Skip to main content

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

नमस्कार वाचकांनो,

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न

शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नन्दन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल.

१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये
१ ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य म्हणजे ३६००० कल्पे
१ कल्प अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १४ मनु
१ मनु म्हणजे ७१ महायुगे
१ महायुग म्हणजे ४ युगे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्यवर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे (संवत्सरे)
(ही माहिती पुराणांतून दिलेली आहे)

हे गणित लक्षात आले म्हणजे एका संवत्सर चक्रात येणार्‍या ६० वर्षांच्या ६० नावे का ठरवली गेलीत याचे उत्तर मिळते. नेमकी हीच ६० नावे का? याचे उत्तर मात्र माझ्याजवळ सध्या नाहिये. त्यावर कधीतरी सवडीने अभ्यास करुन लिहिन.

शके १९३४ चे संवत्सरनाम नंदन आहे. जे मी पुढील यादीत ठळक केले आहेच. एकदा ही ६० नावे माहिती झाली की पुढील वर्षाचे म्हणजे शके १९३५ साठी कोणते संवत्सरनाम असेल हे तुम्ही स्वतःच ओळखू शकाल :)

६० वर्षांचे चक्र : संवत्सर नामे

१. प्रभव
२. विभव
३. शुवल
४. प्रमोद
५. प्रजापति
६. अंगिरा
७. श्रीमुख
८. भाव
९. युवा
१०. धाता
११. ईश्वर
१२. बहुधान्य
१३. प्रमाथी
१४. विक्रम
१५. विश्व
१६. चित्रभानु
१७. सुभानु
१८. तारण
१९. पार्थिव
२०. व्यय
२१. सर्वजित्
२२. सर्वधारी
२३. विरोधी
२४. विकृत
२५. खर
२६. नन्दन
२७. विजय
२८. जय
२९. मन्मथ
३०. दुर्मुख
३१. हेमलम्ब
३२. विलम्ब
३३. विकारी
३४. शर्वरी
३५. प्लव
३६. शुभकृत्
३७. शोभन
३८. क्रोधी
३९. विश्वावसु
४०. पराभव
४१. प्लवंग
४२. कीलक
४३. सौम्य
४४. साधारण
४५. विरोधकृत्
४६. परिधावी
४७. प्रमादी
४८. आनन्द
४९. राक्षस
५०. नल
५१. पिंगल
५२. कालयुक्त
५३. सिद्धार्थ
५४. रौद्र
५५. दुर्मति
५६. दुन्दुभि
५७. रुधिरोद्गारी
५८. रक्ताक्ष
५९. क्रोधन
६०. क्षय

लेखात काही चूक असेल तर ती अवश्य लक्षात आणून द्यावी ही वाचकांना नम्र विनंती

धन्यवाद,
- सागर

अशोक पाटील Fri, 23/03/2012 - 19:33

गुढीपाडव्याच्या निमित्ताने "कालगणना" या तशा किचकट समजल्या जाणार्‍या विषयावर सागर यांचा हा गणिती मांडणीचा लेख छान वाटला. प्रत्येक धर्मीयाच्या व्याख्येनुसार/विश्वासानुसार कालचक्राची मांडणी होत असली तरी सर्वत्र सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांचे चलन यासाठी विचारात घेतले जाते असे दिसते. अदिती आणि सागर यांच्यासारख्या "अ‍ॅस्ट्रॉनॉमी" विषयात गती असणार्‍या सदस्यांच्या दृष्टीने असे लेख जिथे रोचक ठरतात तिथे दुसरीकडे आमच्यासारख्या "आजचा दिवस गेला समाधानात, आता उद्याचे उद्या पाहू" अशा लॉजिकवर जगणार्‍यांना वरील माहिती काहीशी गोंधळात टाकणारी वाटणे साहजिकच आहे. पण कालगणनेचे हे चक्र अनादी काळापासून सुरू आहे आणि अनंतापर्यंत सुरूच रहाणार आहे. म्हणजेच हे चक्र सुरू होण्याची विशिष्ट अशी वेळ नाही आणि विशिष्ट वेळी हे थांबेल असेही नाही; इतका प्रचंड असा आराखडा कधीही न दिसलेल्या निर्मात्याने करून ठेवला आहे असे वरील संवत्सर नामावलीवरून म्हणावे लागेल.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

अशोक पाटील

सागर Fri, 23/03/2012 - 19:53

In reply to by अशोक पाटील

अशोक काका,

तुमचा प्रतिसाद नेहमीच मला सुखावून जातो.
हाही प्रतिसाद त्याला अपवाद नाही.

