अचूक मराठी लेखनासाठी मदत
दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुढे आलेली एक बाब म्हणजे मुद्रितशोधन. तसा प्रत्येकानेच थोड्याफार प्रमाणात या कामाला हातभार लावला असला तरी मेघना भुस्कुटे, अमुक आणि चिंतातुर जंतू यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी ही बारीक फणी फिरवल्यामुळे ऐसीच्या दिवाळी अंकात शुद्धलेखन, भाषेचा वापर, विरामचिन्हांचा उपयोग इत्यादी बाबतीतल्या चुका अत्यंत नगण्य स्वरूपात आहेत अशी आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. दुर्दैवाने न राहिलेल्या चुका दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना किती काम करावं लागलं याची कल्पना येत नाही.
अर्थातच मुळातल्या लेखनात कमीत कमी त्रुटी असतील तर मुद्रितशोधनाचं काम करायला वेळ कमी लागेल हे उघडच आहे. काही वेळा अनेक गोष्टी नजरचुकीने घडतात. तेव्हा लेखन करताना नुसतं भान पाळणंही मुद्रितशोधकांचा वेळ प्रचंड प्रमाणावर वाचू शकतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर बोली आणि लेखी भाषेची सरमिसळ लिहिताना सहज होऊ शकते. झाले, केले, येणे असं काही वेळा तर झालं, केलं, येणं असं काही वेळा लिहिण्याच्या ओघात लिहिलं जाऊ शकतो. लिहिताना हे लक्षात ठेवलं आणि प्रसिद्धीपूर्वी त्यातून राहिलेल्या चुका दुरुस्त केल्या तर मुद्रितशोधनाचं काम प्रचंड हलकं होऊ शकेल.
म्हणून दिवाळी अंकाच्या लेखकांसाठी एखादं 'स्टाइल गाइड' (मराठी प्रतिशब्द/अनुवाद सुचवा) तयार करावं अशी कल्पना पुढे आली. ते करण्यासाठी संपादक प्रयत्न करत आहेतच. शिवाय ऐसीच्या वाचकांकडूनच सूचना आलेल्या आवडतील.
या स्टाइल गाइडमध्ये
१. नेहमी लेखनात दिसून येणाऱ्या चुका टाळण्यासाठी काय करावं याबद्दल सूचना असाव्यात.
२. परिपूर्णतेपेक्षा उपयुक्ततेवर भर असावी. तेव्हा शक्य तितक्या मोजक्या पण महत्त्वाच्या सूचना असाव्यात.
हे गाइड तयार करताना संपादकांनी केलेल्या काही सूचनांनी मी सुरूवात करतो आहे. जसजशा नवीन सूचना येतील त्याप्रमाणे या लेखात मी त्यांची भर घालेन. सर्व संपादक त्यावर हात फिरवतील आणि ऐसीवर ज्याप्रमाणे 'मराठीमध्ये टंकनासाठी मदत' असा धागा आहे, तसाच हा उपयुक्त ठरेल.
शुद्धिचिकित्सक
- शुद्धलेखन तपासण्यासाठी फायरफॉक्स अॅडऑन पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/
सर्वसाधारण संकेत
- लेखी (करावे, माझे, तुझे इ.) आणि बोली (करावं, माझं, तुझं इ.) यांत सातत्य असावं. ललित लेखनात उद्गार असल्यास त्यात बोली आणि निवेदनात लेखी इतका फरक ठीक. पण एरवी निदान एका लेखात तरी कोणतीही एकच एक शैली राखावी.
- बोलीच्या शैलीत लिहिताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर शीर्षबिंदू देण्यापूर्वी शीर्षबिंदूऐवजी मात्रा वापरली तरी शब्द अर्थपूर्ण राहतो का ह्याची चाचपणी केलेली चांगली. चुकीच्या शीर्षबिंद वापराची काही उदाहरणे: मस्तं, भावविश्व ऐवजी 'भावं विश्व' असे लिहिणे इ.
- पूर्णविरामाआधी आणि स्वल्पविरामाआधी रिकामी जागा (स्पेस) सोडू नये. विरामांनंतर एक जागा जरूर सोडावी.
- शब्दयोगी अव्ययं शब्दाला जोडून लिहायची असतात. ‘अदितीदेखील’ - योग्य. ‘अदिती देखील’ – अयोग्य.
- दुहेरी अवतरणचिन्हं (“...”) ही फक्त व्यक्तीचे उद्गार दर्शवायला वापरायची. विवक्षित तपशील दाखवण्यासाठी, नावाचा निर्देश करण्यासाठी, एखाद्या शब्दाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एकेरी अवतरणचिन्हं (‘...’) वापरावा.
- अनेक गोष्टींची जंत्री दाखवताना स्वल्पविरामाचा वापर करावा. पण त्या जंत्रीतही पोटप्रकार आल्यास तिथे अर्धविराम (;) वापरावा.
- सामासिक शब्द : तत्सम शब्द स्वतंत्र लिहिताना दीर्घान्त लिहिला जातो. पण समासात प्रथमपदी आला आणि र्हस्वान्त असेल तर मात्र र्हस्वान्त लिहिला जातो. उदा : कवी योग्य. कवि अयोग्य. पण कवीराज मात्र अयोग्य. तिथे कविराज योग्य.
- '...' व उद्गारचिन्हांचा अतिरेक टाळावा.
काही विशिष्ट शब्द/अक्षर रूपांविषयी
- पाहा, वाहा, राहा (पाहणे, वाहणे, राहणे; पाहताना, वाहताना, राहताना; पाहत, वाहत, राहत) ही योग्य रूपं. मात्र आज्ञार्थासाठी पहा, रहा, वहा अशी रूपेही चालतील.
- बहुतांश मराठी शब्दांत (जसे युद्ध, वृद्ध इत्यादी) द्ध योग्य. ध्द अयोग्य.
- तत्समेतर मराठी अकारान्त शब्दांमध्ये उपान्त्य स्थळी उकार, वेलांटी असल्यास दीर्घ द्यावी. उदा. घरून, येऊन, चूळ, नीट इ. शब्दाला 'ही', 'च' असे प्रत्यय लागले असतील तर नियम लावण्यासाठी प्रत्यय काढून उरलेल्या शब्दाला लावावा आणि मग प्रत्यय परत लावावा. उदा. कुठूनही, चूकच इ.
परभाषिक शब्दांविषय़ी
- परभाषिक शब्दांसाठी मराठीत प्रमाण किंवा रुळलेला संकेत असला, तर तो वापरावा. उदा : रशिया, रशियन, पॅरिस, वगैरे
- काही परभाषिक शब्दांसाठी मराठीत पर्याय असला, तरीही परभाषिक शब्द जर मूळ लिखाणाच्या प्रकृतीला साजेसे असतील, आणि मराठी प्रतिशब्द त्या लिखाणप्रकृतीच्या मानानं बोजड वाटत असले, तर मूळ लिखाणातले परभाषिक शब्द तसेच ठेवायला हरकत नाही. उदा : कंप्यूटर-संगणक, इंटरनेट-आंतरजाल, डेटा-विदा, परस्पेक्टिव्ह-परिप्रेक्ष्य वगैरे.
तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी वाचताना दातातल्या खड्यांसारख्या खटकत असतील त्यांविषयी सकारात्मक सूचना केल्यास आवडेल. दिवाळी अंक लेखनासाठी अंतिम स्टाइल डॉक्युमेंट तयार करताना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद.
लेख प्रकाशित केला होता तेव्हा
लेख प्रकाशित केला होता तेव्हा 'संस्थळाची माहिती' प्रकारचा असल्यामुळे प्रतिक्रिया देण्याची सुविधा नव्हती. आता वाचकांना प्रतिसाद देण्यासाठी धागा खुला केला आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व.
जुना वाद.
वरील सूचना बह्वंशाने योग्यच आहेत. पण 'कवि' का 'कवी' अशा प्रकारचे चिरहरित वाद ह्यामुळे सुटणार नाहीत. शासनाच्या नियमांनुसार 'कवी' हेच योग्य हा युक्तिवाद सर्वांना मान्य आहे असे मुळीच नाही. अशा वादग्रस्त बाबी लिहिणार्याच्या इच्छेवर असाव्यात हेच योग्य.
प्रथमेचे रूप मानून चालवून घ्या की हो!
प्रथमा एकवचनाचे विभक्तिरूप मानून चालवून घ्या की हो! (हा उपाय सुटसुटीत आहे, त्यामुळे सामासिक शब्दांत "कवि" हे रूप राहाते, कारण समासामधील पूर्वपदांना विभक्तिप्रत्यय लागत नाहीत. )
आज मराठी भाषेत संपादकीयात वा वार्तांमध्ये "कवी"ऐवजी "कवि" असे छापणारे असे एक तरी प्रमुख वर्तमानपत्र असे आहे का? जर असे नसेल, तर शासकीय नियमावली "सर्वांना" मान्य नसली, तरी शिष्टसंमत आहे, प्रतिष्ठितांपैकी बहुप्रचलित आहे, असे मानायला काही हरकत नाही. (वर्तमानपत्रे ही शासनावेगळी आहेत, हे सांगणे नलगे)
ललित लेखन आणि काव्यात लेखक-कवीच्या प्राथमिकता वेगळ्या असू शकतील.
