विश्ववाची उत्पत्ती - प्रश्न
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरू झाले असा सिद्धांत आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्यासाठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी वा मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरू झाली. आता वेळ ही आपल्यासाठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस - अवकाश लागत असेल तर ती स्पेस - अवकाश आलं कोठून.
बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली?
कोणी वैज्ञानिक निरूपण करू शकेल का ह्या प्रश्नाचे.
"वेळेच्या आधी" असं काही नसतं
"वेळेच्या आधी" असं काही नसतं. हा डायलोग मारत्ये असं वाटेल, पण तसं नाहीये. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, महास्फोट झाला तेव्हा काळ सुरू झाला. त्याच्या आधी ही संकल्पना भौतिकशास्त्रात नाही.
एनर्जी वा मॅटरच्या आधी काहीही नव्हतं. कारण त्याआधी हा प्रकारच नाही.
वर अदिती म्हणते तेच मलाही
वर अदिती म्हणते तेच मलाही माहिती आहे.
महास्फोट मानत असलात तर 'त्या आधी' हा प्रश्न चूक आहे.
---
स्थिर/स्थिरवत स्थितीचा वगैरे सिद्धांत मानत असाल तर त्याआधी काहीतरी असावं - पण ही मॉडेल्स आता विश्वासार्ह मानत नाही कुणी.
----
मला विचाराल तर बिगबँग असो किंवा आणखी काही -त्याआधी होते फक्त मोदीच.
रास्त प्रश्न
आपल्या प्रश्नावरून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आठवण झाली. आठवण्यास कारण की, त्यांनी आस्तिक-नास्तिक विषयावर चर्चा करताना एके ठिकाणी (बहुतेक ‛यक्षप्रश्ना’त) मांडलंय, की ‛धरण किंवा घर बांधल्याशिवाय उभे राहील काय? वस्त्र विणल्याशिवाय निर्माण होईल काय? मूर्ती घडविल्याशिवाय अस्तित्वात येईल काय? तो अज्ञाताचा, अनंताचा हात हेच भगवंताचे खरे रूप होय.’ आपला प्रश्नही असाच दिसतोय.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ही मांडणी अशी आस्तिक बाजूने सरकत जाणारी आहे. त्यावर पुन्हा कधीतरी...
तूर्त त्यांचा (मला त्यावेळी भावलेला) तिथलाच एक डायलॉग मारतो. ‛जे आहे ते असतेच. ते मानावे लागत नाही. जे नाही ते नसतेच ते मानल्यामुळे अस्तित्वात येत नाही.’
आता थोडं वैयक्तिक - मी बारावीत असताना डिस्कव्हरी का नॅशनल जिओग्राफी चॅनेलवर स्टीफन हॉकिंग यांचा कसलातरी बिंग बँग विषयक कार्यक्रम पाहिला होता. तेव्हापासून मी बिग बँग कसं घडलं याचा शोध घेतो आहे ते अजून घेतोच आहे. मी बिग बँग कसं घडलं यासाठी आमच्या त्यावेळच्या फिजिक्सच्या सरांजवळ विचारणा केली होती. त्यांनी त्यावेळी ‛अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ वाचायला सांगितलं; पण 12वीची परीक्षा झाल्यानंतर! नंतर मग नंतरच राहीलं. मधी त्याचा मराठीतला अनुवाद कशात तरी वाचला आणि भूक शमायची सोडून अधिकच वाढली.
स्थिर-स्थिती सिद्धांत जास्ती पटत नसल्याने तसेच त्याचे पुरावेही कमीच मिळत असल्याने मी नारळीकर, हॉईल, स्टीफन यांचं फारसं मनावर घेत नाही. मात्र त्यांच्यामुळं मी नास्तिक बनलो; तो आजही कायम आहे.
माझ्या मते, आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर आजही शास्त्रज्ञांना समर्पकपणे माहीत झालेलं नाही. शोध चालू असावा. ‛बिग बँग’ला मात्र जवळपास सार्वत्रिक मान्यता आली आहे.
‛आधी काय’ हा आपला रास्तच प्रश्न आहे. मलाही तो ज्यावेळी पडला होता त्यावेळी त्याचं उत्तर म्हणून मला ज्यानं त्यानं ‛ऊर्जा अक्षय’तेचा सिद्धांत ऐकवला होता. असो. चालायचेच.
स्पेसटाईम ही एकच एंटिटी आहे.
स्पेसटाईम ही एकच एंटिटी आहे. स्पेस आणि टाईम वेगवेगळं प्रसरण नाही. स्पेसमधेच टाईम आहे.
टाईम असं वेगळं काही अस्तित्वात नाही. काहीतरी बदल होतात तेव्हा त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवताना आपोआप आधी आणि नंतर असे काल्पनिक भाग निरीक्षक पाडतो. प्रत्यक्षात काळ अशा नावाचं काही पुढे किंवा मागे सरकत नसतं. सोयीसाठी तो फिजिकली असतो असं समजायचं असल्यास तो अवकाशाचाच एक भाग मानावा लागतो.
हे न कळल्याने आधी काय आणि नंतर काय या स्वरूपाचे न सुटणारे प्रश्न पडतात. ते प्रश्न निरर्थक ठरल्याने उत्तरे मिळण्याची शक्यता नाही.
माझं आकलन
माझं आकलन असं -
समजा गुरुत्वाकर्षणामुळे ठरावीक भागातलं अवकाश वाकडं होतं. म्हणजे जिथे वस्तू नाही, वस्तुमान नाही, अशा रिकाम्या जागेतून एका ताऱ्याकडून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत जायला प्रकाशाला समजा २.७२ वर्षं लागत होती. आता तिथे मध्ये कुठेतरी वस्तुमान ठेवलं. मधलं अवकाश वाकडं झालं. समजा आता त्याच दोन ताऱ्यांमधलं अंतर ३.१४ प्रकाशवर्षं झालं.
तर तिथे काळ ही संकल्पनाही वाकडी झाली. सरळ रेघ म्हणजे काय ही व्याख्या बदलल्यामुळे अंतर म्हणजे time-distance बदललं. त्या दोन ताऱ्यांपैकी एका ताऱ्यावर काही घटना घडली, तर ती दुसऱ्या ताऱ्यापर्यंत पोहोचायला २.७२ ऐवजी ३.१४ वर्षं (किमान) लागतील. हे काळ 'वाकडा' होणं.
काळ मोजताना, माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं महत्त्वाचं असतं. ती माहिती जात नसेल तर काळ 'थांबतो'; कृष्णविवराच्या बाबतीत जे होतं ते हेच.
तर काळ 'वक्र' होतो ह्यापेक्षा तेच काम करायला जास्त वेळ लागतो, हे आकळणं कदाचित सोपं वाटेल.
रामविजय ग्रंथात मूळमायेचे
रामविजय ग्रंथात मूळमायेचे इतके सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. थांबा सापडला की देते. अफाट वर्णन आहे.
_________
जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||
जर प्रश्न बदलला तर
आधी काय होते यापेक्षा आत्ता जे काही आहे ते नसतेच तर?
म्हणजॆ सूर्य, चंद्र, पृथ्वी, इतर ग्रह, तारे, आकाशगंगा किंवा सूक्ष्मातिसूक्ष्म क्वार्क्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे काहीच नाही.
अक्षरशः काहीच नाही...
अशा स्थितीचे कसे वर्णन करणार.
कारण तेव्हा शब्दपण नसणार.
म्हणजे काहीतरी असणे हि साधारण स्थिती आहे का?
हांगाश्श्शी
ह्या इथे कदाचित तुम्हाला मिळेल उत्तर असे वाटते.
शुभेच्छा.
मला विर्चाराल तर चितळेकाकांनाच जर प्रश्न पडत असतील तर उत्तर द्यायचे कुणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे.