Skip to main content

<भारताची प्रगती - झुरढेपाउडा>

प्रगती म्हणजे केवळ आनंदात वाढ नव्हे. या गैरसमजातून अनेक वेळा लोक 'गाड्यांची संख्या वाढली' 'पुण्यात पहा कसे झकपक मॉल तयार झालेले आहेत' किंवा 'अहमदाबादेत जाऊन पहा, रस्ते इतके गुळगुळीत की पोरं रस्त्यावर बसूनच कॅरम खेळतात.' वगैरे ठार चुकीची विधानं प्रगतीची लक्षणं म्हणून सांगतात. गुजरातेतल्या रस्त्यांवरून शोफर ड्रिव्हन कारमधून जाऊन आल्याबरोब्बर आपल्या गावातल्या रस्त्यातल्या खड्ड्यांना शिव्या देतात आणि तिथलं प्रगतीचं मॉडेल देशभर राबवण्यासाठी कटिबद्ध झालेल्या भाजपाची स्तोत्रं गाऊ लागतात. सरकार आलं की मग परत महिन्याभरातच 'भाडेवाढ झाली' म्हणून शिव्या देतात ते वेगळंच. या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे प्रगती म्हणजे काय, किंवा विकास म्हणजे काय याबाबत असलेल्या ठार चुकीच्या कल्पना.

बहुतेक वेळा प्रगती होते ती दुःखं कमी झाल्यातून. देवालयं बांधण्याआधी शौचालयं बांधण्यातून. दुःखं ही नेहमीच मृत्यू, बालमृत्यू, आजारपण वगैरे काहीतरी मोठंच असलं पाहिजे असंही नाही. साध्यासुध्या गोष्टी जसे की - इंटरनेट चालू नसल्यामुळे फेसबुक बघायची घाईची इच्छा असूनही तासभर उशीर होणं, आजकाल आपल्याला तरुण पोरी जाऊच दे, मोठाल्या बायाही काका म्हणतात हे लक्षात येणं, 'भला उसकी कंबर मेरी कंबर से बारीक कैसी?' असं प्रत्येक सडपातळ बयेकडे बघून स्वतःला वाटून घेणं... अशी अनेक दुःखं आधुनिकोत्तर काळाने बहाल केलेली आहेत. पण मला लक्ष केंद्रित करायचं आहे ते उच्चवर्गीयांच्या दुःखांकडे नव्हे तर ज्या गोष्टींचा त्रास सर्वांनाच होतो अशा गोष्टींकडे. नाहीतर 'श्रीमंतांची दुःखं कमी झाली पण ज्यांना ही दुःखं मुळातच नव्हती त्या गरीबांचं काय?' अशी तक्रार होईल. (प्रतिसादांतून येणाऱ्या तक्रारींना मी फार घाबरतो ब्वॉ.)

म्हणून मी रोजमर्राच्या दुःखांचा विचार करायला लागलो. आणि तितक्याच अस्वल यांनी लिहिलेला झुरळमारीचा लेख दिसला. त्यावरचा चिंतातुर जंतू यांचा प्रतिसादही पाहिला. त्यामुळे जीवजंतूंची चिंता करण्यात मग्न झालेल्या लोकांचं चित्र डोळ्यासमोर आलं. उडत्या झुरळाची भीती ही गरीब-श्रीमंतात, हिंदू-मुसलमानांत सर्वत्र आहे. डासांच्या चावण्याचा त्रासही असाच सार्वत्रिक. त्यामुळे ही भीती जर कमी झाली असेल तर तिला मी निश्चितच प्रगती म्हणेन.

