घराविषयीच्या नोंदी

हिजाब की शिक्षण? असं एक राजकीय धार्मिक द्वंद्व सध्या सुरू आहे. कर्नाटकातल्या उडपी जिल्ह्यात - बुरखा घालून कॉलेजात जाणाऱ्या मुलीसोबत काय झालं, हे आपण पाहिलं. सोशल मीडियावर या सगळ्या गोंधळाचे पडसाद उमटले. वेगवेगळे ट्रेंड्स सुरु झाले. हिजाब बुरख्याच्या बाजूने-विरोधात हिरीरीनं मतं मांडली जाऊ लागली. निधर्मीवादाच्या आड लपून स्त्री-स्वातंत्र्याचे आम्हीच जणू कैवारी अशा थाटात अतिरेकी उजव्या संघटनांचे नॅरेटिव्हज, सदाहरित आय.टी.सेलची कर्तबगारी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, आस्तिक विरूद्ध नास्तिक, स्त्रीवादी विरुद्ध स्त्रीवाद न मानणारे अशा अहमहमिकेत इस्लामोफोबियाचा मुद्दा जरा मागेच पडला. हिजाबवरून आता जे झालं, ते केवळ निमित्त होतं, द्वेषावर पोसलेल्या हिंदुत्ववादी सरकारचा खरा अजेंडा वेगळाच आहे. त्याची सुरुवात तीनतलाकविरोधी कायदा तसंच उत्तरेकडील काही राज्यात तथाकथित ‘लव जिहाद’विरोधी कायदा करून मुस्लीम पुरुषांच्या गुन्हेगारीकरणाने झाली. आता स्त्रियांचा नंबर आहे. ‘तीन तलाक’, बुरखा, हिजाब वा डोईवरचा पदर आणि धर्मसत्तेने, जातसमूहांनी, पुरुषसत्तेनं स्त्रियांवर जेजे काही लादलंय ते अन्यायीच आहे मात्र त्याविरोधात कायदे करणाऱ्या इथल्या सरकारचा, सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीचा हेतु स्त्रियांचे स्वातंत्र्य, प्रगती हा नाहीच, तर त्याआडून अल्पसंख्यांक समूहांना लक्ष्य करण्याचा आहे आणि यासाठीची मुहूर्तमेढ कधीच रोवली गेली आहे. ‘बाबरी मशीद प्रकरण’ हे याचं पहिलं मूर्त उदाहरण म्हणता येईल. त्याआधीपासूनही प्रत्येक मार्गाने मुस्लिमांबाबत चुकीच्या धारणा आणि द्वेष निर्माण करण्याचं काम वर्षानुवर्ष अनेक माध्यंमातून केलं जात आहे. आता तर आय.टी. सेलच ‘इस्लामोफोबिया’ अजून बळकट करण्यासाठी पुरेसा आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामोफोबिया कसा निर्माण केला जातो, त्याचा मी घेतलेला अनुभव, त्यातनं माझ्या पदरी काय पडलं, यावरचा माझा मागच्या वर्षी प्रकाशित झालेला हा लेख इथं शेअर करावासा वाटला. ‘हाकारा’ या द्विभाषी डिजिटल त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०२१ च्या आवृत्तीत तो याआधी प्रकाशित झाला होता. त्या आवृत्तीच्या ‘घर’ या थीमवर बेतलेल्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख अंशत: संपादित करून पुढे देत आहे.

हाकारातील मूळ लेख इथे वाचता येईल
https://www.hakara.in/priyanka-tupe/

घराविषयीच्या नोंदी

माझं घर असा निबंध आपल्यापैकी प्रत्येकानं लहानपणी एकदा तरी लिहिलेला असतो, किंवा चित्र तरी काढलेलं असतं. समजा चित्र काढलं तर आपण एक घर काढतो, समोर एखादं झाड, छोटंसं अंगण, हवं तर कुंपण किंवा रस्ता, मागे डोंगररांग - त्यातून वाहणारी नदी, उगवणारा सुर्य, ढग पक्षी काढण्यापर्यंत आपल्या कल्पनेची भरारी असते. पण आपल्या चित्रातल्या घराच्याशेजारी आणखी खूप घरं, शेजारी का नाहीत? असा प्रश्न आपल्याला कुणीच विचारत नाही, घराची आपली संकुचित कल्पना अशी बालपणापासून आकार घेत जाते आणि पुढे जाऊन विविध जात-धर्मांचे शेजारी, त्यांचा सहवास, त्यांच्याशी संवाद, सांस्कृतिक देवाण-घेवाण पालक जाणीवपूर्वक घडवून आणतातच असं नाही, माझ्यासोबतही असंच घडलंय. त्यामुळे वर्षानुवर्ष आपल्याच आसपास राहणारी हाडामासाची माणसं, आपल्यासारखंच सामान्य आयुष्य जगतात, वेगळ्या धर्माची असली ती सुंदर माणसं असतात, त्यांची घरं आपल्या घरांसारखीच स्वच्छ किंवा पसारा असलेली असतात, आपल्या घरात केला जातो, तसाच पाहुणचार तेही करतात, हे समजायला वयाची खूप वर्ष जावी लागली.

माझा जन्म १९९३ च्या नोव्हेंबरमधला. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत सतत दंगली घडत होत्या. बॉम्बस्फोट, दंगलींचं सत्र सुरुच होतं. माझे आई बाबा तेव्हा मुंबईतल्या वडाळा परिसरातल्या अँटॉप हिल भागात राहत होते, हा भाग तसा मुस्लीमबहुल. आमचं चाळीतलं छोटंसं घर धरून तिथं आठ-दहाच हिंदूंची घरं होती, मी आईच्या पोटात असल्यानं आता दंगलींच्या सावटाखाली, आईची डिलीवरी कशी होणार, असा बाबांसकट सगळ्यांनाच प्रश्न होता, शेवटी आईला तीन महिने आधीच गावी पाठवलं गेलं आणि तिकडेच माझा जन्म झाला. आई मला अजूनही त्या आठवणी सांगते. माझ्या जन्मानंतर, मी लहान बाळ आणि त्यातही मुलगी असल्यानं आम्ही त्या मुस्लीमबहुल भागात राहणं कसं योग्य नाही, हे तिथल्या हिंदू शेजाऱ्यांनी आई-बाबांना सांगितलं होतं. त्यामुळे काही दिवसांतच मला घेऊन आई बाबा कुर्ल्याला शिफ्ट झाले.

Pic 1 here

अँटॉप हिलला आमचं भाड्याचं घर आणि दुकान होतं, त्या दुकानात आसपासचे मोठ्या संख्येनं तिथं राहत असलेले उत्तर भारतीय मुस्लीम यायचे. आमचे तेव्हाचे घरमालकही मुस्लीम होते. आई सांगते, तेव्हा सगळ्या आगरी शेजाऱ्यांच्या घरात वरच्या माळ्यांवर लाल तिखटाचं पाणी टोप-टोपभर करून ठेवलेलं असे, चिंध्याचे बोळे करून, रॉकेलच्या टोपात भिजत घालून ठेवलेले असत, सोडा वॉटरच्या फुटलेल्या बाटल्या (की फोडलेल्या ?) जमा करून ठेवलेल्या असत, अचानक ‘शत्रूचा’ हल्ला झाला, तर प्रतिकार करण्यासाठी. ही अशी बेगमी किती तरी महिने आमच्या घराच्या माळ्यावरही होती. पण त्याचा वापर करण्याची वेळ कधी आलीच नाही, असंही आईनं सांगितलं. हिंदूंची सात-आठ घरं संपूर्ण मुस्लीम वस्तीनं वेढलेली होती, तरी त्यांनी अंदाज केला होता, त्याप्रमाणे मुस्लिमांनी काही वस्तीवर हल्ला केला नाही, कुठल्याच हिंदू व्यक्तीला साधं खरचटलंही नव्हतं आणि तेवढ्या दंग्यातही आमचं दुकान सुरळीत सुरु होतं, दुकानावर एक दगडही पडला नव्हता, हिंदू असण्याच्या विशेषाधिकारानं एवढी सुरक्षा पदरात टाकूनही माझे आई-बाबा दुसरीकडे शिफ्ट झालेच. कुर्ल्याला आमचे काही नातेवाईक होते, म्हणून तिकडे राहायला गेल्यावर आई-बाबांच्या लक्षात आलं की, तोही मुस्लीमबहुल भाग आहे, मग त्यांनी दोनच वर्षात पुन्हा चुनाभट्टीला स्थलांतर करायचं ठरवलं. (चुनाभट्टी हे हार्बर रेल्वे मार्गावरचं एक स्टेशन असून कुर्ल्याला लागूनच असलेला एक छोटासा भाग आहे.)

आई-बाबांच्या बोलण्यातून मुस्लीमद्वेष थेट कधी बाहेर पडला नसला तरी त्यांना त्यांच्याविषयी फार प्रेमही नव्हतं आणि त्यांच्याबद्दल बरी मतंही नव्हती. त्यामुळे चुनाभट्टीतल्या कसाईवाडा या भागात जायला आम्हाला बंदी होती. कारण ती मुस्लीम वस्ती आहे. खरं तर कसाईवाड्यात तेजस्विनी बांबुगडे नावाची माझी शाळेतली एक मैत्रीण राहत होती, एकदा तिनं तिच्या वाढदिवसाला सगळ्यांना घरी बोलावलं. चौथीत होते मी तेव्हा, मला तिच्या घरी जायची खूप इच्छा होती, पण घरून परवानगी मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी आईच्या मागे खूपच भुणभूण केली, सगळ्या मैत्रिणी मिळून जाऊ आणि अंधार व्हायच्या आधी परत येऊ आणि उशीर झालाच तर तेजस्विनीच्या बाबांना सोडायला घेऊन येऊ..अशी माझ्या तल्लख डोक्यातली आयडिया पण आईला मनवू शकली नाही. ती म्हणाली, ‘’तो एरिया मुलींसाठी चांगला नाहीये...तिथं सगळे मुस्लीम राहतात, त्यांच्या घरी मोठमोठ्या तलवारी, सुरे असतात. तुम्हा पोरीपोरींना कुठे मुरगळून टाकतील, कळणार पण नाही.’’ मी रडून गोंधळ घातला तरी मला तेजूकडे जायला मिळालं नाही, कारण तिचं घर कसाईवाड्यात, खरं तर पूर्ण कसाईवाड्यात नाहीच, पण कसाईवाड्याचा डोंगर सुरु होतो, त्या रस्त्यावर होतं. मला आईचा खूप राग आला होता, मी दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गातल्या आल्ताफला, त्याच्या घरी तलवार आहे का? असं लगेच विचारलं, तो नाही म्हणाला...पण मला तेव्हा त्याचं म्हणणं खोटं नि माझ्या आईचं म्हणणंच खरं वाटलं.

मी पाचवीत असतानाचा असाच एक प्रसंग अगदी लक्ख आठवतो. एकदा मला बाबांची खूप आठवण येत होती. बाबा कामावर गेलेले. मस्जिद बंदरच्या एका प्रिटींग प्रेसमध्ये ते काम करायचे. त्यावेळी मोबाईल, विडिओ कॉल याचं इतकं फॅड नव्हतंच. नेमकं माझा मावसभाऊ त्या दुपारी बाबांना भेटायला मस्जिद बंदरला गेला पण मी मागे लागूनही त्यानं मला नेलं नाही. बाबांच्या प्रेसमधला लॅंडलाईन नंबर आणि पत्ता मला तोंडपाठ होता, दादाला पुढे जाऊ दिल्यावर, आई झोपलीये याची खात्री करून मी आईच्या पर्समधले पैसे गुपचूप काढून एकटीच चुनाभट्टी स्टेशनला गेले. तिथं तिकीट वगेरे रितसर काढून ट्रेनमध्ये बसले. त्यादिवशी ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा एवढ्या बुरख्यातल्या बायका बघत होते. जरा भीती वाटली, पण त्यातल्या एका बाईनं लहान मुलीला एकटं बघून खरं तर काळजीनं चौकशी केली, पाणी दिलं. माझे बाबा मला मस्जिद बंदर स्टेशनवर घ्यायला येणारेत अशी थाप मारून मी त्यांची नजर चुकवून त्यांच्याकडून येणारे संभाव्य प्रश्न टाळले. मस्जिद बंदरला त्या बायकांच्या घोळक्यासोबत मी उतरले, त्यांना पुढे जाऊ दिलं नि मग दादीसेठ अग्यारी लेनच्या दिशेनं चालू लागले. एव्हाना पाच वाजत आले होते, आजूबाजूला अजानचा आवाज ऐकू येत होता, त्याला अजान म्हणतात, हे तेव्हा माहीत नव्हतं पण तो आवाज कानांना गोड वाटला. आजूबाजूला खूपच खूप माणसं दिसत होती, बहुतेक सगळी पांढरा सदरा पायजमा, गोल पांढरी टोपी घातलेली, दाढी असलेली...काही फळांच्या गाड्या, खजूर, आगरा पेठा विकण्याच्या गाड्यांवरची माणसं लगबगीनं कुठं तरी जात होती, मी घाबरत घाबरतच दोन तीन जणांना पत्ता विचारला, तो विचारताना त्यांच्याकडच्या तलवारीनं त्यांनी मला काही केलं तर….अशी भीती होतीच, पण बाबांना भेटण्याच्या ओढीनं मी धाडस केलं. अर्ध्या तासानं मी बरोबर पत्यावर पोचले. मला बघून बाबा शॉक्ड! पण अजिबात रागावले नाहीत. मग ते आणि दादा एका मालाची डिलीवरी द्यायला जाईपर्यंत त्यांनी मला प्रेसमधल्या शेठच्या काऊंटरवर बसवलं. तोवर रसूल अंकल आणि बाकी मंडळी मशिदीतून नमाज अदा करून आली होती, बाबांच्या शेठला पण बाहेर जायचं होतं, म्हणून ते माझी जबाबदारी रसूल अंकलवर टाकून गेले. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण अंकल एकदम भारी होते, थोड्या वेळातच आमची दोस्ती झाली. अंकल, तुमच्या घरी तलवारी आहेत का? असं मी त्यांनाही विचारलं. त्यांनीही ‘नाही’ असं सांगितलं. आता मात्र मला आई आपल्याला उगाच काही तरी टेपवते असं वाटू लागलं. ट्रेनमधल्या सगळ्या आंटींनी आपल्याला काहीच केलं नाही. पत्ता सांगणाऱ्या अंकलनी पण काही केलं नाही, रसूल अंकल पण आपल्याशी छान वागले, आल्ताफ म्हणाला की, त्याच्या घरी पण तलवार नाहीये. सगळंच कनफ्यूजन...पण आईचं म्हणणं आता खोटं वाटू लागलं होतं.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो. आमच्या गावच्या घरासमोर राहणाऱ्या तावरे आजोबांची मुलगी जना मुंबईत गोवंडीला राहत होती, जनामावशी पण त्या सुट्टीत गावीत आली होती आणि येताना गोवंडीला तिच्या शेजारी राहणाऱ्या आमच्याच वयाच्या हबीबाला घेऊन आली होती. आम्हा सगळ्यांना नवी मैत्रीण मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. हबीबा हिंदीमिश्रीत मराठी बोलायची ते ऐकायला फारच मजा यायची आणि गंमत म्हणजे तिच्याही घरी तलवारी नव्हत्या. आम्ही दिवसभर खेळायचो, गप्पा मारायचो, चाफ्याची फुलं गोळा कर, पानांच्या चपात्या बनव नि काय काय...हबीबाचा एक ड्रेस मला खूप आवडला होता, तिनं तो एक दिवस मला घालायलाही दिला. मोठी खट्याळ आणि लाघवी पोर होती ती, सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी. माझ्या आजूबाजूला मुस्लिमांबद्दल असणारी मतं, कानावर पडणाऱ्या गोष्टी या सगळ्याबद्दल मी जना मावशीला विचारलं. तिनं खूप काही सांगितलं. त्यावरून मला एक कळलं की आपल्याला सांगितलं जातं.. तसे काही मुस्लीम घाणेरडे नसतात, ते त्यांची घरं दररोज स्वच्छ करतात. त्यांच्या घरात गायीचं, बैलाचं मांस नेहमीच नसतं. ते आपल्यासारख्याच भाज्याही खातात. जनामावशीला तर हबीबाच्या आईच्या हातची शेपूची भाजी खूप आवडायची. आणि हबीबाला जनामावशीशिवाय एक क्षणही करमत नसायचं...म्हणूनच हबीबाचे आई वडील त्या सुट्टीत त्यांच्या गावी लखनौला गेले होते, पण हबीबा जनामावशीबरोबर आमच्या गावी दोन महिने राहिली होती.

Pic 2 here

अशाप्रकारे मुस्लीम लोक आणि मुस्लिमांबद्दल अधूनमधून माझ्या कानावर जे पडत होतं ते आणि प्रत्यक्ष मुस्लिमांचं माझ्याशी वागणं यात खूप फरक होता. नेमकं खरं काय असेल, याबाबत मनात खूप गोंधळ होता, त्यात पुढची काही वर्ष गेली. मग मी दहावीत असताना, आम्ही ज्या भागात राहत होतो, तिथल्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांच्या कट्ट्यावर एक दिवस एक वाक्य भल्या मोठ्या अक्षरात पेंट केलेलं पाहिलं. ‘नसेल भगवा शिरावर, तर बसेल हिरवा उरावर’ असं वाक्य आमच्या ग्रुपमधल्या एका दादानं लिहिलं होतं, बाजूला भगवा झेंडा काढून, ‘भगवा कट्टा’ असं लिहिलं होतं. मला ‘त्या’ वाक्याचा अर्थ समजून घेण्यातच बरेच दिवस गेले. एकदा मी शेजारच्या दादाला विचारलंही, तर तो म्हणाला, ‘’हे वरती कसाईवाड्यात राहणारे सगळे मुसलमान, गायी कापून खातात नि गायींची मुंडकी तशीच वरून खाली फेकून देतात. गाय कापतो का आपण? आपल्यासाठी गाय देव आहे, हे या लांड्यांना माहितीये साल्यांना...तरी असं वागतात. माजलेत साले. आणि त्यांच्या घरी कधी जायचं नाही आ..ते खूप घाण असतात...कधी तिकडून चुकून गेलं तरी वासानेच उलटी होते. गटारांमध्ये सगळं लाल पाणी वाहत असतं. सारखं गायी बैल कापून खातात. कशाची शिस्त म्हणून नाही. त्यांच्या अंगाला पण घाण वास येतो. जुम्मा टू जुम्मा आंघोळ करतात. घरात बघशील तर नुसत्या माश्या, आता एवढं मांस ठेवल्यावर माश्या येणारच ना…’’ दादाचं हे ऐकल्यावर मला, तोही थापा मारतोय असं वाटलं. पण मुस्लीमद्वेष, इस्लामोफोबिया, प्रोपगंडा हे शब्द तेव्हा माहितही नव्हते. एक मात्र खरं की आजूबाजूचे अनेक लोक जवळपास सगळेच मुस्लीम, मुस्लिमांची घरं, वस्ती याबद्दल खूप पूर्वग्रहदूषित धारणा बाळगून होते आणि अजूनही आहेत, शिवाय मी नि माझ्यासारख्या कित्येकांमध्ये या धारणा रुजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. पण एकेदिवशी मी कसाईवाड्यात जायचं ठरवलंच. सकाळी वॉकला बाहेर पडले नि कुणालाही न सांगता पावलं कसाईवाड्याकडे वळवली आणि तो दिवस माझ्या अनेक धारणांना धक्का देणारा ठरला. हिंदू बहुसंख्याक समाजात, त्यातही तथाकथित उच्चजातमसूहात वाढताना अशा अनेक धारणा माझ्यासारखे करोडो लोक बाळगून असतात, जसंजसं विविध समूहांशी अधिक खोलवरचा सबंध येतो, तशा एकेक धारणा गळून पडतात.

