Skip to main content

एक डॉलर म्हणजे पासष्ठ-सत्तर रूपये का?

एक डॉलर म्हणजे पासष्ठ-सत्तर रूपये का?
(चलनाचा विनिमयदर कसा ठरतो, हा या पोस्टचा विषय नाही)
.

आज अमेरिका, बहुतेक प्रगत युरोपीय देश, जपान हे सर्वच देश आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या प्रचंड (प्रचंड हा शब्दही खुजा ठरेल इतक्या) कर्जाखाली आहेत.

पाश्चिमात्यांनी अर्थशास्त्राचा गरीब व विकसनशील देशांच्या पिळवणुकीसाठी उपयोग करणे हे त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या आपल्या वेगवेगळ्या सरकारांमधील अर्थमंत्र्यांच्या अथवा बाहेर अर्थशास्त्रावर मोठमोठ्या शिकवण्या घेणा-या अर्थतज्ज्ञांच्या लक्षात येत नसेल असे म्हणावे का? त्यांची ही विचार करण्याची पद्धत देशहिताची आहे का?

असे प्रचंड कर्ज आणि जे कमी होण्याची सुतमात्र शक्यता नाही, तरी या महासत्ता आणि आपण मात्र भिकारी या परिस्थितीचे कोणालाच कसे वावगे वाटत नाही? खरे तर या परिस्थितीत भिकारी कोणाला म्हणायला हवे? जो जितका अधिक कर्जबाजारी, तो तेवढा अधिक भिकारी नाही का?

डॉलर-रूपया विनिमयाचा दर निव्वळ परकीय चलनाच्या मागणीशी लावून तो अक्षरश: स्टॉक मार्केटसारखा संवेदनशील करून टाकणे योग्य आहे काय? गेली कित्येक वर्षे मंदी असूनही बाजार १८हजारचा २८हजारवर जातो, आपल्याला त्याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. कंपन्यांची कामगिरी व त्यांच्या शेअरचा भाव यांचा संबंध केव्हाच संपल्यात जमा आहे. चलनविनिमयदराबरोबरच परदेशी संस्थांना येथील बाजारात पैसे लावू देऊन त्या जीवावर आपण उड्या मारायच्या आणि त्यांचा रस संपेल तेव्हा त्यांनी ते त्यांच्या फायद्यासह काढून घेतले की त्यातून होणा-या नुकसानामुळे आपल्याकडे शोकाला पारावार राहत नाही. तरीही त्याबाबत मुलभूत विचार होताना दिसत नाही.

आपली अर्थव्यवस्था ही क्रुड तेलाच्या आयातीवर म्हणजे उर्जेच्या बाबतीत जवळजवळ संपूर्णपणे परावलंबी असताना म्हणजेच या एकाच मोठ्या घटकावर अवलंबून असताना रूपयाची सतत होणारी घसरण हा एका प्रकारे देशाच्या गळ्यातला फास बनण्याइतका गंभीर प्रश्न होत चालला आहे. त्यात पुन्हा आण्विक आणि इतर प्रकारच्या उर्जानिर्मितीवरील प्रचंड आयातप्रणीत खर्चामुळे त्याचे पुढे काय होईल? त्याप्रमाणात निर्यात वाढवण्यास किती कालावधी लागेल आणि तोपर्यंत या देशाचे काय होईल? शिवाय 'मेक इन इंडिया'द्वारे जे काही करायचे घटत आहे त्यातूनही या दृष्टीने फार काही फरक पडणार नाही असा सूर आताच ऐकू येत आहे.

आज अमेरिकेतल्या एका डॉलरची क्रयशक्ती खरोखर पासष्ट रूपयांएवढी आहे का?

एकेकाळी मनमोहनसिंगसारखे अर्थमंत्री या दुष्ट शिकवणीचे बळी होऊन स्वत: होऊन रूपयाचे एका फटक्यात कितीतरी टक्क्यांनी अवमूल्यन करत होते आणि आपण त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करत होतो. त्याआधी देश दुष्काळात होरपळत असताना इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेने भारताला गव्हाच्या पुरवठ्याच्या बदल्यात रूपयाचे अवमूल्यन करा ही अपमानास्पद अट मान्य करायला लावली होती. तेव्हा तर जागतिकीकरणाचा ज देखील ऐकण्यात नव्हता. तेव्हा रूपयाच्या अवमूल्यनातून कोणत्या देशांना फायदा होतो हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय?

दुसरीकडे गेले जवळजवळ दीड दशक चीनवरदेखील युआनचे अवमूल्यन करण्याचा दबाव असूनदेखील तो त्याला बळी पडलेला नव्हता. त्यांनी डॉलर-युआन विनिमयदर पेग केला होता आणि त्यामुळे चीनचे काही फार वाईट झालेले दिसले नाही. चीनचे उदाहरण डोळ्यासमोर आहे म्हणून, एरवी तसेही एक मुलभूत विचार म्हणून याचा विचार करायला काय हरकत आहे? आता कित्येक वर्षांनंतर त्यांनी युआनचे अवमूल्यन केले.

त्यामुळे चलन विनिमयाच्या दराचा प्रश्न हा किती परकीय चलनखरेदी होते यावरच नाही तर त्याहीपेक्षा त्या देशाच्या इच्छाशक्तीशीही निगडीत आहे हे स्पष्ट आहे.

उद्या भारत सरकारने पुढची दहा वर्षे एक डॉलर म्हणजे पंचवीस रूपये असे जाहीर केले तर या देशातील चित्र काय असेल?

मी अर्थतज्ज्ञ नाही आणि केवळ त्याच कारणाने जे खरेच अर्थतज्ज्ञ आहेत त्यांना माझी विनंती आहे की या आधारावरील एक मॉडेल बनवावे आणि ते सर्वांसमोर मांडावे. चीनमध्ये ही पाश्चात्य शिकवण असलेले अर्थतज्ज्ञ निर्णय घेण्याच्या पदांवर नाहीत असे आपल्याकडील झापड लावलेले अर्थतज्ज्ञ समजतात काय हा विचार करावा. याचे उत्तर केवळ तो चीन आहे, त्यांची निर्यातक्षमता अधिक आहे अशा पॉप्युलिस्ट प्रमेयातच आहे की त्यात या तथाकथित प्रगत राष्ट्रांच्या दडपणाला बळी न पडण्याची इच्छाशक्ती हाही तेवढाच प्रबळ मुद्दा कारणीभूत आहे याचा विचार केला, तर हा मुद्दा निव्वळ अर्थशास्त्रापेक्षा कितीतरी वेगळा आहे हे लक्षात येईल.

मोदी काय किंवा मनमोहनसिंग काय, दोन्हीही राजवटींमध्ये याबाबत विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडणार नसेल तर काय उपयोग?

एक डॉलर म्हणजे पंचवीस रूपयेच का, तीस-चाळीस रूपये का नाही हाही मुद्दा होऊ शकतो. तर मग प्रत्येक देशावरचे कर्ज लक्षात घेऊन आणखी एक मॉडेल तयार करा की! कदाचित एक डॉलर म्हणजे पाच-दहा रूपये असायला हवा असा निष्कर्ष निघाला तरी आश्चर्य वाटायला नको!

पुनश्च विनंती, हे शक्य आहे का, मांजराच्या गळ्यात खरेच घंटा कोण बांधेल अशा शंका-कुशंका नकोत. कारण प्रश्न असा आहे की या आधारे काही उपाय काढता आलाच तर आपल्यासारखी प्रचंड गरिबी असलेल्या आणि प्रचंड संख्येने अशी गरीबी असलेल्या आपल्या देशाचे भले होईल का?

