निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठीचे नियोजन
पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या लोणावळे या हिलस्टेशनात माझी एक बहीण व तिचे पती यांनी एक छोटेखानी घर वीकएन्ड घालवण्यासाठी म्हणून नवीनच बांधून घेतले आहे. मध्यम वयातील या जोडप्याच्या या नवीन घराला मी मागच्या आठवड्यात भेट दिली होती व दुपारचे जेवण त्यांच्या सोबतीने घेण्याचा योगही मला आला होता. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत, अगदी गरमागरम मराठी जेवणाचा आस्वाद घेत दुपारचे काही तास मोठ्या सुखद आणि आरामदायी वातावरणात मला घालवता आले होते. सह्याद्री पर्वताच्या हिरव्यागार कुशीत दडलेले लोणावळे हे गाव मोठे छान आहे. मी येथे खूप वेळा आलेलो असलो तरी येथे जाणवणारी निसर्गाची जवळीक आणि मस्त हवा यामुळे लोणावळ्याचे आकर्षण मला नेहमीच वाटत आलेले आहे. अर्थात लोणावळ्याचे खरे सौंदर्य अनुभवायचे असले तर येथे पावसाळ्यात यावयास पाहिजे. भणाणणारा थंड वारा अंगावर झेलत आणि आसमंताला एखाद्या रजई सारखे लपेटून घेणार्या व दोन पावलांवरचेही काही दिसू न देणार्या दाट धुक्यातून मार्ग काढत,जेंव्हा येथे आपण पावसाळ्यात भ्रमंती करतो तेंव्हा दिसणारे लोणावळा अगदी निराळेच भासते असे नेहमीच मला वाटत राहिलेले आहे. मात्र मागच्या आठवड्यातील हवा त्या मानाने बरीच कोरडी व गरम असली तरी सुखद मात्र होती.
माझी बहीण आणि तिचे पती हे आपापल्या नोकरी व्यवसायात अजूनही पूर्णपणे कार्यरत आहेत आणि त्यामुळे आठवडाभर कामात व्यग्र असतात. परंतु त्यांच्या घरातील चित्र मात्र एकदम भिन्न आहे. त्यांची मुले आता मोठी झाल्याने लग्न होऊन बाहेर पडली आहेत व स्वत:च्या संसारात गुंग आहेत. त्यामुळे हे दोघे कामावरून घरी आले की सध्याच्या त्यांच्या वयाच्या अनेक मध्यमवर्गीय जोडप्यांप्रमाणे त्यांनाही समोरचे रिकामे घर अगदी अंगावर आल्यासारखे होते. पारंपारिक भारतीय कुटुंबांमध्ये ही परिस्थिती सहसा येत नसे. मुले, सुना, नातवंडे हे सगळे आजी आजोबांसकट एकाच छताखाली रहात. आजी आजोबांना त्यामुळे निदान नातवंडांचा सहवास तरी सतत लाभत असे. आता निदान शहरी समाजात तरी विभक्तीकरणाच्या प्रक्रियेने चांगलेच मूळ धरलेले असल्याने अशी पारंपारिक कुटुंबे फार कमी प्रमाणात दिसतात व विभक्त कुटुंबांचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे. समाज व्यवस्थेतील या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
बहीण आणि तिचे पती यांच्याबरोबर गप्पागोष्टी करत असताना आमच्या गप्पांचा रोख मुले दुसरीकडे राहण्यास गेल्याने, अंगावर येणारे रिकामे घर आणि त्याला जेष्ठ वयातील आई-वडीलांनी कसे तोंड द्यावयाचे? या विषयाकडे साहजिकपणे वळला. आजकाल निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा ज्येष्ठ जोडप्यांसमोर त्यामुळे पुढे निवृत्तीनंतर येणार्या काळात आपल्या रिकाम्या वेळेचे नियोजन कसे करायचे? हा एक मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो आहे. पारंपारिक कुटुंब पद्धतीत हा प्रश्न सहसा येत नसे कारण आजी-आजोबांनी घरातील मुलांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असे. परंतु समाज रचनेतील नव्या बदलांमुळे हा प्रश्न एका मोठे स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभा राहिलेला आहे यात मला तरी शंका वाटत नाही. त्या दिवशी मी बहिणीकडचा माझा मुक्काम आटोपून घराकडे परत निघाल्यावरही माझ्या डोक्यात याच विषयासंबंधीचे विचार घोळत राहिले होते.
माझी बहीण व तिचे पती यांच्यासारखी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेली बहुतेक, निदान मध्यमवर्गीय जोडपी तरी, अलीकडे निवृत्तीनंतरच्या काळाचे आर्थिक नियोजन बर्याच आधीपासून करून ठेवताना दिसतात. यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्यासमोर मोठी आर्थिक अडचण सहसा उभी रहात नाही. आधी केलेल्या गुंतवणूकीमुळे त्यांना स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळत राहते व त्यामुळे निवृत्तीच्या आधी असलेली त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता त्यांना पुढेही राखता येणे शक्य होते. बहुतेक सर्वांनी आजारपणांसाठी विम्याच्या पॉलिसी घेतलेल्या असल्याने आजारपणाचा अतिरिक्त खर्च ते सहजपणे निभावून नेऊ शकतात. त्यामुळे निवृत्तीनंतर चांगली गुणवत्ता असलेले आयुष्य कसे घालवायचे? हा प्रश्नच मुळी त्यांच्यासमोर नसतो.
मग आजच्या या निवृत्तीच्या उंबरठ्यावर किंवा निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसमोरचा मुख्य प्रश्न आहे तरी काय? हा प्रश्न थोडक्यात व अगदी सरळ सोप्या शब्दात असा सांगता येईल की या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर काय करायचे? वेळ कसा घालवायचा? हेच समजत नाही. यापैकी जे ज्येष्ठ नोकरी पेशातील आहेत त्यांना निवृत्त झाल्याक्षणी समाजातील आपले स्थान किंवा श्रेणी अचानक कोणीतरी काढून घेतली आहे व आपण दुय्यम नागरिक म्हणून समजले जाऊ लागलो आहोत असे वाटू लागते. जर या होणार्या बदलाची आधीपासून तयारी केलेली नसली तर बहुतेक लोक या बदलाला योग्य रितीने सामोरे जाण्यास अपयशी ठरतात. आयुष्यामध्ये होणार्या या बदलासाठी तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचे असा प्रश्न काहींना पडतो. उदाहरण द्यायचे तर माझ्या एका स्नेह्यांचे देता येईल. बॅन्केत अधिकारी असलेल्या या माझ्या स्नेह्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांना प्रथमपासूनच ट्रेकिंग किंवा भटकंतीची मनस्वी आवड होती परंतु बॅन्केत कार्यरत असताना त्यांना ही आवड पूर्ण करणे कधीच शक्य झाले नव्हते. आता निवृत्तीनंतर त्यांनी भटकंतीचा छंदच स्वत:ला लावून घेतला आहे आणि हवा चांगली असेल तेंव्हा व शक्य असेल तेवढा वेळ ते हिमालयात घालवत असतात. निवृत्त होणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर पुढे आलेला प्रश्न जास्तच बिकट वाटतो. घरात माणसे दोनच उरल्याने घरात फारसे कामच नसते आणि वेळ कसा घालवायचा? हा एक मोठाच प्रश्न तिच्या समोर उभा राहतो.