तर कसाईवाड्यात गेले होते, तेव्हा सकाळी लोकांची कामावर जाण्याची लगबग सुरु होती, तसा इथं राहणारा वर्ग हा प्रामुख्यानं श्रमिक. त्यामुळे सकाळी असं चित्र दिसणं सर्वसामान्य गोष्ट होती. जसंजसं मी आणखी पुढे आत, आत जाऊ लागले, तसं माझी तिथल्या माणसांशी नजरानजर होऊ लागली. बहुसंख्याक समाजानं माझ्यावर थोपवलेल्या धारणांमुळे नेणीवेत थोडीशी भीती होतीच, पण ती पुढच्या अवघ्या दहा मिनिटांत पळून गेली नि त्यानंतर आजतायगत मला मुस्लीम वस्त्यांमध्ये, असुरक्षित तर सोडाच पण कधी असहजही वाटलेलं नाही, आणि हा एकाच वस्तीचा वा शहराचा अनुभव नाही…सविस्तर पुढे येईलच. तर कसाईवाड्यात मला आणखी एक प्रफुल्लित चित्र दिसलं ते लहान मुला-मुलींचं. सकाळी सातच्या आसपासची वेळ असल्यानं या मुला-मुलींची मदरशात जायची लगबग सुरु होती. इवल्या इवल्याशा मुली, त्यांच्या वेण्या, त्यांचे रंगीबेरंगी सलवार कमीज, काजळ घातलेले सुंदर डोळे, त्यांच्या हातातला दप्तरवजा बक्सा, आणि त्यांच्याच वयाचे कुर्ता, सलवार, टोप्या घातलेले त्यांचे मित्र लगबगीनं मदरशात जात होते. त्यातल्या एका मुला-मुलीचं इमली खाण्यावरून झालेलं लटकं भांडणं, रुसवा-फुगवा हे सगळं मी बारकाईनं पाहत होते, अर्थात त्यांच्यामागून गपचूप चालता चालता...तर ते भांडणही मला मोठं मजेचं वाटलं होतं. आणि लहान मुलं-मुली इतकी गोड दिसत होती की मला त्यांच्याशी बोलण्याचा मोह आवरलाच नाही. त्या मुलांनी सुरुवातीला मला काही भाव दिला नाही पण नंतर आपापली नावं सांगितली. माझंही नाव विचारलं...आणि मग त्यांना माझ्या डोक्यावर असलेल्या हेडफोन्सचं कुतूहल वाटलं. डोक्यावर काय आहे, हे त्यांना समजून सांगितल्यावर त्यांनाही त्या हेडफोन्सनं गाणं ऐकून बघायची इच्छा झाली.

त्यातल्या एका मुलानं दिदी, मलापण गाणं ऐकायचंय म्हंटल्यावर मीच अवघडले. कारण गाणं ऐकण्याला इस्लाममध्ये परवानगी नाही, असा माझा तोवर समज होता, (प्रत्यक्ष इस्लामबद्दल न वाचता किंवा मुस्लीम मित्र-मैत्रिणींशी न बोलताच) आणि त्यामुळे आपण या मुलांच्या हातात हेडफोन्स दिले आणि कुणी आपल्याला बघितलं तर काय? धर्मभ्रष्ट केला म्हणून इथंच आपल्याला हाणतील...असं वाटून गेलं. ‘…लेकीन बेटा इस्लाम तो गाना सुनने की इजाजत नही देता ना…’ असं मला म्हणायचं होतं...पण त्यांचं बालसुलभ कुतूहल बघून मी ते मनातच ठेवलं आणि जो होगा, देखा जाएगा, म्हणत त्यातल्या एका मुलाच्या कानांना हेडफोन्स लावले आणि मोबाईलवर गाणं प्ले केलं. त्यांना फारच मजा वाटली. मी आपलं आजूबाजूला कुणी मला टोकतंय का? हे सावधपणे पाहत होते, पण तसं काहीच झालं नाही. इतर सगळ्यांनाही त्यातनं गाणं ऐकून पहायचं होतं, पण तोवर त्यांचा मदरसा आला आणि उद्या भेटू म्हणत मी त्या मुलामुलींना टाटा केलं. कुणीही मला टोकलं नाही, की तू कोण कुठली? इथं काय करतीयेस? असं विचारलं नाही. मला हायसं वाटलं.

Pic 3 here

पुढे गेले तर काही बायका दारासमोरच रॉकेलच्या स्टोव्हवर भाकरी भाजत होत्या. एक बाई मिसरी घासत दारात बसली होती. कुणाच्या घरासमोर चुलीवर आंघोळीचं पाणी तापत होतं. कुणी दारात बसून मणी ओवण्याची कामं करत होतं. कष्टकऱ्यांच्या वस्तीत अनेकदा असं चित्र दिसतं, की छोटे छोटे हस्तोद्योग (घरी करण्याची मणी ओवणे, राख्या बनवणे इ. कामं) लोक दारात करत बसलेले असतात. विशेषत: बायका. त्यात मुंबईसारख्या शहरात त्यातही मुस्लीम घेट्टोत जागेची अडचण. त्यामुळे दाराबाहेरच्या इवल्या इवल्या जागेचा वापरही लोक करतात. कुठे एखाद्या दाराबाहेर टाकलेल्या बाजेवर मध्येच एखादा म्हातारा माणूस बिडी फुकत पडलेला दिसायचा. तर कुठे कॉलेजला जाण्याच्या वयातली मुलं गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करताना दिसत होती. माझ्याकडे सगळे लोक थोडंसं निरखून पाहत होते, हे खरंच. पण त्या नजरेत दहशत नव्हती तर कुतूहल होतं. एक तर मी ट्रॅक पँट, टी शर्ट, स्पोर्ट शूज या पेहरावात होते, त्यामुळं तिथल्या वातावरणात माझं वेगळेपण पटकन अधोरेखित होत होतं. शिवाय त्याआधी अशा अवतारातली एखादी बाहेरची स्त्री तिथं कधी गेली नसावी, त्यामुळे कुतूहलानं भरलेल्या अनेक नजरा माझ्यावर पडत होत्या, पण असहजता किंवा असुरक्षिततेचा लवलेशही त्यात नव्हता. शिवाय वस्तीतल्या सगळ्याच बायका बुरखा घालणाऱ्या नव्हत्या. अनेकींनी चक्क माझी आई नेसते, तशी गोल साडी नेसलेली होती, कुणी सलवार-कमीज घातलेलं होतं, कॉलेजला जाणाऱ्या एक दोन जीन्स-कुर्त्यातल्या मुलीही दिसल्या विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर बुरखा-हिजाब काहीही नव्हतं.

बाकी वस्ती थोडी बकाल होतीच. काही गटारं तशीच उघडी वाहत होती, घरं एकदम दाटीवाटीनं बांधलेली होती, सार्वजनिक संडांसांबाहेर रांगा होत्या. अस्वच्छताही होती, पण बाहेरचं कुणी माणूस गेलं तर लगेचच रोगराई होऊन मरुनच जाईल, अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. गटारं रक्तानं (बकरी, कोंबड्यांच्या) वाहत नव्हती आणि मुख्य म्हणजे खूप किळस वाटून उलटी येईल, असं मला तरी अजिबात वाटत नव्हतं. उलट वेगळ्या प्रदेशातली वेगळी माणसं, एक नवं जगच माझ्यासाठी खुलं झालं होतं. ज्यापासून मला माझ्या बहुसंख्यांक भवतालानं इतकी वर्ष हेतुपुरस्सर दूर ठेवलं होतं. या अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. मुस्लीम वस्त्या अस्वच्छ, दाटीवाटीच्या असतात, पण त्यामागे इतर कारणं असतात, हे शहरच मुळात लहान आहे..इथं सगळ्याच कष्टकऱ्यांच्या वस्त्या अशाच असतात, हे माझ्या लक्षात आलं. पुढे जाऊन अर्थात या मागची राजकीय धोरणं, सामाजिक कारणं लक्षात आलीच.

त्यानंतर आणखी दोन-तीन वर्षांनी कॉलेज पूर्ण झाल्यावर मी लगेचच पत्रकारितेत आले आणि मग कामाच्या निमित्तानं माझा अनेक मुस्लीम घरांशी आणखी जवळचा संबंध आला. २०१६ मध्ये मी मालेगावला गेले होते. डॉ. फारूख मकदुमी यांच्या घरी. फारुख हे २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आधी आरोपी असलेले, अनेक वर्ष तुरुंगवास भोगलेले नि मग दहा वर्षांनी (२०१६) मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलेले चाळीशीचे एक गृहस्थ. पेशानं डेंटिस्ट. पण उमेदीची पाच ते सहा वर्ष आर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये दहशतवाद्याचा थप्पा कपाळावर बाळगत व्यतीत करावी लागली. त्यानंतरची चार वर्ष जामीनावर बाहेर नि मग निर्दोष मुक्तता. २०१६ ला त्यांना निर्दोष मुक्त केल्याचा निकाल लागल्यावर लगेचच मी आमचे तेव्हाचे क्राईम एडीटर (सुधाकर काश्यप) यांच्याशी बोलून डॉ. फारुख यांना भेटायला जाण्याचं नियोजन केलं. नाशकात पोचल्यावर मी डॉ. फारुखना कळवलं. मालेगावात ते स्वत: मला मौसम नदीजवळ घ्यायला आले होते. त्यांच्या बाईकवर बसल्यावर मला थंडी वाजतेय, हे त्यांना जाणवलं... मी काही न बोलताच त्यांनी गाडी एका टपरीजवळ वळवली. चहा पिऊन मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पत्नीनं खूप प्रेमानं माझं स्वागत केलं. त्यांचं घर बऱ्यापैकी मोठं होतं. घराजवळच फारुखचं क्लिनीक होतं. फ्रेश वगेरे झाल्यावर त्यांच्या पत्नीनं चला…आता लगेच नाश्ता करुया, असा प्रेमळ आदेशच दिला. तरी मला वाटत होतं, अरे बापरे…यांनी आता मला नॉन वेज काही दिलं तर काय? कबाब किंवा इतर काही मी कसं खाऊ शकेन? पुन्हा खायला मी नकार दिला...तर त्यांना किती वाईट वाटेल. (तोवर मी अजिबातच मासांहार करत नव्हते) पण आम्ही खायला बसलो आणि फारुखच्या पत्नीनं माझ्या प्लेटमध्ये चना चाट आणि फ्रूट सॅलड वाढलं. माझ्या चेहऱ्यावरचे थोडे प्रश्नार्थक भाव पाहून ती म्हणाली…‘’फारुख को चना चाट बहोत पसंद है नाश्ते मे और ये डॉक्टर लोग सब हेल्दीही खाते है फ्रुट्स वगेरा...लेकीन आपको पसंद नही है तो मै कुछ और बनाती हूँ. क्या खाएंगी आप? पोहा बनाऊ?’’

नाही...हे छानच आहे! पोहे वगेरे नको म्हणत मी, ते सगळं आवडीनं खाल्लं. मालपुवा आणि पाकातले समोसेही खाल्ले. मी ते सगळं आवडीनं नि भरपूर खातेय, हे पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं, ते मी कधीच विसरु शकणार नाही. इथं माझ्या आणखी एका धारणेला धक्का बसला होता की मुस्लीम घरांमध्ये नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळ्या आहारात दररोज मासांहारच असतो. पुढे लवकरच मला पुरणपोळी, करंज्या नि अगदी येसराची आमटी आवडणारे अनेक मुस्लीम मित्र मैत्रिणी भेटलेच. अभिनेत्री दिग्दर्शक मैत्रीण रसिका आगाशेनं एका मुलाखतीत मला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला (अभिनेता झीशान अयुबला) साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते. तर मालेगावात डॉ. फारुख यांच्या केसबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यांनी एटीएस, एनआयए, सीबीआय या तिन्ही तपासयंत्रणांच्या आरोपपत्रांचे समरी रिपोर्ट्सही मला दिले. काहीही नाव नसलेली मी एक साधारण अगदी नवी पत्रकार असताना त्यांनी मला जराही कमी लेखलं नव्हतं, उलट अगदी बारीकसारीक तपशील सांगत, त्यांनी मला बॉम्बस्फोट झालेल्या सर्व साईट्सवर स्वत:च्या बाईकवरून नेऊन आणलं होतं. दिवसभर मी त्यांच्यासोबत बोलत, भटकत होते.

मग संध्याकाळच्या नमाजनंतर, त्याच खटल्यातला आणखी एक निर्दोष मुक्तता झालेला तरुण मोहम्मद झाएद मला भेटायला फारुखच्याच घरी आला. झाएद ३२ वर्षांचा होता, पण तो पन्नाशी ओलांडलेल्या नि सगळं अवसान गेलेल्या एखाद्या म्हाताऱ्यासारखा दिसत होता. तुरुंगातून सुटल्यावर तो मालेगावला येऊन एका हातमागावर कारागीर म्हणून काम करत होता. खरं तर त्याला बॉम्बस्फोटांच्या आरोपात अटक केली, तेव्हा तो अवघ्या बावीस वर्षांचा होता. यवतमाळच्या एका मदरशात शिकवायचा. बारावी चांगल्या मार्कांनी पास होऊन त्यानं डी.एड.ला एडमिशन घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते, रत्नागिरीच्या एका कॉलेजला त्याचा नंबरही लागला. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला एडमिशन घ्यायला जाणार, तोच आधीच्या रात्री पोलिसांनी त्याला उचललं. स्फोट झाला तेव्हा तो नाशिकपासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेल्या यवतमाळच्या एका खेड्यात होता, पण पोलिसांनी प्राथमिक तपासासाठी त्याला जे उचललं ते नंतर तो आपल्या यवतमाळच्या घरी आजतायगत जाऊ शकला नाही. प्राथमिक तपासासाठी त्याला उचललं त्याचं कारण पोलिसांनी सांगितलं की, १९९३ च्या मुंबईत स्फोटांआधी तो ठिकठिकाणी प्रक्षोभक पोस्टर्स लावत होता, त्यामुळे तो एक संशयित आहे. पण झाएदचे आई वडिल अशिक्षित, त्यामुळे २००६ मध्ये २२ वर्षांचा असणारा झाएद १९९३ ला अवघ्या नऊ वर्षांचा होता, ९ वर्षांचं लेकरू प्रक्षोभक पोस्टर्स कसं लावू शकेल, तेही यवतमाळमध्ये…(मुंबईतल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर) आणि जरी त्याच्याकडून कुणी तसं करून घेतलं असेल तरीही तेव्हा तो कायद्याच्या भाषेत बालक असताना अजाणतेपणी केलेल्या कृत्यावरून (फक्त धूसर शक्यता ) देशात कुठेही स्फोट झाले तरी त्याला संशयित कसं समजलं जाऊ शकतं? हा प्रश्न त्याच्या आई - वडिलांच्या गावीही नव्हता. मनात आलं तरी भारतीय गरीब मुसलमानांना हे विचारायची मुभा नसते.

तर झाएदला पुढे सत्र न्यायालयानंही दोषी ठरवलं. जामीनासाठी प्रयत्न करावेत, अशी आर्थिक परिस्थितीच नव्हती. पण इतर सहआरोपींना सहा वर्षांनी जामीन मिळाल्यावर, त्या ग्राऊंडवर त्याचा जामीनाचा मार्ग थोडा सुकर झाला. यवतमाळहून आई-वडिल, भाऊ यांच्यापैकी कुणीही आर्थर रोड जेलमध्ये त्याला वारंवार भेटायला जाऊही शकत नव्हते, प्रवासखर्चाचेही पैसे त्यांच्याकडे नसायचे. भारतीय राज्यव्यवस्थेच्या आणि पोलिसांच्या मुस्लिमांबाबत असलेल्या पूर्वग्रहदूषित धारणांनी एक गरीब नि निर्दोष मुस्लीम कुटूंब उध्वस्त केलं होतं.

झाएदला लहान मुलांमध्ये रमायला, शिकवायला खूप आवडायचं. शिक्षक बनणं हे त्याचं स्वप्नं होतं. ते स्वप्न बेचिराख झालं. आजही हजारो मुस्लीम तरुणांची अशी स्वप्नं चिरडली जातात. कुठेही जरा खुट्ट झालं की पोलिस पहिलं कोम्बिंग ऑपरेशन करतात ते मुस्लीम वस्त्यांतच. मी मुंबईला अनेक वर्ष चुनाभट्टीत राहत असे. आमचं एक नाश्त्याचं दुकान चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या अगदीच गेटबाहेर होतं. अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी आमच्या दुकानात दररोज नाश्त्यासाठी येत. तेव्हा त्यांच्या बोलण्यात सतत ‘कसाईवाड्यात आज कोम्बिंग ऑपरेशन आहे’ असे तपशील येत. त्यामुळे कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे कसाईवाडा असं समीकरण का आहे? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. पुढे बाटला हाऊस फेक एन्काऊंटर, भोपाळ फेक एन्काऊंटर, सोहराबुद्दीन केस अशा अनेक खटल्यांचा अनेक बॉम्बस्फोटाच्या केसेसचा बारकाईनं अभ्यास केल्यावर पोलिसांची एक कार्यपद्धती लक्षात आली. कुठंही काही गुन्हा किंवा तणावाची घटना घडली की आधी मुस्लीम वस्त्यांमध्ये जाऊन वाट्टेल त्या मुस्लीम तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घ्यायचं. त्यातल्या त्यात गरीब, अशिक्षित आणि ज्यांना पुढे मागे फारसं कुणी विचारणारं नाही अशा कुटूंबातल्या मुलांच्या थातुरमातुर बाबी पुरावा म्हणून दाखवत (उदा., एखादा तरुण मदरशात शिकवतो. इ.) त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. बाकीच्यांना काही दिवसांनी सोडून द्यायचं, मात्र ठराविक काळानं पोलिस स्टेशनला हजेरी द्यायला बोलवायचं. पासपोर्ट वगेरे असेल तर जप्त करून घ्यायचा. त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर पोलिसांची परवानगी घ्यायला लावायची इ. अशा कार्यपद्धतीनं कधी पोलिसांवरचा तपासाचा ताण हलका होतो तर कधी दुसऱ्या कुणी ठरवून टाकलेले राजकीय कट यशस्वी होतात. राजकीय शक्तींनी एक पटकथा आधीच तयार केलेली असते शिवाय असं करण्यानं हिंदु बहुसंख्यांक राज्यव्यवस्थेला अपेक्षित असलेलं मुस्लिम वस्त्यांचं गुन्हेगारीकरणही आपोआपच होतं. त्यातूनच पुढे, ‘त्यांच्या घरात हत्यारं असतात’, ‘ते’ लोक डेंजर असतात अशा धारणा रुजवल्या जातात. प्रत्यक्षात हिंदू - मुस्लिमांचा संवाद झाला तर त्यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होईल, दोघांमधला बंध घट्ट होईल, हेच हिंदुत्ववादी सत्ताधारी वर्गाला नको आहे.

