पाहुणे येती घरा, तेव्हा सर्वस्व विसरा!
टीप: इथे देशातून येणाऱ्या जनतेवर टीका करायचा उद्देश नसून खरोखर नीट व्यवस्थापन/ समायोजन करता यावे.
१. खाण्या पिण्याचे वांधे: आपल्याला पिझ्झा पास्ता आवडतो, असा "तिखट" गैरसमज. भारतात मिळतो तो भारतीय पिझ्झा पास्ता असतो, अमेरिकन/इटालियन पिझ्झा पास्ता वेगळा लागतो. अमेरिकेत सर्रास पितात, आणि आम्ही आलोय तर आम्हाला पण प्यायला दिलंच पाहिजे अशी अपेक्षा.
इथे भारतीय जिन्नस सगळे मिळतात, त्यामुळे घरी रोज चारी ठाव जेवण बनवायला "काय जातं?" हा प्रश्न. उत्तर: वेळ :)
प्रोटीन समस्या: शाकाहारी लोकांना प्रोटीन समस्या येते. बाहेर मिळणारे पदार्थ साधारणपणे केवळ चीज मैदा, आणि जेमतेम भाज्या ह्या प्रकारचे असतात. घरच्या बाईने विचार करून रोज वरण, उसळ, भाज्या केल्या तर "हे तर रोजचंच जेवण" असा दृष्टिकोन असतो. जे करायला सर्वात जास्त वेळ खर्च होतो, ते घरची स्त्री आपल्याला करून घालतेय, ह्याची जाणीव नसते, कौतुक तर सोडा च.
२. हवामानाचा "मान" राखणे: हे एक भारतातून येतांना अजिबात माहिती नसतं की दोन दिवसाच्या तापमानात १०-२० डिग्रीचा फरक पूर्व अमेरिकेत सहज होतो. (सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर हिवाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात हिवाळा, असले काहीही बदल होतात, आणि आपण ह्या अनिश्चिततेची कल्पना त्यांना देऊ म्हंटले तर त्यांना एकतर वाटतं: उगीच घाबरावतात! :) नाहीतर वाटतं, 'हिने काही च धड सांगितलं नाही'....
त्यामुळे जॅकेट लागेल, न लागेल, स्वेटर लागेल कि नाही, टोपी घेऊ का नको असले सल्ले दोन्ही पक्षी व्यर्थच असतात.
३. जवळ दूरच्या संकल्पना: एक वस्तू आणायला संध्याकाळी ६ वाजता मध्य-न्यू जर्सीत ग्रोसरीत जायचं असेल, तर जाऊन येऊन दीड तास लागतो, हे कळू शकत नाही. अंतरात न बोलता वेळेत बोलायला लागलं पाहिजे, कारण तेच अंतर सकाळी १० वाजता, आणि संध्याकाळी ५-७ चा दरम्यान फार वेगळ्या वेळात कापलं जातं.
४. कपडे: रोज धुणे शक्य आहे, पण वीज-पाणी खर्चाच्या दृष्टीने ते परवडत नाही, कारण मशीन मोठी असतात, किमान २५ कपडे साठल्या शिवाय लावत नाही.
५. मॉलमध्ये खरेदी: भारतीयांना उपयोगी, किंवा आवडतील अशा स्वस्त-मस्त गोष्टी खूप कमी असतात आणि त्या मिळाल्याच तर मॉल मध्ये नसून आयकिया किंवा तत्सम छोट्या दुकानात, मेड इन इंडिया अथवा चायना असतात. इथून कितीही खर्च करून नेले तरी तिकडे त्यांची दोन टिकल्यांची पण किंमत होत नाही.
जगात कुठेही गेलं तरी, चार ठिकाणी नीट पाहून, वेळ देऊन खरेदी केली, तरच खरोखर चांगल्या डील्स मिळतात, हे स्थलकालअबाधित सत्य आहे. त्यामुळे दोन दिवसात "शॉपिंग" उरकू, हे जमणे अशक्य आहे.
