प्रवास मनाचा...
बऱ्याचदा आपलं मन खूप सैरा-वैरा धावत असतं, त्याच्या वेगावर लगाम लावणे मग जरासं अवघड होऊन जातं...
कधी थेट भविष्यात जाऊन स्वप्नं रंगवतं, तर कधी भूतकाळात जाऊन अडकून बसतं...
खरच मी मनाला "Time Machine" म्हटलो तर मुळीच वावगं ठरणार नाही...
कधी-कधी मग मन आपल्या लहानपणी आपल्याला घेऊन जातं आणि लहानपण दिसताच आपल्या ओठांवर नकळत स्मित हास्य येतं...
मग आठवतं ते सगळं, शाळेत जाण्यासाठी लवकर उठण्याचा कंटाळा, "अजून फक्त ५ मिनिट झोपु द्या ना..." असं घरच्यांनी उठवल्यावर झोपेतच निघणारे वाक्य, नंतर कशी-बशी तयारी करून सायकलवर शाळेत जायचं आणि प्रत्येक तासाला शाळा सुटण्याची वाट बघणं, मग शाळा सुटली कि घरी येऊन लगेचच खेळायला बाहेर पळणं...
अजूनही आठवतंय मला, प्रत्येक दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-वडील आणि बहिणीला भेटण्याची ओढ, आणि भेटल्यावर न चुकता होणारे बहिणीशी भांडण, जसं खास भांडायलाच कि काय मी तिला भेटायला जायचो, ह्या भांडणांमुळे आम्ही तसा मारही खूप खाल्लाय आई-वडिलांचा...
परत आल्यावर त्यांच्या आठवणींनी आठवडाभर वेड्यासारखा रडत राहणं आणि स्वतःलाच प्रश्न विचारात राहणं "मी इतका वाईट आहे का कि मला ते त्यांच्या जवळ नाही राहू देत, त्यांना फक्त त्यांची मुलगीच जवळची वाटते का? मी कोणीच नाहीये का त्यांचा?"...आणि बरेच काही... पण तेव्हा कुठे कळायचं कि हे फक्त ते माझ्या भल्यासाठीच करताय...
आठवड्यातून एकदा येणाऱ्या वडिलांच्या फोनची दिवसभर वाट बघणं आणि प्रेत्येक वेळी विचारणं "मला घ्यायला कधी येणार आहात?"
आणि नंतर सगळ्यांच्या आठवणींनी एकटच रडत राहणं... हे सगळं आठवल्यावर पापण्या अलगत ओल्या कधी होऊन जातात खरं कळतच नाही, आणि डोळ्यांमध्ये जमा झालेलं पाणी गुरुत्वाकर्षणाचा नियम पाळून गालावरून हळूच ओघळून जातं...
मग मी खूप प्रयत्न करतो मनाला परत वर्तमानात आणण्याचा, पण ते मात्र तयारच होत नाही कधी...
आणि जरी मी यात यशस्वी झालोच तरी, परतांना रस्त्यात अनेक ठिकाणी थांबण्याचा मनाचा अट्टाहास असतो, मलाही नाईलाजाने तो मान्य करणं भाग असतं...
काही थांबे (ठिकाणं) खूप गोड आठवणी दाखवून जातात, तर काही डोळे ओले करून जातात, मग "पुढचा थांबा हसवणार कि रडवणार?" असं प्रश्न निर्माण होतो आणि सुरु होतो पुन्हा "प्रवास मनाचा" किंबहुना "आठवणींचा"...
वर्तमान जवळ आल्याची चाहूल लागताच अचानक हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात होते आणि मनाला परत आणतांना का कुणास ठाऊक पण मलाच वाटायला लागतं कि "मी कश्यासाठी आणतोय मनाला परत? जर मी त्याच्या सोबत माझ्या 'लहानपणीच' राहिलो तर?" आणि मग मी अडकतो दुविधेच्या भवऱ्यात... आणि मग हात-पाय मारून बाहेर आल्यावर समोर दिसतो तो "वर्तमान"...
परतल्यावर माझं मन मग तुलना करण्यात मग्न होऊन जातं...
किती सुंदर होती ती लहानपणीची निरागसता... खेळणं तुटल्यावर तासभर रडून विसरून जाण... आई-वडील, घर, शाळा एवढच आपलं "विश्व"... ना भूतकाळाच्या वेदना, ना भविष्याची चिंता...
फक्त कधी काळजी असेल तर ती इतिहासाच्या पेपरची, त्या सनावळ्या पाठ करण्याची, ही चिंता तेव्हा हिमालयासारखी भासते...
