आजचे दिनवैशिष्टय - ३
व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी हा धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
---
दिनवैशिष्ट्यात दखल घेतली गेल्याने ही थोडी अधिक माहिती देत आहे -
ग्रेगरी प्येरेलमान - जन्मदिवस १३ जून
ऑक्सफर्ड येथील क्ले गणिती संस्थेने २००० साली ७ कूटप्रश्न निवडले ज्याला 'मिलेनियम प्राइझ प्रॉब्लेम्स्' म्हणतात. यातील कुठलेही गणित सोडविल्यस ते सोडविणाऱ्या व्यक्तीस दशलक्ष अमेरिकी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. आजवर त्यातील एकमेव कूटप्रश्न 'पोङ्कारे कन्जेक्चर' उकलला आहे तो १३ जून हा जन्मदिवस असणारया ग्रिगोरी (ग्रीशा) प्येरेलमान याने. हा अत्यंत प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे. गंमत म्हणजे त्याने २००२-३ साली आठ महिन्यांच्या अवधीत ३ हप्त्यांत हे काम कुठल्याही प्रतिष्ठेच्या गणिती पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित न करता थेट आंतरजालावर प्रसिद्ध केले. तेदेखील अश्या स्वरूपात की एक अधिक मोठे गणित सोडविताना पोङ्कारे कान्जेक्चर सिद्ध करणे ही वाटेवर असलेली एक छोटी पायरी आहे आणि त्याने ती पार केली, इतकेच त्याचे महत्त्व. हे प्रसिद्ध झाल्यानंतर ४ वर्षे दोन गणितज्ज्ञांच्या गटांनी त्या सिद्धतेचा अभ्यास करून २००६ मध्ये जाहीर केले की ती उकल योग्य आहे. या कन्जेक्चरचा विशेष असा की दोन आणि तिनापेक्षा अधिक मितींमध्ये हे गणित सोडविले गेले होते पण तीन मितींसाठी सोडविणे हे कुणाला शक्य झाले नव्हते आणि भौतिकशास्त्रज्ञांसाठी सर्वात महत्त्वाची हीच बाब होती, कारण आपले जग त्रिमितीय भूमितीत समजून घेण्यासाठी ती एक आवश्यक पायरी होती.
विशेष म्हणजे या कामाकरिता २०१० साली दिला गेलेला मिलेनियम पुरस्कार व दशलक्ष डॉलर्सची रक्कम त्याने नाकारली. त्यापूर्वी त्याने २००६ साली फील्डस् मेडल हेही नाकारले. हा आजवरचा एकमेव गणितज्ज्ञ आहे की ज्याने फील्डस् मेडल (या मेडलला 'नोबेल'पेक्षाही अधिक मान आहे; ते ४ वर्षांतून एकदाच व ४० वर्षे वयापेक्षा कमी असलेल्यांना दिले जाते ) नाकारले.
'न्यू यॉर्कर' मध्ये 'सिल्विया नाजार' (A Beautiful Mind या John Nash वरील पुस्तकाची लेखिका)ने २००६ साली या कामाची दखल घेतली आणि त्यासोबत गणित सोडविण्यात कुणाचा किती भाग आहे, यावरून एका चीनी गणितज्ज्ञाने केलेला दावा व त्यासंबंधित झालेला उहापोह आदीचा वृत्तान्त आहे.
या लेखामुळे आणि एकूणच त्याने नाकारलेल्या पुरस्कारांमुळे गदारोळ माजला. या सगळ्या प्रकरणांनंतर प्येरेलमानने राजीनामा दिला व समाजापासून आणि विशेष म्हणजे गणितापासून स्वत:ला तोडून घेतले. ते का ते कुणाला माहित नाही. त्याचा चरितार्थ कसा चालतो, ते कुणाला माहित नाही. तो सध्या त्याच्या आईसोबत सेन्ट् पीटर्स्बर्गजवळ राहतो व पाश्चात्य अभिजात संगीतात रममाण असतो, इतकेच जगाला माहित आहे.
त्याच्यावर एक माहितीपट (४४ मि.) उपलब्ध आहे.
Man following a different path. A lesson from Perelman.
सुहासिनी मुळगावकर
नाट्यअभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मुळगावकर (१९८९)> ह्या आजच्या 'पुण्यस्मरण'मधील नोंदीमुळे आलेल्या आठवणी.
सुहासिनी मुळगावकर हे नाव १९७०-८९ च्या दशकामध्ये सांस्कृतिक संदर्भात वारंवार ऐकू येत असे. दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांनी स्वत: केलेली एकपात्री 'सौभद्र' आणि एकपात्री 'मानापमान' ही खूप गाजली होती. 'दूरदर्शन' सरकारी मालकीचे असतांना फार चांगले असे काही कार्यक्रम पहायला मिळत त्यांपै़की 'प्रतिभा आणि प्रतिमा' हा रविवारी सकाळी मुंबईहून होणारा मराठी कार्यक्रम एक होता आणि सुहासिनीबाई त्याच्या निर्मात्या होत्या. साहित्य-संगीत-नाटय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या एक तासाच्या मुलाखती असा हा कार्यक्रम असे आणि बरेच कलाकार-लेखक-विद्वान लोक पाहण्यास मिळाले.
समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या अशा ह्या बाई फारच अकाली कर्करोगाने वारल्या.
('प्रतिभा आणि प्रतिमा' चा एखादा भाग वा तुकडा यूट्यूबवगैरे मिळतो काय असे पाहण्याचा बाराच प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही.)
२१ जून / राजाजी
१९४८ : सी. राजगोपालचारी म्हणून पहिले (आणि एकमेव) गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
आँ? मग ते लॉर्ड बेंटिंक (सतीबंदी फेम), झालेच तर लॉर्ड डलहौसी (संस्थाने खालसा फेम), ही सारी मंडळी कोण होती मग? ईष्ट इण्डिया कंपनीतले चपराशी?
बरे, स्वातंत्र्योत्तर म्हणावे, तर लॉर्ड मौण्टब्याटन (बर्मावाले) कोणत्या भावाने?