बॉँडेज
लैंगिक क्रियांच्या बाबतीत काही व्यक्तींचा कल 'बॉँडेज' कडे असतो. या प्रकाराचे सर्वसाधारण नियम असे की वैशालीला बांधण्यापूर्वी अशोकला तिची परवानगी घ्यावी लागते. तिने ती दिल्यासच तो तिला बांधू शकतो. आणि तरीदेखील 'आता मला सोड' असं ती केव्हाही म्हणू शकते, आणि अशोकला तिचं म्हणणं ताबडतोब मान्य करावं लागतं.
शुद्धलेखनाच्या नियमांसाठी हे मॉडेल उपयुक्त आहे. म्हणजे 'अमुकतमुक नियम पाळ' असं 'ऐअ' ने लेखकाला म्हणून पाहावं. त्याला ते पाळावेसे वाटले तर ठीकच. पण 'मी ते जाणूनबुजून अव्हेरतो आहे' असं जर लेखक म्हणाला तर ते 'ऐअ' ने चालवून घ्यावं.
'शासना'च्या नियमांबद्दल माझी भूमिका अशी: महाराष्ट्र शासनाच्या घटनात्मक कक्षेत येणाऱ्या विषयांवर त्याने केलेले कायदे पाळण्याचं बंधन महाराष्ट्रातल्या लोकांवर आहे. आता एकतर 'शुद्धलेखनाचे नियम तयार करणं' हा अशा प्रकारचा विषय नव्हे, कारण मराठी भाषेवर महाराष्ट्र शासनाची कुठल्याही प्रकारची मालकी नाही. शिवाय दुसरं म्हणजे मी महाराष्ट्रातच काय पण भारतातही राहात नाही. सारांश हे नियम पाळण्याचं बंधन माझ्यावर नाही. समजा मला कुणी सांगितलं की अॉस्ट्रेलियन पार्लमेंटने केलेले इंग्रजी लेखनाचे नियम तुझ्यावर बंधनकारक आहेत, तर मी मुळीच ऐकून घेणार नाही. त्यातले शहाणपणाचे वाटतील ते आणि तितके मी स्वीकारीन, बाकीचे नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
बॉंडेजचं उदाहरण वाचून खपल्या
बॉंडेजचं उदाहरण वाचून खपल्या गेलो आहे! (संपादकांना सूचना - इथे खपल्या हा शब्द 'खपली' या शब्दाचं अनेकवचन म्हणून आलेला नाहीये. 'खपणे' या क्रियापदाचं ते रूप आहे. आणि प्रमाण मराठीत 'वाचून खपलो.' किंवा 'खपून गेलो' असं म्हणण्याची पद्धत असली तरी मी विदर्भ का मराठवाड्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीत प्रचलित असलेलं 'केल्या गेले आहे' प्रकारे ते वापरलेलं आहे. तेव्हा ते बदलू नये.)
असो. थोडं गंभीरपणे - या स्टाइल गाइडमध्ये मुद्दामूनच 'नियम' हा शब्द न वापरता 'सूचना' हा शब्द जागोजागी वापरलेला आहे. फेसबुक आणि अॅपलने आपल्या स्त्री कामगारांना दिलेल्या बीजांड-गोठवणुकीसाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच हीही केवळ एक मदत आहे. लेखकावर यापैकी काहीच बंधनकारक नाही. पण त्याचबरोबर दिवाळी अंकाच्या वाचकांना जागोजागी दाताखाली चुकीच्या लेखनाचे खडे लागू नयेत याची काळजी घेण्याची संपादकांची जबाबदारीही आहे. आता तुम्ही म्हणाल की मुद्दाम कोणा विचित्र आचाऱ्याने 'खडे घातलेला भात' तयार करायचा ठरवलं तर काय करावं? प्रश्न विचार करण्याजोगा आहे खरा. निदान त्याने/तिने आपल्या रेसिपीच्या नावात खड्यांची माहिती देणं ही किमान अपेक्षा आहे. असा पदार्थ हौशीने वाढायचा की नाही हा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे.
बॉंडेजचं उदाहरण वाचून खपल्या
अगदी अगदी!!!!!! प्रतिसाद नेमका आहेच, परंतु उदाहरणही अगदी ठ्ठो आहे. ऐशास ठ्ठो नामेकरून श्रेणी अज्जीच नवी निर्मावी, हे विज्ञापना. बहुत काये लिहिणे हे विनंती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आँ
सदर बाबतीत कोणती पार्टी अशोक आणि कोणती पार्टी वैशाली तेच कळेना झालंय.
जाऊ दे. जमेल तसं लिहू. एकसारख्या नियमांनी लिहावं असं माझंही मत आहे. एरवी वाचताना त्रास होतो. शुद्धलेखन आणि बोलीभाषा हे दोन मुद्दे बरेचजण मिक्स करतात. त्याचा काही संबंध नाही. नाय, व्हता, ग्येलतीस, वरडायलाय, पिसाळल्यावानी करतंय हे सर्व शुद्धच. फक्त पिसाळल्यातली पि र्हस्व काढणे इतपत स्टँडर्डायझेशन पाळावे. त्यासाठी नियम किंवा सूचना काय असेल ते लिहिलं गेलंय. लेखकांनी स्वतःच्या लिखाणानंदासोबत वाचकांच्या वाचनसुलभतेचाही विचार करुन इतके करण्याचा प्रयत्न करावा. मेंदूला एकच शब्द दहा ठिकाणी दहा प्रकारे लिहिलेला (र्हस्वदीर्घाच्या बाबतीत) एकाच अर्थाने इंटरप्रीट करणं त्रासदायक होतं.
तिखट, तीखट, तिरवट किंवा अतीरीक्त, अतिरिक्त, अतीरिक्त हे मेंदूच्या दृष्टीने तीन वेगळाले दृश्य सिग्नल्स आहेत. त्याचा अर्थ एकच लावणे हे शक्य असलं तरी रसभंग करणारं असतं.
शुद्धलेखनाबद्दल उगाच डायरेक बंडखोर मोडमधे जाण्याची आवश्यकता नाही. अगदीच प्रस्थापित विरोधाची ओढ असेल तर नवे व्याकरण लिहून सर्व र्हस्व किंवा सर्व दीर्घ असे नियम केले तरी चालेल. एकदोन महिन्यात त्याचीही सवय होईल आणि तेही सटासट वाचता येईल. पण व्यक्तीगणिक एकाच शब्दाची ओढाताण नको. र्हस्वदीर्घामुळे शब्दाला लयही येत असते. लय ही काव्यातच असते हा गैरसमज आहे.
शुद्धलेखनाच्या नियमांसाठी हे
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०#लेखन (संदर्भः ६.६) अन्वये लेखनाच्या बाबतीत सर्वत्र आणि विशेषत: अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात प्रमाण लेखनाला शुद्धलेखन संबोधले जाते. त्याऐवजी प्रमाण लेखन असे संबोधण्यात येईल. हे सुस्पष्ट केले आहे. व्यक्तीशः लेखनास शुद्ध अशुद्ध म्हणण्याच्या आणि तथाकथीत नियमांच्या लांबलचक याद्यांच्या मी तत्वतः विरोधात असतो. आणि म्हणून "मी अनेक जाचक नियम जाणूनबुजून अव्हेरणार्यांपैकी आहे. आणि म्हणून जयदीप चिपलकट्टींच्या मताशी सहमत आहे.
जयदीप चिपलकट्टी यांना धन्यवाद
ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.
ऐसीची (बोगस) आह्वानेसहजच
ऐसीची (बोगस) आह्वाने
सहजच लक्षात आलं,
'ऐसी' अशुद्ध लेखन करणार्यांवर चवताळते आणि
मग त्यांना आह्वान देते की आम्ही अमक्य-तमक्या उकाराचे/कानांचे/मात्रांचे/जोडाक्षरांचे
इतके-तितके शब्द आणुन देतो. त्यांना बरे करून दाखवा.
आता बघा...
एखाद्याने स्टाइल गाइडने (किंवा तत्सम उपायांनी) मुद्रितशोधन
खरोखरच बरे केले असले तर
ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.
’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये स्टाइल गाइडवर आणि ते करणार्यावर
गाढ श्रद्धा असावी लागते.
आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या लेखकांमध्ये पूर्वअट असलेली
ही ’गाढ श्रद्धा’ ऐसी कुठुन आणि कशी आणणार?
त्याचे प्रशस्तिपत्रक ऐसी कशाच्या आधारावर देणार?
म्हणजे ऐसीचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...
दूसरं असं...
आपलं लेखन प्लासिबो-इफेक्ट्ने बरं व्हावं असं एखाद्याला
वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार
संपादकासारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?
'कापण' त्या
'कापण' त्या शब्दयोगी-अव्यय-नियमानुसार प्रमाण मानणार का 'का पण'? कापण?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तम
काही अजून सुचवण्या:
१. तत्समेतर मराठी अकारान्त शब्दांमध्ये उपान्त्य स्थळी उकार, वेलांटी असल्यास दीर्घ द्यावी. उदा. घरून, येऊन, चूळ, नीट इ.
१अ. शब्दाला 'ही', 'च' असे प्रत्यय लागले असतील तर नियम लावण्यासाठी प्रत्यय काढून उरलेल्या शब्दाला लावावा आणि मग प्रत्यय परत लावावा. उदा. कुठूनही, चूकच इ.
२. बोलीच्या शैलीत लिहिताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर शीर्षबिंदू देण्यापूर्वी शीर्षबिंदूऐवजी मात्रा वापरली तरी शब्द अर्थपूर्ण राहतो का ह्याची चाचपणी केलेली चांगली. चुकीच्या शीर्षबिंद वापराची काही उदाहरणे: मस्तं, भावविश्व ऐवजी 'भावं विश्व' असे लिहिणे इ.