गूगलवर थोडा शोध घेतला मला हवा तो विदा मिळाला. पर्यावरणावर मानवाने जे अत्याचार चालवले आहेत त्यांत झुरळं, ढेकूण, उवा, पाली आणि डास (झुरढेपाउडा) अशा महत्त्वाच्या प्रजाती नामशेष होत आहेत. त्यांच्या घटत्या संख्येची मोजमाप करून त्यामुळे पर्यावरणावर हरामखोर मानवाच्या कृत्यामुळे जे परिणाम होतात त्यांचा एका संस्थेतर्फे अभ्यास केलेला आहे. यातून जे चित्र दिसतं ते माझ्या मते आशादायक आहे. अर्थात त्या संस्थेच्या मते या प्रजाती नष्ट झाल्यामुळे मनुष्यजात भरमसाठ वाढते व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होऊन जग तीसेक वर्षांतच नष्ट होणार आहे. म्हणून त्यांनी एक आख्खा देश रिकामा करून तिथे केवळ झुरढेपाउडानाच वास्तव्य करण्यासाठी परवानगी द्यावी अशी शिफारस केलेली आहे.

त्यांच्या रिपोर्टमधला विदा गोळा करून मी भारतासाठी वरील आलेख बनवला आहे. या आलेखावरून स्पष्टच दिसतं की

- उडत्या झुरळांपासून होणारा वार्षिक दरडोई त्रास कमी होत चालला आहे
- सरासरी गादीमधल्या ढेकणांची संख्या घटते आहे
- दरडोई उवांची संख्या कमी होते आहे
- पालींना पाहून 'ईईईईईईई' अशा ठोकलेल्या किंकाळ्यांमध्ये प्रकर्षाने घट झाली आहे
- डासांच्या दरडोई चाव्यांची संख्या गेल्या तीस वर्षांत सुमारे चाळीस टक्क्यांनी कमी झालेली आहे.

ही प्रगतीच कशी आहे हे सिद्ध करण्यााच्या भानगडीत मी पडणार नाही. कारण कितीही सिद्ध केलं तरी लोक तक्रार करतातच.

'पण हे होणं म्हणजे प्रगती असं कशाच्या आधारावर म्हणता येईल?'
'सरासरी कमी झाली असली तरी व्हेरिएशन आहेच की. उलट व्हेरिएशन वाढलेलं आहे. म्हणजे सत्तर साली सगळ्यांनाच जवळपास सारखा त्रास व्हायचा. आता काही लोकांना तो निम्मा कमी झाला आहे, आणि काहींसाठी ऐशी टक्के कमी झाला आहे. म्हणजे असमानता वाढलीच की.' अथवा
'ढेकूण कमी झाले ठीक आहे, पण प्रत्येक ढेकूण जर दरडोई जास्त रक्त पीत असेल आणि जास्त वेळा चावत असेल तर मग काय उपयोग?'
'लोकांचा ढेकणांचा त्रास जितक्या प्रमाणात कमी झाला त्याच्या निम्माच उवांचा त्रास कमी झाला. म्हणजे ढेकणांच्या त्रासाच्या तुलनेत उवांचा त्रास वाढलाच नाही का?'
'कोरिलेशन इज नॉट कॉझेशन, तुम्ही सॅनिटी चेक करा'
'गेली तीस वर्षं उवा कमी झाल्या याचा अर्थ असा होत नाही की पुढेही ती कमी होईल. तालेबच्या म्हणण्याप्रमाणे उवांची कॅटेस्ट्रोफिक वाढ अचानक झाली तर काय घ्या?'

तर अशा तक्रारींना उत्तर देण्यासाठी मी या लेखाच्या तिप्पट लेखन तयार ठेवलेलं आहे. तसंच उडाझुरढेंचा त्रास एचडीआयनुरुप कसा कमी होतो याचा आलेख प्रतिसादांतून देणार आहे.