६. कार आणि टॅक्सीतला फरक: एखादेवेळी तरी पाहुण्यांना आपलं आपलं टॅक्सीने येऊ द्यावं, तोवर त्यांना आपल्याला वेळ मोडून घ्यायला येणाऱ्या जाणाऱ्यांची किंमत नसते. दोन चौक जाण्यासाठी २० डॉलर खर्च करण्याची तयारी (निदान न्यू जर्सी सारख्या महाग ठिकाणी) असेल, तरच "आम्ही आपले आपले फिरू" वगैरे गप्पा कराव्या.
विशेषतः मुलांना स्ट्रोलर घेतला तरी त्यात बसायची सवय नसते. कार सीट मुळे कार मध्ये एका वेळी ४ च लोक बसतात. घरच्या लोकांची पोरं आणि आपली पोरं धरून प्रत्येकवेळी दोन कार लागतात, म्हणजे घरमालक आणि मालकीण दोघंही घरी असल्याशिवाय कुठेही बाहेर पडता येत नाही.
तसेच, चालायची तयारी असावी. भारतातल्या प्रमाणे कितीही ढुंगणाशी गाडी असली, तरी दुकानाच्या आत, बाहेर, प्रत्येक पर्यटनस्थळी, भरपूर चालावं लागतं.
हे अमेरिकेला जास्त लागू
हे अमेरिकेला जास्त लागू पडेलसं दिसतंय, युरोपात हे असे प्रॉब्लेम्स नाहीत, विशेषत:
जवळ दूरच्या संकल्पना: एक वस्तू आणायला संध्याकाळी ६ वाजता मध्य-न्यू जर्सीत ग्रोसरीत जायचं असेल, तर जाऊन येऊन दीड तास लागतो, हे कळू शकत नाही. अंतरात न बोलता वेळेत बोलायला लागलं पाहिजे, कारण तेच अंतर सकाळी १० वाजता, आणि संध्याकाळी ५-७ चा दरम्यान फार वेगळ्या वेळात कापलं जातं.
प्रोटीन समस्या: शाकाहारी लोकांना प्रोटीन समस्या येते. बाहेर मिळणारे पदार्थ साधारणपणे केवळ चीज मैदा, आणि जेमतेम भाज्या ह्या प्रकारचे असतात. घरच्या बाईने विचार करून रोज वरण, उसळ, भाज्या केल्या तर "हे तर रोजचंच जेवण" असा दृष्टिकोन असतो. जे करायला सर्वात जास्त वेळ खर्च होतो, ते घरची स्त्री आपल्याला करून घालतेय, ह्याची जाणीव नसते, कौतुक तर सोडा च.
अमेरिकेत अनेक ठिकाणी चालत
अमेरिकेत अनेक ठिकाणी चालत जाण्याच्या अंतरावर काहीही नसतं. तसंच भारतात असताना त्यांचा जो दिनक्रम असतो, तो पूर्ण मोडून पडतो. तसंच आपलं घर नसल्यामुळे घरात करण्यासारख्या गोष्टीही नसतात. त्यामुळे एक प्रचंड कंटाळा आणि परावलंबित्वाची भावना येते. याची पहिल्यांदा इथे येणार्या आईवडिलांची तयारी नसते.
पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं राहावं.
आपलंच घर आहे असं समजून घराचा आणि शक्यतोवर आपल्या आयुष्याचाही ताबा घेऊ पाहणारे; गूगलून ज्या गोष्टी समजतात किंवा समजल्या नाही तरी क-स-ला-ही आणि का-ही-ही फरक पडत नाही अशा गोष्टींबद्दल किंवा स्वयंस्पष्ट गोष्टींबद्दल*, उगाच काही तरी बोलायचं म्हणून बोलणारे; इंग्लिश बोलता येत नाही आणि लोकांनी बोललेलं समजत नाही म्हणून मराठी बोलताना इंग्लिश शब्दांची भरताड करणारे (उदाहरणार्थ, कानावर आलेलं वाक्य - "पाणी कोल्ड असेल.") लोक मला फार पकाऊ वाटतात.