राजाजींना फार फार तर एकमेव एतद्देशीय ग.ज. (मोहम्मदपंत जीना (कराचीवाले) नॉटविथष्ट्याण्डिंग) किंवा एकमेव हिंदू ग.ज. म्हणता येईलसे वाटते. (आणि भारताचे 'पहिले' ग.ज. तर कोणत्याही अर्थाने नव्हेत. स्वातंत्र्योत्तर नव्हेत, आणि ऑफ ऑल टैम्स तर नव्हेतच नव्हेत.)
हं, भारताचे शेवटचे ग.ज. म्हणत असाल, तर गोष्ट वेगळी.
देशी
स्वतंत्र* भारताचे पहिले देशी गव्हर्नर जनरल.
[१९४७ ते १९५० दरम्यान पूर्ण सार्वभौमत्व नसून डॉमिनिअन स्टेटस (वसाहतीअंतर्गत स्वराज्य**) होता. त्या काळात राष्ट्रपती पद नव्हते].
**आज कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे स्टेटस असे आहे बहुधा. इंग्लंडची राणी (ब्रिटिश क्राउन) ही/हा हेड ऑफ स्टेट*** असते/असतो.
***१९४७ ते ५० या काळात राणीचेच सरकार होते असे टेक्निकली म्हणता येईल काय?
मोहम्मदपंत जीना हे (स्वातंत्र्यानंतर उरलेल्या) भारताचे ग. ज. नव्हते.
...
***१९४७ ते ५० या काळात राणीचेच सरकार होते असे टेक्निकली म्हणता येईल काय?
नाही. १९४७ ते १९५० या काळात भारतात तत्त्वतः राजाचे सरकार होते. राणीचे नव्हे.
(पण 'राजाचे'च. 'इंग्लंड'चे नव्हे.)
इंग्लंडची राणी (ब्रिटिश क्राउन) ही/हा हेड ऑफ स्टेट*** असते/असतो.
यात पुन्हा गंमत अशी आहे, की इंग्लंडची राणी ही स्वतंत्रपणे कॅनडाचीसुद्धा (आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरेंचीसुद्धा) राणी असते. बोले तो, अॅज़ फार अॅज़, फॉर एक्झँपल, कॅनडा इज़ कन्सर्न्ड, ती भले लंडनमध्ये (बोले तो, लंडन, इंग्लंड; लंडन, ओंटारियो नव्हे. बादवे लंडन, ओंटारियोसुद्धा टेम्सकिनारीच वसलेले आहे, असे कळते. पण ते एक असो.) राहत असेल, पण कॅनडाकरिता ती कॅनडाची राणी आहे, इंग्लंडची नव्हे. (अधिक माहितीसाठी: दुवा.)
मोहम्मदपंत जीना हे (स्वातंत्र्यानंतर उरलेल्या) भारताचे ग. ज. नव्हते.
बरोबर. 'एतद्देशीय' (व्हॉटेवर द्याट मे मीन) कदाचित म्हणता यावेत का, ('भारताचे' नसले तरी), एवढीच शंका होती. (अगेन, फॉर व्हॉटेवर इट वॉज़ वर्थ. प्रॉबेबली नथिंग व्हॉटसोएवर.)
आज झिनेदिन झिदानचा वाढदिवस
आज झिनेदिन झिदानचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाला हा एक विडीओ बघा. २००६च्या वल्ड कपची उपान्त्यपूर्व फेरी. फ्रान्स विरुद्ध गतविजेते ब्राझील. ब्राझीलच्या टीमध्ये काकासारखा खेळाडू, रोनल्डिनीओ सारखा जादूगार आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर. रोनाल्डो जाड/म्हातारा झालेला असला तरी धोकादायक. याधिक काफू, रोबेर्टो कार्लोस सारखे भरवश्याचे खेळाडू आहेत. फ्रांसची टीम प्याचवर्क करून बनवलेली. स्पर्धेसाठी क्वालिफाय होणपण अवघड होत तेव्हा झिदान निवृत्तीतून बाहेर आला आणि फ्रांसला क्वालिफायिन्गमध्ये मदत केली. एकहाती मॅच जिंकून देणं म्हणजे काय ते ही मॅच पाहून समजतं. झिदान __/\__
फ्रान्स पुढे फायनलमध्ये गेले. तिथे काय झालं ते माहिती आहेच.
आतले आणि बाहेरचे
१९९८ची एक आठवण -
'फ्रेंचांसाठी फ्रान्स' अशी घोषणा करत स्थलांतरितांविरोधातल्या आणि वर्णभेदी धोरणांचा पुरस्कार करणारा एक उजवा पक्ष फ्रान्समध्ये आहे. तो अधूनमधून उचल खात असतो. (नुकत्याच पार पडलेल्या युरोपिअन निवडणुकींत त्याला अपूर्व यश मिळालं.) फुटबॉलची लोकप्रियता आणि फ्रान्समध्येच वर्ल्ड कप ही संधी साधून त्यांनी 'आपल्या' टीममध्ये इतके लोक 'बाहेरचे' का आहेत अशा प्रकारची तक्रार करायला सुरुवात केली. सामन्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणायची वेळ आली तेव्हा अनेकांच्या लक्षात आलं की कित्येक 'फ्रेंच' (पक्षी : गोऱ्या) खेळाडूंना राष्ट्रगीत म्हणता येत नाही आणि झिदान आणि इतर 'बाहेरच्यां'ना ते येतंय. त्यानंतर अर्थात ह्या 'बाहेरच्या'नं इतिहास घडवला आणि अनेकांची बोलती बंद झाली. भर शाँझेलीझेवर उभं राहून, 'आर्क द त्रिओम्फ'वर प्रोजेक्ट केलेल्या वर्ल्ड कपच्या प्रतिमांवर झिदानला पाहताना अनेक 'बाहेरचे' तेव्हा अक्षरशः ढसाढसा रडले होते.
फर्माज़् लास्ट् थिअरम् (२३ जून - ऑल्मोस्ट)
प्रा. अॅन्ड्र्यू वाईल्स् यांनी जवळपास ७ वर्षे गुप्तपणे काम करीत आकारास आणलेली फर्माच्या प्रमेयाची सिद्धता कशी जगासमोर आणली हे अत्यंत रंजक आहे.
२१ - २३ जून १९९३ मध्ये त्यांनी एक गणिताची व्याख्यानमालिका आयोजित केली आणि त्याचा विषय असा ठेवला की लोकांना फर्माच्या प्रमेयाची सिद्धता त्यातून उलगडत जाणार आहे हे चटकन कळणार नाही. तसे करण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर जेव्हा ती सिद्धता इतर गणितज्ज्ञांनी (प्रा. काट्झ्) तपासली, तेंव्हा त्यात काही त्रुटी आढळून आल्या. मग वाईल्स् यांनी पुन्हा कंबर कसून दिवसरात्र काम करीत पुन्हा वेगळ्या मार्गाने सिद्धता पूर्णत्वाला नेली. २४ ऑक्टोबर १९९४ मध्ये ती प्रकाशनासाठी पाठवली गेली व मे १९९५ साली ती प्रकाशित झाली.
सायमन सिंग यांनी एक अत्यंत हृद्य माहितीपट (४९ मि.) बनविला आहे. एखाद्या गणितज्ज्ञाला त्याच्या कामाबद्दल हळवे होताना मी प्रथमच पाहिले. या प्राध्यापकाचा आणि त्याच्या सिद्धतेचा संपूर्ण प्रवास आवर्जून पाहावा असाच आहे.
बालगंधर्व रंगमंदिर
१९३८ : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन
२६ जूनच्या दिनवैशिष्टयामध्ये असलेली वरील नोंद बरोबर नाही. उद्घाटनप्रसंगी मी हजर होतो. १९६१च्या पुरामध्ये संभाजी पार्कचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरच्या त्याच्या नवनिर्मितीचा एक भाग म्हणून पार्काच्या एका भागात हे रंगमंदिर उभारण्याचे ठरले. त्याच्या आराखडयामध्ये पुलंचा बराच भाग होता असे वाचले आहे. रंगमंदिर १९६८ मध्ये उभे राहिले. येथे पहा
रंगमंचाच्यावर मालविकाग्निमित्रातील कालिदासाचा पुढील श्लोक लिहिलेला आहे:
देवानामिदमामनन्ति मुनयः शान्तं क्रतुं चाक्षुषम्|
रुद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा|
त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते|
नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्||
मालविकाग्निमित्र १.४
मुनिगण नाटयाला सुरनिर्मित असा नेत्रांनी पाहण्याचा यज्ञ मानतात. रुद्राने उमेच्या संबंधामधून आपल्या शरीरातून निर्मिलेले हे नरनारी असे द्विधा रूप आहे. सत्त्व-रज-तम ह्या त्रैगुण्यामधून उत्पन्न होणारे नाना रसांनी पूर्ण असे लोकचरित ह्यामध्ये दिसते. भिन्नरुचि व्यक्तींचे मनोरंजन करणारे नाटय हे बहुशः एकच साधन आहे.
चार्ल्स लॉटन
आजच्या जन्मदिवसामधे त्याचं नाव वाचलं. 'विटनेस फॉर द प्रॉसीक्युशन' मधला त्याचा सुरेख अभिनय जरूर पहा. एक मुरलेला, अनेक वर्षांच्या अनुभवाने आपले स्वतःचे ठोकताळे बांधलेला, आपल्या मर्जीने काम करणारा, फक्त हातातल्या केसशी बांधिलकी जपणारा खट वकील झकास रंगवला आहे त्याने.
आज ३ जुलै हा तत्त्वज्ञ आणि
आज ३ जुलै हा तत्त्वज्ञ आणि साधक दोन्ही असलेल्या, गुरुदेव या नावाने ओळखल्या जाणार्या रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांचा जन्मदिवस आहे. जन्म जमखंडीला झाला. पुढे बी.ए. फर्ग्युसनला केले (गणित विषयात), तर एम.ए. डेक्कन कॉलेजात केले (तत्त्वज्ञानात). एम.ए. चे ते गोल्ड मेडॅलिस्ट होते. त्यांच्या उत्तरपत्रिकेवर
'दि एग्झॅमिनी नोज़ मोर दॅन दि एग्झॅमिनर' असे लिहिल्याची कथा प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजात बेन नामक प्रोफेसरचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. (या प्रोफेसरचा उल्लेख आहिताग्नी राजवाड्यांच्या आत्मवृत्तातही सापडतो.) डेक्कन कॉलेजात त्यांची राहती खोली अजूनही जपून ठेवलेली आहे.
शिक्षण संपल्यावर ते सांगलीला विलिंग्डन कॉलेजात प्रोफेसर म्हणून लागले. काही वर्षांनंतर त्यांचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीवाल्यांशी बिनसले आणि ती नोकरी त्यांनी रोडली. पुढे बरेच कटू प्रसंग आले, आजारपण इ. बर्याच अडचणी आल्या, पण ते त्यातून तरले. त्यात त्यांचा आध्यात्मिक भाव वाढीस लागला. पुढे ते अलाहाबाद विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सेलर झाले. (तिथे त्यांची भेट झाल्याचा उल्लेख सेतुमाधवराव पगडींच्या 'जीवनसेतू' नामक अप्रतीम आत्मचरित्रात आहे.) तिथे ते २० वर्षे होते. तिथून निवृत्त झाल्यावर विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील निंबाळ या गावी ते येऊन राहिले ते अखेरपर्यंत. १९५७ साली त्यांचे निधन झाले. निंबाळ येथे त्यांचा आश्रम आहे. आजिबात गर्दी नसते आणि वातावरणही छान आहे.
त्यांची ग्रंथसंपदा मोजकीच परंतु अतिशय भरीव आहे. त्यांचा मॅग्नम ओपस म्हणता येईल असा ग्रंथ म्हणजे 'अ कन्स्त्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी'. यात त्यांनी मॉडर्न पद्धतीने उपनिषदांचा अॅनॅलिसिस केलेला आहे. प्राचीन ग्रीक भाषा शिकून घेऊन त्यांनी अॅरिस्टॉटल, हेराक्लिटस, प्लेटो, इ. तत्त्वज्ञांचे लेखन मुळातून वाचले. भारतीय तत्त्वज्ञानाच्या त्या तत्त्वज्ञानाशी असलेल्या साम्य-भेदाचे त्यांनी केलेले वर्णन त्यामुळे एकदम मूलगामी झालेले आहे. या ग्रंथामुळेच गंगानाथ झा यांनी अलाहाबादेस येण्याबद्दल त्यांना गळ घातली. पाश्चात्य जगतातही या ग्रंथाचे रिसेप्शन चांगलेच झाले.