हे विधान कदाचित फार कोणाला आवडणार नाही, परंतु हा मुलभूत व देशहिताचा विचार न करणारे कॉंग्रेस व भाजपचे नेतृत्व ‘देशद्रोही’ आहे का? या नेत्यांना व त्यांच्या अर्थतज्ज्ञांना वरील वास्तवाची कल्पना नाही असे कसे म्हणता येईल? तरीदेखील त्याबाबत चकार शब्दही न काढणा-या या लोकांची कृती पाहता ही बाब गंभीरपणे घेतली जावी आणि कृपया या शब्दाची आता चालू असलेल्या सवंगतेच्या आधारावर वासलात लावू नये. व्यापक देशहित न पाहणारा, याबाबतीत आर्थिक महासत्तांच्या दडपणाला बळी पडणारा तो देशविरोधी अशी सोपी व्याख्या या प्रश्नामागे आहे.

माझ्या मते या विषयावर चर्चा करणारे किंवा हे वास्तव मांडणारे नाहीतच असे नाही. पण त्यावर जेवढी व्यापक चर्चा व्हायला हवी तेवढी होताना दिसत नाही. तेव्हा जे अर्थतज्ज्ञ निष्पक्ष म्हणून समजले जातात, त्यांच्याकडून याबाबतची मते जाणून घेता येतील काय? गंमत म्हणजे उजव्या विचारसरणीच्या पक्षांवर व संघटनांवर राजकारणापोटी आरोप करण्यात आघाडीवर असलेले डावेही याबाबतीत जाव विचारताना दिसत नाहीत, यामागचे रहस्य काय असावे? या डाव्यांपैकी काही जणांची मुलेबाळे अमेरिकादि देशांमध्ये शिकण्यास जाण्याइतके जागतिकीकरण झालेले आहे, इतके सोपे कारण त्यामागे असू शकेल?

खरोखर, याप्रकारे जी आर्थिक गुलामगिरी आपल्यावर लादली गेलेली आहे, ती अशीच सहन करत राहिलो तर पुढच्या किती तरी पिढ्यांमध्ये ती दूर होणे शक्य नाही. कितीही निर्यात वाढवा, ती शाश्वत राहू शकत नाही. कारण इतर देश काही त्यांचे धोरण बदलणार नाहीतच याची खात्री देता येत नाही. तेव्हा आपण डॉलर या चलनावर आधारीत व्यापार करतो, म्हणून त्याच्या दावणीला बांधून घ्यायचे, अशी विचित्र व गुन्हेगारी स्वरूपाची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यातून आपल्या देशाच्या हिताचा विचार करण्याची म्हणजे हा विषय चर्चेला घेण्याची हिंमतही कोणी करताना दिसत नाही, तर मग त्याबाबतची चर्चा तर दूरच.

बरेच काही लिहिता येईल.

तूर्त याबद्दलच्या वास्तवावर प्रकाश टाकून यावरील चर्चेला कोणी काही दिशा देऊ शकेल काय?

सुनील Wed, 02/03/2016 - 14:06

उद्या भारत सरकारने पुढची दहा वर्षे एक डॉलर म्हणजे पंचवीस रूपये असे जाहीर केले तर या देशातील चित्र काय असेल?

देशद्रोही आहात!

खरे तर यापुढे कायमच पंचवीस डॉलर म्हणजे एक रुपया, असे जाहीर करायला पाहिजे! ;)

(जाज्वल्य देशभक्त)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 17:49

In reply to by सुनील

सुनील, एरवी तुम्ही नीट लिहिता. पण देशभक्ती म्हणजे रुपया डाॅलरात अपरिवर्तनीय करायचा, हे तुम्हाला समजू नये! शेम शेम. रुपया-डाॅलर परिवर्तन थांबवा, देशाची अर्थव्यवस्था वाचवा.

अनु राव Wed, 02/03/2016 - 14:18

गब्बरने याचा प्रतिवाद करावा असं मी इथे या ठिकानी या निमित्ताने या परसंगी आव्वान कर्तो!

गब्बर काय ब्रह्मदेव अवतरला तरी ह्या लेखातल्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही.

राकु - मला अश्या कॉमेंट लिहायला अजिबात आवडत नाही, पण खरच "अभ्यास करुन या" आणि थोडा तरी कॉमन सेन्स वापरा.

(कै च्या कै) रेज टु (कै च्या कै) लेख आहे.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 02:45

In reply to by अनु राव

गब्बर काय ब्रह्मदेव अवतरला तरी ह्या लेखातल्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही.

याचा अर्थ तू हे सुचवु इच्छितेस का की आमचा (आपला ;)) गब्बर ब्रह्मदेवाहून कमी आहे? ए असं नाही करायचं :( =))

नितिन थत्ते Wed, 02/03/2016 - 14:56

अर्थ तज्ञ बाजूला राहू द्या.

१९९२-९३ मध्ये जेव्हा रुपयाचे अवमूल्यन केले त्यापूर्वी बाहेरच्या देशातून भारतात पाठवला जाणारा परकीय चलनाचा ओघ खूप घटला होता. ज्यांच्याकडे डॉलर होते (जे लोक डॉलर कमावत होते) ते लोक आर बी आयच्या माध्यमातून पैसा भारतात पाठवण्याऐवजी देशाबाहेरच हवाला व्यवहारातून दुसर्‍यांना देत होते. अवमूल्यन झाल्यावर थोड्याच काळात हा ओघ वाढून परकीय चलनाची गंगाजळी ८० बिलिअन डॉलरवर पोचली होती.

राजेश घासकडवी Wed, 02/03/2016 - 19:44

डॉलरची क्रयशक्ती पासष्ट रुपये आहे का? हाच प्रश्न मलाही कधीकधी पडतो. उदाहरणार्थ, इथे अमेरिकेत स्वस्त फुटबॉल (म्हणजे युरोपियन फुटबॉल, किंवा सॉकर बॉल) साधारण १२ डॉलरच्या आसपास मिळतो. भारतात त्याची किंमत काय आहे? यावर तज्ञ काही प्रकाश पाडून दिशा देऊ शकतील का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 19:54

In reply to by राजेश घासकडवी

अमेरिकेत १/३ माणसं फुटबॉल* आहेत; भारतात १/३० लोक फुटबॉल* असतील (अंदाज). भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या साधारण चौपट आहे. क्रयशक्ती समान असेल तर भारतात ४/३ लोक फुटबॉल* असले पाहिजेत; हे गणितीदृष्ट्या अशक्य आहे. म्हणजे भारताची क्रयशक्ती कमीच असणार. (म्हणून भारताची क्रयशक्ती जास्त, असं मी का म्हणत नाही? कारण मी पाश्चात्याळलेली, विचारजंत छापाची, फुर्रोगामी आहे.)

*कोणताही फुटबॉल चालेल, जगात ज्याला फुटबॉल म्हणतात तो; जगात ज्याला रग्बीचा बॉल म्हणतात तो; जगात ज्याला अमेरिकन फुटबॉल म्हणतात तो ... एकच कोणता ते पकडा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 20:40

In reply to by चिंतातुर जंतू

सारखं त्यांना बोलावू नका. इथे थापेबाजी करायची आणि सोयीस्कर तेवढंच सांगायची जबाबदारी मी घेतल्ये ना? आणखी इमोसनल अत्याचार केला तर माझ्यावर विश्वास ठेवणार का?

भारात फुटबॉल कमी मिळतात ही दुर्घटना समजू नका. भारतात क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेटच्या चेंडूच्या किंमती मोजायच्या सोडून परदेशी फुटबॉलच्या किंमती मोजणं ही घासकडवींची पाश्चात्य चाल आहे. तिचा प्रतिकार केलाच पाहिजे.

राजेश घासकडवी Wed, 02/03/2016 - 21:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतात आज फुटबॉल कमी खेळला जातो एवढंच तुम्हा फुरोगाम्यांना दिसतं कारण तुम्ही आधुनिकतेची झापडं लावून बसलेला असता. त्यामुळे आपल्या दिव्य इतिहासाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसते. भारतात पुरातन काळापासून फुटबॉल खेळला जायचा. वेदांमध्ये त्याचे अनेक उल्लेख आहेत. तुम्ही पाश्चिमात्त्यांचे पित्त्ये कायम न्यूटनच्या सफरचंदाच्या गोष्टीचं कौतुक करत असता. पण त्याआधी कितीतरी शतकं आर्यभट्टाला शून्याचा शोध लागला तो त्याच्या पर्णकुटीबाहेर पदकंदुक खेळणारी मुलं पाहूनच. असं म्हणतात की त्यातल्या एकाने मारलेली लाथ इतकी जोरकस होती की चेंडू पर्णकुटीत शिरला आणि आर्यभट्टाच्या कपाळावर आपटला. तो मुर्च्छित झाला. नंतर त्याचा धक्का दौतीला लागून तो काळा झाला आणि जवळच्या भूर्जपत्रावर त्याचा शिक्का उमटला. आर्यभट्ट जागा झाल्यावर त्याला तो वर्तुळाकार दिसला, आणि रेस्ट इज जसं म्हणतात तसं, हिस्टरी.

फुटबॉल नसता तर आजही माणूस रोमन आकडे वापरत शून्याशिवाय गणितं करत राहिला असता.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 21:45

In reply to by राजेश घासकडवी

अहो वेदों में विज्ञान, जरा जागे व्हा. अमेरिकनांनी सुरू केलेल्या विकीपीडीयावर जाऊन बघा. शून्याचा शोध आर्यभटाला नाही, ब्रह्मगुप्ताला लागला होता. तुम्ही इतिहासाचं पुर्नलेखन करत आहात; आज आर्यभटाचं भगवीकरण सुरू आहे. उद्या चाणक्याचं कराल, परवा अल बेरुनीचं कराल. हे सगळं कुठेतरी थांबवलं पाहिजे. (टिढीश, टिढीश, टिढीश)

हे असले शोध लावण्याआधी लक्षात ठेवा की ही पदकंदुक खेळणारी मुलं भारतीय होती. भारतात कशालाही लाथ मारत नाहीत. चुकून पाय लागलाच तरी 'मी मारला, मी मारला' असं हाताने दाखवत तोंडाने सॉरी पुटपुटतात. अशा भारतवर्षात, आमच्या लाडक्या आर्यावर्तात फुटबॉलचा शोध लागेल का? तुम्हाला बॅडमिंटन म्हणायचंय. सकाळच्या देवपूजेसाठी शेजारच्या घरातल्या जास्वंदाच्या अर्धोन्मिलीत कळ्या खुडताना बघून घरातूनच आजीने परात वापरून जास्वंद चोराला झेंडूचं फूल मारलं. तेव्हापासून भारतात बॅडॅस बॅडमिंटनचा शोध लागला. हे बॅडमिंटन खेळताना एकदा झेंडू ब्रह्मगुप्ताला लागला; तेव्हा त्याने त्याचा चष्मा लावला नव्हता. झेंडूचा आकार चेंडूसारखा आणि रॅकेटीचा आकार परातीसारखा समजून त्याला शून्याचा शोध लागला.

लिहायच्या आधी जरा वाचत जा हो. किती लिहाल, किती लिहाल. कीबोर्डाला हात लागला की लगेच अक्षरं गळायला लागतात का काय!

राजेश घासकडवी Wed, 02/03/2016 - 22:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दे संपले की काहीतरी तांत्रिक चुका काढायच्या आणि 'हा माणूस खोटारडा आहे' असलं तुमच्यासारखे फुर्रोगामी करतातच. आता त्या स्मृती इराणींच्या ४३ मिनिटांच्या भाषणातल्या काहीतरी तीनचार तथ्यात्मक चुकाच तुम्हाला दिसतात, तसंच. आर्यभट्ट असेल की ब्रह्मगुप्त, त्याने मूळ मुद्द्यात काहीच फरक पडत नाही. भावनांचं मुसळ पाहाण्यापेक्षा क्षुल्लक तथ्याचं कुसळ पाहाण्यातच तुम्हाला रस आहे. तुम्ही पाकिस्तानातच का नाही हो जात?

भारतात कशालाही लाथ मारत नाहीत. चुकून पाय लागलाच तरी 'मी मारला, मी मारला' असं हाताने दाखवत तोंडाने सॉरी पुटपुटतात.

हे आणखीन काहीतरी तर्कट. अहो, आपल्या मायमराठीतच 'लाथ मारेन तिथे पाणी काढेन' अशी म्हण आहे. ती काय उगाच? आणि फेसबुकांवर, वेगवेगळ्या सायटींवर जी लाथाळी चाललेली दिसते तिचं काय? तिथे कोणी, चुकलं चुकलं म्हणताना दिसतं का?

आता बॅडमिंटनची थियरी कदाचित खरी असू शकेल. पण त्यावरून फुटबॉल नव्हता हे सिद्ध होत नाहीच्च मुळी. बॅडमिंटन चॅंपियनचं नावदेखील 'पदु'कोण होतं यातच सगळं आलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 23:03

In reply to by राजेश घासकडवी

स्मृती इराणींच्या ४३ मिनिटांच्या भाषणातल्या काहीतरी तीनचार तथ्यात्मक चुकाच तुम्हाला दिसतात, तसंच.

तुम्ही दोन-चार प्रतिसाद एकत्र करून त्याला 'लेख पाडला (आजचा कोटा पूर्ण)' असं म्हणता का हो? ते ४३ मिनिदांचं भाषण नव्हतं, कोणीतरी प्रश्न विचारले की इराणीबाई उठून उत्तर देत होत्या. व्हीडीओ एडीट करून तुम्हाला दिला, तर लगेच नाचू नका की बाईंना ४३ मिनीटं बोलता येतं. त्या तरुण दमाच्या तुलसीबाई असतानाही २० मिनीटांच्या एपिसोडात, जाहिरातींच्या नावाखाली दोन ब्रेक घ्यायच्या.

आर्यभट्टाला फुटबॉल लागलेला होता हे कोणी नाकारलं? उगाच भलते आरोप माझ्यावर करू नका. फुटबॉल लागून दौत सांडल्यामुळे त्याला सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि पायची किंमत किती हे समजलं होतं. तुम्ही उगाच वानराची शेपूट सापाला जोडत आहात.

त्यातून ब्रह्मगुप्ताला शून्याचा शोध लागला तेव्हा सध्याची मराठी भाषा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मराठी म्हणींचा संदर्भ भारतीय संस्कृतीला जोडून तुम्ही जे अॅनाक्रोनिझम करत आहात त्यामुळे किती ऐतिहासिक आणि भाषिक गोंधळ माजेल याची जाण ठेवा. वेगवेगळ्या सायट्यांवरची लाथाळी ही मराठी भाषेने जगाला देणगी आहे हे विसरू नका. मराठी भाषेचं हे योगदान संपूर्ण विश्व कधीही विसरणार नाही. लवकरच नासा मंगळावर मानव पाठवेल तेव्हाही तिथे लाथ मारून पाणी शोधण्याचा प्रयत्न होईलच. इश्वर त्यांना यश देवो.

