरूण. या आजारी माणसाच्या वृद्ध पत्नीला डोक्यात एक जड वस्तू घालून मारून टाकतो .त्या या तरुणाला सारखे खायला देत नाहीत म्हणून …
फक्त उदाहरण म्हणून ह्या नुकत्याच घडलेल्या घटना ….
अजून अश्या किती असतील कुणास ठाऊक ?
अश्या कितीतरी घटना तुम्ही वाचल्या असतील. माझ्या मनात जे विचार आले तेच तुमच्या मनात आले असतील.
कोठून येतो हा इतका अमानुषपणा ? या आणि अश्या किती तरी बातम्या.सर्व समाजामध्ये हा क्रूरपणा वाढतो आहे का काही अपवादात्मक लोकांमध्ये हा अवगुण दिसू लागला आहे ?. मनुष्याचे जीवन इतके स्वस्त झाले आहे का ?
मी काही मानसशास्त्रज्ञ नाही किवा समाजशास्त्रीय विद्वान नाही पण या दोन्ही विषयांचा विद्यार्थी म्हणून मला जे जाणवले ते आपल्या समोर मांडतो आहे.
१.० या किंवा अश्या गुन्ह्यामागे मूळ कारण काय असावे ?
प्रत्येक गुन्ह्यामागे महत्वाच्या तीन कारणांपैकी एक असते असे म्हणतात . दारू,पैसा आणि स्त्री . वर दिलेल्या उदाहरणात सुद्धा यातीलच एक कारण सहज दिसून येते. पण एक दोन उदाहरणे सोडता हे सर्व गुन्हे पूर्व नियोजित पद्धतीने केलेले नसून ,तिथल्या तिथे क्षणिक रागाच्या भरात झालेले दिसतात. किवा या गुन्ह्यामुळे आपल्याला काय शिक्षा होईल आणि त्यातून कसे सुटू याचा सखोल विचार झालेला दिसत नाही . मला हे हवे आहे ..मग कोणत्याही मार्गाने ते मला मिळाले पहिजे ….. इतकाच विचार झालेला दिसतो ...किवा काय व्हायचे ते होऊ दे अशी बेफिकीर वृत्ती सुद्धा काही ठिकाणी दिसून येते.
ही तीन कारणे वर वर दिसत असली तरी या मागची मूळ कारणे(Root Causes) काय असावीत ?
ही मूळ कारणे शोधताना या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उपस्थित करायला हवा .
माणूस पहिल्यापासून असा क्रूर होता का आत्ताच तो असा झाला आहे ?
एक मतप्रवाह असा आहे कि माणूस हा मुळातच एक हिंस्र प्राणी आहे . पूर्वी सुद्धा अश्या घटना अश्याच घडत होत्या पण त्या आपल्यापर्यंत येत नव्हत्या इतकेच. आज मात्र आजकालच्या दूरदर्शन, भ्रमण ध्वनी ,आंतरजाल,वर्तमानपत्रे आणि इतर साधना मुळे अश्या घटना आपल्याला ताबडतोब समजत आहेत इतकाच फक्त फरक आहे.
श्री . अच्युत गोडबोले यांच्या “ मनात “ या पुस्तकाच्या प्रास्तविका मध्ये त्यांनी तेंडूलकरांच्या गिधाडे या नाटकाचे उदाहरण दिले आहे. त्यात तेंडूलकर एका मुलाखतीत असे म्हणतात कि पूर्वी गिधाडे मधील माणसातील हिंस्रपणा पाहून लोकांना धक्का बसायचा पण आता तसा धक्का बसत नाही ही तेंडूलकर यांच्या दृष्टीतून चिंतेची बाब होती. तेंडूलकर म्हणतात “ माणसे आता खरच एवढी क्रूर आणि गिधाडासारखी झाली आहेत का ?कि आता या नाटकात काहीच धक्कादायक (नसून त्याचे ) आश्चर्यही वाटेनासे झालय “
हाच प्रश्न मला आणि आपणा सर्वाना सुरवातीला दिलेले प्रसंग वाचून पडला असेल ! ( किंबहुना आपल्या सर्वाना तो प्रश्न पडावा आणि त्यातून काही उत्तरे सापडावीत म्हणून हा लेख !)
दुसरा मतप्रवाह असा आहे कि आजूबाजूच्या वातावरणा मुळे ,योग्य संस्कार न झाल्यामुळे किवा वाईट संगतीमुळे आणि पोट भरायची योग्य साधने उपलब्ध नसल्यामुळे माणूस कुमार्गाला लागतो .
माझ्यामते हे दोन्ही मतप्रवाह काही प्रमाणात बरोबर आहेत आणि यांचा एकत्रित विचार करायला हवा.
आता आपण पशू आणि मनुष्य यातील मूळ फरकाचा विचार करू.
पशु ,मनुष्य आणि देवत्व अशी उत्क्रन्ति होते असे सर्वसाधारण पणे मान्य केले गेलेले आहे.
म्हणजे काय ?
पशू कृती करतो पण या कृतीबद्दल तो जागरूक (Aware) नाही . कृती आहे पण जागरूकता नाही .
मनुष्य कृती करतो पण त्या कृतीबद्दल तो जागरूक असू शकतो . ही जागरूकता प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. ओशो तर असे म्हणतो कि मनुष्य हा ९९ % पशू असतो आणि १ % मनुष्य.
देवत्व गवसलेले आपल्या कृती बद्दल पूर्ण जागरूक असतात.
म्हणजे खरे तर असे आपण म्हणू शकतो कि जो आपल्या कृती बद्दल जागरूक नाही ..विवेक वापरून जर तो एखादी कृती श्रेयस नाही म्हणून नाकारू शकत नाही तो मनुष्य म्हणायच्या लायकीचा नाही .तो पशूच.
आपण एखादी कृती करतो म्हणजे नक्की काय होते आणि त्यात कुणा कुणाचा सहभाग असतो ?
२.० जेव्हा एखादे कृत्य माणूस करतो तेव्हा नक्की काय होते. ? यात अंतरमनाचा सहभाग किती असतो आणि बाह्यमनाचा किती असतो ?