आणि आता, त्या निरागसतेचा मागमूसही सापडत नाहीये... खेळण्यांऐवजी आज हृदय तुटतात, तेही अगदी आवाज न होतां... आतल्या-आत मन रडत असतं आणि चेहेऱ्यावर मात्र हसू कायम ठेवण्याची धडपड सुरु असते... कारण आता थोडी ना लहानपणी सारखं रडता येणारेय मन-मोकळं, ओरडता येणारेय, हट्ट करता येणारेय... स्वप्नातलं जग आणि वस्तुस्थिती यातला जमीन-आसमानाचा फरक आज लक्ष्यात येतोय... कधी-कधी भावनिक गुंतवणुकीतला तोटा आर्थिक गुंतवणुकीतल्या तोट्यापेक्षा घातक ठरतोय... स्वार्थी आणि अप्पलपोट्या लोकांमुळे आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोनच आज पार बदलून गेलाय... मग जखमी हृदयाला आपणच मलम-पट्टी करून, जखम एका हाताने दाबून धरून, पुढे चालत राहावं लागतंय.... कधी-कधी असंख्य प्रश्न डोक्यात तांडव नृत्य करत असतात... "मी तर तोच? सभोवतालची माणसंही तीच? मग हा बदल नेमका झालाय कुठं?"
पण काही प्रश्नांची उत्तरं मिळतंच नसतात, न उलगडणाऱ्या कोड्यांप्रमाणे, हे सत्य मान्य करणं हाच एक रामबाण उपाय... आपलं "विश्व" आता विस्तारलंय... स्वार्थी जगात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरुयेत...
आणि मग ह्या अस्तित्वाच्या शर्यतीत आपलं लहानपण कुठे हरवून जातं हे कधी कळतंच नाही... मग असंच कधीतरी एखाद्या संध्याकाळी परत सुरु होतो आपला आणि मनाचा प्रवास... परत ते लहानपण जगण्यासाठी... परत ती निरागसता अनुभवण्यासाठी... परत आपल्या आई-वडिलांच्या, आपल्या आप्तेष्टांच्या सोबत आनंदाचे चार क्षण घालवण्यासाठी... परत लहान बहिणीशी भांडण्यासाठी... परत मन-मोकळं रडण्यासाठी, हट्ट करण्यासाठी... परत "लहान" होण्यासाठी...
तेव्हा असं वाटतं की हा "मनाचा प्रवास" असाच सुरु राहावा, कधी संपूच नये...
- सुमित
प्रतिक्रिया
मौनराग......
सुमित,
महेश एलकुंचवारांचा ‘मौनराग’हा ललितलेख-संग्रह जरुर वाच! आई-वडिलांनी नाईलाजास्तव आपल्याला ‘दुसया कुणालातरी देऊन टाकलेलं आहे’ हे खूप लहान वयात त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या हळव्या मनावर हया घटनेचा खोलवर परिणाम झाला व एकाकीपणाने त्यांना कायमचं घेरलं.वडिलांशी नाळ जरी जोडलेलीच राहिली, तरीही मनात दु:खाचा ओघ अखंड सुरूच! त्यातूनच त्यांच्यातील लेखक घडत राहिला असावा! वडिल गेल्यानंतर आवरा-आवरी करताना त्यांच्या बिछान्याखाली त्यांना काय सापडलं ठाऊक आहे?
तूच वाच!
तुझ्या जमून आलेल्या लेखाने एका आवडत्या पुस्तकाची आठवण जागी झाली!
धन्यवाद...
हो, मी नक्कीच वाचेन ते ...
धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
वाचनीय
वाचनीय
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद...
धन्यवाद मनोबा...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
आणि आता, त्या निरागसतेचा
अगदी. अगदी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख आवडला की नाही...
आपणास लेख आवडला की नाही?, हे तसं स्पष्ट झालं नाही मला...
पण तरी धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
अगदी अगदी म्हणजे किती मनातलं
अगदी अगदी म्हणजे किती मनातलं बोललात. किती समपर्कपणे, वैगेरे वैगेरे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यवाद...
धन्यवाद... धन्यवाद...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
तसा अशा लाईणीवर विचार करणारा
तसा अशा लाईणीवर विचार करणारा मनस्वी माणूस आपला सुमित असावा अशी आमची लै जुनी इच्छा राहिली आहे. पण देव अशा लोकांना वेगवेगळ्या सर्कलांत एकएकटे बनवतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नाय हो
तुम्ही इकडे या एकदा.
मस्त गप्पांचा फड जमवू.
शिरेसली म्हणतोय.
सुमित्शेठ,
तुम्ही कंच्या गावचं म्हनायचं?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खास गप्पांसाठी नाही आलो तरी
खास गप्पांसाठी नाही आलो तरी आलो तेव्हा खास गप्पा मारेन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धावेल की...
नक्कीच... धावेल की...
लैच भरी आयडीया...
जमवूया एकदा असा कट्टा...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
............
............
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
......
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."