आर. डी. मल्हार !
एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते. गायक हा कवी व संगीतकार यांच्या मधला रसिक श्रोत्यांपर्यंत भावना पोहोचवणारा शेवटचा दुवा आहे. पण अनेक वेळा श्रेय नामावली मध्ये गायकाला विशेष स्थान असते आणि कवी व संगीतकार उपेक्षित राहतात.
कवीला संगीताची ज्ञान असणे सक्तीचे नाही पण संगीतकारला काव्याची जाण असणे अनिवार्य आहे. तसेच गायकाला संगीताचे ज्ञान असणे हे अनिवार्य असले तरी काव्याची समज आवश्यक नाही. म्हणून चांगले गीत / काव्य “चांगले गाणे “ म्हणून रसिकांसमोर आणण्यात संगीतकार हा महत्वाचा दुवा आहे.
तर संगीतकार आ.डी. बर्मन हा माझा अनेक आवडत्या संगीतकारांपैकी एक – अतिशय प्रतिभावान व वैविध्यपूर्ण संगीत रचना करण्यामध्ये श्रेष्ठ ! ख्याल ठुमरी असे शास्त्रीय विशेष करून ऐकणारे सिने संगीताला (सतत) कमी लेखत असतात – तो ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. पण घरंदाज श्रोत्याच्यातही आर.डी. च्या रचनांचे चाहते खूप आहेत , मी ही त्या पैकीच एक ! पाश्चात्य संगीत सरळ सरळ उचलणारा अशीही पंचम ची ओळख आहे. अशी उचलेगिरी कोण करत नाही? कोणत्या चीजा-ख्याल कोणत्या संगीतकर्त्याने वापरले आहेत हा एक वेगळा लेख होवू शकतो. पण ते चालते ! पश्चिमेचे संगीत चोरले की लगेच त्यावर चोरीचा आरोप होतो (होत असे). यामानाचा वापर जसा बाबुजींनी केला तसाच तो पंचम ने केला ! पिलू , खमाज , काफी राग तर अती कल्पकतेने वापरले. तबला , गिटार कोर्ड , सतार अश्या विविध विसंगत वाद्यांचा मस्त वापर केला. ( बडा नट खट है क्रिशन कानैय्या ). असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही.
सध्या मस्त पावसाळा सुरु आहे. हे म्हणजे राग मल्हार गायचे दिवस ! पावसाचे अनेक रंग आणि मल्हार चे अनेक प्रकार !! आर. डी ने मल्हार चा वापर केल्याचे आठवत नाही. तो तसा राग – त्याची वेळ – भावना हया गुंत्यामध्ये फासणारा नव्हे. आपल्या प्रतिभेने रचनांचे सोने करणारा संगीतकार. तर आर. डी ने केलेली दोन पावसाची गाणी पाहूया. मल्हार राग शिवाय त्या गाण्याला – भावनेला कशी मस्त गवसणी घातली आहे पंचमदाने !
बच्चनजी आणि मौसमी चटर्जी वर चित्रित केलेले “रिमझिम गिरे सावन"हया अप्रतिम गाण्याची नव्याने ओळख करून द्यायला नको. पावसाच्या गाण्यांमधले हे सर्वोत्तम गाणे आहे !
हया आठवडयात राजेश खन्नाचे निधन झाले. त्याच्या चित्रपटाचे मला विशेष अप्रूप नाही पण काकाजीना आर. डी. ने अनेक सुंदर रचना बहाल करून , त्याच्या “सुपर स्टार “ होण्यात थोडा हातभार लावला. राजेश खन्नाच्या अजनबी मध्ये असेच एक पावसातले सुंदर गाणे आहे. “ऐसा लागता है”.
ही दोनीही गाणी ऐकल्यावर पावसाला उगाच “मल्हार” मध्ये कोंबण्या पेक्षा असा स्वतंत्र न्याय दिलेला चांगला असे मला नेहमी वाटते.
प्रतिक्रिया
'रिमझिम गिरे सावन' हे
'रिमझिम गिरे सावन' हे प्रेक्षकाला खरोखरच भिजवते. मुम्बईच्या घनगर्द पावसाचे इतके लोभस आणि अचूक दर्शन क्वचितच आढळते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. या गाण्यात लताबाई प्रत्येक ओळीच्या शेवटी जो लाम्बवलेला बारीक कम्प देतात तो कातिल ! हेड्फोनवर ऐकायचे गाणे.
बाकी 'रिमझिम-रिमझिम, रुमझुम-रुमझुम | भीगी-भीगी रुत मैं, तुम-हम हम-तुम' हे '१९४२ अ लव् स्टोरी' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे काय ?
दोन्ही गाणी आवडतात
मला रागातले काही कळत नाही.. पण दोन्ही गाणी आवडतात.
बर्याच दिवसांनी ऐकली.. आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!