Skip to main content

टू मिसेस वाल्या कोळी

अर्थातच पूर्वप्रकाशित वगैरे!

सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती.
नातेवाईक धरून ठेवणं.
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं.
लोकांना रुचेल तसं(च) वागणं.
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं,
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही.
जोरदार आणि समजूतदार समर्थन.
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण.
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं.
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला.
ठिणगी संपली.
संघर्ष संपला.
चेतना संपली.
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग.
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला
एकटे असायला,
न भिणारे.

***

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 16:12

In reply to by वामा१००-वाचनमा…

दिसल्या तशा बर्‍याच ओळी. पण शेवटी उलट्या ओळी आहेत. आणि या सगळ्याचा वाल्यासाहेबांच्या बायकोशी काय संबंध मात्र ३०००० फूटांवरून गेले.

मेघना भुस्कुटे Tue, 07/10/2014 - 21:20

In reply to by वामा१००-वाचनमा…

वाल्या कोळ्याची गोष्ट माहीत आहे तुला?

वाल्या कोळी जंगलात वाटमारी करून आपलं नि कुटुंबाचं भागवत असे. एक वाटसरू लुटला, की जवळ ठेवलेल्या रांजणात एक खडा टाकायचा असं त्याचं रजिस्ट्रेशनही चालायचं. असं करता करता एक दिवस रांजण भरत आला. तेव्हाच जंगलातून नारदमुनी चालले होते. त्यांना वाल्यानं प्रथेप्रमाणे अडवलं. नारदमुनी पडले वस्ताद. ते लुटून घ्यायला बसलेत! त्यांनी चुपचाप पैसाअडका काढून देण्याऐवजी वाल्याची उलटतपासणी चालू केली. 'कसला रांजण?', 'कसले खडे?', 'किती लोकांना लुटलंस?', 'किती धन लुटलंस?'... वगैरे वगैरे. वाल्यानंही रांजण भरल्याच्या खुशीत आढ्यतेत मुनींना उत्तरं दिली. पण नारदमुनींच्या एका प्रश्नावर त्याची तंतरली.

"तू लुटालूट केलीस. त्या धनाचा तुझ्या कुटुंबानं उपभोग घेतला. आता तुझ्या पापाचा घडा भरला. त्याबद्दल तू नरकात जाशील. आता तुझ्या पापातही तुझ्या कुटुंबाचा वाटा असेल काय?"

वाल्या चूप. काही न सुचून तो बायकोला विचारायला घरी गेला. बायकोनं हात वर केले. "तू पैसे कसे मिळवून आणलेस, ते मी तुला विचारलं का? की पैसे मिळवून आणण्याचा हा मार्ग मी तुला सुचवला? तू काय करत होतास, हेही मला ठाऊक नाही. तू मला प्रेमाखातर पैसे दिलेस, मी घेतले. तू केलेलं पाप फक्त तुझं एकट्याचं. मी काही तुझ्या पापात वाटेकरी नाही."

इथून पुढे वाल्याला कसा पश्चात्ताप झाला, त्यानं पकाव नामस्मरणबिमस्मरण करून पापपुण्याचा ब्यालन्स कसा साधला आणि त्याचा वाल्मिकी कसा झाला, ते सगळं पॉपकल्चरमध्ये सापडतंच. पण मला त्यात इंट्रेष्ट नाही.

मला मिसेस वाल्या कोळींचं वक्तव्य आवडलं. 'आपल्या आधीच्या पिढीनं, आपल्या नातेवाइकांनी आणि 'आपला समाज' म्हणून जन्मामुळे आपल्या माथी मारल्या जाणार्‍या लोकांनी केलेल्या धंद्यांचा गिल्ट मी का वाहू? मी तो वाहणार नाही. मी मला हवी तशी, पटेल तशीच वागीन. मी माझ्या नशिबाची.' असा अ‍ॅटिट्यूड होता त्याच्यात. त्यावर मी फिदा झाले. ही कविता लिहिली तेव्हा वाल्याच्या गोष्टीतली आपली कसलीच नावनिशाणी न ठेवता राहून गेलेली ही बाई डोक्यात होती. म्हणून कवितेचं शीर्षक तिला वाहिलेलं.

तिरशिंगराव Wed, 08/10/2014 - 11:40

In reply to by वामा१००-वाचनमा…

या फ्रेज मधे मेंदूलाच बॉक्स म्हटले आहे का ?
कवितेबद्दल म्हणाल तर, तरुणपणी असंच सगळं झुगारुन द्यायचं वेड होतं माझ्याही डोक्यात! पण वय आणि अनुभव वाढला तशी जहाल मते बदलत गेली. सगळ्या जगाला बदलण्याची खुमखुमी विरुन गेली आणि सुधारणा फक्त स्वतः पुरती मर्यादित ठेवायची असते हे शिकलो.