माझ्या परिचयातील 70 ते 80 या वयोगटामधील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक वैशिष्ट्य नेहमी मला जाणवते. या सर्व व्यक्ती अत्यंत कार्यरत असतात. संपूर्ण दिवस ते कोणत्या ना कोणत्या कामात गुंग असतात. माझ्या मताने, निवृत्तीनंतर सुखी आणि समाधानी आयुष्य घालवण्याची ही गुरूकिल्लीच आहे असे समजले तरी चालण्यासारखे आहे. पण आता मला काय कार्य करता येईल? हा विचार निवृत्त झाल्यावर एखाद्या व्यक्तीने करण्याचे ठरवले तर योग्य असे काम त्या व्यक्तीला सुलभतेने मिळणे शक्य नसते. आपण निवृत्तीनंतर काय करणार? याचा विचार निवृत्तीच्या बर्याच आधीपासून, म्हणजे निवृत्तीचे विचार मनात प्रथम घोळू लागल्याच्या दिवसापासून करणे गरजेचे असते.
मी माझे स्वत:चे उदाहरण येथे देऊ शकतो. निवृत्तीचे विचार माझ्या मनात येऊ लागल्यानंतर मला पुढे ज्यावेळी खूप रिकामा वेळ असणार आहे तेंव्हा करता येण्यासारख्या माझ्या आवडीच्या गोष्टी किंवा ज्या करणे आतापर्यंत कधीच जमले नाही परंतु करण्याची प्रचंड इच्छा आहे अशा गोष्टी, यांची एक यादीच मी बनवली होती. यापैकी काही गोष्टी करणे मला शक्य झाले नाही. फ्रेट वर्क किंवा आकाशज्योती निरिक्षण या सारखे काही छंद मला बरीच वर्षे करता आले पण मग पुढे सोडून द्यावे लागले. लेखनाचा छंद मात्र अजूनही टिकला आहे व मला कल्पनेच्या बाहेर आनंद देतो आहे. वाचक वाचत असलेले प्रस्तुतचे हे लेखन माझ्या या छंदातूनच निर्माण झालेले आहे. लेखनाचा हा छंद मला कार्यरत तर ठेवतोच पण माझे मनही अतिशय सतर्क ठेवतो.
निवृत्त झालेल्या व त्यानंतर वर्षानुवर्षे आपले छंद किंवा कार्ये सतत चालू ठेवणार्या लोकांची अनेक उदाहरणे मला तुम्हाला देता येतील. माझ्या नात्यातील एका वरिष्ठ नोकरशहांनी निवृत्त झाल्यानंतर लोककल्याणाचे काम करणारा एक ट्रस्ट चालवण्याचे काम अंगावर घेतले तर माझ्या नात्यातीलच एक महिला, आधीच्या आयुष्यात कधीही आपले हात मातीत घातलेले नसतानाही आता बागकामात आपला दिवसाचा बराचसा वेळ घालवत असतात. अनेक महिला गीता, ज्ञानेश्वरी यासारख्या धार्मिक ग्रंथावर चर्चा करण्यासाठी चर्चामंडळे स्थापन करून त्यात चर्चा करताना दिसतात.
निवृत्त झाल्यानंतर केलीच पाहिजे अशी एक गोष्ट म्हणजे हास्य क्लब किंवा मित्रांसमवेत दिवसाचा काही काळ घालवणे यासारख्या ग्रूप अॅक्टिव्हिटीज. एखाद्या चहा किंवा कॉफीच्या कपासोबत मित्रांशी गप्पा मारणे हेही यातच मोडते. अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटीमधून ज्येष्ठांना जो आनंद मिळतो किंवा जीवन जगण्यासाठी जो उत्साह मिळतो त्याचे वर्णन करणे सुद्धा शक्य नाही. मी अशा प्रकारची ग्रूप अॅक्टिव्हिटी प्रत्येक जेष्ठाने करणे अत्यावश्यक आहे असे मानतो आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येकाने ही अॅक्टिव्हिटी कशी सुरू करता येईल हे बघितलेच पाहिजे.
माझी खात्री आहे की निवृत्तीच्या पुरेशा आधीपासून योग्य नियोजन केलेली निवृत्तीची वर्षे ही प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाल बनू शकतात.
1 जानेवारी 2014
प्रतिक्रिया
प्रकटन आवडले! गुंतवून घेतायत
प्रकटन आवडले! गुंतवून घेतायत त्याबद्दल कौतूकही वाटले!
माझ्या घरी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर काय करायचे हा प्रश्न कोणाला पडलेला बघितलेला नाही. पण आजुबाजूला/परिचितांपैकी काहिंना यातून जाताना जवळून बघितले आहे
वृद्धापकाळी/निवृत्तीनंतर काय करायचे हा प्रश्न मी पुरूषांपेक्षा स्त्रीयांना पडताना पाहिला आहे.
त्यातही संसाराच्या धबडग्यात स्वतःच्या घराबाहेर डोकावायला (कश्शी बै) उसंतच न मिळालेल्या (वा अशी स्वतःची समजूत करून घ्यायची आवड/सवय/प्रकृती असणार्या) स्त्रीयांना तर खूपच!
त्यात सामाजिक बंधनांच्या पूर्वीच्या कल्पना जोपासणार्या स्त्रियांच्या तर अनेक आवडी त्या क्ल्पनाच दाबून टाकतात तेव्हा तर एकटेपण कंटाळवाणे/प्रसंगी भयावह होते.
बाकी मुले उडून गेल्यानंतच्या मानसिक अवस्थेचा अतिरेक झाला की 'एम्टी नेस्ट सिंड्रोम' ला सामोरे जावे लागू शकते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>वृद्धापकाळी/निवृत्तीनंतर
>>वृद्धापकाळी/निवृत्तीनंतर काय करायचे हा प्रश्न मी पुरूषांपेक्षा स्त्रीयांना पडताना पाहिला आहे.<<
माझ्या वाचनात व पहाण्यात हा प्रश्न पुरुषांना अधिक पडतो. स्त्रिया घरकाम,वीणकाम भरतकाम, भजनीमंडळ, सण,कौटुंबिक सोहळे यात स्वत:ला गुंतवून घेतात.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१
असेच
>>स्त्रिया घरकाम,वीणकाम
>>स्त्रिया घरकाम,वीणकाम भरतकाम, भजनीमंडळ, सण,कौटुंबिक सोहळे यात स्वत:ला गुंतवून घेतात.
असेलही. हा केवळ आजुबाजुच्या बायकांकडे बघुन केलेला अंदाज आहे. मात्र एकूणच धार्मिक / सामाजिक बंधनांच्या कल्पनेमुळे महिलांना निवृत्तीनंतरही पुरूषांपेक्षा अधिक बंधने असतात अर्थात ऑप्शन्स बरेच कमी असतात. काही उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर आहेत त्यांनाच प्रातिनिधिक मानण्याची चुक असुही शकेल.
माझ्या घरी गेल्या दोन पिढ्या सगळ्याच बायका आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असल्याने आपल्या आवडी, छंद जोपासु शकल्या आहेत. निवृत्ती नंतर त्या पूर्वीपेक्षा अधिक 'बिज्जी' असतात.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान लेख.
छान लेख.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पोच
लेख छान.
लेखनाचा छंद मात्र अजूनही टिकला आहे व मला कल्पनेच्या बाहेर आनंद देतो आहे
हे आवडलं.
.
.
बाकी नक्की कसं सांगावं समजत नाही; पण हळूहळू विशिष्ट वयोगटाचा अघोषित असा एक ग्रुप्/क्लब बनत चालल्याचे दिसते आसपास.
ह्यात आश्चर्य असे काहिच नाही. बरोबरीच्या लोकांत चार सारख्या गोश्टी घडलेल्या-पाहिलेल्या असणार.
त्या शेअर करणे वगैरे ठीक . पण तो दिन्चर्येचा एक भाग म्हणून ठीक.
मला क्रॉस्-ग्रुप्स खूप फायदेशीर ठरतील असं वाटतं.
ज्येश्ठांशी मैत्रीपूर्ण गप्पा हाणता आल्या तर ज्येश्ठांना तरुणांकडून व बालकांकडूनही खूप काही मिळेल.
उलटही होइल.
हे नक्की कसं , काय करायचं ते सांगता येत नाहिये,; पण मनःस्थिती बॅलन्सड रहावी म्हणून विविध वयोगटातील लोकांशी आपली ऊठबस असलेली बरी.
उदा:-
एखादे आजोबा "गोष्टीवाले आजोबा" म्हणून बिल्दिंगमध्ये चिल्ल्या पिल्ल्यांत पॉप्युलर झाले तर फार बरे होइल.
त्यांना पोरांशी गप्पा हाणता येतील. पोरांना पांढर्या केसांच्या दोस्ताकडून मनोरंजन (व नकळत अनुभव शेअरिंग ) मिळेल.
अर्थात, ही युटोपिअन कल्पना असणे शक्य आहे.
.
.
अवांतर :-
नक्की काय जाणवतं हे माहित नाही, पन च्म्द्रशेखर व अशोक पातिल ह्यांचे लेख्-प्रतिसाद वाचताना ते पोक्त , सिनिअर माणसानं लिहिलेत हे लगेच जाणवतं.
नक्की प्रतिसादातील भाषेमुळे तसं वाटतं की प्रतिसादांतील विचांरांमुळे ह्याचा विचार केला.
एक लक्षात आलं फक्त प्रतिसादातील घटना, स्थल- कालोल्लेख , विचार हे एकच कारण नाही.
.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत आहे
मी तुमचया सन्कल्पनेशि सहमत आहे. माझी एक माझ्या आई च्या वयाची मैत्रिण आहे. आमची मैत्री आम्हाला दोघान्ना आन्नद देते .
मैत्री
निवृत्तीनंतर फक्त ज्येष्ठ वयोगटातील मंडळींचेच गट जर नियमित रितीने भेटत राहिले तर त्यात व्याधी, राजकारण, तरुणांवर टीका आणि आर्थिक अडचणी हे विषय सोडून बाकी विषयांना कधी फारसे तोंड फुटत नाही. म्हणूनच तुमच्या सोशल ग्रूपमध्ये सर्व वयाची मंडळी असणे जास्त श्रेयस्कर ठरते.
छान लेखन. निवृत्तीनंतर
छान लेखन. निवृत्तीनंतर तुमच्यात शारिरिक व मानसिक बदल होत असतात. तुम्हाला आत्मपरिक्षणाला भरपूर वेळ मिळतो.तुमच्यातील उर्जा राखणे हे एक कसरतीचे काम असते. तुम्ही नियोजन केल्या प्रमाणे सगळ्या गोष्टी घडतीलच असे नाही. दात आहेत तर चणे नाहीत व चणे आहेत तर दात नाही या म्हणीची प्रचिती येते. तुम्ही कार्यरत असताना अधिकाराच्या माजातुन म्हणा वा यशस्वीतेच्या माजातुन म्हणा ज्या लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुखावलेले असत्त त्यांच्याशी तुम्ही सुसंवाद साधायचा प्रयत्न करायला लागता.कोण कधी उपयोगाला येईल काय सांगता येईल का? असा व्यावहारिक विचार तुम्ही करायला लागता. अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडायला लागतात....
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लेखही आवडला व हा प्रतिसादही.
लेखही आवडला व हा प्रतिसादही.
नंतरच्या आयुष्याचे 'नियोजन'
माफ करा सर, टायटल व लेख जरा मिसमॅच वाटला.
निवृत्त झाल्यानंतर तुम्ही फायनान्शियली सेक्युअर आहात. मुले बाळे सुस्थितीत आहेत व गरज पडल्यास तुमची काळजी घेण्यास धावून येतील, या बाबी अध्यहृत असतानाच्या परिस्थितीचे, बेसिकली मोकळा वेळ फार आहे मग आता काय करू या स्टाईल चिंतन दिसले.
अर्थात, फायनान्शिअल सिक्युरिटीची तरतूद लोक आधीच करून ठेवतात हे एकच वाक्य टाकून सगळे गुंडाळले गेले आहेच पण तरीही, क्लिक करताना वेगळी कन्सेप्ट डोक्यात होती.
टायटल वाचून म्हातारपणी 'सेक्युअर' रहाण्यासाठी काय करावे लागेल या दृष्टीने नियोजन कसे करावे, याबद्दल अनुभवकथन असेल असे वाटले होते.
इन्शुरन्स व पेन्शन प्ल्यान विकणारी मंडळी तुम्हाला 'आजची लाइफस्टाईल' अमुक वर्षांनी मेंटेन करायचिये ना? मग आत्ता आम्हाला इतके पैसे द्या इत्यादी पुश करीत असतात. हे फसवे आहे, हे वय वाढल्याशिवाय कळत नाही.
चने होते है तब दात नही होते हे दात असताना समजत नाही, अन आपण आपले चने त्या 'इन्व्हेस्ट्मेंट काऊन्सेलर्स'नी सांगितलेल्या स्कीमांत फेकत रहातो. उदा. आजकाल अक्खी कोंबडी खायची माझी हिम्मत नाही. १०-१५ वर्षांपूर्वी १ कोंबडी भाजून खाणे हे चखण्यापुरते ठीक अशी कन्सेप्ट होती. दीड पेग वर प्याली जात नाही. तेही कधीमधी. ही जस्ट उदाहरणे झालीत.
आता मेन खर्च वैद्यकीय असतो.
कार, घराचे हप्ते संपलेले असतात.
अमुक पोस्ट आहे म्हणून तमुक प्रकारचे फॉर्मल कपडे तेहि ब्र्यांडेड घातलेच पाहिजेत हे कंपल्शन संपलेले असते. खादीचा झब्बा पायजमा पुरतो.
सो, म्हातारपणी आजची लाईफस्टाईल ठेवावी लागणारच नसते. जे त्या काळात लागते, वा लागेल, बेसिकली मेडिकल केअर. हाउसहोल्ड हेल्प, जोडीदारापासून वेगळे होण्याची वेळ आल्यास सहन कराव्या लागणार्या बाबी, शारिरिक व मानसिक.. इ. बाबींचे चिंतन इथे सापडेल असे वाटले होते..
थोडी निराशा झाली.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
असेच म्हणतो
असेच. लेख उघडताना वेगळ्याच अपेक्षा होत्या.
निराशा
आर्थिक बाबी व आरोग्य या साठीचे नियोजन हा प्रस्तुत लेखाचा विषयच नसल्याने त्या बाबींचा फक्त उल्लेख मी येथे केला होता. जेंव्हा एखाद्या अपेक्षेने आपण लेख वाचायला घेतो आणि त्याबद्दल लेखात काहीच सांगितलेले नाही हे लक्षात आल्यावर निराशा होणे स्वाभाविक वाटते त्यामुळे आपला प्रतिसाद योग्यच आहे. आर्थिक व आरोग्य नियोजन या बद्दल मी माझ्या ब्लॉगवर इतरत्र लिहिलेले आहे. ते आपण वाचू शकता. मात्र प्रस्तुत लेखाचा तो विषय नव्हता.
तेच म्हणते.
लोणावळ्यात दुसरे घर घेणारे म्हणजे आर्थिक दृष्ट्या मजबूतच असणार. त्यांनाच असे वेळ जात नाही काय करावे वगिअरे प्रश्न पडत असतील. इनकम कमवायची शक्ती अॅबिलि टी संपली वय झाले तरीही घर चालवायचे आहे. बिले भरायची आहेत. आजारप णात स्वतःची काळजी घ्यायची आहे असे प्रश्न असतील तर त्यांची काही उत्तरे असतील म्हणून उघडले. पुण्यामुंबईकडे लेखात दिलेली अथःश्री टाइप लाइफ स्टाईल जगणारे खूप आहेत. आडकित्ता यांच्या पोस्टीतील शेव्टचे वाक्य पटले माझीही तशीच अपेक्षा काहीशी होती. निराशा झाली. रेग्युलर इनकम असेल तर छंद जोपासायला काय प्रॉब्लेम ते तर मी आत्ताही करायला तयार आहे.
विशाखा
नियोजन आणि प्रत्यक्ष अनुभव
मी एक सेवानिवृत्त आहे आणि नोकरीत असतांना कामाचे नियोजन करणे हेच माझे मुख्य काम असल्यामुळे त्याचा पुरेपूर अनुभव आहे.
पहिली गोष्ट म्हणजे 'मॅन प्रपोजेस अॅण्ड गॉड डिस्पोजेस' या म्हणीचा सर्वात मोठा दणका निवृत्तीनंतर बसतो. तरुण वयात ज्या गोष्टी कराव्या असे वाटले होते पण करणे राहून गेले होते ते सगळे निवृत्तीनंतर करू शकू असे गृहीत धरून त्याचे नियोजन केले जाते, पण हा मोठा गैरसमज असतो हे कळायला लागल्यावर ते सगळे वाया जाते. यातली मुख्य अडचण ही असते की मधल्या काळात आपली शारीरिक क्षमता किती कमी झालेली आहे याची कधी जाणीवच झालेली नसते. .
दुसरी गोष्ट जी माझ्या बाबतीत घडणे अपरिहार्य होती, निवृत्तीनंतर निवासस्थान बदलले. जुने साथी विखुरले गेले आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणे दिवसेदिवस अवघड होत गेले. साठी उलटून गेल्यानंतर नव्या वातावरणातल्या लोकांशी दोस्तीचे नवे धागे जुळवायचे ठरवले तरी फार कठीण असते. यामुळे ज्यात इतरांची साथ घ्यावी लागणार नाही असेच काहीतरी करणे आवश्यक होऊन बसते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करता येते आणि बहुतेक लोक ते उत्तम प्रकारे करतात, ती विवंचना रहात नाही, पण काय करायचे हे आधी ठरवल्या प्रकारे करता येईलच असे म्हणता येणार नाही.
मला असे खात्रीपूर्वक सांगता येईल की बालपणी जे मला शिकवले गेले होते तेच उतारवयात चांगले उपयोगी पडले.
१. सतत काही तरी शिकत रहावे. त्याचा काय उपयोग आहे याचा जास्त विचार करायची गरज नाही. शिकल्यानंतर त्याचा कसा उपयोग करता येईल असा विचार केल्यास कदाचित काही सुचेल, कदाचित सुचणारही नाही, तरी काही हरकत नाही कारण शिकत असतांनाच जो आनंद मिळाला असतो तो आपला लाभच असतो. काय शिकावे याबद्दल प्रत्येकाची आवड, क्षमता, उपलब्धता हे पाहून ज्याचे त्याला ठरवता येईल
२. आपल्याला जे काही थोडे फार काम करणे शक्य असेल आणि ते कोणाला त्रासदायक नसेल तर ते काम लगेच करून टाकावे. हे काम मीच का म्हणून करावे असा प्रश्न मनात आणू नये.
३. आपण जे काही थोडे फार काम करायला घेतले असेल ते मन लावून करावे, ते आपल्याकडून जितके चांगले होणे शक्य असेल तितक्या चांगल्या प्रकाराने ते करायचा प्रयत्न करावा.
एका वाक्यात सांगायचे झाल्यास काही नवीन गोष्ट शिकणे आणि काही काम करणे यात आनंद मिळवता यावा. अशी तयारी ठेवली असेल तर सेवानिवृत्तीनंतरचा काळ मजेत जायला हरकत नाही.
मूलाला किती संपत्ती द्यावी?
