Skip to main content

बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??

एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः

१. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे.

२. सदर व्यक्ती ही अमूक एक देश, समाज वा गटातील लोकांच्या 'हिता'साठी काहीएक कार्य मृत्युपूर्वी करत होती, अशी एकंदरित लोकांची, आणि बहुतेकदा स्वतः त्या व्यक्तीचीही - समजूत असणे.

३. हे कार्य ती व्यक्ती स्वेच्छेने, 'कर्तव्य' भावनेने, निरपेक्षपणे करत असणे, किंवा 'मरावे परि कीर्तीरूपे उरावे' ही आकांक्षा. किंवा:

४. ते कार्य करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवण्यासाठी अन्य व्यक्ती, संस्था, सरकार, इ. ने त्याबद्दल काही वेतन, सुविधा, बक्षीस वगैरे देऊ केलेले असणे.

५. प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे.
('हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम' अर्थात युद्धात तू मारला गेलास, तर तुला स्वर्ग लाभेल, आणि जिंकलास, तर पृथीचे राज्य भोगशील" )

***
अमूक एका गटातील लोकांनी 'शहीद' ठरवलेली व्यक्ती अन्य गटातील लोकांना अपराधी, पापी, समाजकंटक वगैरे वाटू शकते.
बाकी एकंदर 'बघ्या' लोकांना या शहीदांचे काही सोयरसुतक नसते. जुन्या शहीदांच्या नावाने एकादी सुटी मिळते, तर नवीन शहीदांविषयी बातमी एक चटपटीत 'ब्रेकिंग न्यूज' असते.
***
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. एकादा प्रसिद्ध नेता वा सत्ताधारी 'शहीद' झाला, तर या गोष्टीचे भांडवल करून त्याचे वारस, वंशज वा नामसादृश्याचा फायदा घेणारे बिलंदर त्या शहिदाचे चित्र नोटांवर छापून, गावोगावी रस्त्यांना त्याचे नाव देऊन जनमानसात त्याची स्मृती जागृत ठेवून पिढ्यान पिढ्या सत्ता उपभोगतात. त्यातून त्या वंशात आणखी कुणी 'शहीद' झाले, तर मग विचारायलाच नको. त्या शहिदांची स्मारके उभी करणे, त्यांचा नावांच्या संस्था काढणे अश्या अनेक खटपटीतून भरपूर बेगमी करता येते.

कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. "जरा आंख मे भरलो पानी" वगैरे गाणी रचणारे, गाणारे, ऐकताना डोळ्यातून टिपे काढणारे, कादंबर्‍या-नाटके लिहिणारे, पुतळे बनवणारे, चित्रे-सिनेमे काढणारे, सर्वांनाच दुसरे कुणीतरी शहीद झालेले हवे असते... एकंदरित कुणीतरी 'शहीद' होणे, हा बर्‍याच लोकांसाठी 'फायदेमंद' सौदा असतो.

... राहता राहिले त्या शहीदांचे आप्त-स्वकीय. ते काही काळ दु:खी, अस्वस्थ रहातात, आणि शेवटी ते ही 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे' या सर्वव्यापी नियतीच्या अटळ गतीस प्राप्त होतात.
बोला, मग व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??

मन Wed, 07/05/2014 - 10:27

खोडसाळपणात मला स्पर्धा करु पाहताय का चित्रगुप्त ?

बॅटमॅन Wed, 07/05/2014 - 13:42

In reply to by मन

स्वतःच स्वतःला कित्ती कित्ती ट्रोल/खोडसाळ म्हणवून घेतले तरी बाकीच्यांनी म्हटले पाहिजे की तसे ;) =))

मनोबानं किती ट्रोलिंग करायचं म्हटलं तरी तो फुस्का बारच =))