Skip to main content

मी गेल्यावर

मी गेल्यावर नकाच ढाळू, उसणवारीचे आसू
मी गेल्यावर नकाच वाहू, श्रद्धांजल्या ढासू
कोण कुठला, रेंगता किडा, या जगातला मी
मेला म्हणुनी, फुलू दे काही, चेह-यावरती हासू ..

नकाच पेटवू, मेणबत्या, महाग होतील उगा
द्या कुणाला, गरीबाला रे, देतील बिचारे दुवा
कशास वाहता, स्मृतीस गंधित, कोमजणारी फुले
अंध मुलीला द्याल का रे, शब्द इतुका हवा

सभा भरवुनि, नकाच जाळू, वीज लाख मोलाची
सह्स्त्रचंद्रे गावी झाली, सवय अंधाराची
तरी वाटले, केले पाहीजे, काही याच्यासाठी ..
कविता माझी समजून घ्यावी, फुका टीकेच्याआधी

- जंतू
(माझ्या फेसबुकवरील मित्रांसाठी : कृपया सेटिंग -१ ठेवावे. इथे कुणी वाकड्यात गेला कि त्याची त्रेधातिरपीट उडवणारे प्रतिसाद तुम्हाला दिसतील. श्रेणी :- विनोदी म्हणजे इणोदि असे वाचावे. निरर्थक म्हणजे आम्हाला झेपत नाही असे वाचावे. ज्या प्रतिक्रिया पाहताना भीतीने गाळण उडते त्यांना +१ च्या खाली ठेवण्यात येते म्हणजे दृष्टीआड सृष्टी ! मी तर सुचवलं बुवा.. ही साधी कविता पण झोंबत असेल तर हिलाच -१ ठेवा. कसं ? आणि मेंबरशिप घ्या आता पटापट.)

'न'वी बाजू Wed, 04/04/2012 - 22:01

मी गेल्यावर नकाच ढाळू, उसणवारीचे आसू
मी गेल्यावर नकाच वाहू, श्रद्धांजल्या ढासू

(वगैरे वगैरे...)

ठीक आहे, नाही ढाळणार, नाही वाहणार.

तसेही नसते ढाळले, तशीही नसती वाहिली, पण आता म्हणताच आहात तर नक्कीच नाही ढाळ/वाहणार. (होऊ घातलेल्या) मृताच्या इच्छेला मान दिला पाहिजे... काय?

पण एक विचारू? हे सांगण्याची तसदी घ्यावीशी तुम्हाला का बरे वाटली? सांगितल्याशिवाय तसेही समजून घेतले नसते काय आम्ही? (हं, आता 'मुंगी उडाली आकाशी'चा अर्थ समजत नसेलही आम्हाला, पण म्हणून इतक्या साध्या गोष्टीही आम्हांस समजू नयेत?)

पूर्ण विजार Wed, 04/04/2012 - 23:39

In reply to by 'न'वी बाजू

तुमची आदळआपत समजू शकतो. कुठलाही संदर्भ नसताना जुन्या वेदना ठसठसल्या तुमच्या... उपचार करून घ्या, बरे व्हा ! त्रागा करू नये. तुमच्यावर श्रद्धांजली वाहण्याचा प्रश्नच येणार नाही असं वाटतं. तुमच्या तेराव्याला येऊन शब्द खरा करून दाखवू आम्ही ..

-------------------------------------------------------------
श्रेणी मिळाली हो (-१)
हा हा हा.. जशास तसं उत्तर दिलं कि -१ दिला जातो इथं. हिंमत होत नाही वाचायची तर कशाला वाकड्यात जायचं म्हणतो मी ? वाकड्यात गेलात कि फटके खाणारच.. तुम्हाला ही साधी कविता पण झोंबत असेल तर तिलाच -१ देऊन टाका कि.. हाकानका. किंवा सरळ उडवून टाका.

'न'वी बाजू Thu, 05/04/2012 - 19:38

In reply to by पूर्ण विजार

तुमच्या तेराव्याला येऊन शब्द खरा करून दाखवू आम्ही ..

धन्यवाद.

(आता 'रेसिप्रॉसिटी' - बोले तो आगाऊ परतफेड - म्हणून तुम्ही 'जाताना' तुम्हाला सेंडॉफ देणे आले... कधी 'जाणार' आहात म्हणताय?)

पूर्ण विजार Fri, 06/04/2012 - 01:07

In reply to by 'न'वी बाजू

अरेरे.. दया येतेय. दामाद मधला अमोल पालेकर आठवतो ना ? टेबलच्या वर सूट आणि खाली ..... तसंच एखाद्याला फटकावल्यावरही बिचारा हसून दाखवताना जसा केविलवाणा दिसतो तशी गत तुमची झालीये. आता तुम्हीच सांगा तुमच्या या पोष्टीतला इनोद तुम्हाला तरी गावला का आं ? सांगा कि..

आमचं कसं हाये, आमची सगळ्याला तयारी आहे. येव्हढी दणदणीत कविता लिव्हली ती दिसली न्हाई का ? पर तुमच्या टकु-यात एक गोस्ट शिरंना. यात तुम्हाला ट्याण्शन घेण्यासारकं काईच नव्हतं. कारन तुम्हाला घालवल्याबिगर आम्ही जात नाई. आमच़ काय करायचं ते आमि लिवुन ठेवलंय पन तुमचं काय करायचं ते आम्हाला म्हाईत न्हाई. तुमच्या मंडळींना सांगू, रडू नगा. मानूस गेला सुटलात. पोरांना बी सांगू, बा गेला. जायच्याच लायकीचा व्हता. जास्त दु:ख करु नगासा. एक गेला दुसरा चांगला भेटल,

तुमचं वेल्फेयर चिंतनारा

जंतू

( अजून काई इच्छा असंल तर शिरा अजून वाकड्यात )

कुणीएक Wed, 04/04/2012 - 23:05

.. दुर्बोध नाहिये ;) पण मी कोण ठरवणार म्हणा दुर्बोध नाहिये हे :D
अवांतर - ईथे पण 'युरी गागारीन' का नाहि झालास रे?

पूर्ण विजार Thu, 05/04/2012 - 00:05

In reply to by कुणीएक

कुणी एक
नाही ओळखले बुवा :)

पहिल्यांदा निरर्थक योग्य ठिकाणी मिळालं बुवा. इथं कुणाचा विवेक शाबूत आहे ? अभिनंदन करायचं होतं

खवचट खान Thu, 05/04/2012 - 00:16

सुरेख टु-द-पॉईंट कविता. फारफार आवडली.

>>>कोण कुठला, रेंगता किडा, या जगातला मी
>>>मेला म्हणुनी, फुलू दे काही, चेह-यावरती हासू ..

किडा शब्दाचा वापर सूचक वाटला. आपण गेल्यावर, (अहिंदू असलो तर) जमिनीखाली जाऊन जमिनीखालच्या किड्यांना काही काळ जगवणार आहोत. आपले जाणे हे त्यांच्या चेहर्‍यावर हासू पसरवणार हे साहजिकच. त्यात आपला दुस्वास करणार्‍या मानवरुपी किड्यांनाही हर्षवायु होणार आहे. दोन पातळ्यांवर ही ओळ भाष्य करते.

>>>कशास वाहता, स्मृतीस गंधित, कोमजणारी फुले
>>>अंध मुलीला द्याल का रे, शब्द इतुका हवा

चार्ली चॅप्लिनच्या सिटी-लाईट्समधल्या मुलीची आठवण झाली. त्यातून आपण मेल्यावर अंध मुलीला आपल्या कॉर्नियाचा जास्त उपयोग झाला असता, तरी तिला दिसू शकणार नाहीत अशी फुले देण्यामधली आयर्नी जाणवली. (हा अर्थ अभिप्रेत होता की नाही हे मला माहीत नाही, पण एखाद्या कोड्याचं 'उत्तर बरोबर आलं का हो' अशा आविर्भावात कवीबरोबर तो अर्थ पडताळून पाहण्याचा मूर्खपणा मी करणार नाही)

शेवटी "मै तेनू फिर मिलांगी' मधल्या अमृता प्रीतम सारखाच, कवी या विश्वात राहीला नसला तरी कवितेच्या रुपाने 'चेतना दे कायनाती धागे' वाचकाची सोबत करणार आहेत, हा विचार आपल्याला सुखावून जातो.

छान कविता.

ऋषिकेश Thu, 05/04/2012 - 09:26

कविता - विषय- ठीक वाटली मात्र मीटरमधे फसलीये
जरा वेगळी शब्द योजना करून योग्य बांधणी करता आली असती

बेफिकीर Thu, 05/04/2012 - 09:59

मी गेल्यावर नकाच ढाळू, उसणवारीचे आसू
मी गेल्यावर नकाच वाहू, श्रद्धांजल्या ढासू
कोण कुठला, रेंगता किडा, या जगातला मी
मेला म्हणुनी, फुलू दे काही, चेह-यावरती हासू ..

छान कडवे आहे

बाकी तळटीप समजली नाही

मनीषा Thu, 05/04/2012 - 16:29

-

राम-कृष्णही आले गेले
त्यांविण जग का ओसची पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले ?

हे तर त्रिकालबाधित सत्य आहे, नाही का?

अवांतर : कवितेतील कल्पना खरच चांगली आहे.