Skip to main content

गणपतीचा शोध

लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतीं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहीती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली. मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.

Node read time
3 minutes
3 minutes

धनंजय Mon, 12/03/2012 - 00:39

रोचक अनुभव आहे.

कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे? मूळ वैदिक देवांना मुख्य आराध्यदैवते केली तर (घरातील बालकांसाठी) तोटा असा, की घरातले सण बाहेरच्या समाजातील सणांशी जुळत नाहीत. तोटा तसा फार मोठा नाही, पण हा विचार मनात सहज आला.

ख्रिस्तजन्माचा सोहळा डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान साजरा करण्याची प्रथा आहे. पण त्या प्रथेला ख्रिस्तकथेच्या प्राथमिक ग्रंथांत आधार नाही. प्राचीन काळातल्या अल्पसंख ख्रिस्ती लोकांनी ती तारीख का निवडली? याबाबत कयास म्हणून सांगतात, की मकरसंक्रांती/हिवाळ्याची सोल्स्टिस आदला बहुसंख्य समाज साजरा करत असे. त्या आनंदमय प्रसंगात आपलाही सण प्राचीन ख्रिस्ती अल्पसंख्याकांनी योजला असावा. ज्यू लोकांचा एक दुय्यम सण "हानुका" डिसेंबरमध्ये येतो, तो सण गेल्या काही दशकांत ज्यू लोक मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. ही तर आपल्या एक-दोन पिढ्यांतली कथा.

बहुधा गणेशपूजा हद्दपार केलेले लोक साधारण त्या तिथीच्या आसपासचा दुसरा कुठला सण धूमधडाक्याने साजरा करू लागतील...

तर्कतीर्थ Mon, 12/03/2012 - 13:33

In reply to by धनंजय

कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?

कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.

श्रावण मोडक Mon, 12/03/2012 - 13:47

In reply to by तर्कतीर्थ

कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?

कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.

गणपती बुद्धी देतो, असं म्हणतात ते खरं ठरतंय म्हणायचं. ;) मलाही अशीच गणपतीनं बुद्धी दिली होती.
तर्कतीर्थ, कृपया प्रतिसाद हलकेच घ्यावा, ही विनंती.

राजन बापट Mon, 12/03/2012 - 08:35

रोचक लेख. लेखकाने अनेक उपयुक्त संदर्भ दिलेले आहेत याबद्दल आभार व्यक्त करतो.
या निमित्तानी मा. ना. आचार्य यांच्या "ध्वनिताचें केणें" या ग्रंथातल्या गणपतीविषयक संदर्भाचे पुन्हा एकदा वाचन झाले. त्या लेखात अनेकानेक संदर्भ आहेत त्यांची निव्वळ यादी देतो म्हणजे केवळ एखाद्या लेखातून या दैवताबद्दल किती दिशांनी आणि किती खोलवर माहिती मिळवता येते त्याचे प्रत्यंतर येईल.

- ज्ञानेश्वरीच्या ग्रंथारंभी, तेराव्या नि सतराव्या अध्यायातल्या गणेशाचा उल्लेख.
- "मूळ अनार्य यक्ष सृष्टीतील दैवताची, ऋग्वेदातल्या ब्रह्मणस्पती या दैवताशी सांगड घातली गेली असावी" असा (श्री. आचार्य यांचा स्वतःचाच ?) अभ्युपगम.
- या निमित्ताने यक्षसृष्टीच्या लोकसाहित्याची महाभारतादि काव्यपुराणांवाटे आणि ऋग्वेदातील उल्लेखांद्वारे वैदिक संस्कृतीशी जोडले जाणे, यक्षांचे वर्णन.
- कथासरित्सागर या ग्रंथाच्या सुमारे तिसर्‍या शतकातल्या पैशाची भाषेतल्या मूळ आवृत्ती आणि अकराव्या शतकातल्या मराठी आवृत्तीमधील "विघ्नदेवते"चे उल्लेख. या निमित्ताने इस पूर्व ६०० पासूनचे यक्षपूजेचे उल्लेख . त्यातून सिद्ध होत असलेला गणेशाचा "ग्रामदैवता"बद्दलचा संदर्भ.
- लोकसाहित्यातील शिव या अनार्य देवतेचे गणेश या दुसर्‍या अनार्यदेवतेचे पितापुत्र असे नसलेले नाते. त्या दोन्ही दैवतांचे लोकनृत्यसापेक्ष उल्लेख.
- ऋग्वेदातल्या "गणपती" या देवतेचे उल्लेख. आणि ब्रह्मणस्पती या देवतेशी स्थापित केलेले एकरूपत्व.
- अथर्वशीर्ष हे मूळ अथर्ववेदाच्या संहितेत नसणे. गणेशदेवतेचे वैदिक देवतामंडलात प्रवेश झाल्यानंतर अथर्वशीर्षाचे त्या वेदाला जोडले जाणे
- वेदांचय निर्मितीनंतर अनेक शतकांनी लिहिल्या गेलेल्या कर्मकांडाची वर्णने असलेल्या वेदांगांमधील "विनायकशांती"सारख्या गोष्टी,
- स्मृतींमधे येत गेलेले गणेशदेवतेचे उल्लेख.
- एकंदर वैदिक साहित्य , पुराणे , स्मृती यांच्यात सामील केल्या गेल्यानंतरही अन्य पुराणादि साहित्यात "अनार्य दैवत" म्हणूनही गणेशाचा उल्लेख सापडणे. (डब्बल रोल !)
-शिवपुराण, स्कंदपुराण , ब्रह्मांडपुराण अशा विविध ठिकाणी थोड्याबहुत फरकाने आलेली "गणेशजन्मा"ची कथा :-)

क्रमशः सध्या इथेच थांबतो. अजून अर्धे संदर्भ देणे बाकी आहे. वेळ झाला की देतो. मुद्दा असा आहे की , एकंदर देवता कशा बनत गेल्या याचा इतिहास वेदपूर्वकालीन अनार्य संस्कृतीपासून, मग वेदांपासून , नंतर जन्माला आलेल्या साहित्याशी, त्यानंतर आलेल्या बौद्ध धर्मादि गोष्टींशी वगैरे अनेक शाखाप्रशाखांनी जोडला गेलेला आहे. आचार्यांच्या एका चॅप्टरमधील निव्वळ संदर्भ देताना दमछाक होते. तर मग त्यातील कालानुक्रम ठरवणे , अस्तिपक्ष, नास्तिपक्ष आदि ठरवणे , त्यात लिखित नसलेला इतिहास, पिढ्यापिढ्यातून वहात आलेल्या ज्ञानाच्या निरनिराळ्या आवृत्त्या...एकंदर हा प्रदेश निबीड म्हणायला हरकत नाही.

बाकी प्रस्तुत लेखात गणपतीला घराबाहेर वगैरे काढणे म्हणजे काय ते नीटसे समजलेले नाही. ते असोच. :)

राजे Mon, 12/03/2012 - 10:20

In reply to by राजन बापट

माझा प्रतिसाद दिल्यानंतर तुमचा हा प्रतिसाद वाचला!
लेखक व प्रतिसादक दोन्हीकडून आलेल्या माहीतीमुळे माझा मेंदु हँग झाला आहे!

सविस्तर चर्चेतून योग्य अशी माहीती मिळेल असे वाटत आहे, वाट पाहतो आहे.

श्रावण मोडक Mon, 12/03/2012 - 10:20

In reply to by पैसा

हे सारे अंधुक आठवणीतून लिहितोय...
नीच वगैरे शब्दांचा वापर आज आपण करतो त्याच केवळ संदर्भांसह नाही. या शब्दाची संदर्भचौकट त्याहून अधिक व्याप्त आहे. पुढे त्यात आजच्या संदर्भातील नीच हा अर्थही आल्याचा प्रवास आहे. त्या अर्थी, गणपती ही अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत, असा तो प्रवास आहे.
२००२-०३ साली केव्हा तरी नामदेव ढसाळांनी 'सर्व काही समष्टी'साठी या त्यांच्या 'सामना'तील स्तंभात या विषयाचा अगदी बारकाव्यांसकट उहापोह केला होता, तोही यानिमित्त आठवला.

पैसा Mon, 12/03/2012 - 10:46

In reply to by श्रावण मोडक

>>अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत,

पण म्हणून आता आपल्यापैकी कोणी अनार्य्/गणपती नीच असं म्हणायचं काही कारण नाही.

(हा पुढचा भाग श्रामोंसाठी नाही. लेखकासाठी आहे) त्यातूनही प्रत्येकालाच कोणत्याही देवाला मानण्याचं/न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच. मग अमूक देव उच्च आणि अमूक देव नीच असं कोणी म्हणू नये. शिवाय अनेक ठिकाणी नाग, बैल, वारूळ, लिंग इ. अनार्यांचे देव पूजेत असतातच. भले तुम्हाला पटू दे किंवा कसेही.

म्हणून दुसर्‍या एखाद्यापेक्षा आम्ही उच्च असा अर्थ आपल्या बोलण्यातून ध्वनित होऊ नये याची काळजी घेतली तर फार बरं. अर्थात तुमचं उच्चार स्वातंत्र्य तरीही मी मान्य करते आहेच!

राजे Mon, 12/03/2012 - 10:18

धन्यु!

आताच मातोश्रींना या लेखाची प्रिन्ट काढून देतो, तसेच तुम्ही लेखात उल्लेख केलेले साहित्य देखील कोठे मिळेल ते पाहतो.

* लोकायत बद्दल काहीच माहीती नाही आहे कोणी सविस्तर माहीती देऊ शकते का?

* काही खटकलं ते पैसा यांनीवर लिहले आहेच.

ऋषिकेश Mon, 12/03/2012 - 10:43

चांगली माहिती. याबद्दल ससंदर्भ लिहिण्याइतका संदर्भ जवळ नाही मात्र काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी (जसे मासिकांतील लेख, व्रुत्तपत्रे इत्यादी) वाचल्या त्यावरून मुळ भारतातील जमाती टोबा ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नामशेष झाल्या. काही जंगली जमाती उरल्या (किंवा नंतर दक्षिणपूर्वेतून आल्या) त्यांच्यापैकी 'गण' या जमातीचा नेता तो गणपती. आर्य आल्यानंतर त्यांनी विविध मार्गाने वैदिक धर्माचा प्रसार केला व मान मिळवुन दिला. ज्यात साम-दाम-दंड-भेद सार्‍या निती अवलंबिल्या. शंकर आणि त्याला मानणार्‍या अनेक जातींशी युद्ध करण्यापेक्षा त्यांनी त्यांना वैदीक धर्मातच वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामावून घेतले. त्यापैकीच 'गण' जमातीशी युद्ध करून बघितले पण त्यांचा नेता अति पराक्रमी असल्याने त्यांना जमले नाही. त्या नेत्यानंतर त्यालाच प्रथम वंदन स्थानी बसवून तो अख्खा समाज वैदिक समाजात सामावता आला.

असे प्रकार आताहि बघायला मिळतातच की. गॉन्दालूपे ला चर्चने असेच मेरीचा अवतार घोषित करून मेक्सिकन समाज फारसे रक्त न वहाता ख्रिस्तमय करुन घेतले होते :)

मन Mon, 12/03/2012 - 10:54

तुम्ही नकळतपणे ज्या प्रोसेसचा उल्लेख केला आहे तो म्हणजे "देवतांचे उन्नयन".
हा एक आत्यंतिक खोलात खोलात घेउन जाणारा आणि नंतर त्याच खोलीत बुडवणारा विषय आहे. जसे गणांचा अधिपती तो गणपती असे त्याचे पूर्वीचे रूप तसेच वैदिक "रुद्र" देवता व तत्कालिन अवैदिक "शिव" ह्यांचे एकीकरण होउन एकच "शंकर भगवान " तयार झाले.
वेदांतील साइड हिरो, इंद्र, वरूण, मित्र्,अग्नी ह्या प्रमुख देवतांचा सहाय्यक असणारा "विष्णु" सुद्ध नंतर अनेक अवैदिक लोक कथांत मिसळून जाउन नंतर "देवांचा देव महाविष्णु" बनला असे म्हणतात.
स्थानिक लोककथांचे नायक राम्-कृष्ण हे खरे तर अवैदिक (किंवा निदान अ-वैष्णव तरी) म्हणता यावेत. ह्यांनाच खुद्द विष्णुचा अवतार मानले गेले.
पंढरपुराचा पांडुरंग-विठ्ठल,राजस्थानचे "श्रीनाथजी" , दक्षिणेतील अय्याप्पास्वामी हे सर्व खरेतर स्थानिक देवच. तेवढ्यातेवढ्या इलाक्यापुरता ह्यांचा प्रचंड बोलबोला. आजच्या भाषेत बोलायचे तर जब्बरदस्त फॅन फॉलोइंग किंवा "कल्ट" पण मर्यादित भूभागावर सुरुवातीला होता तसा.
जसे रजनीकांत नावाची कुणी के प्रभावशाली व्यक्तिमत्व दक्षिणेत उदयास आलेले आहे, व त्याचेही कल्ट तूफान आहे.(हो . Rajni is not a demi god. he can only be equated to the God from his fans perspective.)पण रजनीची तेवढी क्रेझ उत्तरेत नाही.
झाले काय, की कालप्रवाहात ह्यातल्या प्रत्येकावर वैदिक गुण आरोपित केले गेले.मग शतकानुशतके कथांची एक गुंफण सुरु झाली. दीर्घकाळ सुरु असलेलीए गुंत इतकी वाढली की वैदिक साच्यावर अवैदिक मुलामा चढलाय की अवैदिक ढाच्यावर वैदिक कल्प्नांचे नक्षीकाम केले आहे हे कळणे अशक्य झाले. म्हणजे "श्रीनाथ"जी विष्णुचा अवतार मानला गेला.(हा देव सिथियनांनी,राजपुतांच्या पूर्वजांनी मध्य पूर्वेतून का मध्य आशियातून आणला होता म्हणे.) पांडुरंगाचे विष्णु-शिव दोघांशीही एकीकरण इथल्या संतांनी सुरु केले,कित्येक अभंग आहेत,घरि पोचल्यावर दुवे देउ शकतो. अय्याप्पा म्हणजे कार्तिक स्वामी का मोहिनीरुपी विष्णु-शिव ह्यांचा पुत्र असे काहीतरी आहे. थोडक्यात, स्थानिक जमाती पूजा करायच्याअच ह्या देवांच्या त्यांच्यासमर्थनार्थ वैदिकांनी आअपाअपल्या ष्टोर्‍या तयार केल्या. काअही पुरानात टाकल्या, काही वेदांतात प्रक्षिप्त भाग म्हणून टाकल्या. काही कुठेही न टाकता तशीच पूजा सुरु ठेवली "वेदांनाही नाही कळला " म्हणत.

भरिला भर म्हणजे तिकडे बौद्धमताचा उगम झालेलाच होता. मग जिथे तिथे त्यांचाही प्रभाव, तिथल्या संकल्पनांचेही प्रकटीकरण सुरु झाले. जसे आर एस एस वाले(संघ परिवार school of thoughts) आणि पु ना ओक वगैरे प्रत्येक गोष्टीचे पूर्वज वैदिकच होते अशी सर्व सजीव्-निर्जीव वस्तूंची व्म्शावळ लाउन दाखवतात. तस्सेच आपण उल्लेख केलेले कोसंबी(कोसंबी school of thoughts) हे प्रत्येक गोष्टीचे नाते बौद्ध मताशी लाउन दाखवतात. उदा:- पंढरपूर्,पूर्वेचे पुरी (जगन्नाथ यात्रावाले) मठ व इतरही बरेच काही(अगदि रामायण वगैरेसुद्धा) आधी बौद्धांचे होते आणि मग नवप्रणित हिंदुंनी पाचव्या-सातव्या शतकानंतर शक्तीप्रयोगाने ढापले असे म्हणतात.
असे स्थानिक देव आजही दिसतात. चाळोबा,वेतोबा,भैरोबा हे सगळे स्थानिक भूभागातले कोकणातले वगैरे देव. तिथे पोचलेल्या वैदिक वाल्यांनी "हे तर आमच्या शिवाचे/रुद्राचे अवतार" असे सांगत्त्यांचे रूप मानून पूजा सुरु केली. अगदि पुण्यात हिंजवडित "म्हातोबा देवस्थान " आहे. हाही स्थानिक देवच. वैदिक लोक शंकराचा अवतार मानतात.

अजून एक कंगोरा म्हणजे पशूपूजा. म्हणजे आधी त्या देवतेची ज्या मूळ रुपात पूजा होइ, ते मूळ रूप नंतर "सुसंस्कृत " वाटेना. "सुसंस्कृत माणसाने पशूच्या पाया पडायचे? छे छे. काहितरीच." असे वातू लागून मग मूळ रूप त्या-त्या देवाचे वाहन बनले व देवाचे नवे रूप मानवी/सुसंस्कृत भासणारे झाले.उदा:- पाकमधील हडप्पा-मोहेंजोद्डो इथले अवशेष तसेच गुजरातेतील लोथल येथील अवशेषात पुष्ट वशिंड असलेल्या बैलाची पूजा होताना दिसते. हा अतिअतिप्राचीन काळ. त्यानंतर ह्याच देवतेचे मानवी रूप शिव्-रुद्र ह्या नव्याने तयार होत असलेल्या देवतेत टाकले व तो बैल "नंदी"च्या रुपाने मंदिरात विसावला.

थोडक्यात सध्याचे देव म्हणजे अशा अनेकानेक कथा,कल्प्ना,समजुती,लोक्-कथा व काहिसा शक्तीप्रयोग ह्या सर्वांचे एक वेगळेच भेंडोळे(स्पाघेत्ती) बनलेला आहे.

आता वैष्णो देवी, वणी-माहूर्,दुर्गा,सरस्वती,लक्ष्मी इकडे वळुयात.
अर्र्र र्र नको नाहितर. फार अवांतर होतय वाटतं.

मला म्हणायचय इतकच की तुम्ही गणेशाचा उल्लेख केला तसे उन्नयन(developement and mixing up with local deity)
प्रत्येक देवतेचे झालेले आहेच. हे जगभर अभ्यासले जाणारे एक शास्त्र आहे, समाजशास्त्राचे उपांग म्हणून हे येते, लोक कथा व लोक मानस समजून घेण्यासाठी.

टिपः-
१.मी वापरलेले शब्द आहेत वैदिक्-अवैदिक(संस्कृती उद्देशक). आर्य्-अनार्य(वंश उद्देशक) असे शब्द वापरले नाहित. आर्य्-अनार्य असे खरेच काही होते की नाही ह्याबद्द्ल केवळ लोकांचे हवेतील तर्क आहेत. "आर्य" नावाचे लोक भारताबाहेरून कुठूनतरी आल्याचे अजून कुठेही पुरेसे पुरावे मिळालेले नाहित.आले असतीलही, नसतीलही.
२.अधिक माहिती संक्षिप्त रुपात हवी असल्यास रं ना गायधनी ह्यांचे यु पी एस सी च्या जुन्या अभ्यासक्रमातील इतिहासाचे संदर्भपुस्तक पहावे. त्यांनी चांगला आढावा घेतलाय. जालावर संजय सोनावणी ह्यांनी "पांडुरंग" ह्या स्थानिक देवतेबद्द्ल त्यांच्या ब्लॉगवर बराच उहापोह केलेला आहे.

राजन बापट Mon, 12/03/2012 - 21:28

In reply to by मन

मन राव , नेहमीप्रमाणे तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण .
कृपया संदर्भ दिलेत तर फार आवडेल. (संदर्भ मागणे म्हणजे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शंका विचारणे नव्हे हे येथे नमूद करतो. )

मन Mon, 12/03/2012 - 23:18

In reply to by राजन बापट

प्रमुख संदर्भांचा उल्लेख माझ्या प्रतिसादाच्या शेवटी टिप २ मध्ये केलेलाच आहे. पुस्तक असे म्हटले तर यु पी एस सी ची काही पुस्तके आहेत, त्यातले मला महत्वाचे वाटलेले उल्लेखले.
पांडुरंग ह्या देवतेसंदर्भात ब्लॉग म्हटलो तो हा http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html
असाच गाजलेला ब्लॉग म्हणजे खट्टामिठा डॉट कॉम्. ह्यावर बरिच उलटसुलट्, काहिशी अनवट व कधीकधी स्फोटक माहिती येत असे.
ह्याशिवाय विसुनाना ह्या आयडीचे उपक्रम, मिपावरील प्रतिसाद.
सात्-आठ पेप्रात(मागील वीसेक वर्षात) रोज छापून येणारे इतिहास ,लोककथा ह्यासंबंधी काहीही.
हे सर्वच माझे बौद्धिक खाद्य आहे.नक्की काहितरी एकच असे नाही सांगता येणार. अगदि कशातूनही कशाचाही संदर्भ लागू शकतो.
RSSवाले अगणित साहित्य छापील रुपात प्रकाशित करतात्,जालावरही करतात(evivek)त्यातले सारेच काही भक्कम पुराव्यानिशी नसले तरी त्यानिमित्ताने बरेच लीड्स मिळतात. पण त्यांच्या ह्या साहित्याचे,पुस्तकांचे नावे लक्षात ठेवत मी बसत नाही,मला ते जमत नाही.तीच गत सावरकरी साहित्याची. सावरकरांचे समग्र साहित्य जलावर आहेच. कधीही पुस्तक प्रदर्शनात्,लायब्ररित,क्रॉसवर्ड मध्ये जाउन हाताला लागेल ते मायथॉलॉजीचे समजेल त्या भाषेतले उभ्या उभ्या (फुकटात)वाचत बसतो.त्यात राजवाडे,शेजलवलकर,कुरुंदकर आले, तसेच कोसंबीही आले.त्यातले जवळ जवळ कुठलेच पुस्तक माझे १००% वाचून पूर्ण होत नाही. ठळक मुद्दे,बुलेट पॉइंट्स काय ते लक्षात राहतात.
उपक्रमाच्या जुन्या चर्चांतूनही बरेच काही सापडते.
हां, आता मला कुणी म्हणाले की "बोल कुठल्या पुस्तकात काय दिलय? महिकावतीची गाजलेली बखर ,ज्याच्या नुसत्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी यादवकालीन आख्ख्या महाराष्ट्राचा,यादव्,कोली,भिल्ल अशा सर्वच सत्ताम्चा आढावा घेतलाय, त्या पुस्तकाचे नाव काय?" तर माझी तंतरते. म्हणजे मुद्दे आठवतात. शिलाहार्,कदंब्,नागरशा,भिल्लण यादव्,रामदेवराय,हेमाद्रीपंत बरेचसे आठवते, पण नक्की कोण कोणत्या पुस्तकात त्यांनी कोणकोणत्या काळाचा उल्लेख केलाय काहीही आठवत नाही.
थोडक्यात , रोजच्या आपल्याला बातम्या आठवतात तसेच काहिसे.आपण "काय" वाचले, हे आठवते. "कुठे" वाचले हे आठवत नाही. दिवसाला ५-७ वर्तमानपत्रे,जालपत्रे वाचणार्‍यांना माझी अडचण समजू शकेल.उदा :- वीसेक वर्षांपूर्वी राजीव गांधींचा खून झाला १९९१ मध्ये हे आपल्याला आठवते. अगदि स्फोटानंतरचे विदारक फोटोही आठवतात. पण तेव्हा आप्ण ते "सकाळ" मध्ये पाहिले होते की "लोकसत्ता"मध्ये हे म्हणजे अजिबात आठवत नाही.
तुम्ही एकाच पेपरशी एकनिष्ठ असाल तर ही अडचण येणार नाही. पण मी ह्याबाबतीत शब्दशः "सर्वभक्ष्यी" आहे. आजही तिसरी-चौथीच्या इयत्तेतील "छान छान गोष्टी" वाचतो. माझ्या नवबौद्ध मित्रांकडे जाणे झाल्यावर त्यांच्या आंबेडकरी ध्येयास वाहून घेतलेल्या वर्तमानपत्रातील सर्व लेख वाचतो. त्यातून बुद्धाच्या जातक कथांचा अंदाज येतो. डिस्कवरी,फॉक्स हिस्टरी वगैरेंचे माहितीपटही पूरक ठरतात. थोडक्यात, कुठलाच एक निश्चित असा सोर्स नाही.
लहान मुलाने मोठ्यांच्या ताटात वाढलेली मस्त गोडगोड बुंदी/नुक्ती भसाभसा ओढून आपल्या ताटात घेउन बकाबका खायला सुरुवात केली आणि जर त्यास विचारले की "आता सांग ह्यातली आईच्या ताटातून घेतलेले बुंदीचे दाणे कुठले आणि बाबांच्या ताटातून घेतलेले कुठले" तर बिचारे निरागस पोर जसे
दचकून तुमच्याकडे पाहिल तशीच काहिशी माझी स्थिती होते.
उदा:- महाराष्ट्रात पाथरवट समाज जो आज दगडफोडीचे काम अल्प मोबदल्यासाठी करतो,त्यांची प्रमुख वस्ती कुठे कुठे आहे ह्याबद्दल एका एनजीओचा रिपोर्ट होता. त्यांची स्थिती वर्णन केली होती.काहिंच्या मुलाखती होत्या. भारतात जागतिक दर्जाचे अचाट वाटणारे शिल्पकाम ह्याच समजाने केले होते.(वेरूळ्-कैलास पासून ते ऐहोळे-बदामी,मदुरै वगैरे बरेच काही.). झाले. त्या वस्तीचा अंदाज घेत गेल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते की आजही पाथरवटांची अशाच रस्त्याच्या आसपास आहे, जो इब्न बतूता वगैरे भटक्या प्रवाशाचा मार्ग होता. कोणे एके काळी व्यापारी मार्ग होता; पुढे जाउन रेशीम मार्गला हाच मर्ग जोडला जात होता. म्हणजेच शिल्पकला केवळ गुहांत न करता लहानसहान भांडी व इतर ठिकाणी करुनही हा समाज विकत असे असे शक्य दिसते. ह्यासाठी पुरावा काय? म्हटले तर काहिच नाही. म्हटले तर बरेच काही.

मुसुंबद्दल जाहिर तक्रारः- "मी " , "माझे", "मला" असे लिहित बसणे मला स्वतःलाच कसेसेच होते. वाचणार्‍यांनाही ते होतच असणार ह्याचाही अंदाज आहे. पण संदर्भ मागितल्यावर मी पुरेसे संदर्भ का देउ शकत नाही हे सांगण्यासाठी "मी माझे मला" शब्द वगळून प्रतिसद लिहिणे जमले नाही.
तस्मात मुसुंबद्द्ल सर्व वाचकांतर्फे (विशेषतः सदर प्रतिसादाने डोक्याला शॉट्ट बसलेल्यांतर्फे) मी तक्रार करु इच्छितो व दोष तिकडेच ढकलू इच्छितो.

राजन बापट Mon, 12/03/2012 - 23:33

In reply to by मन

सविस्तर उत्तराबद्दल आभार.
हा थोडा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु डेटा-वेअरहाऊसिंग च्या मूलभूत संकल्पना आपण इथे आपण वापरू शकतो. अनेक ठिकाणाहून येणारा, मोठ्या प्रमाणातला डेटा , त्याचे प्रमाणीकरण , तो योग्य-अयोग्य आहे की नाही याची छाननी, विषयवार वर्गवारी, संदर्भांचे व्यवस्थित पुंजीकरण या गोष्टींनाही काही महत्व आहे हे वेगळं सांगायला नको. हे करण्यात बरेच श्रम खर्च होतात हे मान्य आहे. किंबहुना व्यक्तीगत माहितीच्या संचयामधे असं करणं कदाचित फार कमी प्रमाणात आवश्यक आहे हेही खरं. मात्र तुम्ही ज्या प्रमाणात डेटा कन्झ्युम करत आहात ते पहाता अशा स्वरूपाची शिस्त अगदी कमीत कमी प्रमाणात का होईना पण स्वीकारली नाही तर लवकरच "हे खरं की ते खरं" किंवा "अधिक अचूक माहिती काय" अशा प्रश्नांची तड लावणं कठीण होऊन बसेल.

प्रस्तुत प्रतिसाद मन यांना व्यक्तिगत उपदेशपर नसून, ज्ञानमार्गामधे जे अनेक खाचखळगे लागू शकतात त्यांपैकी एका महत्त्वाच्या बाबीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे एवढेच नम्रपणे नमूद करतो.

Nile Mon, 12/03/2012 - 11:30

गणपती या देवाचा इतिहास आणि गणपतीची भक्ती करणं हे दोन वेगळे विषय तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कशाने जोडले आहेत? तुम्ही ज्या गणपतीची भक्ती करत होता त्या कारणांना तो अनार्यांचा देव होता या नविन माहितीमुळे कसा सुरुंग लागला? आज ज्या गणपतीची अनेकजण भक्ती करतात तो गणपती आणि वैदिक काळातला किंवा अगदी दोन-चार शतकांमागच्या गणपती वेगळा असल्याने काय फरक पडतो? आज केली जाणारी भक्ती आज ज्या गणपतीच्या "प्रतिमेला" लोक मानतात त्यानुसारच आहे ना?

(अवांतरः मुळात इतिहासाच्या अभ्यास "भक्ती" वगैरे भावनाच अस्थानी आहत. पण ते असो.)

तर्कतीर्थ Mon, 12/03/2012 - 13:39

In reply to by Nile

गणपती या देवाचा इतिहास आणि गणपतीची भक्ती करणं हे दोन वेगळे विषय तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कशाने जोडले आहेत?

देवाचा इतिहास आणि भूगोल कळल्यावर भक्तीमध्ये विघ्न उत्पन्न झाले ते काही केल्या दूर झाले नाही. :०

नगरीनिरंजन Mon, 12/03/2012 - 11:47

मनोरंजक लेख आहे.
गणपतीच्या दिवसात हापिसात जायला जो त्रास व्हायचा तो साहून तेव्हाच गणपती हा विघ्नकर्ता आहे अशी शंका आलीच होती.
अजूनही काही शंका आहेत.
गणपतीची सोंड म्हणजे काय?
उजव्या सोंडेचा आणखी त्रासदायक असतो असे का?
वगैरे वगैरे. उत्तरे अर्थातच अपेक्षित नाहीत कारण त्यावाचून काहीही अडलेले नाही.

तर्कतीर्थ Mon, 12/03/2012 - 13:27

वरील चर्चेत एक मजेशीर गोष्ट दिसून येते. ती म्हणजे गणपतील "नीच" मानले गेलेले काही जणांना रुचलेले दिसत नाही. पण गणपतीच्या विघ्नकारकत्वाबद्दल कोणीच बोलत नाही. आर्यांच्या यज्ञयागादि नित्य कर्तव्यात इथल्या मूळ लोकांनी त्रास देऊन विघ्ने आणली असणार. ही प्रवृत्ती आज ही टिकून आहे. एखाद्या समूहात नवे घटक सामील होतात तेव्हा त्याना सरळ प्रवेश फार थोड्या वेळेस मिळतो. त्यामुळे त्रास देणारे, विघ्ने आणणारे नीच मानले गेले तर त्यात नवल काय?

मी Mon, 12/03/2012 - 14:03

"स्मृती/वेद मानणार्‍या, उच्च(गृहीतक) अशा आर्य(गृहीतक) कुलात जन्म घेउन मी एका देवतेची उपासना भौतिक सुखांसाठी करत होतो, ती देवता नीच(दुसर्‍या जातीतली) आहे हे समजल्यावर मी तिला माझ्या घरातून घालवून दिले." ??