The Wayward Mind by Guy Claxton.या पुस्तकात लेखक म्हणतो कि आपल्या मेंदू मध्ये प्रथम उर्मी निर्माण होते मग आपण त्या नुसार हालचाली करतो. एखाद्या व्यक्तीवर हल्ला करावा अशी उर्मी प्रथम आपल्या मेंदूत येते आणि मग आपण आपल्या हाताने किवा एखाद्या शस्त्राने त्या व्यक्तीवर हल्ला करतो. ज्याला पूर्व नियोजित हल्ला म्हणतात त्यात सुद्धा ही उर्मी प्रथम येते. मग त्यावर खूप विचार करून आणि योग्य संधी साधून हल्ला होऊ शकतो . तर काही वेळेला असे पूर्व नियोजन नसेल तर ही उर्मी लगेच प्रत्यक्षात आणली जाऊ शकते.
(In this book Claxton writes of experiments that prove our brains tell us
what to do before we consciously decide to do it. In one famous experiment
a neuroscientist named Benjamin Libet hooked people up
to an electroencephalogram (EEG) machine, which showed what
was happening in their brains. It revealed that a surge of brain activity
took place before the person had the conscious intention to do something,
suggesting that the intention came from the unconscious, and
then entered conscious awareness.)
लेखक असे सुद्धा सांगतो कि हि उर्मी आपल्या अंतरमनातून येते तर त्याची कार्यवाही हि बाह्यमनातून होते .
लिबेत नावाच्या शास्त्रज्ञाने असेही सिद्ध केले कि प्रत्यक्ष कार्यवाहीच्या आधी जवळ जवळ एक पंचमांश सेकंद आधी तुमच्या मेंदूत ते कार्य करायची उर्मी किवा इरादा प्रकट झालेला असतो.
आता इथे सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो . हा इरादा किवा उर्मी आपल्या मेंदूत कुठून येतो ? त्यावर कुणाचे नियंत्रण असते. म्हणजे आपण जर एखादे पुस्तक पुस्तकांच्या कपाटातून उचलतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्या मेंदूतून एक संदेश येतो कि हे पुस्तक छान दिसते आहे हे मी उचलावे आणि मग आपले हात क्रिया करून ते पुस्तक उचलतात.
इथे आपण असे म्हणू शकतो कि माझ्या मनात ही पुस्तक उचलायची उर्मी आली हे मान्य पण मी ते पुस्तक उचलणार नाही . म्हणजे या अंतरमनाचा आदेश मी मानवा किवा नाही हे माझ्या हातात आहे पण मुळात हा अंतरमनात हा आदेशचा येऊ नये हे माझ्या हातात नाही .
आता परत त्याच प्रश्नापर्यंत आपण आलो पण एक नवीन फाटा आता दिसतो आहे. माझ्या मनात येणाऱ्या उर्मीवर मी म्हणजे माझे बाह्यमन आणि शरीर कार्यवाही करणार नाही असे मी केव्हा किवा कोणत्या परिस्थितीत ठरवू शकतो ?
आपण वर जे प्रसंग पहिले त्या लोकांच्या मनात सुद्धा पहिल्यांदा उर्मी त्यांच्या अंतरमनातून त्यांच्या मेंदूत आली आणि त्यानी त्यावर कार्यवाही केली . हे असे का घडले ? आपण करतोय ते चुकीचे आहे आणि ते करू नये असा निर्णय त्यांनी का घेतला नाही ? त्यावर ती उर्मी अयोग्य असताना सुद्धा कार्यवाही का झाली त्यांच्या हातून ?
ज्याला आपण स्वतंत्र विचार किवा free will म्हणतो ते त्यांना उपलब्ध नव्हते का ? त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत नव्हती का ?
आणि नसेल तर ती का जागृत नव्हती ?
या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . असे विचार तुमच्या मनात आले तेव्हा तुम्ही जागरूक नव्हता. तुम्ही यांत्रिक हालचाली करत होता.
आपण फक्त असे म्हणतो कि माझा माझ्या मनावर ताबा आहे.फार क्वचित वेळा हे खरे असते.
खरे तर तुमच्या मनाचा तुमच्यावर ताबा असतो. मन सांगेल तसे तुम्ही वागता. किंबहुना आपल्या मनाविरुद्ध आपण वागू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे.
तुम्हाला मधुमेह आहे हे माहित आहे ...गोड खाऊ नये हेही माहित आहे ...पण समोर लाडू आला ,किवा बर्फी आली वा अन्य तुमच्या आवडीचा पदार्थ आला कि तुम्ही तो खायचा मोह टाळू शकत नाही .
रमण महर्षी या बाबतीत असे म्हणतात ..” मनात वाईट विचार येणे अथवा न येणे आज आपल्या हातात नाही परंतु कृती मात्र आपल्या हातात आहे. आपण कृतीत चुकू नये आणि वाईट विचार आल्यास त्याकडे लक्ष देऊ नये. त्या विचारांच्या मागे जाऊन त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत; विचार येतील तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये…”
पण मग ..असे म्हणावे का ? जर माणूस या उर्मी येतात तेव्हा जागरूक नसेल ...त्या क्षणात उपस्थित नसेल ( He is not there and then!) तर तो यांत्रिक पणे त्या उर्मी वर कार्यवाही करेल ...म्हणजे त्या क्षणी तरी तो पशू असेल ….
हे असे का होते आहे ?
३.० मनुष्य एक कळसूत्री बाहुली सारखा आहे का ? अंतरमनात येणाऱ्या उर्मी वर त्याचे नियंत्रण नाही ...पण त्या वर कार्यवाही करायचे किवा नाही हे नियंत्रण आहे पण ते तो वापरत नाही हे नक्की काय चालले आहे?
आजच्या सर्वसामान्य मनुष्याची काय अवस्था आहे ? आजकाल मनुष्य असा यांत्रिकपणे का वागतो आहे ?
आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मनुष्य तीन अवस्था मध्ये सर्वसाधारण पणे वावरत असतो असे सांगितले आहे. जागृत अवस्था, निद्रा अवस्था आणि स्वप्न अवस्था.
पण आजचा मनुष्य जागृतावस्थेमध्ये तरी खरा जागृत असतो का हा प्रश्न उपस्थित करावा अशी सध्या परिस्थिती आहे. हाच प्रश्न थोडा बदलून आपण विचारू शकतो कि या जागृतावास्थेमध्ये तो जागरूक आहे का ? ( He may be awake but is he aware? ) आपण खालील प्रश्नांचा जरा विचार करू .
दारूच्या नशेत धुंद माणूस जागृतावास्थेमध्ये असेल पण तो जागरूक असतो का ?
