माझ ब्राम्हण असण
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :
जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची .
नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली .
बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे अनेक बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत
धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .'
पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे .
एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली .
हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .
आवडला.
लेख आवडला. बहुतांशी सहमत. ब्राह्मणांनाही अलीकडे एका वस्तीत समुदायाने किंवा घेटो करून रहायला आवडू लागले आहे. म्हणजे पुन्हा पूर्वीची 'आळी' पद्धती येतेय की काय. दुसरे निरीक्षण म्हणजे ब्राह्मणांना, विशेषतः ब्राह्मण बायकांना इतर जातींमधल्या रीतिरिवाजांविषयी, सण-उत्सवांविषयी, खाण्याजेवण्याविषयी काहीच माहिती नसते. त्या सुशिक्षित असतात म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा. कुठल्याही मिश्र समुदायात 'आपल्यात हे असं असतं ना?' किंवा 'आपल्यात हे नसतं बाई' अशी वाक्यं सररास उच्चारली जातात. त्या समुदायातली इतर माणसे त्यांच्या खिजगणतीतही नसतात. जणू काही त्या सर्वांची खाण्या-जेवण्याची,वागण्याची एकच पद्धत आहे आणि ती पद्धत म्हणजे 'आपली'च असू शकते, सर्वांची एकच पद्धत असणार, आपली पद्धत तीच सर्वांची असणार वगैरे.
उत्तम
अनुभव सांगणारा लेख आवडला.
तुमचा प्रवास अनेक ओळखीच्या रस्त्यांची आठवण करुन देणारा आहे, पुण्यासारख्या तुलनेने छोट्या शहरांमधे एकंदर कल्चरायझेशनमुळे आपले आणि ते अशा कप्प्यांमधे लोकांची विभागणी सोयीनुसार होणं शक्य आहे, मुंबईमधे मात्र ठेवणीतल्या काही जागा जसे शास्त्री हॉल, पार्ले(?) वगैरे वगळता इतरत्र शहरीकरणामुळे हे ब्राहमणायझेशन फारसं टिकलं नाही असं माझं मत आहे.
धर्मांतर करुनही ब्राह्मणत्त्व जपणारे लोकं आहेत त्यावरुन ते किती खोलं मुरलेलं आहे हे लक्षात येईल, अर्थात खासगी व्याप्तीमधे कप्पे राखण्याचं स्वातंत्र्य अबाधीत असावंच पण सामाजिकरित्या ते कधी आणि कसं जाईल हे सांगता येणं अवघड आहे.
बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .
बहुजन समाजही ब्राह्मणत्त्वाला चुकलेला नाहीच, त्याच्या परिघात तो ब्राह्मण/आब्राह्मण असं पाळतोच, त्यामुळे तो त्याच्या परिप्रेक्ष्याशिवाय अधिक सांगु शकेल असं वाटत नाही, तो परिप्रेक्ष्य तुम्हा-आम्हाला नविन असेल एवढंच.
हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ?
भाषेची आणि व्याकरणाचे विविध नियम लावून हा भेद पाळला जातोच हे तुमच्या लक्षात आले नसावे काय?
काही शंका
मी अकरावीला कला शाखा निवडली . (...) बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क .
शाळेतल्या वर्गात केवळ ब्राम्हणच होते?
मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला .
हे कळले नाही. मिलिंद कॉलेज हे काही विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध असलेले कॉलेज आहे का? किंवा स्वतःचे नाव म्हणून मिलिंद सांगितले, तरीही किस्सा कळला नाही.
शाळेतल्या वर्गात केवळ
शाळेतल्या वर्गात केवळ ब्राम्हणच होते?
नाहि. तोन्डि लावायला काहि अल्प सन्ख्य आनि बहुजन होते.
हे कळले नाही. मिलिंद कॉलेज हे काही विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध असलेले कॉलेज आहे का? किंवा स्वतःचे नाव म्हणून मिलिंद सांगितले, तरीही किस्सा कळला नाही.
सन्धि मिळालि वापरुन घेतो. अभ्यास वाधवा : )
हा घाबरून राहणारा , समाजाच्या
हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो
हे कोणत्याही समाजाच्या बाबतीतले सत्य आहे. त्या त्या समाजधुरिणांना असे ( काल्पनिक का होईना ) शत्रु निर्माण करणं अनिवार्य असतं. त्यांच्या नेतेपणाचा प्रश्न असतो तो. आज एक व्यक्ती म्हणून याकडे लक्ष न देता रोजचं जीवन जगता येतं. ते जगावं आणि आपल्या मुलांना मात्र अश्या या प्रेज्युडायसेस पासून लांब ठेवावं (हे कठीण असतं पण अशक्य नाही) हे उत्तम.
सहमत आहे... लेख आवडला...
सहमत आहे... लेख आवडला...
या लेखातील बर्याच गोष्टी अनेकदा प्रकर्षाने जाणवल्या आहेत...
आजकाल काही ओफिसेस मध्ये देखील "आडनावा"वरुन ओळख केली जाते, group तयार होतो किंवा केला जातो...
विशिष्ट आडनावांच्या लोकांना (तितकेसे कर्तबगार नसूनही किंवा deserve करत नसतांनाही) विशेष सवलती मिळतांना देखील बघितलंय...
काही लोकांच्या इतर जाती बद्द्लच्या (ती अगदी खालची म्हणवणारी असेल असं नाही, पण फक्त आपल्या जातीहून वेगळी असेल तरी) "भ्रामक" कल्पना अजूनही दूर झालेल्या दिसत नाहीत...
समांतर प्रयोग
याच्याशी समांतर प्रयोग मी मागे केला होता.
सर्वेक्षणः http://www.aisiakshare.com/node/1459
विश्लेषणः http://www.aisiakshare.com/node/1476
या सर्व्हतून 'हा भेद आंतर
या सर्व्हतून 'हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का?' याचे उत्तर मिळेल कदाचीत पण 'इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का?' याच्या उत्तरासाठी वेगळा सर्व्हे लागेल.
व्यनिपेक्षा अनामिक सर्व्हे हवा. आणि जात शाळेत फॉर्मवर जी होती ती लिहायची. हा सातींचा प्रतिसाद www.aisiakshare.com/node/3093#comment-68531
पूर्ण वैयक्तिक असं-
मुंबईत वाढलेलो आहे, घरातही कधी जात-आड्नाव वगैरे फारसं ऐकलं नाही.
आडनावावरून जात ओळखणारा एक मित्र आहे, त्याचं नेहेमीच कौतुक वाटत आलंय.. कारण हे मला कधीच जमलं नाही.
शाळेत/कॉलेजातही असा फरक जाणवला नाही. मुंबईत कदाचित हे सगळं बाकीच्या रेट्यापुढे फार गौण मानलं जात असावं.
त्यामुळे स्वतः असा अनुभव आला नाहीये. पण जातीपेक्षा आरक्षण वगैरे मुद्द्यावर हिरिरीने चर्चा आणि आकसयुक्त शेरे आमच्या कंपूतच ऐकले आहेत-दोहो बाजूंनी.
त्यामुळे मुंबईच्या व्यवहारात जोपर्यंत आडवी येत नाही, तोपर्यंत रोजच्या धकाधकीत जातीला फारसं मूल्य कोणी दिलेलं अनुभवलं नाहीये.
ह्म्म्म.. हे निरिक्षण काही
ह्म्म्म.. हे निरिक्षण काही ठिकाणी बरोबर वाटतंय (मुसलमान हा वेगळा प्रकार आहे, तो वगळतोय.)
म्हणजे त्या त्या प्रांतासाठी कालिजात राखीव जागा, बरेचदा प्रांताशी निगडीत समस्या, शाळेत तशी भाषा वगैरेचा आग्रह.
पण हे सगळं रोजच्या जगण्यात तेवढंच परिणामकारक आहे का? म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे- अमुकतमुक जातीचा म्हटल्यावर लोकांची तुमच्याशी वागायची पद्धतच बदलून जाते. तसं प्रांतीयांबद्दल कुठे असतं?
वागायची पद्धतच बदलून जाते असा
वागायची पद्धतच बदलून जाते असा लोक निष्कर्ष कसा काय काढतात देव जाणो. रोज किती जातीचे किती नविन लोक कितीदा तरी भेटतात. भारतात तुमच्या सर्कल बाहेर एक रँडम माणूस तुमच्या जातीचा निघायची संभावना फार कमी आहे. याला विशिष्ट जातींना आकर्षित केलेली चार शहरी केंद्रे अपवाद सोडली तर.
मग काय प्रत्येक जागी वागणेच बदलते? उगाच आपलं.