अशोक काका गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांनाही मनापासून शुभेच्छा :)

सागर Fri, 23/03/2012 - 20:09

In reply to by आतिवास

सविताताई,

तुमच्या मनातली शंका अगदी रास्तच आहे.
पण संस्कृती टिकवणे हे जोपर्यंत आपल्याच हातात आहे तोपर्यंत तरी ही कालगणना अवश्य टिकेल. :)

मुळात इंग्रजी कालगणना जशी वापराने आणि शिक्षणाने आज आपल्याला सोपी वाटते आहे त्याप्रमाणेच ही कालगणना या आधीदेखील प्रचलित होतीच की.
फरक आहे तो फक्त ही कालगणना वापरली कशी जाते या माहितीचा.

कालगणनेची ही माहिती मी माझ्या अल्पमतीप्रमाणे सोपी करुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण सर्वांनी या कालगणनेचा वापर सुरु केला तरच ही अवघड वाटणारी कालगणना सोपी वाटू लागेल. पुढे कधीतरी मराठी महिने व ऋतूंचा आढावा घेईन, तेव्हा या कालगणनेचा वापर रोजच्या जीवनात किती सोपा आहे हे सांगण्याचा अवश्य प्रयत्न करेन.

निदर्शनास आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सविताताई :)

धनंजय Fri, 23/03/2012 - 20:11

छान.

चक्रातील नावांबाबत मलासुद्धा कुतूहल वाटते आहे.

(मागे वारांच्या नावाचा क्रम अमुकच का? ते समजले तेव्हा गंमत वाटली होती, आणि समाधान वाटले होते.)

नितिन थत्ते Fri, 23/03/2012 - 21:06

विक्रम संवत्सरांनाही हीच नावे असतात का?
असली तर गुढी पाडवा ते दिवाळीपाडवा या काळात विक्रमसंवत्सराला कोणते नाव असते?

बाकीचे प्रश्न नंतर.....

सागर Mon, 26/03/2012 - 14:34

In reply to by नितिन थत्ते

नितिनजी,

विक्रम संवत् साठी वेगळी नावे आहेत. नव्याने सुरु झालेल्या विक्रम संवताचे नाव 'विश्वावसु' हे आहे. तर पुढील वर्षाचे नाव 'पराभव' हे आहे.
विक्रम संवत् चे संवत्सर चक्र ६० चेच असावे. मला नेमकी माहिती मिळाली नाही, पण संवत्सर चक्र विक्रम संवत देखील पाळते हे माहिती आहे.
नावे वेगळी आहेत हे नक्की.

गुढी पाडवा ते दिवाळीपाडवा या काळात विक्रमसंवत्सराला कोणते नाव असते?
विक्रम संवत हे प्रत्येक वर्षी नवे नाव धारण करते. दिवाळीपाडव्याला नाव बदलत असल्यास त्याची माहिती माझ्याकडे नाही. पण प्राप्त माहितीनुसार विक्रमसंवत हे प्रति वर्षी एकच नाव धारण करते.

मिहिर Mon, 26/03/2012 - 15:40

In reply to by नितिन थत्ते

मोहन आपटेंच्या 'कालगणना' या पुस्तकातून मिळालेली आणि मला समजलेली माहिती पुढीलप्रमाणे:
या संवत्सरांना गुरु संवत्सर असेही म्हणतात. याचा गुरूच्या आणि शनीच्या सूर्यभ्रमणाशी संबंध आहे. ६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय.
गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ११.८६२६ वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर म्हणजे ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळे ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. जर संवत्सर आणि वर्षामध्ये एकास एक संबंध जोडायचा असेल तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो. उत्तर भारतात अशा प्रकारे संवत्सराचा लोप केला जातो आणि दक्षिण भारतात केला जात नाही. त्यामुळे दोन्ही पद्धतींमध्ये १२ संवत्सरांचा फरक पडला आहे. म्हणजे यावर्षीच्या दिवाळी पाडव्याला* 'क्रोधी(३८)' संवत्सर सुरू व्हायला हवे. अर्थात, त्यात नजीकच्या काळात संवत्सराचा लोप झाल्यामुळे या दिवाळी पाडव्याला 'विश्वासू(३९)' सुरू होत असल्यास कल्पना नाही.

द. भारतातील संवत्सराचा गुरूच्या प्रदक्षिणेशी असलेला संबध आता मोडल्यातच जमा आहे.

बाकीचे प्रश्न आल्यासही आवडेल.

*विक्रम संवत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सुरू होते असे इथे म्हटले आहे.

सागर Mon, 26/03/2012 - 18:25

In reply to by मिहिर

छान माहिती दिलीस मिहिर

प्रा. मोहन आपटेंचं कालगणना सुरेख पुस्तक आहे. माझ्याकडे हे पुस्तक असूनही हा लेख लिहिताना लक्षात आले नाही :(

उत्तरेतील विक्रम संवत कालगणनेप्रमाणे क्रोधी संवत्सर संपले आहे. व विश्वावसू सुरु झाले आहे.
पण तू म्हणतो तसे विक्रम संवत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी सुरु होत असेल तर मग दिवाळी पाडव्याला विक्रम संवत सुरु होते त्या तिथे क्रोधी हेच संवत्सर अजून मानत असतील.