राजेश घासकडवी Wed, 02/03/2016 - 23:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झालं तुमचं सुरू माननीय शिक्षणमंत्री स्मृती इराणींना नटी, नटी म्हणून चिडवत अॅड होमिनिम करणं. त्या इतकं समर्थ भाषण देऊन रणचंडिका आणि दुर्गामातेचा अवतार धारण करतात हे कुठेच गेलं.

हे आर्यभट्ट-ब्रह्मगुप्त वगैरे सगळे द्वैती विचार आहेत. भारतीय संस्कृतीत अद्वैताला महत्त्व आहे. आर्यभट्ट हा ब्रह्मगुप्ताचाच पुनर्जन्म असल्यामुळे माझ्या दृष्टीने कोणी कुठला शोध लावला याने काहीच फरक पडत नाही. शेवटी कर्ता करवता तोच असतो, कोणाकडून काय येतं हे फक्त नावापुरतंच असतं. सगळेच आत्मे आणि परमात्मा हे एकच आहेत. त्यामुळे कन्हैयाचा आत्मा, त्याला बडवणाऱ्या काळे कुडतेवाल्यांचा आत्मा - ही सगळी एकाच परमात्म्याची रूपं आहेत. पण हे तुम्हा पाश्चात्त्य पांडित्याचा चष्मा लावलेल्यांना काय कळणार?

ब्रह्मगुप्ताला शून्याचा शोध लागला तेव्हा सध्याची मराठी भाषा अस्तित्वात नव्हती.

हे लिहून तुम्ही महाराष्ट्रद्रोहाची रेषा ओलांडलेली आहे असंच म्हणेन मी. मराठी भाषा अभिजात आहे आणि ती अनादी अनंत आहे. मी इथल्या व्यवस्थापकांना विनंती करतो की असली बदनामीकारक वाक्यं काढून टाकावीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/03/2016 - 00:19

In reply to by राजेश घासकडवी

हे पहा. तुमचं थोडं बरोबर आहे. सगळ्यांचे आत्मे एकच असतात. 'नावात काय आहे' हे त्या पाश्चात्य नाटककाराचं वाक्य म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा रसाळ परिपोषच आहे. शेक्सपिअरचा पाया भारतीयच. आणि सगळ्यांचे आत्मे सारखेच या न्यायाने जॉर्ज बर्नार्ड शॉ, मोलियर, शेक्सपियर आणि इव्ह एन्सलर या सगळ्या नाटककारांचा पाया भारतीयच.

पण त्याच हिशोबात नटी आणि दुर्गामाता, रणचंडिका आणि स्मृती इराणी यांचाही आत्मा एकच. एकाच आत्म्याला नटी म्हटलं काय, नटवी म्हटलं काय आणि मंत्री म्हटलं काय, एकच. त्यात उगाच ल्याटिन फ्रेजांची नावं घेऊन स्वतःच्याच तत्त्वाला हरताळ फासू नका. हरताळ फासलेले तुम्ही आणि हरताळ न फासलेले तुम्ही यांचा आत्मा एकच असला तरीही. हा आत्म्याचा नव्हे तत्त्वाचा प्रश्न आहे.

हे लिहून तुम्ही महाराष्ट्रद्रोहाची रेषा ओलांडलेली आहे असंच म्हणेन मी. मराठी भाषा अभिजात आहे आणि ती अनादी अनंत आहे. मी इथल्या व्यवस्थापकांना विनंती करतो की असली बदनामीकारक वाक्यं काढून टाकावीत.

माझा प्रतिसाद संपादित करायचा असेल तर तुमचाही करावा लागेल. मला नाक खाली घालायला लावून तुमचं नाक वर जणार नाहीये हे लक्षात ठेवा. शिवाय सगळ्या नाकांचे आत्मे एकच असतात. त्यामुळे माझं नाक खाली गेलं की आपसूक तुमचंही नाक खालीच जाणार आहे.

आणि मी म्हणत्ये तो मराठीभाषाद्रोह नाहीच. तुमच्या कल्पनेच्या भराऱ्या कुठेही भरकटलेल्या आहेत. मी मराठी भाशेचा इतिहास सांगत आहे. तुम्ही महानुभावांचं साहित्य वाचलंय का? तिथून मराठी भाशा सुरू झाली. त्याआधी मराठी असं काही नव्हतंच. सगळे वेगळंच बोलायचे. मग महानुभावांनी येऊन मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. त्यात क्ष, ज्ञ अशी जोडाक्षरं आणि ण, ळ असे कठीण वर्ण वाढवले. तेव्हा मराठी भाषा तयार झाली.

मेघना भुस्कुटे Wed, 02/03/2016 - 21:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी सगळं धाग्याला सुटेबल चालू आहे. पण 'टिढिश टिढिश टिढिश' हे भारतीय दूरचित्रवाणीचे पेटंट उद्गार ढापल्याबद्दल संपादिकाबाईंचा जळजळीत निषेध. आपल्या पचड्या आपल्या घरी वापरा म्हणावं, असली ढापाढापी करायला नको. तुम्हांला जर याच सुरात बोलायचं असेल, तर आम्हांलाही त्याच सुरात बोलावं लागेल. त्याला आमचा नाईलाज आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 23:53

In reply to by मेघना भुस्कुटे

तुम्हाला 'टिढिश टिढिश टिढिश' हे भारतीय दूरचित्रवाणीचे पेटंट उद्गार चालणार नसतील नवं घ्या - ढिशक्यँव. के अंखियों से गोली मारे, लडकी कमाल रे की ...

Nile Wed, 02/03/2016 - 20:29

In reply to by राजेश घासकडवी

फुटबॉल का हे कळलं नाही.

मॅकडोनल्ड्सचा बर्गर हे चलन सहसा वापरलं जातं हे माहीत आहे.

(मध्यमवर्गीय मनुष्याची खरेदी पाहिली तर $१= २०-३५ रुपये अशी क्रयशक्ती आहे असे माझे निरीक्षण आहे. इलेक्ट्रॉनिक्स, भाजीपाला वगैरे गोष्टी स्पेक्ट्रमच्या वेगवेगळ्या टोकांना येतात.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/03/2016 - 21:39

In reply to by Nile

जळ्ळ्या मेल्या हामेरिकन बर्गरबद्दल सांगू नका आम्हाला. तुमचा बर्गर तर आमचा वडापाव. चला फुटबॉल बनू या.

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साहेब.

जयदीप चिपलकट्टी Thu, 03/03/2016 - 01:07

In reply to by Nile

> मध्यमवर्गीय मनुष्याची खरेदी पाहिली तर $१= २०-३५ रुपये अशी क्रयशक्ती आहे असे माझे निरीक्षण आहे.

वर्ल्ड बॅँकेच्या म्हणण्यानुसार भारताचा Purchasing Power Parity (PPP) factor अमेरिकेच्या तुलनेत सध्या 0.3 आहे. याचा अर्थ असा की एका डॉलरमध्ये जितक्या जीवनावश्यक वस्तू/सेवा अमेरिकेत खरेदी करता येतात तितक्या भारतात करायला १ x ६७ x ०.३ = २० रुपये पडतात. अर्थात स्थलमाहात्म्यानुसार (पुणे की यवतमाळ, सान फ्रान्सिस्को की अोमाहा) यात फरक पडणार हे आलंच. तेव्हा २०-३५ हा अंदाज मला ठीक वाटतो.

