फुसके बार – ११ जानेवारी २०१६ पासून पुढचं संकलन
फुसके बार – ११ जानेवारी २०१६
‘
आजच्या फुसक्या बारांमध्ये शिक्षण क्षेत्रातले काही अनुभव
प्रसिद्ध शिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञ व्ही. व्ही. चिपळूणकर पंढरपूरच्या विठ्ठलदर्शनाला गेलेले असतानाची गोष्ट.
विठ्ठलदर्शन झाल्यावर पंढरपुरातील शाळांमध्ये कोणते उपक्रम चालू आहेत याची त्यांनी चौकशी केली. तेथील विवेकवर्धिनी या शाळेत एक विज्ञानप्रदर्शन चालू असल्याचे त्यांना कळले. प्रदर्शन तर प्रदर्शन, ते तरी पाहू, म्हणून ते शाळेत दाखल झाले.
प्रत्येक वर्गात प्रदर्शन चालू असल्यामुळे शाळेतील वर्गांना सुट्टी. नवनवीन प्रयोग मांडलेले. प्रत्येक मुलाकडे स्वत: चौकशी करून त्यांना त्या प्रयोगाची खरोखरच माहिती आहे की नाही याची खात्री करून घेतली. मग प्रश्नांची गाडी आली शास्त्राच्या प्रयोगशाळेवर. साहेबांना प्रयोगशाळा पाहण्याची हुक्की आली. सगळी उपकरणे जागेवर. प्रयोगांची यादी तयार. मुलांच्या प्रयोगाच्या वह्याही तयार. पण त्यांचा विश्वास बसेना की हे प्रयोग खरोखर विद्यार्थ्यांनीच केले असावेत हा? झाले, मग विद्यार्थ्यांच्या एका वर्गाला पाचारण.
त्यांना हवा तो प्रयोग विद्यार्थ्यांनी करायचे ठरले. अट अशी की मुलांनी त्यांना हवे ते प्रयोग साहित्य प्रयोगशाळेतील सहाय्यकाकडून मागवून घ्यायचे. शिक्षकांनी त्यांना असे करा वा तसे करा वगैरे सांगायचे नाही. मुलांनी अगदी तसेच केले. प्रयोग व्यवस्थित पार पडले. साहेब खुश.
लपवण्यासारखे काही नसले तर ब-याच गोष्टी किती सोप्या होतात पहा.
मागे हेमलकसाला गेलो असता प्रकाश आमटेंनी सांगितलेला अनुभव. ते तेथे शाळा चालवतात. शाळातपासनीस येतात, तेव्हा त्यांच्या काही खास ‘अपेक्षा’ असतात. मात्र त्यांना स्वच्छपणे सांगितले जाते की तेदेखील मुलांसाठी शिजवलेले अन्नच खातात, त्यामुळे याबाबतीत कोणाची काही खास सरबराई केली जाणार नाही. तेव्हा तुमच्या शाळेला प्रतिकूल शेरा देऊ वगैरे धमक्यांचाही काहीच उपयोग होत नाही. जे आहे ते तुमच्यासमोर आहे, हवा तसा शेरा देऊ शकता असे हेच सांगतात. अशा कर्मदरिद्री लोकांमुळे तेथे शाळातपासणीसाठी जायलाच तपासनीस नाखुश असतात.
तर मग चिपळूणकरांनी शाळेतील इतर विज्ञानविषयक उपक्रमांची माहिती विचारली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून लिहिण्याची शाई तयार करून घेतली होती. चेह-याला लावण्याचा स्नो तयार केला होता. असे विविध उपक्रम होते. उदा. ती शाई विकून जो विद्यार्थी अधिकाधिक पैसे कमावेल त्याला त्या महिन्यात लागणारी सारी शाई मोफत. आजच्या काळात शाळेत तयार केलेला स्नो वगैरे विकण्याची परवानगीही कदाचित मिळणार नाही. पण अशा उपक्रमांमुळे व एकूणच शिक्षणाधिकारी खुश झाले.
त्यांनी सदर शिक्षकांचा आपल्या धडपडमंडळात समावेश केला.
त्या मंडळातील काही शिक्षकांनी कशाकशावर संशोधन केले होते ते पाहता त्यांचा एकूण हुरूप वाढला.
एका शिक्षकाने संशोधन केले होते ते मुले शाळेत उशीरा का येतात या विषयावर. अनेकदा शिस्तीचा बडगा दाखवून मुलांना अशा बाबतीत विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्या जातात. पण त्यामागे मुलांच्या खरोखर काही अडचणी आहेत का हे विचारले जात नाही. एका गावातील खाटकाचा मुलगा मधूनमधून शाळेला दांडी मारे. त्याबाबत त्याच्या वडलांना विचारले असता त्यांनी सांगितले की आठवड्यातल्या दोन दिवशी जवळच्या बाजारांच्या ठिकाणी जावे लागते. त्या दिवशी मुलाला शाळेत पाठवले तर आम्ही खायचे काय? अशा बाबतीत काय कारवाई करावी? कारवाई करण्याऐवजी शिक्षकांनी त्या मुलाला दोन दिवस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. मात्र त्या दोन दिवसात त्याचा बुडालेला अभ्यासक्रम वर्गातील मित्रांच्या सहाय्याने पूर्ण करण्यास त्याला सांगितले गेले. शाळा एवढी मुभा देते आहे, हे पाहिल्यावर एखाद्याच्या बेशिस्तीने वागण्याला आणखी पंख फुटायला हवे होते. पण येथे ती बेशिस्त नव्हती, तर गरज होती. या सवलतीचा परिणाम म्हणून तो मुलगा पुढे एम.पी.एस.सी परीक्षा पास झाला.
कित्येक शाळांमध्ये शाळेचेच काय, परीक्षाशुल्कही भरू न शकणारी मुले असतात. अशा मुलांना वा त्यांच्या पालकांना पैसे भरण्याची सोय करा अशी नोटीस काढली किंवा उद्या पैसे आणा असे सांगितले तर ती मुले दुस-या दिवशी शाळेत येतच नाहीत. तेव्हा अशा नोटिसा पाठवून आपण मुलांचे नुकसानच करत आहोत हे पाहून एका शिक्षकांनी त्यावरचा उपाय शोधला. मुलांच्या पालकसभेत त्यांनी सर्वच सधन पालकांना याबाबतची कल्पना दिली. तुमच्या पाल्याची शैक्षणिक स्थिती चांगली असली तरी शाळेतली काही मुले याबाबतीत तुमच्या पाल्याएवढी नशीबवान नाहीत. त्यांना तुम्ही मदत करू शकलात तर त्या मुलांचे भले होईल. अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर अनेक पालक इतर मुलांना आर्थिक मदत करण्यास तयार हातात याबाबतचा अनुभव त्यांनी सांगितला.
झोपडपट्ठीतली मुले म्हणजे वाईट संगत सोडण्याची इच्छा नसलेली मुले असेच समीकरण नसते असे एका शिक्षकांनी सांगितले. त्यातल्या अनेक मुलांचीही तेथील अशैक्षणिक वातावरणातून बाहेर पडण्याची इच्छा असते. त्यासाठी ती मुले दिव्याच्या खांबाखाली बसून, पावसाळ्याच्या दिवसात तर रात्री बंद असलेल्या बसेसमध्ये झोपण्याचा आसरा शोधत आपली प्रगती करून घेण्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेली असतात, असेही त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी या मुलांना अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.
याबाबतीत झोपडपट्टीतलीच मुले जाऊ देत, काही शाळा एकूणातच कशी बनवाबनवी करतात हेदेखील त्या शिक्षकाच्या लक्षात आले. वडलांची बदली निमशहरी भागात झाल्यामुळे एक मुलगा दहावी झाल्यावर मुंबई सोडून तेथे पुढील शिक्षणासाठी गेला. दहावीत उत्तम गुण मिळालेले. नवीन शाळेतील वातावरण असे की अनेक शिक्षक काही वर्गांवर जाण्यासही घाबरत. कारण काही विद्यार्थी हातात सुरा घेत ‘तू फार बडबड करतोस, वर्गावर यायचेच नाही’ अशी थेट धमकीच शिक्षकांना देत. दुर्दैवाने हा मुलगाही अशाच वर्गात. तेव्हा शाळेत वर्ग होत नाहीत, तर मग करायचे काय या विवंचनेत सापडलेला. त्याची ही अडचण गावातील दुस-या शाळेतील एका शिक्षकांच्या कानावर गेली. त्यांनी विविध विषयांच्या शिक्षकांना गाठून त्या मुलाला शाळेच्या वेळानंतर दररोज मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. पण हे करायचे तरी कोठे, गावातल्या एका वकिलाने त्याच्या ऑफिसमधील एक खोली यासाठी उपलब्ध करून दिली. वडील दारू पिणारे. मुलगा या खास शिकवणीवरून घरी परतताना वडील रस्त्यात कोठे तरी दारु पित बसलेले दिसायचे. त्याने ही बाबही शिक्षकांच्या कानावर घातली. शिक्षकांचा मोर्चा त्याच्या घरी. तुमचा मुलगा हुशार आहे, पण तुमच्या अशा पिण्यामुळे व एकूणच वागण्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होतो. तेव्हा तुम्ही त्याची बारावी होईपर्यंत तरी दारू पिणे सोडून द्या. अन्यथा आम्ही सगळे व तुमचा मुलगा घेत असलेली मेहनत वाया जाईल. खरे तर हे दुस-या शाळांमधले शिक्षक व तो वकील हे लोक या मुलाचे कोण? पण चमत्कार झाला. वडलांनी शिक्षकांचे म्हणणे मानले. अशी दोन वर्षे भरपूर मेहनत घेणारा हा मुलगा बारावीत सगळ्या महाराष्ट्रात पहिला आला. चमत्कार झाला. पण झाले काय. की त्याच्याकडून फी वसूल करण्याशिवाय त्याच्यासाठी दोन वर्षे इतर काहीही न करणा-या शाळेला निकालानंतर मात्र आठवले, की हा मुलगा त्यांच्या शाळेत होता. की त्यांची भली मोठी जाहिरात सुरू. की आमच्या शाळेचा विद्यार्थी संपूर्ण राज्यात पहिला आला. तो मुलगा दहावीला मुंबईत ज्या क्लासमध्ये जाई, त्या क्लासची जाहिरात की ‘त्यांचा विद्यार्थी’ बारावीला पूर्ण राज्यात सर्वप्रथम आला.
चिपळूणकर शिक्षकांना उद्देशून याबाबतीत नेहमी एक उदाहरण देत.
रेसचा घोडा असतो. तो जिंकण्यामध्ये सर्वात मोठा सहभाग कोणाचा असतो? कोणी म्हणे त्याच्यावरील जॉकीचा, कारण तोच त्याला जिंकण्यासाठी मोटिव्हेट करतो, प्रेक्षकांचा, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे, उत्साहाने घोड्याला धावण्याची स्फूर्ती मिळते, घोड्याच्या मालकाचा, कारण त्याने अशा घोड्याची पारख केली. पण ही कारणे देत असताना कोणाच्याच लक्षात हे येत नाही की त्या घोड्याला स्वत:लाच जोपर्यंत वाटत नाही की आपण पहिले यावे, तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही. अर्थात या युक्तिवादात घोडा म्हणजे स्वत: विद्यार्थी; त्यालाच जोपर्यंत स्वत:हून वाटत नाही की आपल्याला आयुष्यात काही करून दाखवायचे आहे. तोपर्यंत काही होऊ शकत नाही, तोपर्यंत काही होणे अवघड असते.
बाकी घोडे सगळीकडेच आहेत. कोणाला कोण पारखी मिळतो, कोण जॉकी मिळतो, पाठिंबा देणारे प्रेक्षक मिळतात यावर त्यांच्यातल्या ब-याच जणांचे नशीब ठरते. कारण सगळेच घोडे स्वयंभू नसतात.
प्रतिक्रिया
भारी लिहिलंय. आवडलं, राकु.
भारी लिहिलंय. आवडलं, राकु.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लेख आवडला. एकाच विषयावरचे
लेख आवडला. एकाच विषयावरचे सुसंगत विचार असल्यामुळे विशेष आवडला.
+१. शीर्षक "फुसके बार" असे न
+१.
शीर्षक "फुसके बार" असे न ठेवता बदलले गेले तर बरे होईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेखकाला विचारून बदलण्यात
लेखकाला विचारून बदलण्यात यावं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
धन्यवाद. सुरुवातीला नावाबद्दल
धन्यवाद. सुरुवातीला नावाबद्दल फार विचार केला नव्हता. ते आत्मप्रौढी मिरवणारे नसावे एवढेच कारण होते.
अनेकदा केवळ निरीक्षणे, कधी विनोद, कधी एखाद्या घटनेवरील भाष्य, कधी माझ्या मनचे, असे वेगवेगळे प्रकार देत असल्याने एकच सर्वसमावेशक असे नाव ठरवणे अवघड होते. अशा प्रकाराला सहसा दिली जाणारी रंगीबेरंगी, फुलबाज्या किंवा तत्सम नावे नको वाटतात. एका फेबुमित्राने सुचव्लेले अंतर्मुख' हे नाव सोबर वाटते. विचार करतोय.