अवांतरः गुरुच्या ५ व शनिच्या २ प्रदक्षिणा यांची बेरिज करुन सप्ताहाची (आठवड्याचे दिवस ७) निर्मिती झाली काय?

राजेश घासकडवी Fri, 23/03/2012 - 22:18

१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये

याच्या आधीचं, ब्रह्माच्या आयुष्यापर्यंतचं आधी वाचलं होतं. पण त्याच्या पलिकडचं म्हणजे विष्णु आणि शिवभक्तांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न वाटतो. 'ब्रह्माचं काय सांगता, अहो त्याची एक हज्जार आयुष्यं म्हणजे विष्णूची निव्वळ एक घटिका' 'अस्सं? तुमच्या विष्णूच्या असल्या हजार घटका होतात तेव्हा आमच्या शिवाचं एक निमिष होतं, माहित्ये का!'

बाकी एकेकाळी लहान माप असलेल्या युगांच्या मोजणीतदेखील कोणीतरी एक्स्ट्रा शून्यं आणि ३६० वगैरेचे फॅक्टर्स लावून कालमापन म्हणून निरुपयोगी केली असावीत असं वाटतं. हे नक्की कुठच्या प्रक्रियेने आणि उद्देशाने घडलं असावं याबद्दल कुतुहल आहे. पुराणांतल्या नक्की कुठच्या गोष्टी कुठच्या युगात घडल्या हे माहीत आहे का?

पण सर्वांनी या कालगणनेचा वापर सुरु केला तरच ही अवघड वाटणारी कालगणना सोपी वाटू लागेल.

हे पटत नाही. संवत्सर चक्र सोडलं तर त्यातला कुठलाही कालखंड ३६० वर्षांच्या पलिकडचा आहे. त्याचा उपयोग नक्की कसा होऊ शकेल?

आलोच एका शिवनिमिषात...
अरे हे किती वेळ लावताहेत चहा आणायला? ऑर्डर देऊन दोन विष्णु घटिका झाल्या.
मॅडम, हा कलप लावून फक्त तीन कल्प ठेवायचा. आणि मग धुवून टाकायचा. झुल्पं एकदम काळेकुळीत. मग ब्रह्मदेवाच्या तीन महिन्यांर्यंत चिंता नाही.
यंदा कर्तव्य नाही. मन्मथात माझी एमबीए पूर्ण होईल. त्याशिवाय लग्न करायचं नाही असं ठरवून ठेवलेलं आहे.
आता काय म्हातारीला वय इचारताय... माज्या पोरीचा जन्म जाला तेवा बगा... गेल्या चक्रातलं प्लवंग चालू व्हंतं. का कीलक व्हतं त्ये? आसंच काईतरी. आन मी त्यावेळी होते सोळाची. तवा पार्थिव किंवा व्ययमंदली म्या. आता तुमीच करा हिशोब.

लालयेत बारांशचक्रानि षष्ठांशचक्रानि ताडयेत
चतुर्थांशचक्रसमाप्ते पुत्रममित्रवदाचरेत.

सागर Mon, 26/03/2012 - 14:08

In reply to by राजेश घासकडवी

पण सर्वांनी या कालगणनेचा वापर सुरु केला तरच ही अवघड वाटणारी कालगणना सोपी वाटू लागेल.

राजेशजी, माझ्या या वाक्यात फक्त शके कालगणनेबद्द्लचा वापर अभिप्रेत होता. शिवनिमिष , विष्णुघटिका आपल्या कित्येक हजार पिढ्यासुद्धा अनुभवू शकणार नाहीत. तुमचा हा मुद्दा माझ्या लक्षात आला. माझ्या प्रतिक्रियेत मी नेमका मुद्दा अधोरेखित करायला हवा होता :)

मुख्यकरुन मराठी वार, महिने आणि वर्षे इंग्रजांच्या अगोदर प्रचलित होतीच. पुन्हा ती वापरायला सुरुवात करणे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अवघड आहे याची मलाही कल्पना आहे. पण वापर करणे सोपे असेल तर काय हरकत आहे एवढेच निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 24/03/2012 - 03:47