चटणी Wed, 02/03/2016 - 23:18

मला या साइटवर लिहायला खुप भिती वाटत असे. हा लेख वाचल्यावर मला ही इथे लिहिता येईल असे वाटते.

अमेरीकेचे कर्ज १५ ट्रिलियन असल्याचे सगळीकडे लिहून येते. तेवढे मला ही माहित आहे. हल्ली मराठी पेपर मध्ये अमेरीकेच्या बातम्या छापतात. वॉशिंग्टनमध्ये खूप बर्फ पडल्याची बातमी पेपर मध्ये आली होती. हल्ली भारताच्या बातम्या ही जगभर छापून येतात. त्याबद्दल जेएनयू च्या विद्यार्थ्यांचे आभार.

साती Thu, 03/03/2016 - 00:26

In reply to by चटणी

मला या साइटवर लिहायला खुप भिती वाटत असे. - माहितीपूर्ण
हा लेख वाचल्यावर मला ही इथे लिहिता येईल असे वाटते.- रोचक
अमेरीकेचे कर्ज १५ ट्रिलियन असल्याचे सगळीकडे लिहून येते. - विनोदी
तेवढे मला ही माहित आहे- उपेक्षित
हल्ली मराठी पेपर मध्ये अमेरीकेच्या बातम्या छापतात- भडकाऊ
. वॉशिंग्टनमध्ये खूप बर्फ पडल्याची बातमी पेपर मध्ये आली होती.- मार्मिक
हल्ली भारताच्या बातम्या ही जगभर छापून येतात. - निरर्थक
त्याबद्दल जेएनयू च्या विद्यार्थ्यांचे आभार.- खोडसाळ

अनु राव Thu, 03/03/2016 - 09:27

In reply to by चटणी

मला या साइटवर लिहायला खुप भिती वाटत असे. हा लेख वाचल्यावर मला ही इथे लिहिता येईल असे वाटते.

मस्तच प्रतिसाद मैत्रीणी.

गवि Thu, 03/03/2016 - 07:30

प्रश्न कसे तर्कशून्य / ज्ञानशून्य आहेत यावर बहुतांश सर्वांचा भर दिसतोय. पण त्या निमित्ताने या विषयामागच्या कन्सेप्टस सांगण्याचा प्रयत्न फार कमी दिसतोय. छद्मी ताशेरे किॅवा उपहासात्मक विनोद सुरुवातीला किंवा काही टक्के प्रतिसादांत ओक्के,पण फक्त तेवढंच न देता काही प्रत्यक्ष मुद्दे आले तर आवडेल. प्रत्येक प्रश्नकर्त्याची ज्ञानपातळी इतरांच्या किमान अपेक्षेइतकी असली तरच उलगडा करु असा अप्रोच नसावा.

याहून कितीतरी जास्त अतार्किक विषय येत असतात आणि तरीही चर्चेचा ५०% भाग तरी प्रत्यक्ष विषयावर होतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/03/2016 - 08:05

In reply to by गवि

तुम्ही डिस्क्लेमर वाचले नाहीत का? चलन विनिमयाचा दर कसा ठरवतात, हे शक्य आहे का, या गोष्टींबद्दल न बोलता चर्चा कशी, कशाबद्दल करायची?

छोटेमोठे प्रश्न धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद बघितलात का?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/03/2016 - 08:47

In reply to by गवि

मग याच वेळेस (किंवा याच सदस्याच्या धाग्यावर) असं बरेच लोकं का करत नाहीयेत याला कारण असणार काहीतरी!

अनु राव Thu, 03/03/2016 - 09:30

In reply to by गवि

प्रत्येक प्रश्नकर्त्याची ज्ञानपातळी इतरांच्या किमान अपेक्षेइतकी असली तरच उलगडा करु असा अप्रोच नसावा.

गवि - प्रश्नकर्त्यानी ज्या पद्धतीने लेख पाडला आहे त्यावरुन असे दिसते की त्यांची ज्ञानपातळी फारच वरची आहे. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाही.

तुम्ही विमानाबद्दल चे तज्ञ आहात. कोणा माणसाला रामायणात विमाने उडत होती ह्याची ठाम खात्री असेल तर तुम्ही त्याला सध्याचे विमान कसे उडते हे सांगु शकाल का?

याहून कितीतरी जास्त अतार्किक विषय येत असतात आणि तरीही चर्चेचा ५०% भाग तरी प्रत्यक्ष विषयावर होतो.

मला लगेच काही उदाहरण सुद्धा आठवत नाही ह्या पेक्षा अतार्कीक विषयांचे

adam Thu, 03/03/2016 - 09:55

In reply to by अनु राव

स्वताडन - स्वबदनामी चा धोका पत्करुन सांगू इच्छितो की ऐसीवरच एका ठिकाणी शंका विचारली होती --
टॉयलेटमध्ये पाणी टाकल्यावर सगळी शी/मैला निघून जातो कुठेतरी ड्रेनेज नावाच्या ठिकाणी;
मग जे काही असेल ते सगळच जायला हवं. पण तरीही सगळं गेल्यावर शेवटी थोडंफार पाणी उरतच.
जर शी सुद्धा निघून जाउ शकत असेल तर सगळेच पाणी कसे काय निघून नाही जात ?
थोडेफार का असेना शिल्लक का राहते.
ह्यास तार्किक आणि नेमके असे उत्तर घनु ह्या आय डीकडून मिळाले होते.
.
.
शिवाय काल परवा मी खफवर विचारले होते की एकटा पुरुष स्त्रीवर जबरदस्ती कशी काय करु शकतो ?
पुरुषाच्या लिंगावर मारलं तर तो एकदम खलास होतो.
संग करणयस जवळ आलेला असताना लिंगावर मारुन जायबंदी अक्रणे जमत नसावे का ?

अनु राव Thu, 03/03/2016 - 10:04

In reply to by adam

मनोबा - तुझी उदाहरणे चुकीची आहेत. तुझ्या शंका डीबेटेबल आहेत आणि उत्तरे पण आहेत ( पटली/ नाही पटली तरी )

बलात्काराचा प्रश्न राकुंनी असा विचारला असता "स्त्रीला जर लिंग असते तर पुरुष तिच्यावर बलात्कार कसा करु शकतो?" अशी ज्रर उलटे बेसिक समज असेल तर काय उत्तर देणार?

मला खरे तर खूप बेसिक प्रश्न पडलेले असतात, पण एक-दोन वेळेला ऐसी वर विचारायचा प्रयत्न केला तर लोकांना शष्प माहीती नसते असे लक्षात आले, मग विचारणे बंद केले.

काही काही प्रश्नांची उत्तरे हल्ली गुगल वर मिळतात.

हा प्रश्न तुला पडला होता का?

तू सा ( षडज ) हा स्वर लावलास, अगदी अचुक लावलास, आणि लता मंगेशकर नी लावला तर तिच फ्रीक्वेन्सी असुन आवाज वेगळे का येतात? हा अनेक वर्ष पडलेला प्रश्न जालावरच्या उत्तरानी संपवला.

गवि Thu, 03/03/2016 - 11:02

In reply to by अनु राव

कोणा माणसाला रामायणात विमाने उडत होती ह्याची ठाम खात्री असेल तर तुम्ही त्याला सध्याचे विमान कसे उडते हे सांगु शकाल का?

या ठिकाणचे प्रश्न उपरोक्त स्वरुपापेक्षाही खालील स्वरुपाचे जास्त आहेत:

१. विमानाचे सर्व भाग हवेपेक्षा जड असूनही ते उडतं, तर सर्व भाग हवेपेक्षा हलके केल्यास इंधन आणखी वाचणार नाही का?
२. एकामागे एक विमानं जोडून त्यांची साखळी केल्यास एक विमान पडण्याची रिस्क कमी करता येणार नाही का?