एखादा माणूस गाडी चालवतो आहे पण त्याच वेळी भ्रमणध्वनीवर बोलतो आहे किवा text message करतो आहे तर तो गाडी चालवायच्या बाबतीत कितपत जागरूक आहे ?
बऱ्याच हॉटेलमध्ये दिसणारे दृश्य . लहान मुले किवा बरीच तरूण मंडळी भ्रमणध्वनीवर बोलत किवा चाट करत किवा एखादा चित्रपट किवा चित्रफीत पहात जेवत असतात ...आपण काय जेवत आहोत याची त्यांना नंतर आठवण तरी असते का ?
सिगारेट ओढणे हे आपल्या आरोग्यास अपायकारक आहे असे त्या सिगारेटच्या पाकिटावर लिहून सुद्धा किती तरी तरूण तरुणी अजूनही या व्यसनाधीन होत आहेत हे जागरूक नागरिक म्हणायचे का ?
एखाद्या व्यक्तीवर हल्ला होत असताना सभोवतालचा समाज आपल्या भ्रमणध्वनीवर शुटींग करत असतो पण ती घटना होऊ नये म्हणून तो काय करतो ?
किती तरी तरूण तरुणी दारू आणि मादक द्रव्यांच्या प्रभावाखाली हॉटेलात धिंगाणा घालतात त्यांना आपण त्या वेळी काय करतोय याचे भान असते का ?
यातून एकच निष्कर्ष सहज काढता येतो . जागरूकतेचा पूर्ण अभाव.
४. ही जागरूकता आपण आणू शकलो नाही तर त्याचे काय काय परिणाम होतील ? किवा होत आहेत ?
ही जागरूकता आज आपण आणू शकलो नाही याचे परिणाम आज आपल्या समोर आहेत .
ही जागरूकता लहानपणी योग्य संस्कार करून आई वडिलांनी ,शिक्षकांनी आणि नंतर तरूण वयात त्या व्यक्तीने स्वतःच्या प्रयत्नांनी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली वाढवावी लागते.
आज हे होत नसल्याने किवा फारच थोड्या ठिकाणी अपवादाने होताना दिसत असल्यामुळे मनुष्य पशूच राहतो आहे आणि आपण वर जे प्रसंग पहिले आणि तश्याच अनेक घटना घडताना दिसत आहेत ..नव्हे त्या वाढतच जाणार आहेत.
याला अजून एक भयावह पैलू आहे. पशू नेहमी कळप करून राहतात. हे असे समविचारी (विचारी कसले ? अविचारी ) मनुष्यात लपून बसलेले पशू आपल्या सारख्या लोकांना ...आपल्या सारखेच वर्तन करणाऱ्या लोकांना एकत्र करून त्यांचे कळप बनवत आहेत आणि शिक्षण ,राजकारण ,न्याय व्यवस्था , वर्तमानपत्रे ,दूरदर्शन आणि सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत ..यांचा नारा एकच …. आम्हाला सामील व्हा नाहीतर तोंड काळे करा …..
जर एखादा नेहमी शांत असलेला मनुष्य एकदम रागावला किवा एकदम खूप हिंसक झाला तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो ,”काय याच्या अंगात कली संचारला का ?” या वाक्यात आपल्याला वाटते त्या पेक्षा जास्त सत्यता आहे. थोडक्यात त्या माणसाचे नेहमीचे व्यक्तिमत्व झाकाळून जाते आणि एक वेगळेच व्यक्तिमत्व बाहेर येते…..
हे त्याच्या अंगात काय संचारते ? मी वर जे प्रसंग लिहिले आहेत त्या सर्वांच्या अंगात हा कली संचारला होता ...त्या काळा पुरता तरी असे आपण म्हणू शकतो .
हे मानसशास्त्राप्रमाणे शक्य आहे ? का ही अंधश्रद्धा आहे ?
“मी विचार करतो” असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विचारांवर माझा ताबा आहे असे गृहीत असते . पण खरे तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे असत्य आहे. तुम्ही विचार करत नाही ..विचार तुमच्यात प्रवेश करतात. मी पचन करतो ...मी रक्ताभिसरण करतो या विधानामध्ये जितकी सत्यता आहे तितकीच सत्यता मी विचार करतो या विधानांत आहे. बऱ्याच लोकांचे विचार हे अपोआप उद्भवणारे आणि उगीचच पुन्हा पुन्हा मनात प्रवेश करणारे आणि ज्याचा काहीही उपयोग नाही असे मानसिक निरूद्देश आवाज असतात.
बरेच लोक या आवाजाच्या अमलाखाली असतात. हा आवाज ..हे विचार त्यांना ग्रासून टाकतात
प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात असे म्हणतो ...
“The voice in the head has a life of its own. Most people are at the
mercy of that voice; they are possessed by thought, by the mind. And since
the mind is conditioned by the past, you are then forced to reenact the past
again and again. The Eastern term for this is karma. When you are identified
with that voice, you don't know this, of course. If you knew it, you would no
longer be possessed because you are only truly possessed when you mistake
the possessing entity for who you are, that is to say, when you become it.
For thousands of years, humanity has been increasingly mind possessed”
म्हणजे ..हा कली आहे ..तुमच्या आणि माझ्या सुद्धा मनात जिवंत आहे आणि आपण आपल्या सभोवती जे क्रौर्य पाहतो ..युद्ध पाहतो ...ते या कली मुळेच जिवंत आहे. हा कली आपल्या मनात आहे आणि आपल्या अवतीभोवतीच्या सामाजिक मनात सुद्धा आहे. समाजपुरुषाच्या मानसिकतेत ही आहे.
हा जर जिवंत असेल तर त्याचे खाद्य काय ? आणि हा नेमका कुठे लपून बसतो आणि तो बाहेर कसा येतो ?
प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात या कलीला वेदना कोष (Pain Body) असे म्हणतो . ह्याचे वैयक्तिक रूप असते तसेच सामाजिक सुद्धा असते. तुमच्या उर्जा क्षेत्रात( Energy Field) याचा निवास असतो . निराशा वादी भावना ज्या तुम्ही अंतरमनात दाबून टाकता आणि ज्या तुम्ही पूर्णपणे स्वीकारत नाही ...अश्या भावनांमधील वेदना या वेदना कोषात पडून राहतात .जसे वैयक्तिक वेदनाकोषा मध्ये वैयक्तिक वेदना साचून राहतात तश्या सामाजिक वेदना कोषामध्ये ( समाजपुरुषाच्या वेदना कोषात )समाजातील अगणित लोकानी भोगलेल्या वेदना ,त्रास साचून राहतात. या वेदना कोषाचे खाद्य म्हणजे नकारात्मक विचार ...निराशावादी भावना … वेदना आणि दुखः तुम्ही निराशावादा कडे सारखे झुकत असाल तसेच जर तुम्हाला दुखःमय भावना खूप हव्या हव्याशा वाटत असतील तर तुम्ही वेदना कोषाच्या प्रभावा खाली आहात असे म्हणता येईल .