++!!!
याबद्दल जोरदार टाळी दिली पाहिजे!
('सदस्यं' हा असाच डोक्यात जाणारा१ प्रकार! बोले तो, 'मेंबर'चे अनेकवचन 'मेंबरं' - 'मेंढरं'च्या धर्तीवर - हे बोलीभाषेत - आणि म्हणूनच बोलीच्या शैलीतील लिखितभाषेत - खपावे. पण 'सदस्यं'? 'बोलीची शैली' म्हणून जरी खपवून घ्यायचे म्हटले, तरी मग पुढचा प्रश्न असा येतो, की नेमके म्हणायचे काय आहे? 'सध्या २५ सदस्य आलेले आहेत', की 'सध्या २५ सदस्ये आलेली आहेत'? दुसरा पर्याय बोलीत अगदीच चूक जरी वाटत नसला, तरी त्यात सदस्यांप्रति काहीशी तुच्छता मात्र का कोण जाणे, पण जाणवते. असो.)
पण 'सदस्यं' एक वेळ (त्यातून व्यक्त होणारी तुच्छता दुर्लक्षून) 'बोलीभाषा' म्हणून खपवून घेता येईलही. मात्र, 'मस्तं' हे ('हम करे सो' वगळता) कोणत्याही न्यायाने खपेलसे वाटत नाही. अत एव, हा एक अत्यंत मस्तिष्कागमनी३, ४ प्रकार आहे. असो.
...........................................................................................
१ निदान आमच्या तरी डोक्यात जातो बुवा! ("कारण शेवटी आम्ही भटेच!२ त्याला काय करणार?" - पु.ल.)
२ शुद्ध/प्रमाणलेखनाचा नुसता ज़िक्र जरी केला, तरी 'शुद्ध/प्रमाणलेखन हा बामणी कावा आहे, भटाबामणांनी लादलेला प्रकार आहे' (पक्षी: 'आम्ही' असेच लिहिणार! काय करताय?) असे इन्ष्टण्ट नीजर्क कौण्टरआर्ग्युमेण्ट करण्याचीही एक प्रथा तूर्तास प्रचलित आहे. आता, राम गणेश गडकरींपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत व्हाया शिवाजी सावंत यच्चयावत् ब्राह्मणेतर लेखकांच्या साहित्यकृतींत यदाकदाचित जर प्रमाणलेखनाच्या चुका आढळत नसतील, तर एक तर ती त्या (बहुधा ब्राह्मणी) कंपॉझिटर/प्रूफरीडर/प्रूफकरेक्टराची कृपा असे, किंवा, पर्यायाने, ही मंडळी लिहीत असताना यांच्या पाठीशी पर क्यापिटा किमान एक या दराने ब्राह्मण हण्टर घेऊन उभा असे, ज्याच्या धाकाखाली चळाचळा कापत ही मंडळी बर्या बोलाने प्रमाणलेखन करत, हा जावईशोध निदान आम्हांस तरी अनाकलनीय आहे. पण आम्हांस तसेही कोण पुसतो?
३ 'मस्तिष्का'चा मस्तीशी अथवा इष्काशी यत्किंचितही संबंध नसावा, असे जाताजाता नमूद करणे इष्ट वाटते. (हं, आता 'इट्स ऑल इन द माइंड' असा दावा असल्यास गोष्ट अलाहिदा.)
४ शंका: 'मस्तिष्कागमनी' की 'मस्तिष्कगमनी'?
धन्यवाद. या धाग्यामध्ये या
धन्यवाद. या धाग्यामध्ये या सूचनांची भर घातलेली आहे.
शुद्धलेखन तपासण्यासाठी एक
शुद्धलेखन तपासण्यासाठी एक अॅडऑन आहे.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/
अचुक नसला तरि ऊपयोगि आहे.
(या वाक्यातल्या सर्व शुद्धलेखनाच्या चुका त्या अॅडॉनने दाखवल्या)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
धन्यवाद. धाग्यात याचा
धन्यवाद. धाग्यात याचा अंतर्भाव केलेला आहे.
अजून हा मसूदा अपूर्णच
अजून हा मसूदा अपूर्णच असल्यामुळे लेखनप्रकार बदलून 'चर्चा' असा केलेला आहे.
एक प्रश्न आहे. दोन किंवा
एक प्रश्न आहे. दोन किंवा भिन्न लिंगी गोष्टींची यादी असते तेव्हा क्रियापदाला कुठच्या लिंगाप्रमाणे विभक्ती लागेल? की यादीपोटी अनेकवचन वापरावं?
उदाहरणार्थ
ज्यांना उच्च दर्जाचा मेंदू आणि सौंदर्यदृष्टी मिळाली आहे अशा लोकांवर मंदबुद्धी जळतात.
की
ज्यांना उच्च दर्जाचा मेंदू आणि सौंदर्यदृष्टी मिळाले आहेत अशा लोकांवर मंदबुद्धी जळतात.
इथे 'दर्जाचा मेंदू' हे काहीसं नैसर्गिकपणे टाइप केलं गेलं. तेही बरोबर आहे का?
प्रयत्न...
माझ्या समजुतीप्रमाणे या विशिष्ट उदाहरणातील क्रियापद हे यादीतील शेवटच्या पदाप्रमाणे चालावे. (निदान, मी तरी तसेच चालवतो.)
बोले तो, 'ज्यांना उच्च दर्जाचा मेंदू आणि सौंदर्यदृष्टी मिळाली आहे अशा लोकांवर मंदबुद्धी जळतात', असे.
मात्र, सामान्य नियम नेमका काय आहे, हे सांगता येत नाही. कारण, 'राजेश आणि अदिती माझ्या मागे हात धुवून लागले होते'मध्ये बरोब्बर उलटा प्रकार होतो. (आणि, तो 'हात' अनेकवचनी असल्यामुळे होत नसावा, याबद्दल जवळजवळ खात्री आहे.)
अशा वेळी कानाने खेळून पाहावे (मराठीत:प्ले इट बाय द यर), असे सुचवू इच्छितो. (मी तेच करतो, आणि मग मनाचे ऐकतो.)
शंका: इथे 'दर्जाचा/ची/चे' हे फक्त मेंदूचे विशेषण आहे, की सौंदर्यदृष्टीचेसुद्धा?
(इन एनी केस, कानाला ठीक वाटते. दोन्हींचे विशेषण जरी असले समजा, तरी 'उच्च दर्जाचे मेंदू आणि सौंदर्यदृष्टी' हे कानाला बरोबर वाटत नाही. आणि, चालताना मेंदूच्या सान्निध्यामुळे मेंदूप्रमाणे चालावे, सौंदर्यदृष्टीप्रमाणे नव्हे.)
(डिस्क्लेमर: चूभूद्याघ्या.)
तात्पर्य/आज आपण काय शिकलो: 'ऐकावे कानाचे, करावे मनाचे.'
सार-तात्पर्य.
ठळक तात्पर्य आणि ते काढण्याचे तात्पर्यही आवडले.
तृतीयपंथ
ही दोन्ही वाक्यं माझ्या कानांना खटकतात. अशा वेळी अडचणीला वळसा घालणं हा एक मार्ग आहे:
ज्यांना उच्च दर्जाचा मेंदू आणि सौंदर्यदृष्टी अशा दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत, त्यांच्यावर ….
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
वाचाल तर वाचले जाल!
सर्वात मूलभूत सूचना ही की लेखकाने केलेले लेखन 'प्रकाशित करा'चे बटण दाबण्यापूर्वी एक दोन वेळा स्वतःच वाचून बघण्याची आवश्यकता आहे. काही धागे वाचतांना ही एक किमान अपेक्षाही पूर्ण झाली नसावी अशी शंका येते. इतकं करूनही जर काही थोड्या चुका राहिल्या तर त्या संपादित करता येतात...
काही वेळेस वातावरणनिर्मितीसाठी मुद्दाम प्रमाणभाषेत अप्रचलित असलेले शब्द वापरण्यात येतात. उदा. कोकणी पार्श्वभूमीवर लिहितांना शहाळ्याच्या ऐवजी आडसार किंवा मासळीच्या आमटीच्या ऐवजी नुस्त्याचे हुमण वगैरे! तितके स्वातंत्र्य घ्यायला हरकत नसावी. (मागे आमच्या एका दोन अमेरिकन पात्रांच्या संवादात इंग्रजी शब्द (तेही देवनागरी लिपीत लिहिलेले!) खूप जास्त येतात अशी एक तक्रार केली गेलेली आठवली!!)
बाकी ऐसी अक्षरे मराठी भाषेच्या दर्जाविषयी आस्था ठेवून असल्याचे पाहून आनंद झाला, आणि म्हणून हा प्रतिसाद.
चूभूद्या घ्या...
लेखकाने केलेले लेखन 'प्रकाशित
एकदम मान्य. मात्र या सूचना दिवाळी अंकाच्या लेखनासाठी अधिक लागू आहेत. कारण तिथे प्रसिद्ध होणारे लेख हे व्यावसायिक दिवाळी अंकांप्रमाणे असावेत असा आमचा प्रयत्न असतो. ऐसीवर येणारे इतर धागे हे त्यामानाने हौशी कलाकृतीसारखे, लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर प्रसिद्ध केलेले असतात. त्यातही नवीन लेखक, नवीन सदस्य मराठी टायपिंगशीच झगडत असतात. तेव्हा तिथे थोडी माया राखायला हरकत नाही. अर्थात सर्वच लेखकांना हा धागा वाचून फायदा झाला तर सोन्याहून पिवळं.
