कथा सांगण्याची गोष्ट
कथा सांगण्याची गोष्ट
...
गोष्ट सांगणं खरंच अवघड काम. मी जाम डिस्टर्ब झालोय. कशी सांगायची ही गोष्ट...
माझी बायको दोन दिवसांपूर्वी एकदम व्हॉयलंट झाली. अचानकच. मी बाहेर हॉलमध्ये बसलो होतो आणि ती किचनमध्ये कामं करत होती. तेवढ्यात बायको ओरडली, ‘मारून टाकीन तुला, आय विल किल यू...’
मी काय झालंय ते पाहायला आत गेलो, तर बायकोच्या अंगावर रक्त, हातात मोठ्ठा ब्रेड कापायचा सुरा आणि ओट्यावर रक्ताचं थारोळं! बायकोने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग, संताप आणि चीड होती. तिने सुरा आवळला होता. तिच्या मोकळ्या केसांवर, चेहर्यावर आणि छातीवर ताज्या रक्ताचे डाग दिसत होते.
मला दोन मिनिटं काय करावं ते सुचलंच नाही. तिच्या हातात सुरा होता आणि पुढचा नंबर आपलाही असू शकतो, असा विचार करून तिचा अंदाज घेत मी विचारलं, ‘मन्या काय झालं? तू नीटेस ना?’
मी तिला प्रेमाने ‘मन्या’ म्हणायचो. ‘मन्या’ने अपेक्षित परिणाम झाला असावा. कारण तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले. तो करुण व रडवेला झाला. काही क्षणांतच तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.
मी तिच्या जवळ गेलो. पहिल्यांदा तिच्या हाताची पकड सैल करत, तिच्या नकळत हातातला सुरा काढून घेतला. पण सुरा हातात घेतल्यावर मनातून काहीतरी उफाळून येत असावं असं मला वाटलं. सपासप वार करण्याची खुमखुमी हा सुरा माझ्यात इंजेक्ट करतो आहे किंवा ती माझ्यात आहेच, फक्त तो उद्दीपित करतोय की काय, असं वाटलं. आता नंबर कोणाचा, असा विचार मनात येत होता; पण तिने माझ्या छातीवर ठेवलं आणि रडू लागली. विचार मागे पडला. ‘मला त्याला मारायचंच होतं, मी मारलं त्याला...’ ती सारखी हेच मला सांगत होती. तेव्हाच मी ठरवलं की, हिला सध्यातरी घरी ठेवणं ठीक नाही. आज कबूतरावरच भागलंय, पण यानंतर काही विपरीत झालं तर मात्र निस्तरणं कठीण जाईल!
...
माझी बायको घरी एकटीच असायची. घरातूनच फ्रीलान्स भाषांतराची कामं करायची. पण तेच तेच काम करून कंटाळा आल्याने, गेल्या काही दिवसांपासून तिनं कामं बंद केली होती. अशी व्हॉयलंट ती कधीच झाली नव्हती. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं.
मी तिचा चेहरा धुवून तिचे कपडे बदलले. बेडरूममध्ये तिला झोपवलं. तिला सवयच होती, काहीतरी नको असलेलं किंवा भयंकर घडलं की, तिला झोप यायला लागायची. तिचा मेंदू सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःला मिटून घ्यायचा.
ती झोपी गेल्यावर मी ताबडतोब एका केअर सेंटरला फोन केला. घडला प्रसंग सांगितला. तिला घरी ठेवणं कसं धोक्याचं आहे हेही सांगितलं. तेव्हा तिथल्या मानसशास्त्रज्ञबाई म्हणाल्या की, दोन-तीन दिवस ऑब्झर्वेशनखाली ठेवून मग पाहू या.
बायको एकटीच असताना तिने काही भलतंसलतं केलं म्हणजे...
...
काल रात्री मला केअर सेंटरमधल्या मानसशास्त्रज्ञबाईंचा फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. मी रोज संध्याकाळी बायकोला भेटायला जातच होतो. ती अधिकच करुण आणि निस्तेज दिसत होती. त्याबद्दल मी बाईंना विचारलंदेखील होतं. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘आम्ही त्याचाच अभ्यास करतोय. लवकरच मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते.’
ठरलेल्या वेळी मी गेल्यावर बाईंनी मला एका खोलीत नेलं. त्यांनी लॅपटॉपवरच्या काही व्हिडिओ फाइल्स सुरू केल्या. स्पीकर्सचा आवाज थोडा मोठा केला. काही सेकंदात व्हिडिओ सुरू झाला, त्यात माझी बायको होती. पॉज करत बाई म्हणाल्या, ‘आम्ही तुमच्या मिसेसला वेळोवेळी, त्यांच्या कलाकलाने प्रश्न विचारले. त्याची त्यांनी दिलेली उत्तरे एकत्र करून हा व्हिडिओ तयार केला आहे. आपण तो पाहू या, मग त्यावर बोलू या.’
प्लेवर क्लिक केल्यावर व्हिडिओ सुरू झाला. बायको घाबरलेली आणि रडवेली झाली होती. तिचं सांगणं नेमकं मांडता यावं यासाठी ती शब्द शोधत असावी असं वाटत होतं. तिची काळजी आणि उत्सुकता विचित्र मनःस्थितीत माझं मन सापडलं...
‘किती कटकट करायचं ते. मी काहीही काम करत असले की अंगाशी यायचं, सारखं जवळजवळ घोटाळायचं. काही कामही करू द्यायचं नाही. मला कंटाळा आला होता त्याचा...’ माझी बायको बोलत होती.
‘खरंतर सुरुवातीला मी आणि माझा नवरा, आम्ही मूल हवं की नको या पेचात पडलो होतो. त्याला अनेक कारणं होती. मूल जन्माला घातल्यावर त्याची येणारी जबाबदारी. म्हणजे त्याला संभाळणं वगैरे एवढचं नाही तर त्यासाठी आर्थिक तरतुदी करणं, शाळा-कॉलेजच्या फिया भरणं असल्या गोष्टीही त्यात असणार होत्या. आम्ही ठरवलं की, मूल घातलंच जन्माला तर त्याचा नीट संभाळ करायचा. पाण्यात पडलं की पोहता येतंच असा आमचा दृष्टिकोन नव्हता. मूल हवं की नको, असं करण्यातच काही वर्षं गेली. इतकी वर्षं होऊनही मूल होत नसलेल्या जोडप्याला किती प्रेशर सहन करावं लागतं.
‘सगळे जण म्हणजे माझे आईबाबा, त्याचे आईबाबा, आत्त्या-काका म्हणत होते, काय मग गूड न्यूज कधी?
‘आम्ही म्हणायचोही की, पाहू विचार चालूए.
‘विचार कसला करताय आता कृती करा. आता झाली की इतकी वर्षं लग्नाला, बास झालं प्लॅनिंगबिनिंग. आमच्या वेळी असलं काही नव्हतं बाबा. एकदा झालं मूल की, करतात सगळे आपोआपच त्यात काय एव्हढं विचार करण्यासारखं,’ एकदा त्याची आई मला म्हणाली होती.
‘आम्हाला मूल नको होतं असं नव्हतं. पण त्याबाबतचे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक प्रश्न पाहून ‘सध्यातरी नको’ असा निर्णय आम्ही घेतला होता. नवरा म्हणायचा, ‘एक मूल जगात आलं की, मग त्यासाठी सगळ्या व्यवस्था आल्या. म्हणजे पेट्रोल, खाणंपिणं, शिक्षण आलं. जगाची लोकसंख्या वाढणार. परत त्याच्या मानसिक गरजा वेगळ्याच.’ पण मूल ही आमची भावनिक गरज असल्याचं आम्हाला कळत होतं.
‘या हो-नकोच्या दोलायमान स्थितीत खूप रडारड करायचे मी. नवरा टूरवर असला की, एकटी रडायचे. कारण सोबतीला कोणीच नसायचं. मग कोणतरी हवं असं मला सतत वाटायचं.