बेलवलकर नामक अन्य प्रोफेसरांसोबत 'भारतीय तत्त्वज्ञानाचा एन्सायक्लोपीडिया' बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते पण ते अपुरे राहिले. आजमितीस त्याचा फक्त पहिला व्हॉल्यूमच छापला गेला. वैदिक ते उपनिषदिक काळापर्यंतच त्यात म्याटर आहे. त्यांचे काही स्फुट लेखही आहेत. पैकी एक लेख ग्रीक आणि संस्कृतमधील विविध साम्यस्थळांची चर्चा करणारा आहे. त्याचा अरविंद घोषांनीही गौरव केलेला होता. लोकमान्यांशीही त्यांचा संपर्क आला होता आणि लोकमान्यांनी त्यांना मुंबै युनिव्हर्सिटीत 'प्रोफेसर ऑफ हिंदू रिलिजन' म्हणून नेमण्याबद्दल चर्चा केली होती, पण पुढे ते तसेच राहिले. हा उल्लेख रानड्यांच्या चरित्रात आलेला आहे.
हे वगळता 'पाथवे टु गॉड' इन मराठी, हिंदी & कन्नड लिटरेचर ही त्यांची अजून ३ पुस्तके फेमस आहेत. नामस्मरण किंवा अन्य मार्गाने देव कसा मिळवावा याबद्दल प्रत्येक भाषेत लिहिल्या जाणार्या संतपरंपरेत नक्की काय विचार आहेत हे त्यांनी लिहिले आहे. कन्नड आणि त्यातही हळेगन्नड भाषा ते मुद्दामहून शिकले, तर अलाहाबादेस त्यांच्या न्हावी इ. लोकांच्या तोंडची भजने ऐकून त्यांना हिंदी संतसाहित्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. यातली विशेष रोचक गोष्ट म्ह. बहुतेक ठिकाणी संतांची मूळ वचने उद्धृत केलेली आहेत. त्यामुळे नक्की संतांना काय म्हणायचे होते हे तत्काळ समजण्यास मदत होते.
महाराष्ट्र सारस्वताचे पुरवणीकार शं.गो.तुळपुळे यांनी त्यांचे चरित्र लिहिलेले आहे. रानड्यांची आध्यात्मिक गुरुपरंपरा ही रानडे-उमदीकर-निंबर्गी अशी जाते. निंबाळच्या जवळपासच इंचगेरी नामक गाव आहे तिथे उमदीकर महाराजांनी बांधलेला मठ आहे. खुद्द निंबाळ येथे रानड्यांचे राहते घर होते तिथे आता आश्रम आहे.
रानड्यांबद्दल अधिक माहिती तसेच हेराक्लिटस या तत्त्वज्ञाच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख खालच्या दुव्यावर वाचता येईल. 'स्पिरिच्युअल आर्टिकल्स' मध्ये 'ट्रीटाईज ऑन हेराक्लिटस' म्हणून आहे तिथे क्लिकवल्यावर दिसेल.
सायकल कर
आजच्या ३ जुलैच्या दिनवैशिष्टयामध्ये '१९३६ : 'सायकल कर' आकारणीचा पुणे नगरपालिकेचा ठराव नागरिकांच्या एकजुटीमुळे फेटाळला गेला.' हे नोंदवले आहे.
असे झाले असले तर हा कर नंतर केव्हातरी मागच्या दरवाज्यातून परत आला असावा कारण १९५८ च्या पुढेमागे पुण्यात सायकलींना 'बिल्ला' लावलेला असणे आवश्यक असे आणि हे 'बिल्ले' दरवर्षी महानगरपालिकेकडून दोन रुपये देऊन घ्यावे लागत असे आठवते. सायकलला रात्री दिवा असणे आणि त्या त्या वर्षाचा बिल्ला असणे ह्या बाबींकडे पोलीस कटाक्षाने नजर ठेवून असत!
विडंबन
सायकलला रात्री दिवा असणे आणि त्या त्या वर्षाचा बिल्ला असणे ह्या बाबींकडे पोलीस कटाक्षाने नजर ठेवून असत!
यावर आधारीत एक विडंबन (हे विडंबन पुणे मनपावर नसून माधव ज्युलियन यांच्या प्रेमविषयक कल्पनांवर होते!) अत्र्यांनी लिहिले होते. दुर्दैवाने आता हाताशी नाही. फक्त का॑ही ओळी तेवढ्या आठवताहेत.
प्रेमाचे अद्वैत
प्रेयसी सायकल चालवत आहे आणि (शामळू) प्रियकर तिच्या सायकलवर मागे बसून जात आहे अशी कविता होती.
हटा बाजुला तू असे जेधवा कुणा भाग्यवंतास आज्ञापिसी
ठिकाणी तदा त्याचिया मी न का? अशी वाटली खंत मन्मानसी
अशा त्यातल्या ओळी आठवतात. ती कविता आम्हाला बारावीला मराठीच्या पाठ्यपुस्तकात होती.
माधव जूलियन वगैरेंच्या
माधव जूलियन वगैरेंच्या प्रेमकवितांमध्ये प्रेयसीला धाडसी आणि प्रियकराला शामळू दाखवण्याची रीत असावी. प्रियकर प्रेयसीला "तू किती वा वा, मी अगदी फालतू" असे काहीसे बोलत असावा. त्याचे विडंबन अत्र्यांनी इतरत्र "व्हिस्कीतली तू माधुरी, मी तो पिठ्यातिल बेवडा" असे केले होते.
सदर सायकलच्या कवितेतही प्रियकराचा तोच रोल दाखवला आहे. तिच्या "डेअरडेव्हिल" सायकल चालवण्याचे तो वारेमाप कौतुक करताना दिसतो.
मार्क शागाल - जुलै ७
ह्या जन्मदिवसाच्या संदर्भात Donkey on the Roof (1911 - 1912) हे शागालचे चित्र वर दाखविले आहे. त्याच्या अन्य अनेक चित्रांप्रमाणे ह्याच्यातहि रशियातील वित्येब्स गावातील त्याच्या बालपणाच्या ज्यू पार्श्वभूमीचा परिणाम दिसतो. त्याबाबत मला पुढील माहिती जालावर येथे मिळाली. ती सर्वांच्या माहितीसाठी येथे चिकटवीत आहे:
Description:
The artist's first sojourn in Paris between 1910-1914 was a defining period of his life. "I was reborn in Paris", recalls Chagall in his autobiography, who then encountered the developments of Cubism and Fauvism. In the winter of 1911-1912, Chagall joined the La Ruche (Beehive) artist colony, frequented by such influential figures of the Paris art scene as Léger, Archipenko and Modigliani. Here he developed friendships with two illustrious French poets, Blaise Cendrars and Guillaume Apollinaire. Numerous enigmatic titles of Chagall's works originate from Cendrars.
The painter's period in Paris commenced with his series of drawings recording with spontaneous lightness his memories related to his native village, which he then developed further into large-scale oil paintings. Scenes of life in Vitebsk: his works Dedicated to my Fiancée (1911-1912, Kunstmuseum, Bern), and I and the Village (Museum of Modern Art, New York) recall animals and the characteristic buildings and inhabitants of the little village. Works typical of the series are night scenes resembling dreams, such as To Russia, Asses and Others (Musée d'Art Moderne, Paris). This is the large-scale oil painting version of the drawing held in Budapest. The composition of the two works is practically identical. Details of Vitebsk buildings appear before a deep blue background: the roofs of houses and the onion-dome of a church appear. On the long, oblique roof, a ruddy donkey stands with a human gaze, suckling a small child and a small animal. Above the roofs, the enormous figure of a peasant woman is visible, floating impossibly in the dark sky, her head separated from her body. In the works of Chagall, the real elements fall into a fantastic, irrational context, as it were, depriving the viewer from the possibility for a traditional, narrative interpretation. Guillaume Apollinaire employed the expression "Surnaturalist" in connection with these paintings of Chagall, which could fittingly be considered the forerunners of Surrealism. The pronounced, blue-grey diagonals cleaving the dark firmament, the block-like formulation of the buildings and the angular forms of the bodies of the woman and the animal in the reproduced drawing simultaneously inform of the influence of Cubism. Two studies can be brought into connection with the Paris painting, both dated 1911. The drawing in Budapest, while it is of a more transparent, diaphanous effect, nevertheless precisely follows the details of the Parisian work, and thus, it may be assumed that the drawing was produced at the same time, or subsequent to, the painting. The Paris composition appears as the picture within a picture motif in a number of further works; in this way, it also appears on the painter's easel in the famous Self-Portrait with Seven Fingers (Stedelijk Museum, Amsterdam).
Magazine editor and critic Herwarth Walden presented Chagall's works at two exhibitions during 1914 at the Der Sturm Gallery in Berlin. That summer Chagall travelled back to Russia, from whence he was unable to return for nine years, due to the outbreak of World War I. The piece preserved in Budapest may be presumed to be among the visual material that Chagall left at the Walden Gallery for safekeeping, prior to his departure.
Text: © Mónika Kumin
आज शिवशाहीर बाबासाहेब
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांचा जन्मदिवस. त्यांच्याबद्दल, त्यांच्या 'राजा शिवछत्रपती' या कादंबरीबद्दल आणि 'जाणता राजा' या नाटकाबद्दल बहुतेकांना माहिती असते. किंबहुना शिवाजी हे नाव महाराष्ट्रात विसाव्या शतकात पुनरेकवार तुफान पापिलवार करण्यात पुरंदर्यांचा एकहाती सर्वांत मोठा वाटा आहे हे कोणीही कबूल करेल. बहुतेकांप्रमाणे माझीही समजूत होती की पुरंदरे इज़ जस्ट वन ऑफ दोज़ अॅमॅच्युअर गाईज़ (ऑल दो अ रादर स्किलफुल वन). राजा शिवछत्रपतीवरची टीका (क्रिटिकल दृष्टी नाही, शिवाजी=हीरो हे समीकरण डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले पुस्तक, इ.इ.इ.) ऐकल्यावर तो ग्रह अजूनच दृढमूल झाला- यद्यपि फॅक्च्युअल चुका त्या पुस्तकात म्हणाव्या अशा आजिबात नाहीत हे दिसत असले तरीही.
पण अलीकडेच महिन्याभरापूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळात कै. ग.ह.(तात्यासाहेब) खरे यांच्या स्मृत्यर्थ त्यांचे शिष्य आणि शिवचरित्रावरची सध्याची ग्रेटेस्ट अॅथॉरिटी श्री. गजानन मेहेंदळे सरांचे व्याख्यान झाले त्यात पुरंदर्यांची संशोधक क्रिडेन्शिअल्सदेखील कळाली. ग.ह.खरे हे स्वतः फार मोठे संशोधक होते. त्यांनी इतर अनेक कामे केली, त्यांपैकी एक 'मराठा इतिहासाची शकावली' या नावाची मालिका होती. त्यात मराठा इतिहासातल्या कैक घटनांची तारीखवार सूची करण्याचे ब्याकब्रेकिंग टास्क होते. त्या कामी त्यांना चार अशिष्टंट होते, पैकी एक म्हंजे पुरंदरे. हे कळाल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. राजा शिवछत्रपतीमधील बाकी फुलोरा सोडला तरी तारखा इ. चा व्यवस्थितपणा कुठून आला ते तेव्हा कळाले.
--------------------------------------------------------------------------------------------------------
पुरंदर्यांचे वय आजमितीस ९२ आहे. पर्वती पायथ्याला पुरंदरे वाडा होता, तिथे पुरंदरे प्रकाशन व त्यांचे राहते घर आहे. त्यांना स्वतः दोनदा प्रत्यक्ष घरी जाऊन भेटलो होतो त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. पहिल्यांदा गेलो होतो तो एकटाच, १८ मार्च २००७ रोजी सकाळी १०-१०:३० या वेळेत. सुदैवाने घरी होते, थोडक्या गप्पा इ. मारल्या आणि फर्ड्या मोडीत स्वतःची स्वाक्षरी मला दिली होती. दुसर्यांदा गेलो ते २००८ च्या नागपंचमीस (तेव्हा तिथीने त्यांचा वाढदिवस असतो). तेव्हा मित्रांसोबत गेलो होतो. तेव्हा इतर चाहत्यांची लई झुंबड असूनही आमच्याबरोबर थोडक्या गप्पा मारल्या, शिवाय ग्रूप फटू काढून घेतला. इतका मोठा आणि प्रसिद्ध माणूस असूनही वागण्याबोलण्यात कसलाही दंभ, अहंकार म्हणून नाही. देव त्यांना लंबी उमर देवो.
अलिकडेच राजा शिवछत्रपती
अलिकडेच राजा शिवछत्रपती पुन्हा वाचायला घेतले.
काहीशी निराशा झाली. :( म्हणजे फॅक्च्युअल चुका नसाव्यात (किंवा मला सहज आढळल्या नाहीत). पण एकूणात भाषा फार भडक वाटली. म्हणजे आपण चरित्र वाचत नसून पोवाडा ऐकतो आहोत असे वाटले. (त्यांना शिवशाहीर म्हणतात तेव्हा हे साहजिकच आहे)
एक उदाहरण
भाषेचे एक उदाहरणच द्यायचे तर शिवजन्मापूर्वीच्या काळाचे वर्णन करताना त्यांनी असं काहीतरी लिहिले आहे :-
"रयत त्रासली होती. सुलतानांच्या आपसात मारामार्या होत. स्थैर्य नसे. ते एकमेकांस मारत. एकमेकांच्या मुलुखातील प्रदेश उध्वस्त करत. स्वतःच्या जनतेसही लुटत." अशा आशयाच्या परिच्छेदानंतर त्यांनी सलग सत्तावीस शब्द हे फक्त शिव्या वापरल्या आहेत निजामशहा-मुघल व आदिलशहा ह्यांच्याबद्दल.
आपण बोलताना जितक्या त्वेषाने बोलू, तितक्याच त्वेषानं ते लिहिलं गेल्याचं दिसतं.
खुनशी, अप्पलपोटा, लुटारु, लिंगपिसाट्,व्यभिचारी,स्त्रीलंपट्,क्रूर... अशा साधारण सलग सत्तावीस शिव्या होत्या.
=))
शिवजन्मापूर्वीचे प्रकरण वाचावे . "पारतंत्र्याची ऐन मध्यरात्र" हे नाव आहे बहुतेक त्या प्रकरणाचे, प्रकरणाच्या सुरुवातीला घुबडाचे चित्र आहे.
आपण चरित्र वाचत नसून पोवाडा
आपण चरित्र वाचत नसून पोवाडा ऐकतो आहोत असे वाटले.
मेबी म्हणूनच आवडलं असेल मला. नुस्तं फॅक्चुअल सामान्य माणसाला बोर होईल वाचायला. पण रंजक बनवून (नॉट अॅट दी कॉस्ट ऑफ ऑथेंटिसिटी) सांगितलं तर जास्तं लोकं वाचतील ते पुस्तक. नुसत्या घटना मेंशन करून त्यातलं नाट्य सगळ्यांनाच जाणवेल असं नाही. रंजक भाषेनी ते ठळक दिसतं एवढच.
पण एकूणात भाषा फार भडक वाटली.
पण एकूणात भाषा फार भडक वाटली. म्हणजे आपण चरित्र वाचत नसून पोवाडा ऐकतो आहोत असे वाटले
नक्की आक्षेप कळला नाही. ते ललित लेखन आहे.
ललित लेखन असूनही निव्वळ (रटाळ) माहिती भरणे अपेक्षित होते की सत्यासत्यतेविषयी नी इतिहासाविषयी हल्लीची नैतिकता लाऊन चुक बरोबर ठरवणे अपेक्षित होते की शिवरायांच्या चरीत्रात औरंगजेबाच्या महतीचे वर्णन करण्याची?
ललित लेखन आहे असे कायम
ललित लेखन आहे असे कायम ध्यानात ठेवून वाचले तर ठीक आहे. [पण मग ललित लेखन म्हणून ते खूप चांगले नाही].
सहमत.
समांतरः मात्र हे पुस्तक मी वाचलेला पहिला ठोकळा आहे. (बहुदा पाचवीत वाचले असावे). त्यामुळे आपल्याला मोठमोठे ठोकळेही वाचता येतात असा आत्मविश्वास देण्याचे व एकुणच वाचन आवडते याची "जाणीव" करून देण्याचे काम करणार्या पहिल्या काहि पुस्तकांपैकी हे एक आहे. माझ्या पिढीतील अनेकांनी (अनेक मराठी माध्यमांत शिकलेल्यांनी) वाचलेला पहिला ठोकळा हाच असावा असे दिसतेही. त्या अर्थी या ठोकळ्याचे योगदान मात्र मोठे आहे. (तुम्ही ते नाकारत आहात असे म्हणणे नाही, फक्त हा एक प्रकट विचार)
अगदी
समांतरः मात्र हे पुस्तक मी वाचलेला पहिला ठोकळा आहे. (बहुदा पाचवीत वाचले असावे). त्यामुळे आपल्याला मोठमोठे ठोकळेही वाचता येतात असा आत्मविश्वास देण्याचे व एकुणच वाचन आवडते याची "जाणीव" करून देण्याचे काम करणार्या पहिल्या काहि पुस्तकांपैकी हे एक आहे. माझ्या पिढीतील अनेकांनी (अनेक मराठी माध्यमांत शिकलेल्यांनी) वाचलेला पहिला ठोकळा हाच असावा असे दिसतेही. त्या अर्थी या ठोकळ्याचे योगदान मात्र मोठे आहे. (तुम्ही ते नाकारत आहात असे म्हणणे नाही, फक्त हा एक प्रकट विचार)
तंतोतंत!
फ्रिडा काहलो
१३ जुलैच्या 'दिनवैशिष्टय - जन्मदिवस' ह्यामध्ये 'चित्रकार फ्रीडा काहलो (१९५४)'असा उल्लेख आहे. तो वाचून मला माझ्या २००८ सालच्या मेक्सिको सिटी भेटीची आठवण झाली. मेक्सिकोमध्ये तिला मोठा मान आहे. प्रख्यात मेक्सिकन चित्रकार आणि म्युरलिस्ट दिएगो रिवेरा ह्याची ती पत्नी आणि त्याच्या अनेक चित्रांमध्ये स्त्री-आकृति म्हणून तिचे चित्र असते.
मेक्सिको सिटीमधील नॅशनल पॅलेसच्या प्रमुख जिन्याच्या दोन्ही बाजूंना रिवेराची मेक्सिकोचा इतिहास चित्रित करणारी अनेक म्युरल्स आहेत. त्यापैकी मी घेतलेल्या पुढील म्युरलच्या छायाचित्रामध्ये अॅझटेक देवतेच्या स्वरूपात आपल्याला फ्रिडा दिसते.
यशस्वी भारतीय, मराठी व्यक्ती
मधू सप्रेच्या विकीपीडीया पानावर हा उल्लेख आहे, तो मला महत्त्वाचा वाटला -
As Miss India she represented India at the 1992 Miss Universe pageant, where she was the 2nd runner up.[1] In her answer to her final question at the pageant, Sapre talked about the lack of sports fields in India for athletes to practice on. Her rather unusual answer made her the third finalist that evening instead of the winner.
Madhu says "All the officials had told us that our answers had to be truthful," she says, "and coming from the heart. Nobody told us we had to be politically correct. I said what my heart told me and I lost. According to me India has been in poverty for many years, so it was not going to suddenly change in one year by my becoming the prime minister. But there are other areas like art and sports in which we can improve. And being a sportsgirl I had suffered because we don't have the equipment and the grounds in India. In the brief time you get to answer I wanted to say all this but perhaps because of my inadequacy in English, I could not express myself."
शिवाय, (१९९१ नंतर जे बदल व्हायला लागले त्यात) नग्नता या विषयावर समाजमन ढवळून काढायला सुरूवात करणाऱ्यांमध्ये मधू सप्रे आणि मिलिंद सोमण होते हे नाकारता येत नाही. (आता तो फोटो पाहून "ह्यात काय आहे आरडाओरडा करण्यासारखं" असं वाटतं.)
याशिवाय मधू सप्रे ही एक यशस्वी मॉडेल आहेच.
बाहुली
मॉडेल म्हणजे काही तरी सुबक सुंदर डंब बाहुलीसारखं असणं ह्या समजाला मधू सप्रेनं छेद दिला. ती रूढ अर्थानं 'जाहिरातीतल्यासारखी' सुंदर नव्हती. त्यामुळे तिला यश किती मिळालं ह्यापेक्षाही भारतीय मॉडेलविश्वात तिनं नवा पायंडा पाडला हे तिचं योगदान अधिक महत्त्वाचं ठरतं. शिवाय, पार्ल्यातल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेली मुलगी ग्लॅमरस आणि बोल्ड असू शकते हेदेखील तिनं दाखवून दिलं.
दत्तात्रेय गोडबोले
पुण्यस्मरण: अश्लीलताविरोधी विचारांना तर्कशुद्ध विचार देणारे लेखक दत्तात्रेय गोडबोले (१९७४)
..............या लेखकाचे लिखाण कुठे उपलब्ध आहे ? जालावर माहिती मिळाली नाही. जालीय महाराष्ट्र ज्ञानकोश, विश्वकोशातही नाही. 'दत्तात्रेय'ऐवजी 'दत्तात्रय' असे टंकूनही नाही.
'अप्सरा' खटला
एवढाच संदर्भ मिळाला : http://www.loksatta.com/navneet-news/kokan-agricultural-university-2-15…
जनार्दन आगासकर
१८ जुलैच्या दिनवैशिष्टयामध्ये 'पुण्यस्मरण' ह्या सदरामध्ये पुढील नोंद आहे: 'मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश जनार्दन आगासकर (१८९४)'
ह्याबाबत अन्य काही माहिती, तिचा स्रोत असे काही मिळेल काय? हे नाव आजतागायत कधीच नाझ्या वाचनामध्ये आलेले नाही. मुंबई विद्यापीठाचे सुरुवातीचे पदवीधर, मुंबईमध्ये समाजाच्या वरच्या स्तरामधील त्याच त्याच व्यक्ति साधारणपणे अनेक जागी आपल्या पुढे येतात. तेथे कोठेच हे नाव पाहिलेले नाही. रानडे-तेलंगांच्या - हे दोघे तत्कालीन उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते - संदर्भामध्येहि हे नाव पुढे आलेले नाही.
गूगलमध्ये वा गूगल बुक्समध्ये कसाहि शोध घेतला आणि नावाचे स्पेलिंग कसेहि बदलून घातले तरी एकहि लिंक हाताला लागत नाही. म्हणून ही उत्सुकता.
(श्रीपाद बाबाजी ठाकुर, मुंबई इलाख्यातील पहिले आय.सी. एस., १८६९ च्या पहिल्या चार हिंदुस्थानी आय.सी.एस. पैकी एक, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी आणि आर. सी.दत्त ह्यांचे सहाध्यायी, हे असेच एक दुर्लक्षित नाव. त्यांच्याबाबत काही लिहिता येईल असे ह्यावरून सुचले. सवडीनुसार करेन.)
अधिक माहिती
विसोबा खेचर नामदेवांचे गुरू होते. अधिक माहिती -
मराठी विश्वकोश - मराठी साहित्य - नामदेव व इतर संत
म.टा. संपादकीय - 'संतांची बंडखोरी'
विसोबा खेचर
'विसोबा खेचर' ह्या मध्यकालीन सन्ताच्या नावातील 'खेचर' हा गाढव-घोडा संकरातून जन्मलेला प्राणी अशा अर्थाने घ्यावयाचा नसून 'खे चरति' (आकाशात भ्रमण करतो) अशा अर्थाने घ्यावयाचा आहे. वाघावर स्वार होणार्या चांगदेवाप्रमाणे ह्यांच्याभोवतीहि योगसाधनेचे वलय असणार आणि त्यामधून ही उपाधि त्यांना चिकटली असणार असा पटण्याजोगा अंदाज वर्तविता येतो.