देवा, ऐसी का रे माया!!!
सहमत आहे.
बाकी हल्लीच्या लेखकांना असे माया राखणारे प्रकाशक मिळाले आहेत हे बघून ड्वाळे पानावले!!!
आयला, आम्ही काही वर्षांपूर्वी शुद्धलेखनात अचूक अशा साहित्याच्या इलेक्ट्रॉनिक फाईलची देशी छापील दिवाळी अंकात देशी प्रकाशकांनी मोफत घातलेली काशी पाहून आम्ही मराठी दिवाळी अंकात लिखाण करणं सोडलं!!!!
काही नाही तर आमच्या नांवाखाली प्रकाशित झालेलं लिखाण बघून परिचित विचारतील की, "या भ*व्याला आता शुद्ध मराठीही लिहिता येइनासं झालं की काय?" या भीतीने!!!!
त्यामानाने मज्जा आहे हल्लीच्या लेखकांची!!!
अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे
अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे सर्वनामांचा वापर. गोपाळ आणि माधव कॅफेमध्ये भेटतात आणि लेखक त्यांचं वर्णन करताना वहावत जात 'त्याला त्याच्याविषयी अढी अशी नव्हती. पण एकदा तो म्हणाला होता "सर्वच गे स्त्रैण असतात" तेव्हापासून त्याच्या मनात काही प्रश्नचिन्हं निर्माण झाली होती खरी.' यात पहिला तो कोण आणि दुसरा तो कोण याबद्दल वाचकाच्या मनात गोंधळ उडणं साहजिकच आहे. लेखकाच्या मनात तो गोंधळ अर्थातच नसतो.
मात्र हा मराठी भाषेच्या व्याकरणाचा दोष नाही हे उघड आहे. त्यामुळे स्टाइल गाइड मध्ये या सूचनेचा अंतर्भाव करावा की नाही हा प्रश्नच आहे.
शुद्ध लिहण्याच्या प्रयत्न
शुद्ध लिहण्याच्या प्रयत्न प्रयेक व्यक्ती करतोच. पण मराठी न शिकलेल्या आणि वयाच्या पन्नासी नंतर मराठीत लिहिण्याच्या अट्टहास करणाऱ्या आमच्या सारख्यानां, हे थोड जडच आहे. पण प्रयत्न करत राहू, एवढेच.
तुम्ही फार छान भाषेत लिहिता.
तुम्ही फार छान भाषेत लिहिता. हिंदीची फोडणी घातलेलं मराठी वाचायला मजा येते. त्यामुळे लगे रहो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी असेच म्हणतो. प्रमाणभाषा
अगदी असेच म्हणतो. प्रमाणभाषा आणि प्रमाणलेखनाच्या कोलाहलात, ग्रामीण बाजाच्याही एकसारख्या लेखनात अशी भाषा वेगळी आणि छान वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आणि-जोडणीच्या नामांसह क्रियापदांचा अन्वय
"आणि-जोडणीच्या नामांसह क्रियापदांचा अन्वय" या बाबतीत धोंगडे-वली पुस्तकात१ पुढीलप्रमाणे चर्चा आहे :
(मधील-मधील वाक्यांचा स्वैर अनुवाद आणि माझी वाक्ये आहेत. जवळजवळ सर्व उदाहरणे जशीच्या तशी आहेत. उदाहरण क्रमांक माझ्या परिच्छेदातले आहेत.२ सर्व अधोरेखने, जाड ठसे, माझे आहेत.)
-------------------------------------------------------------------------
जोडलेल्या नामांशी अन्वयाचे नियम गुंतागुंतीचे आहेत. नियम तीन प्रकारचे आहेत (१) शेवटल्या जोडपदाशी अन्वय (२) अनेकवचनी अन्वय, व (३) पुंल्लिंगी अन्वय.
(अ) शेवटचे जोडपद अनेकवचनी असेल, तर क्रियापदाचा शेवटच्या जोडपदाशी अन्वय होतो. खालील उदाहरणे १-४ बघणे. स्पष्टीकरणापुरते - पहिले जोडपद एकवचनी असो वा अनेकवचनी असो.
(आ) पहिले जोडपद अनेकवचनी असेल आणि दुसरे जोडपद एकवचनी असेल, तर बहुतेक बोलींमध्ये (+ प्रमाणबोलीमध्ये) शेवटच्या जोडपदाशी क्रियापदाचा अन्वय होतो. हा मुद्दा वेगळे काढायचे कारण असे, की काही बोलींमध्ये पुंल्लिंगप्राधान्य अनेकवचन लागू होते. उदाहरण ५-६(पुंल्लिंगप्रधान ६क, चरमपद-अन्वय ६ख)
(इ) दोन्ही जोडपदे एकवचनी असली, आणि शेवटचे पद पुंल्लिंगी वा नपुंसकलिंगी असले, तर क्रियापदाचा शेवटच्या जोडपदाशी एकवचनी अन्वय विकल्पाने होऊ शकतो. विकल्पाने पुंल्लिंगी अनेकवचनी अन्वय होऊ शकतो. (एकवचनी अन्वय, ७क, ८, अनेकवचनी अन्वय ७ख)
(ई) दोन्ही पदे भिन्नलिंगी एकवचनी असली, तर क्रियापदाचा अन्वय पुंल्लिंगी अनेकवचनी होतो. (उदाहरण ९)
(उ) दोन्ही पदे स्त्रीलिंगी एकवचनी असली, तर क्रियापदाचा अन्वय स्त्रीलिंगी एकवचनी होतो. (उदाहरण १०)
(ऊ)आणि-जोडणीमध्ये एक प्रथमपुरुषी (मी/आम्ही) सर्वनाम असले, पहिले असो किंवा दुसरे, तर क्रियापद प्रथमपुरुषी अनेकवचनी होते. (उदाहरण ११)
(ए) आणि-जोडणीमध्ये एक द्वितीयपुरुषी (तू/तुम्ही) सर्वनाम असले, पहिले असो किंवा दुसरे, आणि प्रथमपुरुषी सर्वनाम नसले, तर क्रियापद द्वितीयपुरुषी अनेकवचनी होते. (उदाहरण १२)
(ऐ) परस्परक्रिया सांगणारे क्रियापद असेल तर क्रियापद अनेकवचनीच असते (चरमपद-एकवचनाचा विकल्पही नसतो), जोडलेली पदे भिन्नलिंगी असली तर अनेकवचनात पुंल्लिंगप्राधान्य कार्यरत होते. (उदाहरण १३)
उदाहरणे :
१. ते नोकर आणि त्या मुली पळून गेल्या.
२. त्या मुली आणि ते नोकर पळून गेलेत.
३. तो नोकर आणि त्या मुली पळून गेल्या.
४. ती मुलगी आणि ते नोकर पळून गेलेत.
५. त्या मुली आणि तो नोकर पळून गेला.
६क. ते नोकर आणि ती मुलगी पळून गेलेत.
६ख. ते नोकर आणि ती मुलगी पळून गेली.
७क. ती मुलगी आणि तो नोकर पळून गेला.
७ख. ती मुलगी आणि तो नोकर पळून गेलेत.
८. तो नोकर आणि ते माकड पळून गेले.
९. तो नोकर आणि ती मुलगी पळून गेलेत.
१०. ती बाई आणि ती मुलगी पळून गेली.
११. मी आणि तू उद्या घरी जाऊ.
१२. तू आणि त्या मुली बागेत जाणार आहात.
१३. ती मुलगी आणि तो नोकर जोराजोरात भांडले.३
----------------------
१Dhongde RV and Wali K. Marathi. London Oriental and African Language Library 13. Johns Benjamins Publishing Company Amsterdam/Philadelphia, 2009 पृष्ठे २३३-२३६
२मुळातले उदाहरण क्रमांक १२-२६
३हे उदाहरण मुळातल्या उदाहरण २६ पासून सुधारलेले आहे.)
वापर
'पहा' योग्य की 'पाहा'? मूळ लेखातल्या सूचनेप्रमाणे 'पाहा' योग्य. पण वापर कुठच्या शब्दाचा अधिक होतो? हे तपासून बघण्यासाठी मी गूगल-सर्च केले. त्याचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
सर्च स्ट्रिंग - हिट्स
तुम्ही पहा ३३०,०००
तुम्ही पाहा २०६,०००
तुम्ही पाहत १२५,०००
तुम्ही पहात ३९,९००
पाहत पहा ३०,७००
पहात पहा ३२,२००
पाहत पाहा ४२,२००
पहात पाहा ११,३००
यावरून असं दिसतं की 'पहा' हा शब्द 'पाहा'पेक्षा दीडपट अधिक वापरला जातो. तर पाहत हा शब्द हा शब्द पहातपेक्षा चौपट वापरला जातो. यावरून पहा/पाहा दोन्ही वापरात आहेत, मात्र 'पाहत' हा 'पाहात'पेक्षा अधिक वापरला जातो असं म्हणता यावं. त्या दोन्ही शब्दांची सरमिसळ असणाऱ्या पानांवरून काही उघड निष्कर्ष काढता येत नाही. फक्त एवढंच म्हणता येतं की 'पहात' आणि 'पाहा' एकाच वेळी वापरणारे लोक खूपच कमी आहेत.