अस्वल Wed, 16/07/2014 - 02:21

-पालींना पाहून 'ईईईईईईई' अशा ठोकलेल्या किंकाळ्यांमध्ये प्रकर्षाने घट झाली आहे
- दरडोई उवांची संख्या कमी होते आहे
..तर अशा तक्रारींना उत्तर देण्यासाठी मी या लेखाच्या तिप्पट लेखन तयार ठेवलेलं आहे

:D

बाकी तुम्हाला अंदाज अपना अपनाच्या चालीवर "आलेखांचा बादशहा और आकडेमोडीचा राज्जा" अशी पदवी समस्त अस्वलांतर्फे अर्पण!

अमुक Wed, 16/07/2014 - 04:11

१. या लेखाचा 'लाउज़ी'-लिखा'ण असे नामाभिधान देऊन गौरव करण्यात यावा काय ? ;)
२. खुद्द लेखकानेच रातकिडे, केमरें यांना अनुल्लेखाने मारले असल्याने त्यांच्या हत्यांचा विदा चाणाक्षपणे गायब केला आहे.
३. नाचात निव्वळ पाय आपटून पृथ्वी २१ वेळा नि:कृमी करणार्‍या सनी देओलला काय पुरस्कार देणार ?
४. भारताची प्रगती साधल्याबद्दल 'कोई यहाँ आहा नाचे नाचे, अउव्वा अउव्वा' हे उवांना श्रद्धांजली म्हणून तयार केलेले गाणे प्रातिनिधिक मानून घराघरांतून गायले जावे अशी शिफारस करण्यात येत आहे.

............सा… Wed, 16/07/2014 - 20:29

In reply to by अनुप ढेरे

असेच म्हणते. :)

तिरशिंगराव Wed, 16/07/2014 - 10:32

इथे, कोणीतरी 'पालींची बदनामी करु नका' असा दम देत होतं. तसाच डासांनाही जगण्याचा हक्क आहे, परदेशांत जाण्याचा हक्क आहे, परदेशांत जाऊन अतिरेक्यांच्या म्होरक्यांना चावण्याचाही हक्क आहे हे बजावून ठेवतो.

ॲमी Wed, 16/07/2014 - 12:54

In reply to by तिरशिंगराव

इथे, कोणीतरी 'पालींची बदनामी करु नका' असा दम देत होतं. >> तेचते तळटीपसम्राट. अजून कोण असणार? मला खात्री आहे त्या स्वाक्षरीनंतर त्यांना येणार्या गुलाबी पत्रांचा महापूर आटला असणार ;-)

अस्वल Wed, 16/07/2014 - 23:02

In reply to by ............सा…

अस्वलाला अभ्यास करायला सांगताय, कुठे फेडाल हे पाप!
असो, मी पालीकडे वळतो.

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 11:47

:)

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 12:13

झुरडेपाउडांची बदनामी थांबवा!!!!!!

-चा'वी काजू.

बाकी लेख अन प्रतिक्रियेबद्दल काय बोलावे????? हाईट्ट आहे =)) =)) =)) =))

चिंतातुर जंतू Wed, 16/07/2014 - 13:11

>> म्हणून मी रोजमर्राच्या दुःखांचा विचार करायला लागलो. आणि तितक्याच अस्वल यांनी लिहिलेला झुरळमारीचा लेख दिसला. त्यावरचा चिंतातुर जंतू यांचा प्रतिसादही पाहिला. त्यामुळे जीवजंतूंची चिंता करण्यात मग्न झालेल्या लोकांचं चित्र डोळ्यासमोर आलं. उडत्या झुरळाची भीती ही गरीब-श्रीमंतात, हिंदू-मुसलमानांत सर्वत्र आहे. डासांच्या चावण्याचा त्रासही असाच सार्वत्रिक. त्यामुळे ही भीती जर कमी झाली असेल तर तिला मी निश्चितच प्रगती म्हणेन.

पुढच्या धाग्यासाठी ह्या धाग्यावरची समीक्षकांवरची वक्तव्यं विचारात घ्या. झुरळांप्रमाणेच समीक्षकांची चिंता करण्यात मग्न झालेल्या लोकांनाही आपलं म्हणा. समीक्षकांविषयीची भीती/घृणाही सर्वत्र आहे. त्यामुळे ही भीती/घृणा कमी झाली असेल असं दाखवलंत तर मी त्याला जागतिक/भारतीय/मराठी विचारविश्वाची प्रगती निश्चितच मानेन.