दुसऱ्या बाजूला मुस्लिमांना, मुस्लिम वस्त्यांना सतत ताणात ठेवणंही राजसत्तेला गरजेचं नि पोषक वाटतं. वर्षानुवर्ष इथं राहणाऱ्या, इथली भाषा, माती, माणसं, संस्कृती आपलीशी केलेल्या मुस्लिमांना सतत एका परकेपणाच्या भावनेत ढकलणं, त्यांना सांस्कृतिक परात्मता येईल, विलगीकरणाचा अनुभव येईल, याची पुरेपूर तजवीज केली जाते. माझा एक मुस्लीम मित्र हडपसरच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहतो. ती सोसायटी तशी मिश्र जातधर्मीय लोकांची आहे पण मुस्लीम सदस्यांची संख्या तशी कमीच - साधारण वीस टक्के. दोन वर्षापुर्वी ईदनिमित्त घराबाहेर, सोसायटीच्या कॉमन जागेत दिव्यांची रोषणाई करण्याचा प्रयत्न या मित्रानं केला, तर त्याला त्याच्या शेजाऱ्यांनी, सोसायटी मॅनेजर इ. नी रोषणाई करू दिलीच नाही. सार्वजनिक जागेचा वापर ईदच्या रोषणाईसाठी नको, असं सोसायटीतल्या इतरांचं म्हणणं होतं. मात्र इतर सणांच्या वेळी सगळीकडेच रोषणाई केली जायची. “गेली वीस वर्ष मी सोसायटीतल्या गणेशोत्सवात सहभागी होत होतो. भंडाऱ्याच्या दिवशी लोकांना जेवण वाढण्यापासून सगळं आनंदानं करत आलोय...हा आपला सण नाही, अशी भावना चुकूनही कधी मनात आली नाही, पण ज्या माझ्या मित्रांसोबत मी हा सण मनापासून साजरा करत आलो, त्यांनी ईदला सोसायटीत रोषणाई करण्याच्या मुद्द्यावर मला अजिबात साथ दिली नाही की, जे चालंलय ते चूक आहे, इतकं बोलायचीही हिंमत केली नाही. त्यामुळे आता मला सर्व कार्यक्रमांमध्ये पहिल्यासारखं सहभागी व्हावंसं वाटतच नाही’’ परवा हा मित्र उद्विग्नतेनं सांगत होता.

असाच काहीसा अनुभव नुरल्लम अन्सारी या माझ्या मित्रानं सांगितला. नूरनं प्रेमविवाह केला...नेहा खन्ना नावाच्या त्याच्या पंजाबी प्रेयसीसोबत. नेहाच्या आईला म्हणजेच नूरच्या विधवा सासूला दुसरं कुणीही नातेवाईक नसल्यानं, त्यानं त्यांना स्वत:च्या घरी राहायला आणलं. नेहाची आई सश्रद्ध हिंदू असल्यानं त्यानं स्वत:च्या घरात त्यांच्यासाठी देव्हारा बनवून घेतला. आजही अनेकदा दिवाळी किंवा अन्य सणांना पुजेचं काही सामान आणायचं असल्यास, नूर ते सगळं त्यांना आणून देतो. त्यांनी बनवलेला प्रसाद आवडीनं खातो. आणि त्या दोघी मायलेकीही- त्याचे रोजे असतात, तेव्हा नूरसाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. “आमचा मुलगा आजीनं देवपुजा केल्यावर टीकाही आवडीनं लावून घेतो आणि नमाजही अदा करतो. दोन्ही संस्कृतीतली माणसांवर प्रेम करण्याची गोष्ट तो शिकतो आहे.’’ नूरनं म्हंटलेली ही साधीसोपी गोष्ट किती सुंदर आहे. तसे नूर आणि नेहा कोणत्याही सामाजिक चळवळींशी जोडलेले किंवा प्रागतिक वर्तुळांमधले नाहीत, पण माणसांवर प्रेम करण्याची शिकवण ते आपल्या मुलात रुजवू पाहतायत. घरातल्या प्रत्येकाच्या धार्मिक श्रद्धा वेगळ्या असल्या तरी त्या प्रत्येकाला तसा अवकाश मिळावा, असा प्रयत्न करत आहेत, हे खरंच महत्वाचं आहे. तरी तो म्हणतो, “घरात सगळं सुरळीत असलं तरी बाहेरची परिस्थिती बदलली आहे. दहा-बारा वर्षांपुर्वी सगळ्या सणांना शेजारी आवर्जून घरी यायचे. ईद असल्यावर हमखास. कुणी नाही आलं तर आमच्या घरून डबा जायचा. आमच्याकडच्या बिर्याणीची, शिरखुर्म्याची वाट पाहत असायचे लोक. आम्हीही शेजारच्यांकडे कधी एकदा दिवाळीच्या चकल्या, करंज्या बनतायत याची वाट पाहायचो. एकमेकांच्या घरी जाऊन कोणतीही गोष्ट थेट उचलून खाण्यासाठी परवानगी किंवा औपचारिकतेची गरज नव्हती. पण आता खूप अंतर आलंय. शेजाऱ्यांना ईदला बोलावलं तर ते काहीतरी बहाणे करून टाळतात. ‘आज आमचा उपवास आहे…तुमच्याकडे तर नॉन वेज असेल…’असं म्हणणारे शेजारी कधीकाळी आमच्या घरात हक्कानं येऊन बिर्याणी खायचे, यावर आता विश्वासही बसत नाही.”

“खरं म्हणजे सर्वसामान्य हिंदु-मुस्लिमांमध्ये चांगले संबंध असतात, पण ग्राऊंडवरची काहीच माहिती नसणारे, अँकर्स दररोज ए.सी. स्टुडिओत बसून विष कालवतात, त्यामुळे हा माहौल अजून बिघडतोय. आता माझ्या मुलाचीही काळजी वाटते. हिंदू मित्रांशी खेळताना, मी त्याला सावध राहायला सांगतो. कोणीही काही बोललं तर उलट उत्तर देऊ नको. शांतपणे बोल...असं मला त्याला नाईलाजानं सांगावं लागतं. लोकांच्या मनात राग, द्वेष इतका भरलेला आहे की एखाद्या लहानशा गोष्टीवरून कधी काय होईल, सांगता येत नाही.’’ नूरच्या आवाजात आता चिंतेचा शिरकाव झालेला असतो.

ही अस्वस्थता, भीती मी माझ्या इतरही मुस्लीम मित्र-मैत्रिणींमध्ये अनुभवली आहे. घराला जाणीवपूर्वक हिरवा रंग न देणं, इंटिरिअरमध्ये हिरव्या रंगाचा वापर किंवा इस्लामी संस्कृतीची प्रतीकं असलेल्या वस्तूंचा वापर करणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. इतकंच नाही तर माझ्या एका मुस्लीम मित्राची हिंदू प्रेयसी, त्याला जेव्हा तिच्या घरी बोलवायची, तेव्हा तिच्या सोसायटीत प्रवेश करण्याआधी - त्याला त्याच्या गळ्यातला स्कार्फ काढून बॅगमध्ये ठेवायला सांगायची. सार्वजनिक ठिकाणी स्कार्फ वापरु नकोस, गाडी चालवताना दुसऱ्याची चूक असली तरी त्यांनी केलेला अपमान सहन कर, अशा तिच्या सूचना असायच्या.

इथं ती जे करत होती ते चूक की बरोबर यापेक्षा तिला तसं का वाटत असावं? याचा विचार केला पाहिजे. ज्या माणसावर आपलं निरातिशय प्रेम आहे, त्याला गमावण्याची कल्पना तिला सहन होत नसणार आणि हिंदु बहुसंख्यांक समाजात अल्पसंख्यांकाना चुकण्याची मुभाच नसते, हे जळजळीत वास्तव तिला माहीत आहे. सांस्कृतिक प्रतिकं लेऊन वावरणाऱ्या जुनैद नावाच्या मुलाची या देशात कशी झुंडीनं हत्या केली जाते, हे तिनं पाहिलं आहे. इतरांना असणारे मूलभूत अधिकार मग तो खासगी अवकाश जपण्याचा अधिकार असो की आणखी काही...मुस्लिमांना ते नसतातच, अशीच आपली प्रबळ समाजधारणा आहे, म्हणूनच मग अखलाखच्या घरात जमाव घुसतो आणि त्याच्या फ्रीजमध्ये नेमकं कशाचं मांस आहे, हे बघतो. बरं ते मांस कशाचं आहे, याची खातरजमाही न करता त्याचा जीवच घेतो. आणि मांस कशाचंही असलं तरी आपल्याला मुळात कायदा हातात घेण्याचा किंवा कुणाच्याही घरात घुसून त्याच्या खासगी अवकाशावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच नाही, हे रुजलेलं नाही.

त्यातही मुस्लीम तर आपल्यासाठी दुय्यम नागरिक. सी.ए.ए, एन.आर.सी.ची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल तेव्हा होईल (आणि तो दिवस दूर नाही) पण तोवर आपल्या असंख्य धारणांनी आपण आधीच मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवून टाकलेलं आहे. आणि दुय्यम नागरिकांनी तर त्यांना मिळेल त्या वागणुकीसाठी, तुटपुंज्या अधिकार-सोयी-सुविधांसाठी कायम कृतज्ञ रहायचं असतं. म्हणूनच दंगलीत सर्वस्व गमावलेल्यांनी अठरा वर्षांनंतरही पिण्याचं पाणी, संडास, शाळा अशा मूलभूत सोयी सरकारनं दिल्या नाहीत, तरी ब्र काढायचा नसतो, उलट घाबरून रहायचं. याही भावनेचा मी जवळून प्रत्यय घेतला.

Pic 4 here

२०१७ मध्ये मी गुजरात दौरा केला. विशेषत: अहमदाबाद, नरोदा, नरोदा पाटिया अशा दंगलग्रस्त साईट्स आणि पुनर्वसन केलेल्या कॉलनीजमध्ये मी आठ दिवस फिरत होते. समशाद पठाण या वकील मित्रानं सलीम भाई नावाचे एक रिक्षाचालक गृहस्थ माझ्या दिमतीला दिले होते. सलीम भाई नरोदा केसमधले, तत्कालीन आमदार माया कोडनानी यांच्याविरोधात साक्ष देणारे एक महत्वाचे साक्षीदार होते, पुढे माया कोडनानी निर्दोष ठरल्या तो भाग अलाहिदा. तर सलीमभाई आणि मी सिटीझननगरला, एकतानरगला गेलो. त्यांच्याच रिक्षानं आम्ही दिवसभर फिरायचो. अहमदाबादला मिर्झापूर रस्त्यावर एक कॉनफ्लिक्टोरियम आहे (गुजरात दंगलीनंतर उभारलेलं आणि दंगलींदरम्यानच्या घडामोडींचं डॉक्युमेंटेशन केलेलं आणि काही आर्ट इन्स्टॉलेशन्स असलेलं ते म्युझियमसारखं एक स्थळ) तर त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये मी राहत असे. सलीमभाई बरोबर सकाळी आठ वाजता मला घ्यायला येत. मग आम्ही सोबत नाश्ता करून लोकांना भेटायला जात असू. दुपारचं जेवण सोबतच. सगळं झाल्यावर रात्री ते नऊ, साडेनऊला पुन्हा मला मिर्झापूर रोडच्या गेस्ट हाऊसला सोडत. पुन्हा मला हे आवर्जून सांगायचंय की, सलीम भाईंसोबत एका परक्या राज्यात, मी एकटी आठ दिवस फिरत होते, तरी मला एकदाही असुरक्षित सोडा असहजही वाटलं नाही. याउलट ज्यांची आपल्याला इतकी भीती घातली जाते, तीच माणसं या भूमीत किती तरी असुरक्षिततेत आणि तणावात जगतात, हे मी जवळून पाहिलं.

पुनर्वसन केलेल्या ज्या कुटूंबांना आम्ही भेटी दिल्या, तिथल्या घरांमध्ये काही भांडी, काही कपडे आणि अगदी मूलभूत वस्तू वगळता काहीच नव्हतं. टीव्ही, फ्रीज या वस्तूही नाहीत. कारण विचारल्यावर त्या बायकांनी सांगितलं, “आम्ही मुद्दामच घरात जास्त वस्तू ठेवत नाही, कारण कधीही काही होऊ शकतं. जरा कुठे तणावाची परिस्थिती निर्माण झाली की, आम्हाला सगळं सोडून काही दिवसांसाठी दूर कुठल्या तरी नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागतं. शहर शांत झालं की आम्ही परत घरी येतो, जास्त वस्तू घरात ठेवल्या आणि आपल्या माघारी त्यांची नासधूस झाली तर काय? याचं टेंशनच असतं. तसं झालं तर परत सगळा संसार जमवायला लागणार. त्यापेक्षा हे बरं. घर आणि घरातल्या वस्तूंमध्ये भावनिक आर्थिक गुंतवणूकच नसणं बरं आहे.’’
हे ऐकून मला धक्काच बसला. आपल्यासोबत काही तरी होणार आहे, दंग्याधोप्यात आपली घरं कधीही उध्वस्त केली जाऊ शकतात, या भीतीसह हजारो माणसं जगतात, हे किती भीषण आहे आणि ती जगतात म्हणजे नुसतीच जिवंत राहतात, साधा स्वच्छ मोकळा श्वासही अक्षरश: घेता येत नाही. कारण संपूर्ण शहरात राहणाऱ्या लोकांनी केलेल्या कचऱ्याचे ढीग या वस्तीच्या आसपास जळत असतात, त्या ढिगाऱ्यांतच त्यांची मुलं खेळतात, प्रत्येक श्वास प्रदुषित.

सकीना नावाची एक माझ्याच वयाची तरुणी भेटली होती. दंगलीत तिचे वडील मारले गेले होते, मग विधवा आईची लेक म्हणून लवकर लग्न झालं आणि पुनर्वसनात मिळालेल्या घरात तिचा संसार सुरु झाला. लग्नाला तीन वर्ष झाली, पदरात दीड वर्षाची लेक आणि नवरा टी.बी. होऊन वारला. कचऱ्याचा धूरच प्रत्येक श्वासातून आत जात असेल, तर आणखी काय होणार? कागदोपत्री नाही तरी मनांतून, धारणांतून आणि राजकीय धोरणांतून ज्यांना दुय्यम नागरिक समजलं आहे, त्यांच्या मूलभूत जगण्याची फिकीर कोण करतं?

दुय्यम नागरिकांनी ‘ठेविले अनंते तैसिचे रहावे’ असाच आपला भवताल, भू-सांस्कृतिक, राजकीय परिवेश आहे. त्यात कष्टकरी- श्रमिक मुसलमानांच्या अडचणी आहेतच, घर म्हंटलं की त्याला जोडून येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, मुस्लीम वस्त्यांचं केलेलं गुन्हेगारीकरण, सांस्कृतिक प्रतिकांचं निर्धास्तपणे, सार्वजनिकपणे आविष्करण करण्याचा अवकाशच नसणं, दिवसेंदिवस त्यांना मुख्य प्रवाहातून समाज, राजकारण, धोरणांतून वगळलं जाणं, हे अनुभव आहेतच. पण उच्चभ्रू, उच्चशिक्षित मुस्लिमांचीही त्यातून सुटका नाही, अडचणींच्या तीव्रतेत कदाचित थोडासा फरक पडत असेल, पण, कष्टकरी असो की उच्चभ्रू मुस्लीम...त्यांच्या घरांतल्या स्त्रिया- आपल्या घरातल्या पुरुषांच्या सुरक्षेबाबत, जीविताबाबत सतत काळजीत, तणावात जगतात.

२०१७ मध्ये मी अ‍ॅड. शाहीद आझमी यांच्या कुर्ल्यातल्या टॅक्सीमेन कॉलनीतल्या ऑफिसमध्ये गेले होते. शाहीद आझमी हे नामवंत वकील होते, विशेषत: बॉम्बस्फोटाच्या केसेसमधल्या, दहशतवादाचे आरोप असलेल्या मुस्लीम तरुणांच्या बचावासाठी ते काम करत. २०१० मध्ये त्यांच्या कुर्ल्याच्या ऑफिसमध्ये घुसून काही लोकांनी त्यांचा खून केला होता. मी २०१७ मध्ये शाहीदचा भाऊ खलीद आझमीला भेटण्यासाठी गेले होते. शाहीदच्याच ऑफिसमध्ये मी आणि खलीद बोलत बसलो होतो. साडेआठला त्यांची अम्मी ऑफिसमध्ये नुसतंच डोकावून गेली. बोलण्यासाठी थांबलीही नाही. मला ही भानगड कळेचना, माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून खलीदनं सांगितलं की, “भाईचा खून झाल्यापासून गेली सात वर्ष अम्मी रोज संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला ऑफिसमध्ये डोकावून जाते, अगदी दररोज - न चुकता. मी जिवंत आहे, हे बघून तिच्या जीवात जीव येतो. फक्त तेवढंच बघायला ती येऊन जाते. एक मुलगा गमावलाय आता दुसरा गमावण्याचा आघात तिला सहनच होणार नाही. म्हणूनच अम्मी पलीकडच्याच बिल्डींगमध्ये रहायला आली. ऑफिसजवळ घर असलं की तिला आमच्यावर लक्ष ठेवता येतं.’’ खलीद पुढे म्हणाला, भाईच्या खुनानंतर मीही वकील झालो, पण मी आता गुन्हेगारी खटले लढवत नाही, फक्त सिविल मॅटर्स घेतो, कारण मुस्लीम असून तुम्ही जर दहशतवादाचे आरोप असलेल्या लोकांचे खटले लढवले तर लोक तुमच्याकडे, तुमच्या अख्ख्या घराकडे दहशतवाद्यांचं घर म्हणूनच बघतात. काही नजरा खूप घाबरवणाऱ्या असतात. पण शेवटी आपल्याला इथंच याच लोकांमध्ये रहायचं आहे, त्यामुळे त्यांच्यानुसार स्वत:ला मोल्ड करावंच लागतं.’’ यावर मला काय बोलावं, कसं रिअ‍ॅक्ट व्हावं हे कळतच नव्हतं. खिन्न मनाने मी घरी परतले.

या सगळ्याच प्रसंगांनी माझी खूप वैचारिक घुसळण झाली, अनेकदा मानसिक त्रासही झाला, अपराधभाव दाटून आला, पण पुढेपुढे हेही जाणवलं की नुसतं आपल्या मनात भावनांचा कल्लोळ दाटूनही प्रश्न सुटणार नाहीच. या सगळ्या विखारी, इस्लामोफोबिक वातावारणात आपण काय करू शकतो? तर सगळ्यात आधी सगळे पूर्वग्रह बाजूला ठेऊन मुस्लीम मित्र-मैत्रिणींशी मोकळा संवाद करू शकतो. त्यांच्या घरी जाणं, एकत्र खाणं पिणं, सांस्कृतिक-वैचारिक देवाण घेवाण करत करत आपल्या मनातल्या चुकीच्या धारणा बाजूला करू शकतो. आणि मग मी हे सगळं करण्याची सुरुवात केली, अजूनही हा प्रवास सुरुच आहे, अंतिम स्थळ आलेलं नाही, पण लहानपणापासून आपल्याच शेजारी राहणाऱ्या हाडामांसाच्या माणसांचं जगणं, त्यांची घरं, संस्कृती यापासून बहुसंख्याक समूहानं आपल्याला अनभिज्ञ ठेवलं, किंबहुना त्याबद्दल द्वेष पोसला, ही चूक आपण (मी, माझ्या पिढीनं) करता कामा नये, यासाठीच हे एवढं सगळं पाल्हाळिक लिहिण्याचा खटाटोप.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्वत: घेतलेले अनुभव हेच खरी मतं बनवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे.
तुम्ही घेतलेले अनुभव सांगा की काका(ऐकलेले नाही, घेतलेले अनुभव)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण घड्याळांचे पार्टस ( रिपेरींगकरता) आणण्यासाठी अब्दुल रहमान स्ट्रीटला जात असे आठवड्यातून दोनदा. ते सगळे बोहरी मुसलमान. बरेच मला ओळखत. या व्यवहारांत मत बनवण्यासारखं काही घडत नसे. एकदा एकाला विचारले "अजून एक शुक्लाजी स्ट्रीट आहे तिकडेही घड्याळांची दुकाने आहेत का?" तर त्याने मला झापले. "वहां कभी नही जाना, वह दुसरे काम का एअरिआ है।" (चोर बजार आणि वेश्याव्यवसाय।)
भटकंतीमुळे मुंब्रा डोगरावर जातो. सुरुवातीला बकाल वस्ती आहे. तिथून जावे लागते. बकाल राहण्याचा धर्माशी संबंध नसून गरीबीशी असतो. यावर एवढेच मत बनवता येते.