इथे हा प्रश्न अवांतर आहे पण मी ६० वर्षाचा असताना माझा मुलगा ३२-३३ वर्षांचा असेल. माझ्या ५२-५३ ते ६०-६२ वय वर्षाच्या काळात मुलाच्या शिक्षणावर, लग्नावर, त्याचे नवे घर, प्रवास, फर्निचर, कार, जीवनशैली यांच्यावर खर्च करण्यासाठी पैसे लागतील. तो नुकताच नोकरीत असल्याने त्याला गब्बर पैसे मिळायची शक्यता कमी. तेव्हा आपले पैसे (ग्रॅच्यूइटी, पी एफ, गूंतवणूक, घर विकणे आणि थोडे स्वस्तातले घर घेणे किंवा अधिकचे घर विकणे, इ इ मधून मिळणारे) त्याच्यावर खर्च करावेत कि नाही. केले तर आपल्या जीवनावर परिणाम. नाही केले तर ...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उधारी आणि पत
मी ज्या काळात ३०-३२ वर्षाचा होतो तेंव्हा नेहमीचा वाणी सोडला तर इतर कोणीही मला उधारीवर काही देत नसे. घरातली कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी आधी पैसे शिल्लक टाकून पुरेसे जमा झाल्यानंतर ती घेतली जात असे. शिवाय श्यामच्या आईचा प्रभाव मनावर असायचा. आजची ३०-३२ वर्षांची मुले धडाधड फ्लॅट्स आणि मोठ्या कार हप्त्यावर घेतांना दिसतात. हे चांगले का वाईट मला सांगता येणार नाही, पण नव्या पिढीचा हेवा मात्र वाटतो. आपण त्यांची काळजी करावी असे त्यांनाच वाटत नाही, मग कशाला करायची?
फ्लॅट
फ्लॅट्स सोडल्यास एक पै सुद्धा लोनवर घ्यायची नाही असा माझा प्रयत्न आहे/असतो.
आजवर तरी ठीक्ठाक चाललय.
बाकी सवय तुमच्यासारखीच :- आधी शिलकीत जमा करायचे मगच खर्च.
ह्यावरून स्नेहपूर्ण महायुद्धही झाले, पण श्ट्यांड बदलला नाही. आडमुठेपणाचा दोष्/शिक्का स्वीकारला.
.
.
.
अर्थात लोनवर घेणे वाईटच वगैरे असे म्हणणयचे धाडस करु शकत नाही. माझ्यापुरता आपला तो निर्णय आहे.
त्यातील एक लॉजिक हे आहे की ग्रुह कर्ज हे जवळपास सर्वात स्वस्त दराने उपलब्ध असलेले कर्ज असते.
तुम्ही घेता तेव्हा ते मोठ्या प्रमणावर घेतलेले असते.
एका अर्थाने तुमची पत ग्रुहित धरुन श्रीयुत मार्केट ह्यांच्याकडून कडून तुम्ही जितके पैसे माफक दराने उचलू शकता ते आधीच उचललेले असतात.
ह्याहून अधिक मागायचे म्हटले तर श्रीयुत मार्केट ह्या किम्वा त्या पद्धतीने ते अधिकचा चार्ज लावतील.
शिवाय अधिकची कर्जे / इ एम आय असल्यास आर्थिक शिस्त असणे नितांत गरजेचे आहे.
ती लावून घेता येत नसल्यास माझ्यासारख्याने इ एम आय वर वस्तू न घेणेच उत्तम.
.
.
वाण्याकडील वस्तूही रोख रकमेने घेतो.(निसर्ग*दयेने तितकी रक्कम मिळते.)
.
.
*देव शब्दाची इथे एलर्जी आहे. "निसर्ग" ह्या अम्ब्रेला खाली काहीही ढकलता येतं म्हणून वापरलं.
अक्षरशः निसर्गाला सजीवसदृश बुद्धी , इच्छा वगैरे असावी असे सुचवत प्रतिसाद इथे दिले तर चालतात.
पण चुकून "अरे देवा" म्हटलेत की येतीलच उत्क्रांती अन् सर्वव्यापक बिगब्यांगच्या आकलन अभावाचा आरोप करीत हे** लोक.
.
.
**"हे " म्हणजे कोण असे विचारल्यास उत्तर मिळणार नाही.फक्त "हे " म्हणजे आनंद घारे किंवा चंद्रशेखर नाहित.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
या बाबतीत माझे मत जरा वेगळे
या बाबतीत माझे मत जरा वेगळे आहे.
पर्सनल लोन तर अर्थात नकोच!
पण गॄहोपयोगी अनेक वस्तू ०% टक्के व्याजाने मिळतात, फक्त ५०० रू वगैरे सुरूवातीचे प्रोसेसिंग चार्जेस द्यावे लागतात. (सरकारने नुकतेच यावर काही निर्बंध आणले आहेत असे ऐकले.. त्यामुळे सध्याची परिस्थिती माहीत नाहि)
म्हणजेच एक रकमी ५०००० देऊन फ्रिज घेण्याऐवजी मी १० हप्यात तो ५०५०० ला घेते. एक रकमी ५०००० जमवण्यासाठी मला थांबावे लागत नाही (असले तरी मी देत नाही कारण कर्जाचा दर ०% त्याउलट ते पैसे माझ्या बचत खात्यात राहिल्यास मला उलटे जास्त व्याज मिळते)
पैसे योग्य वेळी योग्य ठिकाणी टाका आनि जास्तीत जास्त परतावा मिळवा या हिशोबाने मला हे पर्याय कितीतरी जास्त चांगले वाटतात शिवाय एकाच वेळी मोठे भगदाड न पडता घरात उपयोगी वस्तू येतात.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
मान्य
मुद्दा मान्य. बिन्शर्त, निर्विवाद मान्य.
भीती इ एम आय स्कीम बद्दल नसून त्याद्वारे सुप्त मानवी लोभ प्रमाणाबाहेर जागृत होणयची आहे.
"इ एम आय वर तर मिळतय घेउन टाका" असं लोकं म्हणतात. पण असे अनेक इ एम आय मागे लावून घेतले जाण्याची शक्यता आहे.
तीन हजार हा इ एम आय आणि पाच हजार चा इ एम आय ह्यात मानवी कन्झ्युमरी मेंदुला तत्काळ फरक दिसत नाही, दोन्ही लहानच दिसतात.
मग आधीच होम लोन असताना एक तीनचा व एक पाचचा अस घेतला जातो.
.
.
कसं आहे ना, की ह्याच्या उलट केससुद्धा दाखवता येइलच; जी मंडळी अचूक अर्थव्यवस्थापन करतात त्यांच्याबद्दलची.
आपलं स्वतःचं उदाहरण तसंच आहे.
मी पडलो बर्यापैकी बेशिस्त. त्यामुळे करु धजत नाही.
(किम्वा एक करता येतं, की तितकी कॅश खात्यात असतानाच वस्तू घ्यायची. म्हणजे घेताना इ एम आय वरच घ्यायची. पण स्वतःला सांगताना मी ही कॅश देत आहे असे सांगायचे.
त्याची एफ डी काढून मोकळे व्हायचे. ती रक्कम पुढील पाच्-सात महिने खात्यात दिसायला नको. म्हणजे पुडह्च्या महिन्यात तुम्ही अजून काही आवाक्याबाहेरचं घ्यायला उचकणार नाही.)
.
.
भीती क्यापिटालिझ्म व सोशालिझ्म दोन्हीचीही नसतेच हो. त्याआडून स्वार्थी मानवी मन अन्य्याय्य मार्गे इतरांवर कसं वरचढ होइल ह्याची असते.