अंतराआनंद Wed, 08/10/2014 - 18:03

In reply to by मेघना भुस्कुटे

कविता मस्तचं आहे. मिसेस वाल्या कोळीला का हे कळलं नव्ह्तं. आता कळलं.
पण हे चुकीचं नाहीय का? जर

'आपल्या आधीच्या पिढीनं, आपल्या नातेवाइकांनी आणि 'आपला समाज' म्हणून जन्मामुळे आपल्या माथी मारल्या जाणार्‍या लोकांनी केलेल्या धंद्यांचा गिल्ट मी का वाहू

?
अशी भूमिका स्वार्थी नाहीय का? हा गिल्ट त्यानेही वाहू नये ( कारण समाजाने त्याच्याही माथी मारल्याने तो हे करतोय ) , असं नाही का वाटलं तिला? हे आपलं बरयं ; फायदा होतोय तोपर्यंत मी आहे तुझ्यासोबत नाहीतर तू तुझा मी माझी. प्रेमाखातर दिलेले पैसे घेता येत असतील तर गिल्ट ही शेअर करता यायला हवा नाहीतर तो मिटवता यायला हवा नाही का?
अर्थात कवयित्री म्हणून तुला हवा तसा विचार करायचं स्वातंत्र्य आहेच .
अवांतर: काही वर्षापूर्वी कल्याणमधील एक घटना आठवली. आपला नवरा विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास करतोय, आणि समजावून्ही उपयोग होत नाहीय हे लक्षात आल्यावर बायकोने पोलिसात तक्रार केली होती.

वामा१००-वाचनमा… Wed, 08/10/2014 - 18:05

In reply to by अंतराआनंद

आपला नवरा विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास करतोय, आणि समजावून्ही उपयोग होत नाहीय हे लक्षात आल्यावर बायकोने पोलिसात तक्रार केली होती.

वा! मानलं धाडसाला अन सचोटीलाही. खरच टाळ्या.

अंतराआनंद Wed, 08/10/2014 - 18:21

In reply to by वामा१००-वाचनमा…

खरचंय. माझ्याही म्ह्णूनच लक्षात राहीली ती बातमी. या घटनेचे तिच्या संबधितांमध्ये काय पडसाद उमटले असतील यावर तेव्हा मी एवढा विचार केला होता, की एखाद्या कथालेखकाला किती छान कथा बेतता येइल यावर असं वाटलं.
अवांतर : स्मायली कसा द्यायचा?

मेघना भुस्कुटे Wed, 08/10/2014 - 22:29

In reply to by अंतराआनंद

हो आणि नाही. सविस्तर नंतर.

तुम्ही म्हणताहात तीही नाण्याची एक बाजू आहेच. पण हे जेव्हा लिहिलं, तेव्हा माझं डोकं निराळ्या दिशेनं चालत होतं.

आईवडिलांनी आपल्याला वाढवताना केलेला तथाकथित स्वार्थत्याग आणि तत्सम गोष्टींमुळे आपल्या अनेक चुकीच्या कृतीही कशा समर्थनीय ठरतात, ते सांगणार्‍या लोकांची आजूबाजूला चलती होती. त्या सुमारास ही गोष्ट नव्यानं ऐकण्यात आली आणि डोक्यात राहून गेली. पुढेही तिचे संदर्भ डोक्यात येत राहिले. तथाकथित विकासाची फळं चाखणार्‍या सर्वसामान्य माणसानं प्रश्न विचारावेत की न विचारावेत, त्याची रोजीरोटी कमावण्याची लढाई पाहता त्याच्याकडे या प्रश्नांसाठी किती वेळ आहे / असला पाहिजे, त्यानं तो काढणं ही त्याची जबाबदारी + गरज आहे की नाही, अशा अनेक निरुत्तर प्रश्नांमध्ये वाल्या कोळ्याची बायको डोकावत राहिली. इमोशनल ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जाण्यार्‍या प्रेम या गोष्टीच्या तुलनेत त्या बाईचा सडेतोडपणा (किंवा नागडा स्वार्थ - काहीही म्हणा) अधिक आकर्षक वाटत राहिला, इतकं खरं.

बाकी - शीर्षकाची नथ कवितेच्या नाकाला बोजड झालीय हे खरंच आहे. पण विशोभित दिसत नसावी, इतकीच क्षीण आशा शिल्लक आहे!

ऋषिकेश Tue, 07/10/2014 - 18:24

तुफान! म्हंजे लैच तुफान!

गोतावळा आणि गुंतवळ या शब्दातील साधर्म्य केवळ नादाचे व/वा व्यंजनांपुरतेच सिमित नसावे!

राजन बापट Wed, 08/10/2014 - 20:17

कविता आवडली.
शीर्षकाबद्दल :
१. सुरवातीला वाल्मिकी ऋषींनी दोनदोन "बिर्‍हाडं" केली होती का काय असा प्रश्न पडला होता.
२. मग नंतर शीर्षकात दोन बायकांकडे निर्देश नसून त्यांच्या बायकोला संबोधून/उद्देशून ती कविता लिहिली आहे ही ट्यूबलाईट पेटली.
३. मग काही क्षण शीर्षकाचा अर्थ उलगडवण्यात गेले.
४. मग तो स्पष्टीकरणाचा प्रतिसाद वाचला. तो आवडला हे नमूद करतो.
५. कविता छानच आहे. पण कवितेपेक्षा शीर्षक ज्यास्ती आवडले. एकदम सस्पेन्स स्टोरी. :-)

जाता जाता : सानेगुर्जींनी "ल मिझराब्" य फ्रेंच कादंबरीचं भाषांतर "गोड गोड गोष्टीं"मधे केलं तेव्हा त्यांनी Jean Valjean चं नामांतरण "वालजी" असं केलं होतं. तसं शीर्षकात "टू मिसेस Wally, the fisherman" असं करायला हरकत नव्हती :-)

मेघना भुस्कुटे Wed, 08/10/2014 - 22:32

In reply to by राजन बापट

सुरुवातीचे पाचही जोरदार फटके आणि जाता जाता शेवटच्या बॉलवर हाणलेली शालजोडीतली सिक्सर चुपचाप स्वीकारण्यात आलेली आहे. :-|