पठाणकोटचे शहीद व आपण
पठाणकोटचे शहीद व आपण
.
पठाणकोटमधील घटनांमुळे संरक्षणमंत्र्यांना पत्रकारपरिषद घ्यावी लागावी यावरूनच सारे आलबेल नाही हे कळावे. अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले थांबवणे हे लष्कराच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळतेच. आताही पंजाबच्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिका-याने दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगितले. अतिरेकी अशा उच्चपदस्थ अधिका-याला जिवंत सोडतील यावर कोणाचा विश्वास बसावा?
टीव्हीवर मात्र पठाणकोट घटनेबद्दल बोलताना भाजप व कॉंग्रेसचे प्रवक्ते केवळ 'आमच्या वेळी आणि तुमच्या वेळी' असेच बोलत आहेत. हे पूर्ण राष्ट्रापुढचे आव्हान आहे हे त्यांच्या लक्षात तरी येते का असे कधीकधी वाटते. या चर्चा टीव्हीवाहिनीच्या स्टुडिओमध्ये होतात म्हणून; अन्यथा या प्रवक्त्यांची लायकी या जवानांची शब्दश: खेटरे खाण्याचीच.
बाकी या घटनेत शहीद झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे आपण ऐकायचे व म्हणायचे. पण याचा नक्की अर्थ काय? स्वातंत्र्याच्या वेळी जे फासावर गेले त्यांचे बलिदान नंतर स्वातंत्र्य मिळाल्यामुळे व्यर्थ गेले नाही, असे आपण म्हणू शकतो. मात्र येथे या बहाद्दरांच्या बलिदानामुळे ना आपल्यात राष्ट्रीयत्वाची भावना जागताना दिसते, ना या देशाचे नागरिक म्हणून आपल्यात एक प्रकारची शिस्त बाणवून घेण्याची इच्छा दिसते, ना भ्रष्टाचार थांबवण्याची इच्छा दिसते.
तो केरळचा निरंजन हकनाक मेला. त्याचे बाळ अजून त्याला म्हणजे त्याच्या बापाला ओळखण्याच्या वयाचेही नाही असे दिसते, त्याला काय पडली होती या देशातल्या बहुतांशी अप्पलपोट्या नागरिकांच्या हितासाठी; तेदेखील त्याच्या घरापासून दूर त्या पठाणकोटमध्ये जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची?
दुस-या एका शहिदाच्या पत्नीने स्वत: त्याच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे पाहिले. त्या नवरा-बायकोचे प्रेम त्यांच्या-त्यांच्यात. काही दिवसांनीच त्या बाईची कुतरओढ सुरू होईल. तिच्या गावचे लोक तिची जात काढण्यास कमी करणार नाहीत. आपण मात्र तिला केवळ शहिदाची पत्नी असे संबोधून आपले काम झाले असे समजू.
कमीत कमी ‘त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ वगैरे म्हणण्याचा भंपकपणा तरी बंद करू. त्यांचे कामच मरायचे आहे, ते त्यांनी केले असे सोयीस्करपणे म्हणून आपण आपल्या रोजच्या जमेल तशा विलासामध्ये व भोगवादी जीवनशैलीत हरवून जाऊ.
काही नालायक राजकारणी उघडपणे 'त्यांचे कामच मरायचे अाहे' हे बोलून दाखवतात. आपण स्वत:मध्ये काही बदल न घडवून आणता त्या राजकारण्यांना बेजबाबदार म्हणत स्वत:ही कळत-नकळत तेच करू.
जवानांनो, तुमच्या बलिदानाने मधूनमधून भरून येणारे आमचे डोळे म्हणजे मधूनमधून आम्हाला सर्दी-पडसे होते तशातलाच एक प्रकार आहे. त्यापेक्षा वेगळे काही नाही. तुम्ही सीमेवर असा की नसा, आमची झोप कोणी घालवू शकत नाही. तेव्हा तुमच्यामुळे आम्ही शांतपणे झोपतो या भ्रमात तुम्ही तरी राहू नका.
घरातल्या आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर आपली आवडती गोष्ट किंवा सवय सोडायची असे करताना मी काहींना पाहिलेले आहे. मग कोणी एअरकंडिशन्ड खोलीत राहण्याचे सोडतो, कोणी आपल्याला प्रिय गोड पदार्थ त्याजतो, कोणी आणखी काही. या जवानांच्या मृत्युच्या शोकाखातर आम जनतेपैकी कोणी कशाचा त्याग केल्याचे किंवा काही चांगला उपक्रम चालू केल्याचे कधी ऐकण्यात येते का आपल्या?
जाऊ दे.
ललित लेखनाचा प्रकार
टंकन...
घरातल्या आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर आपली आवडती गोष्ट किंवा सवय सोडायची असे करताना मी काहींना पाहिलेले आहे. मग कोणी एअरकंडिशन्ड खोलीत राहण्याचे सोडतो, कोणी आपल्याला प्रिय गोड पदार्थ त्याजतो, कोणी आणखी काही. या जवानांच्या मृत्युच्या शोकाखातर आम जनतेपैकी कोणी कशाचा त्याग केल्याचे किंवा काही चांगला उपक्रम चालू केल्याचे कधी ऐकण्यात येते का आपल्या?
तुम्हाला लिहायला खूप आवडतं ना?
मृत्यूचा धोका आणि झोप
>> तेव्हा तुमच्यामुळे आम्ही शांतपणे झोपतो या भ्रमात तुम्ही तरी राहू नका.
इथे १९५२ पासून कोळसा खाणीत अपघातात मेलेल्या कामगारांची यादी आहे. हे कामगार तिथे काम करतात म्हणून माझ्या घरी पंखा आणि एसी चालतो आणि मला शांतपणे झोपता येते.
मुद्दा हा आहे की अशा अनेक लोकांच्या मृत्यूवर माझी झोप अवलंबून आहे. मग जवानांच्या मृत्यूला खास ट्रीटमेंट का असावी?
?
याच्याबद्दल काय म्हणावे? इथे झोप या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायची गरज नाही.
देशप्रेमासाठी!
गुदस्ता माझ्या एका मैत्रिणीचे पणजोबा गेले तेव्हा मी व्यायाम सोडला. आता लाजलज्जा सोडून सोडण्यासारखं काही उरलेलं नाही. ती सोडू का, देशप्रेमासाठी?