व्हेइकल
एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.
तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा. जवळून जाणारा एखादा भरकटलेला जीव हळूच पटकन कोशाबाहेर येऊन मटकावण्याचा पराक्रमी जिवंतपणा.
दोनच आदिम अवस्था, लाखो वर्षे चालत आलेल्या, दुसऱ्या लहान अशक्त जीवाला पाहून भूक लागणे किंवा मोठ्या बुलीइंग जीवाला पाहून घाबरून जाणे. या दोनच शाश्वत अवस्था, बाकी उत्क्रांती, बुद्धी वगैरे सब झूठ.. जगाचं गाडं चालू या दोन चाकांवरच.
बाकी सगळा हवेतला पसारा, सगळे रंग, सगळा नाद सगळे आकार अत्यंत मायावी, अशाश्वत, पोकळ... आणि केव्हातरी आयुष्यात एकदा तिसरी तडफड.... मैथुन. संपला कोट्यावधी जीवांचा सारांश.. आहार भय आणि मैथुन..
निसर्गाने घालून दिलेल्या तीन रेषा.. तीन मर्यादा... अब्जावधी वर्षे लागली एका पेशीपासून माणूस बनायला पण तीन रेषा अजूनही त्याच आहेत. या अब्जावधी वर्षात कोट्यावधी जमाती जन्मल्या आणि मेल्या, या तीन बिदुंच्या आजूबाजूने रंगांचे, आकारांचे आणि आवाजांचे खेळ करत.
आपण काय वेगळे आहोत? मासे रंग रचतात, किडे आवाज काढतात, प्राणी आकार फुगवतात तसेच आपण..
टीचभर आयुष्यात काहीही केलं, अगदी काहीही, एकट्याने अथवा समूहात, तरी मूळ प्रेरणा तीनच. सुटका नाही..
मारे बडेजाव कराल तत्वज्ञानाचा, कलेचा... या तीन ठसठसणार्या अंधार्या बिदुंपासून कसे सुटाल, तुमच्या आतच आहेत ते, आणि तुमचा घास घेत आहेत आणि पुढे सरकत आहेत, तुमच्याच पेशींमधून निघालेल्या पुढच्या पेशीसमुहाकडे सतत ठामपणे..
तुमचं एक व्हेइकल केलं आहे निसर्गाने, काळाच्या अनंत रेषेवर सरपटायला वापरण्यासाठी. तुम्ही मोडून पडाल, मग पुढचं व्हेइकल, मग त्या पुढचं.. मागील पानावरून पुढे चालू, अनंत वर्षे, व्हेइकलला महत्व नाहीच, काळाच्या रेषेवर पुढे सरकण्याला महत्व...
इतकं नागडं निर्घृण सत्य समजल्यावरही रंग, आकार, आवाज, गोंगाट चालूच, काळाच्या अनंत रेषेवर कोण जास्त वाजतगाजत जातो याचीच किळसवाणी मिरवणूक सतत चालू....
प्रतिक्रिया
लिहिलंय छान पण पटलं नाही या
लिहिलंय छान पण पटलं नाही
कशाला सुटायचंय? एकूणच जीवनाच्या प्रगतीसाठी हे बिंदु आवश्यक आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत वगैरे वगैरे..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असहमत
फार ढोबळ मुद्दे आहेत. प्राण्यांमध्ये जी सौंदर्यनिर्मिती होते तिचा त्यांच्या जीवनाशी संबंध लावता येतो (मोराचा पिसारा लांडोरीसाठी वगैरे) पण माणसामध्ये असं प्रत्येक बाबतीत दिसत नाही. पुरावा (उदाहरणार्थ) :
लिओनार्डो मरेपर्यंत ते चित्र त्याच्यापाशी होतं. म्हणजे आहार मिळवण्यासाठी ते विकलं गेलं नाही.
त्याचा भयाशी काही संबंध (मला तरी) लावता येत नाही.
आणि मैथुनाचं म्हणावं तर चित्रविषयामध्ये किंवा एकंदरीत स्त्रियांमध्ये लिओनार्डोला लैंगिक रस होता ह्याचा पुरावा नाही. लिओनार्डोच्या पश्चात सालाई नावाच्या ज्या विद्यार्थ्याकडे मोनालिसाचा ताबा गेला, त्यानं मोनालिसावरून प्रेरित होऊन काढलेल्या ह्या चित्रामागे मैथुनाची प्रेरणा असू शकेल, पण त्यामुळेच दोन चित्रांतला फरक स्पष्ट व्हावा -
एकुणात असं म्हणता येईल की माणसाच्या प्रेरणा प्राण्यांपासून काही बाबतींत तरी वेगळ्या असतात असं त्याच्या कलानिर्मितीद्वारे अनेकदा दिसून येतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
व्हेहिकल हे रूपक आवडलं...
लिहिण्याची शैलीही आवडली. हॉटेलातल्या एका खोलीत ही विचारधारा सुरू होते तीपासून पुढे काही घटना येतील असा संशय आला होता. मात्र लेख अचानक संपला तेव्हा या विचारधारेचं चित्रण एवढाच हेतू आहे हे लक्षात आलं.
मात्र आहार भय मैथुन ही उतरंड तितकी बरोबर वाटली नाही. अस्तित्वाच्या साखळीच्या सर्व कड्या पुनरुत्पादनाने बनलेल्या आहेत. तेच फक्त महत्त्वाचं, बाकी सगळं दुय्यम. रिचर्ड डॉकिन्सने त्याच्या सेल्फिश जीन पुस्तकातही शरीरांना व्हेहिकल म्हटलेलं आहे. आदिम काळी तयार झालेले स्वजनक उत्क्रांत होत गेले. त्यांनी हळूहळू पेशीकवचाची कातडी पांघरायला सुरूवात झाली. मग या पेशींचे समूह एकत्रित जगायला लागले. त्यांचे उपसमूह हळूहळू एकत्रच, पण स्पेशलाइज्ड कामं करायला लागले. त्यालाच आपण शरीरं म्हणतो. ही शरीरं जसजशी क्लिष्ट झाली तसतशी पुनरुत्पादन प्रक्रियाही क्लिष्ट व्हायला लागली. पण पुनरुत्पादन सुटलं नाही - कारण ही जन्म मरणाची साखळी तोडायची तर ती आख्ख्या प्रजातीच्या मृत्यूनेच तुटते. त्यामुळे पुनरुत्पादन नाही, तर जीवन नाही. या भोज्ज्याला हात लावण्यासाठी त्या काळपर्यंत जगणं आलं. खाणं आलं, स्वतः न खाल्लं जाणं आलं. भूक आणि भीती ही त्यातून आली.