राजेश घासकडवी Wed, 16/07/2014 - 18:35

In reply to by चिंतातुर जंतू

समीक्षक प्रजाती नष्ट झाली तर जगाचं भलंच होईल असं माझं मत आहे. मास्लोच्या पिरॅमिडमध्ये या प्रश्नाचं स्थान वर असल्यामुळे मानवजातीने अजूनही या प्रश्नाकडे पुरेशा गंभीरपणे लक्ष दिलेलं नाही. तूर्तास तरी समीक्षकांवर डीडीटीचा फवारा मारणं, दिसल्यादिसल्या त्यांना झाडूने फटकारणं, मेल्यावर त्यांना स्पर्शही न करता उचलून कचऱ्यात टाकणं अशा गोष्टींचा दिबख (दिल को बहलाने के लिये खयाल) करत असतो. तसंही सरकार बदलल्यामुळे हे लिबरल लोकं बिळांमध्ये लपायला सुरूवात झालीच आहे. फायनल सोल्यूशन लवकर येवो हीच ईश्वराचरणी प्रार्थना.

मी Wed, 16/07/2014 - 15:40

झुरळ, पाली, उंदिर, ढेकुण ह्या घरगुती किटकांचा नाश हा पाहुण्यांच्या उपद्रवाशी(त्यातल्या त्यात बायकोचे नातेवाईक) डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असे मत मुंबई-पुण्याकडच्या लोकांचे आहे, त्याच संदर्भात खालिल चार्ट उद्बोधक ठरावा.

जसा ह्या किटकांचा उपद्रव वाढला तसे प्लेग आणि तत्सम रोगांच्या भितीने पाहुण्यांचा उपद्रव कमी झाला, त्यामुळे प्रगती झाली तर ती हिताची किंवा कसे हे बघणे गरजेचे आहे. पण किटकांचा उपद्रव कमी होवो वा जास्त बायकोचा उपद्र्व तेवढाच राहिला आहे हि सांख्यकीही लक्षात घेण्यासारखी आहे.

Nile Wed, 16/07/2014 - 21:09

In reply to by मी

बॅचलरने बनवलेला दिसतोय हा चार्ट. नाही, गेस्ट आणि पेस्टच्या उपद्रवाच्या डिरेक्ट प्रपोर्शनमध्ये वाईफचा उपद्रव वाढतो असे आपले आम्ही ऐकून आहोत.

नगरीनिरंजन Wed, 16/07/2014 - 17:03

:-D

तयार ठेवलेल्या लेखनातल्या काही सांख्यिकीबद्दल अटकळ
१. झुरढेपाउडा मारण्याचे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे (आलेख). इथून पुढची वाढ कार्यक्षमतेत होईल. लवकरच २००% कार्यक्षमतेचे तंत्र विकसित झाल्याने झुरढेपाउडा मारणारी यंत्रे झुरढेपाउडा मारून वर मेलेल्या झुरढेपाउडांपासून इतकी ऊर्जा मिळवतील की ती यंत्रे स्वत: त्या ऊर्जेवर तर चालतीलच शिवाय घरातली सगळी उपकरणेही त्यावर चालतील.(आलेख)
२. झुरढेपाउडांची संख्या कमी (आलेख) होत आहे ह्याचा अर्थ माणसाकडून त्यांची होणारी हिंसा गेली कित्येक वर्षें कमी होत आहे असे जीवन किंकर आपल्या "माणूस: झुरढेपाउडांचा देवदूत" या भल्यामोठ्या(दुवा) पुस्तकात म्हणतो.
३. पूर्वी झुरढेपाउडांचा इतका सुळसुळाट होता (कोष्टक (म्हणजे कोळ्याचे जळमट नव्हे, टेबल)) की माणसांना चोवीस तास झुरढेपाउडा मारण्याचेच काम करावे लागे (अजून एक कोष्टक (झुरढेपाउडामधे को का नाही?)) व अस्तित्वाचा (स्वत:च्या) विचार करण्यास वेळ मिळत नसे. आता मात्र झुरढेपाउडांची संख्या घटल्याने अस्तित्वाचा विचार करून वर उरलेल्या वेळात माणसे माशाही मारू शकतात. झुरढेपाउडांचे माझुरढेपाउडा झालेले आहेतच, त्यात हळूहळू चिलटं, बीटलं, केमरं, पतंग, मधमाशा, फुलपाखरं यांची भर(दुवा) पडत गेल्याने चिबीकेफुमपमाझुरढेपाउडा होउन माणसांचा त्रास पुष्कळच कमी होईल असा मला विश्वास आहे.
:-D

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 17:06

In reply to by नगरीनिरंजन

वरील प्रतिसादातील आलेख, कोष्टके, आणि दुवे यांचे डिस्ट्रिब्यूषन हे अत्र्यांच्या भाषणाच्या छापील वृत्तांतातल्या हशा आणि टाळ्यांच्या डिस्ट्रिब्यूषनप्रमाणेच वाटते आहे ;)

राजेश घासकडवी Wed, 16/07/2014 - 18:29

In reply to by नगरीनिरंजन

माझुरढेपाउडा

या एका शब्दालाच सलाम!

तुम्ही काही मिस केलेले मुद्दे

- पीक ऑईल मुळे झुरढेपाउडांचा त्रास प्रचंड वाढून मानवजात नष्ट होईल असं अनेक जण म्हणतात. ते साफ चूक आहे. आधुनिक सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरून झुरढेपाउडा नष्ट करण्यासाठी संशोधन चालू आहे, आणि त्याला अभूतपूर्व यश येतं आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार प्रकाशकिरणं अपवर्तित करून जर एकत्र केली तर त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेतून कीटकांना मारता येतं. प्रायोगिक स्वरूपात हे मुंग्यांबाबत केलं गेलं आहे.

- झुरढेपाउडांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम खरं तर नकारात्मकच आहे. त्यांच्या त्रासामुळे माणूस चिडचिडा होतो, आणि मग ती चिडचीड नष्ट करण्यासाठी महाप्रचंड प्रमाणावर उपभोक्तागिरी करतो. त्यातून अब्जावधी प्रजाती नष्ट होतात. त्यामुळे या पाचसहा प्रजाती नष्ट होण्याने बायोडायव्हर्सिटी वाढायला मदतच होईल.

नगरीनिरंजन Wed, 16/07/2014 - 18:45

In reply to by राजेश घासकडवी

पीक विष (पक्षी: बेगॉन)
पृथ्वीवरील बेगॉनचे साठे मर्यादित आहेत आणि बेगॉन गॉन व्हायला फारसा वेळ लागणार नाही. मग बघा झुरढेपाउडा मारायची इंडस्ट्रीच्या इंडस्ट्री खलास होईल आणि हजारो लोक बेकार होऊन (हाताने) माशा मारत बसतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 16/07/2014 - 22:45

घासकडवींच्या विद्रटपणाचा शौक काही नवा नाही; पण याही वेळेस त्यांनी भलताच कार्यकारणभाव जोडून देऊन उगाच प्रगतीची टेप वाजवलेली आहे. यात पालींना पाहून मारलेल्या किंकाळ्या आणि दरडोई उवांचं प्रमाण या भारताच्या जनरल प्रगतीचा फारसा संबंध नसून स्त्रीमुक्तीचा संबंध आहे. स्त्रीमुक्तीमुळे आता मुली, स्त्रियांच्या केसांची लांबी कमी असते, त्यामुळे केस रोज धुता येतात आणि उवांना पोषक वातावरण राहत नाही म्हणून उवांची संख्या कमी झालेली आहे. त्याशिवाय neo-feminism नुसार स्त्रियांनी कोणत्याही प्रकारच्या किंकाळ्या फोडणं डाऊनमार्केट आहे. (संदर्भ - Evolutionary Feminigy by Demi Devi. या पुस्तकात डेमी देवी यांनी पंधरा हजार चौदाशे तेरा भारतीय स्त्रियांचं निरीक्षण करून विदा गोळा केला आहे. हा विदा गोळा करण्यामागचं मूळ कारण निराळं असलं तरी विदेतून अशा प्रकारचे दुय्यम निष्कर्षही निघतात.*)

शिवाय कोणत्या संस्थेने विदा गोळा केला होता याची माहिती न दिल्यामुळे हा संपूर्ण लेखच आक्षेपार्ह ठरतो. तेव्हा वि. वि. घासकडवी यांनी या लेखातल्या विचारांचं परीक्षण आणि त्या निमित्ताने थोडं आत्मपरीक्षणही करून घ्यावं.

*सध्या डेमी देवी त्यांच्या पुस्तकासाठी प्रकाशक शोधत आहेत. आधी पेंग्विनने त्यांचं पुस्तक प्रकाशित करायचं मान्य केलं होतं, पण वेंडी डॉनिजर यांच्या पुस्तकाच्या गुऱ्हाळानंतर त्यांनी पेंग्विनकडून पुस्तक परत घेतलं. मी पुस्तकाचं मुद्रितशोधन केलं असल्यामुळे हे गॉसिप माझ्यापर्यंतही पोहोचलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 29/07/2014 - 00:30

आपण पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धीमानतथा सुसंस्कृत प्राणी असल्याचा एक फारमोठा गैरसमज मानवाच्या मनात अगदि प्राचीनकाळापासून घर करून बसलेला आहे. त्यामुळे त्यानेनिसर्गाच्या सृष्टीचक्रतील मुलभूतसिदधांतांना छेद देवूनस्वत:ची वेगळी अशी नियमावली तयार केली.निसर्गाच्या " Survival of the Fittest"च्या सिद्धांताला त्याने बगल देवूनमानवतेच्या नावाखाली अहिंसेचे कृत्रीमतत्वध्नान निर्माण केले.ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.पृथ्वीवरील अन्य मानवेतर प्राणी पिढी दरपिढी अधिकाधिक सदृढ, आक्रमक तथा बुद्धीमानहोत गेले. याउलट मानवप्राणी मात्र पिढी दरपिढी मानसिक तथा शारिरीकदृष्ट्यादुबळा होत गेला.उदाहरणार्थ मच्छर ह्या क्षुद्र किटकाचा 25वर्षांपुर्वीचा आकार व आक्रमकता आजच्या तुलनेतपडताळून बघीतल्यासत्याची बुद्धीमत्ता तथा विध्वंसकक्षमता कैकपटींनी वाढली असल्याचे दिसून येते.मानवाला सहिसलामतपणे कधी कुठे नि केंव्हा दंशकरावा ह्याचे "Mathemetical Calculations"करायला हा किटक शिकला आहे. याउलट माणूसमात्र आपली रोगप्रतिकार क्षमता झपाट्यानेगमावित चालला आहे. निसर्गनियमांशी विसंगततथा जीवशास्त्रीय दृष्या बिनडोक तत्वध्नानअंमलात आणल्यामुळेचमानवप्राण्याची एवढी वाताहत झाली असून"Survival of fittest " च्या सिद्धांताचे कठोरपणेपालन केल्याशिवाय मानवाला आपलेपृथ्वीतलावरील अस्तीत्व तथा प्रभूत्व टिकवूनठेवणे अवघड होणार आहे.

संदर्भ फेसबुकावर आहे. दुवा