आतिवास Mon, 12/03/2012 - 15:34

गणपती (आणि त्याजागी इतर कोणीही देवता) मानणे आणि न मानणे यात घडलेला प्रवास रंजक आहे. काहींचा नेमका याच्या उलटा प्रवास होतो (असं सांगितलं आहे अनेकांनी/ अनेकींनी मला) तोदेखील तितकाच रंजक असतो. गणेशभक्ती एका अर्थी ग्रंथप्रामाण्यावर आधारित होती (गणपतीचे स्तवन नियमित केल्यास यश मिळत ही धारणा) आणि 'गणपतीला घरातून हद्दपार करणं' घडलं तेही काही ग्रंथाच्या आधारे - म्हणजे पुन्हा ग्रंथप्रामाण्य आलच इथेही.

जी वस्तू उपयोगाची वाटत नाही ती माणूस सामान्यपणे टाकून देतो असं दिसत आजुबाजूला साधारण दृष्य. गणपतीच स्थान बदललं हे कळलं लेखातून काही अंशी, पण हा बदल कसकसा होत गेला, तो होताना तुम्ही कोणकोणते टप्पे ओलांडलेत अस काही वाचायला मला जास्त आवडलं असत.

गणपती यज्ञ करणा-या आर्यांच्या दृष्टीने विघ्नकर्ता होता यात काही विशेष नाही - पण कोणाच्यातरी दृष्टीने तो संस्कृतीरक्षकही असेल, आपल्याला काय माहिती? त्यामुळे उच्च देवता, नीच देवता हे शब्दप्रयोग भक्तांचा त्या काळचा सामाजिक स्तर दाखवतो (समाजमान्य स्तर- शेवटी तो ठरवणारे सत्तावान लोक असतात त्या काळातले) - देवता शेवटी एका अर्थी मनुष्यनिर्मितच असतात!

Nile Tue, 13/03/2012 - 01:44

In reply to by गणपा

अहो देव मर्त्य मानवाच्या तावडीतून केव्हा सुटले होते ते आज सूटतील? मानवाने जेव्हा पासून त्यांना निर्माण केलं आहे तेव्हापासून ते माणसांच्याच तावडीत आहेत.

तर्कतीर्थ Wed, 28/03/2012 - 11:36

In reply to by गणपा

अरेरे देवही सुटले नाहीत मर्त्य मानवाच्या तावडीतुन

दिवेआगरच्या चोरीनंतर हे विधान जास्तच लागू पडते.

अशोक पाटील Mon, 12/03/2012 - 17:07

"....गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो...."

व्वा. काय हृदयस्पर्शी कारण आहे तडफडण्यासाठी !
ख्रिस्तोफर कोलंबस तडफडत होता साता समुद्रावर 'इंडिया' नावाच्या देशाचा शोध लावण्यासाठी
सर रिचर्ड बर्टन मक्कामदिनेच्या शोधासाठी तडफडत होते, हजारो मैलाच्या रणरणत्या वाळवंटातून जाताना.
एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे तडफडत होते, एव्हरेस्टवर झेंडा फडकविण्यासाठी.
एडवर्ड जेन्नर रात्रंदिवस तडफडत होता 'देवी' ची लस शोधून काढण्यासाठी.
विवेकानंद तडफडत होते हिंदु धर्मातील बंधुत्वाची शिकवण जगभर जाण्यासाठी.
मिल्खासिंग जीव तोडून धावत होता, तडफडत होता भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी.
---- पण आता या तडफडण्याच्या व्याख्येत "अमुक एक देव नीच कसा ?" हे सिद्ध करणारा पुरावा शोधणार्‍याचाही समावेश करावा लागणार असे दिसते.

घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]

असो. चालू दे.

अशोक पाटील

'न'वी बाजू Mon, 12/03/2012 - 23:06

In reply to by अशोक पाटील

पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]

हा प्रकार त्या लाटेतला वाटत नाही. किंचित वेगळा असावा.

तर्कतीर्थमहोदयांचा विरोध सरसकट मूर्तिपूजेला, अथवा 'देवा'च्या अस्तित्वाला असावा, असे वाटत नाही. पूज्य दैवत जोवर आर्य आहे, "ब्राह्मण"* आहे, "नीच"* नाही, अथवा मनुस्मृतीच्या अनुसार निषिद्ध नाही, तोवर त्यात त्यांना काही अडचण दिसते, असे आढळत नाही. त्यांचा विरोध केवळ अनार्य / शूद्र / ब्राह्मणेतर / मनुस्मृतीस अनुसरून त्याज्य दैवतांच्या पूजेस असावा, असे दिसते. (विरोध व्यक्तिगत पातळीवर किंवा कसे, याची कल्पना नाही.)

त्यामुळे, त्यांना मूर्तिभंजकांच्या अथवा नास्तिकांच्या पठडीत बसवता येईल, असे वाटत नाही.


* अवतरणांतील शब्दांचा नेमका (किंवा त्यांना अभिप्रेत असा) अर्थ एक तर ते स्वतःच जाणोत, नाही तर तो एक जगन्नियंताच जाणे.

Nile Tue, 13/03/2012 - 01:42

In reply to by अशोक पाटील

घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य.

या तुलनेशी संपूर्णपणे असहमत आहे. घौरी, गझनी इ. तलवारींच्या बळावर मूर्तीभंजन करणारे कुठे आणि इंटरनेट कुठे!! इंटरनेटवर जितका सो कॉल्ड मूर्तीभंजकांचा वावर आहे तितकाच कट्टर धर्मवाद्यांचाही आहे. (अहो पोप सुद्धा आता बायबलचे वेचे ट्वीट करतोय, आहात कुठे!) इंटरनेट हे फक्त माध्यम आहे. तिथे सर्वप्रकारची माहिती उपलब्ध आहे. जे पूर्वी मूर्तीभंजक होते त्यांना फक्त अजून एक माध्यम मिळालं आहे इतकाच काय तो फरक. जे धर्मांध होते त्यांनाही हे माध्यम तितकंच उपलब्ध आहे. इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही.

दुसर्‍यामुद्दयाबाबत 'न'वी बाजू यांच्याशी सहमत.

अशोक पाटील Tue, 13/03/2012 - 10:31

In reply to by Nile

ओके, फर्गेट इट.

"इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही." ~ या मताबद्दल मात्र १००% सहमत. इंटरनेटमुळे इतकेच समजले की, 'ते' कार्य फक्त मुस्लिमच करतात असे नसून "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" येथील एरव्ही दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा गणपतीसमोर रात्रंदिवस रांगा लावणारे हिंदु एलिटही करतात.... किंवा लेट अस से, करू लागले आहेत. छान प्रगती आहे सांप्रत आपल्या देशाची. कशाला पोपच्या ट्विटींगची चौकशी करायची मग ?

उद्या इंटरनेट कोसळले तरी ज्या कुणाला मूर्तीभंजनाचे कार्य अथक पुढे चालू ठेवायचे आहे ते अन्य माध्यम शोधणारच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 13/03/2012 - 02:09

In reply to by अशोक पाटील

ख्रिस्तोफर कोलंबस तडफडत होता साता समुद्रावर 'इंडिया' नावाच्या देशाचा शोध लावण्यासाठी
सर रिचर्ड बर्टन मक्कामदिनेच्या शोधासाठी तडफडत होते, हजारो मैलाच्या रणरणत्या वाळवंटातून जाताना.
एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे तडफडत होते, एव्हरेस्टवर झेंडा फडकविण्यासाठी.
एडवर्ड जेन्नर रात्रंदिवस तडफडत होता 'देवी' ची लस शोधून काढण्यासाठी.
विवेकानंद तडफडत होते हिंदु धर्मातील बंधुत्वाची शिकवण जगभर जाण्यासाठी.
मिल्खासिंग जीव तोडून धावत होता, तडफडत होता भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी.

हा भाग आवडला.

घोरी वगैरेंची तुलना मूर्तीभंजकांशी केलेली आवडली नाही. मूर्तीभंजन हा काही अगदीच टाकाऊ प्रकार आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी थोडी उदाहरणं दिली पाहिजेत. लहानपणी वाटतं आपले शिक्षक किती महान. पुढे आपणही ग्रॅज्युएशन वगैरे करताना लक्षात येतं की आपल्या शिक्षकांना सगळं माहित असतं असं वाटणं हा आपला खुजेपणा होता. एक-दोन शिक्षकांबद्दल हृद्य आठवणी असतात, आणि ते आता खूप चांगली माणसं म्हणून आठवतात, माहितीचा स्रोत म्हणून नाही. अशीच काहीशी प्रतिक्रिया आईवडलांबाबतही होते. दुसर्‍या बाजूने आपण लहानपणी बुवाला घाबरतो, अंधाराला घाबरतो, याला घाबरतो, त्याला घाबरतो. मोठं होताना अशी सर्व भीती निघून जाते (गेली नाही तर मानसोपचारतज्ञाकडे जाण्याची वेळ येते.) आपण कोणालातरी देव नाहीतर बुवा बनवतो आणि नंतर ते सगळं सामान्य वाटतं. हे आपल्या मनातलं मूर्तीभंजनच नाही का?
मी जेव्हा धर्म बदलून निधर्मी, नास्तिक धर्मात गेले तेव्हा माझ्यात फार फरक पडला असं म्हणणार नाही. पण नव्या धर्मातला कडवेपणा गळला तेव्हा खरं मूर्तीभंजन झालं आणि आता कोणत्याही मूर्तींबद्दल पावित्र्य वगैरे वाटत नाही आणि कोणत्याही बुवाची भीतीही वाटत नाही. मूर्तीभंजन हा शब्द मला अतिशय आवडतो. पण ते तलवारीच्या जागी लेखणी/कीबोर्डमधून होणंच श्रेयस्कर हा मुद्दा मान्य आहे.

मूळ लेखाबद्दलः गणपती तसाही मला फारसा आवडत नाही. विचार करा कोणी सोंड फुटलेला, पोट सुटलेला पुरूष उघडा समोर आला तर कसं वाटेल? पुरूषांचं ठीक आहे हो, लक्ष्मी, सरस्वतींच्या प्रतिमा कशा भारतीय पुरूषांना आवडतील अशा देखण्याच असतात.
भारताचे मूळनिवासी अनार्यच असल्यामुळे गणपती हा मूळचा आणि बाकीचे उच्च देव हे इंपोर्टेड आहेत. राज ठाकरेंनी लोकल विठ्ठलाची भक्ती सुरू करावी आणि राम, कृष्ण या भय्यांच्या देवांची उपासना करू नये अशी एक विनंती. (हे सगळं ह घ्या, घेऊ नका, किंवा कसंही!)