जर तुम्ही या वेदना कोषाच्या प्रभावा खाली असाल तर परत परत तुमच्या जखमा उकरून काढून आपल्या वेदना कुरवाळीत बसाल ….
जर तुम्ही जागरूक नसाल ( If you are not absolutely present किवा aware ) तर हा वेदना कोष तुमच्या मनाचा कब्जा घेईल आणि तुमच्या मनात परत परत निराशाजनक विचार आणेल आणि वेदना देणारे अनुभव घ्यायला तुम्हाला प्रवृत्त करेल.
मग तुम्ही दुसऱ्यावर अत्याचार करून त्याला शारीरिक वा मानसिक वेदना देत रहाल किवा आपल्या स्वतःला वेदना देत रहाल .
साध्या सरळ शब्दात या वेदना कोषाचे वर्णन करायचे असेल तर …. दुखःमय भावनांचे व्यसन !
( Mr. Tolle says ….: The pain-body is my term for the accumulation of old emotional pain that almost all people carry in their energy field. I see it as a semi-autonomous psychic entity. It consists of negative emotions that were not faced, accepted, and then let go in the moment they arose. These negative emotions leave a residue of emotional pain, which is stored in the cells of the body. There is also a collective human pain-body containing the pain suffered by countless human beings throughout history. The pain-body has a dormant stage and an active stage. Periodically it becomes activated, and when it does, it seeks more suffering to feed on. If you are not absolutely present, it takes over your mind and feeds on negative thinking as well as negative experiences such as drama in relationships. This is how it has been perpetuating itself throughout human history. Another way of describing the pain-body is this: the addiction to unhappiness.)
हा वेदना कोष जर पूर्वापारपासून असेल तर आत्ताच याची दखल कशाला घ्या ?
आजच्या समाजात जागरूकता कमी आहे म्हणून .
५.० आजचे पकडले गेलेले गुन्हेगार हे वेदना कोषाच्या पूर्ण आहारी गेलेले खुले कली आहेत ...छुपे कली किती तरी जास्त आहेत !
वेदना कोषाला वेदना आवडतात . निराशावादी भावना हव्या हव्याशा वाटतात. दुसऱ्याला दुखः द्यायला आणि स्वतः सोसायला आवडते. काहीतरी कारण काढून दुसऱ्याशी भांडण करायला आपला अमानुषपणा दाखवायला आणि दुसऱ्याला वेदना ..शारीरिक आणि मानसिक द्यायला आवडते. क्रौर्य पहायला आणि अनुभवायला आवडते. या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना ही आपल्यासारखे करायला आवडते.मुष्टियुद्ध ...मुक्या जनावरांना भाल्याने टोचून जखमी करणारे खेळ पाहायला आवडते ...ते अश्यावेळी बेफान होतात.
अश्या लोकांना कळप तयार करायला आवडते सम अविचारी लोकांचा. मग हे लिखाण असेच करतात ..बातम्या अश्याच देतात ...चित्रपट असेच काढतात ...मारामारीचे ..एकमेकांना गोळ्या घालून मारण्याचे खेळ तयार करतात. लहान मुलांच्या कोवळ्या मनावर असेच संस्कार होत राहतात. त्यांच्या मनात या विश्वाची ही अशीच कल्पना तयार होते. मग या कळपाला हेच पहायला आणि ऐकायला आवडते. हे सर्व आवडणारे लोक आहेत म्हणून हे तयार करणारे लोक निर्माण होतात ... हे दुष्ट चक्र मग असेच चालू राहते.
मग फक्त पहायचे कशाला ? करून पाहायला काय हरकत आहे ? आभासी दुनियेतून सत्य दुनियेत मग सहज प्रवेश होतो.
दूरदर्शनवर क्रिकेट बघणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळा गल्लीबोळात आपणही क्रिकेट खेळावे असे वाटते ….अगदी तसेच
चित्रपटात अदाधुंद गोळीबार करणारा खलनायक पाहून शाळेतील निरागस मुलांवर गोळीबार करणाऱ्याची मानसिकता कदाचित अशीच असेल का ? मलातरी तसे वाटते.
असे कली संचारलेले क्रूरकर्मा मग अनेक प्रकारचे गुन्हे करायला लागतात. हे सर्व आवडणारे याला वर्तमानपत्रात ...दूरदर्शनवर ...अंतरजालावर पुन्हा पुन्हा प्रसिद्धी देतात….पुन्हा नव्या छुप्या कलींचा मार्ग मोकळा करतात ...त्यांना छुपे प्रोत्साहन देतात.
मग आपण या लेखाच्या सुरवातीला सांगितलेले प्रसंग पुन्हा पुन्हा घडतात ….त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळते ….हे दुष्टचक्र सुरूच राहते…..
वेदना कोष वाढत राहतो ...आपल्या विळख्यात आणखी लोकांना घेत राहतो . साऱ्या समाजात जणू मग कली संचारतो ...
दुसऱ्याला वेदना देऊन आनंद मिळवणारी एक वेगळी जमात ..एक वेगळा कळप निर्माण होतो
६.० यावर उपाय काय ?
मुख्य उपाय तीनच. हे सरळ आहेत पण सोपे अजिबात नाहीत .
वेदना कोषाचे सकारात्मक विचारांपुढे काही चालत नाही . त्याचा पुरस्कार करा. गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितले आहे तसे …..
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
मतितार्थ ...हे परमेश्वरा आमच्या कानांनी जे शुभ आहे तेच ऐकावे ..आमच्या डोळ्यांनी जे शुभ आहे तेच पहावे .
या प्रार्थानेप्रमाणे सकारात्मक वर्तन करावे. नकारात्मक गोष्टी समोर येताच डोळे मिटून घ्यावेत .. कान बंद करावेत…..