ह्या केस मध्ये मानवी मन खूप सहजी उचकू शकतं अशी मला भीती आहे.
(हाताला लागतील अशा वस्तू समोर मांडलेल्या असतात आकर्षक रुपात. आपला पगार महिनाखेरिस जमा होणार ह्याबद्दल आपण आश्वस्त असतो.
त्या लक्झरी/कम्फर्टपुढे आपण साधे अंकगणितही विसरु शकतो ही ती भीती.)
योग्य गणित मांडलं तर पाच्-सात महिन्यांत त्या एकरकमी मुदलातून थोडेफार का असेना व्याज कमावू शकतो हे मान्यच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
फ्लॅट्स सोडल्यास एक पै सुद्धा
फ्लॅट्स सोडल्यास एक पै सुद्धा लोनवर घ्यायची नाही असा माझा प्रयत्न आहे/असतो.
हा विचार चांगला आहे. बराचसा सहमत आहे.
पण विरोधभक्ती केल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून लिहितो.
Debt/Loan performs an important function in life. It (to some extent) reduces agency($$$) costs of free cash flow(%%%). It disciplines you.
Think about it - Why was the concept of Leveraged Buyout born?
---
($$$) एजन्सी कॉस्ट्स ह्या म्यानेजमेंट ला (viz-a-viz shareholders) लागू पडतात. व्यक्तीस स्वतःच्या संपत्तीचे नियोजन्/विनिमय करताना लागू पडत नाहीत असा प्रतिवाद केला जाऊ शकतो. पण त्यास मी उत्तर देऊ शकतो.
(%%%) - Agency costs of free cash flows ______ Michael Jensen
disciplined
वरील प्रतिसादांत disciplined शब्द महत्वाचा आहे.
शिवाय किती टक्क्यानं लोन कोणत्या गोष्टीसआठी घेणं ठीक आहे ते कसं मोजावं हेच समजत नाही.
ह्या मर्यादेमुळे मग निर्णय बदलत राहतात.
(गृह कर्ज सर्वात स्वस्त. म्हणून ते घेतानाच मी थोडंसं मर्यादेपलीकडे, चड्डी बाहेरचं घेतो.)
हे ज्याक्षणी समजेल तेव्हा पुढील विचार सुरु करता येइल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला असं म्हणायचं आहे की -
मला असं म्हणायचं आहे की - Debt/Loan has the ability to discipline you and your actions. It builds equity for you. It forces you to ration your expenses/spending. व हे कर्जाच्या अनुपस्थितीत होत नाही. किंवा होत नाही म्हणण्यापेक्षा - तसे करण्याकडे आपला कल कमी होतो.
कर्जामुळे दिवाळखोरीची रिस्क वाढते हे सगळ्यांनाच माहीती आहे. पण कर्जामुळे व्यक्तीच्या खर्च करण्याच्या वृत्तीवर अंकुश बसतो.
सर्व कर्जांचे मिळून मासिक
सर्व कर्जांचे मिळून मासिक हप्ते < ३५ % ऑफ फॅमिली इन्कम
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गरज असल्यास किती मदत करायची?
पुण्यामुंबईत मध्यमवर्गातून मोठे झालेली मूले आणि तालूक्याच्या गावी मोठी झालेली मुले यात फरक आहे. पुण्यामुंबईत सक्सेस रेट १००% आहे. मूले यशस्वी होतातच असे जणू सूत्रच आहे. मी तरी कोणाचे अकल्याण झालेले पाहिले नाही. सगळे मोठेच होतात. फक्त झोपडपट्टीवाले आहेत तिथे राहतात वा रिप्लेस होतात.
तालुक्यात मात्र कितीतरी मुले (अधिकतम) अयशस्वी होतात. माझ्या दहावीच्या वर्गात ५५ मुले होती. पैकी ५ नोकरीक्षेत्रात पुढे गेली आणि ४-५ जणांनी आईवडीलांचे धंदे सांभाळले, पुढे नेले. मात्र बाकी ४०-४५ सडत आहेत. त्यांचे बाप त्यांच्यापेक्षा चांगले आयुष्य जगले. (अतिरेक म्हणजे काहींच्या बापांना घरी बसून नोकरीचे आमंत्रण आले आणि त्यांना मात्र दर दर कि ठोकरे खाकर भी...)
माझ्या मुलाच्या माझ्याकडून काय काय अपेक्षा असाव्यात हे मी सांगू शकत नाही, असाव्यात कि नाही हे सांगू शकत नाही, मात्र असल्या तर काय हा प्रश्न उरतो. माझ्या वडीलांची पगार महिना २००० होती तेव्हा माझी इंजिनिअरींग फी वर्षाला ४००० होती. हा दुपटीचा रेशो आज ५ ते २० पटीवर आहे. आणि याच प्रकारे तो वाढत जाणार. मुलाने अपेक्षा केलीच तर कुठल्या बिंदूवर आपण त्याला नकार द्यावा असा तो प्रश्न होता. त्याला गरज नसताना त्याला मदत करावी कि नाही असा नव्हता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>पुण्यामुंबईत सक्सेस रेट
>>पुण्यामुंबईत सक्सेस रेट १००% आहे. मूले यशस्वी होतातच असे जणू सूत्रच आहे. मी तरी कोणाचे अकल्याण झालेले पाहिले नाही.
असं म्हणणं धाडसाचं आहे. पण अयशस्वी मुलांचे आयुष्य बर्यापैकी जाते हे मात्र खरे. मोठ्या शहरातली मुले यशस्वी होतात म्हणण्यापेक्षा त्यांना यशस्वी न होताही ठीकठाक जगण्याच्या अधिक संधी उपलब्ध असतात. [शिवाय मोठ्या शहरात मोठ्या लोकसंख्येमुळे आणि विस्तारामुळे कुठलेही काम करताना हे हलके काम असल्याचा विचार करावा लागत नसेल. जो तालुक्याच्या लहान गावी करावा लागत असेल].
>>मुलाने अपेक्षा केलीच तर कुठल्या बिंदूवर आपण त्याला नकार द्यावा असा तो प्रश्न होता. त्याला गरज नसताना त्याला मदत करावी कि नाही असा नव्हता.