हे वापरत असलेल्या 'नंदभाषे'बद्दल दोन वर्षांपूर्वी मी येथे लिहिलेल्या 'पैसाअडका' ह्या धाग्यामध्ये पुढील वर्णन आहे अणि विसोबा खेचरकृत एक स्तवनहि तेथे दिले आहे. ते असे:
"(ह्यापुढील ’नंदभाषे’चे वर्णन दाते-कर्वेमध्ये सापडले. मलातरी हे पूर्ण अज्ञात होते. सर्वांच्या माहितीसाठी येथे देत आहे.)
नंदभाषा: बाजारात इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’नंदभाषा’ नावाची एक सांकेतिक भाषा वापरत असत. त्या भाषेमध्ये नाण्यांच्या उल्लेखांसाठी विशेष शब्द आहेत. त्यातील अर्थ: केवली, भुरका - एक, आवरु - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा, पवित्र - सात, मंगी - आठ, तेवसू, लेवनू - नऊ, अंगुळू - दहा, एकडा - अकरा, रेघी - बारा, तेपरु - तेरा, चोपडू - चौदा, तळी - पंधरा. एक, दोन इत्यादींचे सांकेतिक शब्द, नंतर तान असा शब्द आणि तदनंतर तळी (पंधरा) असा शब्द जोडून सोळा, सतरा इत्यादींचे संकेत होत असत, जसे भुरका तान तळी - सोळा, आवरु तान तळी - सतरा इ. त्याचप्रमाणे बिटी - शंभर, ढकार - हजार, नाण्यांसाठी संकेत: भुरका - एक रुपया, टाली - अर्धा रुपया, पकार - चार आणे, चकार - दोन आणे, दुकार - एक आणा, फाटा - आणा, अवारु फाटे - दोन आणे.
(ही संकेतभाषा त्या काळात बर्याच जणांना माहीत असावी कारण ह्या संकेतात बांधलेली विसोबा खेचरांची एक रचना दाते-कर्वे देतात: (ही पंचानन शंकराची स्तुति दिसते.)
मुळु वदनाचा। उधानु नेत्रांचा। अंगळू हातांचा। स्वामी माझा॥ मुगुट जयाचा। केवळ्या आगळी काठी। पवित्र तळवटी। चरण ज्याचे॥ ढकार वदनाचा। आला वर्णावया। जिह्वा त्याच्या चिरल्या। वर्णवेना॥ शेली वेडावली। पोकू मौनावली। अंगुळूमंगी थकली। नकळे त्यासी॥ सद्भावे शरण। अवारु जोडून। खेचरविसा म्हणे। स्वामी माझा॥
अर्थ: पाच मुखांचा, तीन नेत्रांचा, दहा हातांचा माझा स्वामी आहे. (मुगुट जयाचा। केवळ्या आगळी काठी। पवित्र तळवटी। चरण ज्याचे॥ ह्याचा अर्थ मला लागत नाही. केवळ्या १, काठी २०, पवित्र ७ असे दाते-कर्वे सांगतात.) एक हजार मुखांचा वर्णन करायला लागला, त्याच्या जिभा चिरल्या पण वर्णन पूर्ण झाले नाही. (शेली वेडावली। पोकू मौनावली। अंगुळूमंगी थकली। नकळे त्यासी॥ ह्याचाहि अर्थ मला लागत नाही. शेली ६, पोकू ४, अंगुळूमंगी म्हणजे १०+८=१८ असे दाते-कर्वे सांगतात.) सद्भावाने शरण जाऊन दोन (हात) जोडून विसा खेचर म्हणतो - स्वामी माझा."
ज्यू नववर्ष?
मागे ह्या तारखेनुसार नसणार्या ज्यू नववर्षाचा तर स्पेशल उल्लेख झाला होता ना? :)
थ्यँक्यू 'न'वी बाजू
तारखेप्रमाणे असेल तरच लिहीण्याचा निर्णय अलिकडच्या काळात कधीतरी घेतला कारण ही अशी पानं बनवणं सुरू आहे.
त्या निमित्ताने दिनवैशिष्ट्य नक्की का वाचता (किंवा दोन-चार लोक का लिहीतात), याचा विचार करायला हरकत नाही. सणासुदीच्या शुभेच्छांची देवघेव दिनवैशिष्ट्यातून व्हावी असं वाटतं का?
विन-विन
त्या निमित्ताने दिनवैशिष्ट्य नक्की का वाचता (किंवा दोन-चार लोक का लिहीतात), याचा विचार करायला हरकत नाही.
व्यक्तिशः, अधोरेखिताचे प्रयोजन मला कळलेले (वा पटलेले) नाही. परंतु, 'ऐसीचालकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य (+ हौस)' म्हणून त्यास आम्ही सोडून देतो, इतकेच.
शिवाय, त्यानिमित्ताने आमच्या अवांतरलेखनास अधूनमधून आणखी एक च्यानेल मिळतो; सबब, ही अधिकची फुकटची संधी का सोडा?
त्यापेक्षा...
...पूर्वी तारा (ईमृशांदे) असत, तेव्हा शुभेच्छांच्या तारांना नंबर असत. अशी तार पाठवताना (पैसे वाचविण्यासाठी) केवळ ज्यास तार पाठवावयाची, त्याचा पत्ता आणि शुभेच्छातारेचा नंबर, एवढे देऊन भागत असे. तारखाते बाकीचे सांभाळत असे, आणि पाठविणार्यास फक्त पत्त्यातील शब्द अधिक तारक्रमांकाचा एक शब्द एवढ्याच शब्दांचे पैसे पडत.
असे काही करता आल्यास उत्तम.
भीमरूपी महारुद्रा?
का कोण जाणे, पण तपशिलात किमान काही सहस्रकांची चूक वाटते आहे.