‘जें शाश्वत त्याचा देंठ तुटे’ : 'द व्हॉइस ऑफ हिंद रजब’
* या लेखात 'द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ या चित्रपटातील काही प्रसंग आणि तपशील चर्चिले आहेत. त्यामुळे प्रथम चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांनी रसभंग टाळण्यासाठी हा लेख नंतर वाचावा.*
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात, तणाव दूर सारून घटकाभर विरंगुळा मिळवण्यासाठी सिनेमा बघितला जातो. पण मोठं बजेट, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि भव्य स्पेशल इफेक्ट्सच्या (CGI/VFX) मदतीने तयार केलेलं चक्रावून टाकणारं विश्व चमकदार पल्लेदार संवाद आणि बरा अभिनय हे सगळं जरी असलं तरी या सिनेमातून माणसाचं खरं दुःख कुठेतरी हरवून जातं असं वाटतं. पडद्यावर आकाशगंगांच्या पातळीवरचं युद्ध, विनाश आणि मृत्यू दिसतात, पण त्यातील मानवी वेदना मात्र जाणवत नाही. केवळ एका अम्युझमेन्ट पार्कात फिरून आल्याचा तो अनुभव असतो. प्रेक्षक म्हणून आपणही समोरच्या दृश्यांना इतके सरावून जातो की रक्त, आक्रोश आणि उद्ध्वस्त होत जाणारे अख्खे ग्रहच्या ग्रह हे केवळ पडद्यावरच्या प्रतिमा म्हणून उरतात. वास्तवाशी, माणसांच्या अस्सल कथांशी जोडून घेतल्यामुळे त्यातून समष्टीचा विश्वरूप अनुभव देणारा, त्यापुढेही दशांगुळे उरणारा कलानुभव हरवतो आणि अशा प्रकारचा सिनेमा हे केवळ संवेदनांना सुखावणारं वेळ घालवण्याचं साधन बनून राहतो.
अशा वेळी ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ सारखा एखादा चित्रपट समोर येतो आणि सिनेमा काय असू शकतो याची नव्याने जाणीव करून देतो. हा चित्रपट नेहमीच्या मनोरंजक चित्रपटांसारखा नाही. तो तुम्हाला मन शांतवणारा विरंगुळा देत नाही, तुमचे दुःख विसरायला लावणारी समाधी मिळवून देत नाही आणि कोणतीही खोटी आशा दाखवत नाही.
हा चित्रपट तुम्हाला अशा भीषण वास्तवाचा सामना करायला लावतो, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी केवळ काल्पनिक नसून, त्यामागे खऱ्या, जिवंत हाडामांसाच्या लोकांचा, त्यांच्या रक्ताचा, त्यांच्या मृत्यूचा संदर्भ सतत अस्वस्थ करून सोडतो. एका निष्पाप मुलीचा अखेरपर्यंत जगण्यासाठी चाललेला आर्त संघर्ष तुमच्या मनावर कायमचे चरे, खडी, व्रण उमटवतो. गाझामधील पाच वर्षांच्या चिमुकल्या हिंद रजबच्या मृत्यूची केवळ एक घटना म्हणून नोंद न करता तिचा आर्त आवाज थेट प्रेक्षकांच्या अंतःकरणात उमटवून त्यांना हादरवून सोडणारा हा सिनेमा त्यामुळेच निराळा आहे.
जानेवारी २०२४ ची ती काळरात्र...पाच वर्षांची चिमुकली निष्पाप हिंद रजब तिच्या काका, काकू आणि पाच चुलत भावंडांसह कारमधून गाझा शहरातून पळून सुरक्षित ठिकाणी जात होती. तेल अल-हवा भागात असताना अचानक त्यांच्या कारवर इस्रायली सैन्याच्या 'मर्कावा' टँकमधून जोरदार गोळीबार करण्यात आला. या पहिल्याच जबरदस्त हल्ल्यात कारमधील ६ जण जागीच ठार झाले. केवळ हिंद रजब आणि तिची १५ वर्षांची चुलत बहीण 'लायन हमदा' जिवंत उरल्या होत्या. लायन हमदा जेव्हा फोनवरून रेड क्रेसेंट सोसायटीशी बोलत मदतीची याचना करत होती, तेव्हाच टँकमधून पुन्हा गोळीबार झाला. फॉरेन्सिक तपासानुसार, अवघ्या ६ सेकंदांत ६४ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात लायनचा आवाजही कायमचा बंद झाला.