--------------------------------
परप्रातीयांबद्दल 'वागणे बदलते' अशी कोणती मानवी भावना असेल तर ती तितकीच तीव्र असते. अज्याबात फरक नसतो.
अव्हेलाबिलीटी बायस
वर वर पाहता लेख पटतो पण भारतात निदान २० वर्षांपुरीपर्यंत तरी बरेच लोक घेटोमध्येच राहत होते. त्यामुळे एकाच समाजात जास्त मिसळणे होते जिथे शक्य झाले तिथे हा प्रश्न कमी आहे. बाकी आमच्या चाळी मध्ये आमची १-२ ब्राह्मण कुटुंबे सोडली तर बाकीचे सोनार, कुंभार, सुतार असे बरेच होते. आणि प्रत्येक जण आपआपल्या प्रथा सांभाळतच होते. तुमच्यात असे नसते आणि आमच्यात असे असते हे वाक्य मी पण आईकून आहे. थोडक्यात फक्त बामणच असे करतात हा जरा अव्हेलाबिलीटी बायस चा प्रोब्लेम आहे.
लिंक जरूर आईका.
http://www.ted.com/talks/hans_and_ola_rosling_how_not_to_be_ignorant_ab…
बहुतेक ऐसीकर तालुके, जिल्हे,
बहुतेक ऐसीकर तालुके, जिल्हे, मेट्रोंच्या चाळी मोठ्या व्हायल्या लागल्या तेव्हा तिथे गावाकडून विस्थापित झालेले गावाकडचे गरीब लोक गावाकडची अर्धी मूल्ये आणि शहरी अर्धी मूल्ये असलेले पालक, ग्रँडपालक असणारी सवर्ण जातीतली मंडळी आहेत. त्यांच्यामते पारंपारिक भारतीय म्हणजे हे अल्पसंख्य निम्नशहरी!!!
================
"भारतीय गावकरी लोकांत"
ब्राह्मण स्वतःला लै शाणे समजत. हो? मग मराठे त्यांना लै पुळचट समजत!!!
मराठे स्वतःला लै शूर समजत? हो? मग ब्राह्मण त्यांना लै मूर्ख समजत!!!
असे अनेक हिशेब प्रत्येक दोन जातीत. फिट्टंफाट.
पण तेव्हाचे समाज असे होते का? असले हिशेब करत का? असल्या गप्पा, विचार कोण करी? इतर कारणांनी प्रेरित भांडण करताना जात देखिल मधे आणणारे लोक.
========================
निदान २० वर्षांपुरीपर्यंत तरी बरेच लोक घेटोमध्येच राहत होते.
अशी रोचक विधाने लोक का करत असावेत? हिंदूंमधे ब्राह्मण (जंगमांसारखे अपवाद सोडले तर ) हा एकच पुरोहित असतो. त्याला झक मारीत गावातली सगळी लग्ने, जन्म, मृत्यू, सत्यनारायण करावे लागतात.
अगदी अगदी. पुणेकर ही जमात लै
अगदी अगदी. पुणेकर ही जमात लै काही युनिक नाही त्याबाबतीत. शिवाय एकवेळ असे मानून चालू, की पुणेकर अख्ख्या जगातले एक नंबरचे जातीयवादी अन तुच्छतापूर्ण लोक आहेत.
बरं मग???? ते तसे असतील तर त्यांचं बोलणं मनाला का लावून घ्यावं? बहुधा कुठेतरी अगोदरच असलेला न्यूनगंड अशा गोष्टींमुळे रीइन्फोर्स होत असावासे वाट्टे.
मेंदू
मानवी मेंदूत संदर्भानुसार लेखन्/दृश्य रिकन्स्ट्रक्ट करण्याची क्षमता असते.(उदा :- विविध सायतींवर तपासणीसाठी दिली गेलेली धूसर अक्षरं/शब्द्--कॅप्चा)
उदा :-
Aoccdrnig to a reersach peapr at an Elingsh uinervtisy, it deson't mttaer in waht oredr the ltteers in a wrod are, the olny iprmoetnt tihng is taht the frist and lsat ltteer is at the rghit pclae. The rset can be a toatl mses and you can sitll raed it wouthit porbelm. Tihs is bcuseae we do not raed ervey lteter by it slef but the wrod as a wlohe.
.
.
Tahts rdiuculios! बट It mkeas tatol snese.
;)
चर्चा
तोच तो विषय असला तरी चर्चा वाचायला आवडेल.