फ्रेंच लेफ्टनंटस् वुमन
तेही नो दिवसा गतः म्हणून उसासे टाकणारे बरेच असतात. भूतकाळ व. इतिहास त्यांना इतका प्रिय असतो की वर्तमानकाळात जिवंत राहणे कठिण होऊन जाते. भविष्य तर आणखी अंधार. खरेतर भूतकाळाची माहिती ऐकून किंवा कुठे तरी पुस्तके वाचूनच झालेली असते. मुद्रित झालेली प्रत्येक ओळ खरी मानायला हवी असे काही नाही. आपल्या येथील राजेमहाराजांच्याबद्दल लिहून ठेवलेले वाचले तर असे वाटेल की प्रत्येक जण कर्ण किंवा हरिश्चंद्राचेच अवतार आहेत. इंग्रजांच्या थडग्यावरील लिहिलेले वाचले तर सगळे इंग्रज म्हणजे जणू काय आकाशातील बापांचेच चेले. थडग्यावर-सुध्दा बहुतेक फार दयाळू असे कोरलेले असेल. जिवंतपणी ह्यातील कित्येक इंग्रजांनी केलेल्या क्रूरपणाला कुठलेही बंधन नव्हते. लिहिणाऱ्याला काय? थोडे पैसे चारले की काहीही लिहू शकतो. राजवाडयांसारख्या इतिहासकारांनी इतिहास लिहिले तर मात्र भूतकाळावर थोडाफार प्रकाश पडेल.
एकोणिसाव्या शतमानाबद्दल इंग्रजी साहित्यात भरपूर उदो उदो केला जातो. इंग्रजी साहित्यातील तो एक सुवर्णयुग. जेन ऑस्टिन, चार्ल्स डिकेन्स, एमिली ब्राँटेसारखे अतीरथी महारथी त्याकाळी होते. कार्ल मार्क्स, डार्विनसारख्या मंडळीनी ह्या जगाला एक वेगळी दिशा दाखविली. पण खरेच सगळे काही चांगले होते का? सामान्य माणूस कसा रहात होता? त्यांच्यासमोर कुठल्या समस्या होत्या? सर्वसामान्य जीवन सुखकर होते का? असे किती तरी प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. त्या काळातील लोकांना असे प्रश्न विचारायची आवश्यकताही वाटली नसेल. पण आपण मात्र ह्या प्रश्नावर अलिप्तपणे विचार करू शकतो. वर्तमानकाळातील संवेदनशील व बुध्दीचातुर्य असलेल्या एखाद्याने 'टाईम मशिन' मधून जर भूतकाळात प्रवास केला तर त्याला काही तरी वेगळेच दिसेल. अशाप्रकारचे टाईम मशिन प्रत्यक्षात कधीच तयार होणार नाही. पण एखादा सर्जनशील लेखक मात्र आपल्या लेखनशक्तीने वाचकांना अशा प्रकारच्या टाईम मशिनमधून प्रवास करून आणू शकतो.
जॉन फौल्स ह्या कादंबरी लेखकाने लिहिलेले 'फ्रेंच लेफ्टनंट्स वुमन' ही कादंबरी वाचताना आपल्याला अशाच कुठल्यातरी टाईम मशिनमधून प्रवासाला जात आहोत असे वाटते. १९६७ मध्ये लिहिलेली ही कादंबरी आपल्याला शंभर वर्षे मागे घेऊन जाते. चार्लस नावाचा एक तरुण विज्ञान प्रेमी. (त्या वेळचे बहुतेक तरुण विज्ञानप्रेमी असलेच पाहिजे!) काकाची इस्टेट त्याला मिळणार आहे. काका अविवाहित. त्याचे उमरावपद पण चार्लसला त्याच्या मृत्युनंतर मिळणार (जर काकानी लग्न केले नाही तर). अर्नेस्टिना ही त्याची प्रेयसी. चार्लसला कशाही प्रकारचे कुठलाही कामधंदा करण्याची आवश्यकता नाही. असेच प्रेमीयुगुल फिरत असताना समुद्राच्या काठी एकटीच बसलेल्या सुंदर तरुणीबद्दल टीना माहिती देऊ लागते. सारा नावाच्या ह्या तरुणीचा संबंध एका फ्रेंच सैनिक अधिकाऱ्याशी आल्यामुळे गावातील लोकांनी तिला वाळीत टाकलेले असते. चार्लस तिला नंतर एकदा एकांतात भेटतो. सहानुभूती प्रेमात बदलते. टीनाला हा बदल आवडत नाही. चार्लसचा काका उतारवयात लग्न करतो. चार्तसला पोटापाण्यासाठी कामधंदा शोधावा लागतो, उमरावपद मिळत नाही, एकोणिसाव्या शतकातील ह्या तरुणाला उमरावपद नाही म्हणजे त्याला आयुष्यातून उठल्यासारखे वाटते. ह्या तीन चार प्रमुख पात्राबरोबर अशा आणखी काही पोषक पात्राभोवती कांदबरीची कथा गु्फली जाते. जॉन फौल्स मात्र या कथेचा शेवट फार वेगळ्या प्रकारे करतो.
