Skip to main content

राजा अलर्क

राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐष-आरामामध्ये गर्क झाला. खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात इतका बुडाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे ठरवून त्याने काशिराजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. वेळी अलर्काला अतिशय दुख झाले. अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाही असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावरील संदेश त्याने वाचला. सर्व संकटाचे
मूळ कारण कामना आहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे.ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत.' तो उपदेश वाचून
राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला. श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन व अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान तसेच विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले. आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ असे त्याने सुबाहूला विनवले. सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे. त्याने अलर्काला सांगितले की तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर. यानंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवट पर्यंत तो दत्तभक्तीत रममाण होऊन गेला.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/07/2020 - 02:18

मध्ये कुणी तरी औरंगजेबाबद्दल अशीच कहाणी लिहिली होती. निरिच्छ होता; वडलांची इच्छा म्हणून राज्यकारभार हाती घेतला, वगैरे ... (हा दुवा - फेसबुकवर आणि शेफाली वैद्य ह्यांच्या भिंतीवर जातो. आपापल्या जबाबदारीवर उघडणे.)

अवंतिका Thu, 09/07/2020 - 11:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजा निरिच्छ असेल तरच बातमी होते. साधू विलासी असेल तरच बातमी होते. राजा विलासी असणार यात नवल ते काय. सारे सुखोपभोग पायाशी लोळण घेत असतानाच एखादा राहुल गौतम बुद्ध बनतो.

आसाराम बापू आश्रम चालवतो आणि माया जमवतो म्हणून बातमी बनतो. राम रहीम हा तथाकथित संत लोकांना आणि बायकांना उल्लू बनवतो म्हणून मोठी बातमी होते. स्वामी नित्यानंद नाव स्वामी असूनही शयन गृहात लीला करतो म्हणूनच बातमी होते.

राज्य चालवणारा राजा या न्यायाने अठ्ठावीस राज्ये चालवणारे नरेंद्र मोदी निरिच्छ नाहीत का? अटलबिहारी वाजपेयीनी माया जमवल्याचे ऐकिवात नाही. लाल बहादूर शास्त्री भणंग अवस्थेतच असायचे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती भवन सोडले तेंव्हा दोनच बॅगा होत्या. एकात कपडे आणि एकात पुस्तके. त्या उलट प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवन सोडले तेंव्हा पाच दहा ट्रक भरून सामान नेले असे म्हणतात.

पुराण डोळे मिटून वाचा किंवा उघडे ठेऊन. ती तुमची निवड आहे. पण ते वाचताना आपण त्यांच्यातले काय चांगले आहे आणि ते अंगी बाणू शकतो का याचाही विचार करायला हवा. हे पुराण असले आणि त्याला काहीही ऐतिहासिक पुरावा नसला तरीही ती आपल्या हिंदू संस्कृतीची एक हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. एखादी नवल कथा वाचावी या पद्धतीने ते वाचावे आणि सोडून द्यावे.

'न'वी बाजू Thu, 09/07/2020 - 11:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुघल थेरडेशाहीचा निःपात करण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने काही ठोस पावले उचलून मोगलाईत एक अत्यंत चांगला पायंडा पाडला तथा एक उत्तम आदर्श जगासमोर घालून दिला, या एकाच कारणास्तव आम्ही त्याला मानतो. ऐसा महापुरुष जगात - किंवा गेला बाजार या पवित्र हिंदभूत - त्यापूर्वी कधी झाला नाही, नि पुन्हा होणे नाही.

बाकी, ती फेसबुकपोस्ट वाचली. लेखिकेने कल्पना पु.लं.कडून ढापलेली आहे, आणि आत्यंतिक टुकाररीत्या कॉपी मारलेली आहे. कॉपी जमलेली नाही. एक तर फॅनफिक हा प्रकार मला झेपत नाही. त्यात ही तर फॅनफिकसुद्धा नव्हे. थोडक्यात, एक अत्यंत ढापीव टुकारपणा आहे. अधिक काय लिहू?

चार्वी Thu, 09/07/2020 - 19:50

In reply to by 'न'वी बाजू

तो ढापीव टुकारपणा म्हणजे पुणे विद्यापीठाच्या इतिहासविभागप्रमुखांनी लिहिलेल्या एका लेखातील दोन वाक्ये उचलून त्याची रेवडी उडवण्याचा केलेला प्रयत्न आहे. लेखात एक लहानसा उल्लेख आहे - औरंगजेबाच्या एका राजाज्ञेत मठ उद्ध्वस्त करू नका असे लिहिले आहे. त्यावरून प्राध्यापिकांवर ट्रोलहल्ले चालू आहेत त्यापैकी ही पोस्ट असावी

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/07/2020 - 21:05

In reply to by चार्वी

... आणि दोन वाक्यं संदर्भाशिवाय उचलून, हे मुद्दामच नोंदून ठेवते.

औरंगजेबानं केलं तर ते वाईट आणि पुराणांत लिहिलं असेल तर ते छान-छान; ह्याची गंमत वाटली.

अरविंद कोल्हटकर Fri, 10/07/2020 - 03:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

औरंगझेबाविषयी आपण जे नेहमी वाचत आलो आहोत त्याच्याहून वेगळे चित्र दर्शविणारे पुस्तक 'Aurangzeb -The Man and the Myth' by Audrey Truschke मिळाले तर अवश्य वाचा. ऑड्रीबाई रटगर्स विद्यापीठात प्राध्यापिका असून हिंदुस्तानच्या इतिहासावर त्यांचे बरेच लिखाण आहे.