भारताचा इतिहास पाहिला आणि त्यावरून मत बनवले / अढी ठेवली तर तो पूर्वग्रह ठरेल.

लेखिका पत्रकार आहे आणि तिचे अनुभव वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या समाजाचे गुण नक्कीच बाकी समजा नी घ्यावेत इतके आदर्श आहेत
.
मध्ये त्यांच्या धर्म गुरू चे निधन झाले होते.ते मलबार हील मध्ये राहतं.
तेव्हा मी बघितले .
खूप सारे बोहरी मुस्लिम गुरूंच्या आंतीम दर्शना साठी आले होते
सर्व एका लाईन मध्ये रस्त्याचे कडेने चालत.
कुठेच गोंधळ नाही रस्ता आडवणे नाही.
दर्शन घेण्यासाठी पण शिस्तीत रांगेत उभे होते
खूप शिस्त असणारा समाज वाटला मला हा.
अगदी आदर्श घेण्यासारखा.
आणि हा समाज शिक्षित पण आहे.
त्यांच्या शी कधीच हिंदू चा टकराव होत नाही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक सारखे अनुभव सर्वांना येत नाहीत आणि सर्व चांगले अनुभव तर कधीच येत नाहीत.सर्व कसे गोड गोड अनुभव आले असे जेव्हा भासवले जाते तेव्हा समजायचे ठरवून थापा मारणे चालू आहे.

सर्व कथा काल्पनिक आहेत.
इतके समजण्या इतकी लोक हुशार अस्तात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

राजेशभाऊ, तुम्हाला आलेले अनुभव सांगाल का ?
(ऐकलेले नाही, स्वतःला आलेले अनुभव)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अगदी मनापासून आणि नेहमीप्रमाणेच प्रांजळपणे लिहिला आहे. ब्राह्मणी घेटोंमध्येही आजूबाजूला, संबंध बिल्डिंगमध्ये एकही मुस्लिम कुटुंब राहत नसतानाही असा मुस्लिम द्वेष लहान मुलांना शिकवला जातो. दुर्दैवानं आपल्याला जे शिकवलं गेलं ते खरं नाही हे पडताळून बघायचा प्रयत्न होत नाही किंवा तशी संधीही मिळत नाही इतकी भारतातल्या प्रिव्हिलेज्ड लोकांची आयुष्य "गेटेड" झाली आहेत.

या लेखातला एक मुद्दा मात्र मला खटकला

>>>से काही मुस्लीम घाणेरडे नसतात, ते त्यांची घरं दररोज स्वच्छ करतात. त्यांच्या घरात गायीचं, बैलाचं मांस नेहमीच नसतं. ते आपल्यासारख्याच भाज्याही खातात. जनामावशीला तर हबीबाच्या आईच्या हातची शेपूची भाजी खूप आवडायची.

>>>तरी मला वाटत होतं, अरे बापरे…यांनी आता मला नॉन वेज काही दिलं तर काय? कबाब किंवा इतर काही मी कसं खाऊ शकेन? पुन्हा खायला मी नकार दिला...तर त्यांना किती वाईट वाटेल. (तोवर मी अजिबातच मासांहार करत नव्हते) पण आम्ही खायला बसलो आणि फारुखच्या पत्नीनं माझ्या प्लेटमध्ये चना चाट आणि फ्रूट सॅलड वाढलं. माझ्या चेहऱ्यावरचे थोडे प्रश्नार्थक भाव पाहून ती म्हणाली…‘’फारुख को चना चाट बहोत पसंद है नाश्ते मे और ये डॉक्टर लोग सब हेल्दीही खाते है फ्रुट्स वगेरा...लेकीन आपको पसंद नही है तो मै कुछ और बनाती हूँ. क्या खाएंगी आप? पोहा बनाऊ?’’नाही...हे छानच आहे! पोहे वगेरे नको म्हणत मी, ते सगळं आवडीनं खाल्लं. मालपुवा आणि पाकातले समोसेही खाल्ले. मी ते सगळं आवडीनं नि भरपूर खातेय, हे पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं, ते मी कधीच विसरु शकणार नाही. इथं माझ्या आणखी एका धारणेला धक्का बसला होता की मुस्लीम घरांमध्ये नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळ्या आहारात दररोज मासांहारच असतो. पुढे लवकरच मला पुरणपोळी, करंज्या नि अगदी येसराची आमटी आवडणारे अनेक मुस्लीम मित्र मैत्रिणी भेटलेच. अभिनेत्री दिग्दर्शक मैत्रीण रसिका आगाशेनं एका मुलाखतीत मला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला (अभिनेता झीशान अयुबला) साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते.

सर्वसामान्यपणे कुणाचं आदरातिथ्य करताना यजमान नेहमीच पाहुण्यांच्या शाकाहारी असण्याची दखल घेत असतात. पण या वाक्यांचा सूर असा वाटतो आहे की, "मुस्लिम लोकही भाज्या खातात! मग ते नक्कीच भीतीदायक नाहीत!"
समजा, त्यांच्या घरात गाईचं आणि बैलाचं मास नेहमीच असतं, तर त्यांना आपलंसं करून घेण्यात काही फरक पडला असता का?
हे आवर्जून लिहिण्याचं कारण असं की भारतात माझ्या पिढीत वर्गातल्या एखाद्या लहान मुलानी/मुलीनी डब्यात नॉनव्हेज आणलं तर त्याला बाजूला बसून जेवायला लागायचं. किंवा मुस्लिम लोक बीफ खातात म्हणून त्यांच्याबरोबर डबाच खायचा नाही अशी ताकीद लहान मुलांना घरून दिली जायची (मुळात मैत्री आडनाव विचारून करायची अशी शिकवणच आधी दिली जायची). माझ्या मुलाच्या पिढीत जग बदललं आहे असं वाटायला वाव होता पण पाळणाघरं सरळ, "आम्ही फक्त अंडं 'अलाऊ' करतो डब्यात कारण इथे अनेक व्हेजिटेरियन मुलं येतात' असं त्यांच्या सुरुवातीच्या ओळख परेडमध्ये सांगतात (आणि मुलांना रामरक्षा शिकवून देऊ असंही आश्वासन देतात).
मुंबईतली मोठमोठाल्या टॉवरमधली शाकाहारी लोकांची झुंडशाही तर सर्वश्रुत आहे.

आपण शाकाहार इतका नॉर्मलाईझ केला आहे की मुस्लिम लोक भाज्या खातात म्हणून ते तितके वाईट नाहीत असं सर्टिफिकेट आपण त्यांना देतो आहोत का?

अर्थात प्रियांका शाकाहारी आहे म्हणून, आणि हा लेख तिच्या दृष्टिकोनातून आहे म्हणून असं वाटणं साहजिक आहे. ते मी समजू शकते. पण त्यापकीकडे जाऊन त्याच्यावर विचार व्हायला हवा.
याच गोष्टीची दुसऱ्या बाजूची गंमत अशी की अनेक भारतीय हिंदू लोक अशा देशांत स्थायिक होतात जिथले लोक खरंच सकाळसंध्याकाळ वेगवेगळ्या प्रकारचा मांसाहार करतात आणि त्यात गोमास आवर्जून येतं. पण तेव्हा बहुसंख्यांक मांसाहारी लोकांबरोबर सार्वजनिक ठिकाणी जेवताना त्यांना स्वतः वेगळं बसून जेवायला आवडत नाही. बीफ खाणाऱ्या सहकाऱ्याशेजारी बसून लोक शाकाहारी पदार्थ खायला तयार असतात.
एखाद्या ब्राम्हण व्यक्तीला ती बीफ/पोर्क सगळं खाते हे आपण किती लिबरल आहोत हे दाखवण्यासाठी उघडपणे वापरता येतं याचं कारणही तिचं प्रिव्हिलेज असतं. कारण अजूनही हिंदू धर्मातील खालच्या जातींमधल्या लोकांना त्यांच्या मांसाहारी खाद्य संस्कृतीबद्दल कुठलेही गंड न बाळगता बोलणं अवघडच जातं (शाहू पाटोळे यांचं 'अन्न हे अपूर्णब्रम्ह' या संदर्भात वाचनीय आहे). त्यात मुस्लिम लोकांचा मांसाहार म्हणजे तर तौबा तौबा!

जरा विचार केला की असं लक्षात येतं की आपल्याला आपल्यापेक्षा 'सुपीरियर' वाटणाऱ्या लोकांचा मांसाहार आपण आनंदाने मान्य करत असतो. आपण कधी एखादी अमेरिकन, फ्रेंच किंवा पोलिश व्यक्ती शाकाहारी आहे म्हणून ती कमी भीतीदायक आहे असं म्हणत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(आगाऊ इशारा: प्रतिसादात (नेहमीपेक्षाही) बरेच अवांतर होण्याची शक्यता प्रचंड आहे. अत एव, प्रतिसाद आपापल्या जबाबदारीवर वाचावा.)

पण या वाक्यांचा सूर असा वाटतो आहे की, "मुस्लिम लोकही भाज्या खातात! मग ते नक्कीच भीतीदायक नाहीत!"

मुद्दा नक्कीच रोचक आहे, परंतु, टू पुट इट इंटू पर्स्पेक्टिव…

अर्थात प्रियांका शाकाहारी आहे म्हणून, आणि हा लेख तिच्या दृष्टिकोनातून आहे म्हणून असं वाटणं साहजिक आहे.

लेखिका शाकाहारी आहे, यापेक्षासुद्धा, मांसाहार म्हणजे काहीतरी भयंकर, असा समज असणाऱ्या वातावरणात वाढलेली आहे, हे लक्षात घेणे येथे महत्त्वाचे आहे. (अवांतर: कदाचित not to that extent, परंतु, Been there, Done that. सुदैवाने, बऱ्याच लहान वयात इतर मनुष्यप्रकारांस जरी विशेष नाही, तरी इतर खाद्यप्रकारांस एक्स्पोझर मिळाल्याकारणाने –आणि घरात किमानपक्षी आईवडिलांचा विरोध नसल्याकारणाने, आणि त्यातही वडिलांचा असलाच, तर सक्रिय पाठिंबाच असल्याकारणाने – the damage was not severe, nor was it permanent. परंतु ते एक असो. सांगण्याचा मतलब इतकाच, की although I cannot personally subscribe to or identify myself with that kind of thinking, I am familiar with it, and can quite understand where it comes from (although I do not necessarily have to agree with it).)

A person’s thinking is ultimately the product of the person’s environment, हे जर लक्षात घेतले, तर लेखिकेच्या तत्कालीन संस्कार तथा मर्यादित एक्सपोझरच्या (आफ्टर ऑल, लहानपणी कोणाला विस्तृत एक्सपोझर असते?) परिप्रेक्ष्यातून पाहिले असता, (१) शाकाहार हेच जीवन तथा मांसाहार हाच मृत्यू (किंवा, पर्यायाने, शाकाहारे निधनं श्रेयः मांसाहारो भयावहः) —> (२) मुसलमान लोक निव्वळ मांसाहार करतात (ऐकीव माहिती), अत एव ते भयानक असले पाहिजेत —> (३) अरेच्या! मुसलमान लोकही भाज्या खातात तर! (किंवा, मुसलमान लोक भाज्याही खातात तर!) (मर्यादित परंतु प्रत्यक्ष अनुभव), अत एव, आपण उगाच घाबरत होतो मग त्यांना! हा विचारप्रवाह/विचारप्रवास, तद्दन चुकीचा असेलही कदाचित (नव्हे, in absolute terms, आहेच!), तरीही, एका तर्काच्या धाग्यास धरून आहे, हे निदान मी तरी नाकारू शकत नाही. (शिवाय, अर्ध्या-भरलेल्या-पेल्याच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, कदाचित हे प्रगतीचे पहिले पाऊल मानता येऊ नये काय? हं, प्रगतीचे अंतिम टोक गाठले, असे मानायचे कारण नाही (तसेही, प्रगतीला अंतिम टोक नसतेच.), आणि, आजमितीससुद्धा जर लेखिका (किंवा तुम्ही/आम्ही/कोणीही) असाच विचार करीत असेल, तर त्यात कौतुकास्पद असे अर्थात काही नाही. परंतु, त्या ‘अरेच्या!’ क्षणाचा स्नॅपशॉट म्हणून, आणि कदाचित प्रगतीची सुरुवात म्हणून, या विचाराची दखल निश्चितच घेता यावी, असे मला तरी वाटते. (लेखिकेनेही ते वर्णन त्या ‘अरेच्या!’ क्षणाचा स्नॅपशॉट म्हणूनच केलेले आहे, असे जाणवते; त्यामुळे, irrespective of how her thought processes may or may not be as of today, I, for one, would certainly not judge her by that single thought of yore.)

किंवा मुस्लिम लोक बीफ खातात म्हणून त्यांच्याबरोबर डबाच खायचा नाही अशी ताकीद लहान मुलांना घरून दिली जायची (मुळात मैत्री आडनाव विचारून करायची अशी शिकवणच आधी दिली जायची).

आमच्या (सदाशिव पेठेतल्या) प्राथमिक शाळेत औषधालादेखील एकही मुसलमान (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, हिंदवेतर) विद्यार्थी नव्हता. (स्थानमाहात्म्य! अर्थात, कशास झक मारावयास येईल?) आमच्या (सदाशिव तथा नवी या दोन पेठांच्या बॉर्डरलाइनीवर असलेल्या) माध्यमिक शाळेत मी असताना पाचवी ते दहावी सर्व वर्गांतून मिळून मोजून दोन होते (ते आमच्या शाळेत कसे आणि का आले, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक!); पैकी एकच, आणि तोही केवळ मी दहाव्या इयत्तेत असताना तेवढ्या एका वर्षापुरताच, माझ्या वर्गात होता; आणि, त्याच्याबरोबर डबा खाण्याचा प्रसंग कधी आला नाही. त्यामुळे, तो डब्यात काय आणत असे, याबद्दल कल्पना नाही. किंबहुना, त्याने वर्गात कधी डबा आणल्याचेही मला आठवत नाही. (आता, मुसलमान जेवत नाहीत, असा यावरून निष्कर्ष काढण्याचे तेव्हाही माझ्या डोक्यात आले नाही, आणि आजही तसे वाटत नाही.) किंबहुना, कधी अधूनमधून मागच्या बाकावर बसून त्याने नाही नाही त्या अरबटचरबट विषयांवर माझे उद्बोधन करावे, झालेच तर, कधी मी मागच्या बाकावर बसून भलत्याच कोठल्यातरी विषयाच्या तासाला, समोर शिक्षक काय शिकवताहेत याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, हिंदीचा राहिलेला गृहपाठ वर्गात पूर्ण करीत असलो, तर याने ‘अरे, यार, घरी मी हीच भाषा बोलतो, माझे ऐक!’ असे म्हणून माझ्या हिंदीतल्या नसलेल्या चुका अत्यंत आत्मविश्वासाने ‘सुधारून’ माझा गृहपाठ बिघडवावा, इतपत वर्ग‘मैत्री’ (or, whatever qualified for it in those days) आमच्यात निश्चितच होती; मात्र, ‘घरी तू काय खातोस?’ हा प्रश्न मी त्याला किंवा त्याने मला, विचारायचे दोघांनाही कधीही सुचले नाही. तर तेही एक असो.

सर्वसामान्यपणे कुणाचं आदरातिथ्य करताना यजमान नेहमीच पाहुण्यांच्या शाकाहारी असण्याची दखल घेत असतात.

हे एक अत्यंत broad आणि तितकेच धाडसी विधान आहे, असे अतिशय विनम्रपणे सुचवू इच्छितो. याबद्दल संमिश्र अनुभव आहेत. (Now you really got me talking.)

- सर्वप्रथम, शाकाहारी लोकांना पुष्कळदा (उघड किंवा सुप्त/अभावित) attitudes असतात, हे मी मुळीच अमान्य करीत नाही.

- परंपरेने मांसाहारी हिंदू लोक बहुधा बोलावलेल्या पाहुण्याच्या शाकाहाराची दखल घेताना दिसतात खरे, परंतु यातही वेगवेगळ्या degrees अनुभवलेल्या आहेत. (पुढील विवेचन हे बहुतकरून परंपरेने मांसाहारी हिंदू लोकांपुरतेच मर्यादित ठेवलेले आहे. याला कारणे अनेक आहेत. एक तर, भारतीय बिगरहिंदूंच्या घरी जेवण्याचा मला फारसा अनुभव नाही. त्यातूनही कधी तसा प्रसंग आलाच, तरीही, मी शाकाहारी अथवा शाकाहाराची (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोठल्याच आहाराची) मर्यादा स्वतःवर घालून घेणारा नसल्याकारणाने, माझ्या (नसलेल्या) शाकाहाराची दखल घेण्याची mine hostवर वेळ येऊ नये, त्यामुळे, I shall never know. त्यातूनही, एखाद्या शाकाहारी व्यक्तीसमवेत (उदा., माझ्या (आता दिवंगत, परंतु तेव्हा हयात) आईसोबत, वगैरे) एखाद्या बिगरहिंदूच्या (उदा., एखाद्या पारशी व्यक्तीच्या, वगैरे) घरी जाऊन जेवण्याचे जे काही अत्यल्प अनुभव मला आहेत, ते (संबंधित शाकाहारी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले असता) अत्यंत चांगले असेच आहेत. मात्र, असे अनुभव मुळात संख्येने अतिशय कमी असल्याकारणाने, त्यांच्यावरून extrapolate करून चांगल्या अथवा वाईट अशा कोणत्याच निष्कर्षांप्रत झेप मी घेऊ इच्छीत नाही. Let us, therefore, for the purpose of our discussion, limit ourselves to traditionally meat-eating Hindus.)

- यांपैकी काही लोक हे खरोखरच, genuinely, आणि मनापासून, पाहुण्याच्या शाकाहाराची दखल घेत असावेत, नि त्याचा आदर करीत असावेत, याची शक्यता नाकारण्याचे काहीच कारण मला दिसत नाही. (After all, there is no logical reason why unicorns should not exist. असो; विनोदाचा भाग तूर्तास सोडून देऊ. मला वाटते, जुन्या पिढ्यांमध्ये असे लोक थोडेफार तरी असावेत. (चूभूद्याघ्या.))