१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये

इथपर्यंत ठीक (च) वाटतं. पण त्यापुढे दहाचे पूर्णांकी घात येत नसल्यामुळे मग लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळे मग किचकट वाटतं. मोठमोठ्या आकड्यांशी सततचा संबंध येत असल्यामुळे किंवा शब्दांपेक्षा आकड्यांबद्दल अधिक जवळीक असल्यामुळे असेल, लाख, कोटी किंवा मिलियन, बिलियन हे सुद्धा तापदायक वाटतं. त्यापेक्षा १०१० असं काही लक्षात ठेवणं सोपं वाटतं; आकड्यांचा आवाका लक्षात येतो.
भारतात (आणि इतरही काही प्राचीन संस्कृतींमधे) फार पूर्वीपासून वापरली गेलेली दशमान पद्धत आता जगभर वापरली जाते याचं कारण सोपेपणा. आज एस.आय. एककं (मीटर, किलोग्राम, सेकंद) ही शास्त्रज्ञ आणि सामान्यांनाही सोपी पडतात कारण दशमान पद्धत. १७६० फूट = १ मैल, १६ औंस = १ पाऊंड वगैरे एककं डोक्यात हिशोब करायला कठीण आहेत. तापमानाचा विचार करता ०-१०० हा आवाका, ३२ ते २१२ पेक्षा लक्षात येण्यास सोपा आहे. त्यामुळे १४, ७१, ४ वगैरे आकडे त्रासदायक आहेतच, पण ३६००, ४८००, १४०० हे पण आवडले नाहीत.

चांद्र कालगणना किचकट आणि गुंतागुंतीची आहे. सूर्योदयाच्या वेळेस चंद्राचा अमुक टक्के भाग दिसत असेल तर अमकी तिथी. चंद्राच्या दिवसाचा संपूर्ण भाग अमक्या तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर दिसत असेल तर अमका महिना हे लक्षात ठेवण्यासारखं नाही; हे रोज गणिताने शोधावं लागेल. त्यापेक्षा नवा सूर्योदय, नवा दिवस हे लक्षात ठेवणं सोपं आहे. एवढं करून मनुष्य (आणि इतरही प्राण्यांसाठी) महत्त्वाचे काय आहेत तर ऋतू. ते पृथ्वी आणि सूर्याच्या आपसातल्या स्थितीनुसार घडतात. तिथे चंद्राचा संबंध फारसा नाहीच. यामुळे मला चांद्र कालगणना फार आकर्षक वाटत नाही. कोळी, ऑप्टीकल अ‍ॅस्ट्रानॉमर्स इत्यादी लोकांनी चंद्राचा विचार करणं रास्त आहे. पण या अल्पसंख्य लोकांसाठी कॅलेंडरात चांद्र दिनांक/तिथी दिलेली असतेच.

वर्तुळांचा विचार करता ३६० हा आकडा ३.१४ पेक्षा सोपा वाटतो. कारण पुन्हा तेच, आकड्याचे भाजक (? factor) मिळणे. ३६० अंशांची कल्पना ३६५ दिवस=१ वर्ष यातून आलेली असेल. ६० सेकंद = १ मिनीट, ६० मिनीटे=१ तास या कल्पना त्या ३६० शी निगडीतच असाव्यात. ६०, ३६०, २४ या आकड्यांचा ३ हा एक भाजक असणे हा एक फायदा आहेच.

गंमत म्हणून अशा गोष्टी माहित असणं मला पटतं; पण अशा गोष्टी लक्षात ठेवायला आवडत नाहीत. आपलं ते सोपं न म्हणता सोप्या गोष्टींना आपलं म्हणणं मला परवडतं. खरोखरच्या क्लिष्ट गोष्टी समजून घेताना डोक्यात कमी mess होते.

१. गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष का म्हणावं? पंजाब्यांचं नवीन वर्ष बैसाखीला, वैशाखात सुरू होईल. बंगाल्यांचंही. गुजराथी बांधव दिवाळीत नवीन वर्ष सुरू करतील. मल्याळी, तमिळ, उडीया लोकांचं वर्ष आणखी इतर वेळेस सुरू होईल. Shame on me, मला माझ्या देशातल्या इतर लोकांचं वर्ष कधी सुरू होतं हे ही धड माहित नाही. महिना पौर्णिमेला सुरू होतो का अमावस्येला यावरूनही एकवाक्यता नाही.
२. भारतीय महिन्यांची नावं अशा पद्धतीने ठरवली जातात. अधिक महिना कोणता हे सुद्धा.

अशोक पाटील Sat, 24/03/2012 - 15:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे भले !!! सागरला आता नक्की समजले असेल की मी माझ्या प्रतिसादात अदितीचा या संदर्भात का उल्लेख केला होता. तिच्या नावातील 'विक्षिप्त' हे प्रीफिक्स असा प्रतिसाद वाचताना किती गैरलागू आहे हे माझ्यासारख्या या क्षेत्रातील अनभिज्ञाला चटदिशी उमजते. खरे तर तिने '३_१४ अभ्यासू अदिती' असाही एक अ‍ॅडिशनल आयडी अशा लिखाणासाठी तयार करायला हरकत नसावी.

ग्रेट रीअली.

अदिती ~ तुम्हा दोघांच्याची लिखाणात 'निमिष' चा उल्लेख आला आहे. एक शंका - आपण कुठेतरी एक मराठी गाणे ऐकतो : "इथूनच दृष्ट काढते, निमिष एक थांब तू...." ~ यातील 'निमिष' हे सेकंदाचा एखादा भाग सांगतो असे वाटते. ते निमिष कालगणनेतीलच का ?