अशा प्रश्नांना उत्तरं देणं (त्यातली माहिती असलेल्यांना) शक्य आहे.

डॉलर व्हर्सेस रुपया आणि यासम विषयात अजिबातच गती नसल्याने मी उत्तर देऊ शकत नाही. लेखात मांडलेले मुद्दे "टू सिंपल टु बी अ सोल्युशन" स्वरुपाचे असल्याचं केवळ तर्काने जाणवतंय. म्हणून त्यातली कदाचित असलेली व्यर्थता मान्य करुनही, कोणीतरी विनाखिल्ली उत्तरं दिल्यास आवडेल इतकंच. (काहीजणांनी थोडेथोडे मुद्दे लिहीलेही आहेत).

अनु राव Thu, 03/03/2016 - 11:22

In reply to by गवि

गवि - आज तुम्ही अति पॉझीटीव्ह मांईंड सेट मधे असावेत. ह्या लेखात आणि त्याच्या मागच्या विचारात मुलभुत चुका आहेत. कसले उत्तर देणार आणि काय.

दुसरीकडे गेले जवळजवळ दीड दशक चीनवरदेखील युआनचे अवमूल्यन करण्याचा दबाव असूनदेखील तो त्याला बळी पडलेला नव्हता

हे एक उदाहरण बघा. चीन वर युआनचे अवमुल्यन करण्याचा दबाव आहे हे तुम्ही कधी तरी ऐकले आहे का? परीस्थिती ह्याच्या बरोबर उलटी नाही का? चीन जबरदस्तीने युआन चे भाव कमी ठेवत असतो हे सत्य नाही का? मग आता ह्या विषयावर काय उत्तर देणार?

एकुणच लेखकाचा सुर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंम्मत कमी असणे हे अतिशय अवमानकारक आणि नुकसानीचे आहे असा आहे. अश्याला काय उत्तर देणार?

सुनील Thu, 03/03/2016 - 11:31

In reply to by अनु राव

एकुणच लेखकाचा सुर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंम्मत कमी असणे हे अतिशय अवमानकारक आणि नुकसानीचे आहे असा आहे

ही यडपट थियरी विद्यमान प्रधानसेवकांनी, प्रधानसेवक होण्यापूर्वी मांडली होती.

बहुधा, रुपयाचा विनिमय दर हा पंतप्रधानांच्या वयाच्या सम प्रमाणात असतो, हा शोधही त्यांचाच!!

नितिन थत्ते Thu, 03/03/2016 - 13:01

In reply to by अनुप ढेरे

लोल

डॉलरचा रुपयातला भाव = पंतप्रधानाचे वय ही थिअरी फॉलो करायची असेल तर १ डॉलर = १० रुपये असण्यासाठी कोण पंतप्रधान व्हायला हवा हे स्वयंस्पष्ट आहे.

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 10:59

चलन विनिमयदर कसा ठरतो या पलीकडचेमुद्दे येथे उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे तो दर कसा ठरतो हा या पोस्टचा मुद्दा नाही असे स्पष्ट केले आहे. डॉलरव्यतिरिक्त दुस-या चलनावर आधारित (उदा. युरो) किंवा दोन देशांच्या चलनावर अाधारित व्यापार केला तरीही अमेरिका अशा देशांवर खार खाउन असते व संधी मिळताच त्याचे उट्टे काढत असते. या उट्टे काढण्याचा परिणाम हा त्या त्या देशातील दारिद्र्य रेषेजवळच्या लोकांवर इतका भयानक परिणाम होत असतो, त्याची कोठेतरी नोंद घेतली जाते का? डॉलरचा विनिमयदर हा खरोखर त्यात्यादेशातील राहणीमानाशी संयुक्तिक आहे का हा प्रश्न पडूच नये का? या बहुतेक सर्व प्रगत देशांवर विक्ृत वाटावे इतके कर्ज आहे, त्यांच्या अर्थव्यवस्था पाहिल्या तर ते फेडले जाणे जाऊ दे, कमी होण्याचेही चिन्ह नाही.
तरीही "तुम्ही डिस्क्लेमर वाचले नाहीत का? चलन विनिमयाचा दर कसा ठरवतात, हे शक्य आहे का, या गोष्टींबद्दल न बोलता चर्चा कशी, कशाबद्दल करायची?" असा प्रश्न कोणाला पडत असेल तर काय करणार?
शिवाय संपादक मंडळांपैकीच बहुतेक जण मुद्दा सोडून भलतेच दळण दळताना दिसतात. ार्थात ही पहिलीच वेळ नाही. एरवी कुठली भाषा त्यांना योग्य वाटली नाही तर त्याबद्दल सूचना देताना ते दिसतात. पण विषयांतर करण्यात मात्र तेच आघाडीवर दिसतात. आता कोणी मुद्द्याला सोडून कमेंट करायला सुरूवात केली तर त्याबद्दल ताकिद द्यावी तर स्वत: संपादकच त्यात सामील. हा स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर आहे हेदेखील स्पष्ट आहे.

गवि Thu, 03/03/2016 - 11:07

In reply to by राजेश कुलकर्णी

पण चलनविनिमय दर कसा ठरतो हा आणि यासम मुद्दा टाळून "पुढची" चर्चा कशी होईल? बेसिकमधेच लोचा असण्याची शक्यताही आहेच ना?

उपरोक्त उदाहरणात (अनुरावांना उत्तर) "विमान मुळात हवेत कसं उडतं यावर चर्चा नको" पण पुढील प्रश्न रास्त नाहीत का? असं म्हणण्यासारखं आहे. अशी रिस्ट्रिक्षन घालून कशी चालतील?

अर्थात असे डिस्क्लेमर्स म्हणजे.. उदा..

.."वरपक्षाकडची मंडळी समंजस आहेत हो चांगली" हे वाक्य "समंजस नाहीत" असं ऐकायचं असतं हे पब्लिकला नीट माहीत असतं हा भाग वेगळा. ;)

.शुचि. Thu, 03/03/2016 - 11:18

In reply to by गवि

"वरपक्षाकडची मंडळी समंजस आहेत हो चांगली" हे वाक्य "समंजस नाहीत" असं ऐकायचं असतं हे पब्लिकला नीट माहीत असतं हा भाग वेगळा. (डोळा मारत)

खलासच गवि. तुमच्या फॅनक्लबात होतेच पण आता फॅनक्लबात अशी चिकटले की पूर्वे पोष्टात लोक चिकटत बघा ;)

.शुचि. Thu, 03/03/2016 - 11:18

In reply to by गवि

"वरपक्षाकडची मंडळी समंजस आहेत हो चांगली" हे वाक्य "समंजस नाहीत" असं ऐकायचं असतं हे पब्लिकला नीट माहीत असतं हा भाग वेगळा. (डोळा मारत)

खलासच गवि. तुमच्या फॅनक्लबात होतेच पण आता फॅनक्लबात अशी चिकटले की पूर्वे पोष्टात लोक चिकटत बघा ;)

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 11:21

In reply to by गवि

यात बंधने घालण्याचा हेतु नाही. चर्चा केवळ तिकडेच भरकटू नये हा उद्देश आहे. अर्थात येथे तर चर्चा त्या मुद्द्याशी घेणेदेणे असलेलीच हवी यावरही बंधन नाही. त्यामुळे चालू दे.