अशोक पाटील Tue, 13/03/2012 - 10:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"मूर्तीभंजन हा काही अगदीच टाकाऊ प्रकार आहे असं मला वाटत नाही"

~ ओके, मग वादच खुंटला. चालू दे.

धनंजय Tue, 13/03/2012 - 21:14

In reply to by अशोक पाटील

वैदिक प्रामाण्य मानून मूर्तिपूजेचा विरोध करणारे दयानंद सरस्वती हे गझनीच्या महंमदाच्या यादीत घातलेले मी कधीच बघितलेले नाहीत. त्याचे कारण असे असावे (आजवर त्याचे कारण शोधण्याचा विचारही मनात आला नाही) की दयानंद सरस्वतींनी स्वतःच्या अनुभवाचे वर्णन केले (पिंडीवरील प्रसाद खाणारा गलिच्छ उंदीर) आणि हिरिरीने - पण धक्काबुक्की न-करता - मूर्तिपूजेचा धिक्कार केला.

दयानंद सरस्वतींबाबत भारतात विशेष अनादर नाही - बराच आदर आहे - याबाबत अशोक पाटील यांचे मत काय आहे?

मी स्वतः वैदिक प्रामाण्य मानणारा नाही, तरी हा लेख मला साधारण दयानंद सरस्वती साच्यातला वाटला. तो तसा न वाटता गझनीच्या महंमदाच्या साच्यातला वाटण्यासारखे लेखात काय दिसले?

अर्थात दयानंद सरस्वती आणि गझनीचा महंमद हे दोघे एकाच साच्यातले आहेत, असे अशोक पाटील मला समजावून सांगू शकतील. ही कल्पना नवीन असल्यामुळे मला समजायला कठिण जाईल, हे आहेच, पण तरी कुतूहल वाटते.

अशोक पाटील Wed, 14/03/2012 - 11:37

In reply to by धनंजय

ज्या धाग्यावरील चर्चेमुळे वैयक्तिक मनःस्ताप होण्याची शक्यता वाटते तिथे मी पुनःप्रवेश करीत नाही (असतो एकेकाचा नेमस्त स्वभाव) तरीही 'धनंजय' सारख्या अभ्यासू सदस्यांनी - ज्यांचे लेखन+प्रतिसाद मी अत्यंत उत्सुकतेने वाचत असतो, त्यांच्या अभ्यासाविषयी आदर असल्याने - माझ्याकडून याबाबतीत काही अपेक्षा थेट आपल्या प्रतिसादात व्यक्त केली असल्याने त्याची बूज राखणे मला निकडीचे वाटते म्हणून हे दोन शब्द.

१. दयानंद सरस्वती यांच्या कार्याविषयी आणि विचाराविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे, विशेषतः "सत्य प्रकाश" वाचल्यानंतर. तुम्ही (पक्षी : धनंजय) वैदिक प्रामाण्य मानणार्‍यापैकी नाही, हरकत नाही. पण म्हणून दयानंद सरस्वती यानी 'अस्पृश्यता मानू नका, सती प्रथा बंद केली पाहिजे, हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण" आदी विषयी दिलेले संदेश अप्रामाण्य मानू शकणार नाही हे तर तुमचा अभ्यास सांगतोच. मी सावरकरांची शिकवण प्रमाण मानतो, पण गाईविषयींची त्यांची मते मला पचविणे जड जाते. दयानंद सरस्वतींचे त्याबद्दलचे मत मान्य होते. म्हणजेच सामाजिक कार्यातील एखादी व्यक्ती आदरणीय वाटली म्हणून ती जशीच्या तशीच स्वीकारली पाहिजे असेही काही नसते. त्याच न्यायाने स्वामींना 'शंकरा' च्या अस्तित्वाविषयी [बालवयात] आलेली शंका त्यानी प्रमाण मानली आणि जो देव आपले अन्न वाचवू शकत नाही तो देव मर्त्य मानवाला काय सहाय्य करणार, म्हणून जर त्यानी मूर्तीपूजा सोडली असली तरी "इन टोटो" त्यानी "ईश्वर" संकल्पना या देशातून हद्दपार होईल अशी भ्रामक समजूत करून घेतली नव्हती. ज्या ज्या ठिकाणी ते व्याख्यान/प्रवचन्/दिशादिग्दर्शनासाठी जात त्या त्या ठिकाणांचे यजमान त्या काळात (१९ व्या शतकात) देवपूजा - म्हणजेच मूर्तीपूजा करीत असणार हे ओघानेच आले, म्हणजे म्हणून आपल्या शिकवणीविरूद्ध यजमान वागतो या कारणास्तव त्यानी त्याच्याकडील अन्नग्रहण केले नाही असे झाल्याचा दाखला नाही. किंबहुना मूर्तीपूजा करणार्‍या एका यजमानाच्या घरचेच अन्न खावून त्याना विषबाधा झाली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला हा इतिहास आहे.

२. गझनी आदी परकीय आक्रमकांचा 'मूर्ती' ला विरोध आणि स्वामीजींचा विरोध यांची तुलना करणे योग्य नाही. मुस्लिम परकियांना हिंदू धर्मच नेस्तनाबूद करायचा असल्याने त्यानी थेट ज्याची पूजा इथे केली जाते त्या "आयडॉल्स" च्या शस्त्रांनी ठिकर्‍या केल्या, तर स्वामीनी मूर्तीपूजा त्याज्य मानली आणि समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानली असल्याने त्यानी अक्षरशः 'मूर्तीभंजन' केले असे नसून हिंदु धर्मातील "अवतार" पुरुष इथे अवतरले होते ते जगाच्या कल्याणासाठी, स्वत:च्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी नव्हे हे लोकांनी लक्षात ठेवावे, त्यांच्या शिकवणीला सामोरे जावे, त्यांना मूर्तीत बद्ध करून पूजा करू नये अशी त्यांची शिकवण असे. यात गैर काही नाही. ईश्वराची पूजा करायची आणि त्याची सर्वधर्मसमभाव ही शिकवण मात्र सोयिस्कररित्या 'उच्चनीचते'च्या कल्पनांना बाजूला ठेवायचे म्हणजे देवाच्या नावाने केलेली भक्ती एकप्रकारे दुष्कर्मच होय असे ते मानत. 'मूर्तीपूजा अमान्य होती' केवळ या साम्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती आणि गझनी मंडळी एकाच साच्यातील होतील असे विधान करणे धार्ष्ट्याचे होईल

खूप लिहिता येईल पण इथे ते अप्रस्तुत होईल, म्हणून थेट धाग्यातील विषयाकडे येतो.
३. धागाकर्ते जे कुणी तर्कतीर्थ [उर्फ युयुत्सु उर्फ राजीव उपाध्ये] आहेत; त्यांच्या लेखातील विचारामुळे तुम्हाला थेट स्वामी दयानंद सरस्वती स्मरले याचे मला सखेद आश्चर्य वाटते, धनंजय जी. अर्थात तसे तुम्हाला का वाटले याचे स्पष्टीकरण मागण्याचा मला घटनात्मक असला तरी कोणताही नैतिक अधिकार बिलकुल नाही, कारण तुमचे ते मत वैयक्तिक आहे. पण स्वामींच्या शिकवणीच्या पटलावर श्री.तर्कतीर्थ यांचे याबाबतीतील [मूर्तीपूजा] वर्तन/विचार दुटप्पीपणाच आहेत हे वाचणार्‍याला समजून येईल. त्यानी 'गणपती' ला घरातून हद्दपार का केले आहे ? तर तो 'देव' आहे हे मान्य असले तरी गणपती आमचा [पक्षी : सो कॉल्ड आर्य तर्कतीर्थ यांचा] नसून तो 'अनार्यां' चा असल्याने त्याला जे भजतील ते साहजिकच शूद्र ठरतात. एकीकडे हे गणपतीला बाहेर काढणार [एकदोन पुस्तके वाचून] आणि दुसरीकडे ब्रह्मा-विष्णू-महेश हे बिग बॉस 'आर्य' आहेत म्हणून रात्रदिवस त्यांच्यासमोर काकडआरतीची गाज घालणार. "देवाला माना किंवा मानू नका" यापैकी एक विचारसरणी योग्य, पण देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे आणि संस्थळावर तिचे जाहीर प्रकटन करायचे याला जर संस्थळ चालक 'विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती' मानून लेखातील विचार "रोचक" आहे असे म्हणत असतील तर पुढील युक्तीवादाचे दरवाजे बंदच राहणार.

अशोक पाटील

श्रावण मोडक Wed, 14/03/2012 - 12:52

In reply to by अशोक पाटील

अशोकराव, वर एके ठिकाणी तर्कतीर्थांनी लिहिलं आहे की, 'गणपती हद्दपार झाला, त्यानंतर त्यांच्याकडे आता देवच नाही.' त्यामुळं "ब्रह्मा, विष्णू, महेश" वगैरेपर्यंत विषय जात नाही. तर्कतीर्थांचा तो मुद्दा मांडणीतून सुटू नये. एक प्रकारे ते देवाचं अस्तित्त्व नाकारताहेत का, इथं हा विषय आता गेला पाहिजे. अर्थात, याचा आग्रह नाही. मला चर्चेची ती एक दिशा दिसली इतकेच.

अशोक पाटील Wed, 14/03/2012 - 15:03

In reply to by श्रावण मोडक

श्रावण जी....

मी तर्कतीर्थांच्या मूळ लेखातील त्यांच्या खालील कबुलींकडे लक्ष वेधू इच्छितो (डार्क ठशातील वाक्य तर्कतीर्थ यांची)

१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची.
// याचा अर्थ त्यांच्य देव्हार्‍यात गणपती तर होतेच, शिवाय ते उच्च दर्जाचे तीन (किंवा त्यापैकी किमान एक) देवही होतेच. त्याचा ते इन्कार करीत नाही.
२. "सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही.
// म्हणजे 'गणपती' नीच आहे हे ठसविण्यासाठी बाकीचे देव उच्च आहेत हे सांगणे याचा अर्थ ते देवाचे अस्तित्व नाकारत तर नाहीतच, उलटपक्षी ते आहेतच पण त्यांची पंगत वेगळी मांडतात हे ओघानेच आले.
३. "हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे."
// ~ ठीक आहे. इथे दाखले अनेक धर्मग्रंथांचे आहेत असे ते म्हणतात म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे. जर ते हा वेद मानतात म्हणजे याच ऋग्वेदात 'विष्णू' या देवतेला पराकाष्ठेचे महत्व आहे. विष्णू आला की क्रमाने 'सूर्या' या शक्तीला मानणे आलेच. सौर वर्षांच्या ३६० दिवसांच्या उल्लेखात ऋतुदर्शक चार नावानी आपल्या दिनदर्शक घोड्यांना विष्णू गती देतो असे म्हटले आहे म्हणजे ती 'देवाची करणी' मानणे आलेच. याचाच अर्थ तर्कतीर्थांच्या मनी आणि वसनी 'विष्णू' ला आर्य मानून वंदन करणे आलेच.
४. "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे."
~~ हे लेखातील शेवटचे वाक्य. इथे 'सर्व देवदेवताना मी केव्हाच हद्दपार केले आहे' अशी स्पष्टोक्ती असती तर मग त्यांच्या लेखाचा रोख अन्य देवतांकडेही जातो असे म्हटले गेले असते. मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्याला कारणही तो 'अनार्यां' चा देव आहे असे अनेक पंडितांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांच्या लक्षात आले. तेही तर्कतीर्थांचे बी.ए. पूर्ण झाल्यानंतर तब्बल वीस वर्षानी.