‘दरम्यान माझं वय वाढत होतं, तसतशी प्रेग्नन्सीमध्ये येणारी कॉम्प्लिकेशन्सदेखील वाढण्याची शक्यता होती. कदाचित मूल व्हायलाही काही प्रॉब्लेम्स आले असते. धिस कूड बी द लास्ट चान्स, असा आम्ही विचार केला. मूल हवं, जे होईल ते होईल असं आम्ही ठरवलं.
‘मला तो दिवस अजूनही आठवतोय. कंडोम, गोळ्या असे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह्ज आम्ही बंद केली. त्यादिवशी सेक्स केल्यानंतर काय छान वाटलं, अर्थपूर्ण. आता सेक्सच्या कृतीला काहीतरी ध्येय, उद्दिष्ट होतं.
...
‘काय छान दिवस होता तो जेव्हा मला कळलं की, माझ्या पोटात एक जीव वाढतोय. एक शुक्राणू माझ्यात गेला आणि त्यापासून एक पेशी तयार झाली – सतत वाढणारी. त्यातून हाता-पाय-मेंदू असे अवयव विकसित होण्याची क्षमता असलेली. छान फिलिंग होत होतं. ही गोष्ट सांगितल्यावर नवराही खूप खूश झाला. म्हणाला, ‘अखेर माझ्यातले एक्सवाय नुस्तेच कंडोममध्ये वाया गेले नाही तर! आज आपण कुठेतरी डिनरला जाऊ.’ खूप आनंद झाला होता आम्हाला, आमच्या दोघांचा मिळून तयार झालेला एक जीव माझ्या पोटात वाढत होता. पाऊस पडल्यावर मातीतून कसे ते दोन हिरवे हात बाहेर येतात तसंच माझ्याही पोटात होतंय असं मला वाटायचं. उचंबळून यायचं. आम्हा दोघांचेही आईबाबा तर काय वाट पाहतच होते. डिंकाचे काय, अळवाचे लाडू काय, बदामाचा शिरा काय काही ना काही माझ्यासाठी घरी येऊ लागलं. या एका गोष्टीने घरातलं वातावरण बदललं. पण मला छान वाटायचं कारण वेगळंच होतं, ते म्हणजे एकाएकी सगळ्यांनी मला महत्त्व द्यायला सुरुवात केली होती!
‘नवरा माझे इतके लाड करायचा. तो बिचारा माझे डोहाळे पुरवायला रात्रीअपरात्रीही उठून बाहेर जायचा. रोज घरी आल्यावर तो माझी चौकशी करायचा, मग पोटावर कान लावून आतल्या बाळाशी बोलायचा. मी त्याला म्हणायचे, अरे त्याला काय कळणारे. तर तो म्हणायचा की, मी पाहिलंय डिस्कव्हरीवर की, पोटात असताना बाळांना आवाज एकू येतात. त्यांनी असा रिसर्च केला आहे. तो टेस्ट, चेकअप्ससाठी सोबत यायचा. सगळं नीट चाललं होतं. कोणीतरी आपल्यासाठी इतकं काहीतरी करतंय म्हणून मला खूप छान वाटायचं!
...
‘अखेर मला पेन्स सुरू झाले, आई घरी होतीच. ते दुखणं.... बापरे, आठवलं तरी अंगावर काटा येतो. तेव्हा असं वाटलं कुठून आई होण्याचा निर्णय घेतला! कंबर, पोट, ओटीपोट भयंकर दुखत होतं, कोणीतरी आतून जोरात ढुशा मारतंय असं वाटत होतं... तसं मी आईला म्हणाले तर आई म्हणाली, ‘अगं बाई आहेस ना मग एव्हढं सहन करायला नको, तुझा जन्मच झालाय यासाठी. काही नाही होणार.’ डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि मला एक मुलगा झाला. तो मासांचा गोळा बाहेर आला आणि मी सुटले... शाळा सुटली, पाटी फुटली...
‘काही सेकंदातच त्याचं ते पहिलं कोवळं करत रडणं सुरू झालं. जणू मी माझे पेन्स त्याला दिले! जणू तो म्हणत असावा ‘कशाला आणलंस या जगात. आता जगावं लागेल!’ मला असं काहीतरी अधूनमधून वाटायचंच. त्यानंतर मला ग्लानी आली...
‘जागी झाले तेव्हा मला कोणीतरी बाळ आणून दाखवलं, म्हणाले मुलगा झालाय, अगदी नीट सुदृढ. माझ्या छातीशी दिलं त्याला, तेव्हा काहीतरी विजेसारखं सरसरून गेलं अंगातून. सुखद, काहीतरी आपलं. म्हणजे आपल्यातूनच निर्माण झालेलं आपल्यासमोर, आपल्या कुशीत. तो दूध पिऊ लागला तेव्हा मला इतकं नवल वाटलं. या आधीही जेव्हा पहिल्यांदा माझे संबंध आले होते तेव्हाही तो पुरुष असंच स्तनांशी लुचला होता, त्यानंतर नवर्यानेही तसंच केलं होतं आणि आता हा! डोळे बंद करून तो लालबुंद कोवळा करकरीत जीव चुटचुट दूध पीत होता. काय छान फिलिंग होतं ते. ते सेक्शुअल होतं का आईपणाचं होतं का आणखी कसलं ते नेमकं सांगता येणार नाही. पण छान वाटत होतं खरं. इतके महिने जे काय सगळं चाललं होतं, त्याचं सार्थक झाल्यासारखं, शांत, समाधानी...
‘आमचा दोघांचा एक छोटासा जीव कलाकलाने मोठा होत जाणारा, आणि पुन्हा कदाचित एका नव्या जिवाला जन्म घालणारा. त्याच्यासाठी नवर्याने असंख्य खेळणीदेखील आणली होती. आम्ही त्याला गोष्टी सांगायचो, चित्रांची पुस्तकं दाखवायचो. त्याला साहव्या-सातव्या महिन्यातच त्यातली चित्र ओळखता येऊ लागली होती.
‘सगळं छान चाललं होतं आणि एकेदिवशी नवर्याला प्रमोशन मिळालं. बातमी आनंदाची असली तरी त्याला त्यासाठी सिंगापूरला जावं लागणार होतं. किमान एक वर्ष तरी त्याला तिथे काढावं लागणार होतं. त्यानंतर भारतात नक्की बदली नक्की करू असं कंपनीने आश्वासन दिलं होतं.
‘मला सिंगापूरला, तेही आमच्या मुलाला घेऊन अजिबात जायचं नव्हतं. त्याला बरीच कारणं होती. एकतर केवळ एक वर्षासाठी तिथे शिफ्ट व्हायचं, हा पर्याय मला फारसा पटला नाही. त्यात पूर्णतः नव्या वातारवणात मला इतक्या लहान मुलाला वाढवायचं नव्हतं. नवर्याला मात्र आम्ही हवे होतो. तो म्हणाला, मी तुम्हा दोघांना टाकून कसं जाऊ? आत्ता तर मी आपल्या बाळाच्या सोबत हवंच.
‘यावर बरीच चर्चा, वावविवाद झाले, रडारडही झाली. पण शेवटी शांतपणे निर्णय घ्यावा लागला. ही संधी करिअरच्या दृष्टीने चांगली होती. त्याला चांगली पोस्ट मिळणार होती, शिवाय पगारही होता त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळणार होता. पुढचा विचार करता सिंगापूरला तो एकटाच जाईल असा निर्णय आम्ही घेतला.