अशोक पाटील

चेतन सुभाष गुगळे Sat, 24/03/2012 - 16:31

In reply to by अशोक पाटील

यातील 'निमिष' हे सेकंदाचा एखादा भाग सांगतो असे वाटते. ते निमिष कालगणनेतीलच का ? >>

निमिष :- १/१० सेकंद (सेकंदाचा दहावा हिस्सा) अर्थात पापणीची उघडझाप करण्यास लागणारा किमान अवधी http://marathi.indiandictionaries.com/meaning.php?id=33098&lang=Marathi.

इथे जरा कालावधी जरा वेगळा लिहीलाय http://tinyurl.com/85xz9nb परंतु क्रिया तीच आहे. विकीपीडिया वरील अर्थ (http://tinyurl.com/6p68mat) चूकीचा असावा असे वाटते.

सागर Mon, 26/03/2012 - 15:21

In reply to by चेतन सुभाष गुगळे

निमिष प्रमाणेच निमिषार्ध हे ही मापन वापरात आहे. निमिष म्हणजे सेकंदाचा दहावा भाग (नॅनोसेकंद) असावा. क्षण आणि निमिष हे एकच मानले असतील तरच. नाहीतर क्षण हा नॅनो सेकंद (१/१० सेकंद) आणि निमिष (१/१०० सेकंद) असा होऊ शकेल. पण दशमान पद्धत पाहता क्षण आणि निमिष एकच असावेत. माझी समजूत अशी आहे की दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरात असावेत. निमिषार्ध हा पापणी लवायच्या आत या अर्थाने वापरला जातो.

धनंजय Sat, 24/03/2012 - 22:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(पुढील दोन वाक्ये सहमतीची आहेत :) दिवस ही कालगणना तशी सोपी असते, म्हणजे सूर्य उगवणे आणि मावळणे हे प्रसंग अत्यंत नाट्यमय असल्यामुळे दिवस मोजणे सोपे जाते. वर्ष ही कालगणना देखील सोपी आहे, कारण भारतात पावसाळा, अन्य देशांत वेगळा कुठला ऋतू इतका नाट्यमय असतो, की विनासायास एक-दोन-तीन मोजता येतात. गणित फारसे कळत नसले, खूप मोठ्या संख्येपर्यंत आकडे ठाऊक नसले, तरी "आता नवीन दिवस/वर्ष आहे, हे समजू शकते.

मात्र दिवस आणि वर्ष यांच्या मधले कुठलेसे एकक गरजेचे भासते. म्हणजे नीट गणित करून नाही, पण "आता पुढचे एकक आहे" हे लक्षात ठेवता यावे, याकरिता आपोआप दिसणारे कुठलेसे चिन्ह हवे. पूर्णिमा-अमावास्येच्या चक्राचे एकक त्या मानाने सोयीस्कर आहे. २७ की २८ दिवस, ते नीट मोजले नाही, तरी "आता पुन्हा चंद्र वाढायला लागला" असे बघून "नवे एकक सुरू झाले" ही कल्पना करता येते.

"सप्ताह" हे एकक मात्र मला सगळ्याच प्रकारे अडनाडी वाटते. "राउंड नंबरही" नाही, आणि नवा आठवडा सुरू झाल्याची कुठली ठळक खूणही नाही. आठवड्याचा कुठला दिवस आहे, हे लक्षात ठेवणे मला इतके कठिण जाते, की गेली काही दशके मी एक सवय केलेली आहे. आठवड्यातला वार दर्शवणारेच घड्याळ वापरतो.

- - -

हे आकडे एकमेकांचे विभाजक नसल्याचा चिमटा मला बसलेला आहे. नोकरी नवी-नवी करायला लागलो, तेव्हा मला दर दोन आठवड्यांनी शुक्रवारी पगार मिळे. बँकेत जमाखातेही नसे - पगार टाकटूक पुरे. घरभाडे, बिले मात्र महिन्याची महिन्याला भरावी लागत. घरभाडे भरायचा दिवा पगाराच्या आदल्या सोमवारी वगैरे आला, की ओढाताण होई. (प्रत्येक महिन्यात बजेटिंग करून पैसे तयार असण्याकरिता, बँकेत जमाखाते तितपत वाढेपर्यंत एक-दोन वर्षे लागली.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/03/2012 - 00:28

In reply to by धनंजय

मात्र दिवस आणि वर्ष यांच्या मधले कुठलेसे एकक गरजेचे भासते.

सहमत. स्त्रियांना आयुष्यातला ३०-४०% काळ हे एकक आपोआप मिळते. त्याचाही चंद्राच्या कलांशी संबंध असण्याचा सिद्धांत ऐकलेला आहे. नक्की काय ते माहित नाही.
चंद्राच्या कलांवर अनेक प्राणीही अवलंबून असतात. काही समुद्री जीवांच्या शंखांवरची वलयं चांद्र महिन्याशी निगडीत असतात असं एकेकाळी वाचलं होतं. निबीड जंगलात रहाणार्‍या प्राण्यांना अमावस्या आणि पौर्णिमा या दोन कलांमधला फरक समजत असेल असं वाटतं.

आठवड्याचा मेन्यू सेट असणार्‍या कॅण्टीनमधे जेवणार्‍यांना, टीव्ही मालिका पहाणार्‍यांना आठवड्याची गणितं सहज जमत असावीत. (कॅण्टीनमधे एकवेळ जेवायचे तेव्हा मला एकेकाळी जमत असे.) मोबाईल किंवा घड्याळाशिवाय मलाही वार लक्षात ठेवता येत नाहीत.

सागर Mon, 26/03/2012 - 15:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती,

आपलं ते सोपं न म्हणता सोप्या गोष्टींना आपलं म्हणणं मला परवडतं.

विचार अगदी पटले

आतिवास Sat, 24/03/2012 - 22:06

'पुण्य', 'कर्म' अशा शब्दांनंतर 'ऐसी'वर निमिष, कल्प, प्लवंग वगैरे प्रचलित व्ह्यायला अडचण नसावी :-)

(संपादक मंडळ अति गांभीर्याने घेणार नाही ही आशा!)

अरविंद कोल्हटकर Mon, 26/03/2012 - 23:51

मुख्यकरुन मराठी वार, महिने आणि वर्षे इंग्रजांच्या अगोदर प्रचलित होतीच. पुन्हा ती वापरायला सुरुवात करणे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अवघड आहे याची मलाही कल्पना आहे. पण वापर करणे सोपे असेल तर काय हरकत आहे एवढेच निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न होता.>

पण सर्वांनी या कालगणनेचा वापर सुरु केला तरच ही अवघड वाटणारी कालगणना सोपी वाटू लागेल. पुढे कधीतरी मराठी महिने व ऋतूंचा आढावा घेईन, तेव्हा या कालगणनेचा वापर रोजच्या जीवनात किती सोपा आहे हे सांगण्याचा अवश्य प्रयत्न करेन.>

सागर ह्यांनी हा धागा प्रारंभ करण्यामागची प्रेरणा त्यांच्या वर उद्धृत केलेल्या दोन विधानांवरून दृष्टीस येते असे मला वाटते म्हणून त्या अनुषंगाने पुढील लिखाण केले आहे.

कालगणना पद्धति आणि त्यांचा इतिहास हा एक गहन विषय आहे. मला त्यात फार गति आहे असे नाही. तरीहि शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीय ज्योति:शास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' ह्या उत्कृष्ट ग्रंथावरून आणि अन्यहि अनेक पुस्तकांवरून ह्या विषयाच्या गुंतागुंतीची आणि आवाक्याची थोडी कल्पना करता येते. येथे पुन: भारतीय आणि अन्य संस्कृतींमधील कालगणना, भारतीय कालगणनेमध्ये पुनः भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळी प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या कालगणना हे अन्य गुंते आहेतच. त्या सर्वांकडे पाहता असे वाटते की 'इंग्रजांच्या अगोदर प्रचलित असलेली मराठी वार, महिने आणि वर्षे' ह्या वर्णनाला पात्र असे काही नव्हतेच. जे काय होते ते मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातले सणवार आणि धार्मिक संस्कार ह्यांच्यापुरतेच मर्यादित होते आणि त्या मर्यादित अर्थाने त्याचा आजहि उपयोग चालू आहेच. बाकीच्या व्यावहारिक जीवनात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर व्यापारी हिशेब, सारा आणि अन्य प्रकारची करवसुली, अन्य दरबारांशी पत्रव्यवहार ह्यांसाठी अन्य प्रकारच्या कालगणना (उदा. विक्रमसंवत, मुघल पद्धतीची फसली कालगणना) ह्यांचाहि मुबलक वापर होत होता. (पेशवेकालीन पूष्कळ पत्रांमधील तारीख फसली पद्धतीची असते.) त्यामुळे ही तथाकथित 'मराठी' कालगणना 'सोपी' आहे हे क्षणभर चर्चेपुरते मान्य केले तरीहि तिचा वापर करणे अशक्य नाही हे त्याच्यापुढील विधान मान्य करणे अवघड वाटते. ती 'मराठी' गणना तथाकथित 'सोपी' असली तरी आजच्या व्यवहाराच्या दृष्टीने गैरसोयीची आहे असे मला वाटते.

ही 'मराठी' पद्धति सौरवर्षाशी जोडून दिलेल्या चान्द्रमासांची आहे. शं.बा.दीक्षितांनी म्हटल्यानुसार दिवसाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे दोन सूर्योदयांमधील कालाचे मान, मासाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे एका पूर्णचन्द्रापासून दुसर्‍या पूर्णचन्द्रापर्यंतच्या कालाचे मान आणि वर्षाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे ऋतुचक्र पूर्ण होते त्या कालाचे मान. ह्या तीन मानांमध्ये नैसर्गिक गुणोत्तर - एकाच्या अमुकपट दुसरा - असे गणिताला सोपे वाटणारे काहीच नाही तरीपण त्यांची एकमेकांत काही तरी प्रकारची सांगड घालण्याची आवश्यकता तर आहे. ह्या तारेवरच्या कसरतीमधून देशकालानुसार अनेक कालगणनापद्धति निर्माण झाल्या आणि त्यांमध्ये अमुक एक पद्धति अधिक 'सोपी' आहे असे निश्चयपूर्वक म्हणता येत नाही. (येथे दोन प्रकारची सौर वर्षे - सांपातिक tropical सौर आणि नाक्षत्र sidereal सौर ह्यांमधील फरकाचा आणि तदंगभूत लीप गणनेचा विचार करीत नाही. अयनचलनामुळे निर्माण होणारे गुंतेहि येथे मोजत नाही.)

आपण सांप्रत वापरत असलेली कालगणना, जिला आपण सोयीसाठी ख्रिश्चन कालगणना असे म्हणू, ही सुमारे १५०० वर्षांच्या प्रयत्नांमधून आणि सुधारणांमधून विकसित झाली आहे. आजहि ती पूर्णपणे अचूक आहे असेहि नाही. उदाहरणार्थ, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गति कमी होत असल्याने लीप सेकंद घालण्याची गरज भासते (http://en.wikipedia.org/wiki/Leap_second), तसेच लीप दिवस घालण्याची चालू पद्धति (चारने भागले जाणारे वर्ष लीप पण शंभराने भाग जाणारे नाही, तरीहि चारशेने भाग जाणारे वर्ष लीप) हीहि काही दशसहस्र वर्षांनी अपुरीच पडणार आहे. ह्या मर्यादा मान्य करूनहि असे दिसते की सध्याच्या आणि पुढच्या काही हजार पिढयांच्या जीवनाला सध्याची ख्रिश्चन पद्धति हीच सर्वात योग्य आहे. 'मराठी' पद्धति 'आपली' असली तरीहि ती 'चान्द्र' आहे. ऋतु आणि त्यांतून निर्माण होणारी अर्थव्यवस्था ही 'सौर' असणारच म्हणून ही 'आपली' गणना तिच्या सध्याच्या कार्यापुरतीच, सणवार ठरविणे, लग्नाचे मुहूर्त काढणे एवढयापुरतीच मर्यादित राहणार आणि तशीच ती राहावी.

'महामायानिमिष', 'शिवनिमिष', विष्णुघटिका' अशी एक भारतीय कालगणना धाग्याच्या प्रारंभी दिली आहे. ह्याच प्रकारची आणि जवळजवळ तसेच कोष्टक असलेली कालगणना मनुस्मृतीमध्ये आहे आणि ती प्राचीन ग्रंथांमधून आणि भारतीय ज्योतिर्गणितात अधिक प्रचलित आहे हे येथे नुसते नमूद करून ठेवतो.

अवांतरः गुरुच्या ५ व शनिच्या २ प्रदक्षिणा यांची बेरिज करुन सप्ताहाची (आठवड्याचे दिवस ७) निर्मिती झाली काय?> अशी विचारणा सागर ह्यांनी वर केली आहे. आठवडयाचे सात दिवस आणि त्यांची नावे ह्यांची उपपत्ति पुढीलप्रमाणे आहे:

मराठीत ’होरा’ म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक ’होराभूषण’ असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील ’दिवसाचा २४ वा भाग अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह ’होरेश’ मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. ’होरा’ शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला ’भविष्य’ हा अर्थ चिकटला. ह्याविषयी श्लोक:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.

(अधिक चर्चेसाठी पहा http://mr.upakram.org/node/3647)

धनंजय आणि मिहिर ह्यांच्या प्रतिसादांमधून ६० वर्षांच्या संवत्सरचक्राबाबत काही माहिती दिली आहेच. शं.बा.दीक्षितांचे ह्याविषयीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
वेदांगज्योतिषामध्ये पाच वर्षांचे युग मानले आहे. ही वर्षे 'बार्हस्पत्य' म्हणजे गुरूची मानल्यास अशा पाच 'बार्हस्पत्य' वर्षांत अदमासे ६० सौर वर्षे बसतात. (अदमासे अशामुळे की गुरूला मध्यमगतीने एक राशि पूर्ण करण्यास सूर्यसिद्धान्ताप्रमाणे ३६१ दि. १ घ. ३६ प. इतका काळ लागतो आणि १२ राशि पूर्ण करण्यास त्याला लागणारा काळ १२ सौर वर्षांहून थोडा कमी असतो. ८५ सौर वर्षात गुरू अदमासे ८६ राशि चालतो.) ह्या ६० सौर वर्षांना प्रभवादि नावे देऊन ही कालगणना सुरू झाली. ही ७व्या-८व्या शतकापर्यंत कोठेकोठे, विशेषत: दक्षिणेकडे, चालू होती असे काही ताम्रपटांवरून वाटते पण मधूनमधून एक वर्ष लोप करण्याची आवश्यकता असल्याने ती प्रचारातून गेली असावी. सध्या पंचांगातील उल्लेखापलीकडे तिचे काही स्थान आहे असे दिसत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/03/2012 - 00:16

In reply to by अरविंद कोल्हटकर

ऋतूंचा अर्थकारणाशी असणारा संबंध महत्त्वाचा आहे हा मुद्दा फारच पटला.

आजच्या कालगणनेत, आता बरीच जास्त अ‍ॅक्यूरसी (मराठी शब्द) आलेली आहे. सामान्य माणसाचा सरळ संबंध येत नसेल तरीही जीपीएस वगैरे उपकरणांमुळे अचूक कालमापनची आवश्यकता सामान्य माणसालाही आहे. त्यामुळे श्री. कोल्हटकर यांनी सांगितल्याप्रमाणे लीप दिवसांमधला किचकटपणा आहे, लीप सेकंद आहेत; त्याचप्रमाणे गुरू-शनी हे 'दादा' ग्रह आणि भूकंप यांमुळे पृथ्वीच्या परिवलन-परिभ्रमणावर होणारा परिणामही लक्षात घ्यावा लागतो. अर्थात या दोन्ही घटनांचा होणारा परिणाम काही नॅनो/मायक्रो सेकंद एवढा कमी असल्यामुळे प्रत्येकाला त्याचा विचार करावा लागत नाही.

आणि एक प्रश्न आहे: खाल्डियन हे नाव बर्‍याचदा ऐकलं आहे. ही भाषा, संस्कृती म्हणजे नेमकी कुठली?

अरविंद कोल्हटकर Tue, 27/03/2012 - 00:42

ह्यापूर्वीच्या माझ्या प्रतिसादात एक विषय उल्लेखिण्याचा राहून गेला. ते कार्य आता करतो.

पाश्चात्य कालगणनेऐवजी भारतीय चेहेरामोहरा असणारी कालगणना हवी अशा विचारातूनच १९५७ साली भारत सरकारने मेघनाद साहा ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक Calendar Reform Committee स्थापन केली होती आणि त्या कमिटीने भारतात प्रचलित असलेल्या अनेक पंचांगांची सांगड घालणारे, सौर पद्धतीचे ३६५/३६६ दिवस असणारे आणि चैत्र-वैशाखादि १२ मासांची नामे असणारे Calendar निर्माण केले होते. प्रचलित शकगणना तशीच पुढे चालू ठेवली होती. ह्या Calendar अनुसार मार्च २२, १९५७ ला चैत्र १, १८७९ शक असे मानून कालगणना तेथून पुढे सुरू केली होती. अधिक माहितीसाठी पहा: http://en.wikipedia.org/wiki/Indian_national_calendar

पहिल्या काही वर्षात किमान सरकारी पातळीवर तरी ह्या Calendar अनुसार तारखा दाखविल्या जात. तरीहि सोयीसाठी इंग्रजी तारखाहि दाखवत. वाचक सोयीस्कर मार्गाने सरकारी तारखांकडे दुर्लक्ष करून इंग्रजी तारखाच वापरत. कालान्तराने सरकारी Calendarचा वापर हळूह्ळू सरकारातहि बंद झाला आणि आता त्या तारखा क्वचितच कोठे दिसतात. ज्या 'सुधारणांची' आवश्यकता नसते त्यांचे असेच होते!

नितिन थत्ते Tue, 27/03/2012 - 10:52

In reply to by अरविंद कोल्हटकर

>>पहिल्या काही वर्षात किमान सरकारी पातळीवर तरी ह्या Calendar अनुसार तारखा दाखविल्या जात.

आकाशवाणीवर आज भारतीय सौर दिनांक...... अशी तारीख सांगण्याची पद्धत होती. आता चालू आहे का ते ठाऊक नाही.

मन Tue, 27/03/2012 - 11:08

In reply to by नितिन थत्ते

रेडिओवर अजूनही ऐकल्यासारखी वाटते.
गंमत म्हणजे संघाच्या आमच्या इथल्या शाखेवरही ह्याच तारखा सांगितल्या जात.

मन Tue, 27/03/2012 - 10:17

चर्चा छानच.
अगदि वाचून थकेस्तोवर माहिती मिळतेय हे चांगलच म्हणायचं.
अदिती, कोल्हटकर ह्यांचे प्रतिसाद भारिच.