प्रश्न असा आहे की या वापरावरून नियम/सूचना बदलावा/वी की नियमाप्रमाणे लेखन अधिक व्हायला हवं असं म्हणावं?
नियम १६
इथे नियम १६ मध्ये आज्ञार्थी रूपे 'पाहा, राहा' बरोबरच 'पहा, रहा' अशीही चालतील असे म्हटले आहे.
यानुसार मी सूचना थोडी शिथिल
यानुसार मी सूचना थोडी शिथिल करतो.
ऑटोमेशन
वरील नियमांनुसार अनेक दुरुस्त्या ऑटोमेशनने करता येतील. त्यासाठी मी वर्डमध्ये मॅक्रो तयार करतो आहे.
१. अतिरेकी स्पेस काढणं
२. विरामचिन्हांभोवती योग्य प्रमाणात स्पेस ठेवणं
३. साठी, देखील, मुळे वगैरेच्या आधीची स्पेस काढून टाकणं.
४. बोली भाषेचं रूपांतर लेखी भाषेत करणं.
५. पहाणे, वहाणे इत्यादींचं रूपांतर पाहणे, वाहणे इत्यादींमध्ये करणं.
६. ध्द च्या जागी द्ध लिहिणं.
७. शब्दांच्या शेवटी येणाऱ्या उन आणि वुन चं रूपांतर ऊन आणि वून मध्ये करणं.
८. अवतरण चिन्हांच्या बाहेरचं उद्गारचिन्ह, पूर्णविराम इत्यादी आतमध्ये आणणं.
अजून कोणाला काही युक्त्या सुचत असतील तर कळवा. तसंच तयार झालेली वर्ड मॅक्रो इथे शेअर कशी करावी हेही सांगा.
तसंच, या मॅक्रो आणि फायरफॉक्सचा शुद्धिचिकित्सक वापरून पाच मिनिटांत हजार शब्दांच्या लेखात प्रचंड सुधारणा करता येतात का हे तपासून पहायचं आहे. त्यासाठी ऱ्हस्वदीर्घाच्या चुका असणारं आणि वर उल्लेख केलेल्या चुकाही असणारं लिखाण हवं आहे. उदाहरणं कुठे सापडतील? (फक्त ऱ्हस्वदीर्घाच्या शब्दाशब्दाला चुका असणारं नको [मोकलाया दाही दिशा सदृश नको] सर्वसाधारणपणे बरं लिखाण, अधूनमधून चुका असणारं असं काहीतरी हवं.)
medireview???
वयाची साठी जसजशी जवळ येऊ लागली, तसतसा आपली मुळे नेमकी कोठे आहेत, हा जुनाच प्रश्न त्याला अधिकाधिक भेडसावू लागला, आणि त्या नादात तो आपल्याच शेतात आपणच लावलेले मुळे आणि गाजरे उपटून खाऊ लागला.
.........................................................
हलकेच त्याने आपल्या पायातली तुटकी चप्पल काढून अलगद हातात घेतली, नि तिला निरखून पाहू लागला. जगण्याच्या धडपडीत आजवर त्याला किती साथ दिली होती तिने! पण आता ती पार झिजून गेली होती. नवी आणायला झाली होती. झिजलेल्या टाचा नि तुटलेले आंगठे बदलून बदलून बदलणार तरी कितीदा? शेवटी मनाचा हिय्या करून काहीशा कृतघ्नतेनेच परंतु अत्यंत निर्धाराने तो तिला म्हणाला, "वहाणे, आजवर तू माझ्यासाठी राब राब राबलीस खरी, पण आज ऐन मोक्याच्या वेळी तुटून मला दगा दिलासच ना? आता मात्र तुला फेकून देणे मला भाग आहे. यूज़ अँड थ्रोच्या आजच्या जमान्यात तुला दुरुस्त तरी कितीदा करू मी, नि कशासाठी? पहा पहा, त्या शेजारच्या बाटाच्या दुकानातून ती नवीकोरी चप्पल मला शुकशुक करून बोलावते आहे, नि मी तुला इथे पोसू? ते काही नाही; नवी जनरीत मला पाळली पाहिजे." असे म्हणून त्याने तिला समोरच्याच नाल्यात (तिच्या जोडीदारणीसोबत, तिच्या सहचारिणीसोबत) भिरकावली. वगैरे वगैरे.
.........................................................
जाता जाता: तेवढा medireview या न-शब्दाचा उगम तपासून पाहाच बरे!
.........................................................
(बाकी चालू द्या.)
अर्थात. या मर्यादांची जाणीव
अर्थात. या मर्यादांची जाणीव आहेच. पण सगळेच प्रश्न ऑटोमेशनने सुटले असते तर आम्ही मुद्रितशोधकांना व्हीआरेस देऊन घरी बसवलं नसतं का?
शेवटी परिपूर्ण काहीच नसतं. जे असतं ते थोड्याफार प्रमाणात उपयुक्त असतं. किंवा नसतं.
र्हस्व - दिर्घ चा खुलासा कोणी करेल काय?
र्हस्व - दिर्घ चा खुलासा कोणी करेल काय? मी सहसा <अक्शर>< i> वापरतो. बघितल्यावर अगदि पटकन चुकीचं वाटलं तर बदलतो - म्हणजे <अक्शर>shift< i> वापरतो. उकाराला पण तेच. पण ते नक्कि माहिती असलं तरंच. मागल्या दोन वाक्यात सुद्धा हा गोंधळ आहेच! अर्थात मी मुळातच चमचाभरच लिहितो त्यामुळे याचा फारसा काहि कोणाला त्रास व्ह्यायचा संभव नाहिये! पण सोपा फार्म्युला कोणी सांगितला तर मी अगदी गटण्यासारखा 'आजन्म उपकृत होईन'!!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
सोपे फॉर्म्युले १. शेवटचं
सोपे फॉर्म्युले
१. शेवटचं अक्षर दीर्घ काढा. 'नाहि' ऐवजी 'नाही'. 'नक्कि' ऐवजी 'नक्की'. याने तुमच्या बहुतांश चुका नाहीशा होतील.
२. करून, धावून वगैरे ऊन प्रत्यय लागणाऱ्या शब्दांत ऊ दीर्घ.
३. शेवटी 'इत' प्रत्यय लागणाऱ्या शब्दांत ऱ्हस्व इ. स्थित, अंकित, संचित वगैरे. पण इत प्रत्यय नसलेल्या मूळ शब्दांत दीर्घ - संगीत वगैरे.
४. बहुतेक मराठी, संस्कृत नसलेल्या शब्दांत शेवटून दुसरं अक्षर दीर्घ. चूळ, गूळ, मशीन, संतूर वगैरे वगैरे.
यापेक्षाही अधिक सुधारायचं असेल तर फायरफॉक्सचं अॅडऑन आहेच. ते फार छान नाही, पण त्याने बऱ्याच चुका सुधारता येतील.
ऑनलाइन वर्तमानपत्रातला सुमारे
ऑनलाइन वर्तमानपत्रातला सुमारे दोन-अडीचशे शब्दांचा एक उतारा पाच मिनिटांच्या आत असा बदलला आहे. मुख्य फरक अर्थातच बोलीचं लेखी भाषेत रूपांतर आहे. तसंच फायरफॉक्स अॅडऑनच्या मदतीने काही उघड ऱ्हस्वदीर्घाच्या चुका सुधारल्या आहेत.
मूळ उतारा
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन तब्बल पाच वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा एकदा मनोमिलन केलं.
चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळाही यानिमित्तानं आज इथं पार पडला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता सचिन पिळगावकर, अतुल परचुरे, महेश मांजरेकर, विनय येडेकर हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
काय म्हटलं अमिताभ बच्चन यांनी आपल्या भाषणात…
यावेळी, अमिताभ बच्चन यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीची १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बीग बींनी रसिक प्रेक्षकांना दिल्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात, एरव्ही पडद्यासमोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपटसेनेनं आणलं समोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपट सेनेनं विम्याचं संरक्षण देऊ केलं. यासाठी बीग बींनी आवर्जुन मनसे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले... आणि ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत बीग बींनी केला भाषणाचा शेवट केला.
काय म्हटलं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात...
अमिताभ बच्चन यांच्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी बीग बींवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली. ‘अमिताभसारखा मोठा अभिनेता झाला नाही आणि होणारही नाही… भाषेवरती कमांड कशी असावी, हे अमिताभजींकडून शिकावं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ यांची स्तुती केली.
‘अमिताभ बच्चन भारताचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर… ते कोणत्याही एका राज्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही’ असं म्हणत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा दाखवून दिलं. ‘अमिताभजी, लताजी ही देवानं पाठवलेली माणसं...’ असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
आपल्या भाषणाचा शेवट करताना अखेर राज ठाकरे यांन आपल्या आणि बच्चन कुटुंबीयांत निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलंच... ‘झालं गेलं गंगेला मिळालं… आणि ती गंगादेखील उत्तरप्रदेशातून वाहते... आम्ही जेवढं प्रेम गंगेवर करतो, तेवढंच प्रेम आम्ही अमिताभजींवरदेखील करतो’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभजींशी आपलं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं दाखवून दिलं.
--------
सुधारित उतारा
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन तब्बल पाच वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा एकदा मनोमीलन केले.
चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळाही यानिमित्ताने आज इथे पार पडला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता सचिन पिळगावकर, अतुल परचुरे, महेश मांजरेकर, विनय येडेकर हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
काय म्हटले अमिताभ बच्चन यांनी आपल्या भाषणात…
यावेळी, अमिताभ बच्चन यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीची १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी रसिक प्रेक्षकांना दिल्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात, एरव्ही पडद्यासमोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपटसेनेने आणले. समोर न येणाऱ्या लोकांना मनसे चित्रपट सेनेने विम्याचे संरक्षण देऊ केले. यासाठी बिग बींनी आवर्जून मनसे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले. आणि ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत बिग बींनी केला भाषणाचा शेवट केला.
काय म्हटले राज ठाकरेंनी आपल्या भाषणात. . .
अमिताभ बच्चन यांच्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी बिग बींवर जोरदार स्तुतिसुमने उधळली. ‘अमिताभसारखा मोठा अभिनेता झाला नाही आणि होणारही नाही… भाषेवरती कमांड कशी असावी, हे अमिताभजींकडून शिकावं’ असे म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ यांची स्तुती केली.
‘अमिताभ बच्चन भारताचे ब्रॅंड अॅम्बेसेडर… ते कोणत्याही एका राज्याचे ब्रॅंड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही’ असे म्हणत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा दाखवून दिले . ‘अमिताभजी, लताजी ही देवाने पाठवलेली माणसे. . . ’ असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले .
आपल्या भाषणाचा शेवट करताना अखेर राज ठाकरे यांन आपल्या आणि बच्चन कुटुंबियांत निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलेच. . . ‘झाले गेले गंगेला मिळाले … आणि ती गंगादेखील उत्तरप्रदेशातून वाहते. . . आम्ही जेवढे प्रेम गंगेवर करतो, तेवढंच प्रेम आम्ही अमिताभजींवरदेखील करतो’ असे म्हणत राज ठाकरेंनी अमिताभजींशी आपले पुन्हा एकदा मनोमीलन झाल्याचे दाखवून दिले.
वरील परिच्छेदाबाबत आणि एकंदरीत प्रस्तावावर प्रश्न
वरील परिच्छेदाबाबत आणि एकंदरीत प्रस्तावावर प्रश्न. (हा प्रकार थोडासा 'रविवार सकाळ'मधल्या, "छान. म्हणजे लिहिता-वाचता यायला लागल्याबरोबर पहिला अर्ज साक्षरतेच्या मास्तरविरूद्धच केलात? व्वा! " सारखा झालाय याची मला कल्पना आहे - र्ह्स्व-दिर्घचा माझा गोंधळ जरा दूर होतोय आणि मी लगेच पुढे सरसावून हे मुद्दे मांडतोय )
१. "मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने...." याऐवजी "मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने..." असं नको का? चुकलो, असे नको का?
२. "यावेळी, अमिताभ बच्चन यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली." या वाक्यात 'यावेळी'नंतर अर्धविराम का आहे? त्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतोय. असा कार्यक्रम या आधी दोन-तीनदा झालाय तेव्हा अमिताभने हिंदितनं भाषण केलं पण या वेळेला मात्र मराठीतून केलं असा अर्थ होतो.
३. "त्याचं असं झालं की मला वाटलं याने त्याला सांगितलंय म्हणून" यात टोचण्यासारखं नक्की काय आहे? हे वाक्य "त्याचे असे झाले, की मला वाटले याने त्याला सांगितले आहे म्हणून" असं लिहील्यावर अचूक होत असेल तर होवो बापडं पण 'ते चौकोनी कुटुंब" मधल्या माधवरावानी "जेवताना आम्ही पोळीचे तुकडे कात्रीने कापतो त्यामुळे कसे एकासारखे होतात नी नेमकी भाजी घेता येते" सांगावं तसं वाटतं हे
४. पुढच्या दिवाळी अंकासाठी लेखन मागवताना ते लेखन या सगळ्या नियमात बसणारं हवं असा आग्रह असणारे का? तसा नसला आणि हे नियम पाळणं ऐच्छिक असलं तर ही खटपट कराच का? की 'तितकंच चांगलं लेखन असलं तर ढिलं असलं तरी चालेल' असं ठरवणारात? (असं ठरवणार असलात तर "कडवेकर, तुम्ही काय केलंय कल्पना आहे तुम्हाला?" !)
५.
. याची काही उदाहरणं देऊ शकाल का (लेखकांची हरकत नसेल असं धरून चालतोय)? का ते सांगतो - ईमेज अॅनालिसीस करायचं असलं तर 'गुलाबाचं चित्रं कसं ओळखावं?' हे काँप्युटरला शिकवण्यासाठी गुलाब कसा दिसतो याचे शंभर तपशीलवर नियम देता येतात किंवा काँप्युटरला गुलाबाची शंभर चित्र दाखवून त्याचे त्यालाच ठोकताळे बांधायला सांगता येतं. तद्वतच, पन्नास नियमांची जंत्री करण्याऐवजी तीन / पाच / दहा 'बिफोर अँड आफ्टर' उदाहरणं दिली ('आधी आणि नंतर उदाहरणं' यासम भयाण भाषांतरापेक्षा 'बिफोर अँड आफ्टर'ला आपल्यात घेतलेलं बरं नाहि का?) तर उभयपक्षी जास्त परिणामकारक होईल असं वाटतं. १००% नाही होणार पण ६०-८०% चुका कमी होतील. (६०-८०%? मी जरा जास्तच आशावादी आहे का?) र्ह्स्व-दिर्घ बघायला फायरफॉक्स अॅडईन आहे.
असो. मी आधीच्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे मुळात माझं लेखन चमचाभर, आणि तो चमचासुद्धा प्रतिक्रियांचा! पण या अशा नियमांच्या चौकटी बांधल्यामुळे मला एखाद्या चांगल्या लेखनाला मुकावं लागेल अशी भयशंका वाचक म्हणून वाटली म्हणून मी माझे मत ईथे मांडले आहे ईतकेच !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
क्र. १, २ ला उत्तर - वरील
क्र. १, २ ला उत्तर - वरील उदाहरण हे केवळ ऑटोमेशन टेस्टिंगचं उदाहरण होतं. स्टाइल गाइडचे बरेच नियम ऑटोमेट करणं शक्य नाही, किंवा महाप्रचंड कठीण काम आहे. त्यामुळे मानवी, तज्ञ मुद्रितशोधकाला पर्याय नाही. फक्त अशा तज्ञाला सर्व 'झालं' 'गेलं' बदलून 'झाले', 'गेले' हाताने करत बसावं लागू नये म्हणून हा खटाटोप आहे. जितकं ऑटोमॅटिक, मॅक्रोज वापरून करता येईल तितकं करावं. म्हणजे मुद्रितशोधकाला यांत्रिक कामं करावी न लागता खरोखर जिथे मानवी मेंदूची गरज आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण अनुभवाची गरज आहे तेवढंच काम करावं लागावं अशी इच्छा या ऑटोमेशनमध्ये आहे. त्यामुळे काही चुका दुरुस्त होतील काही होणार नाहीत हे उघड आहे.
क्र. ३ ला उत्तर - बोली भाषा वापरण्यात काहीच अडचण नाही. मी स्वतः बहुतेक ठिकाणी बोली भाषेतच लिहितो. मात्र वैचारिक किंवा औपचारिक लिहिताना लेखी भाषा वापरावी असा संकेत आहे. तेव्हा दिवाळी अंकात त्याप्रमाणे लेखन सादर केलं जातं. मूळ सूचनांमध्येही 'एक काय ते वापरा' असंच म्हटलं आहे.
क्र. ४ ला उत्तर - पुढच्या दिवाळी अंकाच्या लेखन करताना प्रत्येकाने हे नियम पाळले पाहिजेत असं नसून 'अंकाचा दर्जा राखण्यासाठी लेखन या नियमांशी सुसंगत स्वरूपात सादर करतील' असं म्हणणं आहे. थोडक्यात तुम्ही जर गचाळ भाषेत सुंदर लेख लिहिला तर संपादक कष्ट करून तो चांगल्या भाषेत आणतील. पण बहुतेकांना गचाळ भाषेत लिहिण्याची हौस नसतेच, तेव्हा ते चांगल्या भाषेत लिहिण्यासाठी इथे मदतीचा हात दिलेला आहे.
क्र. ५ ला उत्तर - मला स्वतःला इमेज क्लासिफिकेशन अल्गोरिदम कसे चालतात याबद्दल किंचित माहिती आहे. त्यावरून मला निश्चित म्हणता येईल की दुर्दैवाने इमेज रेकग्निशन अल्गोरिदम त्यामानाने सोपे असतात आणि लॅंग्वेज स्टाइल अल्गौरिदम हे महाकठीण असतात. दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्यांपैकी बिफोर आणि आफ्टर देणं शक्य नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादा उतारा शोधून द्या, त्यातल्या चुका आपण मोजू. मग ऑटोमेशनने किती चुका कमी होतात ते मोजू. आणि सरतेशेवटी मानवी हाताने किती चुका कमी होतात ते पाहू. मग तुम्हाला आपोआपच बिफोर अॅंड आफ्टर चित्र मिळेल. त्यावरून जर तुम्हाला स्टाइल गाइडचा अल्गो लिहिता आला तर सोन्याहून पिवळं.
> त्यामुळे मानवी, तज्ञ
> त्यामुळे मानवी, तज्ञ मुद्रितशोधकाला पर्याय नाही. फक्त अशा तज्ञाला सर्व 'झालं' 'गेलं' बदलून 'झाले', 'गेले' हाताने करत बसावं लागू नये म्हणून हा खटाटोप आहे.