अरविंद कोल्हटकर Thu, 09/07/2020 - 08:52

ह्या लेखाखाली - धाग्याचा प्रकार निवडा: : इतिहास, माहितीमधल्या टर्म्स: इतिहास - अशी नोंद आहे. लेखामध्ये इतिहास किती आणि पुराणामधील सांगोवांगीच्या किंवा साधुवाण्याच्या कथेसारखे भारूड किती असा प्रश्न चिकित्साखोर वाचकांस पडला आहे.

हरिवंशामध्ये ह्या राजाचा उल्लेख आहे असे वाटते. त्या संदर्भाने काही माहिती देता आल्यास पाहावे.

चिमणराव Thu, 09/07/2020 - 12:09

पुराणात सांगितलेल्या गोष्टी पुराव्यांअभावी इतिहास नक्कीच नाही. पण अशी काही भारुडं लिहिली गेली हा इतिहास झाला. करमणूक म्हणून किंवा त्यातल्या पापपुण्य, कर्म, श्राद्ध, अवतार, देवांचा कोप किंवा आशिर्वाद यांची भीती दाखवून कुणीकुणी बरीच माया जमवली. आणि पुराणकथेतील प्रसंग, अवतारवर्णन वापरून देवळांच्या भिंती चितारल्या गेल्य, दगडांना वेगळे रूप दिले गेले.
ग्रीक पुराणं, दंतकथा आहेत पण त्यांचा कुणी आणि कसा उपयोग करून घेतला माहिती नाही.

सुनील Thu, 09/07/2020 - 14:11

मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती

ह्या श्रेणी खुद्द दत्तात्रेयांनी पाडल्या होत्या की भक्तांनी आपापसात?

'न'वी बाजू Thu, 09/07/2020 - 15:25

In reply to by सुनील

... 'मार्मिक', 'माहितीपूर्ण', 'रोचक', 'खवचट', 'अवांतर', 'पकाऊ'/'भडकाऊ' वगैरे?

'भडकाऊ भक्त' कसा/शी असेल?

अवंतिका Thu, 09/07/2020 - 17:25

In reply to by सुनील

तिरुपतीला गेला असाल तर बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची एक रांग असते. ३०० रुपयांची, ५० रुपयांची आणि बिन पैश्याची. म्हणजे ३०० रुपयांची एक श्रेणी, ५० रुपयांची दुसरी आणि बिन पैश्याची तिसरी श्रेणी. यातली उच्च श्रेणी कुठली ही आता लक्षात आली असेलच.

शिर्डी, तुळजापूर येथेही अशी रांग असते.

मदालसेच्या वेळी दिवसाच्या बारा तासात जो जास्तीतजास्त काळ दत्तभक्तीत घालवत असेल तो उच्च श्रेणीचा भक्त असावा. कमी काळ दत्तभक्ती करत असेल त्याची मध्यम श्रेणी असावी आणि देखल्या देवा दंडवत करत असेल तो निम्न श्रेणीचा भक्त असू शकतो. हा माझा अंदाज आहे.

तिरशिंगराव Fri, 10/07/2020 - 07:32

असे पुराण वाचले की, झुलत्या खुर्चीत, ' दत्त दत्त , दत्ताची गाय, गाईचे ........ वगैरे म्हणत बसावेसे वाटते!

अवंतिका Sat, 11/07/2020 - 12:12

In reply to by तिरशिंगराव

होय, ते बडबडगीत असे आहे: दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचे दूध, दुधाचा चहा, चहाचा कप, कपाचा कान, कानात डुल, माझी बायको गुल!

चिमणराव Sat, 11/07/2020 - 16:21

In reply to by 'न'वी बाजू

जत्रेत बायकोला हरवून टाकायची आणि पीडा टाळायची एक ग्रामीण कथा शंकर पाटलांची आठवली. विश काही खरी होत नाही बिचाऱ्याची.
---------------
पण गायीबरोबरच तीन कुत्रीही असतात त्यावर काही गाणं नाही का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/07/2020 - 22:12

In reply to by 'न'वी बाजू

तुमच्या 'शत्रू' काय म्हणतात, ह्याबद्दल मला अपार उत्सुकता आहे!

तिरशिंगराव Sun, 12/07/2020 - 10:24

In reply to by अवंतिका

बॅरिस्टर नाटकांत ऐकलेले,

दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचे दूध, दुधाचे दही, दह्याचे लोणी, लोण्याचे तूप, तुपाची बेरी, बेरीची माती, मातीचा गणपती, गणपतीची घंटा घण घण घण! असं वर्जन होतं.

चिमणराव Mon, 13/07/2020 - 19:08

In reply to by सामो

पण बॅरिस्टर नावाशी नाटकाचा काही संबंध नसावा. ब्याचलरचे उसासे असावेत. ब्याचलरने दत्ताचे पाय धरावेत हे योग्यच. उगाच दिवी किंवा गोपीकृष्ण कशाला.

सामो Mon, 13/07/2020 - 19:10

In reply to by चिमणराव

जयवंत दळवींच्या नाटकांत/कथांत एक तरी वेडसर पात्र असायचेच. या नाटकात नायक फॉरिन रिटर्नड (इंग्लंड मला वाटतं) बॅरिस्टर आहे जो पुढेपुढे भ्रमिष्ट होत जातो.