*घडलेलं उदाहरण - एका दुकानावर पाटी होती, 'अमुकतमुक Jewelery shop' किंवा कायसंसं; Jewelery हा शब्द पाटीवर होता. प्रश्नाळू व्यक्ती वयानं माझ्यापेक्षा २-४ वर्षांनी लहान.
प्रश्न - हे कसलं दुकान आहे?
माझं उत्तर - सँडविचेरी आहे.
प्रश्न - म्हणजे?
उत्तर - हे लोक सँडविचेस विकतात.
प्रश्न - पण तिथे तर Jewelery लिहिलेलं आहे?
उत्तर - एवढं इंग्लिश समजतंय तर प्रश्न का विचारला?
या पुढचा प्रकार म्हणजे प्रश्न विचारायचे आणि उत्तर दिलं की त्यावर विश्वास ठेवायचा नाही.
प्रश्न - अमेरिकेत साधारण ५०० विमानतळ असतील ना?
माझं उत्तर - टेक्सासातच निदान हजारेक विमानतळ असतील.
प्रश्नवाला - ह्यँ! हे काहीतरीच.
हा संवाद सुरू असताना, बरा अर्धा फोन काढतो. गूगलतो. "बरोबर आहे तिचं", म्हणतो. पुरुषानं आणि/किंवा आपल्या रक्तानं उत्तर दिलं की त्यावर सहज विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.
हे सगळी प्रश्नोत्तरं कमी वाटावीत असा आणखी एक प्रकार म्हणजे, धड ऐकू येत नसतं तरीही कानाचं यंत्र लावायचं नाही, अगदी कारमध्ये बसलेलं असतानाही स्वतः मोठ्यामोठ्यानं बोलायचं, आणि निरर्थक, पकाऊ प्रश्न विचारायचे. मी वाट पाहत्ये की बरा अर्धा कधी तरी फक्त तोंडाची हालचाल करेल आणि बोलणारच नाही. असं चार-सहादा करेल आणि मग प्रश्न विचारणंच बंद होईल.
आता मात्र 'घालून घालून सैल झालंय'. असे लोक आसपास आले की मी गांधीजींना स्वतःचा आदर्श मानते. शिव्या भरलेल्या पत्रातली टाचणी तेवढी काढून ठेवते.
(माझी टाचणी - आई-वडील जिवंत नसल्यामुळे ते मला लाज आणू शकत नाहीत आणि मला फार लोकांत मिसळण्याची गरज वाटत नाही, याबद्दल चिकार आनंद होतो.)
तरुण थी मय
पण तेव्हा तरुण थी मय. आता मी तुझ्यासारख्याच विचारांची झाले आहे. सर्वसंगपरित्यागच खरा गं!
म्हणून उपद्रव होत नाही असं नाही. पण उदाहरणार्थ, बाहेर भारतीय रेस्टॉरंटमध्ये खाताना 'पण हे भारतासारखं नाही' असली कॉमेंट आलीच तर "आता बरोबर समजलं तुम्हाला. अमेरिकेत बाकीचं सगळं कसं अगदी भारतासारखंच आहे ना?"... असं नव्या पाहुण्यांना अत्यंत विनम्र-से म्हणते. आपण शहरी लोक आहोत, साप बघितल्यावर लगेचच विषारी का बिनविषारी हे समजत नाही; त्यामुळे सापच कशाला, दोरी दिसली तरीही पळत सुटावं.
मात्र तिरशिंगराव जर आपल्या घरी आलेच तर त्यांना कोथिंबीर निवडायला बसवावं, मिहिरला बसवलं होतं तसं; किंवा आपल्या हातचं खायला घालावं; म्हणजे 'आपण बाहेरच खाऊ' अशा सूचना पलीकडूनच येतात.