अशोक पाटील

श्रावण मोडक Wed, 14/03/2012 - 15:33

In reply to by अशोक पाटील

तुमचा संदर्भ - मूळ लेख.
माझा संदर्भ - मूळ लेखानंतरचा प्रतिसाद.
स्वाभाविकच तुमची वरील मते माझ्या प्रतिसादासंदर्भात भिन्न आहेत. त्यांचे वेगळे स्थान आहे. त्यावर मी मते व्यक्त करत नाही. तर्कतीर्थ उत्तरं देतील.
तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांसारखेच मुद्दे इतरांनीही उपस्थित केलेले दिसतात या धाग्यावर.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 17:39

In reply to by अशोक पाटील

१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची." या माझ्या आईच्या विधानावरून "याचा अर्थ त्यांच्य देव्हार्‍यात गणपती तर होतेच" हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का? वस्तुस्थिती अशी आमच्या देव्हा-यात फक्त ३ देव होते. १ अन्नपूर्णा २ बाळकृष्ण आणि कुलदेवता योगेश्वरी. या सर्वांची कधी कुणि पूजा केल्याचे आठवत नाही. यांची हकालपट्टी झाली देवावरचा विश्वास उडाला तेव्हा.

नंतर गणपती परत काही काळ घरात आला तो केवळ माझ्या कन्येच्या हट्टामुळे. पण त्याची कधी पूजा झालेली नाही.

२. माझी आई गणपतीला विघ्नकर्ता मानत असताना त्याला देव्हा-यात स्थान देईलच कसे. माझी गणेशभक्ती चालायची ती कुणीतरी भेट दिलेल्या गणेश प्रतिमेला घेऊन आणि ही प्रतिमा देव्हा-यात नव्हती तर माझ्या अभ्यासाच्या ठिकाणी होती.

३. " म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे."- हा निष्कर्ष मला अत्यंत हास्यास्पद वाटतो.

४. " मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे" - गणपतीच्या हद्दपारीचे आणि इतर देवांच्या हद्दपारीची कारणे वेगळी आहेत (आपली निष्कर्ष काढायची पद्धत बघता त्याबद्दल न बोललेले बरे). गणपतीची हद्दपारी त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे झाली. हे परत सांगू इच्छितो.

अशोक पाटील Wed, 14/03/2012 - 18:47

In reply to by तर्कतीर्थ

१. "हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का?"
~ याला उत्तर म्हणजे परत मला तुमच्याच लेखाचा आधार घेतला पाहिजे : (अ) "लहानपणी मी गणपतीभक्त होतो." व (२) "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे." ~ ही ती दोन वाक्ये. दोन्हीवरून निदान माझातरी (इतरांचा झाला असेल वा नसेल, वा होऊही शकणार नाही) समज असा झाला की, ज्या गणपतीला श्री.तर्कतीर्थ यानी 'आता हद्दपार केले' तो त्यांच्या घरी होताच होता.
३. ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष ~ जी व्यक्ती मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांचे दाखले देते, म्हणजे तिने वेदांचा काही प्रमाणावर का होईना अभ्यास केला असणार असे साधे तर्कशास्त्र मी माझ्यापुरते केले. हा निष्कर्ष तुम्हाला हास्यास्पद वाटला असेल तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. माझी कल्पना तुमच्या वाचन व्यासंगाबद्दलची होती, ती तुम्हालाच मान्य नाही म्हणजे ती हास्यास्पद कशी होईल ?

निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते.
असो. या विषयावर अधिकची चर्चा न वाढविणे हे उत्तम.

धन्यवाद
अशोक पाटील

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 19:23

In reply to by अशोक पाटील

याचा अर्थ तुम्ही सोयीची वाक्ये उचलून सोयीचे निष्कर्ष काढता, असं दिसतंय. कारण अधली मधली वाक्य तुम्हाला गैरसोयीची ठरत होती... असो जाउ दे.

ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष - एखादी गोष्ट अभ्यासणे म्हणजे ती मानायलाच हवी का? मी कुराण अभ्यासतो म्हणजे मी कुराण "मानतो" असा अर्थ काढता येईल का?

बाकी तुमच्या "निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते." या मताबद्दल बाकीच्यांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

'न'वी बाजू Mon, 12/03/2012 - 21:45

ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली.

त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत.

त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे. गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.

मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.

अच्छा. म्हणजे गणपती ही अनार्यदेवता आहे, "ब्राह्मण" (म्हणजे काय, कोण जाणे!) नाही, शूद्र आहे, तसेच मनुस्मृतीने त्याज्य ठरवलेली आहे, म्हणून आपण गणपतीस चाट दिलेली आहे तर.

रोचक!

अशोक पाटील Tue, 13/03/2012 - 10:44

In reply to by 'न'वी बाजू

बरे झाले. निदान या निमित्ताने तरी ज्ञानात भर पडली की देवगणांतही चातुर्वण्य सिस्टिम असल्याचे आमच्यातील कुणी ज्ञानीपंडितांनी नोंदविले आहे. आता उद्या देवघरात स्थापित करण्यासाठी देवासाठींची परसेन्टेजवाईज रीझर्व्हेशन पॉलिसीही (याच संस्थळावर) मिळू शकेल. त्यानुसार छाप विकत घेऊन आणण्याचा विचार सुरू होईल.

'न'वी बाजू Tue, 13/03/2012 - 16:37

In reply to by अशोक पाटील

कुठले रिझर्वेशन?

उलट अनार्य/"शूद्र" देवतांना देवघरात अजिबात जागा असू नये, असेच तर मत मांडून राहिलेत ते.

याच संस्थळावर

यात संस्थळाचा काही हात असण्याबद्दल साशंक आहे. संबंधितांनी योग्य तो खुलासा करावाच.

सन्जोप राव Tue, 13/03/2012 - 06:34

या विषयावरची साधकबाधक चर्चा आवडली. आता ही चर्चा पुण्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत पोचवता येईल का याचा विचार करतो आहे.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 12:58

श्री अशोक पाटील यांस,

मी गणपतीला घराबाहेर काढला तो विघ्नकर्ता आहे याचे पुरावे मिळाले म्हणून. शूद्र देवता आहे म्हणून नव्हे. माझ्या लिखाणातून हे स्पष्ट होत नसल्यास दिलगिरी व्यक्त करून परत खुलासा करतो.

आपल्या समाजाला वस्तूस्थिती पचवायला जड का जाते हे कळत नाही.

- तर्कतीर्थ

मी Wed, 14/03/2012 - 13:37

In reply to by तर्कतीर्थ

विघ्नकर्ता असल्याची प्रचिती तुम्हाला आली का? की प्रचितीविरुद्ध तुम्ही माहितीवर विश्वास ठेवला?

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 13:45

In reply to by मी

हो. जेव्हा गणपतीच्या भक्तीमध्ये बुडालो होतो तेव्हा अनेक विघ्ने गणपतीने दूर केली नव्हती... आता जास्त तपशील आठवत नाही कारण ३५ पेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत.

मी Wed, 14/03/2012 - 14:08

In reply to by तर्कतीर्थ

ह्यावरून तो विघ्नकर्ता/विघ्नहर्ता आहे असे म्हणता येणार नाही, पण विसंगती अशी की तो विघ्नकर्ता/नीच आहे हे मान्य करताना "तो आहे" हे मान्य करावे लागते.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 14:35

In reply to by मी

" पण विसंगती अशी की तो विघ्नकर्ता/नीच आहे हे मान्य करताना "तो आहे" हे मान्य करावे लागते."

समूहमनाच्या पातळीवर तो नक्कीच आहे. वैयक्तिक पातळीवर मात्र तो होता आणि आता तो नक्की नाही.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 13:04

" देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे " इत्यादि...

अशोकराव,

देवदेवता मधले भेदाभेद कितीही कटु असले तरी ते आहेत आणि राहणार आहेत. दैवतशास्त्राचा, भाबडेपणा सोडून जर साधा परिचय (अभ्यास अपेक्षित नाही) जरी करून घेतलात तरी ते तुम्हाला पटेल, याची मला खात्री आहे.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 13:27

अशोक राव,

" देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे " तुम्हाला खटकले हे मी समजू शकतो. पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते. या भांडणांचे काय करायचे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपतीचा बालाजी आणि कोल्हापूरची अंबाबाई. दोघांनी एकमेकांना "सोडून" दिल्याचे ऐकले आहे...

मला सतावणारा खरा प्रश्न वेगळाच आहे. एका शूद्रदेवतेचे गणपतीचे "ब्राहमणिकरण" झाले. ( त्यामूळे त्याला भजणारे शूद्र असा युक्तीवाद मी कधिच करणार नाही).पण लायक शूद्रांच्या ब्राह्मणिकरणात मात्र खंड पडला, त्याचे मात्र वाईट वाटते.

" लायक शूद्राना जानवी वाटा " असे मी ब्राह्मणांना आवर्जून सांगत असतो ...

- तर्कतीर्थ

श्रावण मोडक Wed, 14/03/2012 - 13:49

In reply to by तर्कतीर्थ

" लायक शूद्राना जानवी वाटा " असे मी ब्राह्मणांना आवर्जून सांगत असतो ...

यामागच्या भूमिकेशी तत्वतः सहमत (तत्वतः, कारण जानव्यात काही दडलेलं नाही. ते एक निरर्थक लक्षण आहे). त्याचाच वेगळा अर्थ घेत, "नालायक ब्राह्मणांची जानवी काढून घ्या" असे म्हणता येते. म्हणजे, मी म्हणेन!

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 14:03

In reply to by श्रावण मोडक

" त्याचाच वेगळा अर्थ घेत, "नालायक ब्राह्मणांची जानवी काढून घ्या" असे म्हणता येते. म्हणजे, मी म्हणेन!"