अनु राव Thu, 03/03/2016 - 11:29

आज अमेरिका, बहुतेक प्रगत युरोपीय देश, जपान हे सर्वच देश आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या प्रचंड (प्रचंड हा शब्दही खुजा ठरेल इतक्या) कर्जाखाली आहेत.

असे प्रचंड कर्ज आणि जे कमी होण्याची सुतमात्र शक्यता नाही, तरी या महासत्ता आणि आपण मात्र भिकारी या परिस्थितीचे कोणालाच कसे वावगे वाटत नाही? खरे तर या परिस्थितीत भिकारी कोणाला म्हणायला हवे? जो जितका अधिक कर्जबाजारी, तो तेवढा अधिक भिकारी नाही का?

पहिला तर प्रश्न नाहीये, एकदम विधान आहे. लेखकाला ह्या देशांवर असलेले कर्ज म्हणजे काय आहे ह्याची कल्पना आहे का? त्याचा असा समज झाला आहे की अमेरीकेला कोणत्यातरी सावकारानी कर्ज दिले आहे आणि ते नाही फेडले तर तो अमेरीकेला जप्त करेल वगैरे. अश्या समजांवर मी काहीही बोलु शकत नाही.

पाश्चिमात्यांनी अर्थशास्त्राचा गरीब व विकसनशील देशांच्या पिळवणुकीसाठी उपयोग करणे हे त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या आपल्या वेगवेगळ्या सरकारांमधील अर्थमंत्र्यांच्या अथवा बाहेर अर्थशास्त्रावर मोठमोठ्या शिकवण्या घेणा-या अर्थतज्ज्ञांच्या लक्षात येत नसेल असे म्हणावे का? त्यांची ही विचार करण्याची पद्धत देशहिताची आहे का?

अर्थशास्त्राचा उपयोग कोणाच्या पिळवणुकी साठी करा करु शकतो हे कोणी सांगु शकेल का? आणि असे शक्य असेल तर मग भारत आजुबाजुच्या छोट्या देशांची अर्थशास्त्र वापरुन पिळवणुक का करत नाही?

अनु राव Thu, 03/03/2016 - 11:42

डॉलर-रूपया विनिमयाचा दर निव्वळ परकीय चलनाच्या मागणीशी लावून तो अक्षरश: स्टॉक मार्केटसारखा संवेदनशील करून टाकणे योग्य आहे काय?

ह्याचे उत्तर तुम्हीच द्या गवि. एकुणात बघता १०-१५ टक्के फ्लक्च्युएशन होत असते वर्षात जास्तीत जास्त. ह्याला संवेदनशील म्हणता येइल का? त्या पेक्षा सोने जास्त हलते.

गेली कित्येक वर्षे मंदी असूनही बाजार १८हजारचा २८हजारवर जातो, आपल्याला त्याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. कंपन्यांची कामगिरी व त्यांच्या शेअरचा भाव यांचा संबंध केव्हाच संपल्यात जमा आहे.

अशी काही मंदी आहे हे राकुंना कोणी सांगीतले? जीडीपी ६-७ टक्यांनी वाढतो आहे, ह्याला मंदी म्हणतात का?
कंपन्यांची कामगिरी आणि शेयरचा भाव ह्यात संबंध कधी होता? राकुंकडे असे काही महीना / साल आहे का की जेंव्हापासुन हा संबंध संपला.

अनुप ढेरे Thu, 03/03/2016 - 12:12

In reply to by अनु राव

कंपन्यांची कामगिरी आणि शेयरचा भाव ह्यात संबंध कधी होता

हे तितकसं खरं नाही. शॉर्ट टर्ममध्ये शेअरचा भाव कामगिरीला फॉलो करेल, न करेल सांगता येत नाही. पण लाँग टर्ममध्ये(५-१०) वर्षाच्या स्केलवर नक्की करतो. आत्ताच रिलायन्सच्या २००६ पासून शेअरचा भाव विरुद्ध वर्ष आणि त्यांचे त्या वर्षाचे प्रतिशेअर उत्पन्न विरुद्ध वर्ष असे दोन ग्राफ काढून पाहिले. व्यवस्थित मॅच होतात.

अनु राव Thu, 03/03/2016 - 12:20

In reply to by अनुप ढेरे

मला वाटलेच असे काहीतरी उत्तर येइल म्हणुन.

तुमचे म्हणणे खरे असेल तर राकुंचे चुकले असे म्हणायला पाहिजे ना

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 12:22

In reply to by अनुप ढेरे

लोक व्यवहार तर त्यात्यावेळच्या भावाप्रमाणे करतात. मग पाच-दहा वर्षांचा आधार देऊन काय साधते?

अनुप ढेरे Thu, 03/03/2016 - 12:25

In reply to by राजेश कुलकर्णी

कामगिरी आणि शेअरचा भाव याचा संबंध नाही अस तुम्ही म्हणालात. ते चूक आहे ते दाखवलं. तुम्हाला काय साधायचय हे मी काय सांगणार?

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 14:18

In reply to by अनुप ढेरे

अहो, केव्हा तरी म्हणजे पाच किंवा दहा वर्षांनी तुम्हाला हवे तसे उत्तर मिळणार आणि तुम्ही त्याचे समर्थन करणार. मधल्या काळात त्याचे काय होते त्याचे काय करायचे? स्पेक्युलेशन वगैरे प्रकार तुम्ही ऐकलेच नसतील असे कसे म्हणू. मग जेथे स्पेक्युलेशन येते तेथे काय बरोबर अन काय चूक. तुमच्या उत्तरातच त्यातली भानगड आहे. मला काही साधायचे नाही. तुम्हीच उत्तर दिले आहे.

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 12:18

येथे सध्याच्या पद्धतीच्या योग्यतेच्या पलीकडे जायलाच कोणी तयार नाही. अर्थशास्त्राखालचे म्हणवले जाणारे हे नियम म्हणजे काही गुरूत्वाकर्षणासारख्या वैज्ञानिक नियमांसारखे शाश्वत नव्हेत. अर्थशास्त्र कोठून आले हे नियम कोणाकडून लादण्यात आले हे विदित आहेच, इतर शास्त्रीय नियमांमधील पॅरामीटर्स हे मॉडेलिंगच्या सहाय्याने अभ्यासता येतात. की कोणत्या पॅरामीटरमध्ये किती म्हणजे प्लस-मायनस बदल झाला तर परिणाम किती होईल हे लगेच कळू शकते. येथे मात्र हे पढवतील तेच खरे असा प्रकार आहे.
या देशांवरचे कर्ज हे कुठल्या प्रकारचे असते, ते असे नाही की ते फेडले नाही तर कोणी अमेरिकाच जप्त करेल हे म्हणणेही त्या प्रकारातलेच आहे. जे कुठल्या प्रकारचे कर्ज असेल त्यांचा एकमेकांशी संबंध नसतोच असे सांगता येते का? देश चालवण्याकरता काढलेली अंतर्गत कर्जे व व्यापारातील आयात-निर्यातीच्या प्रमाणाच्या आधारावर (हा एकच घटक त्यासाठी कारणीभूत नसला तरी) होणारी चलनविनिमयदरातील बदल हे त्या कर्जांशी, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, संबंधित नसतातच असे म्हणू शकतो का?
अर्थक्रांतीच्या तत्वांबद्दल तुम्ही ऐकले असेल. तीदेखील आताच्या व्यापार-करप्रणालीच्या पद्धतीत बसत नाहीत. म्हणून जे अर्थतज्ज्ञ म्हणवून घेतात पण ज्यांची प्रचलित पद्धतीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची तयारी नसते ते त्याला फालतू म्हणून मोडीत काढतात.
मला पडलेले प्रश्न येथे उपस्थित केले आहेत. हे प्रगत देश कर्जाबाजारी आहेत, नको तितके कर्जबाजारी आहेत, हे तर सत्य आहेत, त्याबद्दल काही दुमत नसावे. बरे, आपण उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाहीत. आपण तेल वगैरे अमेरिकेकडून विकत घेत नाही. इराणबरोबर आपण आपल्या सोयीने व्यापार केला तर डॉलरची गरज कमी होते, म्हणून अमेरिका त्यात खोडा घालू पाहते. मुळात एका देशाचेच चलन वापरात आणण्याच्या अट्ट्हासामुळे हे होते व अमेरिका आपल्याच काय युरोसारख्या चलनाच्याही मुसक्या बांधू पाहते कारण त्यांना त्यापासून धोका वाटतो. अन्यथा मला वाटते गड्डाफी की कोणी युरोमध्ये व्यापार करायला सुरूवात केली तर त्याला अमेरिकेने विरोध केला. या परिस्थितीत एखादे जागतिक पातळीवर वापरले जाणारे वेगळे चलनच का अस्तित्वात नसावे की ज्यामुळे अमेरिकेचा उच्छाद कमी होईल? कमी अशासाठी म्हटले की तो बंद तर होणार नाहीच. तेव्हा हे सगळे अर्थशास्त्राच्या तत्वांप्रमाणे चालते यावर कोणाचा विश्वास असेल तर मी काही करू शकत नाही.