(सवांतर)
आई-वडील जिवंत नसल्यामुळे ते मला लाज आणू शकत नाहीत
लाज आणणे इज़ अ मायनर इरिटेशन. गेट ओव्हर इट. म्हणजे, जे जे काही करू शकतात, त्याच्या स्कोपच्या तुलनेत केवळ लाज आणणे हे काहीच नव्हे. हे म्हणजे, आयसिसने कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर केवळ त्याची वाढलेली नखे नेलकटरने व्यवस्थित कातरून त्यास रिहा करण्यासारखे आहे.
असो.
झाकली मूठ झाकलीच राहणार
मेल्या म्हशीला मणभर दूध! बोलायला आता काय जातंय. तरुण थी मय, तेव्हा काही काळ वडील होते. त्यांना बऱ्या सवयी लावायला सुरुवात केली होती. "तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जा, मी माझ्या मित्रांबरोबर जाईन," असं म्हटल्यावर ते गमतीशीर हसले होते.
त्यामुळे आता कोणी येऊन, तेही माझ्याच घरात राहून, गृहीत धरायला लागले की मी त्या लोकांचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्वच नाकारते.
पाहुणे आणि आईबाबा यात थोडा (अगदी थोडासा का होईना) फरक आहे
आईवडील एकतर जास्त दिवस (किमान दोन महिने, प्रथम येतील तेव्हा) राहतात, त्यामुळे त्यांना इथल्या जीवनशैलीची आपोआपच थोडी नीट माहिती होते. दुसरं म्हणजे, त्या पीढीला एकवेळ गूगलची सोय नाही, म्हणून समजून घेता येते.
आपल्याच पीढीच्या, आपल्याच वयाच्या लोकांना मात्र कसे समजवावे कळत नाही.
काहीही फरक नाही!
पाहुणे आणि आईबाबा यात थोडा (अगदी थोडासा का होईना) फरक आहे
काहीही फरक नाही. सरसकट विधान करतोय (अतितुरळक सन्माननीय अपवाद नॉटविथस्टँडिंग), परंतु तितकेच (किंवा त्याहूनही अधिक) पकाऊ (आणि अशक्य) असतात.
(जाऊ दे. १९४७पूर्वी हिंदुस्थानात जन्माला आलेल्या आणि आजमितीस भारतातच वास्तव्य करणाऱ्या पिढीबद्दल, अगेन, अतितुरळक सन्माननीय अपवाद नॉटविथस्टँडिंग, गब्बरच्या फडतूसांबद्दलच्या मतांना लाजवतील/फिकी पाडतील, अशी माझी मते आहेत. त्यामुळे गप्पच बसतो. फक्त, पिदरगीर औरंगजेबाबद्दल केवळ त्याने आपल्या बापास तुरुंगात टाकले, एवढ्या एकाच कारणासाठी अतीव आदर वाटतो, एवढे एकच माफक विधान करण्याची अनुज्ञा मला असावी, इतकीच नम्र विनंती. असा आदर्श राजा भारतवर्षात झाला नाही. असो.)
या अजातशत्रुचाही विचार करणार
या अजातशत्रुचाही विचार करणार का?
Ajatashatru was a king of the Haryanka dynasty of Magadha in North India. He was the son of King Bimbisara and was a contemporary of both Mahavira and Gautama Buddha. He forcefully took over the kingdom of Magadha from his father and imprisoned him. Wikipedia
Died: 461 BC
Parents: Bimbisara, Kosala Devi
आणखी काही नमुने
आपण भारतीय आहोत म्हणजे आपल्याला भारतीय (म्हणजे मराठी आणि त्याही आपापल्या जातीच्याच) अस्मिता असणारच असा समज. आपण भारताबाहेर न मिळणाऱ्या पदार्थांसाठी विव्हळतच असणार, असा समज तर तमाम दुनियेचा असतो.
पाहुणे - तुला कमी गोड आवडतं म्हणून कमी गुळाचा खरवस केलाय.
मी - अमेरिकेत चीक मिळतो हे मला माहीत नव्हतं.
पाहुणे - पावडर आणल्ये भारतातून.