:)

-तर्कतीर्थ

मी Wed, 14/03/2012 - 14:12

In reply to by श्रावण मोडक

तत्वतः सहमत.
पण
वरील विधानामागे "ब्राह्मण=उच्च" हे समिकरण/गृहितक आहे काय?

श्रावण मोडक Wed, 14/03/2012 - 14:18

In reply to by मी

शंका रास्त. तोच त्यातला पेच आहे. मी फक्त जानव्यापुरतं लक्ष केंद्रित करतोय. म्हणून तत्वतः एकाला जानवं दिल्यानं तो उच्च होणार असेल तर दुसऱ्याचं काढून घेतल्यावर तो नीच झाला पाहिजे. एरवी, ही उच्चनीचता मला मंजूर नाही.

अशोक पाटील Wed, 14/03/2012 - 15:38

In reply to by तर्कतीर्थ

".....पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते...."

श्री.तर्कतीर्थ
~ फक्त वरील मुद्यापुरते लिहितो. मी वयाने कदाचित तुम्हाला ज्येष्ठ्य आहे. ज्या डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या पुस्तकाचा तुम्ही आपल्या लेखात उल्लेख केला आहे, ते ढेरे तसेच गाडगीळ आणि तुम्ही ज्या नावाचा आयडी तयार केला आहे ते आद्य 'तर्कतीर्थ' कै. लक्ष्मणशास्त्री जोशी या विषयात ज्याना गुरू मानत त्या अ‍ॅण्ड्र्यू लँग, फ्रेझर, मॅक्सम्यूलर, जॉर्डन अशा प्रकांडपंडितांचे धर्मविषयक साहित्य मी वाचलेले आहे. तुमच्या व्याख्येप्रमाणे जे उच्च देव आहेत आणि ज्याना नीचत्व दिले गेले आहे अशा प्रत्येक देवदेवतांविषयी तसेच दानवांविषयी मी स्वतंत्रपणे लिहू बोलू शकतो, ग्रीक मायथॉलॉजी, ख्रिस्त आणि इस्लाम यांच्याविषयीही मी लिहू/बोलू शकतो, इतकेच नम्रपणे सांगू इच्छितो.

जालावरील लेखनाच्यावेळी आपल्याला दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया येणार हे लेखकाने लेख टाकण्यापूर्वीच गृहित धरणे आवश्यक आहे. लेखाबाबत जे उजव्या बाजूने मत मांडतात त्यांचा अभ्यास थोर आणि जे डावी बाजू पुढे आणतात त्याना/त्यांचा कसलाच अभ्यास नाही असे साध्य मांडणे योग्य नव्हे. आपले काम प्रतिसादकाचा मुद्दा खोडून काढणे आहे, दुसर्‍याचा मुद्दा गैर ठरविताना त्याची कसलीच त्या संदर्भातील साधना नाही असे समजणे गैर आहे.

असो.
अशोक पाटील

चिंतातुर जंतू Wed, 14/03/2012 - 14:52

>>गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

अलीकडच्या काळात गणपतीचा उलटा प्रवास झाला असे ऐकून आहे:

पेशव्यांच्या गणपतीभक्तीमुळे गणपतीला मराठी ब्राह्मण समाजात प्रतिष्ठा मिळाली. ब्राह्मणेतर समाजात गणपतीची पूजा नसे. त्या काळी महाराष्ट्रात गणपतीला विद्येची म्हणजे ब्राह्मणांची देवता समजले जाऊ लागले. टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला तेव्हा गणपतीचे सार्वत्रिकीकरण केले. म्हणून अनेक ब्राह्मणेतरांकडे गणपती पूजला जाऊ लागला.

हे खरे असेल तर गणपतीने दुसरे वर्तुळ पूर्ण केले (अनार्य किंवा नीच -> ब्राह्मण किंवा उच्च -> सर्वसमावेशक) असेही म्हणता येईल. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

अशोक पाटील Wed, 14/03/2012 - 15:12

In reply to by चिंतातुर जंतू

".....म्हणून अनेक ब्राह्मणेतरांकडे गणपती पूजला जाऊ लागला..."

~ म्हणून ब्राह्मणसमाज धुरिंधरांनी 'गणपती' नीच देवता आहे आणि तो शूद्र पूजतात म्हणून आपण त्याला [जरी बळवंतरावांनी तो पुजण्यास सांगितले होते तरी....] त्याज्य देवता मानू या असा ठराव पसार केला होता असे मानावे का ?

अशोक पाटील

मन Wed, 14/03/2012 - 17:40

In reply to by चिंतातुर जंतू

ह्यालाच स्पाघेत्ती म्हणतोय मी.
अनेकानेक प्रवाह असे काही मिसळून जातात की झेब्राच्या अंगावरचे पट्टे.
आजही झेब्र्याच्या काळ्या अंगावर पांढरे पट्ते आहेत की पांढर्‍या अंगावर काळे पट्टे आहेत हे समजलेले नाही.

चिंतातुर जंतू Wed, 14/03/2012 - 15:31

>>म्हणून ब्राह्मणसमाज धुरिंधरांनी 'गणपती' नीच देवता आहे आणि तो शूद्र पूजतात म्हणून आपण त्याला [जरी बळवंतरावांनी तो पुजण्यास सांगितले होते तरी....] त्याज्य देवता मानू या असा ठराव पसार केला होता असे मानावे का ?

शक्यता नाकारता येत नाही. आजतागायत कुणा सश्रद्ध ब्राह्मणाघरी या कारणामुळे गणपतीपूजा थांबली असे मी तरी ऐकलेले नाही. प्रस्तुत धागालेखकांची आई माझ्या ऐकीव किंवा प्रत्यक्ष अनुभवात असे म्हणणारी पहिलीच. अर्थात यात काही पोटजातींतला अंतर्संघर्ष असल्यास कल्पना नाही - म्हणजे 'कोंकणस्थ पेशव्यांची इष्टदेवता ही नीचांचीच देवता असणार, कारण मुळात कोंकणस्थच नीच', वगैरे. असो.

तर्कतीर्थ Wed, 14/03/2012 - 19:15

आजतागायत कुणा सश्रद्ध ब्राह्मणाघरी या कारणामुळे गणपतीपूजा थांबली असे मी तरी ऐकलेले नाही.

माझा लेख वाचून डोंबिविलीच्या एका ब्राह्मण गृहस्थानी गणपतीला घरातून हद्दपार केल्याचे कळवले. आणखी कुणी कळवले तर इथे जरूर सांगेन. बाकी तुम्ही याला कोकणस्थ/कोकणस्थेतर असा रंग द्यायचा प्रयत्न का करत आहात? मी वर उल्लेखिलेली दोन नावे चित्पावनच आहेत.

चिंतातुर जंतू Wed, 14/03/2012 - 20:19

In reply to by तर्कतीर्थ

>>बाकी तुम्ही याला कोकणस्थ/कोकणस्थेतर असा रंग द्यायचा प्रयत्न का करत आहात? मी वर उल्लेखिलेली दोन नावे चित्पावनच आहेत.

मला कसलाच रंग द्यायचा नाही आहे. मी फक्त मला अपरिचित असं काही वास्तव आहे का, ते शोधायचा प्रयत्न करतोय.

>>माझा लेख वाचून डोंबिविलीच्या एका ब्राह्मण गृहस्थानी गणपतीला घरातून हद्दपार केल्याचे कळवले. आणखी कुणी कळवले तर इथे जरूर सांगेन.

त्यापेक्षा मला तुमच्या आईच्या किंवा आधीच्या पिढीत अशी काही परंपरा असेल तर ती शोधायची आहे. कारण मी हे आजवर कधीच ऐकलेलं नाही.

मन Mon, 19/03/2012 - 11:16

In reply to by तर्कतीर्थ

आता मात्र देवतेच्या हद्दपारिचा विचार गलिच्छ वाटतोय.
म्हणजे मूर्तीपूजेलाच कुणाचा विरोध असेल तर ठिक आहे, समजू शकतो. कुणी प्रामाणिकपणे नास्तिक असेल, कुणी अज्ञेयवादी असेल तर समजू शकतो. पण केवळ "गणपती"ह्या देवतेला हद्दपार करा असे म्हणत असाल तर मात्र नक्की काय म्हणणे आहे ते समजले नाही.

गणपा Wed, 14/03/2012 - 20:42

माझा लेख वाचून डोंबिविलीच्या एका ब्राह्मण गृहस्थानी गणपतीला घरातून हद्दपार केल्याचे कळवले.

आता घर एख्याद्याच्या मालकीच असलं तर त्यात कुणाला ठेवायच कुणाला हद्दपार करायच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तुम्ही वा त्या डोंबिवीलीकराने 'तुमच्या' घरातुन गणपतीला काढलेत ठिक आहे.
प्रभादेवीच्या देवळातुन सिद्धीविनायकाला काढून दाखवा बर. :)

स्नेहांकिता Sat, 17/03/2012 - 16:27

हिन्दू देवता ही प्रतीके आहेत. मारुती शक्तीचे, गणपती बुद्धीचे. गणपती घरातून हद्द्पार केलात तसे बुद्धीला डोक्यातून हद्दपार करा बरं...!

तर्कतीर्थ Sat, 24/03/2012 - 08:41

कालच काश्मिरमध्ये असलेल्या एका महाराष्ट्रीयन गृहस्थानी माझा गणपतीवरचा लेख वाचून त्याला घरातून रजा दिल्याचे फोन करून कळवले.

तिरशिंगराव Sat, 24/03/2012 - 19:33

कोणी कोणाला स्वतःच्या घरातून हद्दपार करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आजच्या युगांत, बहुतांशी लोकांनी, आपापल्या मनातून माणुसकीलाच हद्दपार केल्याचे जाणवते, त्याचे फार दु:ख आहे.

धनंजय Sat, 24/03/2012 - 21:45

माझ्या शो-केसमध्ये वेगवेगळ्या नातेवाइकांनी आणि मित्रांनी भेट दिलेल्या तीन गणपतीच्या मूर्ती आहेत.

प्रत्येक वेळी दिलेली भेट मी आनंदाने स्वीकारली. आणि प्रदर्शितही करतो.

आतिवास Sat, 24/03/2012 - 22:02

खर तर लेखाच शीर्षक बदलून ते 'गणपती हटाव' किंवा तत्सम काहीतरी हवं असं 'लेख वाचून अमक्याने गणपती हटवला, तमक्याने हटवला' हे वाचून वाटायला लागलं आहे.