- मात्र, अनेकदा, ही दखल केवळ कर्तव्य म्हणून, त्यातही afterthought म्हणून, कदाचित noblesse oblige म्हणून घेण्यात आलेली आहे, हे स्पष्ट जाणवते.

- अनेक पाहुणे असतील, आणि त्यातील काही थोडेच जर शाकाहारी असतील, आणि यजमान/यजमानीणबाई जर परंपरेने मांसाहारी असतील, तर अनेकदा हे प्रकर्षाने जाणवते. एखादाच शाकाहारी पदार्थ ‘शाकाहाऱ्यांकरिता म्हणून’ वेगळा केलेला असतो, त्यावर (विशेषेकरून (मांसयुक्त) मुख्य पदार्थाच्या तुलनेत) काहीच मेहनत घेतलेली नसते, सर्व उपस्थित त्या (मांसयुक्त) मुख्य पदार्थाबद्दल mine hostessचे वारेमाप (नि वारंवार) कौतुकच काय करतात, मग मध्येच आठवण झाल्यासारखे करून त्या शाकाहारी व्यक्तीला ‘अग, तू पण घे ना!’ म्हणून त्या (एकाच!) शाकाहारी पदार्थाचा मिळमिळीत नॉन-आग्रह काय करतात… विचारू नका.

(याचे टोकाचे उदाहरण म्हणून माझ्या लहानपणीची माझी (रादर, माझ्या आईची) आठवण सांगतो. आमच्या तीर्थरूपांच्या मित्रांची पार्टी पैकी एका मित्राच्या घरी ठरली. पार्टीला सर्व मित्रांस सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण. Mine host परंपरेने मांसाहारी. एका प्रतिष्ठित कॉलनीत राहणारी प्रतिष्ठित मंडळी, वगैरे. आमंत्रित मित्रांपैकी सर्वजण पारंपरिक मांसाहारी नसले, तरी नैमित्तिक मांसाहार करणाऱ्यातले. मुलांचीही तीच गत. मात्र, स्त्रियांपैकी माझी आई नि आणखी एक जण, अशा दोघीजणी शाकाहारी. जेवणाची वेळ झाली, तशी mine hostessमी अचानक लक्षात आल्यासारखे करून लांब जीभ काढून ‘अय्याऽऽऽऽऽऽ! तुम्ही खात नाही, नाही का? विसरलेच मी! नेमके काही व्हेजिटेरियन केलेले नाहीये, नि पटकन करता येण्यासारखे नाहीये… बरे, कालचा भात थोडा शिल्लक आहे, तो फोडणीचा करून दिला, तर चालेल का?’ म्हणून दोघींना विचारलेनीत्.

आता वास्तविक, सीकेपी लोकांत वालाचे बिरडे वगैरे शाकाहारी पदार्थ अत्यंत चांगले बनवितात, असे ऐकून आहे. (ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.) त्यामुळे, प्रस्तुत सुगृहिणींना ‘आमच्यात तसले (पक्षी: शाकाहारी) खात नाहीत’ म्हणून मिजास मारण्याचे खरे तर काही कारण नव्हते. परंतु, आता असते काही जणांना झग्यातून पडल्यासारखे वागण्याची सवय, त्याला कोण काय करणार?)

- त्यात पुन्हा, समजा, एखाद्या दांपत्यास पाहुणे म्हणून बोलावलेले आहे. (ग्रूप पार्टी वगैरे नाही; केवळ एक दांपत्य निमंत्रित आहे.) पैकी, उदाहरणादाखल, समजा नवरा अपारंपरिक/नैमित्तिक मांसाहारी आहे, नि पत्नी शाकाहारी आहे. अशा वेळेस, ते एक ‘राखीव’ शाकाहारी व्यंजन नेहमीप्रमाणे असतेच, ते ‘खासे’ मांसयुक्त पक्वान्नही असते. नेहमीचा उर्वरित प्रोटोकोल तर लागू होतोच, परंतु त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे, तो जो अपारंपरिक/नैमित्तिक मांसाहारी आमंत्रित असतो, त्याला ते मांसयुक्त व्यंजन आग्रहाने वारंवार खिलविले जाते, आणि त्याचबरोबर त्याच्या ‘नॉनव्हेज खाण्या’चे कौतुक केले जाते (यात कौतुक करण्यासारखे नक्की काय असते, हे एक ते जाणोत, नि दुसरा तो एक परमेश्वर (असलाच, तर) जाणे!), नि ती जी शाकाहारी आमंत्रित असते, ती (रिवाजाप्रमाणे) दुर्लक्षित राहाते.

- आणखीही एक प्रकार असतो, थेट शाकाहाऱ्यांच्या संदर्भातला म्हणता येणार नाही, परंतु… कसला, ते तुम्हीच ठरवा.

समजा, पाहुणा अपारंपरिक/नैमित्तिक मांसाहारी आहे, नि एकटाच आहे. Hosts पारंपरिक मत्स्याहारी आहेत. प्रेमाने आमंत्रिताला मासे खाऊ घालतील. आमंत्रितही ते आवडीने खाईल. (इथवर ठीकच आहे.)

मात्र, तो ते खात असताना, तो एखाद्या झूमधील एक्झिबिट असल्यासारखे, त्याच्या हलणाऱ्या तोंडाचे नि माशाचे काटे काढतानाच्या त्याच्या हालचालींचे टक लावून निरीक्षणच काय करतील, वर (तो खात असतानाच) ‘अय्याऽऽऽऽऽऽ… हा (भट असूनदेखील – हे अध्याहृत.) बाजार (सारस्वतांचा मासळीकरिता शब्द) कसा व्यवस्थित, काटे साफसूफ करून खातो, नॉऽऽऽऽऽय? (अगदी आपल्यासारखा! – हे अध्याहृत.)’ अशी सानुनासिक हेलयुक्त कौतुकवजा रनिंग कॉमेंटरीच काय करतील… (हे ‘कौतुक’ पहिल्यांदा, अगदी दुसऱ्यांदासुद्धा ऐकायला बरे वाटू शकते; सत्ताविसाव्या वेळेस ऐकल्यावर ते करणाऱ्याचा गळा घोटावासा वाटू लागतो. अरे, भोसडीच्यो, काटे साफसूफ करून बाजार खाणाऱ्या भटाचे अप्रूप तुम्हांस असेल! असो बापडे, तुमचे एक्सपोझर जर तितपतच असेल, तर तो तुमचा प्रश्न आहे. परंतु, त्या भटासदेखील त्याचे तेवढेच अप्रूप नक्की काय म्हणून वाटावे – किंबहुना, त्यात काही विशेष असे नक्की काय म्हणून वाटावे – असे तुम्हाला वाटते?)

एकंदरीत हा सगळा प्रकार बघता, सुरुवातीस जोवर लक्षात येत नसते, तोवर ठीक असते, परंतु, लक्षात येऊ लागल्यावर, पारंपरिक मांसाहारी हिंदूकडून (त्याला जेवणाचे पैसे देऊन अधिक वरती टिप मोजण्याची सोय असल्याखेरीज) सामिष अन्नग्रहण शक्य तोवर करू नये, अशा निष्कर्षाप्रत निदान मी तरी पोहोचू लागलेलो आहे.

(त्यापेक्षा माझ्या कोकणस्थ ब्राह्मण परममित्राच्या घरी जाऊन ग्रिलवर स्टेक भाजून खाल्लेला परवडतो. एक तर (तोही माझ्यासारखा भटच असल्याकारणाने) साल्याला ॲटिट्यूड नसते. वर दोघेही ‘पारंपरिक’ नसल्याकारणाने, दोघांचीही expertise level तितपतच असते, त्यामुळे, anything goes. दोघांनीही एकमेकांचे अहो रूपमहो ध्वनिः करण्याचीही काहीच गरज नसते. बाजूला आमच्या दोघांच्याही शाकाहारी बायका आम्हाला तोंडावर शिव्या देत आपल्याकरिता काहीतरी शाकाहारी बनवितात, आम्हालाही खिलवितात. आम्ही स्टेकही खातो, बायकांनी बनविलेले शाकाहारीही खातो, नि बायकांच्या शिव्याही खातो. Everybody is happy. आयुष्यात आणखी काय पाहिजे? ग़र फ़िर्दौस बर्-रूहे जमीं अस्त…)

असो, तर सांगण्याचा मुद्दा:

१. शाकाहारी असो वा मांसाहारी, attitudes दोघांनाही असतात.

२. वरील सर्वाच्या प्रकाशात, नक्की कोणी नक्की कशाला नॉर्मलाइझ केलेले आहे, हे सांगणे कठीण आहे. (माझ्या अंदाजाप्रमाणे, जो तो आपल्याला जे नॉर्मल वाटते, त्यास नॉर्मलाइझ करू पाहात असावा.)

—————

ॲटिट्यूडचा आणखी एक मासला. १९९०-९१सालाकडली गोष्ट. त्या वेळेस मी पुण्यात नोकरी करीत होतो. एक ख्रिस्ती सहकर्मचारी होता, पोरगेलासा होता, त्याला घेऊन एकदा कँपात काही कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यानंतर तेथेच काहीतरी चरावे म्हटले, तर हा मला (अर्थात अगोदर विचारून) ‘बर्गर किंग’ नावाच्या एका (आंतरराष्ट्रीय बर्गर किंग चेनशी काहीही संबंध नसलेल्या) तत्कालीन रेष्टारंटात घेऊन गेला. दोघांनी आपापले बर्गर खाल्ले. तत्पूर्वी कधी बीफ खाण्याचा संबंध मला आला नव्हता. पहिलीच वेळ. नंतर हाच ऑफिसात जाऊन उड्या मारू लागला, ‘अरे, याने पहिल्यांदा बीफ खाल्ले रे, Cause celebre’ वगैरे. म्हटले शिंच्या Cause celebre कसले रे? मला कधीतरी खाऊन पाहायचेच होते, पण पूर्वी कधी हा पदार्थ माझ्या वाटेस आला नव्हता. आज आला, तर खाऊन पाहिला – Simple! पण यात तुला उड्या मारायला काय झाले?

आता, यात नक्की कोणी नक्की कशाला नॉर्मलाइझ केले, ते तुम्हीच सांगा!

एखाद्या ब्राम्हण व्यक्तीला ती बीफ/पोर्क सगळं खाते हे आपण किती लिबरल आहोत हे दाखवण्यासाठी उघडपणे वापरता येतं

असेच काही नाही. मी (बादवे, ब्राह्मण) बीफ, पोर्क (आणि इतरही बरेच काही) यातले जे जे काही खातो, ते (१) मला आवडते म्हणून खातो, आणि/किंवा (२) कुतूहल (‘साला हे पण कधीतरी खाऊन बघितले पाहिजे’) म्हणून खातो, आणि/किंवा (३) का नाही? म्हणून खातो.

उलटपक्षी, या गोष्टी खाल्ल्याबद्दल मी जाहीर प्रतिपादन जेव्हा करतो, तेव्हा ते सहसा त्यातून कोणी इरिटेट/ग्रोस आउट/स्कँडलाइझ होण्यासारखे जर असेल, तर त्यांना इरिटेट/ग्रोस आउट/स्कँडलाइझ करण्याकरिता करतो. (नाहीतर काय पॉइंट आहे?)

लिबरलपणाचा दोहोंशीही अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.

जरा विचार केला की असं लक्षात येतं की आपल्याला आपल्यापेक्षा 'सुपीरियर' वाटणाऱ्या लोकांचा मांसाहार आपण आनंदाने मान्य करत असतो.

साशंक आहे. मला स्टेक आवडतो, निहारी, पायादेखील आवडतात (ऑल्दो पायामधले तवंग पाहून बायको ग्रोस आउट होऊन बोंबलते, नि शक्य तोवर खाऊ देत नाही. परंतु, ते सोडा.), साशिमी (अनभिज्ञांकरिता: जपानी कच्चे मासे) आवडते, नि एस्कार्गो (अनभिज्ञांकरिता: फ्रेंच गोगलगायी) हेदेखील आवडतात. आता, अमेरिकन (कोठल्याही वर्णाचे), दक्षिण आशियाई मुसलमान, जपानी, आणि फ्रेंच, यांपैकी मी तरी कोणालाही माझ्याहून सुपीरियर (किंवा इन्फीरियर) मानीत नाही. हं, त्यांच्या मांसाहाराच्या निवडीवरून मी नेमके कोणाला सुपीरियर नि कोणाला इन्फीरियर मानणे अपेक्षित आहे, हे मात्र मला समजू शकत नाही. असो.

आपण कधी एखादी अमेरिकन, फ्रेंच किंवा पोलिश व्यक्ती शाकाहारी आहे म्हणून ती कमी भीतीदायक आहे असं म्हणत नाही.

उजवे पांढरे अमेरिकन गननट मला भीतीदायक वाटतात. आता, या विशिष्ट डेमोग्राफिकमध्ये शाकाहारी मनुष्य भेटणे निव्वळ अशक्य. त्यामुळे, एखादा पांढरा शाकाहारी अमेरिकन भेटल्यास (तसा कोणताही कार्यकारणभाव सकृद्दर्शनी दाखविता येण्यासारखा नसतानासुद्धा) मला तो कमी भीतीदायक वाटू शकतो.

(अर्थात, तसे मी म्हणून दाखविणार नाही, हा भाग वेगळा.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रतिसाद सबंध वाचून त्यात येणाऱ्या शाब्दिक दलदलीत मृत्युमुखी पडावं की तो न वाचता दुर्लक्ष करावं, असा विचार करून मी compromise म्हणून तो धावता वाचला.
I am with you until "‘अरेच्या!’ क्षणाचा स्नॅपशॉट म्हणून, आणि कदाचित प्रगतीची सुरुवात म्हणून, या विचाराची दखल निश्चितच घेता यावी, असे मला तरी वाटते."
पण असे साक्षात्कार होण्याच्या पुढे एक पायरी असते ती या लेखात आली नाही हे मला नोंदवायचं आहे.
शाकाहार/मांसाहाराबद्दल असलेली माझी निरीक्षणं ही लेखिकेला जज करण्यासाठी नव्हेत.
"अय्या! मुसलमान सकाळ संध्याकाळ गोमांस खात नाहीत!"
यापुढे काही दिवसांनी/महिन्यांनी/वर्षांनी
"कुणीही काहीही शिजवून खाल्लं तर आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या स्नेहात का फरक पडावा?"
असं या एम्पिरिकल प्रयोगाचं पुढचं स्टेशन असावं असं मला वाटलं.

शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही attitude असतात हे मान्य आहे.
पण भारतात मांसाहार विरोध आता फक्त attitude पुरता राहिला आहे का ती राजकीय भूमिका झाली आहे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रतिसाद सबंध वाचून त्यात येणाऱ्या शाब्दिक दलदलीत मृत्युमुखी पडावं की तो न वाचता दुर्लक्ष करावं

माझे (वा अन्य कोणाचेही) प्रतिसाद वाचावेत की नाही, हे ठरविणे (आणि तेही कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाविना), हे अर्थातच आपले prerogative आहे. Not my headache. त्यामुळे, आपला पास.

असा विचार करून मी compromise म्हणून तो धावता वाचला.

माझे प्रतिसाद आपण (किंवा अन्य कोणीही) वाचण्यावर वा न वाचण्यावर (किंवा धावते वाचण्यावर) माझा उदरनिर्वाह, चरितार्थ वगैरे अवलंबून नाही. त्यामुळे, Thanks, but no thanks.

Now, having settled that and put out of the way…

पण असे साक्षात्कार होण्याच्या पुढे एक पायरी असते ती या लेखात आली नाही हे मला नोंदवायचं आहे.

ती पायरी आली की नाही, हे समजण्याचा कोणताही मार्ग लेखातून उपलब्ध नाही, हे आपले निरीक्षण योग्यच आहे. मात्र, उलटपक्षी, तशी पायरी आलेली असल्यास, त्याची लेखात नोंद करावी किंवा न करावी, हे ठरविण्याचे prerogative लेखिकेचे आहे; अर्थात, तशी नोंद करण्यास लेखिका बांधील नाही. (Whatever the cost to her narrative thereby notwithstanding.)

तूर्तास तरी मी (१) अशी पायरी लेखिकेचा आयुष्यात आली नाही, किंवा, (२) अशी पायरी लेखिकेच्या आयुष्यात आली, यांपैकी कोणत्याच निष्कर्षाप्रत झेप घेणार नाही.

(In any case, I don’t think that such a revelation, one way or the other, would be very relevant to her narrative. So, to me, it does not matter.)

"अय्या! मुसलमान सकाळ संध्याकाळ गोमांस खात नाहीत!"
यापुढे काही दिवसांनी/महिन्यांनी/वर्षांनी
"कुणीही काहीही शिजवून खाल्लं तर आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या स्नेहात का फरक पडावा?"
असं या एम्पिरिकल प्रयोगाचं पुढचं स्टेशन असावं असं मला वाटलं.

या लेखात जे काही वर्णिलेले आहे, ते (माझ्या समजुतीप्रमाणे) लेखिकेला आलेल्या अनुभवांचे, त्यातून होत गेलेल्या तिच्या वैचारिक जडणघडणीचे, आहे तसे (आणि माझ्या मते अत्यंत प्रामाणिक) वर्णन आहे. लेखिकेने तो कोणताही एम्पिरिकल प्रयोग म्हणून योजलेला असल्याचे जाणवत नाही (किंवा तसा काही उल्लेख केल्याचेही आढळत नाही), किंवा, अमूक एका predetermined logical conclusionकडे डोळे ठेवून त्याप्रमाणे त्या दिशेने जाणूनबुजून वाटचाल केल्याचेही आढळत नाही. (किमानपक्षी, लेखिकेने असा काही दावा केल्याचे मला तरी आढळले नाही.)

एम्पिरिकल प्रयोग, पुढची पायरी वगैरे हे सर्व तुमचेआमचे constructs आहेत. लेखिकेवर ते अर्थातच बंधनकारक नाहीत. लेखिकेने फक्त जे झाले, ते तिच्या शब्दांत प्रामाणिकपणे मांडले आहे; तुमच्याआमच्या अपेक्षांबरहुकूम तिने त्यात (नसलेले) बदल करण्याचे काहीच कारण निदान मला तरी दिसत नाही.

समांतर उदाहरण सांगतो. गांधीजींचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ कदाचित तुम्ही वाचले असतील. (किंवा नसतीलही. त्याने फरक पडू नये.) आता, ते वाचीत असताना, त्यात त्यांनी मांडलेल्या अनुभवांवरून झालेल्या (त्यांनी मांडल्याप्रमाणे) त्यांच्या impressionsशी, त्यातून त्यांनी काढलेल्या निष्कर्षांशी तथा त्यातून (त्यांनी मांडल्याप्रमाणे) झालेल्या त्यांच्या वैचारिक वाटचालीशी मी सहमत असेनच, असे नाही, असे अनेक ठिकाणी जाणवल्याचे आठवते. मात्र, (निदान त्या पुस्तकापुरते तरी) ते काय घडले/घडत गेले त्याचे वर्णन असून (गांधीजींच्या मते) काय घडायला पाहिजे, याचे प्रिस्क्रिप्शन नाही, हे लक्षात घेता, Who am I to deny Gandhiji his experiences or his thought processes? Moreover, who am I to deny him his narrative? तसेच आहे हे काहीसे.

पण भारतात मांसाहार विरोध आता फक्त attitude पुरता राहिला आहे का ती राजकीय भूमिका झाली आहे?

राजकीय भूमिका झालेली तर आहेच (ती कशाचीही होऊ शकते!), आणि ती चिंतेची बाब आहे, आणि तिचा शक्य तितका विरोध (आणि जमल्यास प्रतिकार) अवश्य व्हायला हवा, हे तर उघड आहे. मात्र, येथे (राजकीय भूमिका झालेला) मुद्दा हा शाकाहाराचा (वा मांसभक्षणविरोधाचा) नसून, (मुसलमानांच्या/हिंदवेतरांच्या/in the ultimate analysis, कोणाच्याही) गोमांसभक्षणविरोधाचा आहे, हे अधोरेखित करणे येथे प्राप्त आहे.

१. गोमांसभक्षणविरोधाच्या संदर्भात (कदाचित फुटकळ व्यक्तिगत उदाहरणे वगळल्यास) बाधित मुसलमानांनी पारंपरिक मांसभक्षी (परंतु बहुतकरून अ-गोमांसभक्षी) हिंदूंशी, किंवा, त्याहीपेक्षा, पारंपरिक मांसभक्षी (परंतु, बहुतकरून अ-गोमांसभक्षी) हिंदूंनी बाधित मुसलमानांशी common cause करून बोंबाबोंब केल्याचे विशेष काही दाखले पाहावयास मिळालेले नाहीत.

२. अयोध्येच्या परिसरात उत्तरप्रदेश सरकारने नुकतीच मांसाहारी उपाहारगृहांवर बंदी आणल्याचे ऐकले. बाधित मुसलमान उपाहारगृहचालकांनी साहजिकपणे त्याबद्दल बोंबाबोंब केली. पारंपरिक हिंदू मांसभक्षकांनी बहुसंख्येने त्याविरूद्ध आवाज उठविल्याबद्दल अद्याप तरी ऐकण्यात आलेले नाही. In fact, the silence so far has been deafening.

३. फार कशाला, गोमांस खाण्याच्या (खऱ्याखोट्या) आरोपांवरून (मुसलमानांना) बदडून काढणाऱ्या मंडळींपैकी सर्व किंवा बहुसंख्य मंडळी ही शाकाहारी (किंवा मांसाहारविरोधक) आहेत, असे मानण्याचे कोणतेही कारण निदान आजपावेतो तरी माझ्या निदर्शनास आलेले नाही.

हे सर्व लक्षात घेता, हा जो राजकीय विरोध आहे, तो नक्की कोणाला आहे, नक्की कशावरून आहे, आणि नक्की (कोणा)कोणाचा आहे, हे मला वाटते स्वयंस्पष्ट आहे. उगाच शाकाहारी attitudesचे, झालेच तर सरसकट मांसभक्षणविरोधाचे, मांसभक्षणविरोधाच्या राजकीयीकरणाचे नसलेले फ़िज़ूल मुद्दे त्यास ओढूनताणून चिकटविण्यात काही हशील निदान मला तरी दिसत नाही.

(साधी गोष्ट घ्या. समजा उद्या तमाम बृहन्मुंबई परिसरात सक्तीची संपूर्ण मांसबंदी आणली. ‘कुलाब्यापासून दहिसरपर्यंत नि बोरीबंदरपासून मुलुंडपर्यंत एकपण नॉन-व्हेज हाटेल चालायचे नाय!’ असा कायदा आणला. (असा कायदा कोण आणणार, ते सोडून द्या. समजा, आणला.) तर, बाकीचे लोक सोडा, परंतु (उदाहरणादाखल) तुमचे ठाकरे तरी (कोठलेही) असला कायदा खपवून घेतील काय? परंतु, हाच कायदा जर गोमांसापुरता मर्यादित ठेवला, तर ठाकरे तर झालेच, परंतु मुंबईतील बहुतांश शाकाहारी तथा मांसाहारी हिंदू चकार शब्दानेही त्यास विरोध करणार नाहीत, याबद्दल खात्री आहे.

सांगण्याचा मतलब, राजकीय मुद्दा जो आहे, तो शाकाहाराचा अथवा मांसाहारविरोधाचा नसून, हिंदवेतरविरोधाचा – आणि त्यातही विशेषेकरून मुसलमानविरोधाचा – आहे. तो अर्थातच चिंताजनक आहे, याबद्दल दुमत नाहीच; फक्त, at least, get your issue straight, एवढेच सुचविणे आहे.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढा अख्खा प्रतिसाद काही मी वाचला नाही. मधलंमधलं वाचलं.

१. 'न'बांच्या आईच्या काळात आलेले अनुभव आणि आज भारतातल्या बातम्यांमध्ये दिसणारं हिंदुत्व यांचा परस्परांशी काही संबंध असल्यास कुणी स्पष्ट करावा. 'न'बांनी न सांगितलेलाच बरा. (एवढं वाचायला कुणाला वेळ आहे!)
२. गेली अनेक वर्षं विकसित देशात राहणाऱ्या, सुस्थित, ब्राह्मण पुरुषानं स्वतःचं व्हिक्टिमपण रंगवून रंगवून सांगणं गोडगुलाबी आहे. त्यातून उद्या १४ फेब्रुवारी आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या निमित्ताने, माझेही तुमच्यावर निरतिशय प्रेम आहे, इतकेच जाहीर करून खाली बसतो.

(बाकी, माझ्या प्रतिसादाचा आपल्या मगदुराप्रमाणे हवा तसा अर्थ लावण्याचे, झालेच तर माझ्या नॅरेटिवबद्दल तथा माझ्याबद्दल हवा तो निष्कर्ष काढण्याचे (तथा माझ्याबद्दल बरेवाईट मत बनविण्याचे) स्वातंत्र्य आपणांस आहेच. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देऊन त्यात कोणताही फेरफार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे कष्ट घेण्याची काही गरज निदान मला तरी वाटत नाही. सबब, चालू द्या.)

जाता जाता, पुन्हा एकदा: आय लौ यू, टू!

(इत्यलम्।)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सई. तुझ्या मताशी सहमत आहे. माझ्या बोलण्याचा खटकणारा सूर शैलीचा भाग म्हणून आलेला आहे. शेकडो, हजारो लोकांच्या मनात (माझ्यासकट) असलेले पूर्वग्रह, धारणा कशा सहजी (वरकरणी द्वेषमूलक न बोलताही) व्यक्त होतात, हे दाखवण्याचा भाग म्हणून टोन तसा आहे. बाकी विविध समूहांतल्या लोकांचा आहार अगदी उंदीर, मुंग्या, घुशीपांसून वेगगेवळ्या प्राण्यांचं मांस असलेला असतो, यात मला काहीही वावगं वाटत नाही किंवा त्यावरून ते लोक बरे-वाईट ठरवण्याचा प्रश्न येत नाही. मी मांसाहार न करणं हा माझा चॉईस किंवा अन्य कारणं आहेत. दुसरा एक अवांतर मुद्दा म्हणजे बहुसंख्य समाजाने- समाजातल्या प्रभावशाली व्यक्तींनी आपल्यावर मारा केलेल्या धारणा इतक्या प्रबळ असतात की त्या मागे सारून खरंच सत्यान्वेषी नजरेनं पाहणं, वेगळं काही शोधणं, आपल्याला काय दिसतंय, आपल्या अनुभवास काय येतंय हे तपासून मान्य करणं अवघड असतं, हा प्रवास सतत सुरू राहणारा आहे, माझाही सुरूच आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचं मतही बऱ्याचदा आपण - त्या व्यक्तीचा आपल्याला आलेला अनुभव यापेक्षा दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल काय म्हणते - यावरून करतो, जोखतो, 'अ'बदद्ल 'ब'ला काय वाटतं आणि 'ब' आणि 'क'चं नातं कसं आहे यावरून 'क'चं 'अ'शी असलेलं वर्तन आपोआप ठरूनसुद्धा जातं. इथे कधीकधी 'क' ला 'अ'चं सत्य स्वत:हून नि स्वतंत्रपणे पडताळावंसंही वाटत नाही किंवा 'ब' नि 'क'चे काय हितसंबंध आहेत - त्यात 'अ' चा काय रोल असणार आहे, यावरूनही 'अ'शी कसं वागायचं हे ठरलं जातं. हे असंबंध वा बादरायण संबंध असलेलं म्हणणं वाटू शकतं. पण माणसा-माणसांत द्वेष निर्माण होण्याची-करण्याची बीजं या साध्या प्रवृत्तीतनंही जन्म घेतात नि इतर घटक असतातच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था बंद पडलेली – वा पाडलेली (चूभूद्याघ्या.) – असल्याकारणाने, प्रतिसादातूनच ही पोच.)

प्रतिसादातील एक एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरीक्षणं मार्मिक आहेत. पण ह्यात एक मुद्दा असा की एका समाजगटाला दुसऱ्या कुठल्या समाजगटाची भीती वाटावी (मग ती भीती तर्काला धरून आहे की नाही हा मुद्दा वेगळा) किंवा कुठल्या समाजगटाची संगत किळसवाणी आणि नकोशी वाटावी यामागे ऐतिहासिक संदर्भ असतात. हिंदू आणि मुस्लिम समाज यांत काही ना काही कारणांनी गेली काही शतकं अधूनमधून तेढ होती हे निर्विवाद आहे. (अधूनमधून सख्य आणि सहजीवन सुद्धा होतं वगैरे नेहमीचे रोमिलाथापरष्टाईल डिस्क्लेमर समजून घ्या.)

फ्रेंच आणि ब्राम्हण (किंवा ब्राह्मण) यांचा सामायिक इतिहास तसा नाही. (दुप्ले आणि मद्रासचे कृष्णवर्णीय कृष्णम्माचारी यांच्यात थोडे दिवस तेढही असेलही कदाचित पण ते आता कुणालाच आठवत नाही.) त्यामुळे फ्रेंच लोकांनी बदकाचं सुजलेलं यकृत खाल्लं तरी ते ब्राम्हणांना (किंवा ब्राह्मणांना) धोकादायक वाटत नाही. हा मुद्दा ‘सुपीरियॉरिटी’चा नसून दोघांच्या सामायिक इतिहासात विशेष अप्रिय काही सापडत नाही हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>>>>फ्रेंच आणि ब्राम्हण (किंवा ब्राह्मण) यांचा सामायिक इतिहास तसा नाही. (दुप्ले आणि मद्रासचे कृष्णवर्णीय कृष्णम्माचारी यांच्यात थोडे दिवस तेढही असेलही कदाचित पण ते आता कुणालाच आठवत नाही.) त्यामुळे फ्रेंच लोकांनी बदकाचं सुजलेलं यकृत खाल्लं तरी ते ब्राम्हणांना (किंवा ब्राह्मणांना) धोकादायक वाटत नाही. हा मुद्दा ‘सुपीरियॉरिटी’चा नसून दोघांच्या सामायिक इतिहासात विशेष अप्रिय काही सापडत नाही हा आहे.

हे मला तितकंसं पटलं नाही.
भारतात येणाऱ्या फ्रेंच किंवा अमेरिकन कृष्णवर्णीयांना भारतीय लोक एखाद्या श्वेतवर्णीय फ्रेंच किंवा अमेरिकन माणसाला वागवतील तसे वागवतात का?
एवढंच काय, पूर्णपणे भारतीय असलेल्या उत्तरपूर्वेच्या राज्यांतील लोकांनाही (त्यांच्याबरोबर कुठलीही तेढ किंवा सामायिक इतिहास नसताना) अतिशय झीनोफोबिक वागणूक दिली जाते. आणि यामध्ये आवर्जून ते काय खातात (कुत्रे वगैरे) याचा उल्लेख केला जातो.
हिंदू धर्मातील खालच्या जाती वर्णव्यवस्थेने वाटून दिलेल्या कामांमुळे (मेलेल्या जनावराची विल्हेवाट कोण लावणार, कशी लावणार) गोमास खाऊ लागले. जनावराचे मास घेऊन त्याची चामडी (जी मौल्यवान असते) क्युअर करून जनावराच्या मालकाला परत करणे (अधिक तपशील पाटोळेंच्या पुस्तकात मिळतील). हा सामायिक इतिहास उच्चवर्णियांच्या फायद्याचा असला तरी त्यांच्या मांसाहाराकडे आदराने तर नाहीच पण अनास्थेनेही बघितले गेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा मुद्दा ‘सुपीरियॉरिटी’चा नसून दोघांच्या सामायिक इतिहासात विशेष अप्रिय काही सापडत नाही हा आहे.

महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू व हिंदुएतर लोकांच्या सहजीवनात पुन्हा उपविभागणी करावी लागेल. ख्रिश्चन,पारसी,ज्यु,जैन,बौद्ध,शीख इत्यादी (समजा) हिंदुएतर लोकांशी सहजीवनातील प्रियता व अप्रियता व मुस्लिम धर्मातील लोकांशी सहजीवनातील प्रियता व अप्रियता यांचाही इतिहास अभ्यासावा लागेल. हीच मांडणी पुढे एकाच धर्मातील जात्यांतर्गत/पंथांतर्गत सहजीवनातील प्रियता व अप्रियता यांना लागू करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ब्रह्मदेश मध्ये पण मुस्लिम विरोधी संघर्ष आहे तिथे तर सरकारी यंत्रणा वापरून देशाबाहेर काढण्याचे उद्योग झाले आहेत .
चीन मध्ये पण सरकारी यंत्रणा मुस्लिम विरोधी वागते .
अनेक किस्से असतात चीन मधील.श्रीलंकेत पण तेच आहे.
ऑस्ट्रेलिया ,मध्ये पण मध्ये काही घटना घडल्या.
सर्व ठिकाणी समान समाज घटक एक च आहे.
असे का घडतं ह्याचा विचार च जर कोणी करणार नसेल तर उपाय कसे शोधले जाणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिका उपाय सांगत नाही. तिचे अनुभव सांगतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही धर्मातील सामान्य लोकांचे संबंध चागले असतात.

पण ते जो पर्यंत वैयक्तिक पातळीवर असतात तो पर्यंत च.
असे का म्हणतो त्या साठी काही उदाहरणे.
ट्रेन मधील प्रसंग.
हिंदी भाषा असणारा व्यक्ती आणि मराठी भाषा असणारा व्यक्ती(इथे कोणत्याही भाषिक टाकता येतात)
ह्यांचे जर भांडण झाले अगदी मारामारी पर्यंत प्रकरण गेले तर
चूक कोणाची हा प्रश्न बाजूला राहतो आणि मराठी भाषिक मराठी व्यक्ती ची बाजू घेतात आणि हिंदी वाले हिंदी भाषिक व्यक्ती ची.
सरळ विभागणी होवून दोन व्यक्ती च्या भांडणाचे रुपांतर दोन भाषिक समुदाय मध्ये होते.
त्या प्रमाणे आपण आता जे घडले आहे त्या वरून हेच घडतं आहे हे सिद्ध होईल.

दोन व्यक्ती मधील वादाचे रुपांतर दोन धर्मातील,भाषेतील,जाती मधील समाजात होते.
हे घडू नये म्हणून.
चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर म्हणायचे धाडस असावे लागते.
संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच आपण आत्मसात केलेले असते
पण संघर्ष अन्याय विरुद्ध करा हे पुढचे वाक्य आपल्याला माहीत च नसते.
संघडीत व्हा संघर्ष करा पण अन्याय विरुद्ध नाही अन्याय करण्या करता.
हेच सर्व ठिकाणी दिसत आहे.
गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी संघटित पाठिंबा मिळणे.
फक्त तो गुन्हेगार जरी असला तरी आपल्या जाती चा आहे,धर्माचा आहे,भाषेचा आहे म्हणून.
दुसऱ्या पक्षाची न्याय बाजू असेल तरी संघटित होवून त्याच्या वर अन्याय केला जातो..
हे असे जे धार्मिक,जातीय संघटन समाजात झाले आहे.
त्या मुळे समाजात उभ्या ,आडव्या भेगा पडल्या आहेत.
मन कलुशित झालेली आहेत.
पूर्वग्रह आहेत
आणि सर्वात जास्त कमतरता आता जाणवत आहे ती विवेकशील,विचारी नेतृत्व आता भारतात नाही.
जे सर्व समाजाला एकत्र घेवून जाईल.
नेतृत्व वा शिवाय माणसाच्या समुदाय ला योग्य वळण दिले जावू शकतं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे अवांतरच आहे.

लहानपणी वर्तमानपत्रांमध्ये मुसलमान असा शब्द वाचल्याचं आठवतं. हल्ली वाचायला फक्त वर्तमानपत्रंच नाही, जोडीला समाजमाध्यमंही असतात. तिथे मुसलमान या शब्दाची जागा मुस्लिम या शब्दानं घेतलेली दिसते... म्हणजे सभ्य लोकांत, असभ्य लोक आणि त्यांची भाषा सोडून देऊ. हा बदलही इंग्लिशचा प्रभाव का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘चीन-ओ-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, मुस्लिम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा’ या इक्बालगीताबद्दल (होय, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ लिहिणारे ते हेच ते.) ऐकलेले नाहीत काय? (साहिर लुधियानवींनी याचेच पुढे ‘चीन-ओ-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, रहने को घर नहीं है, सारा जहाँ हमारा’ असे विडंबन केले होते. तर ते एक असो.)

इक्बाल हे तुमच्याच काय, माझ्याही (किंवा फॉर्दॅट्मॅटर पाकिस्तानच्यासुद्धा) जन्माच्या बऱ्याच वर्षांअगोदर वारले. म्हणजे, ‘मुस्लिम’ हा शब्द किमान तितक्या जुन्या काळापासून प्रचलित असावा, असे मानावयास जागा आहे.

(इक्बाल यांस सभ्य लोकांमध्ये गणण्यास मला वाटते तुमची हरकत नसावी.)

—————

बाकी, मूळ शब्द ‘मुस्लिम’ असाच आहे, ‘मुसलमान’ हा केवळ त्याचा फ़ारसी (की तुर्की? नक्की आठवत नाही, परंतु बहुधा फ़ारसीच.) पाठभेद आहे, आणि त्यामुळे हिंदुस्थानात अधिक प्रचलित आहे, असेही कोठेसे वाचल्याचे स्मरते. (नक्की संदर्भ सापडल्यास यथावकाश चिकटवितो.)

—————

ता.क.: जालावरून इकडूनतिकडून गोळा केलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे. मूळ अरबी शब्द ‘मुस्लिम’. त्याचा फ़ारसी पाठभेद ‘मुसलमान’. फ़ारसीतून ‘मुसलमान’ या स्वरूपात त्याची दोन दिशांनी वाटचाल झाली. एका बाजूस तो तुर्की भाषेत शिरला, आणि तुर्कांच्या संपर्कातून तो फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांनी उचलला. दुसरीकडे तो (विभिन्न फ़ारसीभाषक तथा क्वचित्प्रसंगी तुर्कीभाषक आक्रमकांच्या तथा सत्ताधीशांच्या संपर्कातून) उर्दूत तथा विविध दक्षिण आशियाई भाषांत शिरला. दक्षिण आशियात ‘मुसलमान’ हे रूप या कारणास्तव बऱ्यापैकी सामान्य वापरात आहे; मात्र, ‘मुस्लिम’ हे रूप वापरात नाही, असे नाही.