लहान मुलांवर सकारात्मक संस्कार करा . त्यांना लहानपणापासून योग आणि ध्यान ( Meditation..). शिकवा ...प्राणायाम शिकवा ….. त्यांना जास्तीतजास्त जागरूक कसे करता येईल हे पहा. प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात असे म्हणतो ...वेदना कोषाशी सलग्नता तोडायला हवी . आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावना या वेदना कोषातून येत आहेत आणि त्या माझ्या नाहीत हे ओळखायला हवे. ही अशी जागरूकता आली कि वेदना कोषाच्या प्रभावापासून तुम्ही लांब जाता. अश्या लोकांची संख्या वाढली की सामाजिक वेदानाकोष हळू हळू कमी प्रभावी होतो. तो पूर्णपणे नष्ट होणार नाही ...काही लोकांवर त्याचा प्रभाव पडेल सुद्धा पण त्यांची संख्या कमी कमी होईल. कलीचा संचार जागरूक लोकांमध्ये होत नाही हे कायम लक्षात ठेवले पाहिजे ..
जागरूकता( awareness) तर हवीच पण जर योग्य अयोग्य याचा विवेक नसेल तर त्याचा प्रभाव कमी होईल . म्हणून लहानपणापासून मुलांवर योग्य संस्कार हवेत. आई वडील आणि शिक्षकांचे हे संयुक्त काम आहे. मुले शाळेत जायला लागल्यावर तर शिक्षकांचे जास्त. पण त्या साठी हा शिक्षणाचा बाजार बंद झाला पाहिजे. राष्ट्र रक्षणाचे काम करणाऱ्या सेनेत जसे शिस्त आणि क्षमता महत्वाची ...तसे राष्ट्र संवर्धनाचे काम जिथे होते त्या शिक्षण पध्दतीत ही यालाच महत्व देऊन शिक्षक तयार केले पाहिजेत. . शिक्षण हे पैसा उपसायच्या खाणी नसून तरुणांना तावून सुलाखून राष्ट्राचे सुजाण नागरिक करायचे यज्ञ कर्म आहे हे समजणारे या पेशाला पूजा समजून काम करणारे पात्र शिक्षक या क्षेत्रात यायला हवेत . प्राथमिक शिक्षणापासून हे योग्य संस्कार झाले पाहिजेत. आपल्या राष्ट्राची मुले आणि मुली कायम जागरूक आणि सुसंस्कारित झाली पाहिजेत . मग समाजातील आज सगळीकडे दिसणारी अमानुषता खूप कमी होईल .
गुन्हेगारांना कठोर शिक्षा विलंब न लावता देणे आणि ती कमीत कमी वेळात अमलात आणणे हे तर हवेच पण मुळात गुन्हे आणि ते ही अमानुष गुन्हे होऊच नयेत या साठी संस्कार आणि जागरूकता खूप महत्वाची आहे.
सगळीकडे पसरलेला हा क्रौर्याचा अंधार नष्ट करायचा असेल तर जागरूकतेचा दिवा लावणे हा एकच मार्ग मला तरी सध्या दिसतो आहे.
थोडक्यात काय?... तर जागे व्हा ...आणि जागे रहा !
************************************************************************************************
जयंत नाईक
प्रतिक्रिया
माझ्या मते क्रोर्याची कारणे -
माझ्या मते क्रोर्याची कारणे -
१) लोभ,
२) लवकर विनासायास श्रीमंत होण्याची हाव,
३) अंगातली रग जिरवण्यासाठी स्पर्धात्मक साधने/ खेळ करण्याची नावड,
४) तरुणांस हिजडे करणारी रंगीत बेगडी चित्रपट माध्यमं,
५) यंत्रांचा अतिरेक वापरून येणारा आळशीपणा.
सहमत
अगदी बरोबर आहे ...पण म्हणजे मुळातच स्वार्थी मनोवृत्ती. तसे स्वार्थी आपण सगळेच असतो . संस्कारांमुळे आपण थोडासा इतरांचा विचार करायला लागतो. थोडी थोडी सद्सद विवेक बुद्धी यायला लागते. हेच होणे गरजेचे आहे.
पण म्हणजे मुळातच स्वार्थी
.
इतरांचा विचार करणे म्हंजे इतरांना त्यांचा स्वार्थ साधण्याची संधी/अवसर देणे त्यांच्याशी त्यांना त्यांचा स्वार्थ साधण्याच्या कामात सहकार्य करणे - हे खरं की नाही ??
.
गुस्सा
गुस्सा पलभर का होता है
पर सजा जिंदगीभर की होती है
भांबड आलं
संस्कृती
आत्तापर्यंत अनेक प्राचीन संस्कृती काळाच्या ओघांत नष्ट झाल्या. त्याचे कारण प्रगतीचा आलेख सर्वोच्च स्थानावर गेल्यावर उतार अटळ असतो. तसेच आत्ताच्या प्रगत संस्कृतीचेही होणार आहे. त्यावर चर्चा करुन वा जुजबी उपाययोजना करुन ते थांबणार नाही. तेंव्हा , 'कालाय तस्मै: नम:', असे म्हणून, या सर्व अधोगतीचे मूक साक्षीदार होणेच आपल्या हाती आहे.
+१
अगदी असेच म्हणतो. या कमेंटमुळे आयझॅक असिमॉव या प्रख्यात विज्ञानकथालेखकाची फाउंडेशन सेरीज ही जबरदस्त कथामालिका आठवली. त्याचा थोडक्यात सारांश असा:
आजच्यापासून साधारणपणे १२ हजार वर्षे पुढचा अतिप्रगत काळ. अतिप्रगत म्हणजे इतका प्रगत समाज आहे की सूर्यमालाच काय , अख्खी आकाशगंगा मानवाने पादाक्रांत केलेली असून अख्ख्या आकाशगंगेचे एक अतिबलाढ्य साम्राज्य आहे. त्याची राजधानी एक ग्रह असून एकूण साम्राज्यात अडीच कोटी ग्रह असतात. तर यातील दशवार्षिक गणित कॉन्फरन्समध्ये एक गणिती आपली नवी गणिती पद्धत सादर करतो. त्याचा उपयोग भविष्य वर्तवायला होणार असतो अगदी परफेक्टपणे. तर आकाशगंगेचा सम्राट त्याच्या मागे लागतो की बॉ तुझे गणित वापरून लोकांना कन्विन्स कर की माझे राज्य जनकल्याणार्थ आहे उत्तम आहे वगैरे. पण गणिती म्हणतो की असे काही नाही, तुमचे राज्य येत्या शेदोनशे वर्षांत कोसळणार असून त्याची सुरुवात तुमच्याच काळात होणारे. निसर्गनियमांप्रमाणे तुमचे राज्य संपले की सगळीकडे केऑस वगैरे. पुन्हा मग समाजाची प्रगती होऊन या लेव्हलला यायला अदमासे तीसेक हजार वर्षे लागतील. त्यापेक्षा मी म्हणतो ते जर केले तर दुसरे साम्राज्य फक्त एक हजार वर्षांत उभे राहील. मी म्हणतो ते केले म्हणजे काय? तर सध्या अजून समाज ॲडव्हान्स लेव्हलला आहे तोपर्यंत आकाशगंगेच्या दोन विरुद्ध टोकांवरचे दोन बारके ग्रह हेरून तिथे सायंटिस्ट इ. लोकांची छोटीशी कॉलनी वसवायची. त्यांचे काम एकच- सध्याच्या संस्कृतीतले सर्व ज्ञान जतन करायचे. थिअरी, प्रॅक्टिकल, सर्वच. एन्सायक्लोपीडिया गलॅक्टिका असे त्या कोशाचे नाव. तर तसे करतात, पुढे संस्कृती खालावल्यावर हे सायंटिस्ट आपल्या ज्ञानाच्या जोरावर पुन्हा कसे डॉमिनेट करतात, त्यांना नवीन संकटे कशी सामोरी येतात वगैरे प्रकार इतका जबरदस्त वर्णन केलाय की मी ते वाचून अक्षरश: मंत्रमुग्ध झालो होतो. मान गये बॉस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझे ते मला मिळायलाच हवे(
माझे ते मला मिळायलाच हवे( स्वार्थ ); मला आणखी आणि मलाच मिळायला हवे ( लोभ सुटणे. )
बिंबिसार, अजातशत्रू गोष्ट बुद्धच्या काळातली आहे.
संपूर्ण समाजाची(च) संवेदना बधिरता
ओलावा जपावा, दिसावा.. हा लोकसत्तेतील अग्रलेख (28 एप्रिल) आपल्या आताच्या समाजाच्याविषयी बरेच काही सांगून जात आहे. मनाच्या कप्प्यातील संवेदनशीलतेची कोपऱ्याची जागा रिकामी होत असून आपल्या आवती भोवती घडणाऱ्या दुर्घटनांबद्दल, रागाच्या भरातील गैरवर्तनाबद्दल आपल्या संवेदना बधिर होत असल्यामुळे संघटितपणे त्याचा प्रतिकार सातत्याने होणे दुरापास्त ठरत आहे. या संवेदनाविहीनतेच्या मूळ कारणाचा शोध घेतल्यास कदाचित भावनेच्या भरात विवेकी विचार व त्याप्रमाणे कृती होत नाहीत म्हणून ही मानसिकता अजूनही वरचेवर डोके काढत आहे. मुळात आपला आताचा आधुनिक म्हणवून घेणारा समाज sex, sadism, (in)sensitivity त मोठ्या प्रमाणात गुरफटून घेत आहे. त्यामुळे अविचारातून होत असलेल्या अमानुष व क्रूर कृतीचे काय परिणाम होणार आहेत याची पुसटशी कल्पना येत नाही. अविचारांची सरशी होण्यास जात, धर्म, जगण्यातील अगतिकता, भविष्याची भीती अशी अनेक कारणं असून अविचारांना, दुष्टविचारांना वेळीच थोपवून त्यातून होणाऱ्या कृतीची जाणीव करून देणे याला प्राधान्य क्रम दिल्यास, काही प्रमाणात का होईना, हा समाज संवेदनशील होण्याची शक्यता आहे. केवळ स्वतःपुरते बघत जीवन जगणाऱ्यांना या मानसिकतेची झळ अजूनही पोचलेली नाही. व अशा दुर्घटनेकडे अलिप्तपणे बघत सामाजिक संघर्षात ते सहभागी होत नाहीत. त्यामुळे अशा प्रसंगी अपेक्षित असणारा सामाजिक आधारच पीडितांना मिळत नाही.
एखाद्या दुर्घटनेनंतर केवळ मेणबत्त्या पेटवण्यापुरते एकत्र आलेल्या समूहाला दीर्घकाळ आंदोलन करण्यास वा सातत्याने निदर्शन करण्यास उद्युक्त करणे कुठल्याही सामाजिक (वा राजकीय) संघटनेला शक्य होईनासे झालेले आहे. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीमधील मानवी नैतिकतेला व विवेकी विचार करून कृती करण्याला आव्हान करून हा ओलावा निर्माण करता येईल असे वाटते.
अगदी बरोबर.
मला काय त्याचे ? असे विचार आणि दुसर्याला वेदना देण्यात आनंद हा संवेदनशील पणा पूर्ण नाहीसा होतो आहे याचे लक्षण आहे.
डेरिव्हेटिव्ह
मी गणिती आहे. कॅल्क्युलस फार आवडत नसलं तरी बऱ्याच गणिती लोकांना ते साधारण जीवनात कसं वापरता येत नाही, आणि साधारण जनतेला ते कसं अनाकलनीय वाट्टं ह्याची मजा घेणं मला ज्याम आवडतं.
--
लेखकरावांचा मुद्दा हा आहे की समाजात 'आजकाल' क्रौर्य फार वाढत चाललेलं आहे. माझे काही फार्फार मूलगामी इ. प्रश्नहेत्.
१. कालच्या युगात क्रौर्य नव्हतं का? दोन महायुद्धं, पारतंत्र्य, अणुबॉम्ब हे क्रौर्यात मोडत नाहीत का?
२. 'आपल्या समाजात' म्हणजे फक्त भारतीय असं म्हणायचं असेल, तर रामन राघवन, जोशी-अभ्यंकर वाले सिरीअल किलर्स, मुंबईतले डॉन्स, त्यांच्या टोळ्या, दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे इ. लोक क्रूरांत मोडत नाहीत का?
३. लेखकच म्हन्लेत तसं,
मग हे 'आजकाल' 'आपल्या समाजात' क्रौर्य वाढायलं का, ह्याच्या उत्तरासाठी हवं कॅल्क्युलस. म्हणून ती प्रस्तावना.
--
लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. पब्लिक अक्षरश: किडेमुंग्यांसारखं जगतंय आणि वाढतंय. क्रौर्याचा पर क्यापिटा रेश्यो नक्की वाढलाहे का? वाढला असेल, तर माझे काही डाऊट:
१. आधीच्या काळी, कुठेतरी झालेलं क्रौर्य तुमच्यापर्यंत पोहोचायचं साधन काय होतंं? लोक आधी आत्ताइतक्या तत्परतेने तक्रार नोंदवायचे का? ती कुठेतरी अरुणाचल प्रदेश किंवा लक्षद्वीप बेटांत झालेली तक्रार तशी तुमच्यापर्यंत पोहोचायची का? ह्याचाच फायदा घेऊन, अधिक विकृत/क्रूर लोक आधीच्या काळीच
जास्त होते असं म्हटलं, तर ते खोडता येईल का? सध्याचं मिळणारं फुटेज पाहता लोक ज्यास्त औकादीत राहतात हे खोटं कशावरून?
२. त्यावेळच्या तुलनेत क्रूर लोक्स किती होते आणि आत्ताच्या तुलनेत किती आहेत? हा जो नॉर्मल लोक व्हर्सस क्रूर लोकचा जो आलेख आहे त्याचा स्लोप काय आहे? मी इथे डबल डेरिव्हेटीव्ह बद्दल विचारतो आहे, सिंगल नव्हे. सिंगल डेरिव्हेटिव्ह हे पॉझिटीव्ह असणं अगदीच नॉर्मल आहे, आणि ते ह्यासाठी:
३. अशी लोकसंख्या वाढायला कालच्या काळातलेच लोक जबाबदार आहेत. भारतातल्या लोकसंख्येला पुरं पडणारी व्यवस्था आणि (कालचे पिकलेले लोक खपून) नवं सरकार उभं रहायला अजून पन्नास वर्षं तरी आरामात जातील. शिवाय कालच्या काळातल्याच लोकांचं तेच ते अति मर्यादाशील जगणं आणि स्वत:च्या नशिबाला कोसत राहणं, ह्याचा वीट आलेल्या आजच्या लोकांची (हे
ममव बद्दल, अजून गरिबांचं तर पहायलाच नको) उद्विग्नता हाताबाहेर जाणं हा कालौघच आहे. ह्याच्यामुळेच (कुठलीही मोस्लेच्या त्या पिऱ्यामिडातली एक गोष्ट) असलेल्या आहे रे आणि नाही रे वर्गातली दरी वाढतच जाणार आहे. आणि त्यावर; लेखकराव, तुम्ही सांगितलेले उपाय अगदीच पुचाट आहेत हे माझं म्हणणं आहे.जाता जाता:
...
हे शुद्ध बेकायदेशीर आहे, हे बहुतेक वेळी कोणीही करत नाही, केल्यास आणि जीव गेल्यास मृतांना भरपाईही मिळत नसावी.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
प्रतिसादाशी जोरदार सहमती.
प्रतिसादाशी जोरदार सहमती.
----
निळ्या रंगाने रंगवलेल्या शब्दावर आक्षेप.
-----
ती तशीच वाढत जावो ही सदिच्छा.
.
----
आवडला.
प्रतिसाद आवडला. बऱ्याचशा मुद्द्यांशी सहमत.
शहामृगांपुढे काय बोलणार?
वादळ आले कि शहामृग वाळूत मान खुपसतो आणि वादळ आलेच नाही असे म्हणतो. माणसात सुद्धा असे अनेक आहेत असे काही प्रतिक्रिया वाचून वाटले. आपण आपल्या स्वप्नील जगात असेच जगत रहा. युद्धातील क्रौर्य किवा हुकुमशहा किवा धर्माच्या नावाखाली झालेले क्रौर्य हे काही लोकांच्या मनातील क्रौर्य ..आज्ञापालन या सदरात पुढे वाढत जाते. हिरोशिमा आणि नागासाकीवर ज्या वैमानिकाने बोंब टाकला तो फक्त आज्ञापालन या सदरात येतो . त्याला स्वतःला आपल्या हातून येवढा नरसंहार होणार आहे हे पूर्ण पणे माहीतसुद्धा नव्हते. मनुष्य हा पशू म्हणूनच जन्मतो संस्कार त्याला माणूस घडवतो . हे संस्कार कुणाला पुचाट वाटत असतील तर वाटो बापडे. माझ्या मते हेच महत्वाचे आहेत.
म्हणून पाहिजे कॅल्क्युलस.
मग ते क्रौर्य नव्हेच, किंवा हे असलं क्रौर्य तर चालतंऽच, असं आपलं म्हणणं आहे का? 'काही लोकांच्या' म्हणजे काय? आजकाल सगळेच लोक क्रूर झाले आहेत का?
मी त्या वैमानिकाला क्रूर म्हणतच नाहीए. मी त्या आज्ञा देणाऱ्या अमेरिकी इसमासच क्रूर म्हणतोय. त्याला, आईनष्टाईनला, ओपेनहायमर इ.ना नक्कीच माहित होतं ह्या बॉम्बने काय होणार आहे ते. कोणीतरी ठरवून न भूतो न भविष्यती असं, अतिसंहारक असं क्रौर्य घडवून आणलंच आहे, आणि प्रत्येक सहस्त्रकात असे लोक मिळतातच. त्यामुळे मुळात क्रौर्य हे अबाधितच आहे, हे माझं म्हणणं आहे.
आणि अंतिमत:
म्हंजे मला दिसतंय बा विरोधाभास का काय ते. गौतम बुद्धाची गोष्ट तुम्ही वाचली असावीत अशी आशा आहे. बाकी नेहमीप्रमाणे तुम्हाला, त्यांच्या अंगात असलेली उर्जा व्यवस्थित वापरून (लहान/तरूण/किशोर/कुमार) मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मुलांना संमती आणि नकाराचा अर्थ, मेहनतीचं आणि स्वकष्टार्जित गोष्टींचं महत्त्व, शक्तीचा विधायक उपयोग इत्यादी न शिकवता,
हे पुचाटच उद्योग शिकवायचे असतील तर तुम्ही शिकवू शकता.
--
जाता जाता:
वादळ आजच आलेलं नाहीए. वादळ आपल्या रक्तात आहे. वादळ कायमच घोंघावतं आहे. वादळ कालही होतं आणि आजही आहे. 'ते वादळ आजच आलेलं आहे, आणि कोणालाच ते दिसत/जाणवत कसं बा नाहीये', ह्या मुद्द्याचं खंडन करायला मी प्रतिक्रिया लिहीलेली आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
जयंतराव, तुमचा गुस्सा सिर
जयंतराव, तुमचा गुस्सा आणि ठामपणा सुद्धा सिर आखोंपर. इथे ऐसीवर काही वेळा जोरदार धुमश्चक्री होते. चौदावेंच्या बरोबर माझी एकदा गरमागरम चर्चा झाली होती.
पण नंतर आम्ही दोस्त आहोत.
तुम्ही पण तुमची आयुधं शमीच्या झाडावरून उतरवून कुरुक्षेत्रात या. घनघोर युद्ध करू. आणि नंतर मुर्गीपार्टीला बसू.
.
धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. माझे इतकेच मत आहे कि संवाद असावा ....वाद कशाला ?
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
जयंतराव, वाद का नसावा ?
.
जोरदार वाद असावा असं मला वाटतं. घनघोर शाब्दित युद्धं व्हावीत. Intense debates force us to think harder. I have experienced that.
.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावधी तीच आहे - खडाजंगी, धुमश्चक्री.
.
मी बरोबर तुम्ही चूक
या भावनेतून जे होते ते नको . आपण दोघे मिळून सत्याचा शोध घेऊ हे मला सुद्धा स्वागतार्ह आहे. आपण दोघे ही चूक असू शकतो . मुळात सत्याचा शोध हा असा बरोबर आणि चूक यात अडकवून उपयोग नाही . संवाद मला मान्य आणि त्यात एकमेकाबद्दल आदरच हवा. मग जोरदार संवाद होऊ दे. पण आजकाल मुद्दा नसताना वाद घालणे आणि मग हमरातुमरीवर येणे आणि मग मारामारी ....क्रौर्य वाढलय याचे मूळ कारण खरे तर मी बरोबर तुम्ही चूक अशी भूमिका आणि जागरूकतेचा अभाव म्हणजेच ego चा असीम विळखा. हा मला कोण सांगणार ? हे मला मिळालेच पाहिजे ...अशी भूमिका.
आपण दोघे मिळून सत्याचा शोध
.
.
.
सत्याचा शोध घेताना इगो चे अस्तित्व अमान्य करून कसं चालेल ?
इगो हे सत्य नाहिये का ?
.
अनादर करण्याचा कोणताही उपयोग नसता तर अनादर करण्याचा विकल्प निर्माण झाला असता का ?
.
अनादर
काही लोकांना लोकांचा अनादर करूनच आपला आदर वाढतो असे वाटते त्याला काय करणार ? एक सुभाषित आठवते आहे.
खलानां कण्टकानांच द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्मुखभंगोवा दूरतो वा विसर्जनम्॥
दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोन प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेनी फोडून काढणं किंवा दुरूनच टाळून जाणे.
अर्थात!
मुर्गी आणि मदिरा बाकीहे बर्का गब्बर्राव तेव्हाची!
बाकी गोष्टींना अर्थातच सहमती.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
पार्टी.
दिवाळीत जमवायचा प्रयत्न करू.
एकच प्रश्न
त्यांना मुर्गीपार्टीचे आगाऊ आमंत्रण देण्याअगोदर, कदाचित ते शाकाहारी असू शकतील, ही शक्यता आगाऊ विचारात घेतली आहेत काय?
शाकाहारी असल्यास कठीण आहे.
शाकाहारी असल्यास कठीण आहे.
निर्व्यसनी असल्यास त्याहून कठीण.
होय शाकाहारी आहे.
पूर्ण शाकाहारी आहे आणि चहाचे व्यसन आहे ...बाकी नाही !
काय???
कॉफीसुद्धा नाही???
बरे, चहाचा ब्रँड कोणता? 'लेबल'?
पूर्ण शाकाहारी आहे आणि चहाचे
.
प्रणाम नाईक साहेब.
.
चहाचे व्यसन हे व्यसन नसून व्यसनाचा भ्रम आहे.
.
जिसने पी नही व्हिस्की
जिंदगी व्यर्थ है उसकी.
.
भ्रम व्यसनाचा
मला व्यसन नाही अश्या भ्रमात राहूनच पुढे ते व्यसन होत असावे का ? बहुतेक .
मी चुकून "सावधान ! आपल्या
मी चुकून "सावधान ! आपल्या समाजातील कौमार्य वाढत आहे ... जागे व्हा आणि जागे रहा" वाचलं
Liberalism is a mental disorder
ते आपणच सांगू शकाल
मस्त comment. आवडली . सत्य आहे किवा नाही याबद्दल मोठा वाद होऊ शकेल .
सहमत
म्हंजे मला दिसतंय बा विरोधाभास का काय ते. गौतम बुद्धाची गोष्ट तुम्ही वाचली असावीत अशी आशा आहे. बाकी नेहमीप्रमाणे तुम्हाला, त्यांच्या अंगात असलेली उर्जा व्यवस्थित वापरून (लहान/तरूण/किशोर/कुमार) मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मुलांना संमती आणि नकाराचा अर्थ, मेहनतीचं आणि स्वकष्टार्जित गोष्टींचं महत्त्व, शक्तीचा विधायक उपयोग इत्यादी न शिकवता,
या बद्दल वादच नाही . संस्कार म्हणजे काय ? फक्त रात्री शुभम करोति म्हणणे नव्हे . शरीर ..मन आणि आत्मा यांची उन्नत्ती . संस्कार म्हणजे ...सम अर्थात सम्यक ...चांगले ते सर्व ...कार म्हणजे कृती ...ज्यातून चांगली कृती निर्माण होते ते संस्कार. आपण म्हणता ते नक्कीच व्हायला पाहिजे .
मला आवडला लेख ... बहुतेक सगळे
मला आवडला लेख ... बहुतेक सगळे मुद्दे व्हॅलीड आहेत.
शत्रूच्या प्रति दाखवलेले
शत्रूच्या प्रति दाखवलेले क्रौर्य हे शौर्य म्हणून प्रतिष्ठीत पावते त्याच काय करायच?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आवश्यक
शत्रूच्या प्रति दाखवलेले क्रौर्य हे शौर्य म्हणून प्रतिष्ठीत पावते त्याच काय करायच?
त्याला, 'आवश्यक कार्य', असं लेबल लावून गप्प बसायचं!