शूरशिपाई Mon, 26/03/2012 - 00:00

गणेश हा देव नाही किंवा नीच देवता आहे वगैरे मतांशी असहमत. उलट, गणेश हा देव सर्व देवांचा अधिपती आहे, सृष्टीरचैता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारक महेश यांनी वेळोवेळी श्रीगणेशाची आराधना केली आहे.
परंतु गणेश जन्माविषयीच्या ज्या कथा आहेत उदा. पार्वतीची अंघोळ, ह्त्तीचे शीर वगैरे त्या सगळ्या अयोग्य समजूती (आख्यायिका) आहेत.
गणेशाचे तत्वज्ञान सार्थ रितीने सांगू शकणारे गणेश तत्वज्ञान पंडित म्हणजे गजानन मनोहर पुंडशास्त्री.त्यांनी आपले आयुष्य गणेश चिंतनालाच समर्पित केले. त्यांनी आणि त्यांचे शिष्य प्रा. स्वानंद पुंड यांनी २१ ग्रंथांची "श्री गणेशोपासना ग्रंथमालिका लिहिली. (प्रकाशन : संजना प्रकाशन, मुंबई) या ग्रंथमालिकेत गणेशाविषयीच्या अनेक समजुतींचे अर्थ संदर्भासकट समजतात.
हे २१ ग्रंथ पुढीलप्रमाणे :
१)श्री गणेशोपासना
२)सर्वपूज्य गणराज
३)श्रीगणराज युगावतार
४)श्रीमुद्गल पुराणोक्त अष्टविनायक
५)श्रीसत्यविनायक
६)श्रीगणेश अवतार लीला
७)श्रीगणेशगुरूपरंपरा
८)श्रीगणेश संप्रदाय
९)श्रीगणेश योगींद्राचार्य - यांचे तर गणेशाविषयीचे प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यांनी श्रीक्षेत्र मोरगावला समाधी घेतली. त्यांची गणेश गीता प्रसिध्द आहे. त्यांनी गणेशाचा अर्थ श्रीगणेश विजय नावाच्या ग्रंथातून स्पष्ट केला आहे
१०)श्री अंकुशधारी योगींद्र
११)श्री मयुरेश्वर क्षेत्रवर्णन
१२)श्री गणेशपुराण उपासना खंड
१३)श्री गणेशपुराण क्रीडा खंड
१४)श्री गणेश गीता
१५)श्री गणेश सहस्त्रनाम
१६) श्रीगणेश अथर्वशीर्ष
१७)संतस्तुत गणराज
१८)गाणपत्य आरती संग्रह
१९) गाणपत्य स्तोत्र संग्रह
२०)गाणपत्य दिनचर्या
२१) गाणपत्य व्रतावली

लेखक :- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यातील काही ग्रंथ माझ्याकडे आहेत, खालील पत्त्यावर ते नक्कीच उपलब्ध होतील-
संजय वेंगुर्लेकर, संजना प्रकाशन, मीठ बंदर रोड ठाणे पूर्व.

आता यातील माहितीनुसार श्रीगणेश शिवपुत्र नसून परब्रह्म आहे, आणि ओम् कार हेच त्याचे निर्गुण रूप आहे. गणेशाने प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत. भगवान शंकरासहित अनेक देवतांनी गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडच्या संतांनी सुध्दा गणेशाची स्तुती केली आहे, ती निराकार ओमकार स्वरूप गणेशाची स्तुती आहे, शिवपुत्र गणेशाची नव्हे. "सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी....निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना" इति समर्थ रामदास हे उदाहरण पुरेसे आहे.

कविता Mon, 26/03/2012 - 15:19

ओह जीझस्स............. :(
काय वाचतेय मी हे??
बाकी मोदक दुसर्‍या कुणाला चालतात का कुणी सांगेल का प्लीज? ;)

कविता Mon, 26/03/2012 - 20:43

In reply to by Nile

आपणदेखिल विघ्नकर्ता नाही, याचा काही पुरावा कुठे आहे का?
उगाच कशाला मोदक वाया घालवायचे?
तुम्ही नवसाला पावू शकता का?
तुम्ही निदान स्वेटर तरी घालता का?
अशी थट्टा करु नका भाबड्या जीवाची! ;)

Nile Mon, 26/03/2012 - 20:52

In reply to by कविता

मी विघ्नहर्ता नाही (उलट विघ्नकर्ता आहे असे इथले अनेक जण म्हणतात), खरे खोटे त्या नीळकंठालाच माहीत ;-)

मोदक वाया जाणार नाहीत याची खात्री आम्ही देऊ, आहे काय आणि नाही काय!!

हो,तर! मी नवसाला पावतो, नवसाचा नैवैद्य व्यनीने कळवू का? ;-)

स्वेटर, जॅकेट आणि अगदीच हुडहुडी भरली तर हुडी सुद्धा घालतो!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/03/2012 - 20:59

In reply to by Nile

कलियुगात निळ्याला आम्ही सर्वद्वेष्टा म्हणतात.*

*व्याकरणासाठी श्रेयअव्हेर - 'असा मी असामी', ले. श्री. पु. ल. देशपांडे.

चिंतातुर जंतू Tue, 27/03/2012 - 19:53

In reply to by Nile

मोदकांचं माहीत नाही पण मोडक आम्हाला चालतात. तसे ते वाया गेलेत म्हणा, पण आम्हाला ते पावतात. कुठल्याही कथा-पुराणांपेक्षा प्रत्यक्ष प्रचिती आहे. घेऊन पाहा. ;-)

बिपिन कार्यकर्ते Mon, 26/03/2012 - 17:02

कथा पुराणं वाचून भक्तीबिक्ती करणार्‍यांना माझ दंडवत. आणि कथा पुराणं वाचून भक्तीबिक्तीच्या नादातून बाहेर पडणार्‍यांना त्याहून मोठा दंडवत.

चिंतातुर जंतू Mon, 26/03/2012 - 18:59

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>कथा पुराणं वाचून भक्तीबिक्ती करणार्‍यांना माझ दंडवत. आणि कथा पुराणं वाचून भक्तीबिक्तीच्या नादातून बाहेर पडणार्‍यांना त्याहून मोठा दंडवत.

कथा पुराणं हा आपल्या महान, पुरातन संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. त्याचं महत्त्व नाकारणार्‍या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/03/2012 - 21:06

In reply to by चिंतातुर जंतू

एकेकाळी (ग्रीक आणि भारतीय) कथा पुराणांमधल्या तारकासमूहांशी संबंधित गोष्टी ऐकताना "या बाईलवेड्या/थडकी पुरूष/स्त्रियांना पुराणांमधे कोणी जागा दिली" असा प्रश्न पडत असे.

'मोठं झाल्या'नंतरही "आजकालची पिढी फार वाया गेली आहे" वगैरे ऐकवून कोणी नैतिकता शिकवायला लागलं की या स्टोर्‍या तोंडावर मारायला उपयोगी पडतात.

तर्कतीर्थ Mon, 26/03/2012 - 21:52

माझ्या गणपतीवरील लेखाला सतीश लळीत, जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची खालील प्रतिक्रिया आली -

[...] आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि त्यांची मांडणी छान वाटली. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. आत्ता थोडा घाईत आहे. गणपती या तथाकथित वैदिक/आर्य दैवताविषयी दिलेली माहिती अचुक आहे. गाणपत्य संप्रदायाबद्दल असल्याला काही माहिती आहे का? महाराष्ट्रात जे अष्टविनायक नावाचे थोतांड आणि स्तोम आहे, ते सर्व गणपती, म्हणजे मुर्त्या या तंत्र गणपतीच्या आहेत. (तांत्रिक पंथातील)(पण यांच्या मते स्वयंभू). खरेतर जो गणपती आज घरोघर पुजतात, तो आणि हे अष्टविनायक यांचा काहीच संबंध नाही. असो. तुमचा ब्लॉग आता वरचेवर बघत जाईन. शुभेच्छा...

शूरशिपाई Mon, 26/03/2012 - 23:28

In reply to by तर्कतीर्थ

माणसाच्या अंतरंगात अष्टविकार असतात. त्यांना मारणारे ते अष्टविनायक. प्रतिकात्मक अष्टविनायक आपण महाराष्ट्रात मानत असलो तरी अष्टविनायक भारताच्या चहूदिशांना विखूरलेले आहेत. (ज्योतिर्लिंगाप्रमाणे) फक्त मोरगावचा मयुरेश्वर या आठ स्थानांमध्ये येतो.

धनंजय Tue, 27/03/2012 - 19:45

In reply to by तर्कतीर्थ

जर श्री. लळीत यांना त्यांच्या हुद्द्याचा उल्लेख अमान्य नसेल, आणि सदस्य "तर्कतीर्थ" यांनी विनंती केली, तर ऐसी अक्षरे संपादकांनी तो उल्लेख काढून टाकावा.

अर्थात कोणीही कुठल्याही अधिकार्‍याच्या वैयक्तिक मतांबद्दल काहीही लिहू शकतो. अधिकृत घोषणा नसेल, तर खरे-खोटे काहीच नाही. असा कोणी अधिकारी आहे तरी मला कुठे ठाऊक आहे? ललित वाङ्मयात तर खरे-खोटे असा विचार होत नाही. तर ऐसी अक्षरेने संपादन न-केले तरी ललित अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वाखाली आधार आहे.

ऐसीअक्षरे Tue, 27/03/2012 - 19:59

In reply to by धनंजय

श्री. तर्कतीर्थ यांची या संदर्भातली सूचना आमच्यातर्फे आलेली नाही. त्यांची हरकत नसेल तर पदासंदर्भातला भाग संपादित करायला ऐसीअक्षरेची कसलीच हरकत नाही. श्री. तर्कतीर्थ यांनी या धाग्यावर वा अन्यत्र तसे सांगावे. लगेच कारवाई केली जाईल.

तर्कतीर्थ Wed, 28/03/2012 - 09:32

In reply to by ऐसीअक्षरे

श्री लळीत यांच्या हुद्दयाचा उल्लेख गैरसमजास आमंत्रण देईल असे लक्षात आल्याने मी तो डिस्क्लेमर टाकला. हुद्याचा उल्लेख संपादकानी काढून टाकल्यास माझी हरकत नाही.

श्रावण मोडक Wed, 28/03/2012 - 09:36

In reply to by ऐसीअक्षरे

सतीश लळीत यांचे मत वैयक्तिक आहे हे ठीक. त्यामुळं त्यांच्या पदाचा उल्लेख या प्रतिसादात येऊ नये, हेही समजू शकते. पण सतीश लळीत यांनी तर्कतीर्थांच्या ब्लॉगवर प्रतिसाद देताना निव्वळ 'सतीश लळीत' असा दिला आहे की, 'सतीश लळीत, ----, महाराष्ट्र (किंवा कोणतेही)­ शासन' असा दिला आहे?