‘तिथे गेल्यावर रोज फोनवर बोलायचो. व्हिडिओ कॉल करायचो. नवरा गेल्यावर मात्र मला कंटाळा आला होता. मला सगळं एकट्यानंच करावं लागत होतं. तो मला बर्याच गोष्टीत मदत करायचा. स्वयंपाक करायचा, मुलाची शी-शू काढायचा, कपडे बदलायचा. त्याला आवडायचं ते. पण तो हे सगळं माझ्या एकटीवरच आलं. माझी फार घुसमट व्हायची. दिवसभर बोलायला कोणीच नसायचं. नंतर नंतर तर, तो माझ्यामागे मागे मागेच राहायला लागला. झोपायचा तेही मी जिथे जाईन, ज्या खोलीत असेन तिथेच, माझ्याचजवळ. मी तिथून हळूच निघाले की, काही मिनिटांत जागा व्हायचा आणि भोकाड पसरायचा. तो जणू माझ्या पाठीवरचं एक बांडगूळच झाल्यासारखा वाटायचा मला! आजोबा किंवा आजी यांच्याबरोबर बाहेर फिरायलाही जायचा नाही. मला सुरुवातीला छान वाटलं, आपलं बाळ, त्याला किती लळा आहे आपला, पण नंतर मात्र बंधन होऊ लागलं. कंटाळा आला. मी जिथे जाईन तिथे हा माझ्या मागे मागे, माझा पदर किंवा ओढणी धरून हजर.
‘त्याला थोडं थोडं बोलायला येऊ लागल्यावर तो ममा, पपा शिवायही काही निरर्थक शब्द बडबडू लागला. एक-दोनदा मला इतका कंटाळा आला की, मी त्याला ओरडून म्हणाले, ‘आय डोन्ट लाइक युवर कंपनी.’ बिचारा. नुसता टकामका डोळ्यांनी पाहत राहिला माझ्याकडे. कदाचित माझ्या मोठ्या आवाजाने असेल, मग रडायला लागला. मला असं वाटलं तेव्हा की, दोन थोबाडीत मारून गप्प करावं त्याला, ‘म्हणावं चुप बैस. एकदम गप्प.’ पण नंतर मात्र मला छान वाटलं. माझ्यावरचं बांडगूळ, या विचाराने मी सुखावले! माझ्याशिवाय त्याचं अस्तित्व शून्य होतं. खरंतर मी आहे म्हणूनच त्याला अस्तित्व होतं. मी त्याला झिडकारलं तर तो एक असहाय, मूर्ख आणि निरागस बालक होता. अ लिटल पुअर गाय!’
....
‘एक वर्ष होत आलं होतं, पण तरी नवर्याचं तिकडचं काम संपलं नव्हतं. अजून काही महिने तरी त्याला तिथे थांबावं लागणार होतं. त्याने हे सांगितलं तेव्हा मला रडूदेखील नीट फुटलं नाही, इतकं वाईट वाटलं. सुन्नच झाले मी. मला वाटलं जणू तो आता पुन्हा येणारच नाही आणि मुलाची जबाबदारी आपल्यावरच पडणार. आपलं आयुष्य आता असंच, यातच जाणार आहे. हा मुलगा म्हणजे आपल्या गळ्यातलं लोढणं होणार. आपण याच्या घाण्याला बांधलेला एक बैल आहोत. इतका तिरस्कार आणि नकारात्मक भाव माझ्या मनात दाटून आला होता ना त्या वेळी की, मुलाचं तोडंही पाहू नये असं वाटलं. सारखं दिसेल ते तोंडात घालणारा, लाळ लागलेला आणि मोठ्या-मोठ्या निर्विकार डोळ्यांचा तो मठ्ठ...
‘मी एक-दोनदा आईला थोडसं आडूनआडून असं सांगितलंदेखील की, मला कंटाळा आलाय. तुम्ही घेऊन जा ना त्याला दोन-तीन दिवस. तर ती एकदम उखडलीच, ‘अगं काय आई आहेस का काय तू? तुझं पोटचं पोर आहे ना ते? मग तुझीच जबाबदारी आहे ती.’ मला वाटलं की, आपण हे आईपण आपल्यावर लादून घेतलंय. मूल जन्माला आलं तेव्हापासून ते आपल्याला चिकटलं. आणि आता कदाचित आयुष्यभर. माझ्यात आई होण्याच्या सगळ्या शक्यता असल्याने हे आईपण श्वापदासारखं दबा धरून होतंच. संधी मिळाली आणि त्याने माझ्या मानगुटीवर उडी घेतली. आता त्यातून सुटका केवळ अशक्य. अशक्य? पूर्णतः अशक्य नाही खरंतर. काहीतरी मार्ग असेलच. मी त्याला पाळणाघरात ठेवायचा पर्याय निवडला. पण मी तिथून निघाले की, तो जे रडायचा की, त्याने माझा सगळा धीरच खचून जायचा. त्याचा आकांत कानात घुमायचा. मग मी त्याला परत घेऊन यायचे. तो असहाय, बिचारा जीव. त्याच्याकडे पाहून मला कीव यायची आणि हसूही.
‘कधीकधी एक आई म्हणून किंवा माणूस म्हणून त्याचं रडणं एकून मीही रडायचे. पण मला त्याचा राग यायचा. मला वाटायचं, हे असहाय आणि बिचारं बांडगूळ माझ्यावर अंकुश ठेवतंय; मला त्याच्यानुसार कठपुतळ्यांप्रमाणे खेळवतंय...
‘एकेदिवशी नवर्याने सांगितलं की, सिंगापूरमधला त्याचा प्रकल्प जवळपास संपलाय. ते एेकून मी इतकी आनंदित झाले की, मुलाची मी मोठ्ठी पापीच घेतली! जणू त्याला सांगत होते की, आता तुझ्या तावडीतून माझी अंशतः तरी सुटका होईल. पण नवर्याने पुढे जे सांगितलं, त्याने मात्र मी अधिकच निराश झाले. तो म्हणाला, पण मला अजून काही महिने यूएसला जावं लागणार आहे. ते झालं की, मी भारतात!
‘मी भयंकर निराश झाले. मला वाटलं की, सिंगापूरमध्ये त्याला कंपनीतलीच कोणी भेटली तर नसेल ना. म्हणून आता तिला घेऊन हा यूएसला कामानिमित्ताने मजा मारायला चाल्लाय. असं असेल तर काय पातळीवरचे संबंध असतील त्यांचे?’ मी मोठ्या सुरीने ब्रेडचा लोफ कापत कापत विचार करत होते.
‘म्हणजे आपण त्याच्यावर अवलंबून आहोत तशीच तीही त्याच्यावर अवलंबून असेल तर ठीक आहे. मग आम्ही समान पातळीवरच्या होऊ, पण त्यापेक्षा जास्त काही असेल तर, आपल्यापेक्षा वरचढ असेल तर? काय विचार करतोय आपण. आपला नवरा अजिबात असा नाहीये. आणि असलंच असं काही, तर लपवून ठेवणार्यातला तो नक्कीच नाहीये...
‘काय झालंय आपलं मन, डेंजर. काळ्याकुट्ट खोल्यांचा तुरुंग. एकेक विचारांचा कैदी असा बाहेर येतो आणि विष कालवू लागतो. पण हे असे विचार का आले आपल्या मनात? किती प्रामाणिक आणि चांगला नवरा आहे आपला. प्रेम करणारा, काळजी घेणारा. तरी ही संशयाची पाल चुकचुकलीच, ही संशयाची पाल दबा धरून असतेच फक्त संधी मिळायला हवी!
आपल्या मनाला असा विचार शिवलाच कसा? आपण बोलून नाही दाखवला, पण मनात आला म्हणजे तो निर्माण झालाच न. उच्चारला गेला नाही म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीये असं थोडीच. आहेच त्याचं अस्तित्व आणि आता त्याचा जन्म झालाय म्हणजे तो थोडंफार राहीलच मनात....