तुम्ही हे रोज सदर स्वरूपात
तुम्ही हे रोज सदर स्वरूपात लिहू शकता.
--------
सदर म्हणून चालू देण्याची विनंती प्रशासनाला या प्रतिसादातून करतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद थत्तेसाहेब. संपादक
धन्यवाद थत्तेसाहेब.
संपादक आजवर सगळ्या पोस्ट्स एकाच धाग्यावर हलवत आले आहेत. त्यामुळे काही पोस्टमध्ये मला नंतर काही बदल करता येत नाही. कोणाचा प्रतिसाद अाला तर तो पाहणे /शोधणे अवघड होते.
किती जणांनी ती पोस्ट पाहिली हे पाहणे शक्य होत नाही (हे त्यामानाने किरकोळ).
काही दिवसांनी एखादी पोस्ट शोधायची तर स्क्रोलिंग करणे अवघड होते.
विविध मुद्द्यांवरील लेखन एकत्र करणे ही कल्पनाच संपादकांना सहन होत नाही असे दिसते. हे सदर या स्वरूपात चालू द्यावे, अशी विनंती मीदेखील त्यांना मागे केली होती. परंतु संपादकांना अपेक्षित दर्जाचे लेखन होत नाही या कारणाने येथे पसारा होऊ नये म्हणून त्यांनी ते वेगवेगळ्या पोस्ट्स एकत्र करण्याचे धोरण अवलंबले आहे. मध्येच केव्हा तरी त्यांना एखादी पोस्ट पसंत पडली तर ते तिचे वेगळे अस्तित्व ठेवतात. असा थोडा विचित्र प्रकार चालू आहे. शिवाय माझे याबाबतीत काही आक्षेप असतील तर मी येथे लिहितोच का, असा सुंदर मार्मिक प्रश्न संपादकांनी मला विचारलेला आहे. तेव्हा मी हे येथे लिहितो आहे तोच मुळात माझा एक प्रकारचा निर्लज्जपणा किंवा कोडगेपणा आहे.
तर अशी परिस्थिती आहे.
तरीही तुम्ही विनंती करून पहायला हरकत नाही.
नुस्तं "फुबार" चाललं असतं.
नुस्तं "फुबार" चाललं असतं.
(ह. घ्या)
छान लिहिलय. आवडलं!
छान लिहिलय. आवडलं!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फुसके बार – १२ जानेवारी २०१६
फुसके बार – १२ जानेवारी २०१६
‘
१) उसाचा वाजवी दर किती?
सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत काही जणांची बैठक. दादा, इथलेच एक शेतकरी आहेत. शिक्षकही अहेत. त्यांना आजच्या बैठकीला बोलवू का?
बोलवा की.
बैठक सुरू.
इकडचे तिकडचे विषय सुरू.
अहो सर, भावाचा विषय काढा की.
अहो, मंत्री विचारत नाहीत, आणि आपणच कसा विषय काढायचा?
नाही, तुम्हीच काढा. मीच सांगतो दादांना. दादा, हे बघा, सर काय म्हणतात उसाच्या दराबद्दल.
बोला सर, किती भाव पाहिजे उसाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे?
टनाला पंचवीस हजारच्या आसपास पाहिजे.
काय सांगता, इथे तीन हजार देता देता मारामार होती आहे आणि तुम्ही पंचवीस हजाराच्या गोष्टी करताय? कसं काय?
हे बघा दादा, १९७२च्या काळात सोन्याचा दर तोळ्याला ११०-१२० रूपये होता. तर उसाला टनामागे मिळणारा भाव साधारण तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडाच कमी होता. त्या काळात महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे पेव फुटलेले नव्हते. पंढरपूर-सोलापूर भागातला ऊस कर्नाटकातल्या बाळकुद्री साखर कारखान्याला जाई. आमच्या भागातील नेते याबाबतीत शेतक-यांना मदत करत, त्यात लबाडीचा भाग नसे. उसाचा जो दर मिळे त्यातल्या शंभर टनामागे दोन टनाचे पैसे सोडून इतर उसाचे पैसे शेतक-याला देत. दोन टनाच्या बाबतीत त्या शेतक-याला रोखीने पैसे न देता त्याबदल्यात त्याला तेवढ्या रकमेचे सोने द्यायचे. त्यामागचे कारण असे सांगायचे, की पुढच्या कुठल्या वर्षी पाऊस झाला नाही अन मुलामुलीचे लग्न करायचे झाले, तर पैसे कोठून आणणार? गरज पडल्यास दर वर्षी अशा पद्धतीने जमवलेले सोने मोडून त्यासाठी लागणारे पैशाची सोय तरी त्यावेळी करता येईल.
आता सोनं दहा ग्रॅमला पंचवीस हजाराच्या आसपास घोटाळते आहे. बाकी किती तरी गोष्टींमध्ये सोन्याच्या भावाशी तुलना करतात. उसानेच काय घोडे मारलेय? म्हणजे उसाचा भाव एवढा नाही तरी निदान त्याच्या आसपास तरी असायला पाहिजे की नाही दादा?
हा चांगला डाव टाकलात सर तुम्ही. केव्हापासून शेती करताय?
जेव्हापासून समजू लागले तेव्हापासून.
होय का? सांगा रे, सरांच्या बोलण्यात कोठे गडबड दिसत आहे का?
आणखी काय सर?
उसाच्या या भावाने साखरेची किंमत काय असायला हवी दादा?
२) ये चांदसा रोशन चेहरा
जुल्फोंका रंग सुनेहरा
ये झील सी नीली ऑंखे
कोई राज है इनमें गहरा
या गाण्याचे वैशिष्ठ्य असे की यातली कोणतीही एक ओळ पूर्ण गाण्याच्या चालीवर म्हणता येते. आता याचे येथे प्रात्यक्षिक करून दाखवणे अवघड आहे. पण प्रयत्न करून पहा.
३) ‘होणार सून मी या घरची’ हा हॉरर कम कॉमेडी शो संपतो आहे तेवढ्यात काही जण ‘पसंत आहे मुलगी’ या साधारण तशाच शोची धमकी देत आहेत. काही दिवस तरी आनंदाचे जावेत एवढी साधी इच्छासुद्धा हे लोक पुरी होऊ देत नाहीत.
४) आज दुस-या एका विषयावरून बाजीप्रभू देशपांडेंची आठवण आली. दुस-याचा जीव वाचवण्यासाठी आपण बाजू लावून ठेवायची. आपण जिवंत राहणार नाही याची खात्री असूनही.
तिकडे कारगिलच्या लढाईतला तो कॅप्टन विक्रम बात्रा म्हणतो की उद्याच्या ऑपरेशनमधून जिवंत परत येईन की नाही याची शाश्वती नाही. पण एक नक्की आहे, की मी उद्या तिरंगा फडकवत खाली येईन किंवा मीच त्यात गुंडाळलेला तरी असेन.
कोठून येते ही मानसिक शक्ती?
५) शाळांमध्ये बलात्कार होण्यावरून उच्च न्यायालयाने शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. शासकीय अनुदान मिळणा-या शाळांमध्ये याबाबतची सक्ती करण्यास सांगितल्याचे ऐकले. हा विषय इतका गंभीर आहे, तेव्हा अनुदानप्राप्त असो वा नसो, असा भेद करण्याची आवश्यकता का पडली असावी?
६) टीचर्स रूममध्ये ऐकलेल्या काही गोड तक्रारी:
अ) अहो मॅडम, ती मला डार्क शर्ट व लाइट कलरची पॅंट घालायची जबरदस्ती करते. मला नाही आवडत तसे कॉंबिनेशन. पण करू काय?
आ) अहो मॅडम, ती आठवड्यातून एकदा तरी कार्ल्याची भाजी करते आणि मी ती संपवेपर्यंत समोर बसून राहते. मी तिला म्हणतो की तुला कार्ले गाजरासारखे कच्चे खायचे तर खा, हवे ते कर. पण माझ्यावर भाजीची जबरदस्ती करू नकोस, पण ती ऐकतच नाही.
इ) अहो मॅडम, तिने तिला आवडणारा परफ्युम माझ्यासाठी आणून दिला आहे. मी शर्टला इस्त्री केली रे केली, की ती त्यावर स्प्रे मारते आणि तो वास दिवसभर मला सहन करावा लागतो.
फुसके बार – १३ जानेवारी २०१६
फुसके बार – १३ जानेवारी २०१६
‘
१) 'लाजाळू' की ‘स्पर्श करू नकोस’
प्रत्येक जण एखाद्या घटनेकडे कसा पाहतो, त्यावरून काढलेले निष्कर्ष वेगळे असू शकतात.
आता हेच पहाना, लाजाळूच्या झुडपाला आपण तसे नाव देण्यामगे कदाचित कवीकल्पना असावी. हिन्दीतही त्याला छुईमुई किवा लाजवंती असे नाव अहे. मात्र या नावांपेक्षा इंग्रजीतील ‘Touch me not’ हे नाव अधिक समर्पक वाटते. त्याची परवानगी न घेता आपण त्याला हात लावणार आणि वर त्याने आपले अंग आक्रसून घेतल्यावर ते ‘लाजले’ असे आपणच सोयीस्करपणे समजणार. हा कोणता न्याय? म्हणूनच म्हटले, Touch me not हे नाव अधिक समर्पक वाटते. की ते सांगते अहे, की तुझे मला असे हात लावणे मला आवडलेले नाही. येथून गेलास/गेलीस तर थोड्या वेळाने मी पुन्हा उमलेन.
एखाद्या व्यक्तीला वा मुलीला हात लावला व परिस्थितीप्रमाणे ती बावरली व तिने अंग आक्रसून घेतले तरी आपण ती व्यक्ती वा मुलगी लाजली, अशी समजुत करून घेणार का? उलट तो तर विनयभंग ठरू शकेल.
हे म्हणजे वर उल्लेख केलेल्या कवीकल्पनेऐवजी त्याकडे थोडे कायद्याच्या दृष्टीकोनातून पाहण्यासारखे झाले.
यामध्ये मला एका कवितेचे किंवा शेराचे बीज दिसते आहे. कोणी मनावर घेईल काय?
२) आज विवेकानंदांची जयंती. त्यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या ‘ब्रदर्स व सिस्टर्स’ या ऐतिहासिक भाषणाची नक्कीच आठवण होणार. ती परिषद विविध धर्मांमधली होती. पण त्या काळात आपल्या धर्मात तरी एकमेकांना ब्रदर्स व सिस्टर्स म्हणण्यासारखी समानता होती का? त्यानंतर शंभरापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर आज तरी तशी परिस्थिती आहे का?
अर्थात दोष विवेकानंदांचा नाही, आपला आहे.
३) आजच जिजाबाईंचीही जयंती.
माहेर व सासरच्या दोन घराण्यामध्ये हाडवैर असल्यामुळे लग्नानंतर त्यांच्या मनाची जी तगमग झाली असेल, त्यावर कोणी सविस्तार भाष्य केल्याचे पाहण्यात आहे का?
ते सगळे पचवून अस्थिर राजकीय वातावरणात धीराने राहणे व एवढेच नाही तर त्यातून ‘पुढचा मोठा’ विचार करणे हे खरोखरच थोर काम आहे.
४) महात्मा फुलेंच्या चौथ्या व पाचव्या वंशजांपैकी काही जण संघाच्या शिवशक्तीसंगमात सहभागी झाले होते. याचीही बातमी झाली आहे. तीही तशी व्हायला नको होती. ते कुठल्या समाजवादाचा उद्घोष करणा-या पक्षाशी संबंधित असते, तर त्यांचे कौतुक केले गेले असते. मग भलेही त्या पक्षाचा प्रत्यक्ष समाजवादाशी काही संबंध नसेना का! किंवा काही विशेष करत नसते तरी कोणाला त्यांच्यात रस वाटला नसता.
मात्र तसे न होता ते संघात असल्याचे दिसल्यामुळे काही जणांचा मुड गेला आहे. अर्थातच त्यांना हे आवडलेले नाही.
आता कोणी म्हणत आहेत, की ते महात्मा फुले यांचे थेट वंशज नाहीत. कारण त्यांच्या दत्तक पुत्राला एक मुलगी होती, त्यामुळे त्यांचे थेट वंशज आता होले या नावाचे आहेत. तरी ‘ले’ सामायिक आहे हे विशेष.
शिवछत्रपतींच्या आजच्या वंशजांपैकी एकजण जवळजवळ सदैव तारेत असतात, तर दुस-यांना बळेबळे घोड्यावर बसवून त्यांच्या नावाने राजकारण केले जाते. हा आणखी एक प्रकार.
चार पिढ्यांमध्ये एवढा गोंधळ, तर इतर वंशावळींमध्ये काय होत असेल? एकूण ही ‘वंशज’ वगैरे भानगड मोठी किचकट आहे.