इंग्रजीच्या बाबतीत बोलायचे, तर इंग्रजीने ‘Muslim’ (किंवा त्याचा अपभ्रंश/स्पेलिंगभेद ‘Moslem’) हे रूप जसे उचलले, त्याचप्रमाणे ‘Mussulman’ (किंवा त्याचा स्पेलिंगभेद ‘Mussalman’) हे रूपदेखील उचलले. मात्र, ‘Mussulman’ किंवा ‘Mussalman’ ही रूपे पुढे फारशी वापरात राहिली नाहीत, नि आता ती फक्त जुन्या (बहुधा Colonial? चूभूद्याघ्या.) साहित्यात वगैरे क्वचित आढळतात. ‘Moslem’ हा पाठभेद त्या मानाने विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वगैरे टिकला, परंतु आजमितीस तो वापराकरिता फारसा शिष्टसंमत मानला जात नाही. (त्याव्यतिरिक्त, ‘Mohammedan’ किंवा ‘Mahomedan’ हेही एकेकाळी थोडेबहुत प्रचलित असलेले पर्याय आजमितीस त्याज्य किंवा आक्षेपार्ह मानले जातात. म्हणजे, आफ्रिकी वर्णांच्या लोकांकरिता ‘Negro’ हा एकेकाळचा प्रचलित शब्द आजमितीस जितका त्याज्य आणि आक्षेपार्ह मानला जातो, तितकेच.) ‘Muslim’ हा एकमेव पर्याय इंग्रजीत आजमितीस शिष्टसंमत आहे.

सारांश:
- ‘मुस्लिम’ हा मूळ अरबी शब्द; ‘मुसलमान’ हा त्याचा फ़ारसी/तुर्की पाठभेद.
- दक्षिण आशियाई भाषांतून दोन्ही पर्याय पूर्वापार सामान्य वापरात आहेत; ‘मुसलमान’ हा पर्याय कदाचित तुलनेने अधिक प्रमाणात वापरात असावा, इतकेच.
- मराठीत ‘मुसलमान’ हा पर्याय परंपरेने प्रचलित आहे खरा, परंतु ‘मुस्लिम’ या पर्यायाच्या मराठीतून वापराचा इंग्रजी प्रभावाशी संबंध शंकास्पद आहे. (उदाहरणार्थ, इतर भारतीय भाषांच्या – विशेषतः हिंदीच्या – प्रभावाशीसुद्धा याचा संबंध असू शकतो.)
- खुद्द इंग्रजीतसुद्धा, ‘Muslim’च्या तुलनेत अल्प प्रमाणात का होईना, परंतु ‘Mussulman’ हा पर्याय एके काळी वापरात होता. आजमितीस मात्र तो प्रचलित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गझल गाताना गुलाम अलींनी, मुसलसल चा अर्थ continuous असा सांगितला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचा संबंध ‘मुसलमान’शी नसून ‘सिलसिला’शी असावा. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्या शी काही संबंध नाही

भारत हा संपन्न देश कधी होता?
उत्तर कोणाकडेच नसेल.
आपसात मतभेद इतके तीव्र आहेत की भारत प्रगत ,सर्व सुखी देश कधीच नव्हता
आता अतिशय उत्तम राज्य घटना आहे,लोकशाही आहे .
तरी भारत हा गरीब तो गरीब च आहे.
फक्त सरकार श्रीमंत आहे.
ह्याची लाज कोणाला वाटत नाही.
प्रत्येक जण ,
जात ,धर्म,भाषा ह्या मध्ये इतका गुंतला आहे की जगातील सर्व नशेच्या पदार्थ चे मिश्रण करून त्याचे सेवन केले तरी माणूस थोडा तरी शुद्धीत राहील
तेव्हढी पण शुद्ध भारतीय लोकात नाही
सर्व जात ,धर्म,भाषा ह्यांच्या नशेत बेदुंध आहेत
परत कोणी ह्या देशावर हुकूमत गाजवली तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाहीं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अशोकाच्या काळात. हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झाले आहे.
-------
बाकी साडेचारहजार वर्षांपूर्वीचा इजिप्त म्हणाल तर राजे सरदार, धर्मगुरू दगडी महालांत आणि जनता झोपड्यांतच होती. पिरामिडांतला ऐवज पाहून संपन्न म्हणाल तर तेही लक्षात घ्या राजेश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...कोठला देश संपन्न आहे? कोठलाच नसावा.

----------

अतिअवांतर: फारा वर्षांपूर्वी, बायकोचा एक नातलग कामानिमित्त, प्रॉजेक्टवर काही महिन्यांकरिता अमेरिकेत आला होता. हॉटेलात राहात होता, परंतु जवळ गाडी नव्हती. अटलांटा परिसरातच होता, म्हटल्यावर एकदोन शनिवाररविवारी, आमच्या अटलांटात बाहेरच्या माणसाला आवर्जून दाखविण्याच्या लायकीचे तसे फारसे काही नाही, म्हणा, परंतु जे काही त्यातल्या त्यात आहे, त्यातले थोडेफार दाखविण्यासाठी म्हणा, झालेच तर थोडेफार माफक खरेदीसाठी म्हणा, बाहेर घेऊन गेलो होतो. तर या सद्गृहस्थाने डाउनटाउन अटलांटातील भिकाऱ्यांची छायाचित्रे आवर्जून घेण्यात विशेष रस दाखविला होता. अस्सा राग आला होता त्याचा, म्हणून सांगू!

परंतु, शांत डोक्याने अधिक विचार केला असता असेही वाटले, की त्याबद्दल त्यालाच दोष देण्यात काय अर्थ आहे? भारतात येऊन केवळ तेथील भिकाऱ्यांचे, झोपडपट्ट्यांचे, कचराकुंड्यांतून चरणाऱ्या गायींचे, बकालीचे नि दारिद्र्याचेच फोटो काढण्यात विशेष रस घेणारे कित्येक अमेरिकन टूरिष्ट असतातच की!

चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमातले खान हीरो प्रचंड लोकप्रिय असणे (त्यांच्या बायका/प्रेयस्या हिंदू असल्या तरीही चालतं),अझीम प्रेमजी फाउंडेशन तर्फे कॉलेजेस, हॉस्पिटल सारख्या समाजोपयोगी संस्था चालवल्या जाणे, झहीर खान, शमी इत्यादी खेळाडू भारताच्या क्रिकेट टीम मधे असणे, ए पी जे अब्दुल कलाम यांनी इसरो स्पेस प्रोग्रॅम चालवणे आणि मग राष्ट्रपती होणे, झाकिर हुसेन, अमजद अली खान, रेहमान यांचे संगीताच्या क्षेत्रात जगभर अगणित चाहते असणे वगैरे गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा धर्म सोयीस्कर पणे बाजूला ठेवला जातो. अगर पहा, "मुस्लिम असून सुद्धा" त्यांना किती मोठेपणा मिळतो हे अभिमानानी सांगितलं जातं. श्रीमंत, लोकप्रिय, प्रसिद्ध, हुशार व प्रतिभावान मुस्लिमांचे हिंदू समाजाला कधीच वावडे नसते. ते तर देशाच्या एकात्मतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक ठरवले जातात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त दोष च दिसत असतील तर हा एकांगी विचार झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याच विचार धारे चे हमाल होवू नका.सत्य काय आहे ह्याची चाड ठेवून व्यक्त व्हा.
सर्व माणसाची गुणसूत्र एकसारखीच आहेत .कोणी अती हुशार कोणी अडाणी नसतो..
शिक्षण म्हणजे गुणवत्ता नव्हे.
लोकांना हमाल लगेच माहीत पडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर: गझनी ने हिंदू स्त्रियांना (कदाचित, त्या काफिर होत्या म्हणून) पळवून नेऊन दोन-दोन दिनारांना विकले असे काहीतरी या ठिकाणी वाचण्यात आले.

दुख्तरे हिन्दोस्तां.. नीलाम ए दो दीनार

दुख्तरे हिन्दोस्तां.. नीलाम ए दो दीनार

---

बाकी सदर लेखक / लेखिका काफिर आहे की मोमीन आहे यावर शंभर रुपयांची पैज कुणी लावली नाहीय का अजून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर लेखक/लेखिका काफ़िर असो वा मोमीन, परंतु त्याच्या/तिच्या कल्पनाशक्तीची भरारी उत्तुंग आहे, एवढे मात्र निश्चित.

उदाहरणार्थ, गझनीचा महमूद हा मुघलकालीन होता, हे मला प्रस्तुत लेख चाळल्यावाचून कळले नसते. इतके anachronism तर आमच्या लाडक्या ॲस्टेरिक्स मालिकेतसुद्धा आढळणार नाही. मूळ ॲस्टेरिक्सकार (ईमृशांदे) अर्थातच ते मनोरंजनासाठी/विनोदनिर्मितीसाठी करीत असत. प्रस्तुत लेखकाचा/लेखिकेचा तसाच काही उद्देश असल्यास कल्पना नाही. (चूभूद्याघ्या.)

प्रस्तुत चित्रकाराची प्रतिभा तथा कल्पनाशक्तीही दाद देण्यासारखी आहे. कल्पनेतून चित्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभारण्याचे कसब लाजवाब आहे.

बाकी चालू द्या.

----------

ता.क.: सदर लेखक/लेखिका काफ़िर आहे की मोमीन, याबद्दल कोणताही तर्क लढविण्यास आमची असमर्थता आम्ही वर व्यक्त केलेली आहेच. मात्र, प्रस्तुत चित्रकार हा काफ़िरच असावा, मोमीन नसावा, अशी अटकळ (कोणत्याही पैजेविना) वर्तवू इच्छितो.

(कारण, इस्लाममध्ये चित्रे काढणे हराम आहे, असे निदान आम्ही तरी ऐकले आहे बुवा. (चूभूद्याघ्या.) सबब, प्रस्तुत हरकत काफ़िराचीच!)

(अतिअवांतर: प्रस्तुत चित्रातील विक्रेत्यांचा वेष अरबांसारखा दिसतो. दहाव्या शतकातील गझनीत वास्तव्यास असणारे लोक - मुसलमान असतीलही, परंतु - अरब होते, ही प्रस्तुत चित्रकाराच्या कल्पनेची गरुडभरारीच म्हणायची!)

('तुम्ही काही म्हणा, 'न'बाशेठ, सर्व मुसलमान सारखेच!' चालायचेच.)

==========

प्रस्तुत चित्र येथे विक्रीस आढळले. (१९१० साली काढलेल्या) प्रस्तुत चित्राचा चित्रकार युरोपियन असून, चित्र जरी गुलामबाजाराचे असले, तरीही, प्रस्तुत चित्रातील विक्रेत्यांचा गझनीच्या महमूदाशी (अथवा गझनीतील तत्कालीन व्यापाऱ्यांशी) तथा प्रस्तुत चित्रातील विक्रेय स्त्रियांचा हिंदू स्त्रियांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. कोठूनतरी उचलले चित्र, नि दिले डकवून, झाले!

(अवांतर: प्रस्तुत चित्र USD १५१.१० या किमतीस विक्रीस आहे, असे कळते. (गूगलबाबा झिंदाबाद.) प्रस्तुत लेखकाने/लेखिकेने ते प्रस्तुत लेखासमवेत प्रस्तुत संस्थळावर डकविण्याअगोदर ते त्या (किंवा अन्य कोणत्याही) किमतीस विकत घेतले असावे, आणि/किंवा प्रस्तुत लेखकास ते इतरत्र पुन:प्रकाशित करण्याची कायदेशीर परवानगी असावी, याबाबत at best साशंक आहे.)

==========

प्रस्तुत प्रतिसादकाने (इतरत्र वाचलेल्या) प्रस्तुत लेखाचा दुवा त्यासोबतच्या चित्रासोबत येथे डकविण्यात प्रस्तुत प्रतिसादकाची naivete आहे, की आणखी काही अंत:स्थ हेतू आहे, हे कळू शकले नाही. I sincerely hope that it is the former, and not the latter.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्लाममध्ये चित्रे काढणे हराम आहे, असे निदान आम्ही तरी ऐकले आहे बुवा.

एवढेच नाही, इस्लाममध्ये काफिरांचे नुसते अस्तित्वही हराम आहे हं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I sincerely hope that it is the former, and not the latter.

माझ्या आशांना तडा गेला. अर्थात, झाले हे चांगलेच झाले. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आशांना तडा गेला. अर्थात, झाले हे चांगलेच झाले. असो.

आशेला तडा गेला हे कदाचित चांगलं झालं असेल, आजवर लाखो काफिर स्त्रिया अत्याचारग्रस्त झाल्या हे मात्र निश्चित अति-वाईटच झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रातल्या स्त्रिया अजिबातच भारतीय वाटत नाहीत. अभारतीय स्त्रिया हिंदू असल्याचं फार बघितलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगोदर म्हटल्याप्रमाणे,

प्रस्तुत प्रतिसादकाने (इतरत्र वाचलेल्या) प्रस्तुत लेखाचा दुवा त्यासोबतच्या चित्रासोबत येथे डकविण्यात प्रस्तुत प्रतिसादकाची naivete आहे, की आणखी काही अंत:स्थ हेतू आहे, हे कळू शकले नाही. I sincerely hope that it is the former, and not the latter.

त्यामुळे... असो.

==========

मात्र...

अभारतीय स्त्रिया हिंदू असल्याचं फार बघितलेलं नाही.

नेपाळ, बाली बेटे, उत्तर तथा पूर्व श्रीलंका, मॉरिशस तथा फिजी बेटांचे काही भाग, झालेच तर न्यू जर्सीतील एडिसन/आयझेलिन शहरांतील ओकट्री रोडचा परिसर... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ पॉर्न!

ज्याची त्याची जिची तिची विचारसरणी...

अत्याचारग्रस्त (काफिर) स्त्री पाहिल्यावर तिच्याबद्धल सहानुभूती वाटण्याऐवजी पॉर्न सुचणं, हे पॉर्न ओके प्लीज म्हणणाऱ्या संकेतस्थळावर स्वाभाविकच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र एका प्रख्यात युरोपियन (जन्माने चेक, परंतु नंतर स्विस) चित्रकाराचे आहे. (चित्रकाराविषयी अधिक माहिती येथे.) वर दिलेल्या उदाहरणातील जवळपास दीडशे डॉलरांपासून ते जवळजवळ दीड लक्ष डॉलरांपर्यंत त्याच्या प्रस्तुत चित्राच्या (विविध दर्जांच्या) प्रती विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे रँडम गूगलशोधावरून समजते.

चित्राचा उद्देश (बहुधा इजिप्त-लिबिया भागांतील) 'गुलामबाजाराचा देखावा' इतकाच असावा; 'पॉर्न' हा (बहुधा) नसावा. (चूभूद्याघ्या.) आता, मला चित्रकलेतील काहीही कळत नाही, आणि पॉर्नमधीलही काहीही कळत नाही, परंतु, पॉर्नला इतकीही किंमत मिळत असावी, याबद्दल मी साशंक आहे.

सबब, प्रस्तुत चित्र हे by itself पॉर्न नसावे, असे मानावयास जागा निश्चितच आहे.

मात्र, (चित्राशी, तथा अन्यथाही) असंबद्ध मजकुरासोबत प्रस्तुत चित्र डकवून देण्याच्या भडक प्रकारास मात्र कदाचित पॉर्न म्हणता यावे.

असो. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा दे वादे जायते कंठशोष:
असं कुठेतरी वाचलं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक अन्नाचे फोटो काढून समाजमाध्यमांवर डकवतात तेव्हा त्यांचा उद्देश फूड पॉर्न बनवणं हा नसतो. सदर चित्र डकवण्यामागचा प्रतिसादकर्त्याचा हेतू काय दिसतो तो हा आहे. फक्त शाब्दिक प्रतिसाद देऊन पुरवलं नाही तर चित्र डकवून भावनाउद्दीपनही करण्याचा प्रयत्न केला. मुळात ते चित्र काढण्यामागचा हेतू काही का असेना, इथे ते चित्र पॉर्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिल्ली - आग्रा परिसरात असायची तेव्हा आदिवासींसह प्रत्येक प्राणी पकडून नेत. खाण्यासाठी/गुलाम म्हणून वापर इत्यादी.. इतिहासात नोंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाचे स्थित्यंतर होत होत आज ची मानव सभ्यता अस्तित्वात आली आहे
जंगलात राहणाऱ्या मानव,टोळी नी राहणारा मानव ,धर्माचे समूह बनवून एक मेकाला नष्ट करायचा प्रयत्न करणारा मानव.
खूप रूप बघितली.
आता तरी शहाणपण आले पाहिजे होते.
जे पाहिले घडले ते विसरा तेव्हाचा काळ तसाच होता.
माणूस जंगलात राहताना कच्चे मांस खात होता .
आता तो हट्ट धरणारा आहात का?
धर्म जातीच्या पलीकडे जावून.
मानव सुखी कसा होईल हा विचार हवा.
दुसऱ्या धर्माला सुधरावयाला जावू नका.
तो कोणालाच हक्क नाही.
स्वतःच्या धर्मातील वाईट गोष्टी वर मी प्रहार करून माझा धर्म कसा सुधारेल हे माझे कर्तव्य आहे
असे सर्व धर्मीय,जातीय लोकांस वाटेल तो सुदिन

हिंदू नी मुस्लिम धर्माच्या चुका काढायच्या ,मुस्लिम धर्मातील लोकांनी हिंदू कसे वाईट आहेत असा प्रचार करायचा.
परत वेगवेगळे जातीचे विद्वान आहेत च.
थांबवा हे आता
अन्न,वस्त्र,निवारा,सुरक्षा सर्व लोकांस मिळेल हेच ध्येय ठेवून राजकारण करणाऱ्या लोकांची आता गरज आहे
मझ्या धर्मातील लाखो लोक उपाशी आहेत पण त्यांना अन्न मिळणे हे मला महत्वाचे वाटत नाही त्यांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांची डोकी फोडावित असे मला वाटत.
असे विचार करणारे राजकारण आता नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण खरी स्थिती अशी आहे.

बुरखा वापरणे म्हणजे पूर्ण शरीर झाकणे ह्याचे समर्थन कोणत्याच base वर करता येणे शक्य नाही तरी त्याचे समर्थन धार्मिक अधिकार म्हणून सर्रास शिक्षित लोक करतात .
काय अवस्था होत असेल भारता सारख्या गरम हवामान असणाऱ्या देशात त्या स्त्री ची.
पण स्त्रियांनी पूर्ण कपडे वापरावेत असे कोणी हिंदू बोलला की हीच बुरख्याचे समर्थन करणारे तुटून पडतात स्त्रियांनी हवे तसे शॉर्ट कपडे वापरावेत त्यांचा तो हक्क आहे असे ज्ञान तेव्हा हीच लोक देत अस्तात.