‘याला कारण आहे या मुलाचा जन्म. हा जन्माला आला म्हणून पैशांसाठी नवर्याला सिंगापूरला जावं लागलं, याच्यामुळेच आपल्याला वैताग आलाय, याचं हे असं माझ्यावर अवलंबून असणं, त्याची कीव येणं, त्याचा सगळा अस्तित्वभार आपल्यावर ओझं होणं... त्यामुळे आपलं मन असं सैरभैर आणि कलुषित होतंय... हे सगळं याच्या जन्मामुळेच झालंय, हाच कारणीभूत आहे. या सगळ्यामागे हाच... हाच आहे...’ मी असा विचार करत असतानाच मुलगा माझ्या पायापाशी आला. त्याला पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी हातातला तो मोठ्ठा सुरा त्याच्यावर वेडावाकडा सपासप चालवला. तो रडू, भेकू लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा तो आवाज माझ्या आणखीनच डोक्यात गेला. मी आणखीन चिडले आणि चीत्कारून सुरा दुप्पट वेगाने चालवू लागले. त्याचा आवाज शांत झाला. पण मी थांबले नाही. सुरा चालवत राहिले....
मी भानावर आले. माझे हात रक्ताने माखले होते, माझ्या अंगावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि माझ्या पायाशी रक्ताचं थारोळं साचलं होतं....
माझी शुद्धच हरपली आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मी इथे होते. मीच माझ्या मुलाला मारलंय, बस्स...’
....
क्लिप संपली. सगळं एकून मी भंजाळलो, सैरभैर झालो. मी मानसशास्त्रज्ञबाईंना म्हणालो, ‘मॅडम, मी जरा दोन मिनिटं जाऊन येऊ बाहेर? आय नीड सम टाइम.’
‘ऑफकोर्स.’
मला सिग्रेट ओढायची होती. इमारतीच्या बाहेर रस्त्यावर आल्यावर वर्दळीच्या, वाहनांच्या आवाजाने मला वास्तवाची जाणीव झाली. एका कोपर्यात असलेल्या छोट्याशा चौथर्यावर मी बसलो. सिग्रेट पेटवली. धूर आत घेतला आणि बाहेर सोडला. नंतर दीर्घ इन केलं. वाहनांचे आवाज माझ्याआत, जाणिवेत धूसर होत गेले आणि एकेक प्रश्न स्वतःच्या आवाजात एेकू येऊ आले – आपण जे एेकलं ते खरंय? ती बोलणारी आपलीच बायको होती?
पुन्हा दीर्घ इन.
काय रिअॅक्ट करणारोत आपण यावर? काय रिअॅक्ट झालं पाहिजे?
...
सिग्रेटमुळे थोडं बरं वाटलं. मी आत गेलो. जाण्यापूर्वी टॉयलेटमध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं. जरा आणखी रिलॅक्स वाटलं. मी जे एकलं होतं त्यातला एकेक भाग, एकेक मुद्दा सुटा-सुटा केला.
खोलीत गेल्यावर मानसशास्त्रज्ञबाईंनी कसनुसं हसत माझं स्वागत केलं. त्या हसण्यात थोडा अवघडलेपणा आणि थोडी सहानुभूती होती.
‘मी थेट मुद्द्याचंच बोलते,’ बाई बोलू लागल्या. मला काखेत, कपाळावर थोडा घाम फुटला. ‘आपण एेकलेला व्हिडिओ नक्कीच शॉकिंग आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मिसेसना इथे आणलंत तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळंच सांगितलं होतंत...’
‘कारण तिने जे काय सांगितलंय त्यातलं काहीच घडलेलं नाहीये!’
मॅडम म्हणाल्या, ‘म्हणजे?’
‘म्हणजे असं, की मी सिंगापूरला गेलो हे खरंय, पण तिने आमच्या मुलाचा खून नक्कीच केला नाही, ते शक्यच नाही.’
‘पण त्यांनी तसा स्पष्ट शब्दांत कबुलीजबाब दिलाय...’
‘दिला असेल, पण जे नाहीच त्याचा कसा खून होईल – आम्हाला मूलच नाहीये तर ती खून कसा काय करणार!’
बाई अवाक झाल्या. त्यांना काय बोलावं हे सुचलं नाही.
‘आम्हाला मूल नाहीये हे शंभर टक्के सत्य आहे. पण तिने जे जे काय सांगितलं त्याचा विचार करताना मला काही गोष्टी आता थोड्या-थोड्या लक्षात येताहेत...’ मॅडमनी मला मध्येच थांबवलं. ‘सॉरी पण आम्हाला तुमचंही बोलणं रेकॉर्ड करावं लागेल.’ त्यांनी फोन करून कॅमेरा मागवून घेतला. कॅमेरा नीट लावून, ट्रायल घेतल्यानंतर त्या पुन्हा जागेवर बसल्या. म्हणाल्या, ‘हं सांगा...’
‘काही वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत...’ मी बोलू लागलो.
‘लग्न झाल्यानंतर मूल हवं का नको, यावर आम्ही बराच काथ्य़ाकूट केला. हवं यासाठीही कारणं होती आणि नको यासाठी तर बरीच होती. बायकोने ते सांगितलंय क्लिपमध्ये. एकूणच हा निर्णय घेणं कठीण होतं. पण बराच खल करून आम्ही शेवटी चान्स घ्यायचा ठरवलं. आम्ही खूप प्रयत्न केले, पण यश येत नव्हतं. आम्ही नको म्हणत होतो तेव्हा आम्ही आमच्या भावनांकडे, हळव्या कोपर्यांकडे दुर्लक्ष केलं. सप्रेसच केलं म्हणू यात. तेव्हा आम्ही प्रॅक्टिकली खमके होतो. पण आता मात्र आम्ही सगळे प्रॅक्टिकल मुद्दे सोडून मूल हवं असं ठरवलं आणि आम्हाला हवं ते होत नव्हतं. फार कठीण काळ होता तो. बायकोने ते मनाला फारच लावून घेतलं होतं. तिला वाटायचं की, आपणच आधी नाही नाही केलं आणि आता तो जीव एकाअर्थी जणू आपल्याला इंगा दाखवतोय. मी तिची समजूत काढायचा प्रयत्न करायचो.
‘कधीकधी तर ती एकटीच बोलायची, ‘असं काय रे करतोस तू हे बघ, माझ्या आत नाही का येणार तू? तुझी आई आणि तुझा बाबा किती वाट पाहतोय तुझी. मला माहितेय मीच आधी तुला नको नको म्हटलं, पण त्याचा असा सूड़ नको उगवूस. मी तुला सॉरी म्हणते खूपदा खूप खूप सॉरी म्हणते, पण प्लीज तू ये. मला तू हवाएस.’
खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. ‘चहा किंवा कॉफी काय आणू मॅडम?’ एका पोर्याने विचारलं. ‘चहा चालेल.’
‘मलाही चहाच.’
‘पुढे मला ऑफिसातून प्रमोशन मिळून सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. पण ते काम फक्त काही महिन्यांचंच होतं. आणि त्याच वेळी ती प्रेग्नंट असल्याचं कळलं. आम्ही खूप आनंदात झालो. वयामुळे प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन्स असणार होत्या, पण डॉक्टरांच्या मते त्यावर अनेक उपाय होते. काळजी करण्याचं तसं काही कारण नव्हतं. सिंगापूरला तीही माझ्यासोबत येणार असं मी गृहीतच धरलं होतं. पण तिने यायला साफ नकार दिला. तिला अशा स्थितीत परदेशात – नव्या जागेत, देशात जायचं नव्हतं. माझं कामही दोन-तीन महिन्यांचंच असल्याने मीही तिला फार आग्रह केला नाही. आणि इथे तिचे व माझे आईवडील काही लागलं तर पाहायला होतेच. शिवाय फोन, व्हिडिओचॅट होतंच. सिंगापूरला जाण्यामागे आर्थिक कारणही होतं. आमच्या आयुष्यात एक नवा जीव येणार होता. त्यासाठी पैसे लागणार होता. प्रमोशनने माझ्या पगाराच्या पॅकेजमध्येदेखील बरीच वाढ होणार होती. परत भारतातून कायमस्वरूपी कुठेही जायचं नव्हतं. आमच्या आयुष्यात दोन चांगल्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे आम्ही खूप खूश होतो.