कारमध्ये आता फक्त ५ वर्षांची हिंद जिवंत होती. तिच्या अवतीभवती तिच्याच कुटुंबातील जिवलगांचे रक्ताळलेले मृतदेह होते. ती प्रचंड घाबरली होती आणि फोनवरून सतत विनवत होती, "मला भीती वाटतेय, प्लीज मला वाचवा, टँक माझ्या अगदी जवळ आला आहे." त्यानंतर घडलेला दुर्दैवी घटनापट दिग्दर्शिकेने सिनेमात प्रभावीपणे मांडला आहे. ही घटना केवळ जागतिक युद्धविषयक बातम्यांतली एक बातमी बनून राहू शकली असती; पण दिग्दर्शिका 'काओथर बेन हानिया' यांनी आपल्या कॅमेऱ्यातून तिला केवळ एक कोरडी बातमी न ठेवता, इतिहासाचा एक जिवंत आणि कधीही न पुसता येणारा दस्तऐवज बनवले आहे.
चित्रपटाची सर्वात धक्कादायक आणि वादग्रस्त गोष्ट म्हणजे हिंदचा खरा आवाज वापरण्याचा निर्णय. चित्रपटातील डिस्पॅच सेंटर, स्वयंसेवक आणि घटनाक्रम कलाकारांनी साकारले आहेत; पण फोनवर ऐकू येणारा थरथरता, घाबरलेला आवाज खऱ्या हिंद रजबचाच आहे. “माझं सगळं कुटुंब मेलंय”, “अंधार होईल, मला भीती वाटते” तिच्या या वाक्यांमुळे प्रेक्षक आणि पडद्यामधलं अंतर संपतं. मृत्यूच्या सावलीत अडकलेल्या त्या मुलीची भीती, असहायता, तिच्या बाल मनातील गोंधळ, तिचं एकटेपण आणि मदतीसाठी पुन्हा पुन्हा केलेली विनवणी हे सगळं अंगावर येतं.
आता आपण चित्रपट पाहणारे तटस्थ प्रेक्षक उरत नाही, तर जणू त्या फोनच्या दुसऱ्या टोकाला उभे आहोत अशी भावना निर्माण होते. हिंदचा तो आवाज केवळ एक आवाज उरत नाही; तो मानवी असहाय्यता, युद्धाचा क्रूरपणा आणि जगाच्या सोयीस्कर मौनाचा पुरावा बनतो. 'The Voice of Hind Rajab' हा फक्त एक सिनेमा बघितल्यावर मनाला डागणी बसते. एक कधीही न विसरता येणारी भयाण आठवण तयार होते. आपण कुठल्या काळात जगलो आणि त्या जगात काय भयानक होत होते याची अस्वस्थ जाणीव कायम सोबत करते.
या चित्रपटाचे संपूर्ण कथानक 'पॅलेस्टाईन रेड क्रेसेंट'च्या डिस्पॅच कार्यालयात घडते. पडद्यावर कुठलीही उघड हिंसा नाही. तिथे आहेत फक्त सतत वाजणारे फोन, नकाशे, कागदी परवानग्या आणि एक अस्वस्थ करणारी प्रतीक्षा. एका निष्पाप मुलीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला अवघ्या काही मिनिटांचा रस्ता पार करायचा असतो; पण 'सुरक्षित मार्ग' आणि 'प्रशासकीय समन्वयाच्या' नावाखाली तासनतास वाया घालवले जातात. चित्रपट इथे युद्धाइतक्याच क्रूर असणाऱ्या 'प्रशासकीय हिंसेचा' क्रूर काळा चेहरा दाखवून देतो. कधीकधी नियमांच्या आड लपून चाललेली दप्तरदिरंगाई ही शस्त्रांइतकीच थंड धारदार कशी असते याचे दर्शन घडते.