ही मर्यादा प्रत्येकाची वेगळी असेल. शिक्षणासाठी (सहज शक्य असेल तर- मोठे कर्ज काढून नव्हे) मदत करावी असे मी म्हणेन. बाकी वाहन, घर इत्यादि 'घेऊन देऊ नयेत' असे म्हणेन.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मातृसत्ताक कुटूंबपद्धतीत
मातृसत्ताक कुटूंबपद्धतीत तुम्हाला हे विचार करावेच का लागतात?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वैयक्तिक
वैयक्तिक
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत आहे. शेवटी डॉळा मारणारी
सहमत आहे. शेवटी डॉळा मारणारी स्मायली न टाकल्याने वाक्याला (माझा उद्देश असणारा) 'कोपरखळी'चा फिल नाहिसा झाला
अजो, दुखावलात? (तरच) स्वारी!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी पद्धत निरपेक्ष असलो तरी
मी पद्धत निरपेक्ष असलो तरी कुटुंबाच्या भल्याचा बराच विचार करतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शिक्षण- हो लग्न - थोडे
शिक्षण- हो
लग्न - थोडे फार
नवे घर, प्रवास, फर्निचर, कार, जीवनशैली - अजिबात नाही - अंथरूण पाहून हातपाय पसर - असा सल्ला मुलांना देईन.
आणि हे तेव्हाच असे नाही हे संस्कार त्यांच्या मनावर आतापासून बिंबवले जातील हे बघेन.
आपल्या आई-बापाकडे भरपूर पैसा अहे आनि आप्ल्याला हवी ती गोष्ट ते आप्ल्याला देऊ शकतात ही जाणीव त्यांना कधीच होउ द्यायची नाही.
मुले काय आप्ली पेस्लिप बघणार नाहीत कि ऑनलाइन बँकिंगला लॉगिन करून बॅलन्स आणि बाकी गुंतवणूक बघणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या समोर माझे खर्च आणि जीवन्शैली अशीच ठेवेन की आप्ले आई-वडील जरूरी च्या सगळ्या गोष्टी मिळवण्यास सक्षम अहेत पण गडगंज नाहीत हेच त्यांना वाटेल. अर्थात आत्ता ती खूप लहान आहे त्यामुळे ते सोपे आहे, ती शाळेत जाईल तेव्हा तिच्यावर पीअर प्रेशर येईल (अमकी/अमक्याला ति/त्याच्या बाबांनी वाढदिवसाला आय-पॅड दिले, भारीतले खेळणे दिले..मला पण!) ते कसे हँडल करायचे ते बघावे लागेल. तुझे आई - बाबा गरिब आहेत हा संवाद जरी फेकला नाही (कारण ते अस्थानी वापरला जाईल) तरी समजावणे/रागावणे नक्कीच वापरले जाईल.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
+१
+१
माझ्या डोक्यात हेच विचार येतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझे मत किंचित भिन्न आहे.
माझे मत किंचित भिन्न आहे. आपल्या अपत्यांना आपल्या आर्थिक मिळकतीची सुरवातीला बर्यापैकी (८-१० वर्षाची झाल्यावर पूर्णपणे) कल्पना असावी इतकेच नव्हे तर घरातील एखाद्या गोष्टीवर खर्च करावा की करू नये या निर्णयप्रक्रीयेतही त्यांना समाविष्ट करून घ्यावे असे वाटते. अर्थात जसे इतर मोठ्यांना हव्या असलेल्या वस्तूत त्यालाही विचारले जाते, तसेच अपत्याच्या मागण्यांवरही सगळ्यांचे मत घ्यावे , त्यामुळे आपल्याला हवे ते मिळतेच हा समजही राहत नाही आणि घरात एक पारदर्शकताही रहाते.
अर्थात, हे प्रत्यक्षात करणे स्वभावानुसार जरा कठीण जाऊ शकते, पुढे मुलांना आपले व्यवहार लपून करावेसे वाटण्याची शक्यता कमी असते हा मानशास्त्रीय फायदा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुलांना आपले व्यवहार लपून
असहमत... आप्ल्याला फर्म स्टँड मिळू शकतो फक्त... मी लपवले नाही तू पण लपवू नकोस... म्हणजे ते लपवणार नाहीत याची खात्री नाही.
"समजावणे" - हे त्यासाठीच.
आणि पारदर्शक्ता आणण्यासाठी, मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचे बाकी बर्याच संधी उपलब्ध होणार आहेतच. घरातल्या ज्या गोष्टींमध्ये त्यांना फरक पडेल त्यात त्यांचे मत नक्कीच विचारलेले बरे
- तुझी खोली कशी सजवायची?
- आज कोणते कपडे घालणार?
- तुझा वाढदिवस घरी करायचा आहे - कोणकोणत्या मित्र/मैत्रिणींना बोलवायचे?
- आई/बाबा आज तुला घरी ठेवून बाहेर गेले तर चालेल का? पुढच्या वेळी तुला नक्की नेऊ.
जस्जसे मूल मोठे होईल ते मत देतात ते प्रश्न जास्त महत्वाचे आणि फक्त त्यांच्या पुरते न राहता पुर्ण घराला फरक पडणारे होऊ शकतात. पण आर्थिक बाबतीत मत देण्याची अक्कल निदान १७/१८ होईपर्ञंत येते असे मला वाटत नाही (मला नव्हती)
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
ही विचारधाराही बघितली आहेच.
ही विचारधाराही बघितली आहेच. यात चुक बरोबर असे काही नसावे हे आलेच, अर्थात असहमतीचा आदर आहेच!
फक्त बाकी मुलांना ८-१०वर्षांपासून आर्थिक मते असतात (योग्यच असतील असे नाही)/समजतात असे माझे मत आहे. चर्चेतून त्यांच्या अनेक शंकाचे निराकारण होते. मी म्हणतोय त्या प्रक्रीयेत त्याच्याकडे कसे हे हे आहे? आपण का नाही घ्यायचे?: त्याच्या घरी या महिन्यातला इतर खर्च काय आहे आपल्याला माहिती आहे का? कदाचित पुढल्या महिन्यात आपण अबकसाठी ठरवलेली ही ही वस्तु आणुया नको त्या ऐवजी तुला हे घेईन? चालेल? वगैरे दुतर्फी संवाद होतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुलांचे आर्थिक स्वावलंबन.
८-१० वर्षांच्या मुलांना आर्थिक व्यवहारांची जाणीव असते, त्याबद्द्ल प्रश्नही पडतात, पण व्यहवारांचे पूर्ण आकलन होत नसते असा माझा अनुभव आहे. जेव्हा एखाद्या तुलनेने महाग(पण परवडण्यार्या आणि बर्याचदा मला अनावश्यक वाटणार्या) वस्तूची मागणी होते, तेव्हा मी पिगीबँकेतले पैसे वापरण्याचा सल्ला देते. ते पैसे मुलांना माझ्यासाठी काम करून परत कमावता येतात.
या धाग्यावर हे जरा अवांतर होत आहे याची जाणीव आहे, पण माझ्या आवडत्या मालिकेतला हा भाग बघावा. http://www.popmodal.com/video/1251/BILL-COSBY--Economics-Lesson-With-Mon...
अपार अवांतर
हे अपार अवांतर आहे. (योग्य जागा संपादकांना ठाऊक असल्यास तिथे डकवा.)
मराठीत शब्दयोगी अव्ययं आणि विभक्तीप्रत्यय शब्दाला जोडून लिहायची पद्धत आहे हो. तुमच्यासारखे ज्येष्ठ लेखकही 'निवृत्ती नंतरच्या' लिहू लागले.. तर झालंच की.