‘तिला तिच्या आत काहीतरी कलाकलाने वाढतंय याचा कोण आनंद झाला होता. ती मला तिच्या पोटावर डोकं टेकवायला सांगायची आणि म्हणायची येतंय का काही एेकू येतंय? मी नाटक करायचो, हो येतंय एेकू. आपलं बाळ हसतंय आणि म्हणतंय थँक्यू मला तुम्ही या जगात आणणार आहात. ती मला म्हणायची, आपण आणतोय त्याला या जगात. तो स्वतःहून नाही, तर आपल्यामुळे येणारे या जगात.
‘मी सिंगापूरला गेल्यावर सगळं नीट चाललं होतं. तिची आई दररोज चक्कर टाकायची घरी. माझे आईबाबाही जायचे. सिंगापूरला असताना मला मला काही आठवडे यूएसला जावं लागलं होतं. पण तो दिवस मला अजूनही आठवला की अंगावर काटा येतो. सर्वांत वाईट दिवस होता तो आमच्यासाठी. मी नेहमीप्रमाणे घरी फोन केला तो माझ्या आईने उचलला. तेव्हा आईने मला आढेवेढे घेत सांगितलं, मिसकॅरेज! मी होतो यूएसला, सातासमुद्रापार, मी जाऊ शकत नव्हतो. ते शक्यच नव्हतं. मी आईला म्हणालोही की, मी येऊ का. तर आई म्हणाली की, नको, काही आवश्यकता नाही. आम्ही आहोतच सगळे. तू काळजी नको करूस. तीदेखील नीट आहे तशी. पण थोडा वेळ लागेलच या धक्क्यातून सावरायला.
‘मी इतका अस्वस्थ झालो होतो की, काही सुचत नव्हतं. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपासून लांब असता, तुमचं आणि तिचं, तुम्हाला अत्यंत हवी असलेलं काहीतरी संपतं. हे तुम्हाला माहीत नसतं तोवर ठीक असतं. पण माहीत झाल्यावर मात्र सैरभैर होतं नुसतं, पिंजर्यातल्या जनावरासारखं. हतबल, हतबल झालो होतो मी. मला त्या रात्री झोप लागणं शक्य नव्हतं. माझ्यासोबतही कोणी नव्हतं. एकटेपणा फक्त...
‘ती रात्र मी बायको कशी असेल, तिला काय वाटत असेल, आपण सिंगापूरला आलो खरे, पण ज्यासाठी आलो ते आता संपलंय, आता पुढे काय करायचं या विचारातच घालवली. पण मी स्वतःला धीर दिला. आयुष्य खूप मोठं आहे असं मी स्वतः समजावलं.
‘दुसर्या दिवशी मी बायकोशी बोललो. ती खूप रडली. मला तिचा तो रडण्याचा आवाज अजूनही जशाच्यातसा आठवतो. तो आवाज, तिचा आकांत मी विसरू शकत नाही! ती मला म्हणाली, एखाद्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा राहतो; तिच्यासोबत काही तास, काही क्षण घालवतो तेव्हा ते आपल्या आठवणींत जमा होतात. मग ती व्यक्ती जाते आणि ते मागचं आठवून आपल्याला वाईट वाटतं, आणि छानही वाटतं. पण इथे तर ती व्यक्ती आपण पाहिलीही नव्हती. ती केवळ आहे हे आपल्याला माहीत होतं. त्या असण्याच्या एका धाग्याच्या तंतूने आपण आयुष्यात काहीतरी विणू पाहत होतो. आणि एके दिवशी आपल्याला कळलं की, आता तिथे काहीच नाहीये, खरंच काही नाहीये. मी तिला समजावलं की, हे पहा आयुष्य खूप मोठं आहे. नीट रहा.
‘त्यानंतर ती अगदी नेहमीसारखी झाली. आता तो विषय काढायचा नाही, असं आम्ही ठरवलं. पण हे सगळं स्वीकारणं आणि पचवणं सोपं नव्हतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती, तिची ओढ तीव्र होती. मग मी ठरवलं की, तिला तिचा वेळ द्यायला हवा. आणि तीदेखील तसं स्वतःहून म्हणत होती...’
चहा आला. चहाच्या गरमपणा घशातून रक्तात गेल्याने बरं वाटलं. बाईंनी विचारलं, ‘तुमच्या आजूबाजूला काही लहान मुलं होती. जी तुमच्याकडे यायची, खेळायची. किंवा असं कोणाविषयी तुमची मिसेस तक्रार करायची?’ मला प्रश्नाचा रोख कळला.
‘नाही. आमच्या आजूबाजूचे बरेचसे फ्लॅट बंद होते. त्यांचे मालक हे बाहेरगावीच असायचे. कधीतरी कोणीतरी यायचं. पण हो ती एक तक्रार मात्र नेहमी करायची, घरी येणार्या कबुतरांबद्दल...
....
‘ती स्वयंपाकघर आणि हॉलच्या खिडकीतून येणार्या कबूतरांविषयी सारखी तक्रार करायची. जवळपास रोजच. मला म्हणायची, या कबूतरांचं काहीतरी कर रे. जरा खिडकी उघडी दिसली की आली आत. घुमत बसतात नुसती आणि घाण करतात नुसती. एवढी छान मोठी खिडकी असूनही ती बंदच ठेवायची म्हणजे निव्वळ मूर्खपणाच नाही का?
‘मधे एकदातर आमच्या बाथरूममध्ये घुसून घरटं केलं होतं. त्यांना हाकलवता हाकलवता वैताग आला. ती गेल्यावर त्यांचा वास्तव्याचा एक कुबट व घाणेरडा उग्र वास तिथे भरून राहिला होता. तो वास होता त्यांनी तिथे केलेल्या घाणीचा, टाकलेल्या अंड्यांचा! त्या प्रसंगापासून तिच्या मनात कबूतर या जमातीविषयीचा राग अधिकच वाढला.
‘एकदा काय झालं, चुकून तिच्या हातून किचनची खिडकी उघडी राहिली. ही संधी साधून कबुतरं आत आली! मला रागाने म्हणाली, काय सारखी घूघू करत बसतात. एेकलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. त्यांचा तो डार्क करडा रंग, त्यावरचा लालसर-मोरपिशी रंग आणि डोळे डोक्यात जातात. वाटतं एकेकाच गळाच घोटावा. बरं त्यांना काय वाटतं की, ती काय आपली मुलं आहेत की आपण त्यांना संभाळू? तिच्या या वाक्याने मी चकित झालो. ती पुढे म्हणाली, त्यांचे ते मंद मठ्ठ भाव असलेले डोळे पाहिले की वाटतं सुरीने गळाच चिरावा त्यांचा...!’
...
पोर्या कप घ्यायला आल्याने मी थांबलो. मी बाईंचं नीट निरीक्षण केलं, तेव्हा मला जाणवलं की, तशी दिसायला बरी आहे ही बाई. फक्त नीट पाहिलं तरच तिची वैशिष्ट्यं कळली असती. म्हणजे ती सोकॉल्ड आकर्षक कॅटेगरीत बसली नसती. तिने ग्रे रंगाची कॉटनची साडी घातली होती. मेकअप नसला तरी साडीला सूट होतील असे कानातले होते. त्यांचे केस छोटेसेच असले तरी गळ्यात काळी मोठ्या खड्यांची माळ घातली होती. रंग गोरा होता. त्यामुळे त्या साडीत ती उठून दिसत होती. त्या साडीतून अर्धवट दिसणारं पोट सुप्त आकर्षण निर्माण करत होतं. डोळे तपकिरी रंगाचे, बोलके होते. केस काळे मोकळे होते.
चहा झाल्यावर मी पुन्हा बोलू लागलो.