रूढार्थाने या कथेला तीन शेवट आहेत, एकामध्ये चार्लस साराला पूर्णपणे विसरून टीना बरोबर सुखाने संसार करतो. दुसऱ्यामध्ये बंड व क्रांतीकारी तरुणी सारा अमेरिकेसारख्या राष्ट्रात जाते. चार्लस पण तिथे जातो व तिच्याबरोबर लग्न करून सुखात राहतो. तिसऱ्यामध्ये चार्लस अमेरिकेला जाऊन साराचा शोध घेतो. पण ती एका कुप्रसिध्द कुटंणखान्यात आहे असे कळते. मगं तो कुठलेही साहसी कृत्य न करता तसाच एकटा राहतो. साराबरोबर एक लहान मूल आहे. कदाचित ते चार्लसचेसुध्दा असू शकेल.
या कादंबरीचा उद्देश फक्त ही गोष्ट सांगितली जावी असे नसून निवेदकाला वाचकांना एकोणिसाव्या शतकाची कल्पना करून देणे आहे. त्यामुळे कादंबरीमध्ये चार्लस, सारा व टीनाइतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे निवेदक. हा निवेदक प्रत्येक घटनेवरती विमर्शात्मक निवेदन करून वाचकांना दोन्ही शतकामधील स्थित्यंतराची कल्पना करून देतो. त्या वेळची सामाजिक स्थिती, लोकांची आवड, त्यांच्या संस्कृतीच्या कल्पना ह्यांचा समग्र वृत्तांत आपल्यापुढे ठेवतो. त्या लोकांची प्रवृत्ती, पूर्वग्रहदूषित विचार, यांच्यावरही हा 'निवेदक चर्चा करतो, अनौरस संतती, बालकामगारांचे प्रमाण हे विसाव्या शतकपेक्षा त्या काळी जास्त होते. व्यभिचार व मादक पदार्थाचे सेवन याचेही प्रमाण त्याकाळी जास्त होते. कोवळया वयातील मुलांकडून दर रोज अठरा तास काम करवून घेतले जात होते. बारा तेरा वर्षाच्या मुली बाळंतपणात मरत होत्या. डॉक्टर मंडळी स्त्रिया अबला आहेत असे भासवून एकेका पेशंटवरती श्रीमंत होत होते. श्रीमंतानी इतरांच्या केलेल्या पिळवणूकी तर सर्तश्रुत आहेच. योनिशुचित्वाच्या भलत्याच कल्पना त्यावेळी होत्या. धार्मिकतेच्या नावाखाली प्रत्येक नवीन कल्पनेला मूठमाती दिली जात होती. साडेतीनशे पानांच्या या कादंबरीमध्ये जॉन फौल्स, सारा व चार्लस यांच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर एक अजब, अनाकलनीय दुनिया आपल्यासमोर उभी करतो. हया निवेदकाच्या डोळ्यातून एकोणिसाव्या शतकांतील इंग्लंडचे दर्शन, एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपण घेतो.
कादबरी म्हणजे विश्वामित्राची सृष्टी. पहिल्या पानाबरील नायकांचे हिरवे केस शेवटच्या पानावर तांबूस होतात. मध्येच कुठेतरी त्याला टक्कलही पडते. कुठेही पात्रनिर्मिती' होऊ शकते. व तितक्याच निर्दयपणांने लेखक त्या पात्रांना मारू शकतो. ही सगळी किमया कादंबरीकाराची. जॉन फौल्स ह्या थराला काही गेला नाही. पण तो येथील प्रत्येक पात्राला व पात्राबरोबर वाचकाला आपल्या अनुरोधाने खेळवतो. आपल्या बोटाबर नाचवतो. पण कुठेही विसंगती नाही, कित्येक वेळा असे वाटते की कथानकातील ही मंडळी लेखकावर ताबा घेतात व आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे त्याच्याकडून लिहून घेतात. संपूर्ण कादंबरी वाचताना डिकेन्स किंवा स्कॉट त्यांच्याप्रमाणे हा लेखक आपल्याला कुठेही विश्रांती घेऊ देत नाही. विसाव्या शतकातील शहाणपणाचा उपयोग करून वाचकांना खेळवत राहतो. अशाप्रकारे एका वेगळया जगाच्या प्रवासात घेऊन जातो व परत आणून सोडतो.
जॉन फौल्स ह्या कांदबरीमुळे प्रसिध्दीच्या झोतात आला. त्याचे सर्व लेखन अस्तित्ववाद व स्वच्छंदतावादाच्याच भोवती आहे. 'कलेक्टर', 'मेगस', 'एबोनी टॉवर”, 'डेनियल मार्टिन' ह्या कृती पण भरपूर गाजलेल्या आहेत. सार्त्र, कामू ह्यांचा प्रभाव यांच्या लेखनावर आहे. तरीही लेखन क्लिष्ट न वाटता मनोरंजक वाटते. चांगल्या कृती देणारा हा एक लेखक आहे. लेखकाच्या ह्या पुस्तकातील प्रंवास वाचकांना भरपूर दिवस निश्चितच लक्षात राहील.
+१
डिकन्सच्या क्रिसमस कॅरल, ग्रेट एक्सपेक्टेशन्स, आणि सध्या वाचत असलेली टेल ऑफ टू सीटीज मध्ये मध्यम वर्गाचा संघर्ष दिसतो. ब्राँटेच्या जेन एअर मध्ये साथीचे रोग दिसतात, अनाथाश्रमाथल्या मुलांची दैन्यावस्थाही दिसते.
पण एकंदर का कुणास ठावूक गतकाळातल्या कादंबर्या वाचल्या की त्या काळात रेंगाळतोय अशी भावना काही दिवस घर करून राहते.
फ्रेंच लेफ्टनंटस् वुमन कादंबरी इंटरेस्टींग वाटली.
जेन ऑस्टीन अत्यंत सुमार आणि रटाळ निव्वळ कचरा
जेन ऑस्टिन चे अतिशय सुमार , अतिशय रटाळ, प्रचंड कचरा असे साहित्य असूनही जो उदो उदो तिच्या कादंबऱ्याचा केला जातो त्याच्या मागे साहेबा चे आणि त्यांच्या साम्राज्याच्या शक्ती चे आणि त्यांच्या निष्ठावंत गुलामांचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे.
मात्र जेन ऑस्टीन च्या पुस्तकांचा एक उत्तम शिक्षा म्हणून वापर होऊ शकतो.
म्हणजे तिच्या कादंबरीचे पूर्ण लिखाण करा किंवा पारायण करा अशा भयानक शिक्षा देता येतील
किंवा आत्म संयम वगैरेसाठी केश लोचन ऐवजी देण्यापेक्षा जेन ऑस्टिन वाचा लिहा इत्यादी विधी देऊ शकता
किंवा व्हिडिओ गेम addict किंवा नेट addict साठी जे सेंटर असतात तिथे या कादंबऱ्या लिहा वाचा करता येईल
किंवा विपश्यना केंद्रात सुद्धा जेन च्या कादंबऱ्या देऊ शकता.
एकोणिसाव्या शतमानाबद्दल…
एकोणिसाव्या शतमानाबद्दल इंग्रजी साहित्यात भरपूर उदो उदो केला जातो.
एखादी "साहित्यिक कलाकृती" कुणाला आवडेल तर कुणाला रद्दी वाटेल त्यामुळे व्यक्तिगत आवडीनिवडीवर बोलण्यात काही अर्थ नाही. पण हे मात्र खरं की १८-१९ व्या शकतकातल्या कादंबर्या (इंग्रजी वा फ्रेंच वा अन्य भाषेतल्या) या एक दस्ताऐवज आहेत.
सरकारी/ राजदरबारी अधिकृत आकडेवारीवरून तत्कालिन युरोपिअन समाजाचे जे वास्तव दिसते तेच जेन ऑस्टीन, हेन्री जेम्स यांच्या इंग्रजी कादंबर्यांमधल्या कथानकात वा बल्झाकच्या फ्रेंच कादंबर्यांच्या कथानकात उतरलेले आहे हे पिकेटीने त्याच्या कॅपिटल इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी मध्ये दाखवून दिले आहे. दुर्दैवाने मराठीत तत्कालिन लोकजीवनाचा, आर्थिक व्यवहारांचा, राहणीमानाचा अंदाज येईल अशा कादंबर्या नाहीत. विष्णूपंत गोडसेंचा "माझा प्रवास" नक्कीच अशा कॅटेगरी मध्ये येतो. पण इतर कुठल्या कादंबर्या आहेत याची कल्पना नाही. असतील तर वाचायला नक्कीच आवडेल.