या चित्रपटाचा राजकीय सूर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक आहे. हा चित्रपट सध्याच्या हिंसेची मुळे पॅलेस्टाईनच्या इस्रायली कब्जामध्ये (Occupation) शोधतो. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या हिंसक संघर्षाच्या पलीकडे जाऊन, दशकानुदशकांच्या पारतंत्र्याने पॅलेस्टिनी जनतेचे रोजचे जगणे कसे गुदमरवून टाकले आहे, याचे दाहक वास्तव यात दिसते.
चित्रपटातील एक स्वयंसेवक हताश होऊन, संतापून विचारतो, “ज्यांनी त्यांना मारलं, त्यांच्याशीच समन्वय कसा साधायचा?” त्यावर दुसरा पॅलेस्टिनी कर्मचारी अत्यंत शांतपणे पण तितक्याच दुःखाने उत्तर देतो, “हेच आपलं वास्तव आहे.” हा हतबल संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला निष्पाप लहान मुलांचा जीव घेणारी क्रूर शस्त्रास्त्रे आणि दुसऱ्या बाजूला केवळ कागदी परवानग्यांच्या आशेवर बसलेली हतबल माणसे; या दोन टोकांमधील दरी हा संवाद दाखवून देतो. इथे पीडिताला आपल्या मारेकऱ्याकडे जीवनदानाची भीक मागावी लागते. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायली दडपशाहीखाली गुदमरणाऱ्या संपूर्ण पॅलेस्टिनी जनतेची अगतिकता आणि वेदना एका झटक्यात समोर येते. प्रेक्षकालाही या व्यवस्थेच्या क्रूरतेचा साक्षीदार बनवून अस्वस्थ करून सोडते.
चित्रपटाभोवती काही नैतिक प्रश्नही उभे राहतात. खऱ्या मुलीचा मृत्यूपूर्वीचा आवाज वापरणं योग्य आहे का? दुःखाचं सिनेमॅटिक रूपांतर करणं योग्य आहे का ? वगैरे. फ्रेंच समीक्षक जॅक रिव्हेट यांनी एकदा विचारलं होतं की सिनेमा जेव्हा मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो नैतिक सीमारेषा ओलांडतो का? ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा प्रश्न पुन्हा समोर आणतो.
पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आवश्यक वाटतो. आजच्या जगात युद्ध, मृत्यू आणि विध्वंस हे जणू केवळ कोरडे आकडे बनून गेले आहेत. बातम्यांतून सतत दिसणाऱ्या रक्तपातामुळे संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा वेळी हिंदचा आवाज आपल्याला या कोलाहलात जरा थांबायला, विचार करायला भाग पाडतो. आपण फक्त प्रेक्षक आहोत का? की या वास्तवाशी आपला काही नैतिक संबंध आहे? माणूस म्हणून, या अफाट मानवी संस्कृतीचा एक भाग म्हणून काही देणे घेणे आहे? हिंदच्या जागी माझी मुलगी असती तर? हिंदच्या मायभूमीऐवजी माझी भूमी असती तर?
'द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर मानवतेच्या अंगावरची एक भळभळती जखम आहे. हा चित्रपट तुम्हाला कोणतीही तयार उत्तरं देत नाही. उलट तुमच्या मनात कधीही स्वस्थ न बसू देणारे प्रश्न सोडून जातो. आणि कदाचित एका महान कलाकृतीची खूण हीच असते. ती तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकते, मग तुम्ही त्यासाठी तयार असा किंवा नसा.