५) 'दहशतवादी' अफझल गुरू आणि त्याचा हुशार मुलगा
दहशतवादी कारवायांच्या आरोपांखाली फाशी दिला गेलेला अफझल गुरू याच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळाल्याची बातमी वाचली.
वडलांना झालेल्या शिक्षेमुळे त्याच्याकडे समाजाचे डोळे नेहमी वेगळ्या नजरेने रोखलेले असणार. त्यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे काही साधे काम नाही.
तेव्हा दहशतवाद्याचा मुलगा म्हणून त्याची टिंगल करण्यापेक्षा त्याला या कामगिरीत साथ देणा-या त्याच्या कुटुंबियांचे स्वागत करू या. एक कुटुंब चांगल्या मार्गाला लागल्याचा चांगलाच परिणाम समाजावर होईल.
६) स्टार गोल्ड एचडी हे भलतेच धाडसी चॅनल आहे. सिनेमा चालू असताना मधूनमधून दाखवल्या जाणा-या जाहिरातींमध्ये ’थर्टी मुव्हीज टू वॉच बिफोर यू डाय’ मध्ये चक्क सिंघमचे नाव होते.
आता हा सिनेमा पाहिलाच नाही म्हणजे भरपूर जगायला मोकळे. अन्यथा इतका विनोदी सिनेमा पाहतानाच हसून हसूनच जीव जायचा.
फुसके बार – १४ जानेवारी २०१६
फुसके बार – १४ जानेवारी २०१६
‘
१) छोटी क्रांती
पूर्वी ब-याच घरांमध्ये नवरा संडासला निघाला की त्याच्या तांब्यात पाणी भरून देण्याचे काम त्याच्या बायकोकडे असे. अर्थातच विधी उरकून परत येईपर्यंत त्याची वाट पहात बसणे आणि नंतर हातापायावर पाणी घालण्याचे कामही तिचेच.
आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही प्रथा चालू असू शकेल.
त्या काळामध्ये निमशहरी भागातली एक मुलगी निम-निमशहरी भागात लग्न करून गेली. त्या काळात सहसा एकत्र कुटुंबपद्धती होती.
तर सांगायचे म्हणजे सकाळी उठल्यावर घरातली एक छोटी तिला सांगायला आली की काका संडासला चाललेत.
थोड्या वेळाने तिच्यापेक्षा मोठा मुलगा जो असेल, तो सांगायला आला, की काका संडासला चाललेत.
हिने ‘ठीक आहे’ म्हणून सांगितले.
मग थोड्या वेळाने मधली जाऊ सांगायला आली की अगं तो संडासला चालला आहे. त्यावर हिने ‘तर मग काय’ असे भाव चेह-यावर आणले.
मग मात्र मोठी जाऊ सांगायला आली.
तोच निरोप.
मग मात्र ही म्हणाली, अहो चार वेळा हाच निरोप मिळाला आहे. चालले आहेत,चाळे आहेत, तर जाऊ देत. मी काय करू?
जाऊबाईंचा चेहरा असा झाला की आता हिचे काय करू!
अगं, काय करू काय विचारतेस, जा त्याच्या लोट्यात पाणी घाल.
हिला हा मोठाच धक्का.
काऽऽय, मी नाही असली कामे करणार. त्यांचे त्यांना लोट्यात पाणी भरून घेता येत नाही का? जायचे तर जाऊ दे नाही तर तसेच बसू दे.
अर्थातच तिचे राव थोड्या वेळाने सेल्फसर्विस करून विधीसाठी प्रस्थान ठेवते झाले.
झाले, जवळजवळ दिवसभर घरात तोच विषय. तरी मी सांगत होते की शिकलेली मुलगी नको घरात आणायला. पण माझे कोणी ऐकेल तर खरे ना!
दोनतीन दिवसांनंतर घरातले सारेच राव सेल्फसर्विस करू लागले. कारण त्यांच्या बायकांनी ही तसे करत नाही तर मी का करू हा पवित्रा घेतला.
छोटी क्रांती. कधीकधी कोणी तरी निर्धाराने एखाद्या गोष्टीला 'नाही' असे म्हणण्याचा अवकाश असतो.
२) प्राचीन भारतीय विज्ञानावरील प्रदर्शन
डेक्कन कॉलेजमध्ये नुकतेच प्राचीन भारतीय विज्ञान यावर तीन दिवसांचे प्रदर्शन भरवले होते. विविध सत्रांमध्ये माधवन नायर, चिदंबरम यांच्यासारख्या नामवंत शास्त्रज्ञांची भाषणे झाली. मी कोणत्याच भाषणांना हजर राहू शकलो नाही तरी प्रदर्शनाला भेट दिली.
एक विभाग होत तो अग्निहोत्राशी संबंधित. त्यावर चालू असलेल्या संशोधनाशी संबंधित. माहिती देण्यासाठी देसाई कॉलेजमधील मुले होती.
अग्निहोत्र चालू असताना आसपासच्या हवेचे घेतलेल नमुने व नेहमीची हवा यांच्यात वाढणा-या बॅक्टेरियाच्या वाढीतील फरक, त्याच पद्धतीने अग्निहोत्रातून राहिलेल्या राखेपासूनही तशीच केलेली परीक्षा वगैरे दाखवत होते. त्याचा उपयोग घरातील, रूग्णालयातील जागा प्रभावी पद्धतीने निर्जंतुक करण्यासाठी करता येईल अशी शक्यता व्यक्त केली गेली होती.
अग्निहोत्राशी संबंधित सामग्रीत तांदूळ, गाईच्या शेणापासून केलेली गोवरी आणि गायीच्या दुधापासून केलेले तुप हे तीन घटक.
दिवसांतून दोन वेळा करायचा उपचार. सुर्योदयाच्यावेळी व सुर्यास्ताच्या वेळी दोन्हीवेळी म्हणायचे मंत्र वेगळे.
त्यांना विचारले की गायीच्या ऐवजी म्हशीच्या शेणाची गोवरी आणि म्हशीच्या दुधाचे तुप वापरले तर काय फरक पडतो? लगेच उत्तर आले, की त्यापासून कार्बन मोनॉक्साइड तयार होतो, तो विषारी असतो. गायीच्या शेणापासून बनलेल्या गोवरीपासून तसे होत नाही. त्यांना म्हटले, पूर्ण ज्वलन झाले की कशापासूनही कार्बन डायॉक्साईडच बनेल, मोनॉक्साइड नाही. तेव्हा हा दावा योग्य नव्हे. मग उत्तर आले की गायीच्या व म्हशीच्या आतड्यातील जीवाणूंमध्येही फरक असतो, त्यामुळेही रिझल्ट वेगळे असतील. म्हटले की तुम्ही तर ते जाळताच आहात, मग वेगवेगळ्या जीवाणुंनी काय फरक पडेल?
यावर मग ४० वर्षांपासून यावर संशोधन करणा-या कोणाचा तरी दाखला दिला गेला आणि त्यांनी म्हशीपेक्षा गायीपासून मिळणा-या पदार्थांपासून मिळालेले रिझल्ट्स चांगले आहेत असे सांगितले आहे असे ती मुले म्हणाली.
एकूण बॅक्टेरियांच्या वाढीपेक्षा इतर बाबतीतील संशोधनासाठी आणखी बराच पल्ला गाठणे बाकी आहे असे दिसले.
अग्निहोत्रातून वा यज्ञातून ऑक्सिजन मिळतो असे म्हणणारे अज्ञानी असतात, अर्धवट माहितीवर बिनधास्त चुकीचे दावे करत असतात. त्यामुळे हे प्रकार हास्यास्पद होतात.
अक्कलकोटमध्ये अग्निहोत्रावर संशोधन चालते ही माहिती जवळजवळ ३० वर्षांपूर्वीची आहे. असे जर निश्चित दावे करणारे निष्कर्ष काढता येत असतील, तर आजवर या गोष्टी रोजच्या व्यवहारात वापरात का आलेल्या नाहीत हा प्रश्न पडतो. याबाबतीत ब्रिटिशांना किंवा इतक्या दशकांच्या कॉंग्रेसच्या राजवटीला दोष देऊन चालणार नाही.
जर्मनीसह इतर अनेक देशामध्येही याबाबतचे संशोधन चालू असल्याचे सांगण्यात आले. पण हे ज्वलन ज्या पात्रामध्ये करायचे त्याच्या आकाराला अवाजवी महत्त्व देण्यापेक्षा भट्टीमध्ये ज्या पद्धतीने ज्वलन होते त्या पद्धतीने हा विधी पार पाडला तर काय फरक पडतो या व अशा प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. तर मग इतकी दशके संशोधन झाले म्हणजे नक्की काय झाले असा प्रश्न पडतो.
याच प्रदर्शनामध्ये आणखी एक प्रयोग दाखवण्यात आला. कल्हई लावणा-याकडे हवेचा पुरवठा करण्यासाठी जी फुंकणी असते, त्यातून हवा सोडून त्यावर वजनाला अगदी हलकी अशी थर्मोकोलची चौकोनी वस्तु उडलेली दाखवण्याचा ‘पराक्रम’ दाखवण्यात आला.
व्हर्टिकल लिफ्ट या तंत्राप्रमाणे विमान कसे उडवता येऊ शकेल याचेही प्रात्यक्षिक होते. त्याची तुलना कशाशी केली होती तर धनुष्याची प्रत्यंचा ओढल्यानंतर व बाण सोडल्यानंतर बाण तर वेगाने निघून जाईलच, पण त्याच वेळेस धनुष्यही हातातून सोडले तर तेही थोडेसे पुढे जाईल. या तत्वाचा उपयोग विमान उभे उडवण्यासाठी होऊ शकेल असे सांगण्यात आले.
काही वैज्ञानिक सत्ये दडलेले श्लोक रोजच्या पुजेत म्हणले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यातला एक श्लोक तर एक असे अलॉय (धातुक) करण्याचा फॉर्म्युला सांगतो, की ते कोणतेही रेडिएशन शोषून घेऊ सकते. या धातुकाचा थर विमानावर दिला तर ते विमान रडारलाही शोधता येणार नाही अशी शक्यता आजमावता येईल असे सांगण्यात आले. या धातुकाचा नमुना प्रदर्शनात ठेवण्यात आला होता.
यात एक सर्वात इंटरेस्टिंग वाटणारा प्रयोग पाहण्यात आला. अगस्त्य ऋषींच्या एका श्लोकामध्ये विद्युतघट (बॅटरी) वापरून पाण्याचे पृथ:करण करून हायड्रोजन वायु कसा बनवायचा याचे वर्णन आहे. त्याप्रमाणे बनवलेला एक विद्युतघट तेथे ठेवलेला होता. मात्र हा प्रयोग फारच मूलभूत पातळीवर होता. तो औद्योगिक पातळीवर नेता येईल का किंवा ही पद्धत प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळी आहे का, वगैरे माहिती सादरकर्त्यांकडे नव्हती.
या विषयावरील संशोधनामध्ये सुसुत्रता येण्यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये त्याचा विभाग चालू करण्याचा मानस असल्याचे सांगितले गेले.
संस्कृत ग्रंथांचे परंपरागत ज्ञान भटजींकडे; मात्र त्यांना शास्त्राचा (विज्ञानाचा किंवा शास्त्रीय दृष्टिकोनाचा) गंध थोडाही नाही. तर दुसरीकडे शास्त्रज्ञांनी स्वत:च काही करू म्हटले तरी त्यांना संस्कृतचा गंध नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडणे गरजेचे असल्यामुळे यावरील संशोधनाला वेळ लागतो आहे असे सांगण्यात आले.
एकूण दिल्ली अभी बहोत ही दूर है असा प्रकार आहे. पण त्यातून खरोखर काही निष्पन्न होईपर्यंत त्याबद्दल आमच्या पूर्वजांचे ज्ञान वगैरे अभिनिवेशाने होणारी बडबड करण्यापासून वाचाळवीरांना रोखले पाहिजे.
प्रदर्शन
एकंदरीतच प्रदर्शनात भरपूर करमणुकीची सोय दिसतेय!
फुसके बार – २१ जानेवारी २०१६
फुसके बार – २१ जानेवारी २०१६
‘
१) नाटकामध्ये एखाद्या पात्राची विंगेत एक्झिट झाल्यावर जर रंगमंचावरची पात्रे “गेला एकदाचा” किंवा “गेली एकदाची” असे एकमेकांना जोरात टाळी देत व अगदी जोरात म्हणत असली तरी ते त्या पात्राला ऐकू आलेले नाही हे प्रेक्षकांनी समजून घ्यायचे असते.
२) एकदा एक मित्राने एक मिनिट किंवा तत्सम कमी वेळात संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतो म्हणून सांगितले. घाई असेल तेव्हा म्हणायला सोयीचे पडते असे त्याचे म्हणणे होते. आणि तसे म्हणून दाखवलेही.
त्याला म्हटले की अरे, त्यासारखे काही तरी वाटले, पण एकही शब्द स्पष्ट म्हणता येत नाही, ना ऐकू येत नाही. तुझा हेतु यातून पुण्य मिळवायचा असेल तर गणपतीला ते नीट ऐकू तरी जायला हवे की नको?