अशा अनेक शक्यता असू शकतात. मी स्वत: अर्थतज्ज्ञ नाही त्यामुळे उपाय सांगू शकत नाही. तूर्त तरी प्रश्नच उपस्थित करू शकतो.
या विषयावर नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन च्रर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. पण ज्यांना हे प्रश्नच पटत नाहीत, त्यांच्याक्डून हे होणार नाही याचीही जाणीव आहे.

अनु राव Thu, 03/03/2016 - 12:24

In reply to by राजेश कुलकर्णी

अर्थशास्त्राचा आणि एकुणच जगण्याचा हा एक महत्वाचा नियम आहे

"जिसकी लाठी उसकी भैस"

लाठी मिळवा, ती वापरायला शिका - हे एक उत्तर आहे.

अर्थशास्त्र असे काही "शास्त्र" आहे का?

राजेश कुलकर्णी Thu, 03/03/2016 - 14:48

In reply to by अनु राव

देशांतर्गत कर्जे असो वा बाहेरून घेतलेली, ती फेडायची असली तर त्याचा तुमची पत काय हे ठरवण्यासाठी निकष काय ते उपयोग व्हायलाच हवा. ते बाजुला सारून विनिमयदर ठरवणे हे अाता चालू असेल, पण ते योग्य नव्हे. कारण त्या कर्जातली थोडीथोडी रक्कम फेडायची ठरवले तर तुमच्या अर्थव्यवस्थेचे काय होईल हे कोठे ग्ृहित धरले जाते का? तेव्हा ते न होता काय केले जाते त्याचे उत्तरही तुम्हीच दिले आहे. तुम्ही अशी दादागिरी असते हे मान्य करताहात, त्यातच उत्तर आले. मग विनिमयदराचे शास्त्र वगैरे मतलबी गप्पा आहेत, हेही लक्षात येऊ दे.
आता म्हणताय ते अाधीच सांगितले असते तर इतका वेळ तुम्हाला कैच्या कै करावे लागले नसते.

गवि Thu, 03/03/2016 - 12:29

In reply to by राजेश कुलकर्णी

येथे सध्याच्या पद्धतीच्या योग्यतेच्या पलीकडे जायलाच कोणी तयार नाही. अर्थशास्त्राखालचे म्हणवले जाणारे हे नियम म्हणजे काही गुरूत्वाकर्षणासारख्या वैज्ञानिक नियमांसारखे शाश्वत नव्हेत.

अजो ??

विसुनाना Thu, 03/03/2016 - 12:12

(एका अस्सल राष्ट्रभक्ताची कविकल्पना किंवा दिवास्वप्न)
डॉलरचा भाव भारतीय रुपयाच्या तुलनेत ठरायला लागला आहे...
अहाहा, एका भारतीय रुपयाला शंभर स्विस फ्रँक्स, दोनशे यु एस डॉलर्स, करोडो पाकिस्तानी रुपये..... ग्रीनबॅक ऐवजी गांधीबॅक असा शब्दप्रयोग वापरात आला अहे.

थांबा, थांबा... जगातले सगळे देश आपले इतर सर्व उत्पादन थांबवून केवळ भारतीय नोटा छापू लागले आहेत, आफ्रिकन फ्रॉडस्टर्स कागद जाळून भारतीय नोटा तयार करतात.
वगैरे!
असो.

अनु राव Thu, 03/03/2016 - 12:27

उद्या भारत सरकारने पुढची दहा वर्षे एक डॉलर म्हणजे पंचवीस रूपये असे जाहीर केले तर या देशातील चित्र काय असेल?

जाहीर करायला काय सरकार एक डॉलर म्हणजे १ रुपया असे पण जाहीर करु शकते :-) पूर्वी असे होतेच की, मग धारावीत सुद्धा करंसी बदलुन देण्याचा कोट्यावधीचा व्यवसाय चालायचा.

सरकार काय दर जाहिर करतय ह्याला कमीत कमी चलन विनिमयाच्या बाबतीत फार काही अर्थ नाही.

अनु राव Thu, 03/03/2016 - 12:28

आज अमेरिकेतल्या एका डॉलरची क्रयशक्ती खरोखर पासष्ट रूपयांएवढी आहे का?

पुन्हा गोंधळ. क्रयशक्ती वेगळी आणि विनिमय दर वेगळा. क्रयशक्तीची उदाहरणे वर लोकांनी दिली आहेत.

अनु राव Thu, 03/03/2016 - 12:30

प्रत्येक देशावरचे कर्ज लक्षात घेऊन आणखी एक मॉडेल तयार करा की! कदाचित एक डॉलर म्हणजे पाच-दहा रूपये असायला हवा असा निष्कर्ष निघाला तरी आश्चर्य वाटायला नको!

कै च्या कै

आता कंटाळले.

सुनील Thu, 03/03/2016 - 15:04

ही विनिमय दराची भानगड फियाट मनी (कागदी प्रॉमिसरी नोट्स) चलनांमुळे निर्माण झालेली आहे. जर सगळ्या देशांनी पूर्वीप्रमाणे धातूची नाणीच चलनात वापरायची असे ठरवले तर विनिमयाची भानगड उरणारच नाही!!

काय म्हन्ता??

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/03/2016 - 17:36

In reply to by सुनील

धातूवर अडकून राहिल्यास आकार कमी होणार नाही?

(प्रमाणिम करण्यात येते की हा प्रतिसाद एकाच अर्थाचा आहे.)

असंका Thu, 03/03/2016 - 16:37

असे प्रचंड कर्ज आणि जे कमी होण्याची सुतमात्र शक्यता नाही, तरी या महासत्ता आणि आपण मात्र भिकारी या परिस्थितीचे कोणालाच कसे वावगे वाटत नाही? खरे तर या परिस्थितीत भिकारी कोणाला म्हणायला हवे? जो जितका अधिक कर्जबाजारी, तो तेवढा अधिक भिकारी नाही का?

यात काहीही वावगे नाही. भिकारी तो, जो म्हणेल तेव्हा- म्हणेल तितके कर्ज मिळवू शकत नाही.