ठीक. पण हा शब्द (संस्कृतप्रमाणे) 'तज्ज्ञ' असा लिहायचा का हेही ठरवून टाका. उच्चार तसा करणारा मात्र अजून कुणी भेटला नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
क्र. ५ चा प्रस्ताव असा होता की
क्र. ५ चा प्रस्ताव असा होता की अशी 'बिफोर आणि आफ्टर' उदाहरणं लेखकाला द्यावीत, काँप्युटरला नव्हे. पन्नास नियमांची जंत्री देण्यापेक्षा अशी उदाहरणं वाचून त्याप्रमाणे भान राखून लिहिणं लेखकाना जास्त सोईचं वाटेल अशी अपेक्षा आहे.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
बाकी सगळं ठीक आहे, पण 'बोलीचं
बाकी सगळं ठीक आहे, पण 'बोलीचं लेखी करणं' हा फार भानगडीचा प्रकार आहे, आणि त्याचं अॉटोमेशन करण्याच्या इष्टानिष्टतेबद्दल मला शंका आहे. काही मुद्दे मांडतो:
-> वर्तमानपत्रात जर 'बोली' वापरलेली असेल, तर ती 'बोली' राहिलेली नाही असा त्याचा अर्थ होतो.
-> पण 'बोली' हा शब्द तूर्तास मान्य केला तरीही 'बोली' आणि 'लेखी' मिसळून वापरणं अनेकदा साहजिक ठरतं. उदाहरणार्थ 'अमिताभजी, लताजी ही देवाने पाठवलेली माणसं' असं लिहिण्याची मुभा हवी. एकतर 'देवानं' लिहा किंवा 'माणसे' लिहा, हा दुराग्रह वाटतो.
-> तुम्ही वर जो सुधारित उतारा दिलेला आहे, त्यात 'झाले गेले गंगेला मिळाले' हे कानाला खटकतं, कारण ते राज ठाकरे 'बोल'लेले आहेत. तेव्हा बाकी सगळं 'लेखी'त असलं तरी असे मधलेमधले खंड 'बोली'त असायला हवेत.
एकूण पाहता, निदान हा प्रकार अॉटोमेट करण्याबद्दल मी साशंक आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. पण
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. पण कुठच्या प्रॉब्लेमसाठी हे सोल्यूशन आहे हे लक्षात घ्यायला हवं. सर्वसाधारणपणे 'हा सगळा लेख बोलीत आहे, त्याचं पूर्णपणे लेखीत रूपांतर व्हायला हवं! ते कसं करावं बरं?' असा प्रश्न नसतो. बहुतेक वेळा हा लेख 'लेखी' भाषेत हवा हे लेखकालाही माहीत असतं. वैचारिक किंवा औपचारिक लेख जेव्हा लिहायला घेतले जातात तेव्हा अनेक वेळा लेखी लिहिता लिहिता ओघात बोली रूपं यायला लागतात. त्यामुळे मधूनच लेखी मधूनच बोली अशी मिश्र भाषा बनते. ती एकसंध करणं हा प्रश्न असतो. दोन पाच हजार शब्दांच्या लेखात हे हाताने करणं जिकीरीचं ठरतं. तेव्हा अशा वेळी एक मॅक्रो वापरून सगळं लेखी करून टाकणं सोयीचं ठरतं. मग नंतर त्यातल्या उद्गारांचं पुन्हा बोलीकरण हाताने करणं त्यामानाने कमी कष्टाचं पडतं.
देवाने पाठवलेली माणसं - बोली भाषेत पुन्हा तृतीया प्रत्यय एकारान्त आणि अनेकवचन अनुस्वाराने लिहिणं हे बऱ्यापैकी प्रस्थापित आहे. त्यामुळेच खरं तर बोलीचं लेखी करणं खूप सोपं आहे. याउलट लेखीचं बोली करणं कठीण आहे. कारण सर्वच अंत्य अनुस्वार बोली, आणि त्याचं एकारान्तात रूपांतर म्हणजे लेखी अशी सोपी मॅक्रो लिहिता येते. याउलट सर्वच एकारान्तांचं अनुस्वारांत रूपांतर करणं चुकीचं ठरतं - कारण मग अनेकवचनं जी एकारान्तांनी दाखवली जातात तीही बदलतात. इतर रूपंही बदलतात. 'पंतप्रधानांच्या हस्ते त्याला बक्षीस म्हणून मासे मिळाले' चं रूपांतर 'पंतप्रधानांच्या हस्तं त्याला बक्षीस म्हणून मासं मिळालं' बनतं.
बोली ते लेखीच्या ऑटोमेशनमध्ये मधले अनुस्वार बदलता येत नाहीत. म्हणजे 'कसंबसं' चं 'कसंबसे' होईल.
थोडक्यात, ऑटोमेशन हे उपयुक्त आहे, पण परिपूर्ण नाही. तेव्हा कुठच्याही हत्याराप्रमाणे ते उपयुक्त असेल तरच वापरावं.
मोठ्या मजकुराबाबत ऑटोमेशन
मोठ्या मजकुराबाबत ऑटोमेशन आणखी तापदायक ठरेल. कारण एका मिलिसेकंदात ऑटोमेशनचा रोडरोलर त्या डांबरावर फिरवून झाला की त्या ऑटोमेशनने कुठे अर्थाचा अनर्थ (पक्षी: मूळ मजकुरावर थ्री इडियट्सचा "चमत्कार") केलेला नाही ना हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा तो सर्व मजकूर बारकाईने वाचणे आणि तदनुषंगिक चुका सुधारणे आलेच.
त्यापेक्षा उत्तम प्रकाशकांची खूप खूप पुस्तके वाचावीत. त्यात शुद्धच लिखाण असतं. मग सर्व शब्द हे प्रतिमा बनून डोक्यात बसतात आणि वेगळे व्याकरण अॅज सच शिकावं लागत नाही. गुळ की गूळ असे प्रश्नच पडत नाहीत.
अरुण फडके
ज्यांना हे करण्यासाठी वेळ नाही, किंवा ते केलं तरीही योग्य वेळी आपली स्मरणशक्ती दगा देणार नाही ह्याविषयी खात्री नाही अशा लोकांसाठी मी अरुण फडक्यांचा 'मराठी लेखन-कोश' वापरायची सुचवणी करेन. मराठी लेखकाच्या संग्रही असावंच असं हे पुस्तक आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वेळ नाही त्यांच्याबाबत सहमत
वेळ नाही त्यांच्याबाबत सहमत आहेच..
पण
आता कोणता गियर टाकू ? विसरलो
किंवा हा कावळा आहे की चिमणी ? विसरलो..
असं होतं का ? अधिक उत्तम वाचनाने शब्दही असेच अखंड प्रतिमारुपात सबकॉन्शस माईंडमधे जावेत अशी अपेक्षा आहे.
स्वानुभव
माझ्या अनुभवात - जवळपास ९०-९५% शब्दांविषयी मला खात्री असते; पण काही शब्द मात्र गोंधळ करतात. एकाही शब्दासाठी गोंधळ झाला, तरी संदर्भासाठी काही तरी हवं. सबब, संदर्भासाठी 'लेखन-कोशा'साऱखं पुस्तक मला अनिवार्य वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माझ्या अनुभवात - जवळपास
याच्याशी मात्र अतिशय सहमत.
विहीर / विहिर
लिहितो/ लिहीतो
अधुनमधून / अधूनमधून
वरुन / वरून, तरुण / तरूण (वर राघासाहेबांनी खुलासा केला आहे)
संस्कृतोद्भव शब्दांचा अंत मी र्हस्व करतो. पण कोणत्याश्या नियमानुसार मराठीत अंत दीर्घ करायचा असतो म्हणे.
मी ऋषि, तथापि असे लिहीतो. (लिहितो)
ऋषी, तथापी असे हवे का?
कोणीतरी इतक्या शंका दूर कराव्यात.
विहीर / विहिर विहीर लिहितो/
विहीर
लिहितो
अधूनमधून
वरून, तरुण
ऋषी आणि तथापि बरोबर.
आता नियम (तत्समेतर शब्दांसाठी):
१. शब्दाच्या अंती 'अ'कार वगळून इतर र्हस्व स्वर येऊ शकत नाहीत. (उ, इ येणार नाहीत) (अपवादः नि, आणि, परंतु)
२. जर शब्दाच्या अंती दीर्घ स्वर असेल, तर उपान्त्यपदी र्हस्व स्वर येईल. उदा. लिहितो ('ओ'कार आणि 'ए'कार हे दीर्घ मानले जातात), कुठे, तुला, तिथे, कुणी इ.
३. शब्दाच्या अंती जर 'अ'कार असेल, तर उपान्त्यपदी दीर्घ स्वर येईल. उदा. वरून, खालून, हशील, कबूल, उणीव, ताशीव, खरपूस इ.
संस्कृत शब्दांसाठी:
संस्कृतात जरी ऋषि, मति, गति असले तरी मराठीत ऋषी, मती, गती. समासाबद्दलचा नियम वर दिलेला आहेच.
अव्यये मात्र र्हस्वान्तच राहतात. उदा. तथापि, कदापि, यथाशक्ति इ.
चूभूदेघे.
......
र्हस्व स्वरः अ, उ, इ
दीर्घ स्वरः आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
(...)
बरोबर.
मात्र, 'मिहिर'मधला 'हि' र्हस्वच लिहावा.