कधी तरी सद्सद्विवेक बुद्धी नी मत व्यक्त करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी, बोलू नये...म्हणत आपण बरंच बोलतो, पण लोकशाहीत सर्वांनाच बोलायची मुभा असते, त्यामुळे बोलणे वावगे नसून आपण केवळ बोलायचं म्हणून काहीही बोलतो, हा प्रॉब्लेम आहे, हेही आपल्या लक्षात येत नाही हा प्रॉब्लेम आहे. बुरखा घातल्याने भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या प्रदेशातल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल तुम्हाला जी कणव वाटते, त्याने गलबलून आले. पण असं पहा की दररोज भारतातल्या कोट्यवधी स्त्रिया स्वयंपाक करण्यासाठी चुलीजवळ, गॅस शेगडीपाशी उभं राहून दिवसातले सरासरी चार तास खपतात, तेव्हा त्यांनी पोशाख कोणताही केला असला अगदी अंतर्वस्त्रही न घालता नुसताच गाऊन वा टीशर्ट ट्रॅक वा साडी वा बुरखा घातला असला तरी त्यांची अवस्था उकडलेल्या बटाट्यासारखी होते, चुलीच्या धुराने किती स्त्रियांना डोळ्यांचा नि अस्थम्याचा त्रास होतो, याची माहिती घेण्याकरता वर्तमानपत्रे, वेब पोर्टल्स, टीव्ही नामक काही माध्यमांत अधनंमधनं सविस्तर वार्तांकनं येत असतात, ती वाचली, पाहिली तरी थोडं कळू शकतं. आणि याहून भयंकर अनेक गोष्टी घडत असतात. एक उदा., हिंदू मॅरेज एक्टमधील सेक्शन ९ अंतर्गतच्या कॉंजुगल राईट्सच्या रेस्टिट्युशनमुळे विवाहांतर्गत बलात्काराला एक प्रकारे खुली सूट मिळते. याविरोधात एक पिटीशन सुप्रीम कोर्टात फाईल झालं तर त्यावर आमच्या 'बेटी पढाओ, बेटी पटाओ' सरकारने आपलं म्हणणं मांडलं की - कॉंजुगल राईट्समुळे विवाह संस्थेचं पावित्र्य टिकून राहण्यास मदत होते, सबब ते महत्वाचे आहेत, त्यांना अंसविधानिक ठरवता येणार नाही. (आता विद्वान मंडळी कॉंजुगल राईटसना असंविधानिक का म्हणतात, याबाबत तुम्हालाच थोडं वाचावं लागेल, इतनी मेहनत तो बनती है - आणि स्त्री प्रश्नाच्या कळवळ्यामुळे तुम्ही हे वाचालच.) आता यामुळे किती तरी स्त्रियांना विवाहाअंतर्गत बलात्कार निमूटपणे सहन करावे लागतात, म्हणजे आयपीसीतली कलम ३७६ ची प्रोविजन विवाहाअंतर्गत बलात्काराच्या मुद्द्याला प्रत्यक्ष कज्ज्यांमध्ये फार कामी येत नाही. पण असोच. असे प्रश्न स्त्रियांनी काय परिधान करावं यापुढे खूप क्षुल्लक आहेत, शेवटी स्त्रियांनी काय घालायचं, हे पुरुषांनी त्यांना सांगणं फार महत्वाचं. त्यातही केवळ बुरख्याचा प्रश्न महत्वाचा, त्यामुळे त्यावरच बोलायलाच हवे, बाकी प्रश्न एक तर सुटलेले किंवा क्षुल्लक आहेत.

ता. क. तुम्ही इथे ज्या बोलाच्याच शिळ्या कढीला ऊत आणला आहे -
‘’पण स्त्रियांनी पूर्ण कपडे वापरावेत असे कोणी हिंदू बोलला की हीच बुरख्याचे समर्थन करणारे तुटून पडतात स्त्रियांनी हवे तसे शॉर्ट कपडे वापरावेत त्यांचा तो हक्क आहे असे ज्ञान तेव्हा हीच लोक देत अस्तात.’’ हे वाचून अंमळ हसू आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी सरकारच्या "उज्वला" गॅस योजनेमुळे धुरापासून ग्रामीण महिलांच्या डोळ्यांचे संरक्षण झाले. "उजाला" योजनेमुळे शरीराची उष्णतेपासून मुक्तता झाली ( महिलांना तोकडे कपडे घालायची गरजच उरली नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एजंडा म्हणतात.
१) हिंदू स्त्रिया दिवसातून पाच तास चुली पुढे राहुन जेवण करतात , डोळ्यात धूर जातो ,घामाने त्रास होतो(चुलीवर जेवण फक्त हिंदू स्त्रिया च बनवतात का?)

तसा हा प्रश्न आर्थिक स्थिती शी संबंधित आहे .
गरिबी मुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो.

२) हिंदू विवाह कायद्या मुळे लग्नानंतर च्या जबदर्स्ती च्या संबंध ना बलात्कार समजलं जावा असे पीटिशन कोर्टात टाकली आहे.

मुळात ह्या देशात लोकशाही आहे .कायदे हे संसदेत च बनले पाहिजेत.कोर्टात जावून कायदे बदलायचे प्रयत्न करणेच चुकीचे आहे असे माझे मत काही.
समाजातील दोनतीन लोकांना त्यांचा एजेंडा चालवण्यासाठी लोकांना गरज नसलेले कायदे कोर्ट मार्फत लादणे हे चूक च .
मुळात बेड रूममध्ये काय घडते हे कोणाला माहित असते.
स्त्री अत्याचार कायद्याचा खूप मोठ्या प्रमाणात गैर वापर होत आहे अशी मत कोर्टनी पण व्यक्त केली
आहेत.
अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा पण मोठ्या प्रमाणात गैर वापर होतो.
संपत्ती हडपने,किंवा बाकी दुष्मानी काढण्यासाठी अशा एकच बाजूला झुकते माप देणाऱ्या कायद्यांचा सर्रास गैर वापर होतो.
आणि सर्वांस सामान अधिकार ह्या घटनेच्या तत्वाचाच इथे खून पडतो.
बलात्कार लग्नानंतर .
कसा ठरवणार.
पुरुषांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क असलाच पाहिजे.
अशा केस मध्ये संपत्ती वरचा बायको म्हणून असलेला हक्क स्थगित झालाच पाहिजे.
असे विविध पैलू आहेत.
भारताची कुटुंब व्यवस्था नष्ट करून भारतीय समाज व्यवस्था अस्थिर करणे हा हेतू .
लग्न नंतर आलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार समजावा ह्या मागणी मागे असावा अशी शंका नक्कीच येईल.
चीन आणि भारत देश उद्याचे प्रबळ देश आहेत.
भावी महासत्ता आहेत
त्याचाच भाग म्हणून भारताला कमजोर करण्याचे डावपेच म्हणून.
भारताचा समाज अस्थिर करणे हा कट असू शकतो.
सावध असावे सर्वांनी.
जगातील शांती भंग करणाऱ्या लोकांना पण नोबल पुरस्कार दिले गेले आहेत.
समस्या समाजाची आणि चिंता भलत्याच लोकांना असे कधी होत नाही.
मुळात ही जर समाजाची समस्या असेल तर लोकप्रतिनिधी नी तो विषय लोकसभेत मांडावा.
त्या वर चर्चा व्हावी सर्व पैलू चा विचार करावा.
आणि सर्व समंती नी योग्य तो कायदा बनवावा.
हा मार्ग सोडून कोर्टात पीटिशन .
म्हणजे हेतू च स्वच्छ नाही.
मुळात अजून एकदा हेच व्यक्त करेन संसदेला कायदे बनवू ध्या .
कोर्टात जावून देशात कायदे लादू नका
ते लोकशाही तत्वाच्या विरुद्ध आहे.
लादलेले कायदे हिताचे नसतात.दोन समाज,व्यक्ती ह्यांच्या मधील दरी रुंदावत जाते त्या मुळे
हाच हेतू असेल तर मग कोर्टात जावून कायदे लादणे हा मार्ग सर्वोत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश १८८, तुमची प्रतिक्रिया पाहता, तुमच्याशी चर्चा करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. हा शेवटचा प्रतिसाद. तुम्हाला इतकी कळकळ आहे स्त्रियांच्या प्रश्नांची अथवा जगातल्या प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्याची खुमखुमी तर तुम्ही स्वतंत्रपणे लेख - फिक्शन - नॉन फिक्शन वा जे जमेल ते का लिहित नाही?
अवांतर - पिंकदाणी नामक प्रकार फार महाग मिळत नाही, कुणालाही परवडू शकतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समोर ठेवून तुम्ही स्त्रिया चे प्रश्न मांडा.
प्रतेक घरात स्त्रिया आहेत ..
आई आहे
बहीण आहे
बायको आहे.
मैत्रीण आहे .
त्यांच्यावर अत्याचार होणे हे भारतीय पुरुष पण सहन करत नाहीत.
आई वरून शिवी दिली तरी खून पडतात.
त्या मुळे स्त्री ची इज्जत कशी ठेवावावी हे सांगू नका
कुटुंब व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे .
त्या मध्ये सर्व वयातील स्त्रिया ,सर्व वयातील पुरुष सुरक्षित आहेत
काही दोष आहेत
पण त्याची उत्तर वेगळी आहेत
भारतीय आदर्श कुटंब व्यवस्था नष्ट होणे म्हणजे भारत नष्ट होणे हा आहे
लोक जाणतात सर्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियांका, आंतरजालावर लोक आपल्या करमणुकीसाठीच लिहितात, असं मानलं की आपल्याला त्यांचा उपद्रव कमी होतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खऱ्या विचारवंत लोकांचा तोल कधी जात नाही.प्रतेक वस्तू,विचार ह्यांना दुसरी बाजू असतेच .आणि ते मान्य करणे हीच खरी कसोटी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वेगळा बबन झालाच पाहिजे.

- विदर्भ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rajesh188 हे अजोंची डुप्लिकेट आयडी आहेत काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो तुलनेने बऱ्यापैकी coherent लिहायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का वाटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय ।
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।।

लेखिका खरोखरीच नशीबवान आहे. एवढे चांगले लोक तिला पदोपदी भेटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकं. ( मला लोक का टाळतात याचे उत्तर.)
कबीरचा दोहा आहे नं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दुर्मिळ मधील अती दुर्मिळ योग समजावा.
तो अती भाग्यवान माणसाच्या आयुष्यात च येतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहाणी माणसं कचरा बाजूला टाकायला शिकतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या निमित्ताने, हा रोचक लेख ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रसंस्थळावर नुकताच वाचावयास मिळाला. (For whatever it is worth.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In the end, they decided that they would have an event, make an effort to redefine the day as a true marker of freedom, one where all sorts of women, veiled and unveiled, from the Iranian left and right could come together. To make the day truly ‘international’, the women also invited some feminists from around the world, notably France and the United States. Again and again, CAIFI reiterated that all women were welcome to the event; they even made a special effort to attract women who were fully veiled.

The women who arrived from the West were surprised by this attempted unification between the women of the right and the women of the left, both of whom had faced persecution under the Shah. As one of them, Kate Millett, wrote in her book Going to Iran, the women veiled in full black looked “forbidding”. Feminist Simone de Beauvoir never actually came to Iran, but when talking about the invitation she had received she imagined the whole purpose of the visit was to save Iranian women from the veil. As is still the case, almost half a century later, the entire identity of the women of Iran was being reduced to whether or not they were wearing the veil.

रोचक. (नो कमेंट्स.)

—————

(अवांतर: प्रस्तुत लेखिकेशी मी नेहमीच सहमत असतो, असे नाही. (क्वचित असतो; बहुधा नसतो किंवा न्यूट्रल असतो.) परंतु, ‘दोन बायका (येथे, लेखिका आणि सिमों द बुव्वा) जेव्हा नळावर कचाकचा भांडतात, तेव्हा त्यातून जे बाहेर पडते, ते सत्य’, अशी एक सत्याची (admittedly पुरुषी) व्याख्या निदान आम्ही तरी ऐकली आहे बुव्वा.)

अत्यंत रोचक!

(अतिअतिअवांतर: याला ‘स्त्रीवादी सांस्कृतिक वसाहतवाद’ म्हणता यावे काय? (आम्ही याला निव्वळ वायझेडपणा म्हणतो; परंतु, त्याउपर?))

(अतिअतिअतिअवांतर: फ्रेंच निधर्मीवाद हा ‘मुसलमानांनी बुरखे न घालायची सक्ती; सरदारजींनी फेटे न घालायची सक्ती’ असल्या वळणांवर का जातो? ‘मुसलमानांनी हवे तर बुरखे घाला, नाहीतर न घाला; सरदारजींनी फेटे बांधा, वा न बांधा; फार कशाला, ब्राह्मणांनी शेंड्या उडवा, वा न उडवा; आम्हाला त्याच्याशी घेणेदेणे नाही’ या वळणावर का जाऊ शकत नाही? मुख्य म्हणजे, हे तथाकथित फ्रेंच liberalismशी कसे जुळते? आणि, ‘मुसलमान बायकांनी बुरखे घालू नयेत’ हे फ्रेंचांनी ठरवणे frenchsplaining नव्हे काय? (‘मुसलमान बायकांवर बुरखा घालण्याची सक्ती करणे बेकायदेशीर ठरवले जाईल’ म्हणणे वेगळे; त्यात आणि ‘मुसलमान बायकांनी बुरखा घालणे बेकायदेशीर ठरवले जाईल’ यात मोठा फरक आहे.))

(स्वातंत्र्याच्या/फाळणीच्या पूर्वसंध्येनिकट, ११ ऑगस्ट १९४७ रोजी, कायदेआझम मुहंमद अली जीना यांनी पाकिस्तानच्या घटनासमितीला उद्देशून, ‘पाकिस्तानचे स्वरूप कसे असावे’ अशा स्वरूपाचे एक directive भाषण दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते:

“You are free; you are free to go to your temples, you are free to go to your mosques or to any other place or worship in this State of Pakistan. You may belong to any religion or caste or creed -- that has nothing to do with the business of the State.

“We are starting with this fundamental principle: that we are all citizens, and equal citizens, of one State.”

“Now I think we should keep that in front of us as our ideal, and you will find that in course of time Hindus would cease to be Hindus, and Muslims would cease to be Muslims, not in the religious sense, because that is the personal faith of each individual, but in the political sense as citizens of the State.”

आता, पुढे यातील काहीही अंमलात आणले गेले नाही, हा भाग निराळा. परंतु, यामागील विचार महत्त्वाचा आहे. मुहंमद अली जीनांना(सुद्धा) जी अक्कल होती, ती फ्रेंचांना का असू नये?)

(त्या तुलनेत मला भारताची निधर्मी भूमिका आवडते, पटते. आता उजव्यांच्या राज्यात ती कितपत टिकते, हा भाग वेगळा, परंतु तरीही.)

(बॉटमलाइन: कसली बुव्वा?)

—————

(असो, आता पुरे. दोन ग्लास Chiantiवर माणसाने किती म्हणून लिहायचे? तरी बरे, हा प्रतिसाद लांबलचक असला तरी कोणाला उत्तर म्हणून लिहिलेला नाही. (किंबहुना, असलाच, तर माझ्याच प्रतिसादाला उपप्रतिसाद आहे.) नाहीतर, स्त्री आयडीला ट्रोल केल्याचा ठपका लागायचा! (माझा आयडी हा माझ्या कल्पनेप्रमाणे तरी स्त्री-आयडी नाही. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, हा at best – असलाच, तर – self-troll आहे. असो.) Not that I care… As if त्यांचा आयडी हा स्त्री आयडी असण्यावर माझे काही नियंत्रण आहे! असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘दोन बायका (येथे, लेखिका आणि सिमों द बुव्वा) जेव्हा नळावर कचाकचा भांडतात ...

Really?

सिमोन दी बोव्हारनं किमान दोन बाबतींत स्वतःची भूमिका बदलली. 'द सेकंड सेक्स'मध्ये ती स्वतःला स्त्रीवादी म्हणवत नाही (साधारण १९४६). आणि त्यात ती पुढे म्हणते की डाव्या चळवळीमुळे, विचारांमुळे स्त्रियांना समानता मिळेल, स्त्रीवादाची गरज नाही. ह्या दोन्ही भूमिका १९८४-८५च्या आसपास दिलेल्या मुलाखतींमध्ये तिनं बदलल्या होत्या. ती असं काहीसं म्हणाली की डाव्या चळवळीतही पुरुष मिरवायची कामं करतात, आणि स्त्रियांना कमी लेखतात, हलक्या दर्जाची, पडद्यामागची कामं देऊन श्रेय लाटतात. ती स्वतःला स्त्रीवादीही म्हणवते. डाव्या चळवळीमुळे स्त्रियांचं भलं होईल असं तिला वाटणं बंद झाल्याचं तिनं स्पष्ट लिहिलेलं आहे.

दी बोव्हारनं स्वतःबद्दल हेही म्हणलेलं/लिहिलेलं आहे की ती जेव्हा तत्त्वज्ञान शिकली तेव्हा खूप स्त्रिया असे विषय शिकत नसत. त्यामुळे पुरुषांच्या जगात ती अपवाद होती, आणि त्या अपवादाचं पुरुषांनी स्वागतच केलं. जेव्हा मोठ्या प्रमाणावर स्त्रिया असे विषय शिकायला लागल्या तेव्हा विरोध सुरू झाला. ती स्वतः सुखवस्तू घरातली असल्यामुळे तत्त्वज्ञान शिकणं तिला शक्यही झालं. 'द सेकंड सेक्स'मध्ये ती असंही लिहिते की ज्या स्त्रियांकडे शिक्षण नाही, पदरात मूल आहे अशा स्त्रिया आता स्वातंत्र्य कसं मिळवणार, हे तिला समजत नाही.

सिमोन दी बोव्हारचं बुरख्यांबद्दलचं, इराणी स्त्रियांबद्दलचं मत नक्की काय होतं आणि ते पुढे बदललं की नाही हे मला माहीत नाही.

केट मिलेट ही अमेरिकेतली दुसऱ्या पिढीतली महत्त्वाची स्त्रीवादी. तिचं नाव पॉर्नला विरोध करणाऱ्या स्त्रीवाद्यांच्या इतिहासात वाचलेलं आहे, पण तपशील काही आठवत नाहीत. एवढं निश्चित आठवतं की ती गोरी, सुखवस्तू घरातली स्त्री होती. गौरेतर स्त्रियांचे वंशभेदामुळे आणि गरिबीमुळे असलेले प्रश्न ह्या गोऱ्या स्त्रीवाद्यांना पुरेसे समजले नाहीत, अशी तक्रार त्याही काळात गौरेतर स्त्रीवाद्यांची होती.

मला सध्याची रोक्झान गे (तिचं पुस्तक वाचल्यामुळे) माहीत आहे. 'बॅड फेमिनिस्ट' नावाच्या संग्रहातल्या एका निबंधात ती म्हणते की इतर कुठलीही स्त्री स्त्रीवादी आहे की नाही, हे महत्त्वाचं नाही. ती स्त्री आहे हे महत्त्वाचं आहे. कुणा स्त्रीला स्त्रीवादाची मूल्यं, तत्त्वं पटत नसतील तरीही ते अधिकार तिला मिळावेत यासाठी स्त्रीवाद्यांनी जागरुक असलं पाहिजे. रोक्झान गे ही हैतीहून अमेरिकेत आलेल्या काळ्या कुटुंबात जन्माला आलेली अमेरिकी प्राध्यापिका.

---

अवांतर - 'न'बा, आपण दिलेल्या लिंकेवर लोकांनी क्लिक करून ती वाचावी असं मला वाटत असेल तर त्या लिंकेत काय म्हणलं आहे, मला कशाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे याबद्दल मी थोडक्यात काही लिहिते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असेच योग बऱ्याच वेळा येतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान आणि महत्त्वाचा लेख:

मला जे प्रतिक्रियार्थ म्हणायचंय ते अ. बा., अदिती, न. बा. आणि सईने जवळ जवळ तसंच, आधीच आणि अर्थातच अधिक चांगल्या प्रकारे म्हणून टाकलंय.
उशीरा येण्याचे तोटे / का फायदे?? का फोटे ??

(सवांतर: हाऊ आय मेट युअर मदर मधील बार्नीच्या "ऑस्फुल" सारखा फोटे हा शब्द मराठीला द्यावा का? रादर दिला !!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0