३) सिक्किम हे नुकतेच पूर्ण सेंद्रिय राज्य घोषित करण्यात आले. बारा वर्षांपासून या दृष्टीने प्रयत्न सुरू केले गेले. सिक्किमनेच सर्वप्रथम प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली होती. हे अगदी अभिनंदनीय आहे.
अशा छोट्या राज्याला हे सगळे नखरे करणे शक्य आहे, आपल्याला ते शक्य नाही आणि गरजही नाही अशी सोयीस्कर समजुत करून घेऊन कीटकनाशके खात-पित राहू या व गायींच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या कोंबत राहुयात.
४) प्रधानमंत्री या एबीपी न्यूजवर प्रसारीत झालेल्या कार्यक्रमामधून अनेक माहित नसलेल्या गोष्टी समजत आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वात प्रथम बनलेल्या आंध्र प्रदेशचे गठन करताना तेव्हाचे मद्रासही त्याबरोबर जोडावे अशी प्रमुख मागणी होती. शिवाय यासाठी गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामुलु यांचे झालेले आमरण उपोषणही मद्रासमध्ये झाले होते. हैद्राबाद वगैरेमध्ये नाही.
आता मद्रास म्हणजे आजचे चेन्नई कोठे आणि आंध्र कोठे हे पाहिले तर या मागण्या अविश्वसनीय वाटतील.
५) प्रधानमंत्री या वर उल्लेख केलेल्या मालिकेत काश्मीरच्या भारतातील सामीलनाम्याचाही भाग आहे.
मुळात आणीबाणीच्या परिस्थितीत महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. तेथे पाकिस्तानी घुसखोरांच्याविरूद्ध लढण्यासाठी भारतीय सेना तातडीने पाठवण्यापूर्वी माऊंटबॅटन यांनी अट घातली होती की तेथे शांतता प्रस्थापित झाल्यावर सार्वमत घेतले जावे. नेहरू व पटेल यांनी त्यास नाइलाजाने संमती दिली होती. परंतु सर्वात मोठा घोळ झाला तो नेहरूंनी रेडिओवरून केलेल्या भाषणात. असे सार्वमत घेण्यास आमची संमती असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. निम्म्यापेक्षा अधिक काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात असताना असे सार्वमत घेणे व्यावहारिक कसे होईल, याचा विचारही नेहरूंनी तेव्हा केला नाही.
एवढेच नव्हे, तर भारताने सेना पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर जीनांनीही पाकिस्तानची सेना तेथे पाठवण्याचा आदेश दिला. पण गंमत म्हणजे दोन्ही देशांच्या सेनेची सूत्रे तेव्हाही इंग्रजांकडेच होती. त्यांनी पाकिस्तानचे सैन्य तेथे पाठवण्यास नकार दिला. त्यावेळी जीनानी माउंटबॅटन यांना नेहरूंसमवेत चर्चेसाठी लाहोरला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळीही नेहरूंची भूमिका ही आपली सेना ही काश्मीरवर कब्जा करण्यासाठी आपण पाठवलेली आहे अशी नव्हती. अशा कचखाऊ भुमिकेमुळे भारतसरकार काश्मीरच्या बाबतीत कधीच निर्णायक भूमिका घेऊ शकले नाही. या सर्व परिस्थितीत आणि पाकिस्तानच्या सेनेचा या आक्रमणात हात नसल्याचा निर्णय इंग्लंडने दिला. व त्यांनीच १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानने घुसवलेले कबिलेवाले अजून काश्मीरच्या भूमीवर असतानाही एकतर्फी युद्धबंदीचा आदेश दिला.
राज्य स्थापनेच्या बाबतीतही आधी आंध्र, मग मुंबईसह महाराष्ट्र अशा एकापाठोपाठ एक राज्यांच्या निर्मितीबाबत नेहरूंचे सगळे अंदाज चुकत गेले. प्रत्येक वेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, हिंसाचार झाल्यावरच त्यांनी निर्णय घेतले. प्रत्येक निर्णय त्यांच्या मूळ निर्णयाविरुद्धच होता.
६) शेअर बाजार गेल्या वीस महिन्यातल्या नीचांकी पातळीवर अशी बातमी पाहिली. मुळात देशामधली परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये वाईट असताना, कोणतीही वृद्धी होत नसताना बाजार वाढत कसा गेला याचा प्रश्न कोणालाच कसा पडला नाही याचे आश्चर्य वाटते. जेव्हा वेळ येते तेव्हा पेरूसारख्या नगण्य शेअर बाजारामध्ये झालेल्या घसरणीचे कारण द्यायलाही कमी करत नाहीत. इतक्या पोकळपणावर हे प्रकार चालतात आणि प्रत्येकवेळी सोयीप्रमाणे ते शास्त्र असल्यासारखे आलेख काढून त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिले जाते.
>>मुळात आणीबाणीच्या
>>मुळात आणीबाणीच्या परिस्थितीत महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. तेथे पाकिस्तानी घुसखोरांच्याविरूद्ध लढण्यासाठी भारतीय सेना तातडीने पाठवण्यापूर्वी माऊंटबॅटन यांनी अट घातली होती की तेथे शांतता प्रस्थापित झाल्यावर सार्वमत घेतले जावे. नेहरू व पटेल यांनी त्यास नाइलाजाने संमती दिली होती. परंतु सर्वात मोठा घोळ झाला तो नेहरूंनी रेडिओवरून केलेल्या भाषणात. असे सार्वमत घेण्यास आमची संमती असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. निम्म्यापेक्षा अधिक काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात असताना असे सार्वमत घेणे व्यावहारिक कसे होईल, याचा विचारही नेहरूंनी तेव्हा केला नाही.
व्यावहारिक नाही हा विचार नेहरूंनी केला नाही की व्यावहारिक नसल्याचा विचार करूनच सार्वमताची ऐड्या काढली ? कारण त्यानंतर भारतने कधीही सार्वमत घेतलेच नाही.
>>त्यांनीच १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानने घुसवलेले कबिलेवाले अजून काश्मीरच्या भूमीवर असतानाही एकतर्फी युद्धबंदीचा आदेश दिला.
युद्धबंदीचा आदेश कोणी दिला? इंग्लंडने की नेहरूंनी? युद्धबंदी १ जानेवारी १९४९ रोजी जाहीर झाली. त्या आधी सुमारे १४ महिने युद्ध चालले. त्या १४ महिन्यांत लष्कराला कितपत यश मिळत होते?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फुसके बार – १८ जानेवारी २०१६
फुसके बार – १८ जानेवारी २०१६
‘
१) माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे निर्बुद्ध समजले जायचे.
त्याच्याबद्दलचा एक किस्सा मौजच्या दिवाळी अंकात आलेला आहे. विजय कुवळेकरांनी खुशवंत सिंगावर लिहिलेल्या लेखातून.
खुशवंतसिंगांनी त्यांची एक आठवण सांगितली. त्यांच्या विनोदी बुद्धीची एक झलक. ते निवृत्त होण्याच्या दोनेक आठवडे आधी खुशवंत सिंग यांच्या एक पुस्तकाचे प्रकाशन होते. खुशवंत सिंग त्यांची पुस्तके एखाद्या सुंदर स्त्रीला अर्पण करत आणि शक्यतो ती स्त्री प्रकाशनावेळी हजर राहील असेही पहात. प्रमुख पाहुण्याने सर्वात शेवटी अर्पणपत्रिका वाचायची व त्या पुस्तकाची प्रत त्या स्त्रीला द्यायची अशी त्यांची पद्धत असे.
झैलसिंग अर्पणपत्रिका वाचू लागले. “जिने आमच्या अनेक मैफिलींमध्ये रंग भरला, वगैरे वगैरे”. ती स्त्री खुशवंत सिंगांच्या घनिष्ट कौटुंबिक संबंधातली होती. ते एकेक ओळ वाचू लागले, तसे तिच्या लक्षात येऊ लागले की ती अर्पणपत्रिका तिच्यासाठीच आहे व ती खुशीने लालेलाल होत गेली. शेवटी ग्यानींनी तिचे नाव उच्चारले. टाळ्यांच्या कडकडाटात ती व्यासपीठावर आली. आणि तिने खुशवंतसिंगांचे चुंबन घेतले. ग्यानी अगदी बापुडवाण्या चेहयाने तिच्याकडे पहात म्हणाले, “देखो जी, हम तो ठहरे देहाती आदमी, देहात में ऐसा होता है, की जो डाकिया डाक लाता है, उसे कुछ ना कुछ मिलता ही है। लेकिन जो पढ के बताता है, उसे भी चवन्नी-अठन्नी मिल ही जाती है। असे म्हणून ते क्षणभर थांबले आणि तसेच बापुडवाण्या नजरेने बघत म्हणाले की “तो ये रही आप की किताब”. असे म्हणत पुस्तक तिच्या हातात ठेवले. त्यांचा ढंग इतका लाजवाव होता की सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून व हसून त्यांना दाद दिली.
२) याच लेखात भारत-पाक युद्धाच्यावेळचीही खुशवंतसिंगांची एक आठवण सांगितली आहे. न्यूयॉर्क टाइम्सला भारत-पाक संबंधांवर एक लेख तातडीने हवा होता. त्यांनी खुशवंत सिंगना भारतात फोन केला. तेव्हा त्यांना कळले की ते अमेरिकेतच आहेत व ते दीडदोन तासातच भारतात परतायला निघणार आहेत. त्यांनी विचारले की उद्या किती वाजेपर्यंत लेख देऊ शकाल?
या विषयावरचे सगळे संदर्भ त्यांच्या लक्षात होतेच. तेव्हा ते भारतात परतल्यावर दोन-तीन तासांमध्ये हा लेख देता येईल, असे ठरले. विमानातच त्यांनी बराचसा लेख लिहून पूर्ण केला. ठरल्याप्रमाणे टाइम्सवाल्यांचा फोन आला व फोनवरच चाळीस मिनिटांमध्ये तीन हजार शब्दांचा लेख तिकडच्या स्टेनोने उतरवून घेतला. ती म्हणाली की थोडा वेळ घरीच थांबा. लेख वाचून झाल्यावर वाचून दाखवते. बरोबर पाउणेक तासाने पुन्हा फोन आला. भारतीय शब्दांचे स्पेलिंग, अचुकपणा वगैरे सगळे तपासून घेतले.
न्यूयॉर्क टाइम्समधला हा लेख खूप गाजला. त्यांना या लेखाच्या मोबदल्याच्या स्वरूपात शब्दाला सहा रूपये मिळाले होते. तेव्हापासून अनेक परदेशी वृत्तपत्रे त्यांच्याकडून लेख मागवू लागली.
३) मालद्याची हिंसक घटना म्हणजे हिंदू-मुस्लिम जातीय दंगल नव्हती. मात्र “आता खरी ‘हिंदू-मुस्लीम’ दंगल घडवून आणण्याचं निमित्तच संघ परिवाराला मिळणार आहे. संघ परिवाराची कार्यपद्धती बघता एखाद्या मंदिराचा विध्वंस मुद्दामच केला जाऊ शकतो अथवा एखाद्या धार्मिक नेत्याचा खूनही केला जाऊ शकतो. त्यावरून सहज दंगल पेटेल आणि मग ती खऱ्या अर्थानं ‘हिंदू-मुस्लिम’ दंगल असेल.” असे प्रकाश बाळ यांच्या लोकमतमधील एका लेखातील विधान उद्धृत करून राजीव साने यांनी बाळ यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवले आहे.
बाळ काहीही म्हणोत, हिंदू-मुस्लिम नसली तरी मुळात मालद्याची घटना जातीयच होती व हिंसक होती. एवढे पुरेसे आहे. पण ती केवल हिंदू-मुस्लिम दंगल नव्हती म्हणून त्यास जबाबदार असणा-यांना बाळ दोषी धरत नाहीत हा त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. आता ते म्हणतात तशी दंगल झालीच, तर पहा मी म्हटले नव्हते असे होईल म्हणून टीव्हीवर झळकायला तयार. असा हा डाव आहे.
एरवी ते ज्या आक्रमकतेने संघाविरूद्ध बोलतात, तेवढ्याच आक्रमकतेने अशा वाईटाला वाईट म्हणायची त्यांची तयारी दिसत नाही, यातच त्यांचा एकांगीपणा दिसून येतो. संघ दंगल घडवून आणू शकेल असा दावा ते करतात. खरे तर एवढी मोठी हिंसा झाली तरी आपल्याला सरकारी संरक्षण मिळते व कोणतीही मोठी कारवाई होत नाही हे दिसल्यावर कोण अधिक निर्ढावल्यासारखे वागेल व कोणापासून अधिक धोका संभवतो? पण बाळ यांच्यासारख्या ठरवून खोडसाळपणा करणा-यांना हे प्रश्न पडणार नाहीत. मालदा व तेथील भागात असलेली बांगलादेशींची मोठी संख्या पाहता हा देशाच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. बाळ यांच्यासारख्यांना सोयीकरपणे हे मुद्दे दिसत नाहीत.
४) टीव्हीवरील चर्चेत भाग घेणा-यांना किती बिदागी मिळते? त्यात राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना कदाचित त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करायची संधी दिली मिळते म्हणून त्यांना काहीच मोबदला दिला जात नसावा (की दिला जातो?).
मात्र जे राजकीय पक्षांशी संबंधित नाहीत, त्यांना याबद्दल किती मोबदला मिळतो? त्यातही काही प्रमुख वाहिन्या आणि फार प्रेक्षक मिळत नसलेल्या वाहिन्या यांच्याकडून मिळणा-या मोबदल्यात फरक असतो का?
मुद्देसूद बोलणा-यांची वानवाच दिसते, पण काही जण नव्हत्याचे होते करून खोडसाळपणे मते मांडताना दिसतात. वर प्रकाश बाळ यांच्या खोडसाळपणाचे उदाहरण दिलेच आहे. ते किती मोबदल्यासाठी असे करायला तयार होतात, त्याचाही अंदाज यावरून येईल.
५) साहित्य संमेलनाध्यक्षांवर टीका करणारा लेख लिहिल्यामुळे संमेलनात असलेल्या चपराकच्या स्टॉलवरील आयोजकांनी जबरदस्तीने हलवले. खरे तर हा लेख संमेलन चालू होण्यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर चपराक या प्रकाशनाला त्यांचा स्टॉल उभा करण्यास परवानगी कशी दिली?
शिवाय कशाबद्दल आक्षेप असेल तर महामंडळाने त्याबाबतची भूमिका घ्यायला हवी होती. चपराकच्या कोणा प्रतिनिधीने तेथे काही गैरवर्तन केलेले नव्हते. तेव्हा आयोजकांनी त्यांच्या अधिकारात हा उद्योग करण्याचे कारणच नव्हते.
या अशा कारणावरून अशी मनमानी करणा-या या शिक्षणसम्राटांच्या संस्थांमधले वातावरण किती मोकळे असेल याची यावरून कल्पना यावी.
६) काल साहित्य संमेलनात गुलजार यांनी कुसुमाग्रजांची कणा ही त्यांनी रीड या नावाने हिंदीत अनुवादीत केलेली कविता ऐकवली.
त्यांची मूळ मराठी कविता पुढे देत आहे.
कणा
ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
खुशवंत सिंग यांनी झैल सिंग
खुशवंत सिंग यांनी झैल सिंग यांची सांगीतलेली आठवण मजेशीरच आहे![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
फुसके बार – २२ जानेवारी २०१६
फुसके बार – २२ जानेवारी २०१६
‘
१) रोहित वेमुला आत्महत्या – इतरांवरील कारवाई मागे घेतल्यावर मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणार?
आजच इतर चार विद्यार्थांवरची कारवाई मागे घेतल्याचे कळते आहे. याहीपुढे जाऊन आर्थिक मदत, कोणाची तरी गच्छंती यावर हे प्रकरण मिटले, तरी अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत. यात कोठेही दलित अँगल नसताना त्यावरून राळ उठवली गेली. पप्पू, ममता बॅनर्जीच्या पक्षांच्या लोकांनी तेथे भाषणे दिली. पप्पूच्या पक्षाचे सरकार केद्रात व राज्यातही असताना दहापैकी मागच्या नऊ दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. तिकडे ममता बॅनर्जी उघडपणे अनाचाराचे सरकार चालवत आहेत. अशा लोकांना आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला वापरू दिले. पप्पूला तर आंदोलनकर्त्यांनी याबद्दल एक प्रश्नही विचारला नाही. जणू आधी आत्महत्या केलेल्या दलितांशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. (या अर्थाने हे आंदोलन ‘दलितां’शी संबंधित नव्हते असे म्हणता येईल).
या आंदोलनाच्या दरम्यान हैद्राबाद विद्यापीठाने या पाच विद्यार्थांची शिष्यवृत्ती सात-आठ महिन्यांपासून बंद केली असा आरोप केला गेला. आजच्या टीव्हीवरील चर्चेत ऐकले की याचा व आंदोलनाचा काहीही संबंध नाही आणि कितीतरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप थकलेली आहे. तेथील रचनेत काहीतरी बदल झाल्यामुले हे झाल्याचे व ती यथावकाश एक-रकमी मिळेल असे कळते. यापेक्षा अधिक तपशील माझ्याकडे नाही. तरीदेखील ‘दलिता'च्या पोटावर पाय असा त्याचा प्रचार केला गेल्याचे आपण ऐकले.
मूळ प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न न केल्यामुळे काय होईल, की दलितांशी संबंधित प्रश्नावरून काही राजकीय फायदा उठवता येतो का यावर ही सगळीच राजकीय गिधाडे टपून बसतील.
खरे तर आयआयटीतला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे, कोट्यासारख्या ठिकाणी मानसिक ताण सहन न झाल्यामुळे किंवा असे राजकीय स्वरूपाचे आंदोलन करून आत्महत्या करणारा यांमध्ये फार काही फरक वाटत नाही. सगळ्याच घटना दुर्दैवी आहेत. यात कोठेही कोणाच्या जातीचा प्रश्न नाही. मागासवर्गीय व गरीब अशा मुलांपुढची आव्हाने इतर मुलांपेक्षा वेगळी व मोठी असतात. त्यासंदर्भात मुलांचे प्रभावी समुपदेशन करण्यासाठी देशभरात यंत्रणा उभी करण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का?
'पहा, या विद्यार्थ्यावरची आधीची कारवाई चुकीची होती, हेच यावरून सिद्ध होते' अशी एक बाजू म्हणेल, तर 'आंदोलन चिघळू नये म्हणून ही भूमिका घ्यावी लागली' असे दुसरी बाजू म्हणेल. मात्र विद्यार्थ्यांनी (मग ते कोणीही असोत) राजकीय आंदोलने करावीत का, हे मूलभूत प्रश्न मागे पडतील किंबहुना अशी आदोलने करण्याचा प्रत्येकाचा हक्कच आहे, हा सोयीचा प्रस्थापित विचारच चालू राहील.
हे प्रकरण शांत झाल्यावरही यातील मूलभूत मुद्द्यांचा पाठपुरावा करत रहायला हवा. तरच आणखी दलित विद्यार्थ्यांच्या नशिबी असा अंत येणार नाही.
२) बिहारमधील नीतिशकुमार सरकारने लालू व त्यांच्या मुलांवरील अनेक खटले मागे घेतले आहेत.
या खटल्यांमुळे कोर्टाचा वेळ वाया जातो, हजारो केसेस कोर्टापुढे प्रलंबित आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे नीतिशच्या पक्षाचा प्रवक्ता सांगतो आहे. मात्र मागे घेतलेल्या खटल्यांमध्ये जातीय आधारावर लालूच्या पक्षाने पुकारलेल्या बंदमुळे दाखल केलेला खटलाही सामील आहे. हा बंद पाटणा उच्च न्यायालयानेही बेकायदेशीर ठरवला होता.
मी मागेही म्हटले होते स्वच्छ नीतिशनी सत्ता राखण्याच्या व मोदींशी वैयक्तिक स्पर्धा करण्याच्या नादात चिखलात उडी मारली आहे आणि बिहारला वीस वर्षांनी मागे टाकणा-या, भ्रष्टाचार व अनाचाराच्या युगात नेणा-या लालू नावाच्या दैत्याशी संग केला होता. लालूला त्यात गमावण्यासारखे काहीच नव्हते. सौदा होणार होता तो नीतिशनी कमावलेल्या पुण्याईचा. तेच होताना दिसत आहे. अगदी दररोज.
त्यातल्या त्यात एक चांगली बातमी काल वाचण्यात आली. निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे नीतिशनी महिलांना ३५% आरक्षणाची घोषणा केली. आता केन्द्रातही हे होण्यास हातभार लागावा.
३) एबीपी न्यूजवरील प्रधानमंत्री ही मालिका
चीनशी संघर्ष
१९६२चे भारत-चीन युद्धावर या मालिकेत एक प्रकरण आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि चीनमधली क्रांती या घटना साधारणपणे एकाच सुमारास झाल्या. त्यानंतर लगेचच म्हणजे १९५०मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला. त्यानंतर पंचशील करारामध्ये भारताला तर काहीही मिळाले नाहीच, पण भारताने तिबेटवरचा हक्क मान्य करून टाकला.
एकापाठोपाठ एक चुका करण्याचा विडाच नेहरूंनी उचलला होता. त्यांचे मित्र व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यात आणि लष्करप्रमुख थिमय्या यांच्यात एकमेकांचे तोंड न पाहण्याइतपत कडाक्याचे मतभेद. मेनन यांच्या मताप्रमाणे चीनपेक्षा पाकिस्तानकडून धोका अधिक होता, त्यामुळे चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करायला ते तयारच नव्हते. त्यात नेहरूंनी त्याचे नातेवाईक समजले जाणारे बी. एम. कौल यांना लेफ्टनंट जनरल म्हणून बढती दिली. ते करताना त्यांनी अनेक अधिका-यांच्या वरिष्ठतेचा बळी दिला. त्यावरून चिडून जनरल थिमैया यांनी नेहरूंकडे आपला राजीनामा सोपवला. नेहरूंनी तो नाकारला. परंतु नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करणे नेहरूंनी सोडले नाही.
चीनचे सामर्थ्य ओळखून त्यांनी चीनशी मैत्री करून युद्ध किंवा संघर्ष करण्याचा प्रयत्न चालवला होता. पण हा प्रकार सशाने वाघाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करण्यासारखा होता. बरे, ब्रिटिशांनी चिनी लोकांच्या महत्त्वाकांक्षा ओळखूनच तिबेट हा एक ‘बफर’ प्रदेश तयार केला होता. परंतु त्यातून धडा घेण्याऐवजी नेहरूंनी त्यावरचा चीनचा हक्क मान्य केला. त्यानंतर फॉरवर्ड पॉलिसी या नावाने चीनच्या सीमेवर सैन्यबल वाढवण्याचे ठरले. पण जसे अर्थसंकल्पांमध्ये घोषणा तर केल्या, पण त्यासाठी निधीच उपलब्ध न करण्याचे प्रकार चालतात, तसाच प्रकार त्यावेळीही झाला. त्यामुळे या काळात जवळजवळ आठ वर्षे मिळूनही त्याकाळात काहीही भरीव प्रगती झाली नाही.
या सगळ्या प्रकारामुळे चीनने चढाई केली तेव्हा भारतीय सैन्याकडे दारूगोळा नव्हता, पुरेसे अन्न नव्हते, होती ती केवळ हिंमत. केवळ हिंमतीवर लढणारे सैन्य किती टिकणार? मागे मी रेझांग ला च्या लढाईत भारतीय सैन्याच्या कुमाऊं बटालियनमधील अहिर यादव जवानांच्या तुकडीने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल लिहिले होते. ज्यांची इच्छा आहे त्यांनी या लढाईचे वर्णन जरूर वाचावे.
अरूणाचल सीमेवर तैनात सैन्याचा चिन्यासारखे दिसणारे पुतळे किंवा चित्रे तयार करून त्यांच्याशी लढून बायोनेटचा वापर करण्याचा सराव चालू होता. पंचशीलचे नाटक चालू होते, तेव्हा लष्कराला सांगून चिन्यांचा कोथळा काढण्याचा सराव बंद करण्यास सांगितले गेले.
या सगळ्या प्रकाराचा परिणाम एकच झाला, भारतीय सैन्याची ससेहोलपट.
दोन्ही बाजूंचे नुकसान तपासले तर भारतीय सैन्याचे १३८३ सैनिक मृत्युमुखी पडले. १०४७ जखमी झाले, १६९६ बेपत्ता झाले तर ४००० सैनिकांना चीनने आपल्या ताब्यात घेतले. या तुलनेत चीनचे ७२५ सैनिक मारले गेले तर १७०० जखमी झाले. तर मग कोणी म्हणेल की मग यावरून भारतीय सैन्य हरले असे का म्हणतात. याचे उत्तर दोन्ही बाजूंच्या सैन्यसंख्येत होते. भारताचे १० ते १२ हजार सैनिक चीनच्या ८०हजारांपुढे कसे टिकणार होते? त्यामुळे चीनने आपला ४३,००० स्वे. किमी प्रदेश व्यापला. नेहरू या काळात काही महिने, काही वर्षे हे युद्ध टिकेल असे भाषणांमध्ये सांगत होते. पण नशीब असे (नशीबच म्हणायला हवे) की एका महिन्यानंतर चीननेच त्यांना जे हवे ते मिळाल्यानंतर युद्ध एकतर्फ़ी थांबवले.
या युद्धापूर्वी चीनने भारताला दिलेला पर्याय अस होता की अरूणाचल प्रदेशचा भाग भारताकडेच ठेवून अक्साई चीनचा भाग चीनला देण्याबाबत मान्यता देणे. पण गवताचे पातेही उगवत नाही त्या प्रदेशावरून काय लढायचे अशी नेहरूंची दूरदृष्टी होती. त्यावर तेव्हाचे खासदार यांनी चिडून व उपरोधाने आपली टोपी काढून विचारले होते की माझ्या डोक्यावरही केस उगवत नाहीत, तर माझे डोके निरूपयोगी समजायचे काय?
मागे वळून पाहिले तर पंतप्रधान नेहरू, व्ही. के. कृष्णा मेनन, ले.ज. कौल हे ती जबाबदारी हाताळण्यास अजिबात लायक नसलेले हे त्रिकूटच लष्कराचा व पर्यायाने देशाचा मुखभंग होण्यास जबाबदार होते असे म्हणावे लागते. आपण देशाचे तहहयात पंतप्रधान झालो आहोत असा समजच जणू नेहरूंनी करून घेतला होता आणि एवढ्या मोठ्या नामुष्कीनंतरही ते त्या पदावरून पायउतार झाले नाहीत. बळींचा बकरा बनवले गेले ते मेनन यांना. एवढे झाल्यावरही आपल्याकडच्या लोकांमध्ये कवित्व शिल्लक होते आणि त्यांनी मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री बनवल्यावर त्याला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे उपमा दिल्या. धन्य असते लोकांची.
ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी यांनी या सगळ्या तमाशावर हिमालयन ब्लंडर हे पुस्तक लिहिले. त्यावर बंदी आणण्याचे काम मात्र भारत सरकारने तत्परतेने केले. तमाशा म्हणणे योग्य एकाच कारणामुळे वाटत नाही की नेते नेभळट निघाले तरी आपल्या जवानांनी हिमालयातल्या ऐन थंडीत आपले रक्त तिथल्या बर्फात सांडले. पुन्हा म्हणतो, या नेभळटांसाठी.
पकवणं बंद करा.
१. जागे व्हा.
२. मतं मांडण्याआधी पूर्ण माहिती द्या.
३. ही संपूर्ण मालिका यूट्यूबवर उपलब्ध आहे. महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चार-चटोरी ओळी खरडून पकवू नका.
---
पहिला भाग पूर्ण आणि दुसरा भाग थोडा बघितला. इतिहासाचा चटपटीत स्नॅक वाढणारी मालिका वाटली. जरा काही भारदस्तपणाचं पोषण म्हणून दोन स्कॉलर पेरले आहेत. घटनांचं नाट्यमय रूपांतर दाखवताना उगाच नाट्यमय पार्श्वसंगीत आहे. पटेलांचं पात्र तर हास्यास्पद बनवलं आहे. पटेलांच्या आवाजाचं ध्वनिमुद्रण ऐकवलं आहे, ज्यात (अर्थातच) असला हास्यास्पदपणा नाही. जुनागढच्या नवाबाला नाचगाण्याबद्दल आपुलकी, प्राण्यांवर प्रेम आणि दोन कुत्र्यांचं लग्न लावलं हे गुन्हे असल्यासारखं बोललं गेलंय. मधल्या काळात नैतिकता सैल झाली असेलही, पण त्या काळात या गोष्टी गुन्हे मानल्या जात असत? त्याच्या नावाने कहीं-सुनी बाते आहेत ते ही नाट्यमय प्रसंगांमध्ये दाखवलं आहे. शेखर कपूरपेक्षा बरं हिंदी आमच्यासारखे 'उंच जिने उप्पर से धाडकन पड्या' लोक बरं बोलू!
निवेदनात नेहरुंचा उल्लेख फक्त नेहरू. पटेलांचा उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल. भगवा अजेंडा घेऊन मालिका काढल्ये हे समजणं फार कठीण नाही.
ज्यांना इतिहासाबद्दल अजिबातच माहिती नाही त्यांच्यासाठी हे नवनीत बरंय, असं पहिला भाग बघून वाटलं होतं. पण दुसरा भाग तर निव्वळ बनवाबनवी वाटायला लागल्ये. संजय लीला भन्साळीला दिग्दर्शन करायला लावलं असतं तर निदान भव्यदिव्य सेट्स बघूनतरी डोळे निवले असते. ते ही नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भगवा अजेंडा? तुम्हाला काय भगवी कावीळ झालेली आहे की काय?
तुम्ही नेहमीप्रमाणे एवढ्या लवकर पकता हा माझा दोष नाही. मालिकेचा संदर्भ दिला आहे. लपवून ठेवण्याचा प्रश्न नाही.
पटेलांचे पात्र वगैरे गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत नाहीत. तुमचे भलत्याच गोष्टींकडे लक्ष जाते हे स्पष्ट दिसते.
चीनच्या युद्धाच्या संबंधित यातील किती गोष्टी सर्वसामान्यांना माहित आहेत? यातलाच पुढचा हिंदूकोडबिलाचा एपिसोड पाहिलात? नेहरूंनी हिंदू कोड बिल झाल्यावर तसेच सुधारणावादी मुस्लिम बिलही केले जाईल असे सांगितले. पण मुस्लिमांच्याबाबतीत तसे न करता कसे शेपुट घातले ते पाहिलेत? ही तथ्ये माहित आहेत का कोणाला? ते दाखवले की लगेच भगवा अजेंडा कसा? आणि उठसुट अशा गोष्टींना भगवा अजेंडा म्हणणा-या तुमच्यासारख्यांचा कुठला अजेंडा म्हणायचा?
लष्कराची तयारी न झाल्याबद्दल अनेक लष्करी तज्ज्ञांनी लिहिलेले आहे, ते वेडे आणि उठसुट भगवा अजेंडा म्हणणारे तुमच्यासारखे विद्वान सूज्ञ काय?
लिहिण्याआधी थोडा संयम ठेवलात तर काहीतरी योग्य प्रतिसाद उमटतील. पण तुम्हाला तुमचा जो अजेंडा राबवायचा आहे ते पाहता मला दुषणे देणे हे तुमचे एकमेव काम आहे असे दिसते.
असा थर्डक्लास कमेंट्स करण्याच्या स्वत: मालकांच्या/संपादकांच्या या प्रव्ृत्तीचा निषेध.
तुमच्या अशा ाजेंड्याचा तुमच्या पॉलिसीमध्ये उल्लेख करा. तेवढेच बाकी राहिले अाहेत. म्हणजे कोणाला वावगे वाटायला नको.
उठसुट या पोर्टलच्या दर्जाबद्दल मला लेक्चर देणारे दुसरे संपादक राजेश घासकडवी यांनीही मालकांची सदर कमेंट पहावी आणि मालकीपोटी येणा-या हक्काचा हा दुरूपयोग आहे का ते सांगावे.
मालकीपोटी येणा-या हक्काचा हा
मालकी पोटी अनिर्बंध हक्क प्राप्त होतो राकु साहेब. आणि अनिर्बंध हक्क आहे म्हणल्यावर त्याचा "दुरुपयोग" वगैरे काहीही नसतो, हक्काचा फक्त "उपयोग" असतो.
काळजी घ्या, जपा स्वतःला.
कुलकर्णी, तुम्हीच काय इतर कोणत्याच व्यक्तीविरोधात माझा काहीही अजेंडा नाही. अजेंडे चालवण्यासाठी मी मेहेनत करून ड्रूपाल वापरायला शिकले नाही; ना संस्थळ सुरू केलं. तुमच्या विरोधात कुणा एका किंवा अनेक व्यक्तीचा अजेंडा आहे असं वाटत असेल तर ते मनातून काढून टाका; लोकांना आपापली आयुष्यं, अडचणी आणि ध्येयं असतात. इथे कोणी नेहरु, गांधी, वा गोळवलकरांबद्दलही अजेंडे बाळगत लिहीत नाहीत. 'मी विरुद्ध इतर' असा विचार होता होईतो टाळलेला बरा असतो.
एकदा शांतपणे स्वतःची भाषा काय आहे ते वाचा. दोन दिवसांनंतर पश्चाताप होईल असं लिहिणं टाळा. तुम्ही अतिशय रागात, संयम सुटून, अनेकदा लोकांना नावं ठेवली आहेत. एवढ्या संतापाची गरज आहे का? तुम्हाला संताप आवरता येत नसेल तर प्रतिसाद दोन दिवसांनंतर लिहा; कोणीही, कुठेही पळून जात नाहीयेत. बाकिचं/बाकीचे सोडा, पण एवढा त्रागा तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठीही बरा नाही. जपा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी
मस्त मुद्दा. नेविल मॅक्सवेल यांच्या "इंडियाज चायना वॉर" पुस्तकावरही बंदी घालण्यात आली. सध्या "न सांगण्याजोगी गोष्ट" हे मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लिहिलेले पुस्तक वाचत आहे.
------------
नेहमी प्रमाणे - सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचे जबाबदार असतात. ( आता लगेच - हे विद्यार्थी सिस्टिम मधलेच आहेत्त ओ - असा प्रतिवाद होईलच. )
जनरल बी एम कौल - The Untold Story
जनरल बी एम कौल ह्यांनी आपल्यावर झालेले अनेक आरोप कसे वैयक्तिक हेव्यादाव्यातून झालेले आहेत असे दाखविण्यासाठी The Untold Story नावाचे आत्मकथेसारखे पुस्त्क १९६७ मध्ये लिहिले होते. ते तुम्ही वाचले-पाहिले आहे काय?
त्यांचे नेहरूंशी काही नाते नव्हते. दोघेहि काश्मिरी ब्राह्मण असल्यामुळे हा खोडसाळ आरोप करण्यात येतो. जनरल कौल ह्यांचे वडील लवकर वारल्यामुळे त्यांचे लाहोरमधील बालपण बर्याच कष्टात आणि गरिबीत गेले ही मात्र वस्तुस्थिति आहे. कौल ह्यांनी नेहरूंना आयुष्यात पहिल्यांदा दिल्लीमध्ये जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष म्हणून भाषण करतांना पाहिले असा पान १० वर उल्लेख आहे. त्यावेळेस कौल हे १७ वर्षांचे होते.
हा खोटा आरोप जर पुनःपुनः केला गेल्यामुळे खरा वाटू लागतो तर इतर आरोपांमध्येहि कितपत तथ्य आहे अशी शंका येऊ लागते. ले.ज.पदाच्या बढतीविषयक कौल ह्यांची version नेहमी ऐकण्यात येते त्याहून वेगळी आहे.
भाजप लॉबीच्या प्रथमपासूनच्या नेहरू-विरोधी भूमिकेतून नेहरूंच्या आयुष्यातील काश्मीर आणि चीन ही प्रकरणेच केवळ उचलून बाकीकडे दुर्लक्ष करायचे असे असू शकेल काय?
नातेवाईक आहेत की जवळचे हा
नातेवाईक आहेत की जवळचे हा मुद्दा तसा महत्त्वाचा आहे. नेहरूंनी त्यांना बढती देताना इतर डझनभर तरी अधिका-यांची ज्येष्ठता व गुणवत्ता डावलली.
कौल यांच्याबद्दल थिमय्यांनी घेतलेली भूमिकाही बरेच दर्शवते. त्यांना त्यापूर्वी युद्धाचा कसलाही अनुभव नव्हता, ते सर्व्हिस कोरमध्ये होते. लष्करी अधिका-यांच्या जजमेंटवर थोडातरी विश्वास ठेवू.
यात भाजप लॉबीचा प्रश्न नाही. चुकीला चूक म्हणण्यात काही गैर नाही.
पुढच्या काही पोस्ट्समध्ये सदर मालिकेसंदर्भात नेहरूंच्या चांगुलपणाचाही उल्लेख येईल. थोडी कळ काढा.
पुढच्या काही पोस्ट्समध्ये सदर
राजेशराव, नेहरू हे एक व्हिलन होते असं माझं मत आहे. भाजपाविरोधकांनी नेहरूंना अॅबसॉल्व्ह करायचा चंग बांधलेला आहे असे माझे मत ... जाताजाता नोंदवून ठेवतो इतकेच. पण ज्या बाबींबद्दल मी नेहरूंना दोष देतो त्या भाजपा सुद्धा करते (व म्हणून भाजपा सुद्धा दोषी आहे) असेही नोंद करु इच्छितो. पण तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे. सध्या इतकेच.
नेहरू हे एक व्हिलन होते असं
गब्बर कडुन कोणाबद्दल स्पष्ट असे त्याचे स्वताचे मत ( आणि ते सुद्धा कुठल्याही लिंका न देता ) बघायला मिळाले त्यामुळे मनस्वी आनंद झाला.
त्यामुळे मनस्वी आनंद
यूं दिल के झूम उठने का कुछ तो है सबब आखिर
या तो ये फूलोंकी महक है या फिर आपने इधर देखा
"नातेवाईक आहेत की जवळचे हा
"नातेवाईक आहेत की जवळचे हा मुद्दा तसा महत्त्वाचा आहे." येथे चुकून 'नाही'च्या ऐवजी आहे असा उल्लेख झालेला आहे. तो पुढीलवाक्यांच्या द्ृष्टीने सुसंगत नाही. येथे 'संपादन'चे बटन का दिसत नाही माहित नाही. कदाचित संपादकांच्या या पोस्ट्स एकत्र करण्यामुळे होत असेल. अनेकदा पोस्टही एडिट करता येत नाही.
त्यामुळे ही वेगळी कमेंट टाकत आहे.
प्रतिसादावर उपप्रतिसाद आला
प्रतिसादावर उपप्रतिसाद आला असेल तर मूळ प्रतिसाद संपादित करता येत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रधानमंत्रीची पूर्ण मालिका
प्रधानमंत्रीची पूर्ण मालिका माझ्या संग्रही आहे.
'सिलेक्टिव्ह' तथ्यांचे नाट्यरुपांतर इतकेच या सिरीजबद्द्ल म्हणता येईल. त्या सिरीज चा आधार घेऊन काहीही चर्चा करणे म्हणजे केवळ कालापव्यय! एकाही भागार सत्य चारी अंगांनी विचार करून येत नाही, एखादा चमचमीत तुकडाच समोर ठेवला जातो आणि त्यालाच इतिहास इतिहास म्हणून बोंबलणार्यांच्या चर्चेची सोय करून दिली जाते!
==
त्या सिरीज पेक्षा तर 'इंडीया आफ्टर गांधी'सारख्या खपाऊ पुस्तकातही बराच अधिक इतिहास आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सिलेक्टिव्ह का होईना 'तथ्ये' आहेत म्हणत अाहात ना?
"सिलेक्टिव्ह' तथ्यांचे नाट्यरुपांतर इतकेच या सिरीजबद्द्ल म्हणता येईल."
सिलेक्टिव्ह का होईना 'तथ्ये' आहेत म्हणत अाहात ना? की मिथ्य भरलेले अाहे? ही सत्ये आजवर किती सांगितली गेली अाहेत सांगा.
तरी असे म्हणताहात याचे आश्चर्य वाटते.
इथे तर काहींना भगवा अजेंडा दिसतोय.
तूर्त 'इंडीया आफ्टर गांधी' हा या पोस्टचा आधार वा संदर्भ नाही इतकेच.
ऐसीवर विषयाच्या अनुशंगानेच
ऐसीवर विषयाच्या अनुशंगानेच चर्चा होते असे नाही तेव्हा हा या पोस्ट विषय आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही हे एक. ते प्रतिसादक ठरवणार. इथे अवांतर, समांतर लिहिणे संमत आहे! त्यातून नवी चर्चा उद्भवली तर येथील व्यवस्थापक त्यांचधावेगळा धागाही काढतात. (हे फेसबुक किंवा तुमचा ब्लॉग नव्हे, प्रतिसादांवर लेखकाचा कंट्रोल इथे नाही आणि लेखक कोणते प्रतिसाद हवेत ते ठरवूही शकत नाही हे आधी स्वीकारा)
आजवर इतके विनोदी काही वाचले नाही.
समाजा एखाद्याने सांगितले भारतीय सैनिकांनी एका व्यक्तीला मारून टाकले - हे सत्यच आहे पण कोणला मारले, कधी मारले, कसे मारले इत्यादी गोष्टी लपवल्या तर हे सत्य निरुपयोगी आहे!
तसेच त्या सिरीजचे आहे
उदा. काश्मिर प्रश्न. युनोमध्ये जेव्हा नेहरू गेले तेव्हा भारतीय सैन्याला उपलब्ध सामग्रीत काश्मिर जिंकणे शक्य होते का? अक्साईचीन मुळातच काश्मिरराज्यात होते का वगैरे माहिती दिलेली नाही. लोकांना जी सनसनाटी आवडते तितकीच द्यायची नीट माहिती द्यायची नाही आणि मग तुमच्यासारखे लोक तितक्याशा माहितीवर शब्दांचे धबधबे ओतणार! काका मला वाचवा!!!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेशसाहेब, तुम्हीच तुमचा
ऋषिकेशसाहेब,
तुम्हीच तुमचा विनोद करून घेता हेही तुमच्या लक्षात येत नाही. मागेही स्त्रियांवरील अत्याचारांच्या संदर्भातील लेखाचा सूर काय आहे हेदेखील लक्षात न घेता कुठलेतरी स्टॅटिस्टिक्स वापरून मला उपदेश केला होतात. तेव्हा आता याचे आस्चर्य वाटत नाही.
"समाजा एखाद्याने सांगितले भारतीय सैनिकांनी एका व्यक्तीला मारून टाकले - हे सत्यच आहे पण कोणला मारले, कधी मारले, कसे मारले इत्यादी गोष्टी लपवल्या तर हे सत्य निरुपयोगी आहे!" असे काही आहे काय? नाही तर का लिहिले?
"उदा. काश्मिर प्रश्न. युनोमध्ये जेव्हा नेहरू गेले तेव्हा भारतीय सैन्याला उपलब्ध सामग्रीत काश्मिर जिंकणे शक्य होते का? अक्साईचीन मुळातच काश्मिरराज्यात होते का वगैरे माहिती दिलेली नाही." आता तर तुम्ही संरक्षणतज्ज्ञही झालात. अभिनंदन. उपलब्ध सामग्रीत काश्मीर जिंकणे शक्य होते काय या तुमच्या प्रश्नाने तमाम भारतीय धन्य होतील. शिवाय काहीही असले तरी युनोमध्ये जायचे कारण काय? माझेही शतश: नमन.
अर्धसत्य = असत्य
थोडक्यात ऋ म्हणतोय की अर्धसत्य सांगणं हे खोटं बोलण्यासारखंच असतं.
किंवा
'माणसाने माणसाला मारलं' आणि 'गांधीजींवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल नथुरामला फाशी दिलं' या दोन वाक्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
कोणत्याही विषयाचा काही-किंचित अभ्यास करणार्या व्यक्तीला या गोष्टी समजतात; फार व्यासंगाची गरज नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कळले नाही (अवांतर)
या संदर्भात...
यातून नक्की काय म्हणायचे आहे, ते कळले नाही.
बोले तो, 'माणसाने माणसाला मारले' हे विधान 'गांधीजींवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल नथुरामला फाशी दिले' या विधानाशी (किंवा त्यातील कोणत्याही उपविधानाशी) ईक्विवॅलण्ट नाही??? (पक्षी, (अ) गांधीजी आणि नथुराम यांजपैकी एकजण (किंवा दोघेही) आणि/किंवा (ब) नथुराम आणि त्याचा जल्लाद यांजपैकी एकजण (किंवा दोघेही) 'माणूस' नाही(त), असे काही?)
पण मग यांजपैकी नक्की कोण(कोण) 'माणूस' नाही(त) असे सुचवायचे आहे? गां., की न., की न.चा ज.? की यांपैकी कोठलेतरी दोन? (नेमके कोणते दोन?)
की तिघेही???
विधान भलतेच संदिग्ध आहे ब्वॉ!
तुम्ही नमन करताच आहात तर
तुम्ही नमन करताच आहात तर 'लेखक होण्यासाठी एक चांगले चतुरस्र व विचार स्वीकारण्यासाठी मेंदू खुला ठेवणारे साक्षेपी वाचक व्हा' असा आशीर्वाद देतो![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
सुरूवात म्हणून 'अक्साई चीन' या धाग्यापासून वाचन सुरू करता येईल. याबाबत जालावर खुल्या दिलाने वाचलेत तर मोप माहिती उपलब्ध आहे, अनेक चांगली पुस्तकेही आहेत. पण वृत्तपत्र आणि टीव्हीवरील सिरीजवरून मते बनवायची असेच जर ठरवले असेल तर कशी बरं चर्चा करणार?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुमच्या आतापर्यंतच्या कमेंट्स
तुमच्या आतापर्यंतच्या कमेंट्स पाहिल्या त्यावरून मूळ लेख समजण्याच्या बाबतीत तुम्ही बिगारीतच आहात. आशीर्वाद वगैरे देण्याचा खेळही खेळू नका.
चर्चा?
तुमच्या आतापर्यंतच्या कमेंट्स पाहिल्या त्यावरून मूळ लेख समजण्याच्या बाबतीत तुम्ही बिगारीतच आहात. आशीर्वाद वगैरे देण्याचा खेळही खेळू नका. तुमच्या कमेंट्सचे स्वरूप पाहता चर्चा करण्याचा तुमचा हेतु दिसतो असे तुम्हाला वाटते की काय?
यार!
लय भारी बर्का राकु! अपुन तुमरा फ्यान. कस्ले सांसदिय शब्दात शिवीगाळ कर्ता तुम्ही!! वाह. मस्तंच.
बरं.
इथल्या संपादक मंडळाला एक खून माफ करून टाकीन असं माझं मत आहे. लोकहो, तुमचं मत काय?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मुळ लेख!!! येऊन जाऊन लेखकच
मुळ लेख!!! येऊन जाऊन लेखकच त्याला फुसके बार म्हणतोय! त्याला समजण्यात शक्ती नि वेळ काय फुकट घालवायचा!!![Tongue](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/tongue.gif)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तू लेखकाचा विनय असू शकतो.
तू लेखकाचा विनय असू शकतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तू की तो?
तू की तो?
काही अर्थच लागेना गेलाय!
तू नाही तो पायजेलाय.
तू नाही तो पायजेलाय.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दुसरे काहीही नाव दिले असते
दुसरे काहीही नाव दिले असते तरी हेटाळणी करण्याची तुमच्यासारखी व्ृत्ती असलेल्यांनी काहीतरी शोधून काढलेच असते की. आता नवीन धागे तुम्ही वाचनमात्र केले आहेत, त्यामुळे वाचकांना कमेंट करता येणार नाहीत, तसे तुम्हालाही.
अाता पुढची शिक्षा काय आहे? मी इथल्या कोणत्याही नियमाचा भंग करत नसतानाही तुमच्या व्हि्म्स न फॅन्सीज पाळत नाही म्हणून पोस्ट वाचनमात्र करण्याची शिक्षा दिली आहे. मोजणेही चालू आहे. एक-दोन-तीन मोजूनही झालेले अाहे. तेव्हा आता पुढची शिक्षा काय आहे?
बाकी पोस्ट वाचनमात्र करण्यामुळे कोणी कमेंट करू शकत नाही, त्यामुळे ऐसी अक्षरे या पोर्टलचा 'उदात्त' हेतु मात्र सफल होताना नक्की दिसतो आहे. यावर एकमत.
संपादकांपैकीच कोणी सदस्याच्या लेखनाला 'डुकराची पिलावळ' असे संबोधणे, सदस्याच्या लिखाणावर भाजपचा अजेंडा असे संबोधणे, सदस्याच्या लिखाणावर असंबद्ध कमेंट्स करणे याबद्दल संपादकांसाठी काही शिक्षा असते का हो ऐसी अक्षरेमध्ये?
छे, भलतेच काय विचारतोय मी? फुकटात येथे येऊ देऊन आपल्या पोस्ट्स टाकण्याचे स्वातंत्र्य देत नाहीयेत का संपादक? ते उपकार विसरून हे भलतेच काय विचारतोय मी?
राकु,
मी काय म्हण्तो --
ही इथली मंडळी फारच चांगली वगैरे आहेत असं नाही.
ही सुद्धा तुमच्याआमच्यासरखीच माणसं आहेत. खूपदा बायस्ड आसतात सामाजिक राजकिय विषयांवर.
पण असू देत की.
ऋ नं कैतरी डुक्कर वगैरेशी संबंधित लिहिलेलं होतं; ते वैतागून लिहिलं होतं. आता त्यानं ते काढूनही टाकलय.
शिवाय खेद व्यक्त केलाय. हे इतकं पुरेसं नैय्ये का ?
तुम्ही भरमसाट लिहिता. माझ्यासारखा कैकांना(म्हणजे थत्ते वगैरे) तुमचं लिहिणं इंट्रेस्टिंग वाटतं.
तुम्ही लिहा की. पण कुणी तुमच्या लिखाणाबद्दल वैतागणार, "बोअर होणार" हे पण स्वाभाविक आहे की.
नसेल आवडत यांना तुमचं लिखाण. पण अदरवाइज हे लोक तुम्हाला वाटतात तितके वाईट नाहित.
(पकाउ असतील; पूर्वग्रहदूषितही असतील.) पण एकूणात अगदिच पूर्ण दडपशाही वगैरे इतर संस्थळांच्या मानानं काहीही नाही. (आय डी ब्यान
करीत नाहित.) ह्या धाग्यावर लिहायचं का त्या धाग्यावर; ह्याबद्दल त्यांची काही मतंही असू नयेत का ?
त्यांना ते फक्त दुसरीकडे हलवायचय; तर हलवू देत ना. लिखाण काही उडवलं जात नाहिये.
(माझ्या सम्जुतीनुसार "मनातले लहानमोठे प्रश्न" मध्ये तुमचं लिखाण टाकवं असं ते म्हणत आहेत.
"लिहूच नका" असं म्हणत नाहियेत. किम्वा शिविगाळ वगैरेही नाही. (जितकी झाली तितकी ह्यानं सरळपणानं मागेही घेतलिये.)
)
धन्यवाद
मन१,
धन्यवाद. या पोर्टलवरील चांगल्या गोष्टींना मी चांगलेच म्हटले आहे. उदाहरणार्थ येथे इतर पोर्टल्सपेक्षा थिल्लरपणा कमी आहे हे मी त्यांना सांगितलेच आहे.
भाराभर लिहिण्याबद्दल. मी भाराभर लिहितो, यांनी अनेकदा सांगूनही लिहितो. तरीही यांचे त्यावरून कमेंट करणे चालूच आहे. त्यांच्यापैकी एकाची कमेंट काढल्याचे तुम्ही लिहिले, म्हणुन कळले. परंतु सुरवंट या सदस्यांनी खडसावले, म्हणून तसे झाल्याचीच अधिक शक्यता आहे. एरवी ते मला दाद देत नाहीत असा अनुभव आहे. संपादकांनीच कधी सदस्याची टोपी घालून माझ्या कमेंटला राजकीय अजेंडा म्हणायचे, कधी जुन्या सदस्याची बाजू घेताना माझ्यसारख्या नवीन सदस्याची कानउघाडणी करायची किंवा इतर कमेंट्स करायच्या, तर कधी त्यांच्या असंबद्ध/हेटाळणीखोर कमेंटवरून मी काही म्हटले, तर मात्र मला ताकिद द्यायची हा प्रकार खरे तर गंमतीशीर आहे. ग्रो अप हा प्रकार होताना दिसतच नाही. (गंमत म्हणजे ते हेच मला उद्देशूनही म्हणतील).
तरी मी तुमचा सल्ला मानतो. यापुढे यांच्या कोणत्याही कमेंटला प्रत्युत्तर देणार नाही.
बाकी ते सांगत असले तरी मी माझ्या पोस्ट्स स्वत:हून अडगळीत टाकणार नाही. त्यांना टाकायच्या तर टाकू दे. तशा अडगळीत टाकण्याने किती जणांपर्यंत त्या पोहोचणार, त्या पोस्ट्स/त्यावरील कमेंट्स एडिट न करता येणे, नवीन पोस्ट टाकल्याचे न कळणे अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापेक्षा आता वाचनमात्र (हा शब्द फार आवडला) करण्याने दीडशेएक लोकांपर्यंत तरी त्या पोहोचताना दिसत आहेत. भलेही त्यांच्यापैकी कोणाला कमेंट करायची असेल ती करता येत नसली तरीही. मला तेवढेही पुरेसे आहे.
मनातले छोटे मोठे प्रश्न हे
मनातले छोटे मोठे प्रश्न हे सदर मी आवर्जून वाचतो. तेव्हा तिथे लिहिलेले तुमचे लिखाण "अडगळीत" गेल्यासारखे होणार नाही याची खात्री बाळगा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
राकु काका - तुमच्या लिखाणाचे
राकु काका - तुमच्या लिखाणाचे चालु द्या, पण तुम्ही दुसर्यांच्या धाग्यांवर अजिबात कॉमेंट देत नाही हे काही बरोबर नाही. त्या धाग्यांचे मुल्यवर्धन कसे होणार तुमचे विचारधन त्यात भरले नाही तर?
तुम्ही व इतारंनी मला सुधरू
तुम्ही व इतारंनी मला सुधरू (सुधारू नव्हे) दिलेत तर मी इतर काही वाचू शकेन की नाही?
की येथे माझ्या पोस्टवर ज्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जातात तशाच इतरांच्या पोस्टवर करायला सुरूवात करू? मग टॉपिक काय आणि कमेंट काय या संबद्धता असण्याचीही गरज नाही.
एक व्यावहारिक मुद्दा
राकु,
तुमचे भाषणस्वातन्त्र्य, ते अमर्याद असावे का नसावे इत्यादि गहन प्रश्नांमध्ये न उतरता तुमच्या अपेक्षित भाषणस्वातन्त्र्याची संस्थळाच्या आणि येथील अन्य लेखकांच्या दृष्टीने दिसणारी एक downside दाखविण्याचा प्रयत्न करतो.
क्षणभर असे माना की 'फुसके बार'सदृश धागे रोजच्या रोज निर्मिण्याचे अमर्याद स्वातन्त्र्य तुम्हास दिले आहे. आता तुम्ही रोज उठल्यावर वर्तमानपत्र/टीवी/फेबु/ट्विटर इत्यादि मार्गांनी तुमच्या मनात जे प्रश्न उद्भवतात अशा १०-१५ प्रश्नांवर प्रत्येकी १०-१५ ओळी लिहून फुसक्या बारांची एक कडी तुम्ही प्रकाशित केली. अशा प्रत्येक कडीवर प्रत्येकी १०-१५ प्रतिक्रिया आल्या. अशी कोणतीहि प्रतिक्रिया आली की ती कडी प्रतिसादांच्या मुख्य पानावर (http://www.aisiakshare.com/tracker येथे) शीर्षस्थानी जाऊन पोहोचेल. तुमचे असे २०-२५ फुसके बार जर play मध्ये असले तर हे मुख्य पान केवळ तुमच्या बारांनीच भरून जाईल. दुसर्या कोणी सदस्याने काही अन्य विषयावर काही लिहू म्हटले तर त्या बिचार्याचा धागा काही मिनिटे डोळ्यासमोर राहील. तुमच्या एखाद्या बारावर क्षुल्लक जरी प्रतिसाद आला की तो प्रतिसाद सर्वात वर जाऊन बसेल आणि बिचार्या दुसर्या लेखकाची जागा खाली जाईल. एक दोन तास असे झाले की तो बिचारा खाली ढकलला जात जात आतल्या पानावर जाऊन पडेल. तो कितीहि वाचनीय असला तरी त्याची टिमकी तुमच्या ढोलाच्या आवाजात हरवूनच जाईल.
अशा पद्धतीने तुमचे हे बार गणपति उत्सवातल्या मंडपातल्या गाण्यांसारखे होतील. कोणाला हवे असो वा नसो, तुमचे लाउडस्पीकरवर लावलेले गाणे आसपासच्या अर्धापाऊण किमी परिसरातील प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे, त्याचा स्वतःचा गाण्याचा आवाज तुम्ही दाबूनच टाकणार!
अशा प्रकारे तुम्हाला अमर्याद स्वातन्त्र्य म्हणजे इतरांच्या स्वातन्त्र्याचा आत्यंतिक संकोच हे तुम्हाला दिसते आहे काय?
म्हणूनच मी त्यांना
म्हणूनच मी त्यांना "राकुपीडिया डॉट ऑर्ग" असं नवीन संस्थळ काढा म्हणून सुचवलं होतं.
(राकुपीडिया डॉट ऑर्ग च्या सदस्यांना "राकुपीडित" म्हणण्यात येईल हा विनोद कोणी मारल्यास खबरदार!)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
<<तुमचे असे २०-२५ फुसके बार
<<तुमचे असे २०-२५ फुसके बार जर play मध्ये असले तर हे मुख्य पान केवळ तुमच्या बारांनीच भरून जाईल. दुसर्या कोणी सदस्याने काही अन्य विषयावर काही लिहू म्हटले तर त्या बिचार्याचा धागा काही मिनिटे डोळ्यासमोर राहील. >>
ऐसीवर फिल्टर आहेतच की,
कलादालन
कविता
चर्चाविषय
पाककृती
ललित
मौजमजा
वगैरे भरपुर आहेत.
मग राकूंचे धागे ज्यांना वाचायचे नाहीत ते फिल्टर लावून आवडीचे धागे वाचू शकतात. ते मुख्यपानावर असावेतच अस काही नाही.
राकूंचे फुसके बार स्वतंत्र धाग्यात असावेत. एकत्र केल्यास वाचण्यासाठी अडचण होते. संपादकांनी वाचकांची अडचण समजुन घ्यावी.
कोल्हटकरसाहेब, केवळ माझ्याच
कोल्हटकरसाहेब,
केवळ माझ्याच पोस्ट्सच दिसतात ही अतिशयोक्ती. फुसके बार दहा बारा ओळींचे नसतात. त्यातली एकेक बुलेट प्रसिद्ध करायला नको म्हणून ते एकत्र प्रसिद्ध केले जातात, तरीही तुम्हाला आक्षेप आहे. दुसरे लिहित नाहीत हा माझा दोष आहे का? केवळ डिस्प्लेमध्ये माझ्याच पोस्ट दिसतात हे काय कारण झाले काय? शुल्लक प्रतिसाद आला तर कोणाचीही पोस्ट वर दिसेल, माझीच दिसली तर त्याला मी काय करणार? शुल्लक प्रतिसाद देऊ नका असे सदस्यांना सांगू शकतो. दुस-या कोणाच्या पोस्टवर जरी शुल्लक प्रतिसाद आला तरी 'बिचा-या' माझी पोस्टही खाली ढकलली जाईलच की.
डिस्प्लेचाच प्रश्न असेल तर एका सदस्याची एकच पोस्ट दाखवायची आणि त्या निमित्ताने त्या पोस्टवर गेल्यावर तेथेच त्या सदस्याच्या इतर पोस्ट्स दाखवायच्या असेही करता येते. करायचे झाले तर ब-याच गोष्टी करता येतील. त्यामुळे तुमचे लाउडस्पिकरचे उदाहरण गैरलागू अाहे.
तसेही आता संपादकांनी फुसके बार वाचनमात्र केलेले आहेत. त्यामुळे कोणाला त्यावर कमेंट करता येणार नाही. त्यामुळे तुमचा जो आक्षेप आहे तो अाता रहायचे कारण नाही. वाचता तरी येतील असे ग्ृहित धरतो. मला तेवढेही पुरसे आहे. परंतु संपादक मला त्याबद्दल कितीवेळा ताकिद दिली हे मोजत आहेत. किती वेळा ताकिद देऊन झाल्यावर ते पुढे काय करतील, याची मला कल्पना नाही. मला पोस्ट टाकूच द्यायची नाही ही त्याची पुढची लॉजिकल पायरी दिसते. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सुटेल.
इथल्या अनेक गोष्टींबद्दल सूचना करू इच्छितो. ऐकून घ्यायची तयारी असेल तर. एकाच वेळी अनेकांच्या कमेंट्स अाल्या व त्यानंतर पोस्ट उघदली तर त्यातील कुटतल्या तरी एका कमेंटवर थेट जाता येते. पण इतरांच्या नवीन कमेंट्स शोधायला सगळे स्क्रोल करावे लागते. त्यापेक्षा फेसबुकची पद्धत सुटसुटीत आहे. तुम्ही प्रत्यक्ष ती कमेंट नोटिफिकेशनवर क्लिक करेपर्यत ती तुम्ही पाहिलेलेी नाही या स्वरूपात तुमच्या स्वरूपात राहते. तसे काही केले तर कमेंट्स/सबकमेंट्स पाहणे सोपे जाईल. ते करणे काही फार अवघड नाही.
असो.
वर म्हटल्याप्रमाणे कदाचित आपण थोड्याच काळाचे सोबती असू. मग फक्त तुमच्याच लाउडस्पिकरचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल.
फुसके बारच्य पोस्ट्स
फुसके बारच्य पोस्ट्स वाचनमात्र केल्याची कमेंट संपादक करत आहेत. त्यामुळे उगाचच माझ्या या पोस्ट्स वर येत आहेत. तेव्हा पोस्ट वाचनमात्र केल्यावर संपादकांनी तेवढीही कमेंट करू नये अशी विनंती. कोल्हटकर साहेबांची गैरसोय नको. शिवाय सदस्याला कोणाचे नावच समोर नको असेल (म्हणजे त्याच्या पोस्ट्स/कमेंट्स), तर तशी सोयही संपादकांनी करावी. ते करणे अवघड नाही हेदेखील साांगतो.
बाकी सुरवंट व त्याआधी थत्तेसाहेबांनी हे स्वतत्र सदर म्हणून ठेवण्याची शिफारस/विनंती केली होती. अर्थात ती मान्य होणे नाही हे कळते.
The devil is in the details.
हे सगळं नक्की कसं करायचं याची माहिती इथे दिलीत किंवा आंतरजालावरच्या योग्य पानाकडे निर्देश केलात तर सोय करता येईल. मला ड्रूपालबद्दल पुरेशी माहिती नाही; कंप्यूटर कोडिंग हा माझा प्रांतही नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मन,
प्रतिसाद आवडला. मलाही असेच काहीसे म्हणायचे होते.![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
.
पण अजोंना सल्ला दिला मग लोक म्हणायला लागले शुचिने अजोंना सॉर्ट ऑफ कॉर्नर केलं मग माफी मागावी लागली...... काय रे देवा?
.
तेव्हापासून मी सल्लेच देणं बंद केलय.
गल्ली चुकलीय का? माझीही
गल्ली चुकलीय का? माझीही चुकलीय.
मै क्या बोल रही हूं, आप क्या
मै क्या बोल रही हूं, आप क्या बोल रहे है.... कुछ ताळमेळही नही लग रहा![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
तुमच्या वरच्या प्रतिसादाच्या
तुमच्या वरच्या प्रतिसादाच्या विषयात "मन" हा शब्द वाचला, म्हणून तसे विचारले.
होय मनोबाला उद्देशुन आहे तो
होय मनोबाला उद्देशुन आहे तो प्रतिसाद. त्याने दिलेला सल्ला आवडला.
ok
ok