झहीरचे काय?
झहीरचे काय?
...
ते झहीरच सांगू शकेल.
नेहमी चुकणारे शब्द
हे खरं आहे. माझ्या शुद्धलेखनाबाबत मला ९० टक्क्याहून थोडी अधिक खात्री असते. मात्र काही शब्द नेहमी गोंधळ करतात. यास्मिन शेख यांचा 'मराठी शब्दलेखनकोश' अनेकदा जवळ ठेवायचो. मात्र आता बहुतेक शब्दांबाबत असलेल्या शंका मनोगतावरील 'नेहमी चुकणारे शब्द' या दुव्यावरुन निस्तरता येतात. मनोगताचा शुद्धीचिकित्सकही गरजूंसाठी फार उपयुक्त आहे.
http://www.manogat.com/node/259
अधूनमधून किंवा विहीर सारख्या शब्दांबाबत मला शंका नव्हती. मात्र इत्थंभूत, पारंपरिक, अनसूया किंवा अक्रीत सारखे शब्द मी नेहमीच चुकीचे लिहीत होतो. त्या शब्दांची दुरुस्ती या दुव्यामुळे करता आली.
मला असं वाटतं की
मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकांचं वाचन जरी पुरेसं केलं असेल (म्हणजे ललित लेखन फार वाचलं नसेल) आणि 'प्रमाण लेखन करण्याचे महत्त्व वाटत असेल' तर टंकलेला शब्द चुकला आहे हे दृष्टीला सहज जाणवते. गवि म्हणतात ते बरोबर आहे. ते प्रतिमा म्हणून मेंदूत साठवले जाते. जर अॅपलच्या लोगोतला कट गोलाकार न ठेवता त्रिकोणाकृती ठेवल तर जितक्या सहज लक्षात येते तितक्या सहज 'गुळ' असे लिहिलेले चुकल्याचे लक्षात येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मुळात कोणीच नियम लक्षात ठेवून
मुळात कोणीच नियम लक्षात ठेवून किंवा चेक करत करत लिहीत नाही. नियम नेहमीच मनात बसलेले असतात. पण ते नियम पुस्तकातून क्र.१ क्र. २ अश्या रितीने शिकलेले नसण्याची शक्यता जास्त. वर म्हटल्याप्रमाणे प्रतिमारुपात शब्द मनात बसतातच पण त्याउपर प्रत्येक शब्द असा स्टोअर होण्याची गरज नसते. प्रतिमांसोबत जनरल पॅटर्नही स्टोअर होतात. दहा शब्द समजले की त्याच जनरल फॉर्मॅटचे इतर शब्द साधारण तसेच लिहीले जातात.
वर विहिर / विहीर किंवा लिहितो, लिहीतो असा घोळ शिल्लक राहण्याचं मुख्य कारण हेच होतं की शेवटचं (तिसरं) अक्षर दीर्घस्वरान्त असण्याने दुसर्या अक्षराच्या र्हस्व आणि दीर्घ असण्यात फरक पडतो हे निरीक्षण एका पॅटर्नमधे बसत नव्हतं. विहीर बरोबर तर त्याच पॅटर्नचा लिहीणे का चूक ? याचं कारण म्हणजे हे दोन पॅटर्नच वेगळे आहेत ही बाब वाचनातून लक्षात आली नाही. तरीही ९९ टक्के र्हस्वदीर्घ बरोबर येण्याचं श्रेय वाचनालाच जातं (माफक वाचन असलं तरी). मुळात हे वाचन लहानपणी व्हायला हवं. गेल्या पंधरावीस वर्षात वाचनाशी माझा संबंध सात आठ पुस्तकांपुरता म्हणजे नगण्यच आहे. पण लहानपणी वाचन खूप झाले त्यामुळे शब्दप्रतिमा तयार व्हायला मदत झाली. त्यामुळे कोणत्या वयात वाचन झाले हेही महत्वाचे.
दृष्टीला सहज जाणवते ते
वरच्या प्रतिसादात माझ्या दृष्टीला सहज जाणवलेल्या गोष्टी :
सांगायचा मुद्दा असा, की दृष्टीला सहज जाणवतं त्यावर विसंबून राहणं नेहमीच पुरेसं नसतं. वरच्या प्रतिसादातल्या किरकोळ चुका सोडून द्या, पण जर आपलं लिखाण खरोखर बिनचूक हवं असा आग्रह असला, तर लिहिलेलं पुन्हापुन्हा वाचणं (ज्यायोगे पहिल्या वाचनात सहज न जाणवलेल्या गोष्टी दिसू लागतात) आणि गरज भासेल तिथे संदर्भ म्हणून कोश वगैरे वापरणं मला तरी अपरिहार्य वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे मान्य आहेच. फक्त
हे मान्य आहेच. फक्त र्हस्वदीर्घाच्या बाबतीत माझा मुद्दा मर्यादित आहे. ग्रांथिक आणि बोलीभाषा याबाबत वेगळी उपाययोजना करावी लागेलच.
एक्झॅक्टली "शुद्धलेखनाचे"
एक्झॅक्टली "शुद्धलेखनाचे" नियम नव्हेत पण मी काही पथ्यं पाळण्याचा प्रयत्न करतो. जमतंच असं नाही दरवेळी पण प्रतिसादात कॅज्युअल मोडमधे नाही जमलं तरी ललित किंवा अन्य लिखाणात नक्की जमवतो.
१. वाक्यांची लांबी कमी ठेवणे. जरा लांब वाक्य व्हायला लागलं की तोडून सरळ दोन करणे.
२. आणि ऐवजी "व" न वापरणे.
३. एका वाक्यात एकाहून जास्त वेळा उभयान्वयी की काय म्हणतात ती शिंची अव्यये न वापरणे.
४. लागोपाठच्या दोन वाक्यांत उपरोक्त "आणि" "परंतु" वगैरे न वापरणे.
५. "आहे" आणि "नाही" या भावांची खिचडी केलेली वाक्ये पूर्णपणे टाळणे. म्हणजे "अमुक म्हटल्यास ते चुकीचे ठरु नये असे मत अगदीच अग्राह्य ठरवण्याचे धाडस कोणी केल्यास आजच्या घडीला त्याचे कौतुकच करावे लागेल." इ इ.
६. कर्मणि (की कर्मणी) प्रयोग टाळणे. शक्यतो कर्तरी प्रयोगात लिहिणे.
७. प्रत्येक वाक्याची सुरुवात "पण" ने होतेय अशी एकाहून अधिक वाक्ये एकाच परिच्छेदात न ठेवणे.
८. पूर्णविराम झाला की दोन स्पेसेस किंवा किमान एक स्पेस सोडणे.
९. परिच्छेद पाडणे मस्ट.
आणि ऐवजी "व" न वापरणे. या
या वाक्यात मला सावरकर दिसले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
साआणिरकर म्हणायचे आहे का तुला
साआणिरकर म्हणायचे आहे का तुला ?
हा हन्त हन्त! आसिन्धुसिन्धु
हा हन्त हन्त! आसिन्धुसिन्धु बाष्पगद्गदित जाहलो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
उच्चाराच्या सोयीसाठी 'सानिरकर' असा पर्याय सुचवितो.
सा तो खैर समझे.. लेकिन
सा तो खैर समझे.. लेकिन णनर्योभेदः किमर्थम्?
...
(अवांतर: रफार चुकीच्या ठिकाणी पडला काय?)
णनयोरभेदः (किंवा, खरे तर, या ठिकाणी णनयोर्भेदः) नव्हे. 'आणि'च्या ठिकाणी 'नि' असा पर्याय सुचविला, इतकेच.
८. पूर्णविराम झाला की दोन
हायला गवि, दाऊ टू? एका जुन्या बॉसशी रिव्ह्यूनंतर झालेलं प्रेमळ संभाषण आठवलं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
'शांपू'मधला 'पू' पहिला की
'शांपू'मधला 'पू' पहिला की दुसरा?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दुसरा. स्पेलिंगप्रमाणे पाहिले
दुसरा. स्पेलिंगप्रमाणे पाहिले तर shampoo आहे, त्यामुळे पू दुसरा पायजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद. इंप्राँम्टू
धन्यवाद. इंप्राँम्टू (impromptu) कधी वापरायची वेळ आली तर तेव्हा त्याबद्दल विचारेन.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मराठीतली फेस्टं फेरबिंडुंगेन (Feste Verbindungen)
कोणत्या शब्दाला कोणता विभक्तिप्रत्यय लावायचा, कोणत्या क्रियापदासोबत कोणते शब्दयोगी अव्यय वापरायचे, इत्यादी गोष्टींचे फार घोळ होताना दिसतात हल्ली. (हे घोळ मोठ्या प्रमाणावर, प्रदीर्घ काळ आणि एकजिनसी व्हायला लागले, की त्यांचाही नियमांत वा संकेतांत समावेश करायला हरकत नाही. पण तोवर तरी आधीचे संकेत लक्षात ठेवायला हवेत.)
अशी अनेक उदाहरणे निघतील. ही केवळ वानगीदाखल :
'माझी मदत कर' नव्हे. 'मला मदत कर'. (एखाद्याला मदत करणे)
'मी त्यांचे धन्यवाद देतो' नव्हे. 'मी त्यांना धन्यवाद देतो'. (एखाद्याला धन्यवाद देणे / म्हणणे)
'तुम्हांला आभार देतो' नव्हे. 'मी तुमचे आभार मानतो'. (एखाद्याचे आभार मानणे)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन