अरभाट आणि चिल्लर
"घ्या, आणखी पोहे घ्या" बाबुअण्णा म्हणाले.
"पुरे हो. दोनदा घेतले की बाबुअण्णा" मी पोह्याचा डिशमधले उरलेले सगळे पोहे चमच्याने गोळा करुन तोंडात टाकत म्हणालो. पोहे खरेच चविष्ट झाले होते. एकदम झणझणीत. नारळ आणि कोथिंबीर भरपूर घातलेले, तळलेले शेंगदाणे घातलेले, लिंबू पिळलेले दडपे पोहे. बाबूअण्णांच्या भाषेत आलेपाक. सोबत खारे दाणे. दडपे पोहे, खारे दाणे, मोडाची मटकी, चहा... बाबुअण्णांच्या आवडीचा नाश्ता. माझ्याही. धारवाडी पेढ्यांच्या डिशला तर अजून हातही लावलेला नव्हता.
"हूं. पोहे असे काय मोजून खायचे असतात होय? खाल्ल्यावर पोटात तासभर गोविंद गोविंद भजन व्हायला पाहिजे बघा. पोहे घ्या, मग चहा घेऊ कपभर कडकसा." बाबुअण्णा म्हणाले.
"आणि मग एकेक सिग्रेट बघा अण्णा. गोल्ड फ्लेक. जमलं बरं का. तुमचा कर्नाटकी पाहुणचार म्हणजे मुलगी बघायला आलेले वर्हाडी बारसं करुनच परत जाणार बघा. तेपण सगळेजण बाळंतिणीएवढीच वजनंबिजनं वाढवून. "
बाबुअण्णा हसले. "खायला पाहिजे हो माणसानं. चमचमीत खाण्याची आवड नसेल, रसिकपणानं बैठक मारुन एखादा देसकार नाहीतर मालकंस ऐकावा तसं चवीचवीनं खाता येत नसेल तर कसला माणूस म्हणायचा हो तो? तुमच्या पुण्याचं कसलं फुसकं खाणं म्हणायचं? दुपारी साधा भात आणि फोडणीचं वरण आणि रात्री फोडणीचा भात आणि साधं वरण.."
मी पण हसलो. बाबुअण्णांच्या 'तुमच्या पुण्याचं' या शब्दप्रयोगाकडे दुर्लक्ष करुन हसलो. एखादी गोष्ट आवडत नाही म्हटली की ती अगदी मुळापासून आवडत नाही - आवडून घ्यायचीच नाही- हे त्यांचे मत मला ठाऊक होते. जीन्स घालणार्या मध्यमवयीन स्त्रिया, चपातीच्या कडा काढून मधलाच भाग खाणारी माणसे, तोंडात तंबाखूचा गोळी धरुन ओठांची कुंची करुन बोलणारी माणसे, पिवळा टाय घालणारी माणसे, अमिताभला नट मानणारी माणसे... त्यांनीच कुठेतरी लिहिलेली यादी माझ्या चांगली ध्यानात होती. 'आय डोंट हेट इन प्ल्यूरल्स' म्हणणारा मला आवडणारा वुडहाऊस आणि वुडहाऊस अजिबात न आवडणारे ,' आय लिव्ह ऑन प्रिज्युडिसेस' म्हणणारे आणि तरीही मला अतिशय आवडणारे बाबुअण्णा - मी हसलो. "होय, ते खरं हो, पण तुमच्या आग्रहाला काय म्हणतात लोक, माहिती आहे अण्णा? तुम्हाला म्हणे कुणीतरी विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला आवडत नाहीत म्हणून. तर तुम्ही त्यांना म्हणालात की पोहे न खाणारी माणसे मला आवडत नाहीत. आता बोला. लोकांना काय निमित्तच पाहिजे असतंय हो..."
"हां, तो दळवी ना? विक्षिप्तपणा म्हणाला, बुवाबाजी म्हणाला... कायकाय लिहिलंय त्यानं. कुठं सगळं मनावर घेत बसता हो त्याचं? कुठं लोकांना काय सांगत बसायचं? आणि सांगून तरी काय फरक पडतो? गैरसमज करुन घेणारी माणसं तुम्ही काय वाट्टेल ते करा, गैरसमज करुन घेणारच बघा. मग कशाला आपण ती स्पष्टीकरणाची उसाभर करत बसायचं? आप्पा परचुर्यांनी मला लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी टीव्हीवर मुलाखत देता काय म्हणून विचारलं होतं. आता बोला! त्यातून हा दळवी. ठणठणपाळच तो. पुण्यात राहून मी लोकांना 'चुकवत', गुप्तपणे राहिलो असंही म्हणाला तो...."
"'भूमिगत' हा त्यांचा शब्द अण्णा. अजून म्हणजे तो तुमचा सेक्रेटरी देवदत्त जोशी, तुम्ही दळवींकडे मागितलेल्या कोणत्या तरी स्त्री लेखिकेविषयीची काही माहिती, तुम्ही दळवींना पाठवलेली कायदेशीर नोटीस... कायकाय लिहिलंय दळवींनी...हे सगळं वाचायला काही बरं वाटलं नाही अण्णा..."
"हे असलं सगळं खरुज-नायट्यासारखं तुमच्या पुण्यात येऊन मागं लागलं बघा. धारवाडात तुम्हाला सांगतो, कुणाला माहितीपण नव्ह्तं हो मी काय कथाबिथा लिहितो ते. कुणी उपटसुंभासारखं भेटायला म्हणून येणार नाही, कुठले सत्कार, चर्चासत्रं, कुठं फेटेच बांध, पगड्याच चढव... काही काही नाही बघा. तब्येतीनं साथ दिली असती तर कशाला कोण पुण्यात यायला बसलंय हो? आणि पत्रं असतातच की हो. काय तुम्हाला बोलायचं असेल, भांडायचं असेल ते पत्रातून करा की. त्याला अगदी प्रत्यक्ष कशाला भेटायला पाहिजे?"
"अण्णा, अशानं अजून गैरसमजच वाढले लोकांचे. अर्थात तुम्ही त्याला कधी किंमत दिली नाही म्हणा. पण ते साहित्य अकादमीचं..."
"कृपया त्या विषयावर बोलायला नको. आता किती वर्षं होऊन गेली त्याला..."
"अण्णा, तुम्हाला तो विषय किती त्रासदायक आहे हे माहिती आहे मला . एकदाच बोलतो, रागावू नका. तुम्ही दळवींनाही म्हणाला होतात, 'ते चिखलाने लिडबिडलेले काळे, केसाळ कुत्रे माझ्या दारात परत आणू नका' म्हणून. पण दळवींनी ते आणून घरभर चिखल केलाच. आणि तेही तुम्ही निघून गेल्यावर - तुमच्या माघारी.."
"माघारी काय आणि समोर काय हो- मी काही ते मनावर घेतलं नाही. हे बघा, मी काही ते पारितोषिक मागायला कुणाच्या दारात गेलो नव्हतो. माझं म्हणणं काय, तर तुम्हाला द्यायचंय ना ते पारितोषिक, मग ते नीट, जरा सन्मानानं द्या हो. असं कसंतरी भीक घातल्यासारखं, कुणाकुणाच्या वादांनी, प्रश्नचिन्हांनी कुरतडलेलें बक्षीस नको होतं हो मला. अहो, कॉलेजात असतानाही ऑफिसमध्ये जाऊन, रांगेत उभं राहून पगार घ्यायची पद्धत बंद करायला लावली होती मी आमच्या प्रिन्सिपॉल सरांना सांगून. मानधन असतंय हो ते. स्टाफ रुममध्ये, पाकिटात घालून जरा मानानं द्या ते प्राध्यापकांना असं म्हणालो मी. सरांनीही ऐकलं बघा त्या वेळी माझं. जरा मानानं, जरा आत्मसन्मानानं जगायला काय हरकत आहे हो माणसानं?"
" पटलं बघा अण्णा. अगदी शंभर टक्के पटलं. आणि सतत गर्दीत राहायचं, गप्पांचे कळपच जमवायचे, चर्चाच करायच्या, हे पण सगळं बिनबुडाचं आहे, हे पण पटलं. पण मला वाईट वाटलं ते दळवींनी तुमच्या साहित्य अकादमीच्या पैशांचा उल्लेख केला तेंव्हा. ते पाच हजार रुपये तुम्ही 'उडवून' टाकले होते आणि म्हणून तुम्हाला ते परत द्यायची वेळ आली तेंव्हा तुम्हाला फार वाईट वाटलं असे दळवी म्हणाले. एकदा सोडून दोनदा म्हणाले. तेही तुम्ही गेल्यावर. हे काही पटलं नाही अण्णा."
"म्हणूनच मी म्हणत असे, कुणाला काही स्पष्टीकरण देत बसू नये. ते पारितोषिक आणि त्याचे पैसे मी साहित्य अकादमीला परत केले, त्याची पावतीही अप्पा परचुर्यांनी त्यांच्या पुस्तकात छापली नंतर. त्यावर एकदाच 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये मी लिहून टाकलं. पण तरी बोलणारे बोलणारच हो..."
"इतक्या वर्षांनंतर हे सगळे उकिरडे उकरले गेले ते दळवींच्या पुनर्मुद्रित झालेल्या ते एका लेखानं. त्यानं सगळं हे पुन्हा उजेडात आलं बघा.."
"हां तो दळवीचा लेख. पण तुम्ही तरी जाऊ द्यायचं हो ते सगळं. तुम्ही कशाला दळवीच्या यड्डाला क्वड्ड लावत बसला? कशाला पाहिजेत तुमची स्पष्टीकरणं? "
"मी तसलं काही केलंही नसतं बाबुअण्णा. पण आता तुम्ही पलीकडे जाऊन पंचवीसेक वर्षं झाली. खुद्द तुमच्या धारवाडात तुमचं नाव विसरुन गेलेत लोक. पुण्याबिण्यात अजून तुमच्या नावाचे काही कार्यक्रम वगैरे होतात म्हणून लोकांच्या स्मरणात आहे तुमचं नाव. बाकी आम्ही आहोतच म्हणा. पण ज्यांनी कुणी दळवींचं हे लिखाण पहिल्यांदाच वाचलं असेल त्यांचा गैरसमज व्हायला नको म्हणून ते लिहून टाकलं मी.... "
"मग? झाले का गैरसमज कमी?" बाबुअण्णांनी मिष्किलपणे हसत सिगरेटचा एक झुरका घेतला. "तुम्ही अगदी साहित्य अकादमीशी संपर्क साधून खरोखर 'काजळमाया' चे पाच हजार रुपये मी परत दिले की नाही याची खात्रीबित्री, पुरावेबिरावे गोळा केले, पण झाले का लोकांचे गैरसमज कमी?"
"नाही, ते चुकलंच माझं जरा बाबुअण्णा. तुम्ही जसं गिड्ड्या लोकांना टाळून पुढे गेलात तसं मीपण करायला पाहिजे होतं. मी कशाला 'ना निन्न बिडलारे' म्हणून लिहितबिहीत बसलो कुणास ठाऊक. साहित्य अकादमीच्या वेबसाईटवर अजून काजळमायाचं नाव आहे. म्हणजे ते पारितोषिक तुमच्याच नावावर आहे. पण दळवी म्हणाले ते पैशाबद्दल हो. आणि शिवाय भलेभले पडले हो ह्यात यात, कारण नसताना... उदाहरणार्थ स्वतःला तंतोतंत क्रांतिकारक म्हणवणारे ते थोर लेखक - त्यांनी पत्रबित्र पाठवून 'साहित्य अकादमीकडे असे पारितोषिक 'परत' घेण्याची पद्धत नाही, हे पारितोषिक तुमच्याच नावावर आहे' असं कळवलं. आता बोला! याला काय म्हणायचं? स्वतःला असलं काही मिळालं नाही ही जळजळ म्हणायची की तुम्ही जाऊन इतकी वर्षं झाली तरी लोक तुमचं नाव काढतात आणि 'हिंदू' वरची चर्चा सहा महिन्यात थांबते ही पोटदुखी म्हणायची?"
"म्हणून म्हणत असतो, असलं काहीबाही करत बसू नये. सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजावून देत बसण्याइतकं आयुष्य मोठं नाही. आपल्याला पाहिजे ते करावं, निघून जावं. लोकांना बसू दे अर्थ काढत. माणसं काय, चुकुन एखादा अरभाट- बाकी सगळी चिल्लर. काय? अजून थोडा चहा घेता? सिगरेट एखादी?"
प्रतिक्रिया
आवडेश
कही संदर्भ लागले नाहीत(माझ्या मर्यादीत वाचनामुळे)..पण छान लिहीलंय...
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
रावसाहेब
रावसाहेब, आहात कुठं? पल्याड जाऊन संवाद करायचा आणि माघारी यायचं हे जमलेलं दिसतंय तुम्हाला. आता आपण भेटलं पाहिजे.
संवाद बाकी फर्मासपणे झाला आहे. अगदी त्या धारवाडी पोहे, तो कडक चहा आणि पोह्यांसोबत मधूनच तोंडात टाकायला तो रवाळ, मिठास पेढा यासारखा.
फर्मास आणि फक्कड लेखन झालं
फर्मास आणि फक्कड लेखन झालं आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
सहमत! छान मैफल!
अंतर-नाद
लेख सुरेख जमून आला आहे. 'मैफिली'ची आठवण झाली.
कावळ्यांच्या कलकलाटात हरवलेली कोकीळाची तान
तात्पर्य काय? तर - गिड्ड्या माणसांच्या जमान्यात उंच लोकांना मान खाली घालावीच लागते.
अगदी 'पुराव्यानं शाबीत' झालेली ऐतिहासिक सत्येही कावळ्यांच्या कलकलाटात हरवलेली कोकीळाची तान ठरतात.
पण त्यामुळे तुमच्या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही.
बाकी, गुरुनाथ आबाजी कुलकर्ण्यांबद्दल कोणी काहीही बोलले तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही.
त्यांची कोणतीही एकच कथा वाचली तरी आयुष्याचे सार्थक झाल्यागत वाटते.
अवांतरः
तुमचा मूळ लेख स्कॅन करून इथे चढवल्यास उत्तम.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संवाद आवडला. "बाबुअण्णा" या
संवाद आवडला. "बाबुअण्णा" या विषयावर इतकंही बोलायला तयार असणार नाहीत - अगदी 'तिकडे'ही - असं मात्र वाटलं. पण काय माहिती? माणसं बदलतात
***
अब्द शब्द
झकास!!
फार छान लिहिले आहे! पण ते एवढया मोकळेपणाने बोलले असते असे वाटत नाही.
>> खाल्ल्यावर पोटात तासभर गोविंद गोविंद भजन व्हायला पाहिजे बघा >>
>> तोंडात तंबाखूचा गोळी धरुन ओठांची कुंची करुन बोलणारी माणसे >>
इथे त्यान्ची शैली जाणवली.
"If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer."
धन्यवाद
दळवीञ्च्या कुठल्या पुनर्मुद्रित लेखाविषयी बोलले जात आहे ? उत्सुकता आहे. तेवढ्या एका गोष्टीचा सन्दर्भ लागला नाही. बाकी जी.एं.च्या आवडत्या/नावडत्या गोष्टीञ्ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
लेख
लेख आवडला.
१९७२ सालचं अकादेमी पारितोषिक, त्यावरचा तो शां शं रेगे यांचा लेख, जीएंच्या मृत्यूनंतर १९८८ च्या अंकात दळवींनी लिहिलेला तो अन्यायकारक लेख, या सार्या गोष्टींना मोठाच काळ उलटून गेलेला आहे. हे सारं (लेखात उल्लेख आलेल्या प्रमाणे) आता काही निव्वळ मोजक्या लोकांच्याच स्मृतीमधे शिल्लक आहे.
मात्र, इतक्या वर्षांनंतरही नव्या वाचकाचा गैरसमज होऊ नये म्हणून आवर्जून केलेले प्रयत्न कौतुकास्पद वाटतात. ज्या प्रथितयश लेखकाने त्यावर कुजकट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याने जीएंच्या कथांचा उल्लेख "मोठ्या लोकांचा चांदोबा" असा करून अनेक वर्षे उलटून गेलेली आहेत. प्रस्तुत लेखकाचं एकंदर व्यक्तिमत्त्वच वादग्रस्त असल्याने या अशा स्वरूपाच्या पिंकेबद्दल , किंवा संजोपरावांच्या लेखाला दिलेल्या कुजक्या उत्तराबद्दल आश्चर्य वाटत नाही.
असो. या निमित्ताने अनेक जुन्या स्मृती ढवळून निघाल्या खर्या. लेखाबद्दल पुन्हा एकदा आभार.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
जीए आणि साहित्य अकादमी पुरस्कार
असे आठवते की जीएंच्या एका पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशनदिवस विवक्षित काळाबाहेरचा असल्याने त्या वर्षाच्या पुरस्काराला ते पुस्तक पात्र नाही, हेतुत: प्रकाशनदिवस चुकीचा दाखवून पुरस्कार 'लाटला' आहे असे काहीसे आरोप झाल्याने व्यथित होऊन जीएंनी म.टा.मध्ये लिहून आपला पुरस्कार परत केला असे काहीसे घडले होते असे स्मरते आणि वरील लेखातहि त्याची सूचना आहे.
हे तपशील कोणास नीट आठवत असले तर त्यांची उजळणी वाचावयास आवडेल.
लेखाची भट्टी छान जमली आहे.
लेखाची भट्टी छान जमली आहे.
वगैरे वाक्यांनी लेखाला खुमार आलेला आहे.
त्यानिमित्ताने त्यावेळी ऐकलेल्या काही गोष्टी पुन्हा उजळल्या गेल्या, आणि माहितीत काही नवी भरही पडली.
संवाद वाचायला आवडतायत..पण
संवाद वाचायला आवडतायत..पण संदर्भ काहीच माहित नाहीत. असो..
पण आलेपाक न आवडणारा दुर्मिळ असणार हे नक्की...त्यामुळे बाबूअण्णांना बरीचशी माणसं आवडत असली पाहिजेत.
बेळगावात एकदा आलेपाक खायला मिळाला होता.तेव्हा असं कळलं की पोहे (दडपे पोहे असतात तसे पण वरनं फोडणी नाही, आलं-मिरची खलबत्त्यात ठेचून पातळ पोह्यात कालवलेली) आणि सोबत ऊसाचा रस असा आलेपाक असतो. आठवणीनेच पाणी सुटलं तोंडाला.
फर्मास
आधी मूळ लेख वाचला. आणि नंतर हा. फर्मास हा एकच शब्द लागू पडतो.
जिये तो ऐसे जीए!!!