(मला असले पावडरचे प्रकार खायला आवडत नाहीत, हे चेहऱ्यावर दिसू न देण्याची पराकाष्ठा करत वाटीतला अर्धा खरवस काढून ठेवला. पहिला घास तोंडात टाकल्यावर ... असो. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. फीडबॅक हवा होता.)
मी - ताज्या टोफूचा पोत खरवसासारखाच असतो. त्यावर मध ओतून खायचा; म्हणजे ज्यांना जेवढं हवं तेवढं गोड करून घेता येतं.
(मला आशा असते की हे साटल्य पोहोचेल. निष्कारण.)
--
तीच ती Jeweleryवाली पाहुणी. मला अजिबात स्वयंपाक येत नाही, असं तिचं मत. असू दे बापडं. ती ठूसन देत होती की गूळ घातल्याशिवाय भाज्या चांगल्या लागतच नाहीत. मी दोन कान वापरत होते. मग एकदा पावभाजी करण्याचा बेत ठरायला लागला.
मी - पण तुम्ही लोक भाजी कसे खाणार? गूळ तर संपलाय घरातला!
पाहुणी - अय्या, पावभाजीत गूळ नाही घालत! तुला माहीत नाही?
मी - (निरागस चेहरा करणं मला जमतं.) तूच तर परवा म्हणालीस ना, गूळ घातल्याशिवाय भाज्या चांगल्या लागतच नाहीत.
--
कधीमधी बरा अर्धा निरागसपणे भारतीय पाहुण्यांसमोर मला विचारतो, "पाव कधी करणारेस? घरात फोडण्यांचा भयंकर वास पसरलाय, म्हणून विचारलं. पाव भाजल्याचा वास घरभर पसरला की छान वाटेल." (तो खरोखरच निरागस आहे. मानवी भावनांचे कंगोरे त्याला समजत नाहीत.)
--
उगाच बोलण्याचा प्रयत्न, उदाहरण क्र. दोन -
(साधारण माझ्याच वयाचा) पाहुणा - पुस्तकांचं कलेक्शन चांगलं आहे तुझं!
मी - तुला कोणती पुस्तकं आवडल्येत यांतली?
पाहुणा - जनरल गिरीश कुबेर वगैरे नावं दिसली म्हणून म्हटलं.
मी - त्यांच्या पुस्तकांबद्दल तुझं काय विश्लेषण?
पाहुणा - ते लोकसत्तामध्ये लिहितात ना... ते!
मी - (मनातल्या मनात अर्थातच बरंच काही.) बरोबर आहे तुमचं.
पाहुण्याचा उल्लेख अचानक अनेकवचनी केलेला लक्षातही येत नाही, समजणं आणखी दूरची बाब.
अर्थात या बहुतेकशा गोष्टी घडल्या तेव्हा तरुण थी मय. आता सामुदायिक कवायतीसारखं, सगळ्यांपासून हातभर लांब राहायचं; आणि हातात चुकून सापडलेच तरी कुस्तीगीरांसारखं अंगाला तेल चोपडून राहिलं की कोणी पकडू शकत नाहीत.
बिर्याणी
( मला जरा चढलिये but don't let that cloud your judgment. )
अदितीच्या घरी जाण्याआधी माझ्याकडे चिकन बिर्याणी खायला या रे दोस्तानू !!!
(ब्याट्या सारखे) दर्दी खवय्ये असाल तर मटन बिर्याणी.
( बाकी इतर "बाबीं"ची तजवीज मी मस्त करेन याची खात्री बाळगा. आयमिन व्हिस्की, टेकिला, रेडवाईन, रम, जीन, ब्रँडी, व्हड्का वगैरे वगैरे. )
बै बै बै
प्रथमच असे लेख वाचणाऱ्याला किंवा कधी आगंतुक पाहुण्यांचा तितकासा त्रास न झालेल्या व्यक्तिला हा/असे लेख म्हणजे "बै बै बै. काय असतात ना एकेक लोक" असा सूर लावणारा वाटू शकेल.
मराठी आंतरजालावर अनादि अनंतकाळापासून ह्या धर्तीच्या चर्चा होत असतात. अगदी मनोगत, माबो वगैरेच्या काळापासून. कारण स्वाभाविक आहे. सुरुवातीस मराठी आंतरजालावर बाय डीफॉल्ट वावर हा एन आर आय लोकांचाच होता. त्यातही आय टी वाल्यांच्या संख्या अधिक. त्यांना जे काही अनुभवावं लागायचं ते त्यातून समोर यायचं. आणि "काय लोक असतात एकेक" अशा टाइपच्या चर्चा सुरु झाल्या की त्यात सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो लोकांचा. कारण मुळात वैचित्र्यपूर्ण लोकांची, प्रसंगांची जगात कमी नसावी. शिवाय भरीस भर म्हणजे विचित्र म्हणजे काय ह्याच्याही व्याख्या पुरेशा अगदिच काटेकोर नसतात. एकाचं नॉर्मल दुसऱ्याच्या डोक्याला शॉट्ट देणारं ठरु शकतं. पण हे शॉट्टदायक वर्तन लै लै लोक करु लागले तर अमुक एका समजसमुहाचं वर्तन म्हणुन काही एक मान्यता त्याला प्राप्त होते. सामाजिक भौगोलिक सांस्कृतिक पार्श्वभूमी बदलली की निदान काही मूल्यं तरी बदलतात. त्यात पुन्हा "काळ" हाही एक महत्वाचा पॅरामीटर आहेच. कालची सर्वसाधारण बाब आज सर्वसाधारण असेलच असं नाही.
भारतात सर्रस सहजतेनं भाजी भाकरी, पोळी भाजी (त्यातही फोडणीची पालेभाजी किंवा वरण ) ज्या सहजतेनं स्वीकारलं जातं तसं बाहेर होत नसावं.
बाकीच्यांचं माहित नाही, पण मला स्वत:ला जाणवलेली अडचण म्हणजे बाहेरच्या देशात फोडणीचा तो कोंडून राहणारा तो वास. त्या वासाचं ते कपड्यांवर चिटकणं आणि मग त्याची झीट/वैताग येणं. तिथलं हवामान आणि एकुणात एसीचा वापर, काहिसं हवाबंद असणं ह्यामुळं हे होतं का ठौक नै.
.
.
हे सगळं झालं जेनेरिक/ढोबळमानानं. प्रत्यक्षात एन आर आय व्हर्सेस त्यांचे परिचित/मित्र/नातेवाइक भारतीय ; ही म्याच दोन-चार विविध प्रकारे खेळता येते.
१. एन आर आय ना आगंतुक पाहुण्याबद्दल काय वाटतं त्या चश्म्यातून लिहिणं (ह्या धाग्यासारखं)
२. टिपिकल भारतीयांना 'तिकडे' पाहुणे म्हणून गेल्यावर काय वाटतं त्याबद्दल
३. एन आर आय लोक भारतात पाहुणे म्हणून आल्यावर त्यांना काय वाटतं ह्या चश्म्यातून्
४. एन आर आय लोक भारतात पाहुणे म्हणून आल्यावर त्यांच्या host/ यजमानांना काय वाटतं ह्या चश्म्यातून्
.
ह्या चारही बाजुनं आंतरजालावर अगदि महायुद्धं म्हणता यावीत इतपत हाणामाऱ्या झालेल्या आहेत. मिपावर तर आठवडाभरात पंधरावीस धागे पडले होते ह्याच विषायावर दोन्ही बाजुनं आणि तुफ्फान बॅटिंग केलेली दोन्ही बाजुंनी.
बरेच लोक तिकडून पाठवलेल्या
बरेच लोक तिकडून पाठवलेल्या तिकिटांवरच जातात त्यांनी सांगितलेलं ऐकावं. मला हे करायचं अन त्याच्याकडे जायचं हा हट्ट ठेवू नये. उगाच सिनिअरपणाचा फायदा उठवू नये.