लघुकथा – नवी कल्पना
ह्या कथेचे नायक आहेत साने आजोबा.
साने आजोबा हाडाचे शिक्षक. त्याना निवृत्त होऊन जरी बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांची कडक शिस्त अजूनही तशीच होती. दोन वर्षांपूर्वी घरच्यांनी उत्साहात पंच्याहत्तरी साजरी केली होती. मुले, नातवंडे आपापल्या व्यापात मग्न असल्यामुळे साने आजी-आजोबांना करमत नसे. सतत नवीन विरंगुळ्याच्या नाहीतर गप्पा मारायला माणसांच्या शोधात दोघेही असत. आजोबाना नवनवीन कल्पनाही खूप सुचत. त्यातूनच जन्माला आली ही कथा.
साने आजोबांनी वर्तमानपत्र उघडून वाचयला सुरु केले तसे एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘ प्रिय आजी-आजोबा, नमस्कार!
बाल कल्याण मंडळ ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी एक उन्हाळी शिबीर आयोजित करीत आहे. त्यासाठी आम्हाला स्वयंसेवक म्हणून चक्क तुम्ही हवे आहेत. ज्याना नातवंडांसाठी वेळ असेल आणि प्रेमाच्या चार गोष्टी शिकवता येतील असे आजी-आजोबा आम्हाला हवे आहेत. तुम्हाला जे काही नवीन शिकवता येईल ते तुम्ही मुलाना शिकवायचे. त्याना गोष्टी सांगायच्या. शिवाय बैठे खेळ खेळता येतील . सुट्टीत टी वी, मोबाइल ह्यापासून ह्या पिढीला दूर ठेवून त्याना वेगळेच आयुष्य जगायला शिकवायचे. जे त्यांना विशेष माहीतच नाही आहे आणि तेही आजी-आजोबांच्या उबदार छायेत. आहे का तुमची तयारी? चला तर मग लौकर फोन करा. आजच सुरु होतंय हे शिबीर. आम्ही आणि मुलं तुम्हाला भेटायला अगदी उत्सुक आहोत. येताय ना मग?
फोन नं – ******** ‘
साने आजोबा तीन ताड उडालेच. हे म्हणजे अगदी ‘छप्पर फाडके’ म्हणतात तसेच काहीसे वाटले त्याना. त्यांच्या अंगात उत्साह संचारला. आणि ते लगबगीने फोन करायला उठले.
टिंग टोंग, टिंग टोंग!
बेलच्या आवाजाने आजोबांची झोप उडाली. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर दुधवाला आला होता. त्यांच्या लक्षात आले की त्याना स्वप्न पडलं होत. पहाटेची स्वप्न खरी होतात असे मानले तर होईल का हे स्वप्न पुरे?
आजोबा आतुरतेने वर्तमानपत्र येण्याची वाट पाहू लागले.
– उल्का कडले
(हल्ली पाहण्यात येते की काही ज्येष्ठ नागरिक खूप एकटे असतात. संवाद साधायला कोणी नसते. आर्थिक सुबत्ता असली तरी मानसिक, भावनिक दृष्ट्या ते हळवे झालेले असतात. त्यावरून सुचलेला हा एक उपाय मी कथा स्वरूपात मांडला आहे. मला अपेक्षित असलेला शेवट हा आशादायी आहे आणि निराशावादी नक्कीच नाही. असे काहीतरी त्यांना काम/छंद मिळावे असे मनापासून वाटते. 'आपली कोणालातरी गरज आहे' ही भावना त्याना जगण्यासाठी उभारी देईल.)
काल्पनिक कथा व काल्पनिक पात्रे.
प्रतिक्रिया
छान आहे कथा ..
छान आहे कथा ..
मला वाटले मी मुक्तपिठ्च वाचते
मला वाटले मी मुक्तपिठ्च वाचते आहे, पण जागेपणाचे स्वप्न भंग पावले आणि ऐसीवर च असल्याचे समजले. कुठे नेऊन ठेवली मिपाकरांनी ऐसी माझी ( म्हणजे तशी माझी नाही, ऐसीच्या मालकांची )
मलाही कथा आवडली कारण
मलाही कथा आवडली कारण त्यातल्या भावना पोचल्या.
कथोटूक म्हणता येईल का अशा
कथोटूक म्हणता येईल का अशा लेखनप्रकाराला?
बाकी भावना पोचल्या. पण बहुतेक लोकांना स्वतःचंच हवं असतं.