Skip to main content

निर्भया - दिल्ली आणि मुंबई नंतर सगळं शांत शांत का ?

निर्भया बलात्कार प्रकरण खूपच वाईट होतं. या प्रकरणात मेडीया एक झाला होता आणि देशभर, नव्हे जगभरात रान पेटवलं होतं. पुढे खटला चालला, वेगवान चालला, तावातावाने चर्चा झाल्या...

पुढे काय ?

पुढे मुंबईची केस घडली. मग पुन्हा तोच घटनाक्रम.

निर्भया आणि मुंबईची घटना या दरम्यान देशभरात सगळंच आलबेल होतं का ? निभयाच्या आधी आणि मुंबईच्या नंतरही आता सगळं काही ठीक चालू आहे का ? जर निर्भयाची केस दिलीत न घडता अन्यत्र घडली असती तर त्या घटनेला इतकंच महत्व दिलं गेलं असतं का ? त्यातून ती गरीब किंवा दलित समाजातील मुलगी असती तर अशीच आग लागली असती का ?

हा मेडीया आरुषी तलवार प्रकरणात इतका हळवा का होतो ? दोन दोनदा निकाल देऊनही न्यायव्यवस्थेला धारेवर धरतो. पण याच मेडीयाला हजारो, लाखो निर्भया दिसत नाहीत. खैरलांजी प्रकरणाचा उल्लेख केला कि वीट आला अशा प्रतिक्रिया आल्या म्हणून अन्य उदाहरणं आज देणार आहे. ढिगाने देता येतील उदाहरणं.

अंजू बाला बलात्कार आणि हत्या प्रकरण - आंतरराष्ट्रीय मेडीयात वाचा फुटली पण आपल्याला पत्ताच नाही !
http://bahishkrutbharat.blogspot.in/

Help the victim of India's most brutal gang-rape! She's the rape victim India forgot
http://bahishkrutbharat.blogspot.in/2013/12/help-victim-of-indias-most-…

खरोखर अनेक प्रकरणं आहेत. लोक म्हणतील मेडीया कुठं कुठं पोहोचणार ?
प्रिन्स या बालकाचं उदाहरण आठ्वतंय का ? खड्ड्यात पडलेल्या लहान मुलाचं. हरीयाणा, पंजाब बॉर्डरवरचं एक छोटंसं गाव होतं. मेडीया पोहोचला तिथे. नंतर अहाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणीही अशा घटना घडल्या तेव्हांही पोहोचला. मग या घटनांमधे काय घडलं असं ?

खूप प्रश्न आहेत.
जाळपोळ, दंगल, देवदर्शनावरून खून याबद्दल तर बोलायलाच नको.

निर्भया प्रकरण म्हणूनच दिल्लीऐवजी अन्यत्र घडलं असतं तर ??

अनिल सोनवणे Mon, 23/12/2013 - 02:53

पण एकदा कुठंतरी बोलायचं होतं. या निमित्ताने इथं व्यक्त होतोय.

गेली आठ वर्षे आंजावर आहे. दलित समाजावरच्या घटनांबद्दलची उदासीनता अनुभवतो आहे. ऑर्कूटवर तर आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया आलेल्या तेव्हां हैराण झालेलो. पण संयम ठेवला होता. माझ्यासारखे अन्य काही वातावरण निवळण्यासाठी सर्वत्र वावरणारे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत. कारण रोजच काही न काही घडतंय आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतय. पण राष्ट्रीय माध्यमाचं वार्तांकनच नसल्याने विश्वासार्ह लिंक दिल्याशिवाय आंजावरचं पब्लीक विश्वास कसं ठेवणार ?

कुठंतरी हा असंतोष साध्या साध्या गोष्टीतून चिडक्या प्रतिसादांतून निघत होता. इथे माझी कथा सांगणे हा उद्देश नसून एकदाच काय ते मन मोकळे करणे हा उद्देश आहे. नाहीतर आपण जातो वातावरण निवळायला आणि निचरा न झाल्याने मनात साठून राहतं. त्या पेक्षा दोन दिले दोन घेतले हे परवडलं. पुढे या कृत्रीम वातावरणात जीव घुसमटू लागला. आपल्याला सगळं येतं असं दाखवणारे आणि दलित असून अशा प्रश्नात तटअस्थ राहणारे आयडी पाहीले कि मन सहानुभूतीने भरून यायला लागलं. कितीही आव आणला तरी, रिझर्वेशनच्या सीट न घेता देशात पहिल्या दहामधे येऊनही देवयानीची जातच काढली ना शेवटी ? अगदी कमी आहेत हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे. ज्यांना समजून घ्यायचंय ना ते कसेही समजून घेतील, पण ज्यांचे पूर्वग्रह आहेत त्यांना समजून सांगण्याने त्यांना अधिकच चेव येतो हे निरीक्षण झाल्यावर काही ठिकाणांना टाटा बाय बाय केलं. मी मुद्दामून सांगतोय कि इथं लिहीतोय याचा अर्थ इथं नक्कीच वेगळं वातावरण आहे. आंजावर असे माझ्यासारखे वावरणारे अनेक जण आणखीही आहेत. कुणाला कवी बनायचं, कुणाला विचारवंत, कुणाला आणखी काही. प्रत्येकाला स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण जेव्हां दलितांचे प्रश्न येतात तेव्हां तोंड लपवल्याने नेमकं काय साध्य होतं हे मला अजून समजलेलं नाही.

मग हे लोक निर्भयावर अतिविद्वान पोस्टी टाकत बसतात. पण आजूआजूला काय घडतंय हे माहीत असून शांत बसतात. हा समाजघटकही तितकाच दोषी असल्यानं मेडीयालाच फक्त कसा दोष द्यायचा ? जर अशा विषयांवर लिहीलं तर मैत्री तुटणार असेल तर त्या मैत्रीला मैत्री म्हणत नाहीत हे अशांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. सेतू बांधण्याची गरज आहे हे नक्की आहे. पण मोठा समाज हा अशा विचारांपासून दूर आहे. तसंच बुरखेधारीही अनेक आहेत. देवयानी प्रकरणात वारंवार आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करणायांबद्दल काय बोलणार ?

खूपच अवांतर झालं. क्षमा असावी. पण खूपच अस्वस्थता आहे.

राजेश घासकडवी Mon, 23/12/2013 - 07:56

तुमची कळकळ समजू शकतो. पण मीडियाकडून तुमच्या अपेक्षा अधिक आहेत असं वाटत नाही का? भारतात दरवर्षी वीस हजार बलात्कार होत असतील तर दर दिवसाला सहाशे बलात्कारांच्या बातम्या देता येतील का? त्यामुळे काही प्रमाणात मीडियाकडून चेरीपिकिंग होणार याला इलाज नाही.

आदर्श समाजात शून्य बलात्कार व्हावेत. आदर्श समाजात कोणाच्याच बाबतीत भेदभाव होता कामा नये. तिथपर्यंत पोचायला अजून बराच वेळ आहे. कोणीच जवळपासही पोचलेलं नाही. गेली काही दशकं, शतकं हा प्रवास हळूहळू चालू आहे. उद्याचं माहीत नाही, पण दहा वर्षांनी आजच्यापेक्षा चांगली परिस्थिती असेल याची खात्री आहे. धीर धरा थोडा. आणि दरम्यान खचून जाऊ नका.

नितिन थत्ते Mon, 23/12/2013 - 11:52

In reply to by राजेश घासकडवी

>>आणि दरम्यान खचून जाऊ नका.

हे महत्त्वाचं, खचून न जाणं- निराश न होणं अवघड आहे फारच. पण खचण्याचा पर्याय उपलब्ध नाही हे ही खरंच.

अरविंद कोल्हटकर Mon, 23/12/2013 - 10:23

दलितांच्या प्रश्नावर मी स्वत: काही फार लिहीत नाही. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की आम्हाला त्या प्रश्नांचे गांभीर्यच कळत नाही वा दलितांवरचे अन्याय फार अतिशयोक्त पद्धतीने मांडले जातात असे आम्हांस वाटते. आमच्या मौनाचा अर्थ असा आहे की आम्हाला त्या प्रश्नांची वैयक्तिक पातळीवर फारशी माहिती नाही आणि असे असल्याशिवायचे लिखाण केवळ वरवरचेच होणार.

आमचे मौन असले तरी आमची सहानुभूति तुमच्याच मागे आहे ह्याचा विश्वास बाळगा.

अजो१२३ Mon, 23/12/2013 - 10:53

मिझोरामचा एक्झिट पोल कुणी ऐकला होता का? आम्ही एका तरी राज्यात ३/४ बहुमताने जिंकलो असे काँग्रसने कधी सांगीतले काय? (यावरून) काय मेडियाचं घेऊन बसला आहात?

प्रायवेट मधे उच्चवर्णीय लोक दलितांबद्दल हिनतेने बोलतात, विशेषतः शहरी आरक्षण अनुभवलेले लोक. आणि केवळ कायद्याच्या भयाने ते तोंड गप्प ठेऊन असतात. दुसरीकडे जे चार चांगले उच्चवर्णीय असतात त्यांच्याबद्दल दलितांनाही विश्वास नसतो. कसा असेल? असा विश्वास चेक करण्याचा कोणता मेकॅनिझम अजून विज्ञानाकडे उपलब्ध नाही.

नोईडाच्या सेक्टर १६ ए मधे सगळे न्यूज चॅनेलचे ऑफिसेस आहेत. तिथून जे काही जवळ पडतं ती मोठी बातमी हा साधा फॉर्म्यूला आहे.

नितिन थत्ते Mon, 23/12/2013 - 11:56

In reply to by अजो१२३

>>नोईडाच्या सेक्टर १६ ए मधे सगळे न्यूज चॅनेलचे ऑफिसेस आहेत. तिथून जे काही जवळ पडतं ती मोठी बातमी हा साधा फॉर्म्यूला आहे.

असं असेलही. पण अगदी असंच नाही. दोनही बळी हे अपवर्डली मोबाइल मध्यमबर्गातले होते (म्हणजे पत्रकार वगैरे मंडळी आणि फेसबुकी मंडळी ज्या वर्गातली असतात त्या वर्गातले). म्हणून* त्या प्रकरणांचा गाजावाजा झाला.

*दिल्ली प्रकरण त्यातल्या ब्रूटॅलिटीने जास्त अधोरेखित झाले.

गवि Mon, 23/12/2013 - 12:33

In reply to by नितिन थत्ते

तो प्रिन्स खड्ड्यात पडला तो कोणत्या वर्गातला होता ? तरीही मीडिया फ्लडलाईट राहिलाच ना त्याच्यावर सतत?

त्यानंतर लगेचच्या काही दिवसांत कोणी कधी एकदा कुठे खड्ड्यात पडतो आणि आपण कव्हर करतो अशा हिरीरीने शोध चालल्यागत बातम्या दिसायच्या.

क्रमाक्रमाने तत्सम मुले जी बोअरवेलमधे पडत गेली त्यामुळे केसगणिक नावीन्य कमी झाले आणि त्यांचे कव्हरेज अनुक्रमे क्षीण होत गेले.

मधे बरीच ग्याप पडली आणि पुन्हा कोणी बोअरवेलमधे पडले तेव्हा पुन्हा नव्या उत्साहाने कव्हरेज मिळाले.

गेल्या दहापंधरा वर्षातल्या टीव्हीवरच्या न्यूज आणि कव्हरेज हा "एन्टरटेनमेंट बिझनेस" आहे, पत्रकारिता नव्हे, त्यात वर्गबिर्ग यापेक्षा लोकांच्या भावना त्या त्या वेळी कितपत उसळल्या आहेत त्यावर सर्व ठरतं.

ऋषिकेश Mon, 23/12/2013 - 12:51

एकूणच कोणती "बातमी" निवडावी - कोणत्या प्रसंगाची बातमी 'करावी' वगैरे गणिते त्या घटनेचे सामाजिक/राजकीय/आर्थिक संदर्भांपेक्षा त्या घटनेतील नाविन्य व त्याहूनही अधिक 'मनोरंजनमूल्य' या निकषावर होत असावे - होताना दिसते.

मंनोरंजनमूल्य म्हटले की काम/क्रोध/मद/मोद/मत्सर/घृणा/कणव अश्या प्रकारच्या भावना/मानसिक स्थितीला चाळवणार्‍या घटनांच्या मागे 'मिडीया' असतो. काही गोष्टी (जसे खड्ड्यात पडलेले मूल, शिक्षक/पालकांच्या दबावाखाली मैलोन मैल धावणारा 'बुधिया') लोकांच्या 'कणव' भावनेला एक्सप्लॉईट करतात, काही घृणा+क्रोध+काही प्रमाणात काम(बलात्कार)किंवा काही अगदी मद/मत्सर (बघा या या नेत्याकडे चपलांचे एवढे जोड, बघा या नेत्याकडे एवढी जमीन) इत्यादी इत्यादी

आता ज्या गोष्टी दाखवून सर्वात जास्त टीआरपी मिळतो त्याला प्राधान्य मिळणार - मिळते.

दलित समाजाच्या प्रश्नांवर अधिक व्यापक व 'सिरीयस' चर्चेची गरज आहे. मात्र अशी अपेक्षा सध्याच्या मिडीया कडून ठेवताना म्हणजे अपेक्षाभंगाची खात्री बाळगावी. समाजातील भेदाभेद स्पष्ट आणि विषण्ण करणारा आहेच याच्याशी सहमत आहे. (यावर उपाय काय हे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला माहिती नाही - पण मिडीया यावर उपाय असेल अशी अजिबात अपेक्षा नाही)

एखाद्य उच्च मनोरंजनमूल्य असणार्‍या बातमीची पात्रे सवर्ण काय, दलित काय किंवा विदेशी काय, या च्यानेलांना फार फरक पडत नसावा. या च्यानेलांमध्ये पैसे गुंतवणारे गुंटवणूकदार व जाहिराती करणार्‍या संस्थांनी घातलेले पैसे वसूल होण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांना जी बातमी टिकवेल ती दिसेल, असे साधे सुत्र असावे.