हल्ली (विशेषतः जालावर आणि व्हॉट्सॅपवर आणि चॅट्स आणि मेसेजेसमधे) बहुधा हिंदीच्या प्रभावामुळे शब्दयोगी अव्ययं शब्दापासून तोडून लिहिली जातात. रोमन लिपीत लिहिताना वाचनाच्या सोयीसाठी ते ठीकच. पण देवनागरीत लिहिताना नका असं करू, अशी कळकळीची विनंती. अशी पद्धत नाहीय हो मराठीत.
***
यावर वादंग / मस्करी / टर सगळं होऊ शकेल. कशाला पाळायच्या मराठीलेखनाच्या पद्धती, त्यानं काय होईल वगैरे प्रश्नही उपस्थित होतील. मी उत्तरं देईनच असं नाही, हे आधीच सांगतेय.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सहमत आहे. कधीपासून चं पाहतोय,
सहमत आहे.
कधीपासून चं पाहतोय, मला हे आजिबात पटत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हात् रां*च्या! सगळ्याची मेली
हात् रां*च्या! सगळ्याची मेली मस्करी.. बरं नै हो हे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सगळ्याची मेली मस्करी.. बरं नै
सहमत आहे. सगळ्याची "मेली" उर्फ मेळी एकेए मिक्स करून मस करी द्यावी हे बरं नै असं म्हणायचं आहे का?
बाकी सहमती आग़ोदरच नोंदवली होती ते बगा की ओ जरा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बघितलंय रे, पण ती शिवी
बघितलंय रे, पण ती शिवी देण्याची सुरसुरी काही आवरेना. म्हणून आजी मोड वापरलाच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पद्धती पासून सुटका मिळाल्या ने
पद्धती पासून सुटका मिळाल्या ने निश्वास लो.
.
.
पद्धतीपासून सुटकामिळाल्याने निश्वासलो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे वाचून "भयंकरसुं दरम राठी
हे वाचून "भयंकरसुं दरम राठी भाषा" नामक शीर्षक असलेल्या पुस्तकाची आठवण आली. ते वाचायचा बहुत प्राचीन प्लॅन होता, परंतु सिद्धीस गेला नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राइट्ट. द. दि. पुंडे.
राइट्ट. द. दि. पुंडे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अवान्तरावर अवान्तर
<हल्ली (विशेषतः जालावर आणि व्हॉट्सॅपवर आणि चॅट्स आणि मेसेजेसमधे) बहुधा हिंदीच्या प्रभावामुळे शब्दयोगी अव्ययं शब्दापासून तोडून लिहिली जातात. रोमन लिपीत लिहिताना वाचनाच्या सोयीसाठी ते ठीकच. पण देवनागरीत लिहिताना नका असं करू, अशी कळकळीची विनंती. अशी पद्धत नाहीय हो मराठीत.>
असल्या 'भ्रष्ट' मराठीच्या तुम्ही विरोधात आहेत. मीहि आहे. ह्या बाबतीत तुम्ही purist आहात असे दिसते. तर मग आमच्यासारख्यांनी 'कवि', 'मति' - 'कवी','मती' नाही - ह्याचा पुरस्कार का करू नये? तेथे purist mode का नसावा?
ज्याला जे योग्य वाटेल त्याने
ज्याला जे योग्य वाटेल त्याने त्याचा पुरस्कार करावा, आक्षेप घेणारे आपण कोण? पण त्यामागचं तर्कशास्त्र असं:
नियम पाळून लेखन व्हावं. ते सर्वांच्याच सोयीचं आहे. प्रमाणलेखनाचे नियम पाळायचे झाल्यास ते शिकवले जावेत. सध्या ते अभ्यासक्रमात कुठेही शिकवले जात नाहीत. बरं, ते शिकवले जातील, असं आपण घटकाभर धरून चालू. त्या नियमानुसार समासात प्रथमपदी तद्भव शब्द वेगळ्या प्रकारे लिहितात. हे तद्भव शब्द ओळखण्याची काही युक्ती आपल्याकडे आहे का? काहीही नाही. मग समजा, नियम शिकवले तरी ते कशाच्या आधारे पाळायचे? केवळ निरीक्षण अपुरं आहे. कुणाचं, किती काळ, निरीक्षणासाठी आदर्श ठरण्याचे निकष काय.. असे अनेक प्रश्न उभे राहतात. मग अशी अंदाधुंद कायम ठेवण्याहून नियमात बदल का करू नये? बरं, जोवर लोकबळावर नियम बदलले जात नाहीत तोवर मी जुन्याच नियमांवर आधारित लेखन करणार. कारण मला सोयीचा बदल हवा आहे. बंडासाठी बंड नव्हे.
ही माझी प्रमाणलेखनाबाबतची भूमिका.
मराठीत शब्दयोगी अव्ययं शब्दाला जोडून लिहिली जातात ही मराठीतली प्रथा. ती पाळण्यासाठी नक्की काय शिकावं लागतं? शब्दयोगी अव्ययं ओळखता येणं. शब्दयोगी अव्ययं ही शब्दाची जात माध्यमिक शाळेच्या व्याकरणात रीतसर शिकवली जाते. म्हणजे ती पाळायला काहीच अडचण नाही. नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. शिवाय शब्दयोगी अव्ययं तत्सम आणि तद्भव अशी वर्गीकृत करून निरनिराळ्या प्रकारे लिहिली जावीत, अशीही काही अट नाही. त्यामुळे मराठीचा लेखननियम पाळण्यासाठी संस्कृत किंवा इतर कोणती भाषा शिकण्याचीही गरज नाही. त्यामुळे या नियमात काहीच अन्यायकारक नाही. हे वैशिष्ट्य आपण जपलं तर बरं.
ही माझी शब्दयोगी अव्यय जोडून लिहिण्याबद्दलची भूमिका.
या दोहोंत विसंवाद आहे का? असला, तर प्लीज मला दाखवून द्या, मला माझं मत बदलायला काहीच अडचण नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
म्हणणं रास्त वाटतंय.
म्हणणं रास्त वाटतंय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शुद्धिपत्रः 'तद्भव'ऐवजी
शुद्धिपत्रः
'तद्भव'ऐवजी 'तत्सम' वाचावे. आता प्रतिसादाचं संपादन शक्य नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विभक्ती प्रत्यय
केवळ शब्दयोगी अव्ययेच नव्हेत तर विभक्ती प्रत्ययदेखिल मराठीत शब्दाला जोडून लिहिले जातात.
याची आवश्यकता नाही. इंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी घरातील मूलदेखिल "सामान्य रूप" म्हणजे काय हे शाळेत न शिकता, व्यवस्थित वापरायला शिकते!
अडचण जिथे सामान्य रूप होत नाही तिथे होते!
म्हणूनच "लालबाग चा राजा" असे लिहिलेले वाचायला मिळते!