दोन प्रेमकविता
अर्थातच याही कविता पूर्वप्रकाशित आहेत.
दोन निरनिराळ्या मूड्समधल्या या कविता. संबंध म्हटला तर नाही, म्हटला तर आहे.
***
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा
'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.
'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
(२९ ऑक्टोबर २००७)
***
पुन्हा या रस्त्यांवरून
शरीराच्या शरीरावर उमटणार्या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्या.
मान्य.
पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्या
नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.
तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.
पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...
(१७ जानेवारी २०१४)
***
लोल! आता तिसरी परवाची कविता
लोल! आता तिसरी परवाची कविता दाखवली तर परत आणिक एक पूल बांधशील की! तारखा एवढ्याकरता लिहिल्या, की 'दोन्हीत काही संबंध आहे का? कोण हा प्रियकर?' छापाचे प्रश्न येऊ नयेत. तर - असो!
स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.
कविता पुन्हा सावकाश, सवडीने
कविता पुन्हा सावकाश, सवडीने वाचेन.
स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.
ललित लेखनाची जशी चिरफाड नको तसं चिरफाड करत समर्थनही नको वाटतं. पण कधीतरी हा विषय निघेल तेव्हा तुझी आठवण होईल.
अर्थ समजावून सांगण्याचा
:( अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं मुळात कविता गंडल्याचंच लक्षण. पण प्रयत्न करते -
जे नातं उद्या कदाचित शरीरसंबंधात परिणत होण्याची शक्यता आहे, अशा नात्याबद्दलची ती कविता आहे. उद्या प्रियकर आणि प्रेयसी आणि पुढे अजूनही काही, अशा रूढ नात्यांत शिरलोच आपण, तर त्यातल्या चौकटी निराळ्या असतील. त्यांचे फायदे-तोटे निराळे. ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता जे काही आहे, ते मात्र अमोल आहे. ते अनुभवून घेऊ या, असं कवयित्री (कैच्याकै वाटतं हो आपल्याच कवितेबद्दल या टोनमध्ये बोलणं, छ्या!) म्हणते आहे.
एक आठवलेली कविता
तुझी कविता वाचताना कुसुमाग्रजांची आठवलेली एक कविता
नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्या वाहात जाई ॥ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ।
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ॥गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा ।
मंझिलकी जयाची तारांगणात राही ॥
तशाच धाटणीची सोनाली वायकुळ
तशाच धाटणीची सोनाली वायकुळ यांची , माझी अतिशय आवडती कविता - http://www.misalpav.com/node/17033
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?
नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती
म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात
सप्तरंगी लोलक
"स्त्री-पुरुष" नात्याचा संदर्भ असलेल्या, निर्मम मनाने भोगाव्या अशा या दोन कविता. कौतुक करण्यास शब्द थिटे आहेत. सुंदर शब्दरचनेबरोबरच शृंगार, समर्पण, प्रेम, मोह, मत्सर यांचा सप्तरंगी लोलक श्ब्दाशब्दातून जाणवत रहातो. कल्पनेच्या पंखांबरोबरच वास्तवाचे भान शब्दबद्ध केलेल्या अलवार कविता. खूप आवडल्या.
दुसरी प्रचंड आवडली! पहिलीही
दुसरी प्रचंड आवडली!
पहिलीही ताकदीची कविता आहे, मात्र त्यातील काही वाक्य विशेषत: "स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर" मधील स्वामित्त्व शब्द जखम करून गेला :(
एकुणच २००७ ते १४ मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय तर! ;)