‘तर माझी बायको इथे येण्याआधी झालं असं की, मी हॉलमध्ये होतो. नेहमीप्रमाणे ती किचनमध्ये काहीतरी करत होती. छान गाणं गुणगुणत होती. मी टीव्हीवर पाहत होतो. तेव्हा मला कबूतराचं गुटर्गू एेकू आलं. मग पंखांची फडफड एेकू आली आणि मग ‘मारून टाकीन तुला, आय विल किल यू’ असा ओरडण्याचा आवाज. मी टीव्ही बंद करून आत गेलो. तर ब्रेडचा लोफ रक्ताने भरला होता. गॅसवर रक्ताचे मोठेमोठे शिंतोडे उडाले होते. बायकोच्या अंगावर, चेहर्यावर रक्ताच्या चिळकांड्या उडल्या होत्या. तिच्या हातात ब्रेड कापायची मोठी धारधार सुरी होती. ती तिने घट्ट धरली होती. आणि तिच्या समोर किचनच्या ओट्यावर एक कबूतर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. जिवंत असताना असलेले निर्विकार डोळे. मरण्याआधी शेवटची धडपड करण्यासाठी अर्धवट उघडलेले पंख. बायको दातओठ खात त्याच्याकडे रागाने पाहत होती. पण मी तिथे गेल्यावर तिने केलेल्या कृत्याची तिला जाणीव झाली असावी. तिने सुरी ठेवली, मला मिठी मारली आणि रडू लागली. ‘मला सारखा त्रास द्यायचा तो, सारखा सारखा यायचा, भुणभुण करायचा. वैताग आलेला मला त्याचा. म्हणून मी...’ तिचं भान हरपत होतं... तिला झोपवून मग मी तुम्हाला फोन केला...’
बाई माझ्याकडे पाहत होत्या, तर मी त्यांच्याकडे. त्या नक्कीच गोंधळल्या असणार. मी मघाशी त्यांच्याकडे थोडं आडून पाहत होतो, पण आता मात्र त्यांच्याकडे मला उघड पाहता येत होतं. खरंच त्यांचं पोट सुप्त आकर्षक होतं. कदाचित अर्धवटच दिसत होतं म्हणून.
मी म्हणालो, ‘माझ्या बायकोने कोण्या लहान मुलाचा खून केलेला नाहीये. तर एका कबूतराला ठार मारलंय. पण तिला असं वाटतंय की, आपण मुलाला मारलंय. आणि त्यामुळे तिने तिची एक कथा रचून सांगितलीये. पण ती संपूर्ण खरी नाहीये.’
बाईंच्या चेहर्यावर थोडे गोंधळल्याचे व किंचित भीतीचे भाव होते. यावर काय बोलावं हे तेव्हातरी त्यांना सुचत नव्हतं. आता त्यांच्याकडच्या कॅमेर्यात होत्या, दोन गोष्टी. एक बायकोची आणि एक माझी. दोन वास्तवं. दोन बाजू.
...
नवर्याचं लक्ष आपोआपच बाईंच्या साडीतून दिसणार्या गोर्या रंगाकडे जात होतं. अधिक काही घडण्याआधी तो निघाला. बाईंनी कसंनुसं हसत ‘एक-दोन दिवसांत तुम्हाला कळवते’, असं म्हणत निरोप दिला. पण या सगळ्या प्रकारामध्ये मला – म्हणजे ही गोष्ट रचणार्याला मात्र चित्रविचित्र स्वप्नं पडायला लागली. त्यातले सगळे तपशील मला कधीच आठवले नाहीत, पण आठवणारे काही असे –
बायकोने मारलेल्या कबूतराएवजी तिथे मानसशास्त्रज्ञ बाईचं मुंडकं आहे... मला मूल झालं आणि ते अर्ध कबूतर, अर्धं माणूस होतं, ते गुटर्गू करत रडत होतं... मी त्या आकर्षक गोर्या पोटावर ओठ फिरवत होतो, त्यानंतर सुरी फिरवत होतो... त्या बाईंच्या पोटातून मुलाएवजी कबूतर बाहेर आलं होतं, हे माझंच आहे मॅडम, माझाच स्पर्म दिलाय मी तुम्हाला असं म्हणत मी त्यांना काँग्रॅट्स करत होतो, त्या स्तिमित, गोंधळलेल्या होत्या, भांबावलेल्या होत्या...
मी जाम डिस्टर्ब झालोय आणि आता मला या सगळ्या स्वप्नांची कथा तयार करून त्यातून बाहेर पडायचंय. पण मला कळतच नाहीये की, या सगळ्याची कथा सांगायची तरी कशी....
- प्रणव सखदेव
पूर्वप्रकाशित - नव-अनुष्टुभ सप्टेंबर-डिसेंबर २०१३
शष्प कळलं नाही...
पण या धाग्याला प्रतिसाद लिहायचाच हे आधीच ठरवलं होतं... म्हणून काईश्या ग्लानीत असुनही हातातल बळ एकवटलं आणी प्रयत्नपुर्वक टाइप करु लागलो तरीही त्या कबुतराच्या रक्ताने बरबटलेले माझे हात किबोर्डवरुन सटकत होते. शेवटी टायपो यापुढे सुधरत बसायचे नाही हे मनाशी ठरवुनच मी प्रतिसाद लिहला की "शष्प कळलं नाही...".
असो, नक्कि सायको कोण आहे कपल ? नवरा की बायको ? का मिसकॅरेजमुळे दोघेही गंडली ? की वाचक ज्यांना कथा समजली आहे ? मला कळतच नाहीये की, या सगळ्याची कथा ऐकायची तरी कशी....
...
किती प्रामाणिक आणि चांगला नवरा आहे आपला. प्रेम करणारा, काळजी घेणारा. तरी ही संशयाची पाल चुकचुकलीच, ही संशयाची पाल दबा धरून असतेच फक्त संधी मिळायला हवी!
पालींची बदनामी थांबवा!!!!!!
बायकोने मारलेल्या कबूतराएवजी तिथे मानसशास्त्रज्ञ बाईचं मुंडकं आहे... मला मूल झालं आणि ते अर्ध कबूतर, अर्धं माणूस होतं, ते गुटर्गू करत रडत होतं... मी त्या आकर्षक गोर्या पोटावर ओठ फिरवत होतो, त्यानंतर सुरी फिरवत होतो... त्या बाईंच्या पोटातून मुलाएवजी कबूतर बाहेर आलं होतं, हे माझंच आहे मॅडम, माझाच स्पर्म दिलाय मी तुम्हाला असं म्हणत मी त्यांना काँग्रॅट्स करत होतो, त्या स्तिमित, गोंधळलेल्या होत्या, भांबावलेल्या होत्या...
"दिडकीची भांग घेतली, की काय वाट्टेल त्या कल्पना सुचतात" असे गडकरीच ना मला वाटते सांगून गेलेले?
(मतकरी चावले काय?)
(अतिअवांतर: दारूचा ग्लास, मोरी, फडताळ आणि बायको यांची अशीच काही पर्म्यूटेशने-काँबिनेशने करणारी एक कथा मध्यंतरी जालावर फिरत होती, असे स्मरते.)
पूर्वप्रकाशित - नव-अनुष्टुभ सप्टेंबर-डिसेंबर २०१३
"छापणारे काय, काय द्याल ते छापतील!" ही अन्तूबरवोक्ती या निमित्ताने आठवली. (ईश्वर पु.लं.च्या मृतात्म्यास या निमित्ताने शांती देवो.)
असो.
ही ती कविता.... एकदम चोक्कस छे
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||
.
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||
.
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
.
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||
.
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...
.
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||
.
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
.
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||
.
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
.
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||
म्हटलं तर अवांतर
या आधीही जेव्हा पहिल्यांदा माझे संबंध आले होते तेव्हाही तो पुरुष असंच स्तनांशी लुचला होता, त्यानंतर नवर्यानेही तसंच केलं होतं आणि आता हा! डोळे बंद करून तो लालबुंद कोवळा करकरीत जीव चुटचुट दूध पीत होता. काय छान फिलिंग होतं ते. ते सेक्शुअल होतं का आईपणाचं होतं का आणखी कसलं ते नेमकं सांगता येणार नाही. पण छान वाटत होतं खरं.
हा लेख पुरषाने लिहीला असेल म्हणून असेल पण एक अगदी स्पष्ट करावसं वाटतं - की लहान बाळाला दूध पाजतानाचं फीलींग अजिबात सेक्श्युअल नसतं. अगदी अगदी वात्सल्याचं किंवा आता कधी एकदा हे दुध पीऊन (अन बाळ शू करुन) झोपतय म्हणजे आपल्याला झोप मिळेल इतपत कंटाळ्याचं असतं.
- इत्यलम (का काय म्हणतात ते :)) = और ज्यादह नही बोलेंगे.
वाचकाला गुढ, अनाम भितीच्या
वाचकाला गुढ, अनाम भितीच्या प्रदेशात ओढून नेणे हे भयकथा किंवा गुढकथा या प्रकाराचं वैशिष्ठ्य. त्यासाठी धक्कादायक प्रसंग, कथनाचा वेग आणि ठाशीव शब्द आणि वाक्य योजना यांची यशस्वी रचना करणे या कसोटीला ही कथा उतरते. म्हणून मला कथा आवडली. अश्या कथेचे तपशील आणि तर्क तपासण्याची गरज असतेच असं नाही (असं मला वाटतं :D ).
खुला शेवट
मला असे वाटते की, मी काही बोलण्यापेक्षा ज्याने त्याने आपापल्या परीने कथेचा शेवट व त्याचा अर्थ लावावा. मी तो मोकळा व खुला ठेवून दिलेला आहे.
एकच सांगू इच्छितो, अंतिम सत्य असे काही नसते, तर आपण कसे पाहतो यावर ते ठरते. म्हणजे सत्य आपापले असते. दुसर्यास ते खोटे वाटू शकते. या थीमभोवती रचलेली कथा आहे.
एकच सांगू इच्छितो, अंतिम सत्य
एकच सांगू इच्छितो, अंतिम सत्य असे काही नसते, तर आपण कसे पाहतो यावर ते ठरते. म्हणजे सत्य आपापले असते.
ओक्के. तुमचं (तुमच्या डोक्यातलं) - लेखक म्हणून - काय सत्य आहे?
याच विषयावर "अ सेन्स ऑफ अॅन एंडिंग" या कादंबरीसंदर्भात चिंतातुर जंतूंसोबत खुंदल खुंदल के डिस्कशन झालं होतं. त्याचे तपशील असे:
आदूबाळ-पक्षः घटनांमागचा कार्यकारणभावही वाचकानेच शोधायचा असेल, तर लेखकाची भूमिका काय मग?
चिंजं-पक्षः मुळात स्पष्ट कार्यकारणभाव आणि तात्पर्य / संदेश वगैरे असणारी कथानकंच असावीत असा आग्रह का?
(खरडवहीतून साभार)
या वादाला अंतिम उत्तर नाही. वैयक्तिक आवड-निवड. पण वरील प्रश्न विचारायचं कारण असं, की तुम्ही कथा लिहिताना तुमच्या डोक्यात कार्यकारणभाव तयार होता का?
माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की
माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की लेखकाच्या डोक्यात कार्यकारणभाव स्पष्ट पाहिजे. तो वाचकाला न सांगण्याचं स्वातंत्र्य अर्थातच आहे.
म्हणूनच प्रणव यांना हा प्रश्न विचारला आहे.
---- यापुढचा प्रतिसाद प्रणव यांच्यासाठी नाही ----
तसा कार्यकारणभाव स्पष्ट नसेल, म्ह० कशाचा कशाला संबंध नसलेले धागे देऊन लेखक निव्वळ पुड्या सोडत असेल तर मला प्रॉब्लेम आहे भो.
लेखक जे ओपन एंडींग म्हणतो आहे
लेखक जे ओपन एंडींग म्हणतो आहे त्याला आपण कुट कथा म्हणतो. त्यामुळे ज्याला त्याला अर्थ काढायचे स्वातंत्र्य आहेच पण ही कथा त्या दर्जाची वाटत नाही. त्यामुळे हा प्रकार अतिशय चिप ट्रीक वाटु लागतो. जसं कि नोलानने इंन्सेप्शन एंडीगला केले होते. पण तो पर्यंत सब्स्टंस डीलीवर झाला होता त्यामुळे इन्सेप्शन रोचक ठरला.
विचार करायला लावणारा मुद्दा
विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
पण असं पहा- लेखकाच्या डोक्यातही ह्या गोष्टी सरळसोट असतील असं कुठे आहे? म्हणजे कथा लिहिल्यावरही कदाचित त्यालाही "सत्य" काय आहे, हे शेवटपर्यंत माहिती नसू शकतं. तोही केवळ "हे असं झालं असेल" ह्या निष्कर्षापर्यंतच पोचू शकला असेल. कथेचा नायक प्रथमपुरूषी असला, तरी लेखकाला त्याच्या मनात काय चाललंय हे समजण्याची आवश्यकता नाही.
बाकी कशाचाच कशाशी संबंध नसलेल्या धाग्यावरून सदाशिवरावभाऊंच्या ____ची आठवण झाली ;)
कार्यकारणभाव
माझ्या बाबतीत तरी लिहिताना मला अनसर्टन राहायचं आहे का, किंवा काय सांगायचं आहे हे निश्चित असतं. त्यानुसारच मी पात्र किंवा घटना-प्रसंग रचत जातो, मांडणी करतो. पण सबजेक्टिव्हिटीमुळे मला जे सांगायचं आहे त्याशिवायचेही अधिकचे आणखी काही घटना-प्रसंगांच्या कॉम्बिनेशनमधून बाहेर पडते. किंवा मी मुद्दाम रचलेल्यामधून कोणालातरी वेगळंच कॉम्बिनेशन दिसू शकतं. त्यामुळे माझ्यामते मी सांगताना स्पष्ट असलो, तरी वाचकाला माझ्या स्पष्टतेच्या दावणीला बांधावं असं मला वाटत नाही. रादर मला वाटतं लिहिताना कळत-नकळत मोकळ्या जागा सुटत असतात. त्या वाचकानेच भराव्यात.
उदा. जेव्हा मी म्हणतो की, व्हिडिओ क्लिप सुरू झाली. तेव्हा व्हिडिओ क्लिप म्हटल्यावरती कॉम्प्यूटर किंवा स्क्रीन, त्यावरचा व्हिडिओ, प्ले झाल्यावरचा आवाज, त्यानंतर ती बाई बोलतेय ते, त्यातले पॉजेस आदी गोष्टी प्रत्येक वाचक वेगवेगळ्या पद्धतीने इॅमॅजिन करेल. किंवा त्याने अनुभवाशी ताडून कल्पना करावी.
मला काय सांगायचंय ते मी सांगितलं आहेच आधी. पण त्याशिवायही तुम्हाला म्हणजे वाचकांना अधिकचे काही हाती लागू शकते. एका अर्थाने मी लिहितो तेव्हा मला जे काही सांगायचे आहे, जे मला दिसले आहे, जाणवले आहे त्याचा मी अधिक खोलात जाऊन शोध घेत घेत रचत, लिहीत असतो.
वाचकाला माझ्या स्पष्टतेच्या
वाचकाला माझ्या स्पष्टतेच्या दावणीला बांधावं असं मला वाटत नाही.
क्या बात कही है जनाब.. लेखन-वाचन या प्रकारात हीच तर जबरदस्त ताकद आहे. वाचकाच्या मनाच्या रंगभूमीचा आणि त्यात तयार असलेल्या कलाकारांचा पुरेपूर वापर करुन घ्यायचा. प्रत्येकाची रंगभूमी वेगळी. आणि अशा रितीने वाचक इनव्हॉल्व होतो तेव्हा त्यालाही वाचनाचा खरा आनंद मिळतो.
उदा. शाळेचं नकाशाबरहुकूम वर्णन नकोच. प्रत्येकाला आपल्या लहानपणची शाळा त्यात भरु दे. आपल्या सरांचे अन बाईंचे चेहरे पात्रांना चिकटू देत. ते होणारच असतं, ते टाळता येत नाही. पण अतिरिक्त स्पष्ट वर्णनाच्या नादात तो आनंदही वाचकाला धड मिळत नाही. मग त्यात तो नसतो. फक्त तुम्ही असता.
