ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य
( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )
हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत. हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो. माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही.
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.
रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.
अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??
कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.
प्रतिक्रिया
छान! 'रस्ता तिथे यस्टी'
छान!
'रस्ता तिथे यस्टी' पोचवणार्या महामंडळाचे नेहमीच कौतुकयुक्त आदर वाटत आला आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
साल्हेर मुल्हेरच्या अंधुक आठवणी
लेख वाचून १९७५-७६ च्या सुमारास मी आणि माझे मित्र डॉ.श्री.मा.भावे (सध्याचे भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष) साल्हेर-मुल्हेर पाहायला गेलो होतो त्याची आठवण झाली. ट्रिपचे काही फोटोहि माझ्याजवळ होते पण गेल्या चाळीसएक वर्षात ते कोठेतरी गहाळ झाले ह्याची आता हळहळ वाटते. थोड्या अंधुक आठवणी शिल्लक आहेत इतकेच.
साल्हेरखालच्या भिल्ल वस्तीतून साल्हेरकडे निघालो. अर्ध्या उंचीवरल्या खिंडीत शेजारच्या सालोटा किल्ल्याचा रस्ता डावीकडे गेला. तेथे आम्ही गेलो नाही पण त्याच्या शेवटच्या चढणीच्या पायर्या लांबूनच पाहून तेथे चढण्याबद्दल धास्ती निर्माण झाल्याचे आठवते. साल्हेर किल्ल्याची तटबंदी खूप विस्तृत आणि भक्कम होती पण एका उजाड देवळाशिवाय तेथे काही नव्हते.
नंतर मुल्हेरला गेलो. अर्ध्या उंचीवर एक संपूर्ण उजाड गाव होते. वर कोणा साधूची समाधि होती. पायथ्याशी असलेल्या मुल्हेरमध्ये रामदासांचे शिष्य उद्धव ह्यांचे समाधिस्थान आणि मठ आहे त्याला भेट दिली. गाव एकेकाळी समृद्ध असले पाहिजे कारण गावात जुन्या पद्धतीचे बरेच वाडे होते.
बस्स...इतकेच आठवते.
चिंता नको.
अरविंद सर, चिंता नको.
तुमची चिंता हि बघा दूर झाली. आता हे (http://sagarshivade07.blogspot.in/2013/02/blog-post.html) वाचून नव्याने ट्रेक चा अनुभव येईल अशी अपेक्षा करतो.
तुम्ही हा ट्रेक केला तेव्हा भलताच अवघड असणार तो। आजही तेवढाच अभेद्य आहेत ते दोन्ही.
लोभ असावा
मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in
सिँगापुरला जाणारी ST आठवली
सिँगापुरला जाणारी ST आठवली
ST महाराष्ट्रात महामंडळाची
ST महाराष्ट्रात महामंडळाची गाडी म्हणून ओळखली जाते .वेळेवर येणे आणि पोहोचवणे तिचा गुण आहे .कधिकधि आजारी पडते ती बिचारी .फाटक्या बैठका ,मागच्या बाजूचे कोरीव लेखन ,ओकाऱ्या आणि पिचकाऱ्या हे मात्र प्रवाश्यांनी महामंडळाला दिलेली ऐतिहासिक देणगी आहे .कर्नाटक आणि केरळ मधल्या बस आणि डेपो जाऊन पाहा . एसटितील दोन विनोदी गोष्टी : १. गळकी बस दाखवा आणि हजार रुपयांचे बक्षिस मिळवा .२ .स्वातंत्र्यसैनिक ,नगरसेवक ,आमदार ,आणि खासदारांसाठी सुध्दा राखीव जागा .यातली नाहीतरी महामंडळाच्या समितीवरची जागा मिळवण्यासाठी किती धडपडत असतात बिचारे .
घरभेदी किंवा कुर्हाडीचा
घरभेदी किंवा कुर्हाडीचा दांडा गोतास काळ असला प्रकार असतो.
तोच प्रकार सध्या एसटी महामंडळाला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या रूपाने लाभला आहे.
एसटी ला कितीतरी करांच्या रूपात आपल्या दयाळू शासनाने जखडून ठेवलेले आहे. आज जी एसटी चालू आहे ना ती केवळ कर्मचार्यांच्या मेहेनतीवर चालू आहे. शासनाचा वाटा त्यात शून्य आहे.
शासनाच्याच व पुढार्यांच्याच काही लोकांनी (आता शासन शासन हे म्हणजे जनता, हवा, देव, ईश्वर आदींसारखे न दिसणारी जमात आहे.) एसटी च्या नाकात दम आणलेला आहे कारण त्यांच्या स्व:तच्या खाजगी वाहतूक कंपन्या आहेत. दक्षिण भारतातील महामंडळाच्या सारख्या सुविधा किमानपक्षी आधार जरी शासनाने दिला तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोणीही मागे टाकू शकत नाही हे सत्य आहे.
वाट पाहीन पण एसटीनेच जाईन!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
खरे आहे.
आज जी एसटी चालू आहे ना ती केवळ कर्मचार्यांच्या मेहेनतीवर चालू आहे. शासनाचा वाटा त्यात शून्य आहे.
१०० % खरे आहे.
मस्त प्रतिसाद
मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in
निळ्या रंगाची जुनी बस
एसटीच्या आताच्या सर्व साध्या गाडया तांबडया असतात पण मला आठवते त्यानुसार एसटी १९४९-५०च्या सुमारास सुरू झाली तेव्हा आणि नंतरहि काही वर्षे - किती ते आठवत नाही पण वीसेक वर्षे तरी असेल - एसटी गाडया निळ्या रंगाच्या आणि त्यावर पिवळा पट्टा असलेल्या असत. हा वळणदार पट्टा डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्यात सुरू होऊन उजव्या बाजूच्या खालच्या कोपर्यात संपत असे आणि त्यावर मध्यभागी एसटीचा लोगो असे. बराच प्रयत्न करूनहि मला अशा जुन्या गाडीचे चित्र मिळाले नाही. कोणास अशी गाडी आठवते काय?
इतक्या आधी रंगीत फोटोग्राफी
इतक्या आधी रंगीत फोटोग्राफी करून ते फोटो अजून जपून ठेवणारे कोणी असण्याची शक्यता अत्यंत धुसर वाटते. एखाद्याकडे तसा क्यामेरा + आवड असेल तरी तत्कालीन फोटोग्राफीवरील खर्च जमेस धरता आपल्या रोलमधील एक फोटो एस्टीचा काढण्याची शक्यता अजूनच कमी.. आणि असेलही तर त्या वयातील व्यक्तींचा आंतरजालाशी संबंध येऊन तो फोटो जालावर चढवणे अगदीच दुरापास्त
तेव्हा जालावर शोधण्यापेक्षा एखाद्या तत्कालिन माहितगाराकडे चौकशी करणे अधिक सोपे पडावे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!