ईमेलमधील एका चित्रमय कथेचा अनुवाद
ईमेल मधून सध्या एक सुंदर , अर्थपूर्ण , सांकेतीक कथा फिरते आहे. खरं तर ती संपूर्ण चित्रमय कथा आहे. आणि ज्याने कोणी चित्रे काढली व ज्याची कोणाची ही कल्पना आहे त्याला , मला दाद द्यावीशी वाटते. सर्वांपर्यंत ही मानसशास्त्रावर आधारीत , "फील गुड" कथा पोचावी या उद्देशाने हा धागा काढला आहे.
चित्र १ - अनेक लोक रस्त्यावरून वाकून वाकून चालत आहेत. ह्म्म थकलेले दिसतात. का बरे? अरेच्च्या हे काय! सर्वांच्या पाठीवरती एकाच मापाचा प्रत्येकी एक असा क्रूस आहे. प्रत्येकजण आपापला क्रूस कसाबसा पाठीवरून वहात आहे.
चित्र २ - आता मागची गर्दी थोडी फीकी झाली आहे. एकाच माणसावर फोकस आला आहे. याने पिवळा टीशर्ट आणि नीळी पँट घातली आहे. याला कथानायक म्हणू यात. हा भरभर जाऊ इच्छितो पण याच्याही खांद्यावरती त्याचा क्रूस आहे.
चित्र ३ - गर्दीत आपला कथानायक कसा मिसळून गेला आहे. त्याचा क्रूस ना अन्य लोकांच्या क्रूसपेक्षा लहान आहे ना मोठा.
चित्र ४ - अरे हे काय? त्याने तर क्रूस खाली ठेवला. हातात चाकू धरून तो काय ओरडून ओरडून बोलतो आहे बरे - "हे परमेश्वरा माझा क्रूस इतका जड का दिलास? मी हा कापून थोडा हलका करू इच्छितो." अरेरे आपल्या कथानायकाचा चेहरा फारच रडवेला दिसतो आहे.
चित्र ५ - जेव्हा इतर लोक मुकाट्याने आपापला क्रूस खांद्यावर घेऊन जात आहेत तेव्हा हा मात्र स्वतःचा क्रूस कापून लहान आणि हलका करतो आहे.
चित्र ६ - अपना अपना नसीब! आता मारे शीळ घालत भराभर चालाला आहे. तुम्ही हे पाहीलत का की इतर लोक त्यांचे क्रूस जमीनीला घासत घासत कसेबसे नेत आहेत तर कथानायकाचा क्रूस आता थीटा झाल्याने जमीन घासत नाही.
चित्र ७ - अर्रेच्च्य्या हे काय! त्याने परत क्रूस जमीनीवर ठेवला आणि चाकू हाती घेतला ...... देजा वू! परत तीच तक्रार " देवा अजून थोडा काप ज्यायोगे मी अधिक चांगल्या तर्हेने हा क्रूस पाठीवरून वाहू शकेन"
चित्र ८ - कथानायकाने अजून कापून क्रूस थिटा केला आहे आणि देवाचे आभार मानून मार्गक्रमणा चालू केलेली दिसते आहे. यंव रे पठ्ठे! इतर बिचारे मात्र अजूनही त्यांचा जड आणि लांब क्रूस वहात आहेत.
चित्र ९ - शीळ घालत घालत भरभर पाऊल उचलत आपला कथानायक आता २ पठारांमधील एका भेगेपाशी येऊन पोचला आहे. अरे बापरे! ही भेग तर खूपच रूंद आहे. ही कशी ओलांडायची?
चित्र १० - अरे अरे हे काय प्रत्येकाने आपापल्या क्रूसचा पूलासारखा उपयोग करून भेग ओलांडायला सुरुवातही केली. अनेकजण पारही पोचले. पण हाय रे दैवा! आपल्या कथानायकाचा क्रूस थीटा पडतो आहे. कथानायक हताशपणे मटकन खाली बसला आहे.
![]() |
तात्पर्य - जीवनातील भोग, दु:खे विनातक्रार सहन करा कारण त्यामागील अंतस्थ हेतू आपल्या आकलनापलिकडील परंतु आपल्याकरता शुभ असू शकतो.
फील गुड
a cross (somebody has) to bear (British & Australian) also a cross (somebody has) to carry (American & Australian)
an unpleasant situation or responsibility that you must accept because you cannot change it
स्त्रोत - http://idioms.thefreedictionary.com/a+cross+to+bear
कोणीतरी म्हटल्याप्रमाणे "सुखी माणसाचा सदरा" ही गोष्ट अस्तित्वातच नाही कारण प्रत्येकाला त्याचा भोगाचा, यातनांचा "फेअर शेअर" मिळाला आहे. अशावेळी याच आपल्या दु:खांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याची नजर ही गोष्ट देते.जी दु:खे आयुष्यभर आपण ओढत आहोत ती एका सोनेरी क्षणी संधीमध्ये अथवा "अॅसेट" मध्ये परिवर्तीत झाली तर? कारण प्रत्येक नाण्याला शेवटी २ बाजू असतात. हा यातील "फील गुड" भाग मला वाटतो.
@धनंजय - पण थोडा विचार केला आणि मला आपण म्हणता तो विक्षीप्तपणा जाणवला. ही मॅसोचिस्ट (उच्चार?) कथा वाटते नाही? म्हणजे जरी ओझे कमी करता येत असले तरी चाकूने क्रूस कापून ते कमी करायचे नाही कारण नंतर पूलाकरता थिटे पडेल.
सुंदर नीरीक्षण धनंजय.
छान
छान मौजमजा लेख, आधी पाहिल्याचे स्मरते. तुम्ही नंतर दिलेल्या प्रतिसादावरून लेखाचा तुम्हाला अपेक्षित असा मतितार्थ कळाला, धंनजयनी केलेल्या निरीक्षणाशी सहमत, फक्त ख्रिस्ती आस्तिक माणसे किती गाढव (ओझे वाहाणारे) असतात असेच ह्यात दर्शवले आहे, जिवंतपणी परमेश्वराच्या (क्रूसाच्या) सानिध्यात कायम दु:खी असणारे असे ते आहेत.
'न'वी बाजू - ('अमरत्वा'चा) पेला अर्धा भरलेला?
चित्र ९ - शीळ घालत घालत भरभर पाऊल उचलत आपला कथानायक आता २ पठारांमधील एका भेगेपाशी येऊन पोचला आहे. अरे बापरे! ही भेग तर खूपच रूंद आहे. ही कशी ओलांडायची?
चित्र १० - अरे अरे हे काय प्रत्येकाने आपापल्या क्रूसचा पूलासारखा उपयोग करून भेग ओलांडायला सुरुवातही केली. अनेकजण पारही पोचले. पण हाय रे दैवा! आपल्या कथानायकाचा क्रूस थीटा पडतो आहे. कथानायक हताशपणे मटकन खाली बसला आहे.
म्हणजे क्रूसाशिवाय भेग ओलांडता येत नाही तर. उत्तम!
थोडक्यात, 'क्रूस नसणे' ही 'भेग न ओलांडण्या'करिता सबब/पळवाट (एक्स्क्यूझ) होऊ शकावी.
यात हताश होण्यासारखे काय आहे? आहे तेथेच बूड टेकून (सुखाने, कायमचे!) बसून राहिले तर? भेग कशाला ओलांडायची? मुळात, ओलांडायची आहे कोणाला?
कोण म्हणतो या ष्टोरीत "फील गुड फ्याक्टर" नाही म्हणून? द्या फेकून तो क्रूस बिनधास्तपणे, (ष्ट्र्याटेजिकली प्लेस्ड) भेगेत जाऊ द्या त्याला, नि मग बसा निवांतपणे आरामात. (किवा बागडा. किंवा काय हवे ते करा.) ज्यांना भेग ओलांडायची एवढी खाज आहे, ते बाळगतील ओझी. (बाळगू देत! त्यांची चिंता आपण का करावी?)
('तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा विसरलाशी'? की 'ग़र फ़िर्दौस रूह-ए-ज़मीं अस्त, हामी अस्तो, हामी अस्तो, हामी अस्त'?)
"जूं" नि बाजू.
'पन इज इन्टेन्डेड'
"जूं" नि बाजू. जूं म्हणजे बैलाच्या मानेवरचं जोखड. गुलामीचे चिन्ह. नि त्याची ही दुसरी बाजू: "जूं" नि बाजू.
मानेवरचं 'जूं' अन वाहून नेलेला क्रूस. सारखे असतात.
जोखड झुगारून देणे छानच. पण तेच जूं त्याच बैलाचा जीव जंगली श्वापदापासून, वा सर्पदंशापासून बचाव करण्यास सक्षम ठरते.
नुसता फील गुड नका पाहू हो. फीलगुड पेक्षा आहेत त्या जबाबदार्या पार पाडणे महत्वाचे. Just like carrying ur cross. कदाचित त्या क्रूसाचा उपयोग कधी चुकून दरीत पडायची वेळ आली तर तुम्हाला होईल. पुरातून बैलाची शेपूट पकडुन पार होता येतं तसा?
हरकत नाही...
बैलांना जर ओझे वाहून नेण्याची हौस असेल, तर तो बैलांचा प्रश्न आहे, आमचा नाही. सबब, आमचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही.
कदाचित त्या क्रूसाचा उपयोग कधी चुकून दरीत पडायची वेळ आली तर तुम्हाला होईल. पुरातून बैलाची शेपूट पकडुन पार होता येतं तसा?
त्याकरिता स्वतः क्रूस कशाला बाळगायला पाहिजे? बैल कशासाठी आहेत? औटसोर्स, म्यान, औटसोर्स! इतके जण क्रूस वाहत चाललेत ते काय मग.
अवांतरः 'द लॉकहॉर्न्स' या कार्टूनमालिकेतील एक जुने चित्र या निमित्ताने आठवले. दोन सुळक्यांपैकी एका सुळक्यावर लेरॉय उभा आहे. या सुळक्यावर दोन पाय नि पलीकडच्या सुळक्यावर दोन हात अशा अवस्थेत लोरेटाला त्या दोन सुळक्यांमधल्या दरीवर पुलासारखी मस्तपैकी आडवी लोंबकळत ठेवलेली आहे, नि लेरॉय तिच्या पाठीवरून दरी ओलांडण्याच्या प्रयत्नात आहे. लोरेटा वैतागून म्हणते, "I should have listened to my mother when she warned me that you would be marrying me for my body." (उद्धृत स्मरणातून, चूभूद्याघ्या. अवांतर समाप्त.)
(पण मुळात, दरी जर ओलांडायचीच नाही, तर दरीकडे फिरकतो कोण? नि मग दरीत पडण्याचा प्रश्न उद्भवतोच कोठे?)
ये लगा सिक्सर ....
यात हताश होण्यासारखे काय आहे? आहे तेथेच बूड टेकून (सुखाने, कायमचे!) बसून राहिले तर? भेग कशाला ओलांडायची? मुळात, ओलांडायची आहे कोणाला?
अगदी, अगदी!
शिवाय ... एकदा एकाने पूल बांधला तर प्रत्येकाने जाऊन आपापला पूल बांधायची गरज नाही. बाकीचे तिथे पुलावर चांगला रस्ता बनवू शकतात, कोणी गाड्या बनवू शकतं, कोणी पुलावर दिवाबत्तीची सोय करू शकतं.
ही रूपककथा अगदीच विसविशीत वाटली; सारीका म्हणते तशी मासोकीस्टच!
दृष्टिकोनावर अवलंबून आहे
शिवाय ... एकदा एकाने पूल बांधला तर प्रत्येकाने जाऊन आपापला पूल बांधायची गरज नाही. बाकीचे तिथे पुलावर चांगला रस्ता बनवू शकतात, कोणी गाड्या बनवू शकतं, कोणी पुलावर दिवाबत्तीची सोय करू शकतं.
मुळात भेग ओलांडायची कशासाठी हा आमचा प्रश्न आहे. 'पूल - पक्षी क्रॉस - नाही' ही इष्टापत्ती का मानू नये? अर्थात, ज्यांना ओलांडायची खाज आहे, त्यांनी आपापले स्वतंत्र पूल बांधावे की समाईक, नि मग त्या पुलावर चांगला रस्ता बांधावा की (आमच्या पुण्यातल्यासारखे) खड्डे बांधावेत, दिवाबत्तीची 'सोय' करावी की 'मराविमं' करावी, हे आमचे प्रश्न नाहीत.
ही रूपककथा अगदीच विसविशीत वाटली; सारीका म्हणते तशी मासोकीस्टच!
कथा कशी आहे हे कथेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आम्हांस ही कथा अत्यंत आशावादी आणि उद्बोधक वाटली असे नम्रपणे नमूद करू इच्छितो. 'अमर व्हायचे आहे, तर मरायला जायचेच कशाला' हा कथेमागील सुप्तसंदेश डोळे उघडणारा आहे.
मुळात भेग ओलांडायची कशासाठी
=)) =))
मुळात भेग ओलांडायची कशासाठी हा आमचा प्रश्न आहे. 'पूल - पक्षी क्रॉस - नाही' ही इष्टापत्ती का मानू नये? अर्थात, ज्यांना ओलांडायची खाज आहे, त्यांनी आपापले स्वतंत्र पूल बांधावे की समाईक, नि मग त्या पुलावर चांगला रस्ता बांधावा की (आमच्या पुण्यातल्यासारखे) खड्डे बांधावेत, दिवाबत्तीची 'सोय' करावी की 'मराविमं' करावी, हे आमचे प्रश्न नाहीत.
छे, छे आपण पलिकडे जायचं नाहीच! आपण आउटसोर्सिंग करून पूल बांधायचा, रस्ता बांधायचा, दिवे लावायचे, आणि मग आपल्याच भाईबंदांनी बनवलेल्या वहानांत बसून कोणी आलं तर आपण फक्त टोल गोळा करायचा! ;-)
'अमर व्हायचे आहे, तर मरायला जायचेच कशाला' हा कथेमागील सुप्तसंदेश डोळे उघडणारा आहे.
आणि मेल्याशिवाय कसे हो तुम्ही अमर होणार? मुमताज जिवंत असताना ताजमहाल कसा बनणार?
तेवढे सोडून बोलू या!
छे, छे आपण पलिकडे जायचं नाहीच! आपण आउटसोर्सिंग करून पूल बांधायचा, रस्ता बांधायचा, दिवे लावायचे, आणि मग आपल्याच भाईबंदांनी बनवलेल्या वहानांत बसून कोणी आलं तर आपण फक्त टोल गोळा करायचा!
येथे मात्र आमचा आशावाद फिका पडतो. औटसोर्सिंगची एकंदर परिस्थिती पाहता, दिलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे पूल कधीच बांधून होणार नाही, आणि दुहेरी एकदिक पुलाऐवजी एकाच दिशेने जाणारे दोन एकेरी पूल - आणि तेही अर्धेच बांधलेले ('ब्रिज टू नोव्हेअर'?) - मिळतील, असे मानावयास जागा आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रवाह नेहमी एकाच दिशेने राहील (म्हणून, 'ब्रिज रेक्टिफायर'); सबब, वाहनात बसून कोणी 'येण्या'ची शक्यता सुतराम् नाही (कोठून येणार म्हणा!), फक्त 'जाणारे' 'जातील' (कोठे जातील कोण जाणे), असे आमचा 'गट फील' सांगतो. तेव्हा, टोल-आवक इल्ला.
चालायचेच. बैलांनी सिविल इंजिनियरिंगची कामे केल्यावर दुसरे काय होणार?
आणि मेल्याशिवाय कसे हो तुम्ही अमर होणार? मुमताज जिवंत असताना ताजमहाल कसा बनणार?
का? मेल्याशिवाय अमर होता येत नाही? आणि 'कधीही मरायचे नाही' हीच जर अमर होण्यामागची कल्पना असेल, तर मग आधी मरून कसे चालेल? आधी मेल्याने अमर होण्याचा मूळ उद्देशच फाफलत नाही काय?
आणि मग ते 'आज़ादी अमर रहे', 'क्रांति अमर रहे' नि कायकाय म्हणतात, ते काय आज़ादीदीदी आणि क्रांतिभाभींच्या मुळावर उठण्यासाठी?
बाकी, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा निघू शकली. जयप्रकाश नारायणांच्या जिवंतपणी शोकसभा भरायला काही अडचण आली नाही. मुमताज़ताईंनीच काय घोडे मारले आहे?
ज्ञानेश्वरांनी जिवंतपणे समाधी घेतली. आपण मुमताज़ताईंची जिवंतपणी समाधी बांधायला काय हरकत आहे? पूर्वप्रघात आहे मोठा त्याला!
शिवाय, 'जिवंत समाधी' म्हणून प्रसिद्धी दिली, की तेवढेच गर्दी जमायला बरे.
माझ्या मित्रमंडळात
आणि 'कधीही मरायचे नाही' हीच जर अमर होण्यामागची कल्पना असेल, तर मग आधी मरून कसे चालेल?
अगदी अगदी. माझ्या मित्रमंडळात कधीही न मेलेले कितीतरी जण आहेत.
माझ्या शाळेतही एक वर्गमित्र अमर होता. तोसुद्धा तेव्हा एकदाही मेलेला नव्हता. (वर्गात दोन अँटणीही होते - अँटणी गोन्साल्व्हीस आणि अँटणी रॉड्रिक्स. पण अकबर एकही नव्हता.)
मेले मेले मेले ...
अरे हो सभ्य गृहस्थहो, विषय काय, तुम्ही बोलताय काय!
मुळात औटसोर्सिंग करायचं तर जरा बर्या कंपन्यांकडे करा की! बैलांकडून माकडांची कामं* करवून घेणार्यांकडे नका करू. टोळ महत्त्वाचा, कसें?
*इतिहासातला पहिला पूल माकड आणि खारींनीच बांधला असा नवीन प्रबंध कांदा संस्थानच्या विद्यापीठात सादर होणारे म्हणे!
एक श्रीरंग पण होता, अगदी
एक श्रीरंग पण होता, अगदी काळाकूट्ट दिसायला.
हे उदाहरण मात्र मान्य नाही. हा तुमच्यावर असणारा उत्तर भारतीयांचा आणि पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव आहे. अहो, आमचा मराठी आणि कानडाऊ विठ्ठलु पहा ... विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातली आहे, संगमरवराची नाही! पांडुरंग नाव असलं तरी वर्णमात्र स्थानिकांसारखाच आहे. पांडुरंग जर सावळा असेल तर श्रीरंगाने का धप्प गोरं असावं? काळा-सावळा वर्णच अस्सल भारतीय आहे. उगाच का टॉल, डार्क आणि हँडसम पुरूषांची चलती असते?
अडचण आहे
मुळात औटसोर्सिंग करायचं तर जरा बर्या कंपन्यांकडे करा की! बैलांकडून माकडांची कामं* करवून घेणार्यांकडे नका करू.
पार्किन्सनचा नियम आणि उत्क्रांतिवाद यांची काहीतरी भयंकर सरमिसळ करून 'दिलेले औटसोर्सिंगचे काम भरून काढण्यासाठी माकडाचा बैल होतो*' अशा धर्तीवरच्या प्रस्तावित धेडगुजरी नियमावरही तूर्तास विद्वानांत चर्चा चालू आहे म्हणे.
* त्या रावणाने नाही, सीतेचे हरण केले? तसे.
टोळ महत्त्वाचा, कसें?
"And therefore never send to know for whom the bell tolls; It tolls for thee." यातील "It tolls for thee" महत्त्वाचे. (या उद्धरणासाठी गूगल अमर रहे.)
सांगायचा मुद्दा, "कोणाकोणाकडून टोल उकळता येणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी कोणाला पाठवू नये. शेवटी टोल आपल्यालाच भरावा लागणार आहे." समजले?
इतिहासातला पहिला पूल माकड आणि खारींनीच बांधला असा नवीन प्रबंध कांदा संस्थानच्या विद्यापीठात सादर होणारे म्हणे!
तरीच हल्ली या पुलाचे केवळ भग्नावशेष सापडतात म्हणे. (किंवा, समुद्रातले कोठलेतरी दोनचार दगड दाखवून 'भग्नावशेष, भग्नावशेष' म्हणून ठोकून देतात, झाले!)
'दिलेले औटसोर्सिंगचे काम भरून
'दिलेले औटसोर्सिंगचे काम भरून काढण्यासाठी माकडाचा बैल होतो*' अशा धर्तीवरच्या प्रस्तावित धेडगुजरी नियमावरही तूर्तास विद्वानांत चर्चा चालू आहे म्हणे.
अहो पण औटसोर्सिंग करणार्या कंपन्या मुळात माकडांत रूपांतरीत झालेलेच नोकरीला घेतील असे पहा की! तुम्ही कशाला क्रूसाची काळजी करता? बाकी ती विद्वानांमधली चर्चा तुम्हाला माहित असेल तर आम्हालाही सांगा की!
* त्या रावणाने नाही, सीतेचे हरण केले? तसे.
रावणाने दोघांचे हरण केलेले दिसते. एकदा मारीचाला हरण बनण्यास भाग पाडले, आणि त्याच्याकडून बहुदा ती कला कपटाने शिकून सीतेचे हरण केले.
"कोणाकोणाकडून टोल उकळता येणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी कोणाला पाठवू नये. शेवटी टोल आपल्यालाच भरावा लागणार आहे." समजले?
ते ठीक आहे हो, पण हा पूल आणि टोल असणारेत कुठे? भारतात असेल तर हरकत नाही, आपण चिरीमिरी देऊन टोलातून मुक्त होऊ शकतो किंवा गाडीच्या नंबरप्लेटवर 'दिल से' किंवा घड्याळ छापूनही!
तरीच हल्ली या पुलाचे केवळ भग्नावशेष सापडतात म्हणे. (किंवा, समुद्रातले कोठलेतरी दोनचार दगड दाखवून 'भग्नावशेष, भग्नावशेष' म्हणून ठोकून देतात, झाले!)
तुमची अपेक्षा काय आहे? पाच हजार वर्षांपूर्वी बांधलेला पूल तुम्हाला आख्खा हवाय का? इथे बदलापुरात बांधत असलेला पूल पडण्याचं उदाहरण आहे.
भांडवलशाही सोल्यूशन...
प्रत्येकाने स्वतःचाच क्रूस (की क्रॉस?) स्वतः दरी क्रॉस करण्यासाठी (की क्रूज करण्यासाठी?) वापरत बसणं हा मूर्खपणा झाला. मला वाटतं हे चित्र अमेरिकन लोकांनी काढलं असावं. (नुकतंच कुठेतरी इंटरनेटवरची ८५% पॉर्न अमेरिकेत तयार होते असं ऐकलं. तेव्हा ८५% यडपटपणाही अमेरिकेत तयार व्हायला काहीच हरकत नाही) कारण यात दोन गोष्टी दिसून येतात.
१. आत्यंतिक आत्मकेंद्री वृत्ती. मी, माझं, प्रत्येकाला स्वतःचं वगैरे वगैरे.
२. भांडवलशाही प्रवृत्ती. म्हणजे तुमच्या प्रत्येकाकडे स्वतःचा क्रूस असलाच पाहिजे. नाहीतर खड्ड्यात जाल. म्हणजे अ पासून ब पर्यंत हजार लोकांना जायचं असेल तर त्यासाठी हजार गाड्या धावल्या पाहिजेत.
त्यापेक्षा मी काय म्हणतो, की दोघातिघांत एक क्रूस वाटून घेतला तर काय हरकत आहे? म्हणजे ट्राफिकमध्ये हाय ऑक्युपन्सी लेन असते तसं. बाकीच्यांना बसू देत आपापल्या एकेकट्या गाडीत, ट्राफिक जाममध्ये अडकून. आपण मस्त रिकाम्या लेनमधून जोरात गाडी हाणावी.
किंवा भांडवलशाहीच्या टोकाला जायचं तर ज्याचा क्रूस लहान आहे त्याने इतरांबरोबर एक कंपनी काढून एक पूल बांधून ठेवायचा. क्रूस तुमचे आणि अक्कलहुशारी माझी असं म्हणून. आणि जाणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचं द्या फेकून तुमचे क्रूस, आणि मस्त थोडेसा टोल देऊन देऊन या पुलावरून जा.
मग गर्दी संपली की आपण सगळे क्रूस पुन्हा गोळा करायचे, आणि पुढच्या भेगेपाशी जायचं. आता कोणाचकडे क्रूस नसतील. मग तर काय जन्माची ददात मिटली. कंपनीचा आयपीओ करायचा, शेअर विकून टाकायचे आणि मस्त कोणाच्यातरी खांद्यावरून जायचं.
हेच ते तुमचं अमेरिकावाद्यांचं
हेच ते तुमचं अमेरिकावाद्यांचं मला धड काही समजत नाही. अहो थोडा विकेंद्रीकरणाचा विचार करा. गांधीजींनी नाही का हेच सांगितलेलं? यात काय आलाय आत्मकेंद्रीपणा?? पंचायत राज कायद्यातून भारतात जी विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्याचा थोडातरी विचार करा. नाहीतर घासकडवी पळवणार पुलावरचं लोणी आणि आम्ही काय फक्त टोलकेंद्र झाडायच्या नोकर्या करायच्या?
अहो थोडा विकेंद्रीकरणाचा
अहो थोडा विकेंद्रीकरणाचा विचार करा. गांधीजींनी नाही का हेच सांगितलेलं? यात काय आलाय आत्मकेंद्रीपणा??
गांधीजी आणि अमेरिकन लोकांची आत्मकेंद्री वृत्ती सारखीच आहे. गांधींना स्वयंपूर्ण खेडं हवं होतं. प्रत्येक खेड्यात प्रत्येक गोष्ट बनली पाहिजे म्हणे! म्हणजे प्रत्येक खेड्यात बासमती पिकला पाहिजे, कोल्हापुरी चप्पल मिळाली पाहिजे, आणि शंपाग्ने बनली पाहिजे.... हा प्रत्येक खेड्याचा क्रूस प्रत्येक खेड्याने वहायचा म्हणे. उगाच नाही बिचाऱ्या नथुरामाला त्याचा क्रूस खांद्यावर घ्यायला लागला. त्यांची हत्या करण्याचा कठीण प्रसंग समोर आला तेव्हा तोच क्रूस वापरून ती घळ ओलांडली.
नाहीतर घासकडवी पळवणार पुलावरचं लोणी आणि आम्ही काय फक्त टोलकेंद्र झाडायच्या नोकर्या करायच्या?
तुमच्या का पोटात दुखतं आम्हाला थोडं तूप मिळालं तर? तुम्हाला जर तूप मिळालं नाही तर डालडा खा म्हणावं. असल्या तक्रारी करण्यापेक्षा सूज्ञपणे आमच्या कंपनीचे शेअर प्रीआयपीओ घेऊन टाका दहावीस. जन्माची ददात मिटेल. निदान क्रूस ओढण्यासाठी टो-ट्रक तरी विकत घेता येईल.

असं आहे तर.
सारीका यांच्या लेखनाचे स्वागतच आहे. परंतु ही कथा विक्षिप्त वाटली.
- - -
जिवंतपणी ख्रिस्ती धर्माच्या अवडंबराचा बोजा त्रासदायक असतो. एखाद्याने निरुपयोगी वाटणारी कर्मकांडे वजा केली तर त्याचा प्रवास सुखावह होतो - त्याला तरी असा भास होतो. पण मृत्यूची दरी ओलांडून अमृतत्वाला पोचायचे असेल, तर काय होते? ज्यांनी आपले धर्माचरण सुटसुटीत केलेले असते, त्यांना अमृतत्वाकडे पोचता येत नाही. ज्यांनी जितेपणी निरर्थक वाटणार्या अवडंबरासकट धर्म पाळला असतो, त्यांचा धर्मच त्यांना मृत्यूच्या दरीवरून अमृतत्वाकडे तारण्यास पुरेसा असतो.
तस्मात कर्मकांडे इहलोकात कितीही त्रासदायक असली तरी त्यांना निरुपयोगी म्हणता कामा नये. बायबलने हे ओझे आपणा सर्वांना वाहायला दिलेले आहे, त्यातील प्रत्येक तपशील अमृतत्वासाठी आवश्यक आहे.
पण यात "फील गुड" काय ते कळले नाही. या क्षणी "गुड फील" करण्यासाठी काही केले तर पुढे कथानायकासारखे मटकन खाली बसावे लागेल. आणि जर पुढे मटकन बसायचे नसेल, तर बाकी सर्वांसारखे "कसेबसे" मार्गक्रमण करावे लागेल - म्हणजे तरीही "गुड फीलिंग" नाहीच.