निदान असं माझं वैयक्तिक मत आहे.
तरीही लेखक म्हणुन आपल्याकडे
तरीही लेखक म्हणुन आपल्याकडे "शेवटाचा" एक ठाम युक्तीवाद हवाच.
पुन्हा एकदा इन्सेप्शनचे उदाहरण देतो. संपुर्ण चित्रपटात कॉब त्याची तलीस्मान रिंग फिरवुन पुन्हा पुन्हा हे सत्य आहे की स्वप्न याची खात्री करताना दाखवला आहे व त्याचे असे वागण्याचे कारणही चित्रपट त्याचा पास्ट दाखवुन स्पष्ट करतो. पण चित्रपटाचा शेवट असा दाखवला आहे ज्यात कॉब अजुनही स्वप्नात आहे की सत्यात हे स्पष्ट होत नाही कारण तो मुलांकडे निघुन जाताना दाखवाताना कॅमेरा तलीस्मान रिंग फिरतच असते त्याकडे स्थिरावतो (ती फिरत राहणे अपेक्षित नाही) व सिन नेमक्या अशावेळी फेडऔट होतो की रिंग फिरत राहीली की नाही याचा प्रेक्षकांना उलगडा न व्हावा. एकदम ओपन एंडींग... दोन्ही बाजुने बोलणार्यांना समान मुद्दे.
पण काही काळानंतर चित्रपटाचा शेवट नक्कि काय आहे असा प्रश्न विचारला तेंव्हा नोलानने उत्तर असे नाही दिले की तुम्हाला हवे ते समजा तो म्हणाला की यावेळी प्रथमच कॉब अजुनही स्वप्नात आहे की सत्यात याची फिकीर न करता मुलांकडे झेपावतो हा चित्रपटाचा शेवट आहे. म्हणजे पुन्हा... कुट तसेच पण त्याने त्याचा असा शेवट (चित्रीत) करण्याचे नियोजनही स्पष्ट केले. थोडक्यात लेखकाला वाचकांकांअथे संदर्भात समर्पक उत्तरे देता आली पाहिजेत. कारण वाचक कथा वाचुन नंदीबैलप्रमाणे फक्त माना डोलावण्यासाठी नसतात. तर कथेची चिरफाड करण्यासाठी, त्याला दाद देण्यासाठीही असतात.
ओके
जॅकी चॅन,
मी माझ्या बाजूने समर्पक उत्तर दिलं आहे. आणि मी वाचकांनी नंदीबैलही समजत नाही, हे माझ्या विवेचनावरून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. वाचकांनी कथेची नक्कीच चिरफाड करावी. जर का पूर्वग्रह डोक्यात ठेवून चिरफाड केल्यास ती एकांगी होऊ शकते. पण त्यालाही माझी ना नाही. कारण ती कृती वाचकाची, माझी लेखनकृती पूर्ण झालेली असते आधीच.
धन्यवाद.
आणि मी वाचकांनी नंदीबैलही
आणि मी वाचकांनी नंदीबैलही समजत नाही, हे माझ्या विवेचनावरून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे
लिहलेल्या कथेवरुन तसं वाटतं नाही.
जर का पूर्वग्रह डोक्यात ठेवून चिरफाड केल्यास ती एकांगी होऊ शकते.
पुर्वग्रह डोक्यात ठेउन दाद हवी असल्यास ति ही एकांगीच नाही काय ? (इथे कोणता पुर्वग्रह डोक्यात ठेवला आहे ?)
पण त्यालाही माझी ना नाही. कारण ती कृती वाचकाची, माझी लेखनकृती पूर्ण झालेली असते आधीच.
तुम्हला खरच हे विचार मैथुन हवय ? की काही सबस्टंस असणारी स्टेमेंट देणार.. ब्घा बुवा... मेंट्ल मास्ट्रबेशन सोडा, मेंटल गँगबँगलाही आम्ही पुरुन उरतो हा अज्ञात इतिहास आहे. बट इफ दॅट्स हाउ यु वांटु रोल.. यु आर वेलकम. तरीही सांगतो, इतकं परिपुर्ण मानणे बरं न्हवे... किप द माइंड ओपन, नॉट जस्ट अन एंडीग ऑफ द स्टोरी.
थँक यु. टु. :)
एक सहज
‘जागी झाले तेव्हा मला कोणीतरी बाळ आणून दाखवलं, म्हणाले मुलगा झालाय, अगदी नीट सुदृढ. माझ्या छातीशी दिलं त्याला, तेव्हा काहीतरी विजेसारखं सरसरून गेलं अंगातून. सुखद, काहीतरी आपलं. म्हणजे आपल्यातूनच निर्माण झालेलं आपल्यासमोर, आपल्या कुशीत. तो दूध पिऊ लागला तेव्हा मला इतकं नवल वाटलं. या आधीही जेव्हा पहिल्यांदा माझे संबंध आले होते तेव्हाही तो पुरुष असंच स्तनांशी लुचला होता, त्यानंतर नवर्यानेही तसंच केलं होतं आणि आता हा! डोळे बंद करून तो लालबुंद कोवळा करकरीत जीव चुटचुट दूध पीत होता. काय छान फिलिंग होतं ते. ते सेक्शुअल होतं का आईपणाचं होतं का आणखी कसलं ते नेमकं सांगता येणार नाही. पण छान वाटत होतं खरं. इतके महिने जे काय सगळं चाललं होतं, त्याचं सार्थक झाल्यासारखं, शांत, समाधानी...
या परिच्छेदात
या आधीही जेव्हा पहिल्यांदा माझे संबंध आले होते तेव्हाही तो पुरुष असंच स्तनांशी लुचला होता
हे विधान वाचताना, अधिकतर वाचकांना, हे "मी"ला प्रथमतः कळत आहे असे वाटले काय? म्हणजे बायकोने हे पहिल्यांदा डॉक्टरला सांगीतले, नवर्याला नाही, असं. हा ही नवर्याला एक अॅडीशनल शॉक (मंजे "अनावश्यक त्रास"दायक माहिती) होता असे वाटले काय? वर हे सध्याला अजिबातच महत्त्वाचे नसून त्याने जी मोठी समस्या आहे, मंजे बायकोचा मनोविकार दुरुस्त करणे, त्यावर लक्ष केंद्रित करावे असे वाटले काय?
हे विधान वाचताना, अधिकतर
हे विधान वाचताना, अधिकतर वाचकांना, हे "मी"ला प्रथमतः कळत आहे असे वाटले काय? म्हणजे बायकोने हे पहिल्यांदा डॉक्टरला सांगीतले, नवर्याला नाही, असं. हा ही नवर्याला एक अॅडीशनल शॉक (मंजे "अनावश्यक त्रास"दायक माहिती) होता असे वाटले काय?
देअर इज नथिंग टु शो दॅट ही डिड नॉट नो इट बिफोर.
पण नवर्यानंही तसंच केलं हे डॉक्टरला सांगितलं याविषयी ऑकवर्ड वाटलं पाहिजे. किंबहुना प्रथमपुरुषी नॅरेशनमधे लिहीताना ते फुटेज / रेकॉर्डिंग पूर्ण एका बल्कमधे सांगून मग शेवटी नॅरेटरची एकच रिअॅक्शन (क्लिप संपली. सगळं एकून मी भंजाळलो, सैरभैर झालो.) अशी देण्याऐवजी ती क्लिप पाहताना अधेमधे बर्याच महत्वाच्या मुद्द्यांवर श्रोत्या नवर्याची त्या त्या वेळीच रिअलटाईम रिअॅक्शन नोंदवली तर ते जास्त उत्तम होईल. अर्थात हे एक व्यक्तिगत मत झालं.
मस्त च!!!!
मस्त च!!!!