माझी तीर्थयात्रा लेखक गोविंद हरी फडके
माझी तीर्थयात्रा ही गोविंद हरी फडके यांनी 4 भागात लिहिलेले 1182 पानांचे पुस्तक आहे. पुस्तके 1923-1928 मध्ये छापलेली आहेत.
फडके यांनी उत्तर हिंदुस्थानचा प्रवास 1916 साली केला , हिमालयाचा 1925,दक्षिण भारताचा 1920 साली केला होता. तसेच महाराष्ट्रात वेळोवेळी केलेल्या यात्रा .हे सर्व यात आलेले आहे. ते नेरळ येथे एक प्राथमिक शिक्षक होते.
श्री दि के बेडेकर यांच्या साहित्य विचार या अप्रतिम सुंदर पुस्तकात. बेडेकर यांनी एक सबंध प्रकरण माझी तीर्थयात्रा वर लिहिलेले आहे.ते अतिशय वाचनीय आहे.
बेडेकर यांचे हे पूर्ण पुस्तक म्हणजे आनंदाचा खजिना आहे.
तुम्हाला ज्याप्रकारच पुस्तक हवे आहे ते हे आहे.
थँक्स..
सुदाम्याचे पोहे कदाचित याला समकालिन असेल. माझ्याकडे निवडक सुदाम्याचे पोहे आहे. तुम्ही सुचविलेलं पुस्तक अमेझॉनवर आहे. मागे पुढे कधीतरी वाचेन.
वीसाव्या शतकाच्या सुरुवातीची काही दुर्मिळ छायाचित्रे, चलचित्रे, मूक/बोलपटही उपलब्ध आहेत. मराठी बरोबर टागोरांचं वा इतर बंगाली साहित्यिकांचे साहित्य आहे. त्यामुळे वीसाव्या शतकाच्या सुरवातीचा वा एकोणवीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाचा बर्यापैकी अंदाअ आहे.
इंग्रज येण्यापूर्वी वा आल्यानंतर एकोणसवीव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातली वा पेशवेकाळातलं एखादं प्रवासवर्णन (मोस्टली तीर्थयात्रेचे - कादंबरी हा साहित्य प्रकार नंतर आल्यामूळे तो सोडून देऊ) असतं तर खूप मस्त झालं असतं.
गोडसे भटजींचं "माझा प्रवास"…
गोडसे भटजींचं "माझा प्रवास" वाचलं आहात का?
https://dn790004.ca.archive.org/0/items/maza-pravas/Maza%20Pravas.pdf
आणि गुणेंचं "माझा यूरोपातील प्रवास"?
https://dn790000.ca.archive.org/0/items/in.ernet.dli.2015.495109/2015.4…
काळ उघडा करणारी पुस्तकं
दुर्दैवाने मराठीत तत्कालिन लोकजीवनाचा, आर्थिक व्यवहारांचा, राहणीमानाचा अंदाज येईल अशा कादंबर्या नाहीत. विष्णूपंत गोडसेंचा "माझा प्रवास" नक्कीच अशा कॅटेगरी मध्ये येतो. पण इतर कुठल्या कादंबर्या आहेत याची कल्पना नाही. असतील तर वाचायला नक्कीच आवडेल.
लेखांक दुसरा १९०० | पालगड..
लेखांक तिसरा - माझा प्रवास - विष्णुभटजी गोडसे
लेखांक चौथा - मुंबईचा वृत्तांत - बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे
.
माझा मुद्दा बहुतेक समजला नाही. जेन ऑस्टीन, ब्राँटे भगिनी ज्यांचा काळ (१७९०-१८३०) म्हणजे एकोणवीसाव्या शतकाचा पूर्वार्ध आहे. त्याही अगोदर सॅम्युअल रिचर्डसन (१७४०) इ. लेखकांच्या कादंबर्या आहेत. त्याचा उदो उदो केला जातो कारण पोस्ट इंड्रस्ट्रीयलाझेशन समाजात घडणारे बदल त्यात दिसतात. त्यांना समकालीन कुठल्या कादंबर्या/लेखन आहेत? "माझा प्रवास" १८५७ पर्यंत पाठी जातो. त्याच्याही अगोदरचं कुठलं लेखन असेल ज्यातून काळ उलगडतो. ते वाचायला आवडलं असतं. उदा. पेशवाई, पेशवाई ते ब्रिटीश हे स्थित्यंतराच्या दरम्यानचे तिर्थटन/पर्यटन टिपणारे लेखन...इ.
पण खरेच सगळे काही चांगले…
पण खरेच सगळे काही चांगले होते का? सामान्य माणूस कसा रहात होता? इत्यादि>>कृपा करून Charles Dickens पुन्हा एकदा वाचा. Time Machine ची गरज पडणार नाही.